Wednesday, March 7, 2012

(बालकथा) चौसष्ट घर तांदूळ

         एकदा बादशहा अकबर आणि बिरबल बुद्धिबळ खेळायला बसले. उगाच का खेळायचे म्हणून अकबरने पैज लावली. बिरबल जिंकला तर त्याला मोठे इनाम देण्याची  आणि  बादशहा जिंकला तर बिरबलाची गाढवावर बसवून आणि तोंडाला काळे फासून नगरीतून धिंड काढण्याची पैज होती ती! बिरबल तयार झाला.
     बादशहा अकबर आणि बिरबल कित्येक तास बुद्धिबळाचा डाव खेळत राहिले. शेवटी डाव बिरबलाने जिंकला. बादशहा पैजेनुसार म्हणाला," माग बिरबल! तुला काय मागायचे आहे ते माग."
     "हुजूर, आपण देऊ शकणार नाही." बिरबल गालातल्या गालात हसत म्हणाला. बिरबलाच्या या विधानावर बादशहा मनोमन चिढला.पण ते चेहर्‍यावर न दाखवता बादशहा म्हणाला," बिरबल, आम्ही मोगल आहोत. मोगल शब्दाचे पक्के असतात. तू आमची सल्तनत मागितली तरी देऊ. बोल, काय मागतोस?"
     "जहांपनाह, माफी असावी, पण मला थोडे तांदूळ मिळावे. त्यासाठी एक शर्त आहे. तांदूळ बुद्धिबळाच्या चौसष्ट घराच्या क्रमाने आणि पटीत मिळावे. हिशोब करून तांदूळ द्यावा. जसे की पहिल्या घरात एक नग तांदूळ.. दुसर्‍या घरात दोन, तिसर्‍या घरात चार, चौथ्या घरात आठ... असे."
     बादशहा अकबराची ही क्षुल्लक मागणी ऐकून पोट धरून हसू लागला. "ठीक आहे, दोन पोती तांदूळ तुझ्या घरी पोहचते केले जातील."
     " नाही जहांपनाह, मला तांदूळ हिशोबानेच हवेत. एकही दाणा कमी अथवा जास्त नकोय मला." बिरबल म्हणाला. अकबर बादशहाने कोठारप्रमुखाला बोलावणे पाठविले आणि बिरबलास पैजेनुसार तांदूळ मोजून देण्याचे आदेश दिले.
     कोठार प्रमुखाने हिशोब केला, तेव्हा त्याचे डोकेच हलले. तब्बल महिन्याभराने कोठार प्रमुख भीत-भीत बादशहासमोर उभा राहिला. त्याने तांदळाचा हिशोब सादर केला. हिशोब ऐकून बादशहासुद्धा चक्रावला.१८४ शंख, ४६ पद्म, ७४ नील, ४० खर्व, ५२ अब्ज, ७३ कोटी ८० लाख ५१ हजार ६१५ इतके तांदूळ. म्हणजेच ६५०५९१९३७०४१७ मण २ शेर ४ तोळे ८ माष ३ रती आणि १ तांदूळ.
     " बाप रे! ... हा हिशोब तर बरोबर अहे ना? " अकबराने वैतागून विचारले. कोठार प्रमुखाने आपल्या कपाळावर आलेला घाम पुसत सांगितलं," हो जहांपनाह! मला हिशोब करायला तब्बल महिना लागला. शिवाय मी अनेकदा  तपासलाय."

     "ठिक आहे, इतकं तांदूळ बिरबलाला  देऊन टाका. कोठार प्रमुखाला वेड लागण्याची पाळी आली. तो म्हणाला," बादशहा सलामत! पण इतकं धान्य उभ्या जगात पुढच्या वीस वर्षात मिळणार नाही."
     " मग मी दिलेला शब्द मोडणार की काय?" बादशहा चिडून म्हणाला. बिरबल तिथेच बाजूला उभा राहून सारा प्रकार पाहात होता. तो बादशहाजवळ येऊन हात जोडत म्हणाला," गुस्ताखी माफ असावी हुजूर! मी आता तांदूळ घेणार नाही. मला फक्त एवढचं सांगायचं होतं की एखादी छोटी वस्तूसुद्धा थोडी थोडी एकत्रित करत गेलो तर त्याचा संचय किती मोठे रूप धारण करतो."  अकबर म्हणाला,"   हे सगळे ठीक आहे, पण आम्हाला ताज्जुब वाटतं आहे ते याचं की हिशोब इतका मोठा कसा झाला?" " यात आश्चर्य करण्यासारखं काही नाही, जहांपनाह! एक म्हण आहे,' थेंबे थेंबे तळे साचे.' माणूस जर एक एक पै जमा करत गेला तर त्याच्याजवळ खजाना जमा होईल." बिरबलानं समजावलं तेव्हा अकबर बादशहा खूश झाला आणि आपला हिरेजडीत हार काढून बिरबलाच्या गळ्यात घातला व आनंदाने बिरबलाला मिठी मारली.      

No comments:

Post a Comment