Friday, February 22, 2013

ग्रामदेवतेचे वरदान

फार पूर्वी एका गावात दोन मित्र राहत होते. त्यांची नावं होती हरिबा आणि जोतिबा. दोघंही एकत्र लहनाचे मोठे होत होते. हरिबाची इच्छा होती खूप श्रीमंत बनण्याची, परंतु जोतिबाला लोकांची सेवा करायची होती. मोठा झाल्यावर हरिबा आपल्या वडिलांच्या कारभारात हातभार लावू लागला. जोतिबा मात्र लोकसेवा करायची असल्याने एखाद्या वैद्याकडे शिक्षण घेण्याची खटपट करत होता. परंतु, जोतिबा गरीब असल्याने त्याच्याकडे तेवढे पैसे नव्हते. तेव्हा हरिबाने आपल्या मित्राला मदत करत त्याला काही पैसे दिले. जोतिबाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर दिवाळीच्या दिवशी गावाबाहेर असलेल्या ग्राममंदिरात भेटण्याचं दोघांचं ठरलं.
वडिलांसोबत काम करता करता हरिबाच्या मनात धनलोभ वाढत चालला, तर इकडे जोतिबा वैद्यांच्या आश्रमात राहून आयुर्वेदिक उपचारपद्धतीचा मन लावून अभ्यास करू लागला. त्याच्यात एका चांगल्या वैद्याचे गुण उतरू लागले.
एका वर्षानंतर दोघंही एकमेकांना भेटायला निघाले. रात्र गडद होत चालली होती. हरिबा ग्रामदेवतेच्या मंदिरात जोतिबाची  प्रतीक्षा करत होता. त्याच मंदिरात एका कोप-यात एक भिकारी अंगावरच्या फाटक्या वस्त्रांनिशी तसाच कुडकुडत पडला होता. थंडीचा कडाका वाढत चालला होता. हरिबाने त्याला पाहिलं होतं, पण त्याच्या अवस्थेची त्याला काही दया येत नव्हती.
इतक्यात जोतिबा तिथे आला. त्याने भिकाऱ्याची अवस्था पाहिली. तो त्याच्याजवळ गेला. त्याने आपली शाल त्याला पांघरायला दिली. आपल्याजवळची शिदोरी त्याला खायला दिली, आणि इतक्यात एक चमत्कार घडला. तिथला भिकारी गायब झाला आणि त्याच्या जागी ग्रामदेवता प्रकट झाली. तिला पाहून दोघांनीही नमस्कार केला. ग्रामदेवता जोतिबाला म्हणाली, ‘तू फार दयाळू आहेस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे’.
तिच्या हातात दोन रोपटी होती. एक होतं आंब्याचं तर दुसरं होतं लिंबाचं. ग्रामदेवता म्हणाली, ‘ही दोन्ही रोपटी चमत्कारी आहेत. आंब्याच्या रोपटय़ाला जितकी पानं लागतील, तितकेच त्याला आंबे लगडतील. आणि हे रोप वर्षभर फळ देईल. िलबाच्या रोपटय़ाची पानं औषधांत मिसळल्यास औषधाची गुणाची मात्रा द्विगुणित होईल. जोतिबा, यापैकी तुला हवं ते रोपटं तू घेऊ शकतोस’.
जोतिबा म्हणाला, ‘देवा, तुम्ही मला लिंबाचंच रोपटं द्या. कारण याने वैद्याची गुणवत्ता वाढेल, त्याचा लाभ लोकांनाच होईल’.हे ऐकल्यावर हरिबा  मात्र मनोमन चांगलाच सुखावला. त्याने विचार केला, आंब्याचं रोपटं मोठं झाल्यावर मला आणखी धनवान करेल. मी देशातला सर्वात श्रीमंत व्यक्ती बनेन. त्यानं हळूच अंब्याचं रोपटं लंपास केलं.
काही काळ लोटला. रोपट्यांचे वृक्ष झाले. आंब्याला जितकी पानं, तितकीच फळं लागायची. िलबाच्या झाडाची पानं ज्या औषधात घातली जात, त्याच्या सेवनानं रुग्ण खडखडीत बरे होत. पण इकडे हरिबाचा धनाचा लोभ दिवसेंदिवस वाढत चालला. अधिक धन कसं मिळेल या काळजीने तो आजारी पडला. अनेक वैद्य झाले, पण त्याला कोणी आजारातून उठवू शकला नाही. मृत्युपंथाला लागलेल्या हरिबाला शेवटी आपल्या मित्राची-जोतिबाची आठवण झाली. आता तो संपूर्ण देशातला एक प्रसिद्ध वैद्य बनला होता.
आपल्या मित्रांची भयंकर अवस्था ऐकून जोतिबा हळहळला. तातडीनं तो हरिबाकडे आला. त्याच्यावर उपचार सुरू केले आणि त्याच्या प्रयत्नाने काही दिवसांतच हरिबा खडखडीत बरा झाला. आता त्याच्या लक्षात आलं की, संपत्तीच्या लोभापायी आपण आपल्या आरोग्याकडे लक्षच दिलं नाही. रोगी शरीर असेल तर या धनाचा उपयोग काय, याची त्याला जाण आली.आता हरिबादेखील जोतिबाप्रमाणे आपले जीवन लोककार्यात व्यतीत करू लागला. प्रसन्न राहू लागला.
prahaar,mumbai 22/2/2013

Wednesday, February 20, 2013

बालकथा: .... आणि मंगू शहाणा झाला

    एक मोठे  तलाव होते. त्यात छोटे- छोटे मासे, जळू, खेकडे आणि बेडूक राहत. याच तलावात अंगानं हिरवेगार असलेले  दोन मोठे बेडूकही  राहत. त्यांची नावे होती, चंगू आणि मंगू. तलावात तरंगायची तेव्हा शेवाळच तरंगतय, असं वाटायचं. पळायची तर अगदी सुर्रकन ! एका काठावरनं दुसर्या काठावर पोहोचली कधी कळायचंसुद्धा  नाही. त्यांच्या उड्या  खूप खूप लांब पडायच्या.
    तलावात सारे प्राणी  गुण्यागोविंदाने, हसत्-खेळत आणि मजेत राहतएखादा बगळा आला की, चंगू बेडूक आपले गोल-गोल डोळे चौफोर फिरवायचा आणि लगेच पाण्यात डुबकी मारायचा. सगळ्या माशांना सावध करत पळायचा. मग मासे तलावाच्या तळाशीच पोहतते वर यायचेच नाहीत. बगळा मात्र काठाला तासनतास ताटकळत उभा राहायचा. त्याला एकही मासा मिळायचा नाही. मग जळफळटत हात चोळत निघून जायचा. तो गेल्यावर चंगू सगळ्यांना शिकारी गेल्याची वर्दी   देत सर्रकन धावत सुटायचा. मग सगळे आनंदाने उड्या मारत, दंगा-मस्ती करत वर यायचे. खेळायचे, हुदडायचे.
    कोळी आला की, चंगू माशांना लपायला सांगायचा. मग मासे शेवाळ, वेली-झुडुपांमध्ये लपून राहत. अशा ठिकाणी कोळी जाळे फेकायचा नाही. फेकले तर जाळे अडकून फाटून- तुटून जायचेएकही मासा जाळ्यात आडकायचा नाही. जळूंमुळे  कोळी पाण्यात उतरायचे नाहीत. मंगूला मात्र असले काम आवडायचे नाही. त्याला वाटे,   का म्हणून  दुसर्याला धोक्याच्या सूचना देत फिरायचं
    "एकमेकाला मदत केली पाहिजे. आपल्यावरही संकट येईल तेव्हा तेही आपल्या मदतीला येतील", असे चंगू  त्याला समजावून सांगायचा. " मला कोण कशाला पकडेल? एक उडी घेतली की, दुसर्या टोकाला जातो, मग मला कोण पकडेल." असे म्हणत मंगू एक मोठी उडी घ्यायचा. त्याला चंगूचा सल्ला आवडायचा नाही.
    एकदा मंगू आजारी पडला. तो केवळ चिखलात पडून राहू लागला.  एक दिवस काही मुलं खेळत- खेळत तलावाच्या काठावर आली. त्यातला एकानं मंगूला पाहिलं. " तो पहा केवढा मोठा बेडूकचला, त्याला पकडू आणि शाळेत घेऊन जाऊ. त्याचे ऑपरेशन करू", मुलगा म्हणाला.
    मुलाचं बोलणं ऐकून तलावातल्या सार्या प्राण्यांना समजून चुकलं की आता मंगूचं काही खरं नाही. मंगूला त्यांच्या तावडीतून सोडवायचं कसं तेही त्यांना सुचेना. इतक्यात एक मासा उसळी घेऊन मंगूजवळ जाऊन पडला. मुलगा मंगूला प़कडण्यासाठी पाण्यात उतरला होता. पण त्याच्या हाताला  मासा लागला. माशाने मग आपल्या पाठीवरचा काटा त्याच्यात हातात घुसवला. मुलगा वेदनेने किंचाळलात्याने हात झ्टकल्यावर  मासा  पाण्यात पडला. चिखलात       बसलेला  जळू  मुलाच्या  पायाला जाऊन चिकटला. मोठ्या मुश्किलीने त्याने त्याच्यापासून सुटका करून घेतली. इतक्यात एक खेकडा त्याच्या पायाकडे सरकू लागला. मुलाने त्याला पाहिले आणि त्याने काठाचा दिशेने जोरात धूम ठोकली. पुन्हा कुणा मुलाचे तलावात उतरण्याचे धाडस झाले नाही.
भुरकट माशाच्या औषधाने मंगू बरा झाला. मंगूही दुसर्यांना मदत करू लागला. पण त्याला लवकरच त्याचा कंटाळा आलाहे काम त्याला बेकार वाटू लागले. तो चिखलात बसून डोळे मिचकावत पडून राहयचा किंवा पाण्यावर आरामात तरंगत राहायचा. तो चंगूला म्हणायचा, " तू फक्त दुसर्याचीच सेवा करत राहा. स्वतः चं काही पाहू नकोस." " आपण एकमेकांना मदत केली पाहिजे." चंगू म्हणायचा आणि मंगू एक मोठी उडी घेऊन दूरवर कोठे तरी निघून जायचा.
    एके दिवशी मंगू गवतावर डोळे मिटून बसला होता. दूरवर असलेल्या सापाने त्याला पहिले. सापाच्या तोंडाला पाणी सुटले. तो मंगूला धरायला सरपटत निघालातलावाच्या काठाला आलेल्या चंगूची नजर सापावर पडली. तो मंगूच्या दिशेने जात असल्याचे पाहिले. " बाप रे! आता मंगूची काही धडगत नाही. "   काही तरी विचार करून चंगूने पटकन उडी घेतली  आणि तो सापाजवळ गेला. दुसरी उडी घेतली ती सापाच्या पाठीवर!  पाठीवर बसलेल्या बेडकाला पकडण्यासाठी त्याने झडप घातली. पण त्यापूर्वीच चंगूने लांब उडी घेऊन तलावाचे किनार  गाठले. आता मंगूनेही सापाला पाहिले. त्याने पटकन तलावात उडी घेतली. आपण चंगूमुळे बचावलो, हे मंगूला कळून चुकले. त्याने चंगूचे आभार मानले. आता त्याने दुसर्याला मदत करण्याचे पक्के ठरवले. आणि तसा वागूही लागला. दुसर्याला मदत करायचा आता  त्याला कंटाळा येत नाही.                                                      

Tuesday, February 19, 2013

बालकथा : विचारातील शुद्धता

     चतुरसेन राजा आणि दामोदर नगरशेठ यांच्यात दाट मैत्री होती. तो रोज भेटायचे. दामोदर चंदनाच्या लाकडाचा व्यापारी होता. एकदा व्यापारात त्याला नुकसान झाले. नुकसान कसे भरून काढायचे याचा तो विचार करू लागला. एक दिवस त्याच्या डोक्यात विचार आला. 'जर का राजाच्या मृत्यू झाला; तर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारी चंदनाची लाकडे माझ्याकडूनच खरेदी करावी लागतील. मग यातून मला काही तरी लाभ होईल.'
     संध्याकाळी नेहमीसारखा दामोदरशेठ राजाच्या भेटीला गेला. त्याच्यासारखाच राजाच्यादेखील मनात विचार आला,' दामोदरने माझ्या मैत्रीचा लाभ उठवत बरीच माया गोळा केली आहे. आपण असा कुठला तरी कायदा बनवायला हवा, जेणेकरून त्याची सगळी संपत्ती सरकारी खजिन्यात जमा व्हावी.'
     दोघेही मित्र रोज भेटायचे, परंतु त्यात आता फारशी आपुलकी, जिव्हाळा  राहिला नव्हता. दोघेही एकमेकांच्या वाईटाचाच विचार करत असल्याने भेटीतला उत्साहदेखील संपला होता. एक दिवस दामोदरने राजाला विचारलेच," गड्या मित्रा, गेल्या काही दिवसांपासून पाहतोय, आपल्या नात्यात काही तरी कमी असल्यासारखे जाणवते आहे. असं तुलाही जाणवत का? "
     राजानेदेखील ही गोष्ट मान्य केली. " असं का जाणवतं आहे?" दामोदरनं राजाला विचारलं. राजा म्हणाला," नगराबाहेर एक साधू महात्मा आला आहे. चल, त्यालाच विचारू!"
     दोघेही त्याच्याकडे गेले. साधू म्हणाला," तुम्ही दोघेही पहिल्यासारखे रोज भेटता, हे खरे असले तरी दोघांच्याही मनात एकमेकांविषयी द्वेषभावना निर्माण झाली आहे. यामुळेच दोघांमध्ये पहिल्यासारखी पवित्र मैत्री राहिलेली नाही."
साधूला त्यांनी आपापल्या मनातल्या भावना सांगितल्या. तो दामोदरशेठला म्हणाला," तू राजाच्या मृत्यूऐवजी राजा लाकडाचा महाल बांधणार आहे आणि त्यामुळे तुझा व्यापार होईल, असा का तू विचार केला नाहीस?    विचारशुद्धतेमुळे गोडी राहते. तू राजाविषयी वाईट विचार केलास, चुकीची भावना बाळगलीस, त्यामुळे राजाच्या मनातदेखील वाईट विचार आले. चुकीच्या विचाराने दोघांच्या संबंधांमध्ये दरी निर्माण झाली. आता दोघीही सच्चा मनाने प्रायश्चित घ्या म्हणजे मैत्रीचे सुख पुन्हा अनुभवता येईल."
     दोघांनीही साधूला प्रणाम केला आणि माघारी परतले. त्यानंतर दोघांच्या मैत्रीत कधी अंतर आले नाही.

Friday, February 15, 2013

'जंगल एक्सप्रेस'. बालकथासंग्रह

माझे दुसरे पुस्तक 'जंगल एक्सप्रेस'. बालकथासंग्रह याचे हे मुखपृष्ठ.

बालकथा: सोन्याच्या मोहरांची थैली

     एक गाव होतं. त्या गावात रमाकांत नावाचा एक गरीब माणूस राहत होता. रोजच्या गरजा भागवण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नसल्यानं, तो सतत काळजीत असायचा. एक दिवस जंगलात तो इकडे-तिकडे भटकत असताना त्याला परिराणी भेटली. म्हणाली, ‘रमाकांत, मला माहितेय, तू मोठ्या काळजीत आहेस. मी तुला मदत करू इच्छिते. मी तुला सहा वस्तूंची नावं सांगेन. त्यातल्या कुठल्याही एका वस्तूची निवड तुला करावी लागेल. ती नावं ऐक, बुद्धी, बळ, आरोग्य, सौंदर्य, दीर्घायुष्य आणि धनदौलत. यापैकी तुला काय हवंय ते मला सांग’.
रमाकांतला तर आनंदाच्या उकळ्या फुटल्या. आता आपलं दैन्य सरणार या कल्पनेनंचं त्याचं मन हवेत तरंगायला लागलं. मागचा-पुढचा काहीच विचार न करता तो म्हणाला, ‘या जगात पैशापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. तू मला धनदौलत देऊन टाक’.
     त्याचा आततायीपणा पाहून ती हसली, म्हणाली, ‘रमाकांत तुझी निवड यथोचित नाही. पुन्हा विचार कर’. परंतु, रमाकांतला तर पैशाशिवाय काहीच नको होतं. कारण पैशाच्या जोरावर काहीही मिळवता येऊ शकत होतं,अशी त्याची पक्की धारणा झाली होती. परिराणीने त्याला एक अद्भुत थैली दिली. त्यात दहा सोन्याच्या मोहरा होत्या. त्या थैलीचं वैशिष्ट्य असं की, त्यातून कितीही वेळा मोहरा काढल्या तरी त्यांची संख्या दहापेक्षा कधीच कमी होणार नव्हती. थैली देऊन परिराणी अदृश्य झाली.
     मोहरांची थैली मिळाल्यानं रमाकांत अक्षरश: आनंदानं नाचायला लागला. आता तो खूप श्रीमंत झाला होता. तो आनंद साजरा करत असतानाच तिथे आणखी दोन प-या अवतरल्या. त्यांना पाहून तो एका झाडामागे लपला आणि हळूच तिथून सटकला. कारण आता त्याला कशाचीच गरज वाटत नव्हती. तो घरी निघून आला.
     तिकडे जंगलात अवतरलेल्या प-यांमधील एक सुष्ट आणि एक दृष्ट परी होती. त्या जंगलात त्यांच्या गुणावगुणांनी भरलेल्या फळ-झाडांचं रोपण करायला आल्या होत्या. दुष्ट परीनं एक बियाणं टोचताच तिथे रसदार फळांनी लगडलेला एक वृक्ष अवतरला. फळं मोठी मोठी आणि मधुर होती. सुष्ट परीनं टोचलेल्या वृक्षाला मात्र छोटी छोटी फळं लागली. हे पाहून दुष्ट परी सुष्ट परीची टर उडवत हसत सुटली. सुष्ट परी म्हणाली, ‘ठीक आहे, तुझ्या मार्गाने चाललेल्यांना प्रारंभी लाभ होतो पण, शेवटी विजय चांगल्याचाच होतो. आपण आपापले काम करत राहू. पाहू, कोण जिंकतं ते? ’ असं म्हणत दोघी वेगवेगळ्या दिशांना निघून गेल्या.
     इकडे भरपूर पैसे हातात आल्यानं संपूर्ण देश फिरून येण्याचं रमाकांतने ठरवलं. सोनेरी मोहरांच्या थैलीच्या जिवावर रमाकांतचा प्रवास अगदी मजेत चालला होता. तो जिथे जिथे जाई, तिथे तिथे त्याचं स्वागत मोठय़ा आदबीने आणि दिमाखात होई. एकदा फिरत फिरत रमाकांत एका नगरात पोहोचला. तिथल्या राजाला भेटायला गेला. राजाला त्याने अमूल्य अशा वस्तू नजराणा म्हणून दिल्या. राजाने अतिथी म्हणून त्याला राजवाडय़ात राहण्याची परवानगी दिली. राजाला एक कन्या होती. ती खूपच धूर्त अणि लबाड होती. तिला गुप्तहेरांकडून कळाले होते की, या आलेल्या पाहुण्याकडे जादूची थैली आहे. राजकन्येला ती थैली मिळवण्याचा मोह आवरता आला नाही. तिने रमाकांतशी प्रेमाचं नाटकं सुरू केलं. रमाकांत तिच्या वागण्याला भुलला. राजकन्येचं रमाकांतवर प्रेम बसलं आहे ही गोष्ट राजाच्या कानी गेली. त्याला रमाकांत चांगला माणूस वाटला. राजाने राजकन्येचं लग्न धूमधडाक्यात रमाकांतशी लावून दिलं.
लग्नानंतर काही दिवस राजकन्या त्याच्याशी अतिशय प्रेमानं वागली. रमाकांतशी प्रेमानं वागून, गोड बोलून तिनं ती थैली मिळवली. त्यानंतर राजाला रमाकांतबद्दल खोटंनाटं सांगून तिनं रमाकांतला राजवाडय़ातून हाकलून लावलं. पुन्हा कफल्लक झालेला रमाकांत जंगलात भटकू लागला.
      भटकता भटकता तो एका झाडापाशी आला. ते एक सुंदर फळांचं झाड होतं. त्याला रसरशीत सुंदर गोड-मधुर फळं लगडलेली होती. त्याला भयंकर भूक लागली होती. त्यानं धावत जाऊन त्यातलं एक फळ तोडलं आणि खाऊ लागला. आणि काय आश्चर्य! त्याच्या डोक्यावर काळीकुट्ट शिंगे उगवली. तो अतिशय विद्रूप दिसू लागला. ते फळ दुष्ट परीने लावलेल्या झाडाचे होते. रमाकांतला पाहून ती जोरजोरानं हसू लागली.
     सुष्ट परीदेखील तिथेच होती. तिला रमाकांतची अवस्था सहन झाली नाही. तिने लावलेल्या झाडाचं फळ तोडून त्याला खायला देत ता म्हणाली, ‘घाबरु नकोस. हे फळ खा, सगळं ठीक होईल’. त्यानं ते छोटंसं फळ खाल्लं. दुस-याच क्षणी त्याच्या डोक्यावरची शिंग गायब झाली. त्यानंतर दोन्ही प-यांना विचारून रमाकांतने जंगलातल्या चांगल्या आणि वाईट झाडांवर फुल्ल्या केल्या. मग काही तरी विचार करून त्यानं दुष्ट परीच्या झाडावरची फळं तोडली आणि ती घेऊन राजकन्येला भेटायला गेला. तो तिला फळे देत म्हणाला, ‘तु माझ्याशी कसंही वागली असलीस तरी माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे. म्हणून हे जादूचं फळं मी तुझ्यासाठी आणलं आहे’.
     राज्यकन्येनं फळ घेतलं. फळं खाल्ल्यावर राजकन्येच्या डोक्यावर दोन शिंग उगवली. तोपर्यंत रमाकांत अद्भुत थैली घेऊन महालाबाहेर आला होता. पुन्हा जंगलाच्या वाटेनं घराकडे जात असताना त्याला परिराणी भेटली आणि राजकन्येशी वाईट वागल्याबद्दल तिने त्याच्या हातातली अद्भुत थैली काढून नेली. रमाकांतला आपली चूक उमगली. आपण पैशापेक्षा बुद्धी मागितली असती तर तिच्या बळावर आपण श्रीमंत झालो असतो. ती संपत्ती आपल्याला आयुष्यभर पुरली असती आणि राजकन्येसारखं कोणाशीही वाईट वागण्याची वेळ आपल्यावर आली नसती असं त्याला वाटलं. आपण केलेली चूक सुधारण्यासाठी रमाकांतने चांगल्या झाडाची फळं तोडली व वैद्याचा वेश धारण करून पुन्हा राजमहालात आला. राजकन्येने रडून रडून मोठा गोंधळ घातला होता. वैद्याचे रूप घेतलेल्या रमाकांतने तिला आपल्याजवळचे फळ खायला दिले. राजकन्येने फळ खाल्ल्यावर लगेच तिच्या डोक्यावरची शिंगे गायब झाली. सगळे ठिकठाक झाल्यावर रमाकांतने आपले खरे रुप प्रकट केले. राजकन्येला माफ केले. राजकन्येलाही आपली चूक उमगली. तिनं रमाकांतची माफी मागितली. त्यानंतर ते दोघेही सुखानं संसार करू लागले.