Thursday, September 10, 2015

धोक्याची घंटा

     ब्रिटनमधला हा सर्व्हे आपल्या सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. आपल्या देशात ज्या शिक्षणाचं मॉडेल स्वीकारलं जात आहे, त्याच्याबाबतीत खरोखरच पुनर्विचार व्हायला हवा. मुलांना आपल्या आजूबाजूच्या जगाची माहिती जाणून-समजून घेण्याची आवड निर्माण व्हायला हवी आपण ज्या पाश्‍चात्य देशांचे अनुकरण करायला निघालो आहोत, त्या देशांच्या मुलांचे ज्ञान ऐकल्या-वाचल्यानंतर गड्या आपला देशच बरा, असे क्षणभर वाटल्यावाचून राहत नाही. इंग्लंडमध्ये अलीकडेच एक सर्व्हे झाला. या सर्व्हेमध्ये मुलांना रोजच्या खाण्यात असणार्‍या फळांविषयी काही प्रश्‍न विचारण्यात आले. त्या प्रश्‍नांची त्यांनी दिलेली उत्तरे थक्क करणारी तर आहेतच. शिवाय त्या प्रगत म्हणवणार्‍या देशाची कीव करावी अशी वाटणारी आहे. स्ट्रॉबेरी फ्रिजमधून मिळते तर चॉकलेटस् झाडावर लगडतात अशी तिथल्या मुलांचे उत्तरे आहेत. इंग्लंडमधल्या मुलांना बहुतांश फळे ही झाडांवर नव्हे तर कारखान्यात तयार होतात, असे वाटते. यावरून त्यांचे परिसरातील ज्ञान किती सखोल (?) आहे याचा अंदाज येतो.
       प्रसिद्ध मफिन फर्मच्या ‘द फेबुलस बेकर्स’ने सहा ते दहा वयोगटातील मुलांचा सर्व्हे केला त्यात ही बाब उघड झाला आहे. सर्व्हेनुसार प्रत्येक दहापैकी एका मुलाला सफरचंद झाडावर लागत नाही असे वाटते. चारपैकी एका मुलाचा स्ट्रॉबेरी जमिनीखाली उगवते, असा समज आहे. मध गायीपासून मिळते, हे सांगणार्‍या या मुलांना केळी कुठे लगडतात याची माहितीच नाही. द्राक्षे वेलींवर नव्हे झाडावर लगडतात. हे दहापैकी एका मुलाचं उत्तर आहे. मुलांचा सगळ्यात अधिक संभ्रम दिसतो तो टरबुजाविषयी! पाण्यानं भरलेलं हे फळ जमिनीखाली, झाडावर आणि झुडुपांमध्ये लागतं, अशी इंग्लंडमधील मुलं सांगतात. सर्व्हे वाचल्यावर आपल्याला हसू येणं स्वाभाविक आहे. पण क्षणभर. अधिक विचार केल्यावर मात्र डोक्याचं दही व्हायला होतं. आपण कुठल्या प्रकारचं शिक्षण देत आहोत, असा प्रश्‍न पडतो. फळं कारखान्यात नाहीत तर झाडांवर लागतात. या साध्या गोष्टी माहीत नसाव्यात हे आश्‍चर्यकारकच आहे. ही तर्‍हा फक्त इंग्लंडमधील शिक्षणाची नाही तर आपल्या देशातल्या शिक्षणाची देखील हीच तर्‍हा आहे. मुलांना ग्लोबल बनवायच्या धुंदीत आपण त्यांना आसपासच्या गोष्टींपासून दूर नेत आहोत. ज्या प्रकारचं कथित कान्व्हेंटी शिक्षणाचं प्रचलन हिंदुस्थानात वाढत चाललं आहे. त्यामुळे आसपासची दुनिया जाणून समजून घेण्याच्या त्यांच्या संधीवर आपण कुर्‍हाड मारत आहोत. मुलगा सकाळी उठतो. बसने किंवा कारने शाळेला जातो. तिथे पाठ्यक्रमाशी झटत राहतो. घरी आल्यावर गृहपाठाच्या दबावाखाली वावरतो आणि उरलेला वेळ कॉम्प्युटर किंवा टीव्हीपुढे बसून घालवतो. शिक्षण पूर्ण करताना कुठली तरी एखादी डिग्री किंवा पुढे जास्तीत जास्त कुठलं तरी एखादं पॅकेज अशा बंदिस्त वातावरणात त्यानं जग समजून घेण्याचा प्रश्‍नच येत नाही. मुलांनादेखील त्याची आवश्यकता वाटत नाही. आई-वडिलांना त्यांची मुलं अमेरिकेतल्या राज्यांची नावं जाणतात, याचाच काय आनंद वाटतो. जगातला सर्वात मोठा धबधबा कोठे, मायकल जॅक्सनच्या जीवनात काय घडलं, असले ज्ञान त्याच्या डोक्यात भरवले जाते. मुलांच्या मनात जे ग्लोबल ज्ञान कोंबलं जात आहे, त्यानुसारच त्यांची स्वप्नाची दुनिया ग्लोबल होत चालली आहे. हे शिक्षण व्यवस्थेचे दुष्परिणामच म्हणावे लागतील. जस-जसा मुलगा उच्च शिक्षणाची पायरी चढायला लागतो, तस-तसा त्याला आपल्या देशाचा वीट यायला लागतो. आपल्या देशात त्याला उणिवा दिसायला लागतात आणि देशाबद्दल कमीपणा वाटायला लागतो. आपल्या देशातल्या सगळ्यात गोष्टींची त्याला दुर्गंधी यायला लागते. मग शेवटी त्याचं विमान अमेरिका, कॅनडा आदी देशाच्या दिशेनं टेक-अप घ्यायला लागतं. जे पेरलं आहे, तेच शेवटी उगवणार.
      ब्रिटनमधला हा सर्व्हे आपल्या सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. आपल्या देशात ज्या शिक्षणाचं मॉडेल स्वीकारलं जात आहे, त्याच्याबाबतीत खरोखरच पुनर्विचार व्हायला हवा. मुलांना आपल्या आजूबाजूच्या जगाची माहिती जाणून-समजून घेण्याची आवड निर्माण व्हायला हवी असं शिक्षण मिळायला हवं. मोबाईल फोनमुळे माणसांमधील अंतर वाढत चाललं आहे. तसं शिक्षण पद्धतीमुळे सभोवतालचा परिसर दूर होत चालला आहे. हे सगळं थांबवायचं असेल तर पहिल्यांदा परिसराचं ज्ञान आवश्यक आहे. चार भिंतीच्याबाहेर मुलाना काढायला हवं. आई-वडिलांनीदेखील कामातून थोडा वेळ काढून मुलांना शेत-शिवरात न्यावं. नद्या, तलावात, विहिरीत मनसोक्त डुंबायला लावावं. त्याची निसर्गाशी मैत्री घट्ट करावी. त्याचं मातीशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं की भारतमातेलाच काय, पण जैविक मातेलादेखील तो अंतर देणार नाही. - See more at: http://www.saamana.com/utsav/6/9/2015

Friday, September 4, 2015

विद्यार्थी-शिक्षकांमधला नातेसंबंध


     पूर्वीच्या आणि आजच्या गुरु-शिष्यामधील नातेसंबंधांमध्ये फार मोठा बदल झाला आहे. पूर्वीच्या गुरुकूल पद्धतीमध्ये राजा आणि प्रजा यांची मुले एकत्रितपणे गुरुच्या आश्रमात राहून शिकत होती. गुरुच्या सानिध्यात राहिल्यामुळे शिष्यांचे आचार-विचार, वर्तन आणि आहारदेखील समानतेने होत असे. पुढे हळूहळू गुरुकुलाची जागा शाळांनी घेतली. आपोआपच शिष्याचे रुपांतर विद्यार्थी आणि गुरुचे रुपांतर सर, मॅडममध्ये झाले. आजचे विद्यार्थी आता काही तासच शिक्षकाच्या सान्निध्यात असतात. त्यामुळे त्याच्या आचार-विचारात आहारात भिन्नता दिसू लागली.
     एकवीसाव्या शतकात वावरत असताना ज्ञानाचा ज्या प्रकारे विस्फोट होत आहे, त्याचा परिणाम निश्‍चितपणे विद्यार्थी- शिक्षकाच्या नातेसंबंधावर झाला आहे, होत आहेत. एकलव्यासारखा आपल्या शरीराचा भाग तोडून गुरुला देणारा शिष्य आजच्या घडीला कुणालाच मान्य होणार नाही. खुद्द शिक्षकालादेखील नाही. पूर्वीच्या गुरुजींप्रमाणे विद्यार्थ्यांना अधिक वेळ देऊन ज्ञानार्जनाबरोबरच त्यांच्यावर अधिक योग्य संस्कार करुन एक सुजाण व संवेदनशील नागरिक बनेल, असा विचार करणारे शिक्षकही फार थोडे मिळतील. आज समाजामध्ये शिक्षकांच्या प्रतिमेची उंची मोजली जाते, तीच मुळी त्याच्या गुणवत्ता यादीत येणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येवरुन आणि निकालाच्या टक्केवारीवरुन. मात्र संवेदनशील व सुजाण नागरिक मिळवून देणार्‍या शिक्षकाचा विचारच केला जात नाही.
     आजचा विद्यार्थी व्यवहारी बनत चालला आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या नातेसंबंधांमध्ये आता पालकाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. अर्थार्जनासाठी घराबाहेर पडणारे नोकरदार दाम्पत्य -पालक पाल्याची संवेदनशीलता हळूहळू कमी करत आहेत. ते पाल्याशी जशी व्यवहारी भूमिका ठेवतात, तशीच भूमिका तो शिक्षक आणि समाजाशी ठेवताना दिसतो.
     गुरु शिष्याच्या नातेसंबंधात बदल व्हायला आणखी एक कारण आहे, ते म्हणजे  वर्गातील विद्यार्थी संख्या. विद्यार्थ्यांच्या गर्दीमुळे शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थ्याकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शंका त्याच्याजवळच राहातात. खासगी शिकवण्यांमुळे तर संवेदनशीलता आणखी बोथट झाली आहे. पैसे देऊन शिक्षण घेण्यामुळे शिक्षकाच्या प्रतिमेला किंमत उरली नाही.
     पाठ्यपुस्तकामध्ये असणारे त्रोटक आणि कालबाह्य ज्ञान. हेदेखील गुरु-शिष्याच्या नातेसंबंधाच्या बदलला कारणीभूत आहे. आज मध्यमवर्गीय घरांमध्ये संगणक आला आहे, स्मार्टफोन अवतरला आहे. यातून विद्यार्थ्याला घरबसल्या ज्ञान मिळत आहे. शाळेत मात्र शिक्षक कालबाह्य शिक्षणाचं रतीब घालतो आहे. त्यामुळे शाळेतलं शिक्षण निरुत्साही होत आहे. प्रचलीत शिक्षणपद्धतीमुळे विद्यार्थी आणि पालकांना कमी वेळेत, कमी श्रमात अधिक गुण मिळवून देणारं परीक्षा तंत्र हवं आहे. हे तंत्र वापरुन अध्यापन करणारा शिक्षक विध्यार्थ्यांना आणि पालकांना हवा आहे. विध्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाचे धडे देणारे, समाजमूल्यांची रुजवण करणारे शिक्षक अप्रिय वाटत आहेत.
     शिक्षक-विध्यार्थ्यांमधले नातेसंबंध दृढ करायचे असेल तर पहिल्यांदा शिक्षणपद्धती बदलली पाहिजे. परीक्षा तंत्राला दुय्यम स्थान असायला हवे. पाठ्यपुस्तके त्रोटक असू नयेत. नव्या तंत्रासह , ज्ञानासह विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. नवी साधने शाळांमध्ये अवतरली पाहिजे. शिक्षकांनी आपल्या अध्यापन विषयांबद्दलचे ज्ञान अद्ययावत ठेवले पाहिजे. त्याचबरोबर इतर विषयांचे ज्ञानदेखील आत्मसात केले पाहिजे.वेळेच्या चौकटी मोडून  विद्यार्थ्यांशी ज्ञानार्जन, हितगुज करणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांतील गुण हेरुन, त्याचा कल पाहून त्याप्रमाणे त्याला मार्गदर्शन देण्याच्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत.तरच विद्यार्थी-शिक्षकांमधील अपेक्षित नातेसंबंध पाहायला मिळेल.