Sunday, October 30, 2016

पोलिसिंगमध्ये लोकसहभाग वाढायला हवा


     कायद्याच्या धाकाबरोबरच पोलिसिंगमध्ये सामाजिक जाणीव महत्त्वाची आहे.त्यासाठी पोलिसिंगमध्ये लोकांचा सहभाग वाढवून पोलिस आणि समाज यांच्यातील परस्पर संबंधातील भक्कम वीण तयार करण्याची आवश्यकता आहे. महिला सुरक्षितता, अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन आणि गुन्हेगारांचे मतपरिवर्तन यावर अधिक जोर देताना यातून पोलिसांविषयी विश्वास निर्माण करण्याचा हेतूही सफल व्हायला हवा.
     अलिकडच्या काळात पोलिसांविषयी समजात अथवा लोकांमध्ये चांगले मत नाही.त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.पोलिसांवर झालेले अलिकडील हल्ले याचेच द्योतक आहे. पोलिसांवर भरवसा राहिला नाहीच शिवाय त्यांचा धाकही कमी झाला आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था पार बिघडून गेली आहे. महिला असुरक्षित झाल्या आहेत. अवैध धंदे फोफावले आहेत. गुन्हेगारी माजली आहे आणि पोलिसांत हफ्तेगिरीही बोकाळली आहे. त्यामुळे सगळीच यंत्रणा, व्यवस्था बिघडून गेली आहे. पोलिस खात्यात याबाबत अधिक मंथन होण्याची गरज असून त्यांच्या पुढाकाराने समाजाला विश्वासात घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
     गावागावात, शहरा-शहरांमध्ये मुली, महिलांच्या छेडछाडीची प्रकरणे वाढली आहेत.त्यांच्यावरील अतिप्रसंग, विनयभंग, मानसिक त्रास अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे.सडकसख्याहरींचा त्रास हाही मोठा प्रश्न निर्माण होत आहे. हुंडाबळीच्या घटनाही काही कमी झाल्या नाहीत. महिलांच्या कौटुंबिक छळांची प्रकरणे प्रत्येक पोलिस ठाण्याकडे येतच आहेत. यासाठी गावांगावांमध्ये महिला सुरक्षा समित्या स्थापन करण्याची व त्या सक्षम करण्याची आवश्यकता आहे. महिलांविषयी वाईट भावना ठेवणार्या, विकृत मानसिकता असणार्या लोकांचे गुन्हेगारांप्रमाणेच रेकॉर्ड ठेवून त्यांच्यावर नजर ठेवण्याची गरज आहे.यामुळे कारवाई करणे सोपे जाणार आहे.
     जनतेच्या सहकार्याशिवाय सक्षम पोलिसिंग निर्माण होत नाही.माहितीच्या देवाण-घेवाणीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग महत्त्वाचा असतो. पोलिस व जनता मिळूनच समाजकंटकांचा बंदोबस्त करणे शक्य होणार आहे. त्यामुळे गाव व वॉर्ड पातळीवर पोलिस मित्र समिती स्थापन करण्याची आवश्यकता आहे. अनेक जिल्ह्यात अशा समित्या अस्तित्वात आहेत, मात्र त्या आणखी सक्षम करण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.विविध उपक्रमांच्या माध्यमातून पोलिसांवरचा सहयोग वाढला पाहिजे. सक्षम व योग्य पद्धतीने काम करणार्या पोलिस मित्रांना ओळखपत्र दिल्यास त्याच्या कार्यात आणखी उत्साह येईल.
     काँग्रेस आघाडीची सत्ता महाराष्ट्रात होती, तेव्हा डान्सबार, मटका हद्दपार झाला होता. अवैध प्रवासी वाहतूकीलाही काही प्रमाणात आळा बसला होता. पण नव्या सरकारबरोबरच पुन्हा अवैध धंद्यांना ऊत आला आहे. या अवैध धंद्यांमुळे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. तरुणपिढी बरबाद होत आहे.गुन्हेगारी बोकाळत चालली आहे.पिस्तूलासह अन्य धारदार हत्यारे सहजरित्या उपलब्ध होत आहेत. त्याच्या जिवावर गुंडगिरी माजली आहे.हफ्तावसुली, अवैध सावकारकी यात वाढ झाली आहे. दारू व मटक्याला समाजातून हद्दपार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्या-तालुक्यात विशेष मोहिम राबवण्याची गरज आहे.यात पोलिस अधिकार्यांवरही कारवाई होण्याची आवश्यकता आहे. ज्यांच्या हद्दीत अवैधधंदे सापडतील, अशा अधिकार्यांच्याबाबतीत हयगय करून चालणार नाही. याकामी महिला समित्या, पोलिस मित्र यांची साथ मोलाची ठरणार आहे.
     अलिकडे वाळू माफियांनी धुमाकूळ घातला आहे. कारवाई करण्यास जाणार्या पोलिस, महसूल विभागाच्या कर्मचार्यांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. तहसीलदारही यातून सुटले नाहीत. वाळूच्या बेकायदेशीर उत्खननामुळे अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा त्यात मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. त्यामुळे वाळू माफियांवर शासन आणि पोलिसांनी अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.वाळूचे उत्खनन व वाहतूक नियमानुसारच होईल, याकडे लक्ष देताना महसूल विभाग व पोलिस यांच्यात समन्वय असणे महत्त्वाचे आहे.
     सामाजिक स्वास्थ्यावरच कोणत्याही समजाचा उत्कर्ष अवलंबून असतो. त्यामुळे तो राहिल, याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी विविध समाजातील नागरीक व नेत्यांमध्ये समन्वय, संवाद वाढायला हवा. सोशल मिडियावरदेखील बारकाईने लक्ष ठेवून जातीय,धार्मिक तेढ वाढविणार्यांच्या मुसक्या आवळायला हव्यात पोलिसांचा नागरिकांबरोबर संवाद योग्य पद्धतीने राहण्याच्याकामी पोलिसांना गरज भासल्यास प्रशिक्षण द्यायला हवे. आर्थिक गुन्हेगारीत वाढ होत आहे, त्यामुळे नागरिक बेजार झाले आहेत.त्याला प्रतिबंध करताना व हे गुन्हे उघडकीस आणताना नव्या तंत्राचा, आधुनिकतेचा वापर व्हायला हवा. सायबर गुन्ह्यांच्याबाबतीत पोलिस अजून अनभिज्ञ आहेत.लोकांच्यातही याबाबत जागृती नाही.त्यामुळे पोलिस आणि नागरिक यांना प्रशिक्षणाची आणि जागृतीची गरज आहे, यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न होण्याची गरज आहे. राज्य शासनाने याबाबतीत पुढाकार घ्यायला हवा.
                                                                                              



Saturday, October 29, 2016

बिस्किटांची परंपरा

रस्त्याची वगैरे कामे करणार्‍या मजुरांच्या लहान मुलांच्या हातात कुठलं तरी स्वस्तातलं बिस्किट असतं, तर दुसर्‍या बाजूला कुठल्याशा एखाद्या पॉश हॉटेलमध्ये ग्राहक गप्पा मारत चहाबरोबर बिस्किटांची चव चाखत असतात. अर्थात ही बिस्किटं हॉटेल आणि ग्राहकांच्या दर्जानुरूप असतात. मात्र गरीब मजुराच्या पोरांच्या हातात असणार्‍या बिस्किटासारखे ते खचितच नसते. गरीब- श्रीमंतांनुसार बनवलेली बिस्किटे तशी सर्वदूर पोहोचली आहेत. बिस्किटांचे साम्राज्य कुठे नाही, असा प्रांत राहिलेला नाही. सारे विश्वच त्याने व्यापून टाकले आहे. परंतु, हे बिस्किट आपल्या इथले नाही. साम्राज्यवादाच्या सोबतीने वैश्विकिकरणाच्या पहिल्या- पहिल्या हवेच्या लाटेवर स्वार होऊन ते आपल्या इथे पोहचले आहे. तेव्हापासून ते इथलेच बनून गेले.
    युरोपात झाला असला तरी अगदी अदिम रुपात हे प्राचीन काळातही उपलब्ध होते. दहा हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये बिस्किटे असल्याचा पुरावा सापडला आहे. त्याचबरोबर मिस्रमध्येही कारागिर भट्टीत बिस्किटे भाजत असणार्‍या कारागिरांची  भित्तीचित्रे उपलब्ध झाली आहेत. अन्य सुक्या आहाराप्रमाणेच याच्या अविस्कारामागेसुद्धा अनेक कारणे आहेत. प्रवासात सहजगत्या नेता यावीत आणि लांब पल्ल्याच्या प्रवासात दीर्घकाळ टिकावीत , यासाठीच याचा शोध लावला गेला असावा, असा कयास लावला जात आहे. प्राचीन शोधक आणि योद्धे समुद्रमार्गाने जगाच्या शोधासाठी ( नंतर कालांतराने लुटण्यासाठी) निघायचे, तेव्हा बराच काळ जमिनीपासून लांब असणार्‍या खलाशांच्या भोजनाची व्यवस्था करणं , एक मोठं आव्हान होतं. या आव्हानाला तोंड देण्यासाठीच बिस्किटचा जन्म झाला. प्रारंभी हे मूळ स्वरुपात शिजवलेले अन्न होते, जे बराच काळ खराब होत नव्हते. शिवाय त्यासाठी  जागाही जास्त व्यापली जात नव्हती. तसे पाहायला गेले, तर ते एक भाकरीचाच एक भाग होते, असे म्हणायला हरकत नाहीम्हणतात की, रोमन साम्राज्य काळात कणीक ३० दिवसांपर्यंत पाण्यात भिजवून ठेवले जात असे. ते मिठाशिवाय किंवा आंबवलेले असायचेप्रवासाला जाताना  ते दोनदा भट्टीत भाजले जायचे. समुद्र प्रवास खूपच दूरचा असेल तर चार वेळा भट्तीत भाजले जायचे. त्यामुळे त्याला 'खलाशांची भाकरी' असेही म्हटले जायचे. पण आज ज्याला बिस्किट म्हणतोजवळपास या बिस्किटासारखेच त्याच्यासारखेच असे. 'बिस्किट' शब्दसुद्धा लॅटीन भाषेतून आला आहे. आणि याचा शब्दशा: अर्थ आहे दोनवेळा भाजलेले! बिस्किट चहात बुडवून खाणारे खवय्ये आपण आपल्या आजूबाजूला नेहमी पाहतो, नव्हे आपणही पाहूणचार घेताना हेच करतो. आज आपण एक शौक म्हणून बिस्किटे खातो. किंवा भूक टाळण्यासाठी त्याचे सेवन करतो. मात्र त्यावेळेला ती एक  गरज होती.
     बरेच दिवस ठेवल्याने बिस्किटे नरम पडत. लांबच्या प्रवासासाठी तयार केली जाणारी बिस्किटे चार वेळा विशिष्टपणे भाजून  इतके कडक केले जात की नरम पडण्याची शक्यताच नसयाची. पण अडचण अशी यायची की खाण्याच्यावेळी त्याच्या कठीणपणामुळे खाता यायची नाहीतत्यामुळे खाण्यापूर्वी त्याल कॉफीत , मिठाच्या पाण्यात किंवा अन्य कुठल्या तरी पातळ पदार्थात भिजवून नरम केले जात मग खाल्ले जात.
     बिस्किटाकडे नंतर खाण्याबरोबरच कलात्मक अभिव्यक्ती म्हणूनही पाहिले जाऊ लागले.  याच्या कणकेस वाटेल तसा आकार देऊन भाजल्यावर आकारात काहीही फरक पडत नाही, याची कल्पना आल्यावर ती प्रारंभी आपापल्या आवडीच्या आकारात बनवली जाऊ लागली. पुढे फूले, पाने, प्राणी, पक्षी यांच्या आकारात बिस्किटे बनवण्यासाठी विशेष साचे बनवले जाऊ लागले. महाराणी व्हिक्टोरियाच्या काळात ब्रिटीश नौसेनेसाठी तयार केली जाणारी विशेष बिस्किटे यंत्रांवर बनवली जात. त्यावर महाराणीची प्रतिमा  किंवा ज्या कारखान्यात बिस्किटे बनवली जात, त्या कारखान्याचा क्रमांक उमटवला जाई
     गोड्या बिस्किटांचा प्रारंभ पश्चिम आशियातून झाला. तेथून तो युरोपात पोहचला. आजसुद्धा परंपरेने बनवली जाणारी नानकटाई चांगल्या-चुंगल्या बिस्किटांना भारी पडे. प्राचीन रोममधील लोक आपापल्यापरीने बिस्किटात गोडवा आणत असत. या कृतीत कणिक उबाळून ताटात पसरले जाई. ते सुकल्यावर त्याचे तुकडे तुकडे केले जात. नंतर त्या तुकड्यांना तळले जाई. ती अगदी कुरकुरीत बनले जात. मग ती मधाबरोबर खाल्ली जात. औद्योगिक क्रांतिनंतर मात्र बिस्किटांचे मोठ्या प्रमाणात व्यावसायिक उत्पादन होऊ लागले. आज किती तरी ब्रँड बाजारात उपलब्ध आहेत, त्याला गिणतीच नाही. ते आता प्रत्येकाची गरज आणि स्वाद पूर्ण करण्याचा खटपटीला लागले आहेत. अशी ही बिस्किटांची परंपरा हळूहळू सार्‍या विश्वभर पोहोचली. विश्वभराची बनून गेली.                       

Thursday, October 27, 2016

असाही एक बदला

बालकथा

     फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. मा चाए नावाचा एक बुद्धिमान माणूस चीनमध्ये राहात होता. त्याच्या गावातला जमीनदार फारच क्रूर होता. शेतसारा वसूल करण्याचे दिवस होते.जमीनदार शेतसारा गोळा करण्यात गुंतला होता.मा चाएलादेखील शेतसारा द्यायचा होता. पण त्याने याखेपेला सारा द्यायचा नाही, असा पक्का निर्धार केला होता.त्याला जमीनदाराला जन्माची अद्दल घडवायची होती. कारणही तसंच होत. जमीनदाराने मा चाएच्या आई-वडिलांचा फार छख केला होता. आणि त्यातच त्यांचा अंत झाला होता
     त्याने एक युक्ती योजली. त्याला  दोन पोती धान्य झाले होते. त्यातले एक पोते विकून त्याने एकसारखे दिसणारे दोन लांडगे विकत घेतले. तर दुसरे पोते विकून मिळेल तेवढ्या धष्टपुष्ट कोंबड्या खरेदी केल्या. मग त्याने त्यातला एक लांडगा घरात लपवला आणि दुसर्याच्या गळ्याला दोरी बांधून गावातून फिरू लागला.
     जमीनदार गावातून हिंडत शेतसारा गोळा करीत होता. त्याला गाठून मा चाए म्हणाला, मालक, या खेपेला खूपच चांगलं पीक आलं आहे. तेव्हा केव्हाही येऊन शेतसारा घेऊन जा.
      जमीनदाराची दृष्टी दोरीने बांधलेल्या लांडग्यावर गेली. तो म्हणाला, अरे, लांडग्याला असा  बांधून कुठं हिंडतोयस? चावेल ना कुणाला तरी!
     मा चाए अगदी बेफिकिरीने म्हणाला, मालक, हा पाळीव आहे. माझ्यासाठी शिकार करतो. मग मा चाएने लांडग्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्याला म्हणाला, जा आणि आज रात्रीच्या मेजवानीला मस्तपैकी कोंबड्या पकडून आण. हां, पण कोंबड्या अगदी धष्टपुष्ट हव्यात बरं का?
     दोरी सोडताच लांडग्याने धूम ठोकली. जमीनदार पाहतच राहिला. मा चाए म्हणाला, मालक, आज रात्री  माझ्या घरी जेवायला या. हा नक्कीच मोठमोठ्या कोंबड्या पकडून आणील.तुम्हाला छानपैकी मेजवानी द्यावी, अशी माझी बर्याच   दिवसांपासूनची इच्छा आहे, ती सफल होईल.जमीनदारानेही लगेच  होकार भरला.
     मा चाएने लागलीच तयारी सुरू केली. जमीनदार रात्र होण्याआधीच हजर झाला. मटणाचा  दरवळ  सुटला होता. वासाने जमीनदाराच्या तोंडाला पाणी सुटले होते.मा चाएने  मांसाहारी पदार्थाचे विविध प्रकारचे मेनू  बनवले  होते. खमंग भाजलेले मटण, उखडलेले, तळलेले, वाफेवर शिजवलेले मटण असे अनेक प्रकारचे मांसाहारी व्यंजन बनविण्यात आले होते.
     जमीनदार म्हणाला, तो लांडगा कुठे आहे? दाखव तरी त्याला? मग आपण सगळे मिळून भोजन करू.
मा चाएने दोरीला बांधून दुसरा लांडगा जमीनदारापुढे उभा केला. लांडग्याची चर्चा करीत दोघांनी भरपेट भोजन केले. जमीनदार तृप्त झाला.त्याने  मनातल्या मनात  लांडग्याला विकत घेण्याचा  इरादा केला. जमीनदार म्हणाला, गड्या, मला शेतसारा काही नको, पण हा लांडगा मला दे. त्या बदल्यात मी तुला  वर  200 चांदीची नाणी देतो.
     मा चाएने शेवटी 300 नाण्याला सौदा पक्का केला. जमीनदार गेल्यावर ते सर्व पैसे त्याने गरिबांमध्ये वाटून टाकले.
तिकडे जमीनदार लांडग्याला घेऊन घरी आला. बायको-पोरांना लांडग्याच्या करामती सांगू लागला. त्यांना त्यावर विश्वास बसला नाही. मग त्याने लांडग्याच्या पाठीवरून हात फिरवला. म्हणाला, जा, आणि माझ्यासाठी चांगल्या धष्टपुष्ट कोंबड्या पकडून आण. असे म्हणून त्याने दोरी सोडली. बंधनमुक्त झाल्यामुळे लांडग्याने धूम ठोकली. बराच उशीर झाला तरी लांडगा परतला नाही, तेव्हा तो  आपली फसवणूक झाली असल्याचे समजून चुकलारागाने त्याच्या अंगाचा तीळपापड झाला. मा चाएला खाऊ का गिळू, असे त्याला झाले. त्याला यमसदनी पाठवण्याचा विढा त्याने उचलला
     नोकराने मा चाएला पकडून आणलेत्याला एका पोत्यात बांधले गेले. नंतर त्याला समुद्राच्या किनारी असलेल्या एका झाडाला लटकविण्यात आले. आणि जमीनदाराने नोकराला  झाड तोडण्याचा  हुकूम सोडलामा चाए पाण्यात बुडून मरावा, अशी योजना त्याने आखली होती.
      झाड खूप मोठे होते. त्याला तोडता तोडता नोकर पार थकून गेला. शिवाय कडाक्याची  भूकही लागली. जमीनदार आणि नोकर जेवायला घरी गेले. इकडे मा चाए हात-पाय हलवत राहिला. जमीनदारचा कुबडा सासरा तिथून निघाला होता. त्याच्या पाठीला पोक आले होते. त्याने हलणारे पोते पाहिले. विचारल्यावर आतून मा चाए म्हणाला, मी माझ्या कुबड्या शरीरावर उपचार करून घेतो आहे. थोड्या वेळातच माझे कुबडेपण  जाईल. मी माझ्या घरच्यांची वाट पाहतो आहे. ते लवकर आले तर बरे होईल. कारण या अद्भूत पोत्याचे भाडे म्हणून तासाला  दोनशे चांदीचीे नाणी द्यावी लागणार  आहेत. वेळ वाढेल, तसा भाव जास्त द्यावा लागेल.
     कुबडा म्हणाला, अस्सं, मग मीसुद्धा कुबडाच आहे. मलासुद्धा पोत्यात लटकू दे. त्याबदल्यात मी तुला शंभर चांदीची नाणी देईन. त्यांचा सौदा पक्का होणार तेवढ्यात तिकडून दोन माणसे आली. मा चाएचा आवाज ऐकून त्यांनी त्याला खाली उतरवले. मा चाए बाहेर आल्यावर अगदी आनंदाने ओरडला, अरे व्वा, मी तर खडखडीत बरा झालो. ही बघा, माझी पाठ!
     जमीनदारच्या सासर्याने फारच विणवणी केल्यावर त्याने दीडशे चांदीच्या नाण्यांना सौदा ठरवला. त्याला पोत्यात बांधले, आणि  झाडावर लटकावून मा चाए निघून गेला.
     जेवण करून जमीनदार आणि नोकर परत आले. जमीनदारने   आता नोकराला झाड लवकर तोडण्याचे आदेश दिले. झाडाला कुर्हाडीचे घाव बसू लागले तसापोत्यातून मोठमोठ्याने आवाज येऊ लागला, अरे नालायका, मी तुझा सासरा आहे. मला बाहेर काढ, नाही तर मी मरून जाईन.
ऐकून जमीनदार आणखी संतापला. त्याने नोकराला झटपट  झाड तोडण्याचा हुकूम सोडला. झाड तुटले आणि समुद्रात बुडाले आणि त्याबरोबर त्याचा सासराही बुडाला.
     काही दिवसांनी मा चाए बाजारात गेला. त्याने दीडशे चांदीच्या नाण्यातून खुपशी मोठमोठी  पांढरी बदके खरेदी  केली. आणि जाणून-बुझून तो जमीनदाराच्या वाड्यासमोरून बदके हाकत निघाला. त्याच्या हातात काठी होती. तो अगदी एकाद्या गुराख्यासारखा  दिसत  होता. जमीनदाराने त्याला पाहिलं. आणि त्याची घाबरगुंडी उडालीभीत-भीतच त्याने विचारलं, अरे  तू, तर मेलायंस ना? मग जिवंत कसा?
     मा चाए म्हणाला, प्रामाणिक, सच्चा माणसाला  कधी मरण नसतं. त्या दिवशी समुद्रात पडताच, तिथल्या राजाने मला त्याच्या राजमहालात नेले. माझ्या स्वागतासाठी त्यांनी  सेनापती पाठवून दिलाविविध प्रकारचे स्वादिष्ट भोजन खाऊ घातले. अमरत्व देणारे फळही खायला दिलं. तोंडाला पाणी सुटेल, असं भोजन होतं. पण दु:खाची बाब म्हणजे तुम्ही तिथे नव्हतात.
मी दोन दिवसांतच तिथे कंटाळलो, कारण मी तर साधासुधा, अडाणी  माणूस. मला कशाला द्रव्याचा हव्यास? मी यायला निघालो तेव्हा समुद्रातला  राजा मला किंमती वस्तू देऊ इच्छित होता. पण मी त्या साफ नाकारल्या. शेवटी खूपच जिद्द केल्यावर राजा नाराज व्हायला नको म्हणून ही बदकं तेथून घेऊन आलो.
     मग मा चाए स्मितहास्य करत म्हणाला, राजाने पुन्हा यायला सांगितलं आहे. राजाने सांगितलंय की, नऊ वेळा मोठ्याने दरवाजा ठोठावून म्हणायचे, मी आहे मा चाए. एक साधा, प्रामाणिक माणूस. मग दरवाजा उघडेल.
हे  सर्व ऐकून जमीनदार भलताच  चकीत झाला. त्याच्या तोंडातून सहज बाहेर पडलेमी जर का तुला माझी सर्व संपत्ती लिहून दिली तर ? तू मला तिथे घेऊन जाशील  का?
     मा चाए रागाने म्हणाला, राजमहालातल्या अमूल्य वस्तू घेण्याचा मोह मला अजिबात झाला नाही, मग तुझी ही  क्षुल्लक संपत्ती का घेऊ?
जमीनदार गुडघे टेकून खाली बसला आणि मा चाएचे पाय धरले. त्याची  क्षमा मागू लागला. मा चाए म्हणाला, मला तुझी दया येतेय. मी तुला एकदा तिथे नक्की  घेऊन जाईन. पण माझ्या काही अटी मानाव्या  लागतील. पहिलं म्हणजे, तू कुठे जाणार आहेस ते कुणाला सांगायचं नाही. दुसरं, तू माझ्यासाठी एका लाकडी पिंपाची आणि तुझ्यासाठी एक मातीच्या घमेल्याची व्यवस्था कर.
जमीनदाराने  सगळी तयारी केली. मग ते घेऊन समुद्राच्या काठी घेऊन गेला. मा चाए पिंपात तर जमीनदार पातेल्यात बसून खोल पाण्यात गेले.
     मा चाएचे पिंप लाकडाचे होते., त्यामुळे ते तरंगत राहिले आणि जमीनदाराचे पातेले मातीचे होते. त्यामुळे ते भिजले नी तळाला गेले. जमीनदार समुद्रात बुडाला आणि कायमचा तळाला जाऊन पोहचला. मा चाए परत आला. पण कुणालाच कळले नाही की जमीनदार  गेला कुठे  तो?  (चिनी लोककथा)                                                                                                         .                           



Tuesday, October 25, 2016

बालसायबर गुन्ह्यांबाबत जागृतता महत्त्वाची


देशात इंटरनेट वापरणार्‍या 40 कोटी लोकांमध्ये मुलांची संख्या जवळपास दोन कोटी 80 हजार आहे.ही आकडेवारी इंटरनेटऐंड मोबाईल असोशिएशन ऑफ इंडियाच्या एका सर्व्हेक्षणावर आधारित आहे. तर एसोचॅमचा सर्वे सांगतो की, पहिल्या आणि दुसर्‍या श्रेणीतल्या शहरांमधील सात ते तेरा वयोगटातील 76 टक्के मुले रोज यू-ट्यूब पाहतात.13 वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं सोशल मिडियाचा वापर करतात.बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या अभ्यासानुसार 2017 मध्ये भारतातली जवळपास 10 कोटी मुलं ऑनलाइन असतील. तुम्ही ही बातमी चांगलीच आहे, असे म्हणाल.पण यात मुलांच्या विरोधात घडणार्‍या सायबर गुन्ह्यांची संख्या वाढण्याचा धोकाही लपला आहे. 
2004 मध्ये दिल्लीतल्या एका नामांकित विद्यालयातलं एमएमएस कांड उजेडात आलं होतं, तेव्हा बालसायबर गुन्ह्याची खुली चर्चा रंगली होती. पण आज 12 वर्षे उलटून गेली तरी नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्यूरो मुलांविरोधात घडणार्‍या सायबर गुन्ह्यांना स्वतंत्र अशा वेगळ्या मापदंडात तोलताना दिसत नाही. यामुळे मुलांच्याविरोधात किंवा त्यांच्याबाबतीत घडणार्‍या सायबर गुन्ह्यांचा खरा आकडा समजून येत नाही. पोलिस अधिकार्‍यांना सायबर गुन्ह्यांबाबत फारशी माहिती अथवा ज्ञान  नसल्याकारणाने नेहमीच पिडित मुलांना केस दाखल न करताच परत पाठवले जाते. असल्या प्रकरणात गुन्हेगारांना शिक्षा मिळण्याचे प्रमाणदेखील कमी आहे. देशात ऑनलाइन चाइल्ड सेक्सुअल अब्युजमटीरिअलला तात्काळ रिपोर्ट करण्याची अथवा हटवण्यासाठी हॉटलाइनदेखील नाही. खूपच कमी लोकांना याबाबतचा रिपोर्ट करण्याचे ज्ञान आहे. अशी सामुग्री असलेल्या वेबसाइटची संख्या गेल्या बारा वर्षात 147 टक्क्यांनी वाढली आहे.
युनिसेफचा अलिकडेच प्रसिद्ध झालेला बाल ऑनलाइन सुरक्षा आणि भारत हा रिपोर्ट आपल्याला या धोक्यापासून सावध करतो आहे. तंत्रज्ञानाच्या बदलत्या स्वरुपामुळे मुलांच्याविरोधात घडणार्‍या सायबर गुन्ह्यांच्या पद्धतींमध्येही बदल होत आहेत.यात प्रामुख्याने सायबर बुलिंग,ऑनलाइन यौवन व्यभिचार, ऑनलाइन यौवनशोषण आदी गुन्ह्यांचा समावेश आहे.देशात अशा पिडित मुलांसाठी ज्या काही थोड्या बहुत सोयी-सुविधा आहेत, त्या महानगरांपुरत्याच मर्यादित आहेत.मेमध्ये दिल्लीत झालेल्या सार्क देशांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बाल यौवन व्यभिचार,हिंसा(ऑनलाइनसह) संपवण्याची विषय निघाला होता.पण त्यानंतर पुढे काय झाले कळायला मार्ग नाही. स्मार्टफोनद्वारा इंटरनेटचा वापर करणार्‍या मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.अर्थात डिजिटल जमाना असल्याकारणाने मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, यात तीळमात्र शंका नाही. शिवाय मुलांना इंटरनेटपासून दूर ठेवण्यात किंवा त्यांच्या हातून स्मार्टफोन काढून घेण्यात कुठला शहाणपणा नाही. मात्र या मुद्द्याची चर्चा समाजस्तरावर घडण्याची आवश्यकता आहे आणि यातून मुलांना,पालकांना आणि शैक्षणिक संस्थांना जागृत करण्याची गरज आहे.

Monday, October 24, 2016

अपारंपारिक ऊर्जेची निर्मिती आणि वापर वाढायला हवा


     पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्यापेक्षा वाढतच आहेत.पाऊसमान होत चालल्याने जलविद्युत निर्मितीवर मर्यादा पडत आहेत. औष्णिक विद्युत प्रकल्पांसाठी लागणारा कच्चा माल म्हणजेच कोळसा वैगेरे यांचे साठे संपत चालले आहेत.शिवाय यातून प्रदूषणही वाढत आहे. त्यामुळे साहजिकच पर्यायी ऊर्जा साधनांकडे आवश्यक ठरले आहे. पारंपारिक ऊर्जेची मर्यादा पाहता भविष्यात सौर ऊर्जेसारखे स्त्रोतांचा वापर मोठ्या प्रमाणात आणण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
     क्रूड तेल,कोळसा यांच्या ज्वलनाने प्रदूषण वाढवून आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेत आहोत.शिवाय हे साठे आपल्याला फार काळ पुरणारे नाहीत.या सगळ्यांची कल्पना आपल्या सगळ्यांना असताना आणि समोर पर्याय उभे असतानाही आपण त्यांचा वापर अजून हवा तसा करताना दिसत नाही.सुदैवाने अन्य देशांपेक्षा सूर्यापासून आपल्या देशाला लख्ख आणि स्वच्छ प्रकाश मिळतो आहे, त्याचा लाभ अगदी मोठ्या प्रमाणात उठण्याची गरज आहे. सौर ऊर्जा प्रकार आपल्यासाठी उत्तम पर्याय आहे.
शासकीय कार्यालये. शाळा, महाविद्यालये,खासगी संस्था, कंपन्या यांना सौर ऊर्जेची सक्ती करणे आवश्यक आहे, यामुळे मोठ्या प्रमाणात विजेची बचत होणार आहे. आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, अशा कुटुंबांनादेखील सौर ऊर्जेची सक्ती देशासाठी हितकारक आहे.यासाठी या लोकांना सौर ऊर्जा संयंत्र खरेदी करण्यासाठी काही प्रमाणात सवलत द्यायला हवे आहे. घराच्या मोकळ्या गच्चीचा उपयोग करून घरातील वापरासाठी स्वत:च वीज उत्पादन करणे सौरफलकामुळे शक्य झाले आहे.
     अर्थात याला भांडवली खर्च अधिक असल्यामुळे लोक मागे सरत आहेत.मात्र उंचच्या उंच इमारती उभे करणारे,त्यावर विद्युत झगमगाट करून आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करणारे आपल्या देशात कमी नाहीत.चकचकीत इमारतीत राहणार्यांना पैशाची अडचण भासत असेल, असे वाटत नाही. मात्र माशी शिंकते ती इच्छाशक्तीपुढे. इच्छाशक्तीच पार कोमेजून गेल्यामुळे देशाला तेलाच्या कच्च्या मालासाठी पैसे खर्चून दुसर्यांपुढे हात पसरावे लागत आहेत. आपल्या देशात अलिकडे मोठमोठे मॉल्स उभे राहत आहेत.मोठमोठी अलिशान इमारती, कार्यालये बांधली जात आहेत.फर्म हाऊसचा नवा प्रकार अस्तित्वात आला आहे. त्यामुळे काचेच्या तावदानाबरोबरच सौर फलके बसवणे फायद्याचे ठरणार आहे. सौरफलकाचा निळसर रंग, त्यावर असलेली धातूची जाळी यामुळे उलट इमारतींची शोभा वाढणार आहे. यात काही अडचण भासत असली तरी बांधकाम डिझायनर आपल्या कामाला येतील.
     सरकारी किंवा खासगी कार्यालये, औद्योगिक कंपन्या, बँका अशा दिवसभर चालणार्या संस्थांवर स्वत: सौर ऊर्जा तयार करून तीच वापरण्याचे बंधन टाकायले हवे. बांधकाम तज्ज्ञ, वास्तूविशारद यामंडळींनी गृहनिर्माणाची कामे घेत अस्ताना नकाशा बनवण्याच्या वेळेला घराची जागा,रस्ते, टेरेस आदींची रचना करताना सौर ऊर्जा संयंत्रण बसवण्याचा विचार करायला हवा. व्यक्तिगत किंवा सामूहिकरित्या सौर विद्युत उपकरणे खरेदी करताना शासनाने एकूण किंमतीच्या काही टक्के सूट अथवा अनुदान द्यायला सुरुवात केली आहे, मात्र त्यात आणखी वाढ अपेक्षित आहे.त्यामुळे नवमध्यम वर्ग किंवा सामान्य माणसाला इच्छा असेल तर यात गुंतवणूक करणे, शक्य होणार आहे.क्रूड तेलाच्या आयातीवर आपली परकीय गंगाजळी उधळण्यापेक्षा अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतावर खर्च केल्यास त्यातून देशालाच अधिक लाभ होणार आहे. पण यामुळे भविष्यात फार मोठी बचत होणार आहे.सरकारने आणि या देशात राहणार्या सर्वच नागरिकांनी स्वत:च्या पायातले पाहण्याच्या वृत्तीला तिलांजली देऊन दूरदृष्टीचा विचार करायला शिकले पाहिजे. पवन ऊर्जा,समुद्रापासून विद्युतनिर्मिती,लघवीपासून विद्युत निर्मिती,पतंगापासून ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देऊन अपारंपारिक ऊर्जेचा वापर वाढवला पाहिजे



आता महिला न्यायाधीशसुद्धा असुरक्षित

     उत्तरप्रदेशच्या कानपूर येथील महिला न्यायाधीश प्रतिभा गौतम यांच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. महिलांवर अत्याचार रोजच होत आहेत,पण यातून महिला न्यायाधीशदेखील सुटल्या नाहीत.ही फारच मोठी  गंभीर घटना म्हटली पाहिजे. या महिला न्यायाधीशचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. त्यांच्या दोन्ही हातांच्या नसा कापलेल्या होत्या. या महिला न्यायाधीशचा प्रेमविवाह दिल्ली येथील एका वकिलाशी याचवर्षी जानेवारी महिन्यात झाला होता. या हत्येच्या प्रकरणाला सुरुवातीला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिसांनी पुराव्याच्या आधारावरून आरोपी वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला तुरुंगात पाठविले.
     तसे पाहता देशात हत्येच्या घटना दररोजच्या झाल्या आहेत. परंतु हे प्रकरण क्लेषदायक व तितकेच चिंताग्रस्त आहे. कारणहत्या झालेली महिला ही  न्यायाधीश  होती. या देशात महिला न्यायाधीश सुरक्षित राहू शकत नसेल तर इतर स्त्रियांची स्थिती काय असेल, याचा विचार न केलेलाच बरा. शिक्षण महाग झाल्यामुळे महिलाच काय तर पुरुषही उच्च शिक्षण घेऊशकत नाही. मात्र, याबाबतीत प्रतिभा गौतम भाग्यशाली होत्या. कारण कुटुंबीयांनी त्यांना उच्चशिक्षणदिले. त्यांनीही शिक्षणक्षेत्रात प्रचंड मेहनत घेऊन न्यायिक मॅजिस्ट्रेटच्या पदापर्यंत मजल मारली. आजही समाजात जज लोकांना मानसन्मान दिला जातो. अशा व्यक्तींचा दराराही मोठा असतो. या हत्येप्रकरणी महिला जजच्या कुटुंबीयांनी वकील पती व त्याचे कुटुंब सतत हुंड्याची मागणी करीत असल्याचा आरोप लावला.

     तत्त्वहीन राजकारण, नैतिकतेचा अभाव, कष्टाशिवाय मिळणारी संपत्ती आदी कारणांमुळे झालेल्या सामाजिक अध:पतनामुळे सध्या महिला असुरक्षित आहेत.  परिस्थितीजन्य पुराव्यांवरून असे लक्षात येते की महिला जजने आत्महत्या केली नसून, कट रचून तिची हत्या करण्यात आली असावी. या प्रकरणात कदाचित तिच्या पतीचा हात नसला तरी कुणाकडून तरी तिची हत्या करण्यात आली, हे सत्य असावे. कारण तिच्या हाताच्या कटलेल्या नसा पाहून हेच सिद्ध होते. तिच्या पतीवर केवळ संशयाच्या आधारावरूनच नव्हे तर स्मार्टफोनवरील व्हॉट्सअपवर होत असलेले त्यांचे भांडणतसेच त्याच्याकडून वारंवार धमक्या देण्याच्या आधारावर कारवाईकरण्यात आली. परंतु महिला न्यायाधीशसारख्या महत्त्वाच्या पदावर पोहोचलेल्या प्रतिष्ठित महिलेचीही हुंड्याच्या मागणीसाठी हत्या होत असेल तर सर्वसामान्य महिलांचे काय, असा प्रश्न निर्माण होतो. यामुळे माती गुंग होऊन जाते. आपल्या देशात काय चालले आहे,आणि आपला देश कुठे चालला आहे,हे कळायला मार्ग नाही.
     देशातील महिलांवरील अत्याचार असो किंवा अन्य प्रकारच्या गुन्ह्य़ातील सत्य बाहेर येणे, लवकर निकाल लागणे आणिन्यायालयाच्या लांबलचक प्रक्रियेमुळे फिर्यादीला जवळजवळ न्याय मिळणे मुश्किल झाले आहे. 
आता महिला न्यायाधीशच या सिस्टमची बळी ठरणार का? असा प्रश्न उपस्थित होतो.

Saturday, October 22, 2016

नाण्यांचे अनोखे संग्रहालय


     माणसाला छंद वेगवेगळ्या प्रकारचा असतो.कुणाला विविध प्रकारची वृत्तपत्रे गोळा करण्याचा छंद असतो.तर कुणाला काड्यापेट्यांचा सग्रह करण्यात रस असतो.कोणी टपाल तिकिटे गोळा करतो.कोणी चित्रांचा संग्रह करतो. काही माणसे नाण्यांचा संग्रह करतात. नाण्यांचा संग्रह करणारी माणसेही कमी नाहीत.आपल्या घरातल्या पेट्यांमध्ये ही नाणी ठेवतात आणि घरी येणार्या-जाणार्या पावण्या-रावळ्यांना दाखवत सुटतात. पण हा नाण्यांचा संग्रह फारच महागडा असतो.जितके जुने नाणे तितके त्याचे मूल्यही अधिक. ते खरेदी करण्यासाठी फारच मोठी किंमत चुकवावी लागते. अशा प्रकारचा महागडा आणि ऐतिहासिक छंद जोपासणार्यांमध्ये एक नाव पुढे आले आहे, ते म्हणजे राजस्थानातील बिकानेर जिल्ह्यातील नोखा येथील ओमप्रकाश गट्टाणी यांचे. संग्रहात भारतीय उपखंडातील विविध राजघराण्यांसह जगभरातील 220 देशांची अधिकृत नाणी चलनाचा समावेश आहे. यात सोन्या-चांदी, तांबे,पितळ, ॅल्युमिनिअम अशा प्राचीन नाण्यांचा समावेश आहे. गट्टाणी यांनी ही नाणी एखाद्या पेटीमध्ये ठेवून दिली नाहीत, तर त्यांनी नोखा-नागोर रोडवर त्यासाठी एक संग्रहालयच उघडले आहे.
     ओमजी क्वाइन क्यूरीइ कलेक्शन बनवून काचेच्या  शोकेसमध्ये नाणी ठेवली आहेत आणि सजवलेल्या टेबलांवर मांडली आहेत.त्यांना ही नाणी ही एकाद्या पेटीत ठेवून देणं योग्य वाटलं नाही. त्यात प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळातील अनमोल नाण्यांचा समावेश आहे. आपण न पाहिलेल्या अडीच रुपयाच्या आणि चार रुपयाच्या नोटा इथे पाहायला मिळतील.आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे एक असे संग्रहालय आहे, जिथे रिझर्व्ह बँके ऑफ इंडियाने प्रदर्शित केलेल्या दहा हजार आणि पाच हजाराच्या नोटाही आपल्याला पाहायला मिळतात. नाण्यांसाठी वेगळे असे दालन करण्यात आले आहे. नाणी तत्कालिन आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सामाजिक व्यवस्थेचा आरसा आहेत.गट्टाणी यांनी या अगोदर नाण्यांचे मोठे संग्रहालय आसामातील जोराहट येथे ऐतिहासिक जिमखाना क्लबमध्येही आपल्या आईच्या नावाने सुरू केले आहे.याठिकाणी ब्रिटिश आणि राजेरजवाड्यांच्या काळातील दुर्लभ चित्रे,घड्याळे,कॅमेरे, वाद्ये इत्यादी अनेक वस्तूदेखील पाहायला मिळतात. या ठिकाणी असलेले जुन्या काळातील सर्वच प्रकारचे कार लोकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. गट्टाणी बनारस हिंदू विश्वविद्यालय,वाराणसी,दिल्ली क्वाइन सोसायटी, कोलकाता सोसायटीचे आजीव सभासद आहेत.त्यांच्या संग्रहालयात राजस्थानच्या राजा-महाराजांबरोबरच भारतातल्या अनेक शासकांच्या काळातील नाणी उपलब्ध आहेत.ब्रिटिश काळातील जवळजवळ सर्वच नाणी आणि विदेशातील बहुतांश नाणी आणि राज्यांचा इतिहास, नाण्यांचे मूल्य, कोणी बनवली,कुठल्या धातूचा आहे, अशा प्रकारची बरीच माहिती शोकेसमध्ये लावण्यात आली आहेत.
     जयपूरच्या राजस्थान विद्यापीठाने सहा वर्षांपूर्वी संग्रहालयात-विज्ञानमध्ये एमए अभ्यासक्रमाची सुरुवात केली. कित्येक सरकारी संग्रहालय त्यांच्या अध्ययन- अध्यापनासाठी कार्यक्षेत्र राहिले आहे.अनेक विद्यार्थी नाण्यांच्याबाबतीत, प्राचीन मुद्रांबाबतीत संशोधनसुद्धा करत आहेत. जुन्या पुस्तकांमधून इकडच्या-तिकडच्या साहित्याचे संकलनही केले जाते.संशोधकांसाठी हे संग्रहालय म्हणजे एक पर्वणीच आहे.त्यांना ते चांगलेच उपयोगाचे ठरत आहे.
     संशोधकांना शोधासाठी नोखाला आल्यावर मुक्काम करायचा असेल तर तशी सुविधाही या संग्रहालयात  उपलब्ध करून दिली जाते.गट्टाणी यांना राजस्थानातील जुन्या साहित्य, संस्कृती, कला, ग्रामीण औजारे आणि साधने  यांचे विशाल असे संग्रहालय विकसित करायचे आहे.यामुळे नोखा एक पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावे, अशी गट्टाणी यांची इच्छा आहे.यासाठी त्यांनी संग्रहालयासाठीची इमारतदेखील पूर्ण करून ठेवली आहे.त्यामुळे या संग्रहालयाचे भव्य रूप आपल्याला लवकरच पाहायला मिलणार आहे.हे ठिकाण धार्मिक पर्यटनस्थळापासून अवघ्या तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे.देशी-विदेशी पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र ठरणार आहे.



Monday, October 17, 2016

शरीराला पाण्याची गरज


      काहीजण सांगतात की ,सकाळी उठल्यावर सगळ्यात अगोदर दोन ग्लास पाणी प्यायला पाहिजे.आणखी कोणी दुसरेच काही सांगतं.जगातल्या जलसंकटाबाबत ज्याला कसलीही  गंध वार्ता नाही ,अशी मंडळी सकाळी सकाळी दोन दोन लीटर पाणी प्यायचा सल्ला देतात. जितकं पाणी प्याल,तितकं चांगलं,असंही ठणकावून सांगतात. जादा पाणी पिल्याने शरीराला कोणताच अपाय होत नाही, कारण जादा झालेले  पाणी शरीर स्वतः बाहेर फेकते आणि त्याच्या बरोबर शरीरातील घाणदेखील बाहेर टाकते,असेही सांगितले जाते.हे असल्या सल्ल्यांनी  शरीराला कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही ,त्यामुळे लोक असे सल्ले स्वीकारतात किंवा  अजमावूनही पाहताना दिसतात.पण शास्त्रज्ञ सांगतात की ,अशा सल्ल्यांमध्ये  कसलाच दम नाही आणि या मागील विचाराच्या द्रुष्टीत  सत्यही नाही. आपल्याला माहीत आहेच,आवश्यकतेपेक्षा पाणी कमी पिल्याने  शरीरात डीहायड्रेशन होते.आणि जरूरतपेक्षा अधिक पाणी पिले तर हायपोहायड्रेशन होऊ शकतं. उलट  हायपोहायड्रेशन शरीराला नुकसान पोहचवू शकतं. जादा पाणी पिल्याने शरीरातील  सोडियमचे प्रमाण कमी होते आणि ते धोकादायक होऊ शकतं.शिवाय किडनीचे  कामदेखील वाढते. म्हणजे आपल्याला जीवन देणारे पाणी अधिक झाल्याने जीवावरसुद्धा उठू शकते.
    काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातल्या शास्त्रज्ञांच्या एका टिमने आपल्या शरीरात जादा झालेल्या पाण्याने काय होतं किंवा काय घडू शकतं ,याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला.यांसाठी त्यांनी काही लोकांवर प्रयोगदेखील केले.त्यांनी त्या लोकांचे दोन गट केले.एका गटाकडून खूप उशीरापर्यंत कसरत करून घेतली.कारण व्यायाम केल्याने घाम निघाल्यानंतर  त्यांना पाण्याची गरज जास्त  लागते. दुसऱ्या गटाला अशा ठिकाणी ठेवलं गेलं की ,त्यांच्या शरीरातून घाम निघणार नाही.काम केल्यानेही त्यांच्यावर फारसा परिणाम होणार नाही. यानंतर दोन्ही गटातील लोकांना एकाच वेळी पाणी प्यायला देण्यात आले. तसेच ते पाणी पीत असताना त्या सगळ्यांचे 'फंक्शनल एमआरआय'देखील करण्यात आला. या 'एमआरआय'मध्ये असे आढळून आले की ,ज्या  लोकांनी व्यायाम केला होता त्या लोकांच्या मेंदूने आरामात पाण्याचा स्वीकार केला.पण दुसऱ्या गटातील लोक जबरदस्तीने पाणी पिण्याचा प्रयत्न करत होते.वास्ताविक  त्यांना तहान लागलेली नव्हती. या गटातील लोकांच्या मेंदूतील कोशिकांमध्ये तणाव दिसत होता. कारण नसताना ते पाणी पीत होते.
शास्त्रज्ञांचे म्हणणे असे की ,जितकं आवश्यक आहे तितकंच खावे तसे,पाण्याच्याबाबतीतही आहे.तहान लागली असेल तेवढेच पाणी प्यावे. आपल्याला भूक लागते , याचा सरळ अर्थ असा की , आपल्या शरीराला  ऊर्जेची गरज आहे. त्याप्रकारे ज्यावेळेस आपल्याला तहान लागते,त्यावेळेस शरीराला पाण्याची गरज आहे. आवश्यकतेपेक्षा खाल्लेले अन्न आपल्याला नुकसान पोहचवते. तसेच जादा पाणी शरीराला धोका पोहोचवते.आपण जादा मीठ असलेले  भोजन खाल्ले की आपल्याला  अधिक तहान लागते. कारण शरीरातील किंवा रक्तातील सोडियमची मात्रा कमी करण्यासाठी जादा पाणी लागते .आपले आणि बाकीच्या जीव -जंतूचे शरीर अशा प्रकारे विकसित झाले आहे की ,त्याला स्वतः ला आपल्या पोषनांची गरज ठाऊक आहे.आपल्या शरीराला माहीत आहे ,त्याला केव्हा , आणि किती पाणी लागते .यांसाठी त्याला सोशल मिडियातील वैद्यांची गरज लागत नाही.सोशल मीडिया आपल्या सामाजिकतेशी निगडीत आहे.आमच्या आरोग्यासाठी नाही.

Sunday, October 16, 2016

मच्छिंद्र ऐनापुरे: मुदतपूर्व बाळंतपण म्हणजे एक आघुरी प्रकारच !

मच्छिंद्र ऐनापुरे: मुदतपूर्व बाळंतपण म्हणजे एक आघुरी प्रकारच !:       विशिष्ट दिवशीच बाळाला जन्म देण्याच्या आग्रहापायी दोन महिलांना आपला जीव गमवायला लागल्याच्या घटना पुणे जिल्ह्यात घटल्या आहेत. या घटन...

भारतात 25 टक्के क्षयरोगी


     क्षयरोग जगभरातल्या लोकांचा जीव घेत आहे.मिनिटाला तिघांचा मृत्यू होत आहे.जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की, विविध देशातील सरकारे या रोगाच्या अटकावासाठी कायद्याने काहीच करायला तयार नाहीत,असं आरोग्य संघटनेच म्हणणं आहे.
     आकडेवारीनुसार गेल्यावर्षी जगभरातल्या क्षयरोगग्रस्त रुग्णांची संख्या 1.04 कोटी होती.त्याच्या अगोदरच्या सालात म्हणजे 1914 मध्ये हीच संख्या 96 लाख होती.डब्ल्यूएचओचे डायरेक्टर जनरल डॉ. मार्गेट चॅन यांच्या म्हणण्यानुसार यासाठी खूप काही करण्याचं बाकी आहे. युएनने 2015 ते 2030 पर्यंत क्षयरोगाने मृत्यू होणार्या संख्येत 90 टक्के घट आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे.याशिवाय क्षयरोगाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये 80 टक्के घट आणण्याच्यादृष्टीने लक्ष्य निश्चित केले गेले आहे.मात्र रोगाच्या उपचारासाठीचे प्रयत्न कमी असल्याकारणाने निर्धारित लक्ष्य गाठणे अवघड असल्याचे म्हटले जात आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की, अमेरिकेसारख्या श्रीमंत आणि विकसित देशानेदेखील या रोगाकडे फारसे लक्ष दिले नाही. या रोगाच्या निर्मूलनासाठी फारच थोड्या निधीची तरतूद हा देश करीत आला आहे.मार्गेट म्हणतात की, अमेरिका क्षयरोगापेक्षा अधिक फंड एचआयव्ही आणि मलेरियासाठी उपलब्ध करून देते.युरोपीय युनिअनदेखील एचआयव्ही आणि मलेरियाच्या तुलनेत क्षयरोगासाठी कमीच तरतूद करते. जगातले बहुतांश सगळ्याच देशातील सरकारे या रोगाच्या अटकावासाठी निष्क्रिय आहेत.या रोगाच्या खात्म्यासाठी सगळ्यांनीच पावले उचलण्याची गरज असून तशी व्यवस्था न झाल्यास रोग आणखी वाढण्याचा धोका आहे.

     डब्ल्यूओने भारताल्या वाढत्या रोगाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. जगभरातल्या क्षयरोगाच्या केसेसपैकी 25 टक्के केसेस भारतातील आहेत.गुजरातमध्ये सर्वाधिक क्षयरोगी आहेत.भारतात याबाबतीत अजूनही राष्त्रव्यापी सर्व्हे झालेला नाही.मात्र सरकार 2019 पर्यंत सर्व्हे करायला तयार आहे.यानंतर इंडोनेशिया आणि चीनमध्ये दहा-दहा टक्के रुग्ण आहेत.पाकिस्तानमध्ये पाच टक्के तर दक्षिण आफ्रिकेत पाच टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण आहेत.या सहा राष्ट्रांमध्येच 60 टक्के क्षयरुग्ण आहेत.  

Saturday, October 15, 2016

फिरकी भारताचे मोठे शस्त्र


     क्रिकेटची काशी म्हणून ओळखल्या जाणार्या लॉडर्स मैदानावर एक फलक लावलेला आहे. त्या फलकावर ज्या ज्या विदेशी गोलंदाजांनी डावात पाच- पाच बळी मिळवले आहेत किंवा फलंदाजांनी 100- 100 धावा कुटल्या आहेत, त्या सगळ्यांची नावे लिहिलेली आहेत. एखाद्या फलंदाजाने काढलेल्या 100 धावा किंवा गोलंदाजाने घेतलेले पाच बळी क्रिकेटमध्ये इक्वल किंवा समसमान समजले जातात.हीच गोष्ट इंदोरमधल्या कसोटी सामन्यावेळी आर. अश्विनच्या डोक्यात होती. त्यामुळेच तो म्हणाला होता, मला भारतीय गोलंदाजांचा विराट कोहली व्हायचं आहे.याचा अर्थ असा की, विराट कोहलीला प्रत्येक डावात शतक ठोकायचं असतं.तसंच आर. अश्विनला प्रत्येक डावात पाच विकेट मिळवायचे असतात. इंदोर कसोटीत स्थीरस्थावर झालेल्या न्युझिलंडच्याबाबतीत आश्विनने हेच केले. त्याने टॉम लॅथमला आपल्याच गोलंदाजीवर झेल घेऊन बाद केले आणि त्याच्या पुढची फळी त्याने सपासप कापून काढली.118 धावांवर पहिली विकेट गमावलेल्या न्युझिलंडची पुरी टिमच्या टिम 299 धावांत गारद झाली. या पहिल्या डावात अश्विनने सहा गडी बाद केले. तर दुसर्या डावात सात विकेट घेऊन त्याने आपल्या कारकीर्दीतील सर्वात चांगलं प्रदर्शन केलं.
     आर. अश्विनने एका डावात पाच गडी बाद करण्याची कामगिरी 20 वेळा केली आहे.20 वेळा एकाच डावात पाच वेळा गडी बाद करण्याच्या विक्रमात आर. अश्विन शेन वॉर्न,मुथय्या मुरलीधारन,अनिल कुंबळे आणि हरभन सिंह अशा दिग्गज गोलंदाजांच्या पुढे आहे. आपल्या कारकीर्दीच्या सुरवातीला 39 कसोटी सामन्यात शेन वॉर्न याने 167, मुथय्या मुरलीधरनने 177 आणि हरभजसिंहने 172 बळी मिळवले होते. हरभजसिंहने 59 कसोटी सामन्यांमधून ही संधी मिळवली होती. त्यांच्यापेक्षा कमी कसोटी सामन्यात ही कामगिरी करणारे जगात दोघेच गोलंदाज आहेत. सिडनी बार्न्स  आणि कॅलरी ग्रिमेट ही ती दोन गोलंदाज. दोन्हीही गोलंदाज 19व्या शतकाच्या प्रारंभी क्रिकेट खेळत होते. आजच्या आधुनिक क्रिकेटचा विचार केला तर अश्विनने ही कामगिरी कमी कालावधीत केली आहे, असे म्हणायला हरकत नाही. तो सव्वा दोनशे बळी घेण्याच्या अगदी जवळ पोहचला आहे.त्याने आतापर्यंत मिळवलेल्या 213 बळींपैकी निम्म्यापेक्षा जास्त बळी विरोधी संघाच्या टॉप फलंदाजांचे घेतलेले आहेत. यापैकी 15 टक्के बळी तर त्याने अशा फलंदाजांचे घेतले आहेत, जे मैदानावर  स्थिरावलेले होते. म्हणजेच त्यांनी पन्नासपेक्षा अधिक धाव्या काढलेल्या होत्या.

     फलंदाजाला चकवा देऊन बाद करण्याची अश्विनची खासियत आहे. आपल्या लाईन, लेंथ आणि टर्न यावर अधिक विश्वास ठेवणार्या अश्विनने इंदोरमध्ये फलंदाजांना फ्रंटफुट किंवा बॅकफुटवर  खेळवून संभ्रमात टाकत बळी मिळवले आहेत.ही कुठल्याही गोलंदाजासाठी मोठी उपलब्धी आहे. ती आर. अश्विनला साधली आहे. गोलंदाजीबरोबरच अश्विनने फलंदाजीतही चमकदार कामगिरी केली आहे.चार कसोटी शतकांसह सहा अर्धशतकेही त्याने झळकावली आहेत. विशेष म्हणजे त्याने ही कामगिरी भारत संकटात असताना केली आहे.तो संघात दाखल झाला तेव्हा तो अष्टपैलूच होता, पण त्याच्यावर लोकांची दृष्टी उशिराने पडली, असं त्याचं म्हणणं आहे.