Sunday, October 16, 2016

भारतात 25 टक्के क्षयरोगी


     क्षयरोग जगभरातल्या लोकांचा जीव घेत आहे.मिनिटाला तिघांचा मृत्यू होत आहे.जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की, विविध देशातील सरकारे या रोगाच्या अटकावासाठी कायद्याने काहीच करायला तयार नाहीत,असं आरोग्य संघटनेच म्हणणं आहे.
     आकडेवारीनुसार गेल्यावर्षी जगभरातल्या क्षयरोगग्रस्त रुग्णांची संख्या 1.04 कोटी होती.त्याच्या अगोदरच्या सालात म्हणजे 1914 मध्ये हीच संख्या 96 लाख होती.डब्ल्यूएचओचे डायरेक्टर जनरल डॉ. मार्गेट चॅन यांच्या म्हणण्यानुसार यासाठी खूप काही करण्याचं बाकी आहे. युएनने 2015 ते 2030 पर्यंत क्षयरोगाने मृत्यू होणार्या संख्येत 90 टक्के घट आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे.याशिवाय क्षयरोगाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये 80 टक्के घट आणण्याच्यादृष्टीने लक्ष्य निश्चित केले गेले आहे.मात्र रोगाच्या उपचारासाठीचे प्रयत्न कमी असल्याकारणाने निर्धारित लक्ष्य गाठणे अवघड असल्याचे म्हटले जात आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की, अमेरिकेसारख्या श्रीमंत आणि विकसित देशानेदेखील या रोगाकडे फारसे लक्ष दिले नाही. या रोगाच्या निर्मूलनासाठी फारच थोड्या निधीची तरतूद हा देश करीत आला आहे.मार्गेट म्हणतात की, अमेरिका क्षयरोगापेक्षा अधिक फंड एचआयव्ही आणि मलेरियासाठी उपलब्ध करून देते.युरोपीय युनिअनदेखील एचआयव्ही आणि मलेरियाच्या तुलनेत क्षयरोगासाठी कमीच तरतूद करते. जगातले बहुतांश सगळ्याच देशातील सरकारे या रोगाच्या अटकावासाठी निष्क्रिय आहेत.या रोगाच्या खात्म्यासाठी सगळ्यांनीच पावले उचलण्याची गरज असून तशी व्यवस्था न झाल्यास रोग आणखी वाढण्याचा धोका आहे.

     डब्ल्यूओने भारताल्या वाढत्या रोगाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. जगभरातल्या क्षयरोगाच्या केसेसपैकी 25 टक्के केसेस भारतातील आहेत.गुजरातमध्ये सर्वाधिक क्षयरोगी आहेत.भारतात याबाबतीत अजूनही राष्त्रव्यापी सर्व्हे झालेला नाही.मात्र सरकार 2019 पर्यंत सर्व्हे करायला तयार आहे.यानंतर इंडोनेशिया आणि चीनमध्ये दहा-दहा टक्के रुग्ण आहेत.पाकिस्तानमध्ये पाच टक्के तर दक्षिण आफ्रिकेत पाच टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण आहेत.या सहा राष्ट्रांमध्येच 60 टक्के क्षयरुग्ण आहेत.  

No comments:

Post a Comment