Monday, October 3, 2016

भावनांवर नियंत्रण आवश्यक

    सामाजिक, सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणार्या पुणे शहरात प्रेमभंग आणि घरच्यांना प्रेम संबंधाची माहिती समजेल, या भीतीने तीन अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली. सुमारे महिनाभरापूर्वी दोन शालेय विद्यार्थिनींनीसुद्धा स्वत:चे हात बांधून नदीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनांमुळे सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. शाळा-महाविद्यालयांच्या शिक्षकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाली आहे.
     प्रसार माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेमविषयक भावनांची माहिती प्राप्त होते. मुलांच्या तारुण्याबद्दल असणार्या संकल्पना आणि पालकांचा विचार याबाबत मोठी तफावत आहे. किशोरवयात होणारे मानसिक आणि शारीरिक बदल, त्याचवेळी वाढती स्पर्धा आणि आयुष्याच्या बदलत असलेल्या संकल्पना यांचा मेळ घालणे विद्यार्थ्यांना अनेकदा कठीण होत आहे. . किशोरवयीन मुलांमध्ये प्रेमप्रकरण, करियरची चिंता, व्यसनाधीनता, प्रेमप्रकरणांमध्ये स्वाभिमान आणि पराभव एकत्र आल्याने मुला-मुलींकडून आत्महत्येचा मार्ग स्वीकारला जातो. आत्महत्या करण्यामागे अनेक कारणे असून, सामाजिक, सांस्कृतिक, नातेसंबंध, तत्कालीन किंवा दीर्घकालीन राग आणि भ्रमनिरास अशी कारणे असू शकतात. प्रत्येक आत्महत्या टाळता येत नाही; मात्र समुपदेशन, योग्य पद्धतीने संवाद याने हे प्रमाण निश्चित कमी करता येऊ शकते; तसेच आत्महत्या करणार्या व्यक्तीनंतर मागे राहणार्या व्यक्तींनी स्वत:ला दोषी धरू नये. समाजानेही आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्ती, प्रेमप्रकरणातील जोडीदार इत्यादींना दूषणे न देता त्यांचा समाजाने योग्य पद्धतीने स्वीकार करावा.
     सुरुवातीपासूनच संस्कृतीच्या नावाखाली समाजाने लैंगिक शिक्षणाला विरोध केला. मात्र, डॉक्टर, समुपदेशक आणि स्वयंसेवी संस्थांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहायला हवे. पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातील सर्व टप्प्यांवर समुपदेशन करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी घरात व घराबाहेर काय करतात, याकडे लक्ष द्यायला हवे. भारतीय समाज हा मुळातच भावनाप्रधान असल्याने मुलांमध्ये भावनेच्या भरात वाहून जाण्यामुळे आत्महत्येच्या प्रसंगांमध्ये मोठया प्रमाणात वाढ होत आहेकिशोरवयीन मुलांमध्ये अनेकदा मी म्हणेन तसेच झाले पाहिजे, असा अट्टहास असतो. तसे न झाल्यास येणार्या रागातून कोणाला तरी शिक्षा झाली पाहिजे, या एकाच उद्देशाने आत्महत्या केली जाते. ही शिक्षा स्वत:ला करणे म्हणजेच आत्महत्या. मात्र भावनांवर योग्य पद्धतीने नियंत्रण मिळविण्याची शक्ती या तरुणांमध्ये नसल्याने आत्महत्या हा टोकाचा मार्ग ते स्वीकारताना दिसतात. प्रेमभंग, करियरमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने आलेली निराशा, स्वत:बद्दल असणार्या अवास्तव अपेक्षा पूर्ण न होणे अशा आयुष्याच्या टप्प्यावरील एखाद्या घटनेवरून जीवनाला नापास करणे अतिशय चुकीचे आहे.
     किशोरवयीन मुला-मुलींच्या शारीरिक आणि मानसिक बदलाच्या कालावधीत पालकांशी संवाद तुटल्यामुळे दिवसेंदिवस अनेक समस्या उभ्या राहू लागल्या आहेत; तसेच वाढत्या वयात भुलविणारे प्रसंग, प्रेमाचे आकर्षण, स्वत:च्या महत्त्वाकांक्षा आणि सामाजिक, कौटुंबिक दबावामुळेकोवळ्या कळ्याउमलण्याआधीच आत्महत्येचा मार्ग स्वीकारून स्वत:ला चुरगाळून टाकत आहेत. त्यामुळे जग समजण्याआधीच, जग सोडण्याच्या निर्णयाप्रत जाणार्या मुला-मुलींना रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची वेळ आली आहे. भविष्यात ही समस्या आणखी तीव्र होण्यापूर्वी समाजातील सर्व घटकांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.                    


No comments:

Post a Comment