Tuesday, February 16, 2016

मुदतपूर्व बाळंतपण म्हणजे एक आघुरी प्रकारच !


      विशिष्ट दिवशीच बाळाला जन्म देण्याच्या आग्रहापायी दोन महिलांना आपला जीव गमवायला लागल्याच्या घटना पुणे जिल्ह्यात घटल्या आहेत. या घटना खोट्या प्रतिष्ठेचा बुरखा फाडणार्‍या आहेत. अलिकडे लोकांच्या डोक्यात कसले कसले खूळ शिरतात, हे कळायला मार्ग नाही. अमूक दिवशी बाळाचा जन्म झाला पाहिजे, यासाठी लोक वाट्टेल ते करायला तयार होत आहेत.पाहिजे तेवढा पैसा ओतायला तयार आहेत. मात्र हे लोक बाळ आणि बाळाच्या आईचा विचार करताना दिसत नाहीत. एकादेवेळी नातेवाईकांचे ठीक आहे, पण आई म्हणून घेणारी बाईदेखील अशा प्रकाराचा हट्ट धरते तेव्हा त्या बाईला काय म्हणायचे असा प्रश्‍न पडल्यावाचून राहत नाही.
      पुण्याजवळच्या लोणी काळभोरखालील एका वस्तीवर एका विवाहितेच्या बाळंतपणाची अपेक्षित तारीख फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात असताना तिच्या पतीसह नातेवाईकांनी अगोदरच म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातील विशिष्ट दिवसाचा आग्रह धरला. अपेक्षित तारखेपूर्वी शस्त्रक्रियेच्या माध्यमातून बाळंतपण केल्यास बाळासह मातेसही धोका असल्याचे सांगण्याचा प्रयत्न संबंधित महिलेवर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी केला. मात्र तरीही संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी विशिष्ट तारखेचा आग्रह धरला. डॉक्टरांना त्यासाठी भाग पाडले व शस्त्रक्रिया करण्यात आली. पण शस्त्रक्रियेनंतर संबंधित खासगी रुग्णालयात महिलेकडे दुर्लक्ष झाल्याने तिला मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. त्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी दोन मोठ्या खासगी रुग्णालयात नेवून लाखो रुपये खर्च करून उपचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या महिलेला शेवटी प्राण गमवावे लागले.
      उरुळी कांचनजवळील एका खेड्यात घडलेल्या अशाच एका दुसर्‍या घटनेत महिलेला प्राण गमवावा लागला आहे. याही महिलेच्या बाळंतपणाची अपेक्षित तारीख फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होती. केवळ पहिल्या मुलाच्या वाढदिवशीच याही बाळाचा वाढदिवस आला पाहिजे, या अट्टाहासापायी नातेवाईकांनी आग्रह धरून पाच दिवस आधीच शस्त्र्क्रिया करून बाळंतपण करून घेतले. याही प्रकरणात बाळंतपणानंतर रक्तस्त्राव न थांबल्याने संबंधित महिलेला प्राण गमवावे लागले.
      आता यातल्या एका घटनेतले नातेवाईक चूक डॉक्टरांवर ढकलत आहेत. बाळंतपणाच्या अपेक्षित तारखेपूर्वी दहा दिवस आधी संबंधित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही इंजेक्शन दिल्यास बाळास व आईस कसलाही धोका पोहचणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितल्यानेच आपण शस्त्रक्रिया करण्यास संमती दिल्याचे नातेवाईक सांगतात. शिवाय रक्तस्त्राव हो ऊ लागल्यावर तिच्यावर योग्य ते तेही वेळेत व्हायला पाहिजे होते, ते झाले नाहीत, त्यामुळेच तिला प्राण गमवावे लागले, असे नातेवाईक म्हणत सुटले आहेत. दुसर्‍या घटनेत नातेवाईकांनी आपली जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे संबंधित महिलेच्या पतीवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      अपेक्षित तारखेपूर्वी बाळंतपण करणे बाळासह आईच्याही जिवाला धोका पोचवणारे असते, हे आता वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र खोट्या प्रतिष्ठेपायी, विशिष्ट तारखेला बाळ जन्माला घालण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अपेक्षित तारखेपूर्वी शस्त्रक्रियेच्या माध्यमातून बाळंतपण करण्यासाठी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार गर्भाशयाचा खालचा भाग (lower segment uterus ) तयार झालेला नसतो. त्यामुळे सत्तर टक्क्यांहून अधिक प्रकरणात रक्तस्त्राव हो ऊन माता दगावण्याचा धोका असतो. ही बाब बाळंतपण करणार्‍या सर्वच डॉक्टरांना माहित असते. पण नातेवाईकांचा आग्रह व जादा पैसे मिळणार असल्याने डॉक्टरांकडून असे प्रकार केले जातात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मातेबरोबरच बाळाच्या स्वास्थाच्या दृष्टीनेही मुदतपूर्व बाळंतपण धोक्याचे असते. बाळाच्या श्‍वासात अडथळा येण्याबरोबरच धाप लागणे, काविळासारख्या आजाराची बाधा पोचू शकते. पण तरीही अडेलतट्टू, खोट्या प्रतिष्ठेचा आव आणणार्‍या लोकांना कोण सांगणार? मात्र बाळ आणि बाळंतीण यांच्या जिवाशी खेळण्याचा त्यांना काय अधिकार आहे? हा प्रकार आघुरीच म्हटला पाहिजे.अशा घटनांना शासन पातळीवर प्रतिबंध घातला पाहिजे.

Monday, February 15, 2016

शेतकर्‍यांचा शेतीला रामराम चिंताजनक

        2011 च्या जनगणनेनुसार आपल्या देशातले अडीच हजार शेतकरी रोज शेतीला रामराम ठोकत आहेत. अनियमित पाऊसमान, गारपीट,बदलते हवामान, शेतीमालाला मिळणारा कमी भाव, दलालांचा वाढता वावर आदी कारणांमुळे शेतकर्‍याला आता शेती परवडेनाशी झाली. रोज त्याच त्या खड्यात पडायचे, याला शेतकरी कंटाळला आहे. प्रचंड कर्जाचे डोंगर अंगावर घेऊन आणि आपल्या बायका-पोरांना माघारी ठेवून शेतकरी आत्महत्या करीत आहे. कृषीप्रधान देशातच शेतकर्‍याची आणि शेतीची झालेली बिकट अवस्था आपल्या देशाला कुठे नेणार, हादेखील विचार करणारा प्रश्‍न आहे. शेतकर्‍याला शेती सोडून अन्य व्यवसाय पत्करावे लागत असतील तर देशातील सरकारे काय करत आहेत, असा सवाल उपस्थित होतो.
      आपली भारतीय अर्थव्यवस्था कृषीप्रधान म्हणून ओळखले जाते. पण कृषी विभागाला बजेटमध्ये स्थानच नसते. सध्याचे सरकार तर उद्योजकधार्जिणे असल्याची टीका होत आहे. अर्थात मागील आघाडी सरकारदेखील शेतकरी हिताचे होते, असे नव्हे. मात्र या सरकारने उद्योगाला अधिक प्राधान्य दिले आहे, हे स्पष्ट दिसत आहे. शेतकर्‍यांकडे त्यांचा कानाडोळा होत आहे. शेतकरी शेती करीत असताना त्यांना बी-बियाणे, खते, औषधे सवलतींच्या किंवा कमी भावात मिळायला हवीत. शेतीला मुख्यत: पाणी मिळायला हवे. शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग शेतशिवारात उपलब्ध व्हायला हवेत. मालाची थेट उचल व्हायच्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. दलालांमुळे शेती मालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकर्‍याच्या पदरात काही पडत नाही. आतबट्ट्यातला व्यवहार का करायचा , असा प्रश्‍न पडणे स्वाभाविक आहे. त्यामुळे शेतकरी शेतीला रामराम थोकत आहे.
      शेती आणि भारतातील लोक शेतीपूरक व्यवसायांशी निगडीत राहून आपला उदरनिर्वाह करतात. सध्या शेतकऱयाला शेती करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. शेतीमध्ये आर्थिक नुकसान होण्याचे प्रमाण वाढल्याने प्रत्येक दिवशी जवळपास 2,500 शेतकरी शेतीला रामराम करत आहेत.
 कृषी क्षेत्राचा अभ्यास केला असता, या क्षेत्राचा विकास अजुनही तेजीत नाही. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2012-13 मध्ये कृषी विकास दर 1.2 टक्के होता. जो 2013-14 मध्ये वाढून 3.% टक्के झाला आणि 2014-15 मध्ये पुन्हा घसरुन 1.1 टक्क्यांवर आला. मागील काही वर्षात पेरणीमध्ये 18 टक्के घसरण झाली आहे. हा चढउतार शेतीला मारक ठरत आहे.
     अनेक अहवालांचा अभ्यास केला असता   तज्ञांच्या मतानुसार,  मागील दोन दशकांमध्ये शेतकऱयांच्या आत्महत्यांमध्ये मोठी वाढ झाली असून अधिकतर आत्महत्यांचे कारण हे कर्ज आहे, जे फेडण्यासाठी शेतकरी असमर्थ ठरतोय. 2011-2012 या दरम्यान जवळपास 3.2 कोटी ग्रामीण लोकांनी ज्यामध्ये शेतकऱयांचे प्रमाण अधिक आहे, त्यांनी शहरांमध्ये पलायन केले. यापैकी अधिकतरांनी आपली जमीन आणि घर विक्री करुन शहरांचा  मार्ग पत्करला.
     गावातून पलायन केल्यानंतर शेतकरी आणि शेतमजुरांची स्थिती मोठी चिंताजनक आहे. त्यांच्याकडे कोणतेही कौशल्य नसल्याने अधिकतर शेतकरी  शहरी भागात मजूर म्हणून काम करताना दिसतात. शेती विकून ना त्यांना आर्थिक फायदा झाला ना जीवनमान उंचावले.एनसीआरबी’च्या आकडेवारीनुसार, मागील 5 वर्षातील आकडेवारीनुसार, वर्ष 2009 मध्ये 11 हजार, 2010 मध्ये 15 हजार, 2011 मध्ये 14 हजार, 2012 मध्ये 13 हजार आणि 2013 मध्ये 11 हजार पेक्षा अधिक शेतकऱयांनी शेती व्यवसायाशी निगडीत कारणांमुळे आत्महत्येचा मार्ग पत्करला. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये शेतकऱयांच्या आत्महत्यांची संख्या सर्वाधिक आहे.
      देशात् 640 पैकी 340 जिल्हयांमध्ये पावासाची प्रमाण 20 टक्क्यांनी घसरले. आजही अधिकतर शेतकरी सिंचन क्षेत्रावर अवलंबून आहेत. अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे मोठया प्रमाणात शेतीचे नुकसान होते. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित निर्णय होणे गरजेचे आहे. या समस्या मागील काही दशकांपासून सुरु आहेत. शेती संपली तर सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशातल्या लोकांचे खायचे वांदे होतील. आधीच तेलजन्य पदार्थ आयात करून देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आलेली आहे. त्यात अन्न-धान्य आयात करायचे म्हणजे भिकेकंगाल होण्याचीच लक्षणे म्हणावी लागतील. शेती आणि शेतकरी सुधारावयाचा असेल तर यावर ठोस निर्णय होणे गरजेचे आहे. शेतीप्रधान देशात शेतीच पोरकी होत असेल किंवा तिला परकेपणाची वागणूक मिळत असेल तर असा देश जगात विरळाच म्हणावा लागेल.



Thursday, February 11, 2016



 मानसिक परिवर्तनाशिवाय थांबणार नाही भ्रष्टाचार
 भ्रष्टाचार संपविण्यासाठी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज असून, भ्रष्टाचार करणार नाही आणि होऊ देणार नाही, असे मानसिक परिवर्तन झाल्याशिवाय भ्रष्टाचार थांबणार नाही. सर्वत्र भ्रष्टाचार सुरू राहिला, तर नागरिकांनी कर का भरावा, असा संतप्त सवाल एका जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. अरुण चौधरी यांनी गत आठवड्यात विचारला. भ्रष्टाचाराचा ’कॅन्सर’ केवळ कायदे करून थांबणार नाही, त्यासाठी मानसिकतेत बदल आणि भ्रष्टाचार करणारांविरुद्ध कठोर कारवाई होण्याची गरज आहे. भ्रष्टाचाराला थांबविण्यासाठी कर न भरण्याचा उपाय होणार नाही, तर सरकारने भ्रष्टाचारविरोधी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. प्रत्येक क्षेत्रात पारदर्शकता असल्यास भ्रष्टाचाराला आळा बसणार असून, भ्रष्टाचाराविरोधात जनगजागृतीची गरज आहे. भ्रष्टाचार करणार नाही आणि होऊ देणार नाही, अशी नागपूर हायकोर्टाची टिप्पणी समाजातील प्रत्येक घटकाला आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारी आहे. भ्रष्टाचार थांबवून सामान्यांना न्याय मिळाला पाहिजे. कर जमा करावाच लागेल. भ्रष्टाचार करणार नाही अन् करूही देणार नाही,असा निश्चय केल्यास गैरप्रकारांना आळा बसेल.   


 झटपट श्रीमंतीच्या मृगजळापासून फायदा नाहीच!
 झटपट श्रीमंत व्हायचे असेल, तर मल्टीलेवल मार्केटिंगसारखे दुसरे काहीच नाही, असे सांगितले जात असले तरी हे फक्त मृगजळासारखेच आहे. यात पैसा गुंतविताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे. अनेक अशा बाबी आहेत, की ज्यामुळे मल्टीलेवल मार्केटिंग म्हणजे व्यवसायापेक्षा फसवणूक जास्त, हे सिद्ध करतात.
 इतर व्यावसायिक पद्धतीपेक्षा मल्टीलेवल मार्केटिंग ही सोपी व जास्त फायद्याची आहे, असे सांगितले जाते. मात्र, केवळ 1 टक्काच लोकांनी अशा योजनातून फायदा मिळविला आहे. जे सुरुवातील अशा योजनात गुंतवणूक करु शकले, त्यांनाच भरपूर कमाई झाल्याची उदाहरणे आहेत. दुसरी अजून एक बाजू सांगितली जाते, की नेटवर्किंग मार्केटिंग ही उत्पादन वेगाने विकण्याची सर्वात प्रभावी आणि प्रसिद्ध पद्धत आहे. लोकांचा अशा सरळ पद्धतीने मिळालेल्या उत्पादनांवर विश्वास असतो. परंतु, अशी थेट किंवा घरोघरी उत्पादने विकण्याची पद्धत कालबाह्य ठरलेली आहे. लोकांच्या खरेदीच्या सवयी आता बदलल्या असून, वस्तू घेताना त्यात वैविध्य, किंमत, बजेट सार्‍याच गोष्टी तपासल्या जातात. त्यामुळे तर आता ऑनलाइन खरेदीचे मार्केटही गेल्या काही वर्षात अब्जावधींची उलाढाल करीत आहे. मुळात मल्टीलेवल मार्केटिंग हे उत्पादन विकण्यापेक्षा नवीन सदस्य जोडण्यावर जास्त भर देते. दुकानापेक्षा जास्त उत्पादने ही मल्टीलेवल मार्केटिंगने विकल्या जातात आणि त्यासाठी जाहिरातीचा कोणताही खर्च होत नाही, हे आणखी एक असत्य आहे. जेवढी उत्पादने योजनांद्वारे विकल्या जातात, त्याचे प्रमाण एकदम नगण्य आहे. त्यासारख्याच उत्पादनाची रिटेल व होलसेल मार्केटमध्ये मोठी विक्री होत असते. अशा योजनांमध्ये सदस्य झालेला एखादा एजंट मात्र सामान्य गुंतवणूकदारांच्या फक्त गुंतवणुकीकडे लक्ष देऊन असतो. त्याला उत्पादन विकण्यापेक्षाही फक्त समोरच्याला आपल्या चेनमध्ये समाविष्ट केल्यास आपले उत्पन्न वाढेल, एवढाच उद्देश असतो. हे उत्पादन दुसर्‍याचे उपयोगाचे आहे किंवा नाही, त्याचा दर्जा, टिकाऊपणा ह्या केवळ बोलण्याच्याच गोष्टी असतात. त्यामुळे सामान्य माणूस सदस्य झाल्याबरोबर तोही दुसरे कुणी गळाला लागतो काय, याचीच चाचपणी करत फिरतो. या सर्व चक्रात उत्पादनाला काही महत्त्व राहत नसते. ते फक्त सदस्य जोडण्याचे माध्यम म्हणून राहते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यावेळी लोक अशा कंपन्यांचे सभासद होतात, तेव्हा त्यांना सुखसमृद्धीचा आणि जीवनात आनंद निर्माण करण्याचा हा मार्ग असल्याचे भासविले जाते. तुम्हाला बंगला, कार, विदेशयात्रा, महागड्या वस्तूंचे स्वप्न दाखविले जाते. मात्र, अशा योजनात फसले तर स्वत:चा पैसाही जातोच आणि ज्यांना तुम्ही सभासद बनवून घेतले आहेत, त्यांच्याशीही संबंध खराब होतात. उच्चभ्रू राहणीमान तर सोडाच घराच्या बाहेरही निघणे मुश्कील होते. काही प्रसंगी तर तुरुंगाची हवा खावी लागूशकते.

                                                                       

शिक्षक संघटनाचे फक्त अस्तित्व उरले, ताकद संपली


      प्राथमिक शिक्षकांच्या एका संघटनेचे राज्यस्तरीय त्रैवार्षिक अधिवेशन नुकतेच मुंबईत पार पडले.शिक्षक सहलीवर, विद्यार्थी वार्‍यावर अशा प्रकारच्या बातम्या माध्यमांतून येत होत्या. कही चॅनेलवल्यांनी तर शिक्षकांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून त्यांना अक्षरश: झोडपून काढले. संवाद-चर्चांमध्ये भाग घेणारे आणि अँकरमंडळींची शिक्षकांना मास्तरड्या म्हणण्यापर्यंत मजल गेली. एकूण काय तर शिक्षकांना अधिवेशनाची गरजच काय आणि सहा-सहा दिवस कशाला, असा सूर विरोधकांमधून निघाला. त्यात शिक्षकांमधल्याच एका शिक्षकाने औरंगाबाद खंडपिठात अधिवेशनाबाबतच याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ही नैमितिक रजाच रद्द केली. त्यामुळे अधिवेशनाचे सूप वाजलेच, असेच सगळ्यांना विशेषत: विरोधक संघटनांना वाटले. मात्र अधिवेशनला शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थिती दाखवून संघटनेच्या अस्तित्वाला थोडे फार बळ दिले. याच कार्यक्रमात शरद पवार यांनी शिक्षणमंत्र्यांच्या हातात काही नसतं, अर्थमंत्री, ग्रामविकासमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या हातात सारं काही असतं,त्यामुळे त्यांच्याशी बोलूनच शिक्षकांच्या अडचणी सोडवल्या जातील, असे पवार म्हणाले. स्वाभाविक, या अधिवेशनाच्या निमित्ताने शिक्षकांच्या हाताला काही लागले नाही. नाईलाजाने  संघटनांच्या पदाधिकार्‍यांनाही अधिवेशन यशस्वी झाल्याच्या बातम्या छापून आणाव्या लागल्या. याचा अर्थच असा आहे की, आता शिक्षक संघटनांचे अस्तित्व दिसत आहे, पण त्यातली ताकद संपली आहे. 
    समाजदेखील आता शिक्षकांच्या पाठीशी राहिला नाही. काल परवापर्यंत समाज ज्या संघटनाच्या, शिक्षकांच्या सोबत होता, त्या संघटनांचा सामाजिक जनाधार का तुटला याचा विचार करण्याची गरज आहे. आज एकमेकांच्या विरोधात लढतांना आरोप- प्रत्यारोपांच्या राळेत सर्वस्व गमावावे लागेल. म्हणून आता विचार करा.. सामान्य शिक्षकांचा विश्‍वास उडण्यापूर्वी एक व्हा. अऩ्यथा ना घरका ना घाटका अशी अवस्था होण्याचा धोका आहे. शिक्षक संघटनाच्या माध्यमातून आपले प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न गेले अऩेक वर्षापासून करण्यात येत आहे. या संघटना आणि अधिवेशनाला जवळपास शंभर वर्षाची पंरपरा आहे. ज्या काळात शिक्षकी पेशाला मोल नव्हते.. म्हणजे ‘अगदी मागता येत नाही भीक तर मास्तरकी शीक‘ असे म्हटले जायचे त्या काळात देखील या संघटनांनी शिक्षकी पेशाला सन्मान मिळवून देण्याकरीता मोठा प्रयत्न केला आहे. यांनी अनेक लढे उभारले. त्या लढ्याला चांगले यश आले. अगदी वसंतदादा पाटील राज्याचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी शिक्षकांचे प्रश्‍न जेव्हा सुटत नव्हते तेव्हा जवळपास त्रेपन्न दिवसांचा संप करीत सरकाला न्याय देण्यास भाग पाडले होते. समाज या प्रत्येकवेळी शिक्षकाच्या बाजूने उभा राहिल्याचे पहावयास मिळत होते. याचे कारण समाजमनात शिक्षक संघटना आणि शिक्षकांबद्दल एक प्रकारचे प्रेम दडलेले होते. त्यामुळे शिक्षकांच्या प्रश्‍नात समाजाने नेहमीच बांधिलकी स्वीकारत शिक्षकांना ताकद दिली. आज शिक्षकांच्या संघटना जवळपास पाव दशकाएवढ्या झाल्या आहेत. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणार्‍या शिक्षक, पदवीधर, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी, मुख्याध्यापक या प्रत्येक संवर्गाच्या स्वतंत्र संघटना आहेत. या प्रत्येकाची एक संघटना नाही. तर यात एकापेक्षा अधिक संघटना आहेत. राज्यात एकेकाळी प्राथमिक शिक्षक संघ अत्यंत महत्त्वाचा व शिक्षकांचे नेतृत्व करणारी सर्वात मोठी संघटना होती; पण काळाच्या ओघात संघटनेत कार्यरत असणार्‍या मंडळीची महत्त्वाकांक्षा मोठी ठरल्याने संघटनेत फूट पडत गेली. या निमित्ताने संघाचे तुकडे पडत गेले. त्यातून राज्यात जशी फुट पडली तशी जिल्ह्या-जिल्ह्यातदेखील त्यांना फटका बसला. त्यातून त्यांचे तुकडे वाढले. संघटना वाढत गेल्या आणि राज्यातील शिक्षक संघटनांचा दबाव मात्र कमी होत गेला. त्यामुळे नेते वाढले.    संघटनाच्या निमित्ताने अनेक पदे मिळाली; पण यातून प्रश्‍न सुटण्याचे प्रमाण कमी होत गेले. सरकारमध्ये बसलेली माणसे पूर्वी या पदाधिकार्‍यांच्या बद्दल आदर व्यक्त करीत. धोरणे आखतांना त्यांच्या भूमिका जाणून घेतल्या जात होत्या. आज  राज्याचे धोऱण आखतांना संघटनांच्या सक्रियतेला महत्त्व दिले जात नाही. त्यामुळे एखादे धोरण येते. त्यांची अंमलबजावणी सुरू होते. मग शिक्षकांना आंदोलने करावी लागतात. शिक्षण विभागाच्या निर्णयात धरसोडपणा तो त्याचाच परिपाक होता. या धोरणात सक्रियता संघटनांनी दर्शवली असती तर त्याचा परिणाम शिक्षकांना सोसावा लागला नसता. या काळात शिक्षकांना कितीतरी मनस्ताप सहन करावा लागला होता. या दरम्यान राज्यात शिक्षक संघटना एकसंघ असत्या तर सरकारने किमान या धोरणात्मक प्रक्रियेत विचार तरी मागविले असते. सरकारने विश्‍वासात घेण्याची तसदी घेतली असती.; पण विभाजित झालेली शक्ती म्हणजे केवळ अस्तित्व एवढेच उरले होते. त्यामुळे संघटनाचे अस्तित्व उरले पण ताकद नाही. या निमित्ताने या सारख्या संघटनाच्या अधिवेशनाची खरेच गरज आहे काय? असा प्रश्‍न चर्चीला गेला आहे. हे खरे आहे की या सारख्या अधिवेशनांची खरच गरज आहे. या निमित्ताने होणार्‍या परिषदा, परिसवांद याच्या कधीच चर्चा माध्यमांत होतांना दिसत नाही. खरेतर माध्यमांतून या बातम्या डोकावत नाही. त्या ऐवजी राजकीय नेत्याची उपस्थिती आणि त्यांची भाषणे यांना अधिक स्थान मिळत आले आहे. त्यामुळे अधिवेशन म्हणजे केवळ राजकीय सभेसारखे काही असावे असे वाटणे साहजिक आहे. राज्यात शिक्षकांच्या प्रश्‍नावर लढा देत समस्या निराकरणासाठी मोठया प्रमाणावर प्रयत्न झाले आहेत. त्यातील संघटनेचे योगदान कोणी नाकारणार नाही. आजही राज्यात या संघटनाच्या माध्यमातून समाजाच्या सुख दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्याचा संघ देखील या प्रमाणात कार्यरत आहे. त्यामुळे शिक्षक संघटना समाजासोबत आहे. या सोबत मात्र शिक्षणांच्या प्रक्रियेत व सरकारच्या धोरणात मात्र सक्रियता अधोरेखित करण्यासारखा ठसा दिसत नाही. आज शिक्षकांच्या माथी निर्णय लादले जात आहेत. त्यामुळे आज खाबुगिरी संस्कृतीच्या काळात शिक्षकांना ज्ञान संपन्न करणे. नव्यानव्या संकल्पना समजावून देणे, त्यांना विश्‍वासात घेणे या गोष्टी घडतांना दिसत नाही.
                                                                                       




Monday, February 8, 2016

कुत्र्यालाही रजई


बालकथा
      एकदा राज्यात भयंकर थंडी पडली. राजा कृष्णदेवराय मंत्र्यांना म्हणाले,’राज्यातल्या गरिबांना एक-एक रजई वाटून द्या.’
      मंत्र्यांनी दवंडी पिटवली. गरिबांची रांग लागली. मंत्री रजईचे वाटप करू लागले. रजईचे वाटप करता करता एका चतुर भिकार्‍याचा नंबर आला. त्याच्यासोबत एक कुत्रादेखील होता. आपल्या वाट्याची रजई घेऊन भिकारी म्हणाला,’ हा कुत्रादेखील याच राज्याचा रहिवाशी आहे. यालादेखील एक रजई द्या.’ मंत्रिमहोदय भडकले. जवळच तेनालीराम उभा होता. तो हसून म्हणाला,’ बरोबर म्हणतो तो. राजाने कुत्रा आणि माणसात फरक ठेवला नाही.’
      मंत्र्याने कुत्र्यादेखील एक रजई दिली. नंतर त्यांनी राजाच्या कानावर ही घटना घातली. मंत्री पुढे म्हणाले,’ महाराज, उद्यापासून रजई वाटण्याचे काम तेनालीरामकडे सोपवा.’
    दुसर्‍यादिवशी तेनालीराम रजई वाटायला तयार झाला. पण समोरचे दृश्य पाहून चपापला. काय करावे आणि कसे करावे, असा प्रश्‍न त्याच्यापुढे पडला. कारण पुढे जी रांग उभी होती, त्या रांगेत प्रत्येकाकडे एक-एक कुत्रा होता. मंत्रीदेखील तेथेच उभा होता. तो मनातल्या मनात हसत होता. तेनालीराम समोर ओढवलेल्या बाक्या प्रसंगाला कसा सामोरा जातो, याची त्याला उत्सुकता होती.
     तेवढ्यात तेनालीरामने नोकराला जवळ बोलावून घेतले आणि त्याच्या कानात काही तरी सांगितले. नोकर आत गेला. परत आला, तेव्हा त्याच्या बगलेला दोन मांजरे होती. बाहेर आल्यावर त्याने ती दोन्ही मांजरे सोडून दिली. रांगेतली सगळी कुत्री त्यांच्या मागे धावली. भुंकू लागली.तेनालीराम ओरडला, ‘राजांच्या मांजरांवर भुंकणार्‍या कुत्र्यांबरोबर आलेल्या सगळ्या मालकांना अटक करा. आणि त्यांना तुरुंगात टाका.’
     कुत्री सोबत घेऊन आलेली माणसे चपापली. ती माणसे म्हणू लागली,’ ‘ ही कुत्री आमची नाहीत.मंत्र्यांनी आम्हाला दिली आहेत.’ मंत्र्यांची मान शरमेने खाली गेली. तेनालीरामने मग कुत्र्यांना  हाकलेले व गरिबांना रजईचे वाटप केले. ही वार्ता राजाला समजली. राजा  तेनालीरामच्या चतुराईवर प्रसन्न हसला.
                                                                          



Friday, February 5, 2016

बालकथा : टिमूने झटकला आळस


     ताकोबा वनात टिमू नावाचे एक माकड होते. टिमू  वनातल्या अन्य प्राण्यांपेक्षा मोठा चलाख आणि उत्साही होता. एके दिवशी अप्पू हत्ती आणि बंडू अस्वल गप्पा मारत बसले होते. ते कुठल्या तरी चिंतेत होते. जंगलातल्या प्राण्यांना त्यांच्या दूरदूरच्या नातेवाईकांकडून पत्रेटपाल, मनिऑर्डर येत. पण ते आणून द्यायला लांबडा जिराफ फार उशीर करत असे. त्यामुळे अनेकांना फटका बसला होता.  आणखी,  हा लांबडा जिराफ पैसे दिल्याशिवाय चिठ्ठीच आणून द्यायचा नाही. त्याला काढून टिमू माकडाला पोष्टमन करण्याचा विचार अप्पू आणि बंडूने केला.
     एक दिवस जंगलातल्या सगळ्या प्राण्यांची सभा बोलवण्यात आली आणि त्यात टिमू माकडाची पोष्टमन म्हणून नेमणूक करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. टिमू अगदी फीट आणि चलाख आहे, अशी शिफारस करण्यात आली. लांबड्या जिराफाला वैतागलेल्या प्राण्यांनी तात्काळ प्रस्तावाला मंजुरी दिली. मंजूर प्रस्ताव वनराजापुढे ठेवण्यात आला. वनराजाने ताकोबा जंगलाचा पोष्टमन म्हणून टिमू माकडाची नेमणूक  जाहीर केली.
     टिमू अगदी वेळेत सगळ्यांना टपाल आणून द्यायचा. असेच काहीदिवस गेले.  टिमूच्या लक्षात आले की, त्याला सगळेच  पसंद करतात.  याचा त्याने फायदा घेण्याचे ठरवले. आता प्रत्येक टपालाला मागे तो एक केळ  घेऊ लागला. याचा एक फायदा त्याला होऊ लागला तो म्हणजे काम झाल्यावर त्याला अन्नासाठी भटकावे लागत नव्हते. आरामात गोळा केलेली केळी खाऊन लोळता येत होते.
     याचा परिणाम असा झाला की, टिमू हळूहळू  सुस्तावत  चालला. काम झाले की, गोळा केलेल्या केळींवर ताव मारून एखाद्या झाडावर सुस्त पडून राहू लागला. त्याच्याने त्याच्यातला चपळपणा कमी हो ऊ लागला. अंगमेहनत कमी झाल्याने  आळस चढत चालला.  कामावर दांड्या मारू लागला.  नंतर नंतर तर तो पक्का  कामचोर बनला. आजचे टपाल परवा द्या, चार दिवसांनी द्या, असा प्रकार करू लागला.   पुढे पुढे पैसेही मागू लागला.
     सगळ्यांच्या लक्षात आले की, टिमू आळशी बनला आहे. प्राण्यांकडून पैसे घेतो आहे. प्राण्यांनी मग एक सभा बोलावली. यात अनेकांनी टिमूच्या तक्रारी मांडल्या. कधी  आजाराचा बहाणा तर कधी कुठे जाण्याचा बहाणा करून  पैसे लाटतो.  झालं, सगळ्यांनी निर्णय पक्का केला. टिमूला काढून टाकायचं आणि बंडू अस्वलला त्याच्या जागी नेमायचं.  तेवढ्यात अप्पू हत्तीमध्ये पडत म्हणाला," आता कोणाला पोष्टमन नेमायचं नाही."
     एकदम सगळे ओरडले," पोष्टमन नेमायचा नाही तर आम्हाला पत्रे कशी मिळणार? आमच्या नातेवाईकांची ख्यालीखुशाली कशी कळणार?"
     अप्पू हत्ती म्हणाला," आपण सगळ्यांनी शहरात किंवा अन्य कुठे राहत असलेल्या  आपल्या नातेवाईक, आई-बाबा, भाऊ-बहीण या सगळ्यांना निरोप पाठवा कीथोडे दिवस तुम्ही पत्रे पाठवू नका. मग टिमू माकड काम नसल्याने आपोआप घरात बसेल. त्याला अद्दल घडेल."
     बंडू अस्वल म्हणाले," अप्पू, तुझी आयडिया मस्त आहे.पण शहरात कुणाला काही झालं तर आपल्याला निरोप कसा मिळेल?"
     सगळेच प्राणी ओरडले," हो हो, निरोप कसा मिळणार?"
     अप्पू हत्ती म्हणाला," अरे, जरा शांत राहा. माझं ऐका. आपण सगळ्यांनी मिळून ताकोबा वनात एक टेलिफोन बुथ बसवू.  बुथचा नंबर नातेवाईकांना देऊ. फोनवर नातेवाईकांशी आरामात बोलता येईल.  मग पत्रे येण्या-देण्याचा सवाल राहत नाही. आणि पोष्टमनची गरजच उरणार नाही.  हळूहळू आपण आपापल्या घरात टेलिफोन जोडून घेऊ शकतो."  ही आयडिया ऐकून सगळे प्राणी खूश झाले.
     ही गोष्ट टिमूच्या कानांवर गेली, तेव्हा तो मोठा अस्वस्थ झाला. त्याला आपली चूक कळली. पळतच तो सभेत पोहचला आणि सगळ्यांची क्षमा मागू लागला.  टिमूला आपली चूक कळल्याचे सगळ्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला माफ करून टाकले आणि आळस झटकून कामाला लागण्याची सूचना केली. आता टिमू पहिल्यासारखा चुस्तफुस्त राहू लागला. आता तो पैसेही कुणाला मागत नाही.  कुणाला वाचता येत नाही त्यांना पत्रेही वाचून दाखवू लागला.  ताकोबा वन आनंदात डुंबून गेले.                                                     - मच्छिंद्र ऐनापुरे, जत


शेरास सव्वाशेर

  एका वृद्ध शेतकर्‍याला तीन मुलगे होते. ते खूप कष्ट करायचे, तरीही घरातली गरिबी हटत नव्हती. मोठ्या मुश्किलीने  घराचा गाडा चालला होता. एक दिवस वृद्ध शेतकर्‍याने आपल्या तिन्ही मुलांना जवळ बोलावलं आणि म्हणाला, मी ऐकलंय की, शेजारच्या गावातील जमीनदाराला एका चाकरी माणसाची गरज आहे.तुमच्यापैकी कुणी तरी ती  चाकरी मिळवावी, त्यामुळे  आपले दैन्य मिटण्यास थोडी फार मदत होईल.
      बराच विचारविनिमय केल्यावर थोरल्या मुलानं जायचं ठरलं. थोरला मुलगा गेलाही, पण काही दिवसांतच उदासवाणा चेहरा घेऊन माघारी आला. त्यानं सांगितलं की, जमीनदाराने मजुरी तर दिली नाहीच, शिवाय काम येत नाही म्हणून परत हाकलून लावलं.  नंतर मधला मुलगा मोठ्या आत्मविश्‍वासानं जायला तयार झाला. सगळ्यांनी त्याला अनुमती दिली.पण तोही काही दिवसांतच  परत आला.जमीनदाराने त्याचीही थोरल्याप्रमाणेच बोळवण केली.
      हे पाहून धाकट्या मुलाला भयंकर राग आला. तो आपल्या वडिलांजवळ जमीनदाराकडे जाण्याचा हट्ट धरू लागला. धाकटा  वृद्ध शेतकर्‍याचा लाडका होता. परंतु, त्याच्या हट्टापुढे त्याचा निभाव लागला नाही. त्याने परवानगी दिली.
 धाकटा मुलगा जमीनदाराकडे गेला. त्याला जमीनदारने अपादमस्तक न्याहळले. मग म्हणाला, अच्छा! म्हणजे तू आता माझ्याकडे काम करणार ? मोठे भाऊ तर बिनकामाचे होते, आता तू तरी काय करणार आहेस?
 धाकटा म्हणाला, मला एक संधी द्या. मी मोठी मेहनत करून दाखवीन.
 जमीनदार म्हणाला, सांगितलेलं काम केलं नाहीस तर तुला मजुरीही मिळणार नाही, समजलास.
 मला मंजूर आहे, मालक, तरुण म्हणाला.
      काही दिवस जमीनदारने त्याला शेताच्या कामाला जुंपले. मग एक दिवस जमीनदार त्याला म्हणाला, इकडे लक्ष दे, घरामागच्या पहाडावर वेळूचं बन आहे. त्याची पालवी चारवायला बैलाला घेऊन ये. आणि लक्षात ठेव, पान तोडायची नाहीत. बैलाला झाडावर चढवून चारायचं.
      जमीनदार मनातल्या मनात आनंदला होता. विचार करत होता, याच्याने काही काम होणार नाही आणि आपल्याला इतक्या दिवसांची मजुरीही द्यावी लागणार नाही. तिकडे धाकट्याने वेळूच्या बुंध्याला बैल बांधला आणि चाबूक घेऊन बैलाला फटकारू लागला. वर मोठ्याने म्हणू लागला, अरे बैला, शेंड्यावर चढ... अरे बैला, शेंड्यावर चढ.
      बिचारा बैल वर चढणार कसा? तिथून जाणारे-येणारे लोक ती गंमत पाहायचे आणि हसत हसत निघून जायचे. ही  बातमी जमीनदाराला लागली. तो धावतच तिथे आला.म्हणाला, मूर्खा, त्या बैलाला मारून टाकतोस की काय?
 बघा ना मालक, हा निर्बुद्ध बैल झाडावर चढेनाच झालाय...!
      जमीनदार वरमला. त्याने आपला आदेश  मागे घेतला.पण तो मनातल्या मनात कुढत राहिला. तरुणही मनातल्या मनात म्हणाला, या कपटी राक्षसाला अशी अद्दल घडवतो की, सात जन्मात  विसणार नाही.
      आता जमीनदारने दुसरी चाल खेळली. तो म्हणाला, हे बघ, भाजीपाल्याची लागवड करायची आहे. पण ही लागवड माझ्या घरावर करायची. थंड हवा आहे, तू कोबी लावण्याची तयारी कर.
      जमीनदारने विचार केला होता की, कौलारू घरावर कोबी लावता येणार नाही आणि मग आपली मजुरी वाचेल. दुसर्‍या दिवशी तरुण कुदळ घेऊन घरावर चढला. तो खुदाईसाठी  कुदळीचे घाव घालू लागला.कौले फुटून  खाली पडू लागले. बर्‍याच उशीराने झोप झाल्यावर जमीनदार उठला. पाहतो तर घरात कौलांच्या तुकड्यांचा ढिग पडलेला. तो किंचाळून म्हणाला, अरे ये दुष्ट माणसा, तुला कौलं फोडायला कुणी सांगितली होती?
      तरुण अगदी नम्रतेने म्हणाला, मालक, कोबी लावायची असतील तर पहिल्यांदा खुदाई तर केली पाहिजे. आणि खुदाई करताना कौलं फुटणारच.
 जमीनदारने रागाने आपले दात-ओठ चावले. त्याचा हा डावसुद्धा उलटला. त्याने आपला आदेश मागे घेतला.तरुण खाली आला.
      जमीनदार त्याची मजुरी हडपण्यासाठी नवी युक्ती  शोधू लागला. काही दिवसांनंतर अचानक त्याच्या चेहर्‍यावर स्मित झळकले. तो तरुणाला म्हणाला, हे बघ, दुष्काळ पडला आहे. कडक ऊन्हामुळे  धान्याचं शेत  वाळून चाललं आहे. त्यासाठी तू त्याला उद्या घरी घेऊन ये. म्हणजे सावलीत सुखणार नाही.
 तरुण नेहमीप्रमाणे निश्‍चिंत होऊन म्हणाला, ठीक आहे मालक, जशी आपली आज्ञा.
      दुसर्‍यादिवशी पहाटेच तरुणाने जमीनदाराच्या घराचे दरवाजे तोडले. नंतर चौकट उखडून टाकली. मग कुदळ घेऊन भिंत पाडू लागला. जमीनदारच्या बायकोची झोप या खटखटीच्या  आवाजाने मोडली. पाहिल्यावर ती दंगच झाली. तिने त्याला खूप सांगितले, पण तो ऐकायला तयार नव्हता. भिंतींवर घाव घालतच सुटला. शेवटी ती भयभयीत होऊन जमीनदारला उठवायला गेली.
 जमीनदार घाबरून धावतच बाहेर आला. त्यानं पाहिलं की, दारं-खिडक्या आणि चौकट जमीनदोस्त झाली आहेत. भिंतीला भलं मोठं भगदाड पडलं आहे.तरुण कुदळ घेऊन भिंतीवर घाव घालत होता. जमीनदाराचा पारा चढला. तो अक्षरश: जीव तोडून किंचाळला.अरे देवा, काय रे केलंस तू हे? तुला दरवाजा-भिंत तोडायला कोणी सांगितलं होतं?
      तरुणानं न ऐकल्यासारखं केलं आणि आपलं काम सुरूच ठेवलं. हे पाहून जमीनदाराची सटकली. तो आरडत -ओरडत नाचू लागला. अरे, तुझा हात चालवायचा थांबव. हे काय करतो आहेस तू?
      तरुण शेतकरी त्याला म्हणाला, इतके ओरडता का आहात. तुम्हीच म्हणाला होतात ना की,  शेत घरात आण म्हणून. आता इतके मोठे शेत  एवढ्याशा दरवाजातून कसे बरं येणार? म्हणून...
      तरुणाने पुन्हा कुदळ हातात घेतली. तशी जमीनदाराच्या छातीतून कळ निघाली. तो काकुळतीला आला हात जोडून म्हणाला, अरे, बास्स कर बाबा! माझं घर नको तोडूस. यापुढं असली काम तुला सांगणार नाही.
      तीन वेळा हारल्यावर जमीनदाराला अक्कल आली. तरुण त्याच्या विचार-बुद्धीपेक्षाही पुढचा निघाला. त्या दिवसापासून पुन्हा म्हणून  कधी त्याने कुणाला धोका दिला नाही. आणि वर्षाच्या शेवटी तरुणाचा त्याची झालेली  सगळा मजुरीही  देऊन टाकली. (चिनी कथेवर आधारित)                                                                                          



Thursday, February 4, 2016

चोराच्या घरात चोरी


बालकथा
 एक चोर होता. त्याचे नाव होते करणकुमार. तो चोरी काही आज करत नव्हता, पण बहाद्दर आजपर्यंत एकदाही सापडला नाही. करणकुमारची बायको मात्र साधी आणि देवभोळी होती. घरकाम आवरलं की, ती पूजापाठाला बसायची. ती देवापुढे एकच मागणं मागायची, त्यानं तिच्या नवर्‍याला सदबुद्धी द्यावी आणित्याचा चोरीचा धंदा सुटावा. करणकुमार  चोरीचा माल तिच्यासमोर आणून टाकायचा, पण ती कश्शालाही हात लावायची नाही. नव्हे त्याकडे ढुंकूनही पाहायची नाही. उलट डोळ्यांत आसवे आणून म्हणायची, ङ्क तुम्ही ज्यादिवशी चोरी करणं सोडाल आणि कष्टाचे पैसे घरी घेऊन याल, त्याचवेळी त्याचा स्वीकार करीन. या हरामच्या वस्तूंना स्पर्शदेखील करणार नाही. पापाच्या कमाईत मी तुम्हाला अजिबात साथ करणार नाही. असेल ते आणि मिळेल ते शिळं पाकं खाईन. फाटकं-तुटकं लुगडं नेसीन आणि दिवस काढीन. माझ्या मुलांवर तुमच्या या पापाची सावलीदेखील पडू देणार नाही.
      बायकोच्या निश्‍चयासमोर करणकुमार  हतबल व्हायचा. त्याला खूप वाटायचं, आपण हा पापाचा धंदा सोडावा आणि मेहनतीचं काम करावं. पण हा त्याचा संकल्प दुसर्‍यादिवसापर्यंतहीटिकायचा नाही. शेवटी वळणाचं पाणी वळणाला जाणारच, नाही का?
      लग्नाअगोदर त्याची चंगळ होती. चोरी करून मिळवलेल्या वस्तू, पैसे मित्रांमध्ये राहून उधळून टाकी. लग्नानंतर त्याचे मित्र सुटले, परंतु चोरीचा धंदा काही सुटला नाही. त्याच्यापत्नीला-अनीताला आपला नवरा चोर आहे कळल्यावर फार मोठा धक्का बसला होता. पण ती सावरली. तिने घर सोडून जाण्याचा वेडेपणा केला नाही. उलट आपल्या पतीला सुधारण्याचा चंग बांधला. अर्थात तिच्या प्रयत्नाला अद्याप यश आले नव्हते, पण तिने प्रयत्न काही सोडला नाही.
      एका रात्रीची गोष्ट. करणकुमार  चोरी करायला बाहेर पडला होता. ती अमावस्येची रात्र होती. सगळीकडे काळाकुट्ट अंधार पसरला होता. डोळ्यांत बोटे घातल्यासारखी परिस्थिती होती. रात्रीच्या बारा वाजल्यापासून पहाटे तीनपर्यंत करण भटकतच होता. त्याला चोरी करण्याची संधीच मिळाली नाही. जिथं कुठं जावं तिथे कोणी ना कोणी जागा असे अथवा एखादा कुत्रा पहारा देत असे. शेवटी एका घरात त्याला संधी मिळाली आणि तो घरात घुसला. चोरी करण्यालायक असलेल्या वस्तूंची तो चाचपणी करू लागला. इतक्यात खोलीतल्या एका टेबलला जाऊन धडकला. टेबलावरच्या वस्तू खाली पडल्या आणि आवाज झाला. लगेच घरातले सगळे जागे झाले आणि तेबलाजवळ जमा झाले. ङ्कचोर चोरङ्ख म्हणून कोणी ओरडू लागले. करणकुमारने मात्र झटक्यात तिथून पळ काढला आणि रस्त्यावर आला. आज आपला दिवस वाया जाणार, असे करणला वाटू लागले.
      पुढे गेल्यावर तो दुसर्‍या एका गल्लीत घुसला. एका घरात तो अगदी काळजीपूर्वक शिरला. खोलीत दिवा जळत होता. एक व्यक्ती दु:खी मनाने मान खाली घालून चिंताग्रस्त बसला होता. त्याच्यासमोर एका कापडात देवाचा एक सोन्याचा मुकूट आणि दागदागिने पसरलेले होते.
      करणकुमार  माघारी फिरणार तोच आवाज आला,  मित्रा ये, आता परत चाललास कुठे? तू चोर ना! चोरी करण्याच्या इराद्यानेच आलाच ना?
      करणकुमार  जागच्या जागी थबकला. त्याला मोठं आश्‍चर्य वाटलं,तो त्याचा रागावला नव्हता. धावू न आला नव्हता. उलट  तो एखाद्या पाहुण्याने स्वागत करावे, तशाप्रकारे बोलत होता. त्याने इशार्‍यानेच करणला खाली बसायला सांगितले. 
      काहीसा घाबरलेला करणकुमार  मुकाट्याने त्याच्याजवळ जाऊन खाली बसला. ती व्यक्ती  म्हणाली, तुझ्यासारखाच मीदेखील चोर आहे.प्रत्येक वेळेला चोरी केल्यावर विचार करतो की आता हा चोरीचा धंदा सोडावा. चोरी म्हणजे पाप. अधर्म. कष्टानं कुणी तरी मिळवतं आणि आमच्यासारखे त्याच्याकडून लुबाडून नेतात. त्याला अडचणीत टाकतात. जरा विचार कर. किती लोकांचे शिव्याशाप आपल्याला मिळत असतील. म्हणूनच तर कुठलाही चोर सुखानं जगू शकत नाही.
      करणकुमार  म्हणाला,  मित्रा, तू म्हणतोयस ते खरं आहे. आपल्यातला आत्मा आतल्या आत आपला धिक्कार करतो. आपणच    आपल्या नजरेतून उतरलेले असतो. आणि घरच्या लोकांच्यातूनही. माझी बायको तर माझा आणि या नीच कामाचा तिरस्कार करते. चोरीच्या वस्तूंना स्पर्शदेखील करत नाही.
       मी तुझ्यापेक्षाही दुर्दैवी आहे. तुझी बायको तुझ्यासोबत राहते तरी पण माझी बायको तर मला कधीची सोडून गेली आहे. आणि जाताना तिने निक्षून सांगितलंय की जोपर्यंत तुम्ही चोरीचा धंदा सोडत नाही, तोपर्यंत या घरात पायदेखील ठेवणार नाही. माझं नाव श्रावणकुमार . जरा विचार कर, तो एक श्रावणकुमार होता, ज्याने  आपल्या अंध माता-पित्यांची सेवा केली. त्यांना कावडीत बसवून तीर्थयात्रा घडवून आणली. आणि मी एक असा श्रावणकुमार, जो नालायक आणि अधर्मी. मी मेल्यावर मला नरकातदेखील जागा मिळणार नाही.
      तू म्हणतोस ते बरोबर आहे, श्रावणकुमार. बरं तू हे समोर काय घेऊन बसला आहेस? हा सोन्याचा मुकूट आणि ही आभूषणं? करणकुमारने विचारले.
         अरे मित्रा, आज तर मी करंटेपणाचा कळस केला. मी एका मंदिरात गेलो होतो. काल कोणता तरी उत्सव होता. त्यामुळे देवाच्या मूर्तीवर सुवर्ण आभुषणं चढवली होती. मी मंदिराच्या दाराला लावलेले कुलूप तोडले आणि ही सगळी आभूषणं चोरून घेऊन आलो. आता माझा आत्मा माझा धिक्कार करतो आहे. अरे, देवादेखील सोडलंस नाहीसङ्ख अरे, हे शब्द घणासारखे माझ्या कानात आदळत आहेत. क्षणभरही माझं मन स्थिर नाही. भावनांचा नुसता कल्लोळ उठला आहे. काय करू आणि काय नाही, कळेनासम झालं आहे. आता तूच सांग, काय करू ते? श्रावणकुमार अतीव दु:खाने म्हणाला.
      करणकुमार म्हणाला,  माझ्यामते तू देवाची ही सगळी आभुषणं जिथे होती, तिथे ठेवून यावंस. सकाळी भक्तमंडळी मंदिरात जातील, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसेल. त्यामुळे तू आता घाई करावीस. कारण सकाळ व्हायला काही अवधीच राहिला आहे.
      पण मला मूर्तीचा शृंगार करता येत नाही. पहिल्यासारखी आभुषणं जिथल्या तिथे कशी बरं चढवता येतील मला? अरे, चोरी झाल्याचा संशयदेखील भक्तांना यायला नको. श्रावणकुमार म्हणाला.
      करणकुमार म्हणाला,  काळजी करू नकोस. या कामी मी तुला मदत करीन. मूर्तीचा शृंगार मला करता येतो. माझे आजोबा एका मंदिराचे पुजारी होते. पाहिलंस, त्यांचा हा नातू कसला पापी , चोर निघाला.
 बरं झालं बघ मित्रा, तुझ्या रुपानं देवच धावून आला. अरे पण, मी तुझं नावदेखील विचारलं नाही.
  मी करणकुमार
       दोघेही मुकुट आणि आभुषणं घेऊन मंदिराच्या दिशेने निघाले.
 ङ्ग आपल्याला लवकर जायला हवं. पाच वाजता मंदिराचा पुजारी पूजा-अर्चा करण्यासाठी उठत असतो. आता साडेतीन वाजले आहेत.चार-सव्वा चार वाजण्याच्या आत मूर्तीवर मुकूट आणि आभूषणं चढवायला हवीत. ङ्खङ्ख श्रावणकुमार म्हणाला.
 मंदिरात पोहचल्यावर दोघांनीही पाहिलं की सगळं काही ठीकठाक आहे. पुजारी अजून झोपलेला होता. मंदिरातल्या आभूषणांची चोरी झाल्याची वार्ता अजूनही कुणाला कळालेली नव्हती. करणकुमारच्यामदतीने श्रावणकुमारने देवाच्या मूर्तीवर मुकूट आणि आभूषणं चढवली.
      आता कुणीही म्हटलं नसतं की, मंदिरात चोरी झाली होती. दोघांनीही देवाला हात जोडले आणि आपल्या दुष्कर्माबद्दल क्षमा मागितली. आणि देवाला वचन दिलं की आता यापुढे कधीही चोरी करणार नाही. कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीन.
 मंदिराबाहेर आल्यावर श्रावणकुमार म्हणाला,  माझ्यावर जे पापाचं ओझं होतं, ते आता दूर झालं आहे. आता मला फार म्हणजे फार समाधान लाभतं आहे.
       ...आणि मलादेखील फार बरं वाटतं आहे. कारण ही जी वाईट गोष्ट मी सोडू शकत नव्हतो, ती सोडण्यास माझं मन तयार झालं आहे.  परमेश्‍वराने आपल्याला सदबुद्धी दिली आहे. आता मी मेहनत करीन आणि भल्या कामासाठी वेळ देईन.
 खरंच, प्रामाणिक माणूस म्हणून जगण्यात फार मोठा आनंद आहे. श्रावणकुमार करणकुमारला अलिंगन देत म्हटलं. चोरीचा धंदा सोडून नवं जीवन जगण्याचा संकल्प करून दोघांनेही एकमेकांचा निरोप घेतला.
      त्यानंतर खरोखरच करणकुमार आणि श्रावणकुमार  दोघांनी चोरीचा धंदा सोडून दिला आणि छोटा-मोठा व्यवसाय सुरू केला.परमेश्‍वराची कृपा म्हणा किंवा त्यांची अंगमेहनत म्हणा, पण दोघांच्याही धंद्याला चांगली बरखत आली. अल्पावधीतच ते शहरातले एक प्रतिष्ठित आणि श्रीमंत व्यापारी बनले. आता त्यांना लोक शेठ करणकुमार आणि श्रावणकुमार म्हणून ओळखू लागले.         
                                                                                                                               - मच्छिंद्र ऐनापुरे, जत




ऑस्कर विजेते ठक्कर


       सत्यजीत रे,भानु अथैय्या,रसुल पुकुटी,ए. आर. रेहमान आणि गुलजारनंतर ऑस्कर अवॉर्ड विजेत्यांच्या यादीत आणखी एक नाव आता सामिल झाले आहे. ते नाव म्हणजे मुंबईत वाढलेले राहुल ठक्कर. त्यांना चित्रसृष्टीतल्या तंत्रज्ञान उपलब्धीवर या अवॉर्डने गौरवले जाणार आहे.
      राहुल ठक्कर आपल्या मित्रांसमवेत डिनर करत होते. त्यांच्या मोबाईलवर रिंग वाजली.नंबर ओळखीचा नव्हता. त्यामुळे त्याकडे त्यांनी कानाडोळा करत पुन्हा मित्रांसमवेतच्या गप्पांमध्ये दंग झाले.पण काही सेंकदातच त्यांच्या फोनवर एक मेसेज आला. पीकअप द फोन, यु हॅव जस्ट वॉन एन ऑस्कर. (फोन उचला, तुम्ही ऑस्कर जिंकला आहात.) त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्‍वासच बसला नाही. त्यांनी तो मेसेज पुन्हा एकदा खात्रीने वाचला. आणि मग त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. आता ते देशातल्या काही मोजक्याच लोकांच्या यादीत समाविष्ठ झाले होते. त्यांनी सिनेसृष्टीतला मैलाचा दगड ठरणारा मानाचा ऑस्कर जिंकला होता. आणि त्यांना त्या अवॉर्डने सन्मानित केले जाणार होते.सिनेमाला तंत्रज्ञानाशी जोडणार्‍या अशा या व्यक्तीविषयी जाणून घेताना आपल्या काही वर्षे मागे जावे लागेल.
      7 जुलै 1984 रोजी अमेरिकेतल्या इलिनोइसमध्ये राहुल ठक्कर यांचा जन्म झाला. मात्र त्यांचे पालण-पोषण, शिक्षण वैगेरे मुंबईत झाले. त्यांची आई प्रभा ठक्कर एक शिक्षिका होती. आणि वडील चंद्रकांत ठक्कर अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक. सिनेसृष्टीशी त्यांची पहिली ओळख वयाच्या अवघ्या तिसर्‍या वर्षांपासूनच झाली होती. मुंबई टिव्ही, चित्रपट आणि रेडिओ क्षेत्रात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका निभावत असतानाच पुढे वॉइस आर्टिस्ट म्हणूनही काम केले. इथे त्यांनी मुंबई विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्सची पदवी संपादन केली. यानंतर ते ऍनिमेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात मास्टरकी मिळवण्यासाठी अमेरिकेत निघून गेले.
     1994 मध्ये राहुल यांनी न्युयॉर्कमध्ये कमर्शियलरित्या विज्युअल इफेक्टसमध्ये काम करायला सुरुवात केली. काही कालावधीनंतर ते अमेरिकी फिल्म प्रॉडक्शन कंपनीच्या ड्रीमवर्क्सवर काम करायला सुरुवात केली. ते रिसर्च अँड डेवलपमेंट टीमचा हिस्सा बनले.इथे त्यांनी आणि त्यांचा सहकारी रिचर्ड चुआंग मिळून एक डिझाईन बनवलं. आणि विशेष म्हणजे या डिझाईनमुळेच त्या दोघांना  हा मानाचा ऑस्कर जाहीर झाला आहे. सायंटिफिक ऍन्ड टेक्निकल कॅटॅगिरीतला हा पुरस्कार 13 फेब्रुवारीला दिला जाणार आहे. बाकी अन्य श्रेणीतले ऑस्कर पुरस्कार 28 फेब्रुवारीला दिले जाणार आहेत. यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली होती.त्यांनी तयार केलेल्या ग्राऊंड ब्रेकिंग टेक्नॉलॉजीचा वापर 30 पेक्षा अधिक हॉलीवूड चित्रपटांमध्ये केला गेला आहे. यात एंटज,श्रेक,मॅडागास्कर, हाऊ टू ट्रेन यॉर ड्रॅगन, कुंग फू पांडा, लिजेंड ऑफ बॅगर वान्स, फोर्स ऑफ नेचर, मिशन इम्पॉसिबल-2 यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. राहुल आणि रिचर्ड यांनी बनवलेल्या तंत्रज्ञानामुळे उच्च दर्जाचे ऍक्शन चित्रपट बनवले जाऊ शकतात. चित्रपट निर्मितीदरम्यान कोणताही शॉट हाय रिजॉल्युशनमध्ये त्याचवेळी पाहिला जाऊ शकतो. याशिवाय यात हाय क्वालिटी ऑडियो आणि स्पीड चेंज कंट्रोलसारखे फिचरदेखील अंतर्भूत आहेत.
      ड्रीमवर्क्समध्ये काम केल्यानंतर राहुल यांनी ऍनिमेशनशी संबंधित ़विविध विभागातही काम केले आहे.यात पार्टीकल इफेक्ट्स, थ्रीडी, नेटवर्क मिडिया, थिएटर डिझाईन,प्लेबॅक सिस्टम आदींचा समावेश आहे. त्यांना प्रोडाक्ट डिझाईन आणि रिसर्च क्षेत्राचा 20 वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते अमेरिकी क्लाऊड क्ंप्युटिंग कंपनीच्या ब्राइयो सिस्टमध्ये रिसर्च ऍन्ड डेवलपमेंट विभागात वाइस प्रेजिडेंट आहेत.                                 



Monday, February 1, 2016

रस्त्यांवरील नियम पायदळी


      रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली आहे. शहरांबरोबरच ग्रामीण भागातदेखील वाहनांना काही तोटा नाही. वाहनाचा आरटीओकडून वाहन परवाना मिळवण्यापासून वाहतुकीच्या नियमांचे आणि कायद्याचे उल्लंघन सुरू असल्याचे दिसून येते. प्रत्यक्ष रस्त्यावर वाहन चालवताना तर पाहायलाच नको. रस्त्यावरचे सगळेच नियम पायदळी तुडवले जात आहेत. आज सर्वत्र श्रीमंतीचे प्रमाण वाढल्याने तसेच अत्यंत अल्प रक्कम देऊन कर्जाने गाडी मिळत असल्याने दुचाकी तसेच कार घेण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. मात्र, नियमांचे पालन करताना कमीच आढळतात.
      ग्रामीण भागातदेखील वाहने भरारा धावत असतात. शहरी अनुकरण गावातही होत आहे. कॉलेज युवक फिल्मी स्टाईलने वाहन चालवून पोरींवर इंप्रेशन पाडत असतो.कॉलेज परिसर, पिकअप शेड,चौक अशा मोक्याच्या ठिकाणी ही मंडळी वाहनासह गर्दी करून उभी असतात. रस्ते अडवले जातात. याबाबत कोणी जाब विचारला तर तुझ्या बापाचा रस्ता आहे काय? असे मग्रुरीने ओरडत त्याच्याच अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडत असतात. मुलींसमोर इन्सल्ट झाल्यावर तर मग बघायची सोय नाही. विचारणार्‍या बोकलूनच काढले जाते. साध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्वकियांना यश मिळाले तर वाहनांची पुंगळी काढून गावभर कर्णकर्कश आवाजात फेरी मारली जाते. लोकांना त्याचा त्रास होतोय, याची जाणीवदेखील त्यांना नसते. मग लोकांना वाटते, का म्हणून त्याला निवडून दिले.पण वेळ गेलेली असते.
      शहरात रस्ता नियमांची पायमल्ली होत असते, त्याकडे लक्ष द्यायला आरटीओ आणि पोलिसांना लक्ष देता येत नाही,तिथे ग्रामीण भागातील काय तर्‍हा.

       शहरात सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणे, पदपथावरून दुचाकी नेणे, गाडी सुरू असताना फोनवरून बोलणे, कारणाशिवाय हॉर्न वाजवणे, सीट बेल्ट न बांधणे, हे सगळे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविले जातात. भारतात तर दुचाकी म्हणजे तरुणांना सायकलच वाटते. बाईक आणि गाड्यांचा हॉर्नही कधीकधी एकसारखाच असतो. त्यामुळे पाठीमागून गाडी येतेय की, दुचाकी हे काही कळायला मार्ग नसतो. कधी वाहनाचा हॉर्न इतका कर्कश असतो की, पादचार्‍यांना आणि इतर वाहनचालकांना क्षणभर कळत नाही की, कशाचा आवाज आहे? पादचारी दचकून थबकतात तर वृद्धांच्या हृदयाचे ठोके चुकतात. शहरांमध्ये सिग्नलवर दुचाकी व कारांचा खच दिसून येतो. येथे अन्य वाहनांसाठी थांबायला जागाच नसते. कारच्या संख्येत वाढ झाल्याने रस्त्यावर डावीकडून उजवीकडे कारच कार दिसून येतात. नियमाप्रमाणे उजवीकडील जागा कार किंवा इतर चारचाकी वाहनांची असावयास हवी. त्याबाजूला दुचाकी व सायकलींची जागा असायला हवी. मात्र, कुठेही वाहतुकीचे नियम पाळले जाताना दिसत नाही.  पाश्चिमात्य देशांत वाहतुकीचे कायदे, नियम पाळणे ही त्यांची संस्कृती बनली आहे आणि कायदे तोडणे ही भारतीयांची संस्कृती बनली आहे. भारतात वाहतुकीचे नियम नव्या नव्या शक्कल वापरून कसे तोडले जातात, हे बघतच नवी पिढी मोठी होते. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले तर सीसीटीव्हीतून चित्रीकरण करून त्याचे नाव-गाव व फोटोसह त्याच्या घरी दंडाच्या रकमेची पावती पाठवून दंड वसूल केला जाईल, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी म्हणाले होते. मात्र, आज तसे होताना दिसत नाही. सर्वत्र वाहतुकीचे नियम सर्रास तुडविले जात आहेत.  

बंधारे बांधण्यावर भर हवा


      राज्यात अलिकडच्या काळात शेकडो कि.मी. लांब असलेल्या धरणातून शेतीसाठी पाणी आणले जाते, अशी अवास्तव मागणी, अपेक्षा निर्माण झाली आहे. वास्तविक राज्यात सर्वच भागात त्या त्या भागात पुरेल एवढा पाऊस दरवर्षी पडतो. काही प्रमाणात विदर्भ, मराठवाडा भागात कमी पाऊस पडतो. तिथे पडणार्‍या पावसापैकी साधारण 10% टक्के पाणीही अडवल्या जात नाही.ही वस्तुस्थिती आहे.  दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली की तात्पुरत्या उपाययोजना करण्यासाठी भरमसाठ पैसा खर्च करण्यात येतो व वेळ निभावून नेण्यात येते. सन 1972 च्या भयानक दुष्काळी परिस्थितीत गावागावांमध्ये विहिरी खोदण्यात आल्या होत्या.  मोठमोठया सामूहिक विहिरी पिण्याच्या पाण्यासाठी व ओलिताखाली उपयोगात येतील हा त्या मागचा उद्देश होता. त्या विहरींना बर्‍याच ठिकाणी भरपूर पाणी लागले. परंतु त्यांचे बांधकाम पूर्ण न करता त्यावर  त्यावर पंप बसविण्याचे काम अर्धवट सोडून दिले. त्यामुळे त्यावर केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च व्यर्थ गेला व समस्या तशीच कायम राहिली. एवढा प्रचंड खर्च होऊनही पिण्याच्या किंवा ओलिताच्या पाणयाचा प्रश्न सुटला नाही. आज अनेक गावात ही विहिरी, आढे दिसतात. त्यांची सध्याची आवस्था खूपच बिकट आहे. ही आढे सुस्थितीत केली तर अजूनही त्याचा उप्योग हो ऊ शकेल. मात्र बोअरच्या जमान्यात त्याकडे कुणाचेही लक्ष नाही.
      खरे तर धरणाच्या रूपात केंद्रिय जलस्रोत निर्माण करण्याऐवजी विकेंद्रित जलसाठे निर्माण करणे आवश्यक आहेत. म्हणजे गावागावात नद्या, नाल्यावर ओढयावर शेतीवर आसोड डोंगरपायथ्याशी, डोंगरावर अशा ठिकठिकाणी जलसंधारणाचे छोटे, छोटे प्रकल्प उभे करावेत. असे केल्याने पावसाचे जास्तीत जास्त पाणी त्या भागात, त्या गावात अडविल्या जाऊन त्याचा वापर त्याच गावात होईल. छोट्या प्रकल्पांना खर्च कमी येतो. पाणलोट विभागाची कामे करताना शेततळे, सिमेंट बंधारे, कोल्हापूर टाईप बंधारे, नाले, खोलीकरण करणे, रुंदीकरण करणे, साठवण बंधारे, जुन्या बंधार्‍यांची दुरुस्ती त्यांचे नुतनीकरण करण्यात आले. लहान बंधारे, जुने बंधारे, जुनी तळी, तलाव यातील गाळ काढण्यात यावा. जेथे जेथे शुद्ध असेल त्याठिकाणी नद्याजोडणी कार्यक्रम तज्ज्ञांच्या सल्यानुसार राबविण्यात यावा. कृष्णा व गोदावरी या दोन नद्यांचा संगम घडवला गेला. गोदावरी नदीचे पाणी कृष्णा नदीमध्ये सोडण्यात आले. या प्रकल्पामुळे आंध्र प्रदेशातील लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. देशातील दुष्काळग्रस्त भागासाठी नदीजोड प्रकल्प उपयोगाचे असून यापुढे दुष्काळग्रस्त भागाला तर पाणी मिळेलच परंतु पुरामळे नुकसान होणार्‍या प्रदेशातील पाणी वापरले गेल्यामुळे येथील पुराचा धोका कमी होईल. अशा महाराष्ट्रातील अनेक जिल्हे दुष्काळाने होरपळून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने नद्या जोड प्रकल्पाला पढाकार घेणे गरजेचे आहे.
      आताच्या  मोदी सरकरने  नद्या जोडणी प्रकल्पाचे काम हाती घेतले असून त्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. त्याचे प्रत्यंतर आंध्रप्रदेशात झाले आहे. नद्या जोडणीमुळे ज्या भागात नद्यांना महापूर येतो त्या भागाचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्यात येणार आहे. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना नद्या जोड प्रकल्पाला प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे बर्‍याचशा नद्यांचे नाल्याचे पाण्याचे रीसायक्लींग झाल्यामुळे लहानही नद्यांना, विहरीचे भुगर्भाचे पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे ओिलतांमध्ये वाढ जाली. हिरव्या चार्‍यामुळे गाई, म्हशीच्या दुधात वाढ झाली. मत्स्योत्पादनात वाढ झाली. धरणाकरिता शेतकरी जमिन धारकाच्या जमिनी नाहीत. त्यामुळे लहान प्रकल्पालाच प्राधान्य द्यावी. त्या प्रकल्पाचे काम व देखभाल योग्य प्रकारे व्हावे. ऊस लागवडमध्ये ठिबक सिंचन व्हायला हवे.कमी पाण्यात येणारे ऊस, तूर पिकांमध्ये मोठया प्रमाणात वाढ व्हावी.