Monday, January 2, 2017

कुठं जातात बालकलाकार?


     बर्‍याच अवधीनंतर बजरंगी भाईजान मधून एका बालकलाकाराचा दमदार अभिनय आपल्याला पाहायला मिळाला. खास मुलीसाठी ती व्यक्तिरेखा लिहिली गेल्यानं त्या चित्रपटाला तितकंच महत्त्वही आहे. जवळजवळ दहा वर्षांपूर्वी बालमानसिकतेवर आधारित तारें जमीं पर हा अमिरखानचा चित्रपट आला होता.त्यात बालकलाकाराचा वाखानण्यासारखा अभिनय पाहायला मिळाला होता. या दरम्यानच्या काळात अमोल गुप्ते,विशाल भारद्वाज,प्रियदर्शन आदींनी बालकलाकारांना घेऊन चित्रपट केले होते. परंतु, त्यांचा व्यापक असा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला नाही.कदाचित हा काळाचा आणि परिस्थितीच्या संक्रमणाचा परिणाम असू शकेल.गेल्या दोन दशकात चित्रपट आणि टीव्ही यांच्या भूमिकांमध्ये आदलाबदली झाली आहे.टीव्ही मालिकांमध्ये बालकलाकार मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत तर चित्रपटांमध्ये त्यांचे अस्तित्व नगण्य दिसत आहे. मुलांची मानसिकता आणि त्यांच्या आकांक्षांची पूर्ती टीव्ही मालिका किंवा टीव्ही शोमधून होत असावी.
     सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितींचा प्रभाव नेहमीच चित्रपटांवर राहिला आहे.फक्त त्याचा अंदाज बदलत आला आहे.अलिकडे जे काही चित्रपट बनवले जात आहेत,त्यात अ‍ॅक्शन आणि भव्यता याला अधिक प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे अशा चित्रपटांमध्ये बालकलाकारांना काम करण्यासारखं काही शिल्लक राहिलंच नाही. काही चित्रपटांमध्ये मात्र मुलांना आत्मा, भूतबाधा यांच्या प्रभावाखाली दाखवून त्यांना तेवढ्यापुरतं सिमित करून टाकलं गेलं. अथवा नवरा-बायकोच्या नातेसंबंधात तिसर्‍याची एन्ट्री दाखवून परिस्थिती तणावपूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला.त्यात त्याला परिस्थितीचा मूकदर्शक दाखवला गेला. मुलांच्या मानसशास्त्रावर आधारित किंवा त्यांच्या स्वाभाविक आयुष्यावर आधारित फारच थोडे चित्रपट निघाले. आता तर ही परंपरा आणखीणच संकुचित झाली आहे. शंभर वर्षाच्या चित्रपट प्रवासात बालपण हा अविभाज्य भाग राहिला आहे.प्लॅशबॅकदेखील महत्त्वाची भूमिका पार पाडत आला आहे. 1913 मध्ये बनलेला दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्‍चंद्र या चित्रपटापासून ही नाळ जोडली गेलेली आहे.ती आजही कायम आहे. त्यावेळच्या चित्रपटात राजा हरिश्‍चंद्राच्या मुलाची भूमिका दादासाहेब यांच्या मुलीने केली होती.1950 च्या दशकात तर कौटुंबिक चित्रपटांच एक वावटळच सुटलं होतं.त्यात नात्यांच्या कलहाचा नाटकीपणा एवढ्या मोठ्या प्रमाणात दाखवण्यात येत असे की, त्यामुळे नायिकेच्या डोळ्ंयात अश्रूंचा पूर यायचा. त्या काळात भावनिक आणि मार्मिक अंदाजात चित्रपट बनवले गेले. नवरा-बायकोंमधला बेबनाव, बायकोच्या चारित्रावर संशय, त्यासाठी कुटील डावाची पेरणी, तसेच सासू-सुनेचा कलहाचा, अथवा जिव्हाळ्याचा विषय अशा चित्रपटांमध्ये मुलांच्या भूमिकांना अधिक महत्त्व आसायचे.त्यामुळे साहजिक बालकलाकारांचे महत्त्वही वाढले.लोकप्रियता वाढली. आपोआप मागणीही सुधारली.पण ही प्रथा-परंपरा फार काळ चालली नाही. पुढे रोमांटिक चित्रपटांचा काळ आला, त्यात मुलांच्या अस्तित्वाला थाराच राहिला नाही.चहावाला किंवा घरातला नोकर असल्या सटरफटर भूमिकांमध्येच बालकलाकार अडकले.मात्र त्यात कॉमेडीचे कारंजे उडायचे.शोले आणि जंजीरसारख्या मारझाड चित्रपटांमुळे बालकलाकारांची उपस्थिती औपचारिकच राहिली. यादों की बारात या चित्रपटाने याची सुरुवात केली होती. पण अमिताभ बच्चन यांच्या उदयानंतर त्यात आणखी वाढ होतच गेली. चमाणिक पोलिस अधिकारी,सरकारी अधिकारी, नैतिकतेचा पाठ शिकवणारा खेड्यातला शिक्षक, गावातला जमीनदार किंवा मील-मालक यांच्या शोषणाविरोधात आवाज उठवणारा मजदूर आपल्या कुटुंबासह चित्रपटांमध्ये दाखवला जाऊ लागला. अशा बुराई आणि अन्यायाला वाचा फोडणार्‍या प्रामाणिक माणसाला  आपली किंमत आपला जीव देऊन चुकवावा लागे.पुढे कित्येक वर्षे असाच पॅटर्न येत राहिला. अशा चित्रपटांचा रतीब काही काळ घातला गेला. अशा चित्रपटांमध्ये बालकलाकारचे अस्तित्व चार-पाच मिनिटापुरतेच असायचे. अख्ख्या कुटुंबाची राख रांगोळी व्हायची त्यात एकादा मुलगा जिवंत राहायचा आणि तो मोठेपणी त्यांचा बदला घ्यायचा.तेवढीच बालकलाकाराची भूमिका पडद्यावर दिसायची.काही मोजक्याच चित्रपटात बालकलाकारांना व्यापक आणि मजबूत अशी भूमिका मिळायची,पण असे चित्रपट हाताच्या बोटावरच असायचे.
     रस्त्यावर आयुष्य काढणार्‍या अनाथ मुलांच्या संघर्षावर आधारित 1954 मध्ये प्रकाश अरोरा यांनी दिग्दर्शित केलेला राजकपूर यांचा बुट पॉलिश नावाचा चित्रपट आला होता. त्यात नाझ आणि रतनकुमार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. कितीही अडर्चीी आल्या तरी दु:खपिडा यांचा अंगिकार करून आनंदी जीवन कसं जगायचं, असा संदेश देणारा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. कब से बैठे आस लगाए,हम मतवाले पालिसवाले किंवा नन्हें मुन्ने बच्चे तेरे मुठ्ठी में क्या है... ही गाणीदेखील सहारणीय होती.
     मुलांना केंद्रस्थानी ठेवून बचपन (1970),बालक (1969), बिन मां के बच्चे (1983), नैनिहाल (1967),विद्यार्थी (1968) सारखे काही चित्रपट आले, पण यातले बरेच चित्रपट अतिनाटकीयतेचे बळी ठरले. मुलांच्या स्वाभाविक समस्यांपर्यंत ते पोहचू शकले नाहीत.उद्देशपूर्ण बनणार्‍या चित्रपटांसाठी आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने 1960 मध्ये फिल्म वित्त निगमची स्थापना करण्यात आली. त्याच्याही अगोदर म्हणजे पाच वर्षांपूर्वी सरकारने बालचित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी बाल चलचित्र मंडळाची स्थापना झाली होती.याचवर्षी सत्यजीत रॉय यांचा पथेर पंचोली प्रदर्शित झाला होता.नंतर या मंडळाचे नाव बदलून चिल्ड्रन फिल्म सोसायटी असे ठेवण्यात आले.या फिल्म सोसायटीच्या आर्थिक सहाय्यावर काही चित्रपट तयार झाले.मात्र अशा चित्रपटांमधील विशुद्ध मनोरंजनाची जागा ज्ञानवर्धक व प्रेरणादायी विषयांनी घेतली. 55 वर्षात चिल्ड्रन फिल्म सोसायटीच्या अर्थसहाय्यावर जवळपास साडेचारशे चित्रपटांची निर्मिती झाली, पण अशा चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात न आल्याने हे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचलेच नाहीत. आता तर आर्थिक लाभाचे गणित बदलले असल्याने सरकारी मदतीवर चित्रपट बनायचे बंदच झाले. अलिकडे केव्हा तरी क्वचितच बालचित्रपट बनवले जातात. यातला सगळ्यात उल्लेखनिय चित्रपट म्हणजे तारें जमीं पर! या निमित्ताने अमिरखान पहिल्यांदाच दिदगदर्शक बनला. याच चित्रपटाच्या धर्तीवर पाठशाला नावाच चित्रपट निघाला, पण तो हास्यास्पद अधिक ठरला. भूतनाथ,तारा रम पम पम, चिल्लर पार्टी अशा काही चित्रपटांमध्ये आजच्या पिढीतल्या मुलांच्या मानसिकतेला हात घालण्यात आला होता. प्रियदर्शन यांनी बम बम भोले मध्ये बालभावनांना मार्मिकपणे टिपण्याचा प्रयत्न केला. पण एक तर हा चित्रपट म्हणजे इराणी चित्रपटाची सही सही नक्कल होती आणि दुसरंम्हणजे विषयानुरुप वातावरण आणि परिस्थिती तयार करण्यात हा चित्रपट यशस्वी झाला नाही. आणखी काही चित्रपटांमध्ये आयएम कलाम, नन्हा जैसलमेर, मकडी,ब्लू, अंब्रेला आंइ स्टेनले का डिब्बा सारख्या चित्रपटांनी रुचिपूर्ण प्रवाह कायम ठेवण्याचा जरूर प्रयत्न केला, पण हे चित्रपट प्रेक्षकांच्या मनाची पकड घेऊ शकले नाहीत.
     एक काळ असा होता की,  बालकलाकाराच्या रुपात करिअरची सुरुवात करणारे काही कलाकार पुढे जाऊन मोठेपणी चांगली ख्याती मिळवली. नरगीस, मीनाकुमारी, मधुबाला,सुरैया, राजकपूर, शशीकपूर, अमिरखान, हृत्विक रोशन यांनी बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली. पण यापैकी नरगीस आणि मीनाकुमारी सोडल्यास बालाभिनयात कोणीही प्रतिष्ठा मिळवू शकले नाही. त्यांनी त्यावेळी अभिनयाचे करिअर गंभीरपणे घेतले नाही किंवा तेवढी त्यांची बौद्धिक कुवत नव्हती. त्यामुळे छंद, शौक या अर्थानेच त्यांची पडद्यावर आपला चेहरा दाखवला.शशी कपूर यांना सोडल्यास आंअळी कोणालाही बालकलाकाराच्या रुपात दमदार आणि महत्त्वपूर्ण भूमिका मिळाल्या नाहीत.
     अर्थात हे एकादृष्टीने बरेच म्हणायला हवे. नाही तर त्यांची बालकलाकार म्हणून एखादी छबी निर्माण झाली असती तर मोठेपणी त्यांना त्यातून बाहेर पडता आले नसते आणि तीच त्यांची छबी यशाला अडसर ठरली असती.जे बालकलाकाराच्या रुपात प्रतिष्ठा मिळाली, लोकप्रियता लाभली, त्यांना शेवटी एका मर्यादेपर्यंतच यश मिळाले. त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले,पण जसे त्यांचे बालपण संपुष्टात आले, तसे त्यांच्या मागणीलाही ब्रेक लागत गेला. बालकलाकार म्हणून काम केलेल्या मुलींना तर फारच मोठ्या अडचणी आल्या.मुलगी ते युवती या प्रक्रियेत देजी इराणी, हनी इराणी, बेबी फरिदा, तबस्सुमसारख्या कित्येक अभिनेत्री पुढे गायबच झाल्या. बालसुलभतेचे जे रंग त्यांनी उधळले, तेच रंग त्यांच्या मोठेपणी कमजोरीचे ठरले. चिराग कहां, रोशनी कहां यासह डझनभर चित्रपटांमध्ये आपल्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी जादू बिखेरली आणि मासूमपणा उधळला, त्याच डेजी इराणीला मोठेपणी बहिणीच्या छोट्या छोट्या भूमिका मिळत गेल्या. आणि त्याही मोजक्याच. काही दिवसांपूर्वी एका चॉकलेटच्या जाहिरातीत आणि एका टीव्ही मालिकेत पाहुणी कलाकार म्हणून ती दिसली. तिची बहीण हनी इराणी बालकलाकारापर्यंतच मर्यादित राहिली. लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांच्याशी विवाह केल्यानंतर त्यांनी अमानत आणि लम्हेंसारख्या चित्रपटांचे लिखाण केले. बालपणीच्या तबस्सुमची अखंड बडबड सगळ्यांनाच भावली पण किशोर अवस्थेत पोहोचेपर्यंत ती तिच्यासाठी अयोग्य बनली. पण त्यांनी आपल्या गुणांचा वापर मंचावर चुटके ऐकवण्यासाठी व रेडिओवर कार्यक्रम करताना बेखुबीने केला. फिल्मी हस्तींबरोबरचा त्यांचा गप्पागोष्टींवरचा फुल खिले गुलशन गुलशन हा कार्यक्रम मात्र चांगला चालला. पण तिच्या अभिनयाची गाडी पुढे सरकली नाही.काही वर्षांपूर्वी आलेल्या चमेली की शादी या चित्रपटात एका छोट्याशा भूमिकेत त्या दिसल्या.
     आखरी खत या चित्रपटात अवघ्या एक वर्षाच्या बॉबीला पुढे बालकलाकर म्हणून मान्यता मिळाली नाही. महेश बाल अभिनयानंतर राजा और रंकमध्ये दुहेरी नायकाच्या भूमिकेत दिसला, पण पुढे त्याचं नाणं चाललं नाही. अलंकारचीही अवस्था अशीच होती. त्याची बहीण पल्लवी, तिचा बालपणातला मासूमपणा पुढे युवावस्थेत तिच्यासाठी अवगुण ठरला. अनुरागमुळे चर्चेत आलेल्या सत्यजीतला पुढे पहेलीमध्ये नायक बनण्याची संधी मिळाली. पण त्यानंतर त्यांच्या अभिनयाची गाडी शोला और शबनम आणि दुलाराच्या चरित्र भूमिकांमध्येच अडकली.
     सचिन, सारिका, सोनिया, राजू श्रेष्ठ आदी 1970 च्या दशकातले सर्वात यशस्वी आणि लोकप्रियता पावलेले बालकलाकार. यातल्या राजूने सगळ्यात जास्त चित्रपट केले. पण त्याला नायक बनण्याची संधी मिळाली नाही.चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये सहाय्यकाच्याच भूमिका त्याच्या वाट्याला आल्या. सचिन मात्र मोठेपणी अपेक्षेपेक्षा अधिक चालला. मराठी चित्रपटात तर तो यशस्वी नायक, यशस्वी दिग्दर्शक,गायक आणि अशा बर्‍याच भूमिकेत यशस्वीरित्या वावरला. सोनियाचे बालकलाकार म्हणूनचे करिअर दो कलियां,वारिससारख्या तीन-चार चित्रपटांपुरते मर्यादित राहिले.  बालपणी त्यांनी आपली प्रतिभा दाखवूनही त्या बालकलाकारांना पुढे तीच प्रतिभा मोठी अडथळ्याची ठरली. आणि ते लहानाचा मोठा होईपर्यंतच्या प्रक्रियेत सगळे हरवून गेले. -

1 comment:

  1. प्रसिद्धी, आणि लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असण्याची सवय, महत्त्वाकांक्षा अतिशय प्रभावी ठरत असते. तुमचे संपूर्ण आयुष्य, तुमचे व्यक्तिव बदलून टाकण्याची क्षमता या महत्त्वाकांक्षेमध्ये असते. जसजशी प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळत जाते, तसतसा त्यांचा हव्यास अजूनच वाढत जातो. बाल कलाकार देखील या भावनेपासून लांब नाहीत. आधीच लहान मुले सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात. त्यातून टीव्हीवर किंवा चित्रपटामध्ये लहान मोठय़ा भूमिकांमध्ये झळकणारे बाल कलाकार सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरत असतात. अश्या या बालकलाकारांचे आयुष्य वास्तवात कसे असते, हा कुतूहलाचा विषय आहे.
    या बालकलाकारांचे देखील कामाचे वेळापत्रक ठरलेले असते. त्यात्या वेळी चित्रीकरणासाठी त्यांना सेटवर उपस्थित असावे लागते. आजकालचे सेट वातानुकुलित असल्याने उन्हाळ्याचा विशेष त्रास जाणवत नाही. अनेकदा चित्रीकरण होणार असलेले सेट या कलाकारांच्या घरांपासून दूर असल्याने घरून सेटवर रोजची ये-जा करणे शक्य होत नाही. अश्यावेळी इतर कलाकारांप्रमाणेच बाल कलकार देखील चित्रीकरणाच्या ठिकाणी जवळपास मुक्काम करतात. अनेकदा हा मुक्काम एखाद्या महिन्यापयर्ंत ही लांबतो. त्यामुळे ही बालकलाकार त्यांच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणे शाळेत जाऊ शकत नाहीत, खेळण्यासाठी किंवा फिरायला जाण्यासाठी वेळ देऊ शकत नाहीत.
    काही बालकलाकार तर महिन्यांमागून महिने शाळेतून गैरहजर असतात. पण त्यांच्या शाळांना त्यांच्या गैरहजेरीचे कारण माहिती असल्यामुळे परीक्षेसाठी बसण्यास विशेष अडचणी येत नाहीत. ह्या बालकलाकारांचे वकिर्ंग अवर्स देखील लांब आणि कंटाळवाणे असतात. त्याचा ताणही या छोट्या मुलांवर अधून मधून दिसून येत असतो. साधारण बारा तासांच्या शिफ्टमध्ये हे कलाकार काम करीत असतात.
    या बालकलाकारांच्या सोबत बहुतेक वेळी त्यांचे पालक ही असल्याने त्यांच्या तब्येतीची, खाण्यापिण्याची योग्य ती काळजी घेतली जाते. तसेच हे कलाकार सातत्याने शाळेमधून गैरहजल असल्याने त्यांचा अभ्यास करून घेण्याची जबाबदारी देखील पालक घेत असतात. इतके धकाधकीचे आयुष्य जगताना देखील हे बालकलाकार खुश दिसतात. आपल्याला कराव्या लागणार्‍या मेहनतीबद्दल त्यांची कोणतीच तक्रार दिसत नाही. या बालकलाकारांना एका दिवसाच्या कामासाठी साधारण पंचवीस हजार रुपये मोबदला मिळतो.

    ReplyDelete