Thursday, February 23, 2017

नवसाला पावणारी आंगणेवाडीची भराडीदेवी


     कोकणात भराडीदेवीचे प्रस्थ मोठं आहे. कोकणात शंभराहून विविध यात्रा भरतात,मात्र यात सगळ्यात मोठी यात्रा (इथे जत्रा हा शब्द रुढ आहे) भराडीदेवीची भरते.सर्वसामान्यांबरोबरच राजकीय मंडळी मोठ्या प्रमाणात नवस मागायला आणि फेडायला येतात. सुरुवातीला काही हजारांत भरणारी जत्रा आता 12 लाखांहून भाविकांच्या उपस्थितीत भरते. कोकणातल्या अधिक भावीक बाहेरचे असतात. आंगणेवाडी येथील भराडीदेवीचं मंदिर सिंधुदूर्ग जिल्ह्यातील एक जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं.मालवणपासून फक्त 15 किलोमीटर अंतरावर एका माळरानावर श्री भराडीदेवी यात्रा भरते.जत्रा दोन दिवस चालते.श्रद्धा आणि नाविन्यतेच्या या जत्रेला गेल्या काही वर्षांत ग्लॅमर मिळालं आहे, ते राजकारण्यांमुळे! कोकणातले राजकारणातले बडे प्रस्थ आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे तर नित्यनेमाने न चुकता या यात्रेला येत असतात.
     भराडीदेवीच्या या जत्रेचं संपूर्ण नियोजन आंगणेवाडीतील ग्रामस्थच करतात. आंगणेवाडीत सगळे आंगणेच आहेत. आपल्या गावावर देवीचा वरदहस्त आहे,या भावनेतून काही वर्षांपूर्वी सर्व आंगणेवाडीवासिय एकत्र आले आणि त्यांनी देवीच्या देवस्थानाकडे व तिच्या जत्रेकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. तेव्हापासून देवस्थानची आणि आंगणेवाडी गावाची भरभराट झाली. देवीची ही कृपा स्मरूनच देवीच्या जत्रेला सर्व आंगणेवाडीवासिय झाडून संपूर्ण कुटुंबियांसह हजर असतात. या जत्रेच्या कालावधीत संपूर्णच गावच भक्तीमय झालेले असते, एवढी त्यांची भराडीदेवीवर श्रद्धा आहे.विशेष म्हणजे केवळ जुनीच पिढी नाही तर शिकलेली तरुण पिढीदेखील जत्रेच्या कालावधीत सर्व धार्मिक कार्यात सहभागी होते. या सार्यांच्या सहभागामुळेच जत्रेत कुठेही गैरप्रकार घडत नाही. सर्वत्र गावातील कार्यकर्ते हजर असतात. अडचण आली की, मदतीसाठी तत्पर असतात.

     आंगणेवाडीवासियांच्या सुरेख नियोजनामुळेच भराडीदेवीच्या जत्रेचा सर्वत्र गाजावाजा झालेला आहे. कोकणात दरवर्षी छोट्या-मोठ्या मिळून शंभराहून अधिक जत्रा भरतात.पण भराडीदेवीच्या जत्रेइतकी गर्दी कुठेच होत नाही. मात्र या जत्रेत स्थानिकांपेक्षा बाहेरून आलेल्या भाविकांचीच गर्दी अधिक असते.विशेष म्हणजे ही देवी नवसाला पावते, अशी तिची ख्याती पसरली असल्यामुळे जत्रेला आलेल्यांमध्ये 70 टक्के भाविक नवस बोलायला आणि बोललेला नवस फेडायला आलेले असतात.
      देवी खरोखर पावते की, नाही ते ज्यांना अनुभव आलेला असेल,त्यांनाच ठाऊक मात्र ती नवसाला पावणारी देवी आहे, याचा गाजावाजा मात्र माईकवरून सतत केला जातो. त्याचा परिणाम होऊनच अनेक भाविक श्रद्धेने नवस बोलण्याचा निर्धार करत होते. आंगणेवाडीच्या जत्रेत भक्तांवर फेकला जाणारा प्रसाद हे एक मोठं गंमतीदार प्रकरण आहे.जत्रेच्या पहिल्यादिवशी होणार्या या कार्यक्रमाला हजर राहता यावे, म्हणून भक्त रात्री उशिरापर्यंत ताटकळत असतात. कारण देवीचा हा महाप्रसाद भाग्यवानालाच मिळतो, अशी तिच्या भक्तांची श्रद्धा आहे.जत्रेच्या पहिल्यादिवशी गावातील सर्व घरांत कडक उपवास केला जातो. देवीने अन्न ग्रहण केल्याशिवाय त्यादिवशी कुणीही काही खात नाही. देवीला रात्री नेवैद्य दाखवण्याची प्रथा आहे. हा नैवेध करताना घरातील गृहिणी देवीसाठी पुरणावरणाचा प्रसाद करायला सुरुवात करते. का प्रसाद करून झाल्यावर ती गृहिणी पारंपारिक पद्धतीने दागिने वगैरे घालून नटते आणि अतिशय सश्रद्ध भावनेने डोक्यावर प्रसादाचं ताट घेऊन देवीच्या मंदिराकडे जायला निघते. यावेळी तिच्या सोबतीला तिचा नवरा हातात चूड घेऊन पुढे चालतो. ही चूड म्हणजे अंधार नाहीसा करण्याचा प्रकार आहे. अशा पद्धतीने गावातील सर्व घरांतून आणलेला प्रसाद देवीला दाखवला जातो. देवीला नैवेद्य दाखवून झाल्यावर उरलेला भाताचा प्रसाद परत घरी जाताना प्रसादाची वाट पहात उभ्या असलेल्या भक्तांवर उधळला जातो. यासाठी भक्तमंडळी आपल्या वस्त्रांचा पदर देवीपुढे पसरतात.त्यात पडलेली भाताची शितं प्रसाद म्हणून खातात.गेली कित्येक वर्षं महाप्रसादाची ही प्रथा सुरू आहे. महाप्रसाद फेकण्याची आणि भक्तांनी तो झेलण्याची ही प्रथा संपूर्ण देशात बहुधा आंगणेवाडीतच असावी. आंगणेवाडीतील सवाष्णींनी वरून फेकलेला प्रसाद मिळण्यासाठी भक्त मंडळी गर्दी करतात.
     कोकणात जत्रा मोठ्या प्रमाणात होतात. त्या जत्रा एकप्रकारे गावजत्राच असतात. त्यामुळे त्या जंत्रांमध्ये फार मोठी आर्थिक उलाढाल होत नाही. पण आंगणेवाडीच्या जत्रेने कोकणात जत्रांचे सर्वच उच्चांक मोडीत काढले आहेत. सध्या कोकणात नंबर एकची आंगणेवाडीची जत्रा भरते.
     इोकप्रियतेमुळे आज भराडीदेवीच्या देवस्थानाला उर्जितावस्था आली आहे. मूळ कौलारू मंदिराच्या जागी राजस्थानी स्थापथ्यशैलीतील सुरेख मंदिर उभं राहिलं आहे. तसंच मंदिरावर साडेतीन किलो सोन्याचा कळसही चढला आहे. या उर्जितावस्थेला माजी मंत्री नारायण राणे यांचाही मोठा हातभार लागलेला आहे, हे गावकरी नाकारत नाहीत.
     आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आंगणेवाडी जत्रेची तारीख आपल्याला कुठल्याही पंचांगात किंवा कॅलेंडरमध्ये सापडत नाही. कारण ही तारीख निश्चित नसते. देवीचा कौल मिळाल्यावरच तारीख ठरते. की तारीख ठरवण्याची प्रथा मोठी उत्सुकतेची आहे. दिवाळीत शेतीची कामे झाली की, आंगणेवाडीतील देवीचे मानकरी एका डाळीवर (बांबूपासून बनवलेली चटई) बसतात. यालाच डाळप स्वारी म्हणतात आणि डुकराच्या शिकारीचा (पारध) दिवस ठरवतात.देवीला कौल लावला जातो. गावकरी जंगलात घुसतात आणि डुकराची शिकार करून वाजतगाजत घेऊनच परततात. त्यानंतर काही दिवसांनी जत्रेचा दिवस ठरवण्यासाठी पुन्हा डाळप स्वारी होते आणि कौल लावून जत्रेचा दिवस निश्चित होतो. नंतर या जत्रेची तारीख सर्वच माध्यमांतून भाविकांपर्यंत पोहचवली जाते. फेसबूक,वॉट्स अॅपच्या जमान्यात याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. पोस्टरबाजी होते.पुण्या-मुंबईपर्यंत जत्रेची तारीख सहज फारवर्ड होत पोहचते. त्यामुळे आंगणेवाडीच्या जत्रेसाठी मुंबईकर जथ्याने येतात.
भराडीदेवीचा इतिहास
     आजचे आंगणेवाडी गाव म्हणजे मालवण तालुक्यातील मसुरे गावाच्या बारा वाड्यांपैकी एक वाडी होय. भरड म्हणजे ओसाड माळरान असलेल्या या परिसरात पूर्वी कुणीच राहत नव्हतं. गावातील सर्व आंगणेदेखील इतरत्र राहात होते. देवीचे स्थान निर्माण झाल्यावरच ते या परिसरात राहायला आले. ओसाड असलेल्या माळरानावर तेव्हाच्या शेतकर्यांना एका स्वयंभू जागृत देवतेचा शोध लागला. या देवतेला आकार नव्हता. ती केवळ पाषाणरुपी होती. मात्र तिचा महिमा लक्षात आल्यावर भराड माळरानावर राहणारी म्हणून लोकांनी तिला भराडी म्हणायला सुरुवात केली. तीच आज आंगणेवाडीची भराडीदेवी म्हणून नावारुपाला आली.

     या देवीचा इतिहासात फार कुठे उल्लेख आढळत नाही.तसेच तिच्याबद्दल गावकर्यांनाही फार काही सांगता येत नाही. फक्त वाडवडिलांपासून तिचे गावात मंदिर होते आणि तिच्या नावाने पूर्वापार गावात जत्रा भरायची ,एवढेच इथले लोक सांगतात. याचबरोबर चिमाजी अप्पा यांनी भराडीदेवीच्या देवस्थानासाठी शेकडो एकर जमीन दिल्याचेही गावातल्या जाणत्या माणसांकडून सांगितले जाते

No comments:

Post a Comment