Wednesday, March 8, 2017

शेतीत काम करणार्‍या महिलांची उपेक्षा

      सत्तर टक्के नागरिकांचा प्रमुख व्यवसाय असलेल्या शेती क्षेत्रातील विविध कामांचा आढावा घेतला तर उत्पादनपूर्व, प्रत्यक्ष उत्पादन आणि उत्पादनानंतरचा काळ या सर्वच काळात महिलांचे योगदान मोठे असते. शेतात राबणार्या महिलांची संख्या मोठी असली तरी या महिलांचे कष्ट आणि योगदान दुर्लक्षित असल्यामुळे शेतीसंबंधी कामे करणार्या महिलांच्या अनेक समस्याजैसे थेअवस्थेत आहेत.
शेतीक्षेत्राच्या संदर्भाने विचार केला जात असताना पुरुष शेतकरी वा पुरुष शेतमजुरांचा विचार केला जातो. परंतु तण खुरपणी, रोपे लागवड, भाजीपाला लागवड, फुले, फळे तोडणी, पिकांची कापणी अशाप्रकारच्या शेतातील कामात वर्षभर व्यस्त असलेल्या महिलांच्या कष्टाकडे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे डोळेझाक होताना दिसून येते. परिणामी शेतीत राबणार्या शेतकरी परिवारातील महिलांसह शेतमजूर महिलांच्या अडचणी दबलेल्या अवस्थेत आहेत. यामध्ये मुख्यत्वे या महिलांचे आरोग्य, कष्टाचा मोबदला, शासनस्तरावरुन विविध योजनांत होणारा महिलांचा विचार या बाबींचा समावेश होतो.

     शेती कामात महिलांचे योगदान प्रभावी आहे. मात्र त्यांच्या शेतीतील कष्टाला दुय्यम लेखले जात असल्याचेच वास्तव असून दुय्यम वागणुकीमुळे समस्याजैसे थेआहे.शेतात काम करणार्या महिलांमध्ये स्वत:च्या शेतीतील पडेल ती कामे करणार्या महिलांची संख्या साधारणतः 35 टक्केआहे. तर रोजंदारी मिळविण्यासाठी म्हणून दुसर्यांच्या शेतात सांगितले जाईल ते काम करणार्या महिलांची संख्या साधारणपणे 45 टक्केआहे. स्वतःच्या शेतात आणि इतरांच्या शेतात काम करणार्या महिला असे शेतात काम करणार्या महिलांचे दोन गट असताना या दोन्ही गटातील महिलांना घरातील दैनंदिन सर्व कामांची जबाबदारी पार पाडून शेतीतील कामात झोकून द्यावे लागते. शेतातील विविध कामांबरोबरच शेतीपूरक व्यवसाय असणार्या पशुपालन, कुक्कुटपालन व्यवसायातही महिलांना वेळ द्यावा लागतो. जनावरांचे गोठे साफ करणे, चारा-पाण्याची सोय करणे यामध्ये महिलांचा वाटा मोठा असतो. बहुतेकदा पुरुषांपेक्षा जादा वेळ शेतीसंबंधी कामांत व्यस्त असणार्या महिलांच्या हितासाठी योग्य निर्णयांची अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे.
दरवर्षी 8 मार्चला महिलांच्या सन्मानार्थ जागतिक महिला दिन साजरा केला जातो. यानिमित्त विविध संस्था व संघटनांतर्फे कार्यक्रम राबविले जातात. काही महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. मात्र रात्रंदिवस काबाडकष्ट करणार्या ग्रामीण भागातील महिला शेतमजूर उपेक्षितच दिसून येतात. या महिलांना ना महिला दिन माहीत असतो.. ना पुरस्कार.. फक्त कष्ट आणि कष्टच या महिलांच्या नशिबी आलेले असतात. आठ-आठ, दहा-दहा तास काम करुनही या महिलांना तुटपुंज्या मजुरीवरच समाधान मानावे लागते. सध्या जिल्ह्यातील या महिला शेतमजुरांना एका दिवसासाठी 100 ते 200 रुपये मजुरी दिली जाते. वास्तविक या पैशांमध्ये संसाराचा गाडा हाकणे कठीण असते, मात्र नशिबी आलेले हे अवघड काम निराश न होता या महिला निष्ठेने पार पाडत असतात.
     सध्या ग्रामीण भागात सुगीचे दिवस सुरू आहेत. काही ठिकाणी ज्वारी काढणीला आली आहे, तर काही ठिकाणी रास सुरु आहे. सुगीच्या दिवसात महिला मजुरांना खूप कष्ट करावे लागतात. वर्षभराचे धान्य गोळा करण्याचेआव्हानया महिलांसमोर असते. त्यामुळे पहाटेपासूनच या महिला कामाला लागलेल्या असतात. घरातील कामे आटोपून या महिला शेतशिवारात दाखल होऊन ऊन-वार्यातच काम करीत असतात. जीवाची पर्वा न करता कष्ट करणाच्या या महिला मजुरांकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. ऊसतोड मजुरांचे हाल तर फारच वाईट असते. ऊन, वारा, पाऊस, पाणी काही न म्हणता पोटाची खळगी भरून घेण्यासाठी ग्रामीण भागातील महिला शेतमजुरांना मोठे कष्ट घ्यावे लागतात. एका शेतातील काम संपल्यावर दुसर्या शेतात जाऊन मिळेल ते काम करावे लागते. उन्हातान्हात राबल्याशिवाय या महिलांसमोर पर्याय नसतो. जगभरात आज महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करीत असताना ग्रामीण भागातल्या या महिला मात्र दुर्लक्षितच राहात आहेत. तुटपुंज्या मजुरीवर संसाराचा गाडा हाकणार्या या महिलांकडे ना प्रशासनाचे लक्ष, ना लोकप्रतिनिधींचे लक्ष...
 कष्टातही आनंद आम्हाला
शेतीत राबणार्या महिलांना कष्टाची कामे करावी लागतात. पुरेसा योग्य मोबदला मिळत नाही. सातत्याने दुय्यम वागणूक मिळते, प्रत्यक्ष उत्पादन हाती आल्यावर निर्णय प्रक्रियेत सहभाग नसतो. असे वास्तव असल्याच्या पार्श्वभूमीवर शेती काम करणार्या महिलांशी संवाद साधला असता शेतातील कष्ट जास्त असले तरी त्यामुळे आमचा परिवार सुखी होणार असतो. हा विचार मनात असल्याने या कष्टातही आम्हाला आनंद मिळतो, अशाच प्रतिक्रिया शेतकरी महिलांमधून व्यक्त झाल्या आहेत.
कष्टमय जीणे
घरातील झाडलोट, स्वयंपाक, धुणी-भांडी, लहान मुलांचे पालनपोषण आदींसारखी कामे पार पाडून उर्वरित वेळेत शेतीत राबणार्या बहुतांशी महिलांना घर ते शेती हा काही कि.मी.चा प्रवास पायी करावा लागतो. वातावरणातील विविध बदलांना तोंड द्यावे लागते. शेतात वापर झालेल्या रासायनिक पदार्थांशी होणारा संपर्क टाळता येत नाही, गुरांच्या संपर्कात कामे करावी लागतात. याचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर होतो. दरम्यान कष्टाच्या तुलनेत महिलांना पुरुषांच्या बरोबरीने मोबदला मिळत नाही. हे वास्तव आहे.
महिलांचा विचार व्हावा
शासनस्तरावरुन कृषीसंदर्भात योजनांची अंमलबजावणी होत असताना प्रामुख्याने पुरुष शेतकर्यांचा विचार केला जातो. त्यावेळी शेतात योगदान देणार्या महिला वर्गाचा अपेक्षित विचार केला जात नाही. मात्र कृषी योजना राबविताना शेतीसंबंधी कामे करणार्या महिलांचाही विचार होणे आवश्यक आहे.
महिला शेतमजुरांच्या नशिबी कष्ट अन् कष्टच!
ग्रामीण भागातील महिला शेतमजुरांची परिस्थिती फार बिकट आहे. रोज एकाच्या शेतात जाऊन कष्ट करावे लागते. तुटपुंज्या मजुरीवर कुटुंब चालवणे फार अवघड काम असते. मात्र पोराबाळांमुळे कष्ट केल्याशिवाय पर्याय नसतो. शासनाचेही मजुरांवर लक्ष नसते. महिला शेतमजुरांच्या कल्याणासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना प्रभावीपणे राबवाव्या.
मुलांच्या शिक्षणासाठी
उन्हा-तान्हात कष्ट करणे, हे आमच्या नशिबी आलेले कर्म आमच्या मुलांच्या नशिबी तरी येऊ नये, यासाठी राबावे लागते. चांगले शिक्षण घेतले असते तर आज शेतात राबायची वेळ आली नसती. मात्र त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आता मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी दुसर्यांच्या शेतात जाऊन कष्ट करावे लागतात. खूप हाल होत असतात मात्र पर्याय नाही.

No comments:

Post a Comment