Thursday, April 6, 2017

स्वत:चा शोध घ्या

     स्वतःला फार जपण्याची आपल्याला सवय आहे. रिस्क घ्यायला घाबरतो. पण, स्वतःचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडावे लागेल. सावलीतील झाड वाढत नाही. त्यामुळे चटके खावे लागतील.तरच तुम्ही स्वत:ला ओळखू शकाल. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश सावजी हे आपल्या व्याख्यानात नेहमीच आपला अनुभव सांगत असतात. एकदा त्यांनी 34 आणि त्यांच्या मित्राने एकाचवेळी 73 गुलाबजाम खाण्याचा प्रयोग केला. सात दिवसांत सायकलने पचमढीमार्गे भोपाळला जाण्याचा वेडेपणाही त्यांनी केला. एकही रुपया खिशात न घेता केलेला हा प्रयोग होता. हे सारे स्वतःची क्षमता ओळखण्यासाठी त्यांनी केलेले प्रयोग आहेत. त्यासाठी अंगात वेडेपण असावे लागते. जे इतरांना दिसत नाही तेच आपल्याला दिसले पाहिजे. वेडा माणूसच काहीतरी जगावेगळे करू शकतो. आमच्या तरुणपणी राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांची क्रेझ होती. त्यांचे कपडे, हेअरस्टाइल सारेच फॉलो करायचे. मीही ते करून पाहिले. पण, चांगले दिसण्यापेक्षा चांगले असणे महत्त्वाचे आहे, हे मला फार लवकर लक्षात आले. अंगात वेडेपणा शिरला की, आपल्यातील चमक शोधता येते.

     रॉबीन शर्मा नेहमी आपल्या मार्गर्शन व्याख्यानामध्ये बालपणात त्यांच्या वडिलांनी सांगितलेले वाक्य सांगत असतात. ते वाक्य असं आहे, मुला,जेव्हा तू जन्मलास तेव्हा तू रडलास पण तुझ्या आगमनामुळे सगळे आनंदले. आता तू तुझे आयुष्य अशा पद्धतीने घालव की, ज्यावेळेला तुला मृत्यू कवटाळेल,तेव्हा सगळे जग रडेल आणि तू मात्र आनंदाने या जगाचा निरोप घेशील.मात्र सध्याचा काळ विचित्र आहे. माणसाला स्वत:कडे पाहायला वेळ नाही. आपण घरबसल्या एका चुटकीसरशी सगळी कामं निपटू शकतो.पण आपल्याला शेजार्याला भेटायला जाताना अडचणी येतात. रस्ता ओलांडायलाही अडचणीही येतात. जग जवळ आले आहे,पण आपण आपल्यापासून, आपल्या माणसांपासून दूर चाललो आहोत.बंद दारांची संस्कृती फोफावत चालल्याने आपल्याला शेजार्याच्या घरात काय चालले आहे,याचा पत्ता नसतो. म्हणजे सोयी-सुविधा आल्या,पण माणुसकी हरवत चालली आहे. आपले उदिष्ट आपण गमावून बसलो आहोत. ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत,त्यावरचे आपले लक्ष उडाले आहे.
     यातून काय साधले जाणार आहे? या पृथ्वीवर इतर माणसांप्रमाणे तुम्हीही अवतरला आहात. इथे येताना आपल्याला काही कामे सोपवण्यात आली आहेत,ती आपण विसरलो आहोत. तुमचा इतरांना काय लाभ होणार आहे? पुढच्या पिढीवर तुमचा काय प्रभाव पडणार आहे? तुम्हाला लोकांनी शाश्वत लक्षात ठेवावं, अशी तुमची काय कामगिरी असणार आहे? या सगळ्या गोष्टी निरर्थक असतील तर तुमच्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे? दिवस तर असे निघून जातात. अर्धे आयुष्य निघून गेल्यावर तुमच्या लक्षात येईल, अरे, आपण उभ्या आयुष्यात काहीच केले नाही. मग पश्चातापाशिवाय तुमच्या हातात काहीच राहत नाही. जॉर्ज बर्नाड यांना म्हणे त्याच्या अखेरच्या दिवसांत विचारण्यात आले होते, तुम्हाला तुमचे आयुष्य परत जगायला मिळाले तर तुम्ही कोणती गोष्ट कराल? यावर जॉर्ज बर्नाड यांनी जरा वेळ विचार करून म्हणाले, मला असा माणूस बनायला आवडेल,जो मी होऊ शकलो असतो,पण बनलो नाही. असे आपल्याबाबतीत होऊ नये,यासाठी आपण वेळीच पावले उचलली पाहिजेत.
     आपण जास्त आनंदाने जगत असताना आपल्या आयुष्याला जास्त अर्थ कसा प्राप्त होईल? आपल्या कामातून चिरकाल टिकणारे साहाय्य कसे घडेल? आपल्याला जास्त उशीर होण्याआधी,आपला जीवनप्रवास आनंदात जाण्यासाठी आपल्याला सहज करण्याजोग्या गोष्टी कोणत्या? हे सगळे जाणण्याआधी अगोदर आपण स्वत:ला स्वत:त शोधले पाहिजे. आपल्यातील कौशल्य ओळखता आलं पाहिजे.प्रत्येक माणसात काही ना काही गुण असतात.कौशल्य असतात. चमक असते.काही लोकांमध्ये एकापेक्षा अधिक गुण वैशिष्टे असतात. पण त्याचा योग्य वापर झाला तर ठीक. नाहीतर त्या जीवनाला अर्थ काय? आपल्या व्यक्तिमत्त्वातील अद्वितीय पैलूंचा काळजीपूर्वक उपयोग करून घ्यायला हवा. अनेकदा आपल्या व्यक्तिमत्त्वातील बलस्थाने आपल्याच लक्षात येत नाहीत आणि त्यामुळे या गुणांचा योग्य उपयोग करणे राहून जाते.

       आणखी एक म्हणजे आपल्यातील प्रत्येक जण एकमेकांपेक्षा वेगळा असतो आणि त्यामुळेच अद्वितीय असतो. मात्र, आपल्या व्यक्तिमत्त्वातील हा सकारात्मक वेगळेपणा प्रत्येकाने जाणायला हवा आणि जोपासायला हवा. या वेगळेपणामुळे आपल्या स्वत:ला ओळखताना फार वेळ लागत नाही. आपल्याला आपल्या कामात आनंद वाटेल, असे कामात झोकून द्या. त्यातून तुमची ओळख इतरांना होईल. तुमच्या कामाचा,व्यक्तीमत्त्वाचा इतरांना लाभ होऊ दे. तुमच्याकडे असलेल्या बलस्थानांचा दुसर्यांना उपयोग होईल. तुमचा आदर्श लोक घेतील.पण हे केव्हा घडेल? ज्यावेळेला तुम्ही स्वत:चा शोध घ्याल!

No comments:

Post a Comment