Wednesday, June 28, 2017

'मै जिंदगी का साथ निभाता चला गया...'

     माणसाचं आयुष्य मोठं खडतर असतं. आयुष्याची नौका पार करत असताना अनेक वादळांच्या मार्यात नौका हेलकावे खात असतेभावभावनांच्या कल्लोळाने भरलेल्या आयुष्यात आपल्याला अनंत चढ-उतार येतात. त्यांना सहन करत मार्गक्रमण करावे लागतेआर्थिक, शारिरीक,सामाजिक चढ-उतारांपेक्षा भावनिक चढ-उतार आपल्या मनाला जास्त क्लेश देतात. लहानपणी आई-वडील, भाऊ-बहिणी, मित्र-मैत्रिणी या सगळ्यांच्या गोतावळ्यात आपल्याला भावनिक सुरक्षितता मिळते. सर्वांच्या ममत्वाचे, आपुलकीचे, स्नेहाचे छायाछत्र आपल्या डोक्यावर असते. पण जसजसे वय वाढत जाईल, तसतसे येणार्या निरनिराळ्या अनुभवांनी आपल्यातील निरागस, निष्पाप मूल भांबावते, घाबरते. त्यामुळे काही वेळेस सगळ्या जगाकडेच आपण अविश्वासाच्या नजरेतून बघायला लागतो. नंतर, हळूहळू वास्तवाचे चटके बसून भान यायला लागते. काही गोष्टी अपरिहार्य आहेत, टाळणे अशक्य आहेत हे जाणवायला लागते. जगरहाटीचे नियम पचनी पडण्यास सुरुवात होते. हे असेच असते, याचा स्वीकार करण्यास शिकतो. आपण तरुण वयात, आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करणे जड जाते. कारण रक्तात तारुण्याचा कैफ असतो, तडफ असते, परंतु वाढत्या वयानुसार काही गोष्टी काळावर सोडून देणे हितकारक असते. हे अस्ते अस्ते समजत जाते. काही काही प्रसंगात, आपण खूप एकटे पडतो कोणीतरी साथ द्यायला पाहिजे, कोणीतरी पाठीवर आधाराचा हात ठेवावा, असे फार वाटते. पण दुर्दैवाने कोणीच सपोर्ट करत नाही, त्यावेळेस आपण परिस्थितीकडे सकारात्मक पद्धतीने पहात पुढे गेले पाहिजे. अश्यावेळेस       जीवन गाणे गातच राहावे, या गाण्याची हटकून आठवण आल्याशिवाय रहात नाही.
     एकट्याने एकटे गर्दीत चालावे, एकट्याने आपल्याशी फक्त बोलावे, अशी अनेक गाणी आपण हिंदी, मराठी चित्रपटातून ऐकतो. कधी निसर्ग गीतातून, कधी जीवनविषयक तत्वज्ञान सांगणार्या गीतातून आपल्याला असा दिलासा देणारी गीते ऐकायला मिळतात. संतसाहित्यातदेखील ओवीरूपाने, अभंगरूपाने,भारुड, कीर्तनरूपाने आपण हेच ऐकतो. ’मै जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुंवे मे उडाता चला गया’, असे म्हणत एखादा हिम्मतवान माणूस आयुष्यातील सगळ्या कटकटींना, संकटांना चिल्लर समजून उडवून लावतो. परिस्थिती बदलणार नाही आपणच काहीतरी हालचाल करून सगळे चित्र बदलवले पाहिजे. ही भावना प्रत्येक व्यक्तीच्या मनात वेगवेगळे भावतरंग निर्माण करते. कोणी बेफिकिरीने सगळ्या गोष्टी क्षुल्लक समजून उडवून लावतो, तर कोणी धाडसाने, धीराने संकटांना सामोरे जातो आणि परिस्थितीशी दोन हात करतो. कोणी एखादी व्यक्ती जीवनगाणे गातच रहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे असे म्हणत आपल्याला त्रास देणार्या व्यक्तीला मोठया दिलदारपणे माफ करून टाकते, आणि जीवनाची यात्रा सुरू ठेवते. कोणी संकटाचे दिवस संपून आपल्या मनासारखी परिस्थिती येण्याची वाट बघत बसतो.
     कधी अत्यंत सहृदय, निकटच्या व्यक्तीचे आपल्याविषयी गैरसमज होतात. ती व्यक्ती आपल्यासाठी तिच्या मनाचे दरवाजे बंद करते. त्याच्या मनात डोकावण्यास आपल्याला मज्जाव करते, अश्यावेळेस जीव तुटतो, पण यावरही मात करून, पुढे चालत राहणे स्वीकारावेच लागते. आपल्याला मन खंबीर करून चालायला सुरुवात करायची. आपल्या आतल्या आवाजाला कौल विचारत, त्याच्या हाकेला ओ देऊन निरंतर पुढे जात राहणे हे कधी प्राक्तन होऊन बसते. हीच तर खरी जीवन जगण्याची कला उत्तम प्रकारे आत्मसात केल्याची खूण आहे.
खरं तर, आपले संपूर्ण आयुष्यच अंधारयात्रा आहे. आईच्या गर्भातून बाहेर उजेडात आलो तरी आपण काळोखातच चालत असतो. भौतिक सुखे, लौकिक मिळवूनसुद्धा आपण मनाच्या एका कोपर्यात एकटेच असतो. आपल्या अंतर्मनाचा एक कोपरा कायमस्वरूपी अंधाराच राहतो. तरीही हताश न होता आपली आत्मज्योत तेवत ठेवून चालत राहायचे, तेच आपल्या आयुष्याचे खरे यश आहे. हसत जगावे हसत मरावे हे तर आपुले गाणे असे गीताचे बोल आपल्याला सकारात्मकपणे जगायला शिकवतात आणि कठिण प्रसंगातही यशस्वीपणे पुढे जायला शिकवतात.

No comments:

Post a Comment