Saturday, June 3, 2017

मुलांच्या पिछेहाटीचे चिंतन व्हायला हवे

     नुकताच बारावीचा निकाल लागला. नेहमीप्रमाणे या परीक्षेतही मुलींनीच बाजी मारली. गेल्या काही वर्षात दहावी-बारावी बोर्डांच्या परीक्षेत मुलीच आपला अधिकार गाजवू लागल्या आहेत. त्यामुळे साहजिकच मुलांना घरोघरी बोल बसत आहेत. तर काही लोक मुलांची हेटाळणी करत आहेत. गावभर उनाडक्या मारत किंवा मुलींच्या मागे फिरत राहणार्या मुलांना ही अशीच शिक्षा मिळणार असे बोलले जाऊ लागले आहे.वास्तविक प्रत्येक घरात मुलींपेक्षा अनेक बाबतीत मुलांना मोठी सूट किंवा मोकळिक असते. मुलींना मात्र घरातील झाडलोट,धुणी-भांडी घासणे, अशा प्रकारची कामे त्या बोर्डाच्या परी
क्षा देत असतानाही लावली जात असतात. तरीही मुली आपला ठसा परीक्षेत उमठवतात.याची चर्चाही होत राहतेच.मात्र मुलांच्या अपयशाची कारणे शोधली जात नाहीत. त्यांना बोल लावले जात नाही.
     वंशाचा दिवा म्हणून मुलाकडे पाहताना त्यांच्या अनेक चुकांवर पांघरुण घातले जाते. त्यांच्यावर सक्ती,जोर-जबरदस्ती घरच्याकडून होताना दिसत नाही. सर्वसाधारणपणे मुली जात्याच हुशार असतात असा एक निष्कर्ष काढून रिकामे होणारे खूप आहेत. तर कांहीना वाटते पालकांनी मुलांच्याकडे जितक्या प्रमाणात लक्ष द्यावयाला पाहिजे तितके देत नाहीत. अर्थात या दोन्ही विधानांना फारसा अर्थ नाही. या विषयाकडे गांभीर्याने पाहता मुलं ही शिक्षणापेक्षा अन्य गोष्टींकडे अधिक लक्ष देतात. ती हुशार नसतात असे विधान धाडसाचे ठरेल. शिक्षणाविषयक चिंतन- मनन आणि प्रयत्न या बाबतीत मुलांच्या बाबतीत कमतरता आढळून येते. आजकाल मुले टोळक्याने राहण्याला पसंदी देत आहेत. सिनेमा वैगेरे पाहून त्यांचे रक्त सळसळते,कुठेतरी साधा इगो दुखवला तर समोरच्यावर वस्सकन अंगावर जाताना दिसतात. असल्या छातूर-माथूर विषयांमध्ये गुंतल्याने मुले अभ्यासात मागे राहत आहेत.
     मुलींना जितक्या सूचना दिल्या जातात, तशा सूचना,ताकीद मुलांना दिली जात नाही. खरे तर पालकच मुलांना घाबरत असतात. काही म्हटले तर घर सोडून पळून जाईल, उलटे बोलेल.काही तरी करून घेईल, असा समज घेऊन पालक मुलांना काही बोलण्यापासून थोडे लांबतच राहतात. ग्रामीण ते शहरी भागात मुलगा नापास झाला तर पुढले शिक्षण बंद करण्यात येईल, अशी साधी लक्षवेधी सूचनाही मुलांना दिली जात नाही. या उलट मुलींच्या बाबतीत कमी गुण पडले तर तिला सूचना केली जाते. गुण चांगले पडले नाहीत किंवा पास झाली नाहीस तर तुझे शिक्षण बंद करण्यात येईल अशा सक्त सूचना, ताकीद, इशारा, भय दाखवले जाते. इथेच त्या मुलींची मानसिकता तयार होते की आपण कोणत्याही प्रकारे परीक्षेत यशस्वी व्हायलाच हवे नाही तर शाळा बंद, शिक्षण बंद आणि पूर्ण वेळ घरच्या कामासाठी, शिवाय घरातच आहे तर लग्न उरकून टाकू या अशा अनेक प्रकारच्या अभिप्रायामुळे मुली मन लावून अभ्यास करतात मनस्वी अभ्यास हेच त्यांच्या यशाचे गमक असते. एखादी मुलगी नापास झाली तर तिला घरातून मिळणारी वर्तणूक याची अनेक उदाहरणे त्याना परिचित असतात आणि नापास झालेल्या मुलाची समजूत काढून त्यास पुनः शिकावयालाच पाहिजे असा अट्टाहास असा प्रयोग मुलांना जागं करण्याऐवजी अभ्यासाकडे दुर्लक्ष करावयाला कारणीभूत ठरत असतात. शिवाय आता समाजातील अशिक्षित स्त्रियांनासुद्धा शिक्षणाचे महत्व आणि महात्म्य महिला आग्रहाने करीत आहेत. आणि आज समाजातील अनेक मुली शिक्षणाच्या जोरावर प्रगतीच्या, यशाच्या शिखरावर पोहचतानाचे दृश्य इतर मुलींना प्रेरणादायी ठरते आहे. तसं अलिकडे मुलांच्या गगनभरारीची आणि यशाची अत्युच्च शिखरे गाठणार्यांची संख्या मुलींच्या पेक्षा कमी प्रमाणात आढळत आहे. खर्या अर्थानं या यशस्वी मुलीचं कौतुक व्हायलाच हवे. मात्र मुलांच्या या अपयशाकडे,घसरणीकडे शाळा,पालक आणि समाज यापतळीवर गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे. मुलांनीही आपल्या गुणवत्तेकडे गांभिर्याने पाहताना मुलांच्या सामुदायिक हाराकिरीचे चिंतन करायला हवे.
      मुलींची संख्या आधीच कमी होत चालली आहे. वधू म्हणून मुलींचा शोध घेताना मुलांच्या नाकीनऊ येत आहे. आता तर शैक्षणिक गुणवत्तेत मुलीच आघाडीवर असल्याने त्यांना आपल्यापेक्षा कमी शिकलेली आणि कमी हुशार असलेल्या मुली मिळणार नाहीत. त्यामुळे हाही एक सामाजिक गुंता आगामी काळात समाजापुढे येणार आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलाला या गोष्टींची जाणीव करून देण्याची आवश्यकता आहे.

No comments:

Post a Comment