Tuesday, July 18, 2017

निसर्गाशी मैत्री साधा

     महाराष्ट्र सरकारने यंदा 4 कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला. शासकीय पातळीवर त्याचे नेटके नियोजन झाले आणि अगदी ग्रामस्तरापर्यंत झाडे लावण्याचा कार्यक्रम झकास पार पडला. ही कौतुकाची बाब झाली पण ही झाडे लावली गेली,त्यांच्या संगोपनाबाबत मात्र नियोजन झाले नाही. सध्या मान्सून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे रानोमाली जी झाडे लावण्यात आली ती वाढण्याबाबत शंका निर्माण झाली आहे. शिवाय बेवारस झाडांकडे पाहायलाही कुणाला वेळ नाही, त्यामुळे ही झाडे मरून जाणार आहेत. शासकीय पातळीवर त्यांच्या जगण्याविषयी काही तरी उपाययोजना व्हायला हवी आहे. टँकरने पाणी घालून ती झाडे जगवायला हवी आहेत. यासाठी आर्थिक तरतूद करून प्रशासन कामाला लावण्याची गरज आहे. नाही तर मग येरे माझ्या मागल्या... प्रमाणे दरवर्षी झाडे लावायची आणि त्याचे आऊटपूट काही नाही, असा कार्यक्रम यंदाही व्हायला नको. एकाच खड्ड्यात कितीदा वृक्षारोपण करण्यात आले आणि त्याचे फोटोसेशन झाले, याला गिणतीच नाही. अशा खड्ड्यांनाच आता लाज वाटत असावी, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शासकीय पातळीवर तर झाडे जगवण्याविषयी प्रयत्न व्हायला हवेच पण तुम्ही आम्हीदेखील वैयक्तिक लक्ष देऊन ही झाडे जोपासली पाहिजेत. आपण ज्या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला ती झाडे जगली का ते पाहायला हवे आणि ती जगली नसतील पुन्हा नव्याने रोप आणून लावावे आणि त्याची काळजी घेतली जायला हवी.

     धावपळीच्या आणि यंत्राच्या चाकाप्रमाणे फिरणार्‍या आजच्या या विज्ञान युगात आपण अनेक जबाबदार्‍या पाठीशी घेऊन काम करत आहे. आपण वृक्षारोपण दिनाशिवाय अन्य दिवशी त्याकडे पाहत नाही. आपले काम आणि आपण एवढेच आपण समजतो. त्यामुळे पर्यावरणाकडे लक्ष जाणार तरी कसे? असा प्रशन आहे.निसर्गाशी प्रेम करणारी माणसे आज घड्याळाच्या काठावर जगणार्‍या माणसांवर नाराज आहे. त्यांच मत असं की माणसाला निसर्गसौंदर्य पाहायला वेळच नाही. तो निसर्गाशी मैत्री साधत नाही, निसर्गाशी एकरुप होत नाही. निसर्गाशी एकरुप न झाल्याने नैसर्गिक विविधता, नाविन्य माणसाला उपभोगता येईल का? चैतन्य, प्रसन्नता यांचे सुख त्याला मिळेल का? असे त्यांना वाटते. मात्र इतकाही माणूस निष्ठूर नाही. त्याला निसर्गाचे महत्त्व पटलेले आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने काय होते, याची त्याला कल्पना आली आहे. निसर्गावर प्रेम करणारा माणूस त्याचा लुप्त उठवण्यासाठी वर्षा सहल काढतो आहे. त्याचा अनुभव घेतो आहे. त्यामुळे सरसकट माणसाला दोष देता येणार नाही. मात्र त्याने निसर्गाची आणखी काळजी घ्यावी, अशी अपेक्षा आहे. 
  आजच्या धावपळीच्या युगात मानवाने निसर्गाकडे पाठ दाखवल्याने व  पर्यावरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे घातक कृतीतून पर्यावरणाचा समतोल ढासळवला आहे. त्यामुळे प्रदूषण वाढले आहे. दररोज अनेक मार्गांनी होणार्‍या प्रदूषणाचा सभोवतालच्या निसर्गावर, पर्यावरणावर, जनजीवनावर झालेला परिणाम फारच भयंकर आहे,याची कल्पना यायला लागली आहे.  निसर्गावर निष्ठा असणारी माणसं सांगतात, निसर्ग माणसाला चैतन्य देतो. आनंद, शांती, उत्साह व चैतन्य मिळविण्यासाठी माणसे निसर्गात रमतात. कंटाळा, दिवसभराचा शीण, आळस घालविण्यासाठी माणसे एखाद्या बागेत जातात. तेथील झाडं, फुलं त्या फुलांवर भिरभिरणारी फुलपाखरं, त्यांची रंगबिरंगी रुपे ते आपल्या नयनात टिपून घेतात. मग त्यांना आनंद मिळतो तो निसर्गाशी एकरुप झाल्याचा. प्रसन्नता आणि शांती लाभून त्यांचे मन उत्साही बनते. 
वातावरण स्वच्छ, शांत ठेवायचे असेल आणि चैतन्य फुलवायचे असेल तर मग पर्याय एकच ’झाडे लावा, झाडे जगवा आणि चैतन्य फुलवा’. 
     माणसाला कळले आहे, निसर्गाला दुखावले की काय होते. मात्र तरीही काही माणसे त्याकडे दुर्लक्ष देतात. जगाबरोबर काय होईल ते होईल, अशी म्हणणारी माणसेही कमी नाहीत.  मनुष्य आळशीदेखील आहे. झाडे तोडली पण नवी झाडे लावली नाहीत. काही माणसे फक्त झाडाचे फळ चाखतात, पण झाडे लावत नाहीत की त्यांना पाणी घालत नाहीत. अंगणात असलेले झाड त्यांच्या कामासाठी पाहिजे असेल किंवा त्याची अडचण होत असेल तर ते झाड माणसे तोडतील पण दुसरे झाड लावणार नाहीत. इंधन टंचाईत मनुष्याने मोठया प्रमाणावर जंगलतोड केली. पण नवी झाडे लावली नाहीत. जंगल तोडीमुळे सृष्टीचे रुप बदलू लागले. हिरवाईचे प्रदेश ओसाड पडू लागले. नवी झाडे न लावल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन ढासळले. प्रदूषणाची समस्या निर्माण झाली. सृष्टीसौंदर्य हरपू लागले. शांतता व प्रसन्नता भंग पावली. मग जंगल संपत्ती नष्ट होऊ लागल्याने जंगलतोडीविषयक कायदे केले गेले, वृक्षरोपणाचे कार्यक्रम हाती घेण्यात आले. 
     निसर्गप्रेमी सांगतात, झाडाफुलांजवळ मनुष्याला जे मिळते ते त्याचे जीवन. म्हणजेच त्याचा आनंद. मित्रांनो हिरव्यागार मखमलीवर पडून झाडांसंगे गप्पा मारुन फुलपाखरांसमवेत बागडून पहा किती मौज आहे. हा सुखद अनुभव अनुभवा. निसर्गात रमा, झाडे लावा त्यांची योग्य काळजी घ्या. झाडे जगवा, त्यामुळे सृष्टीला बहर येईल, सौंदर्य वाढेल आणि शांतता लाभून तुमच्या जीवनात चैतन्य व नवा उत्साह फुलेल.  सृष्टीसौंदर्यात दंग झाल्याने माणसाला नवचैतन्य मिळते. माणूस जर आनंदी असेल, उत्साह व चैतन्य त्याच्याकडे असेल तर तो खर्या अर्थाने जीवन जगेल. ज्याचा आनंद शुध्द, त्याचे जीवन शुध्द. हा आनंद लाभणार या सृष्टीत, निसर्गाच्या सान्निध्यात, झाडाफुलांच्या सहवासात. म्हणूनच ’झाडे लावा, झाडे जगवा आणि चैतन्य फुलवा’. सृष्टीसौंदर्य वाढवा, झाडे लावून सृष्टीचे रुप हिरवेगार ठेवा. हा निसर्गप्रेमींचा संदेश ऐकू या आणि त्यानुसार वागूया.


No comments:

Post a Comment