Tuesday, December 12, 2017

नवर्‍याला मारलं,प्रियकराची सर्जरी करून घरी आणलं आईच्या ध्यानात आला संशय कल्लोळ

     लग्न म्हणजे साता-जन्माची गाठ असते. चार-चौघांसमोर वाजत-गाजत लग्न होतं. आणि त्या दाम्पत्यांचा संसार सुरू होतो. अर्थात घर म्हटलं की भांड्याला भांडं आदळल्यावर ते वाजणार! मात्र या भांडणातही एक प्रकारचं प्रेम असतं.यातून त्यांच्यातला विश्वास वाढत असतो. लग्नानंतरच्या प्रेमातदेखील एक गोडी असते. ती गोडी चाखणारं कुटुंब सुखी होतं.पण या संसारात प्रेमच नसेल तर काय? मग ही गोडी कशी वाढणार? कारण मग दोघा जोडीदारांपैकी कुणाचं ना कुणाचं बाहेर लफडं असतं. कदाचित त्याला म्हटलं जातं. त्यामुळे कदाचित त्यातला एकादा संसारात रमत नाही आणि मग यातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण ही सुटका करून घेण्याची योजना जर भयंकर असेल तर मग त्यांची धडगत नाही. पोलिसांसमोर त्याचं बिंग फुटल्याशिवाय राहत नाही. असाच प्रकार तेलंगणा राज्यातल्या नागरकर्नूल जिल्ह्यात घडली आहे. अगदी फिल्मी स्टाईलने घडलेल्या या घटनेने संपूर्ण तेलंगणा राज्य चकीत झाले आहे.प्रियकराला जवळ करण्यासाठी तिनं चक्क आपल्या नवर्यालाच मारून टाकलं आणि आपल्या प्रियकराचा चेहरा जाळला, त्याची प्लॅस्टीक सर्जरी केली. आणि सुखी संसाराची स्वप्ने पाहू लागली. पण म्हणतात ना! खोटं फार काळ पचत नाही. आईला आपल्या मुलाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. आवाज आणि मागच्या घरादारातल्या आठवणी सांगण्यात तो फसला आणि बिंग बाहेर पडलं. आता ती दोघंही तुरुंगाची हवा खात आहेत. एक तेलगू चित्रपट आहे येवाडू. या चित्रपटावर प्रभावित होऊन स्वातीने हे कृत्य केल्याचे पोलिसांना सांगितले.

     त्याचं झालं असं की, दोन वर्षांपूर्वी स्वाती आणि सुधाकरचा विवाह झाला.त्यांना पाठोपाठ दोन मुलंही झाली. सुधाकर पूर्वी हैद्राबादमध्ये काम करत होता. नंतर त्याने क्रेशरचे काम करायला सुरुवात केली. या दरम्यान स्वातीचे राजेश नावाच्या युवकाशी सूत जुळले. ते नेहमीच एकमेकाला भेटायचे. यात आता तिला तिचा नवरा अडसर वाटायला लागला. दोघांनी नवर्याचे कलम करायचे ठरवले. 26 नोव्हेंबरच्या रात्री दोघांनी मिळून सुधाकर झोपेत असताना त्याचा गळा आवळून ठार मारलं.त्याचा मृतदेह स्वाती आणि राजेश यांनी मैसना जंगलात नेऊन जाळून टाकला.
     नवर्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर स्वातीने आपल्या प्रियकराचा चेहरा अॅसिड फेकून जाळला. घरात तिने कुणीतरी आपल्या नवर्याच्या चेहर्यावर अॅसिड हल्ला केला असल्याचा बनाव केला. पोलिसांनीही यावर विश्वास ठेवला. राजेश आपल्यावर पट्टी बांधून वावरत असल्याने आईला संशय आला नाही.तिला तो आपलाच मुलगा सुधाकर आहे, असे तिला वाटले. स्वातीच्या सांगण्यावरून मयत सुधाकरच्या आई-वडिलांनी प्लास्टिक सर्जरीसाठी पाच लाख रुपये दिले आणि त्याच पैशांतून राजेशने आपल्या चेहर्यावर सर्जरी करून घेतली. आता मनासारखं झालं म्हणून स्वाती आणि राजेश अगदी आनंदात राहू लागले. त्यांची योजना यशस्वी झाली होती.
     मात्र इकडे सुधाकरच्या आईला काही तरी संशय यायला लागला. सुधाकर आणि राजेशच्या चालण्या-बोलण्यात तिला फरक जाणवायला लागला. यानंतर आईने आपल्या मुलाला (म्हणजे राजेशला) आपल्या कुटुंबाबाबत काही प्रश्न केले. यात राजेश हडबडला. त्याला त्यांच्या मनासारखी उत्तरे देता आली नाहीत. तो त्यात फसला. यानंतर आईने आपल्या घरातल्या अन्य लोकांशी चर्चा केली आणि तिने तडक पोलिस ठाणे गाठले. पहिल्या पहिल्यांदा स्वाती आपला गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करू लागली,पण शेवटी पोलिसी हिसका बसायला लागल्यावर ती अगदी घडाघडा पोपटासारखी बोलायला लागली. तिने गुन्हा कबूल केला. आधार कार्डासाठी देण्यात येणार्या फिंगर प्रिंटवरून दुजोरा मिळाला की, हा सुधाकर नाही.
     पोलिसांनी स्वाती आणि राजेशला घेऊन मैसना जंगल गाठले. जिथे सुधाकरला जाळण्यात आले.तिथून जो काही उरलासुरलेला सुधाकरचा मृतदेह होता, तो पोलिसांनी ताब्यात घेतला. त्यांनी दोघांनाही अटक केली आणि तुरुंगात टाकले. अविवेकाचा शेवट तो असा होतो. सुखी संसाराला हरताळ फासून क्षणिक मोहासाठी स्वाती स्वत: तुरुंगाची हवा खायला गेली.

No comments:

Post a Comment