Wednesday, January 10, 2018

नफेखोर माध्यमे

     वृत्तपत्रांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले गेले आहे. पण आज दृकश्राव्य प्रसार माध्यमांमुळे हा चौथा स्तंभ राहिला आहे,का असा सवाल उपस्थित होत आहे. सरकार आणि प्रशासन यांच्यावर समान अंकुश ठेवण्याची जबाबदारी या प्रसार माध्यमांची आहे. या जबाबदारीमुळे सर्वसामान्य लोकांवर अन्याय होणार नाही,त्यांच्यावर अन्याय, अत्याचार होणार नाही. त्यांची कामे कोणत्याही अडथळ्याविना विनासायास पार पडतील, अशी अपेक्षा त्यामागे आहे. मात्र आजची पत्रकारिता पाहिल्यावर यातले काही या प्रसार माध्यमांकडून होत आहे, असे वाटत नाही. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरची पत्रकारिता आज दिसते का, असा प्रश्न केला गेला तर आपल्याला यातून निराशाच पदरी पडते. आज मोठी मोठी वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाहिन्या मोठ्या उद्योगपतींनी गिळंकृत केल्या आहेत. त्यांनी या माध्यमाकडे एक छोटा व्यवसाय म्हणून पाहायला सुरुवात केली आहे. त्यांनी यातूनही नफाखोरी सुरू केली आहे, असे म्हणायला जागा आहे.

     ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी आजची प्रसार माध्यमे ही नफेखोरीच्या मागे लागली आहेत. नफा हेच उदिष्ट ठेवून अनेकदा बातम्या केल्या जात असल्याचे म्हटले आहे. माध्यमांमध्ये मोठ्या उद्योजकांची एकाधिकारशाही निर्माण झाली आहे. हे उद्योजक आपल्या व्यवसायाचा एक छोटा भाग म्हणून माद्यमांकडे पाहात आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांच्या ताब्यात असलेल्या माध्यमांना सरकारवर आणि बाजारावर टीका करता येत नाही. त्यामुळे या माध्यमांमधून किती सत्य समाजासमोर येईल, असा सवाल पी. साईनाथ यांनी उपस्थित केला आहे आणि तो रास्तच आहे. वास्तविक खर्याखुर्या पत्रकारांपेक्षा माध्यम समन्वयकांची संख्या वाढत आहे. त्यासाठी माध्यमांचे लोकशाहीकरण करण्याची आवश्यकता आहे. तरच या माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणता येईल. प्रसार माध्यमांना राजकीय पक्षांवर टीका करण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु, आजची माध्यमे राजकारण्यांच्या चुकीच्या गोष्टींवर बोट दाखवायला तयार नाहीत. त्यांना यातून फक्त नफा कमवायचा आहे. याने खरे सत्य लोकांसमोर येणारच नाही. याचा फटका लोकशाहीलाच बसणार असून यामुळे साम्राज्यशाहीची वाट सुलभ झाली आहे.
     नवीन माध्यम आपल्याला आवाज देईल,मात्र तुमचा आवाज ऐकण्यासाठी कोणी श्रोता आहे का, याची शाश्वती देता येणार नाही. या नवीन माध्यमावरही जुन्याच लोकांची एकाधिकारशाही पाहायला मिळत आहे. ही एकाधिकारशाही छापील आणि टीव्ही माध्यमांपेक्षाही मोठी आणि भयानक आहे. कारण ते तुमच्या व्यक्तिगत माहितीचा वापर करीत असतात. त्यासाठी या माध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी लढा द्यायला हवा. स्वातंत्र्याची भाषा पी. साईनाथ करीत असले तरी ते शक्य आहे, असा प्रश्न आहे. यासाठी समाजच जागृत झाला पाहिजे. खर्या खोट्याची शहानिशा केल्याशिवाय प्रसारमाध्यमांच्या कुठल्या बातमीवर विश्वास ठेवता कामा नये. समाजाने आपली सदसदविवेकबुद्धी जागवली पाहिजे.

No comments:

Post a Comment