Wednesday, January 3, 2018

(अध्यात्म) विरक्त आणि संसारी

   
 एक राजा आपल्या राज्यातल्या एका साधूचा फारच सन्मान करायचा. राजाने साधूला राहण्यासाठी आपल्या राजमहालासारखा एक विशाल असा महाल बनवून दिला होता. त्या महालासमोर आपल्या उद्यानासारखे उद्यान उभारले होते. हत्ती,घोडे, रथ दिले होते. साधूच्या सेवेसाठी सेवकांचीही नियुक्ती केली होती. राजा साधूकडे नेहमी जात-येत होता. तो कधी कधी हास्यविनोद करायचा.गप्पा मारायचा आणि माघारी निघून यायचा. एकदा राजाने साधूला विचारले, आपल्या दोघांकडेही सर्व सुख-सुविधा उपलब्ध आहेत. पाहिजे त्या वस्तू आहेत. मग मला सांगा, तुमच्यात आणि माझ्यात काय फरक राहिला? साधू समजून चुकला की, राजाला काय म्हणायचे आहे. राजा बाहेरच्या सुख-सुविधालाच अधिक महत्त्व देत आहे, याची त्याला कल्पना आली. राजाच्या प्रश्नावर साधू थोडा वेळ गप राहिला आणि पुन्हा म्हणू लागला, राजन, याचे उत्तर आपल्याला काही दिवसांनी देतो. एक दिवस राजा साधूकडे आला, तेव्हा साधूने त्याला जंगलातून त्याच्यासोबत फेरफटका मारायला येण्याची विनंती केली. राजा तयार झाला. ज्यावेळेला ते दोघे दाट जंगलात पोहचले, तेव्हा साधू राजाला म्हणाला,राजा, माझी इच्छा आता नगरात परतण्याची नाही. आपण दोघांनीही भरपूर सुख-वैभव भोगले आहे. आता इथेच वनात राहून देवाचे नामस्मरण करत जीवन व्यथित करायचं म्हणतोय. असं करू, आपण दोघेही इथे राहू. तू थांबतोस ना? राजा घाबरला. म्हणाला, साधू महाराज, मी तर राजा आहे. माझं साम्राज्य आहे. बायका-पोरं आहेत. मी जंगलात राहू शकत नाही. साधू हसले आणि म्हणाले, तुझ्यात आणि माझ्यात हाच तो फरक आहे. जो भोगाविषयी आसक्त आहे, तो जंगलात राहूनही संसारी आहे. जो भोगात आसक्त नाही,तो घरातदेखील विरक्त आहे.

No comments:

Post a Comment