Saturday, March 3, 2018

नव्या तंत्रज्ञानाची माहिती करून घ्यायला हवी


     नागरिकांच्या चुका व अज्ञानामुळे इंटरनेटच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारीचे प्रकार वाढले असून, यामुळे नागरिकांचे पैसे व गोपनीयतेला धोका निर्माण झाला आहे. बँकांनी याबाबत सभासद व ग्राहकांना सजग करण्यासाठी नियमितपणे जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. सायबर साक्षरता महत्त्वाची आहे.बँकांनी मोबाइल, इंटरनेट, एटीएम व अन्य कार्डांच्या वापराबाबत ग्राहक व सभासदांना वेळोवेळी माहिती दिली पाहिजे तसेच जनतेनेही बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती घेऊन अपडेट राहणे गरजेचे आहे. सायबर गुन्ह्यांतील फिशिंग, हॅकिंग, नायझेरियन फ्रॉड, सायबर बुलिंग, डेटा थेप्ट, क्रिप्टोग्राफी, सॉफ्टवेअर पायरसी यासह बिटकॉइन क्रिप्टो करन्सी, मल्टिलेव्हल मार्केटिंग आदी प्रकारांची सविस्तर माहिती करून घ्यायला हवी.
     खरे तर आज तंत्रज्ञानातील क्रांतीने सार्‍या जगाला झपाटून टाकले आहे. स्मार्टफोन बहुतेकांच्या हाती आला आहे. सोशल मीडियाचा प्रभाव वाढला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून व्यवहार ऑनलाईन होऊ लागले. व्हॉट्सअँप, फेसबुक किंवा ट्विटरसारख्या सोशल मीडियावर चुकीच्या वा आक्षेपार्ह गोष्टीही येऊ लागल्या. पण ऑनलाइन पेमेंट करताना कोणती खबरदारी घ्यावी? सायबर गुन्ह्य़ांना आळा कसा घातला जाऊ शकतो? सायबर कायदा व आयटी कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी कोणत्या? अशा इंटरनेटच्या जगतातील विविध पैलूंच्या माहितीपासून मात्र  बहुतांशी वापरकर्ते अनभिज्ञ आहेत. नव्या तंत्रज्ञानाने आपली मोठी सोय झाली आहे. वेळ व पैसा वाचू लागला आहे. पण जशी अन्य क्षेत्रात गुन्हेगारीचा शिरकाव झाला,तसे याही क्षेत्रात झाला. त्यामुळे या गुन्हेगारीपासूनच सावध राहण्याची जबाबदारी आपली आहे, पण याबाबत आपण तसे सावध नाही. त्यामुळे याचा फायदा सायबर क्षेत्रातले गुन्हेगार घेऊ लागले आहेत. 
      साहजिकच याचा फायदा गुन्हेगार घेऊ लागले. या जगात कोणतीही गोष्ट सोपी राहिलेली नाही. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात काळजी ही घ्यायलाच हवी. दोन दशकांपूर्वी दूरध्वनी, दूरचित्रवाणी व संगणकापर्यंत  तंत्रज्ञान मर्यादित  होते. आज दैनंदिन आयुष्यच तंत्रज्ञानाने व्यापून गेले आहे. त्याचे जसे फायदे झाले तसेच तोटेही झाले. ज्ञानार्जनाची विविध व्यासपीठे उपलब्ध झाली असली तरी माणसा-माणसांमधला संवाद, विचारक्षमता कमी झाली आणि तंत्रज्ञानावरचे अवलंबित्व वाढले. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सायबर सुरक्षा हे खूप महत्त्वाचे क्षेत्र म्हणून उदयास येत असतानाच गुन्हेगारीही वाढीस लागली आहे. 
     सर्वाधिक सायबर हल्ले होणार्‍या देशांच्या यादीत भारत सातव्यास्थानी आहे. अनेक गोष्टींचे डिजीटलायझेशन होत असतानाच सायबर गुन्ह्य़ांमध्येही वाढ होताना दिसत आहे. महत्त्वाची माहिती चोरण्याच्या उद्देशाने अनेक हॅकर्स डेटा चोरी करतात. याच सायबर सुरक्षा आणि डेटा चोरीसंदर्भात अमेरिकेतील एका कंपनीने नुकतेच सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार सायबर हल्ले होणार्‍या देशांच्या यादीमध्ये भारत सातव्या स्थानी आहे. या कंपनीने नुकत्याच जाहीर केलेल्या 'स्टेट ऑफ द इंटरनेट'च्या अहवालामध्ये सायबर सुरक्षा आणि डेटा चोरीसंदभातील आकडेवारी जाहीर केली आहे. मागील वर्षी भारतात झालेल्या एकूण सायबर हल्ल्यांपैकी 40 टक्के म्हणजेच 53 हजारांहून अधिक सायबर हल्ले हे आर्थिक क्षेत्रांशीसंबंधित बेवसाईट्स आणि अँप्लिकेशन्सवर झाले आहेत. फिशिंग, वेब हॅक्स आणि मालवेअर प्रकारातील सायबर हल्ल्यांच्या प्रमाणात 2017 सालात वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे आणि सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे ही वाढ आर्थिक व्यवहारांसंदर्भातील सेवांशी संबंधित आहे. त्यामुळेच भारताने सायबर सुरक्षेच्या दृष्टीने इंटरनेट वापरासंदभातील कठोर नियम, त्यासंदर्भातील पायाभूत सुविधा आणि त्यासंदर्भातील अँक्शन प्लॅनवर लवकरात लवकर काम करून डिजीटल व्यवहार अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न करायला हवा.  
    कोणत्याही सायबर हल्ल्याचा मुख्य उद्देश हा आर्थिक नफा कमावणे हाच असतो. मागील काही वर्षांमध्ये सायबर हल्ल्यांचा ट्रेण्ड बदलल्याचे पाहायला मिळत आहे. आधी छुप्या पद्धतीने होणारे हल्ले आता थेट केले जात आहेत. रॅम्सवेअर, क्रिप्टो मायनिंग सारख्या माध्यमातून डिजीटल माध्यमातील संपत्तीवर हॅकर्स डल्ला मारतात. अशा चोरीमुळे त्यांना चोरलेले पैसे थेट त्यांच्या क्रिप्टोवॉलेटमध्ये साठवता येतात. म्हणजे त्यांच्या डिजीटल खात्यावर जमा करता येतात. बँकिंग क्षेत्राशी संबंधित असणार्‍या डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिसेस (डॉस) प्रकाराच्या सायबर हल्ल्यांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक प्रमाणात वाढ झाली आहे. सोशल नेटवकिर्ंग वेबसाईटवर अकाऊंट सुरू केल्यानंतर आपली माहिती संपूर्ण जगासमोर उघड होते. यात अनेक धोके असतात. व्यक्तिगत माहितीचा गैरवापर होण्याचाही धोका असतो. हल्ली अनेक कंपन्या, कॉल सेंटर अशी माहिती मिळवून त्याचा मार्केटिंगसाठी वापर करतात. त्यामुळे सोशल मीडिया अकाऊंटचा वापर करताना काही गोष्टींची निश्‍चितपणे खबरदारी घ्यायला हवी. 
      ऑनलाइन पेमेंट, इंटरनेट बँकिंग, सोशल मीडिया अकाऊंट इत्यादीसाठी असलेल्या आपल्या पासवर्डची पुरेपूर काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. बँकिंगच्या व्यवहारात आणि आता नोटबंदीनंतर तर सर्वांनीच वेगवेगळ्या प्रकारचे वॉलेट वापरायला सुरुवात केल्याने ही बाब खूप महत्त्वाची आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरण आणि इंटरनेट नेटवर्क वापरणे हे 'इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अँक्ट, 2000' या कायद्याखाली येते. अमेरिकेतील कायद्याच्या धर्तीवर भारत सरकारनेही बनवलेला हा कायदा खूप कडक आहे. 2008 मध्ये या कायद्यात दुरुस्ती करून काही नव्या तरतुदींचाही समावेश करण्यात आला. व्हॉट्सअँप किंवा अन्य सोशल मीडियावर पडलेली पोस्ट आपण सहजपणे फॉरवर्ड किंवा शेअर करतो. पण त्यात काही आक्षेपार्ह, अश्लील, बदनामीकारक असेल तर आपण या कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतो, हे लक्षात घ्यायला हवे.त्यामुळे कोणीही आंधळेपणाने अनुकरण करू नये.  नव्या गोष्टी वापरताना त्या गोष्टी शिकून घ्यायला हव्यात. बँकांनीदेखील वेळोवेळी आपल्या ग्राहकांना प्रशिक्षण दिले पाहिजे. सायबर साक्षरता महत्त्वाची आहे.

No comments:

Post a Comment