Thursday, March 1, 2018

लोकसहभागाशिवाय प्लास्टिकमुक्ती अशक्य


      रोजच्या जीवनात विविध गोष्टींसाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला आहे. त्यामुळे जीविताला मोठय़ा प्रमाणात हानी पोहोचवणार्‍या आणि सामाजिक आरोग्य धोक्यात आणणार्‍या प्लास्टिक पिशव्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. मोठ्या  शहरांमध्ये महिन्याला हजारो टन प्लास्टिक पिशव्यांची आयात केली जाते. या सर्वांमुळे प्रदूषणात अधिकच भर पडत असून पर्यावरणाचाही प्रश्न गंभीर बनला आहे.

      फेरीवाले, भाजीविक्रेते, फळविक्रेते, किराणा दुकानदार, मटण, मासळी विक्रेते, अशा सर्वच दुकानातून मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जातो. गुटखा, पान मसाला, निरनिराळे चटपटीत पदार्थ तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू आदींच्या पॅकिंग तसेच विक्रीसाठीही मोठय़ा प्रमाणात प्लास्टिकचा वापर वाढला आहे. मोठी शहरे असोत अथवा छोटी शहरे तिथली कचराकुंडे आणि कडेला प्लास्टिक कचर्‍याच ढीगच पाहयला मिळत असतो. प्लास्टिक बंदीचे कायदे आणि नियम असले तरी ते कागदावरच राहिले आहेत. त्याची अंमलबजावणी होत नाही. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत सरकारवर ताशेरे ओढले होते. मात्र याचा परिणाम पर्यावरण विभागावर काही झाल्याचे दिसत नाही. पर्यावरण मंत्रालयाने यावर अधिसूचना काढून किमान 50 मायक्रॉन जाडी असणार्‍या प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदी घातली. मात्र ही बंदी केवळ कागदावरच असल्याचे वास्तव आहे. आता जरी प्लास्टिकमुक्त महाराष्ट्रचा निर्णय घेतला असला तरी त्याची अंमलबजावणी कठीण असल्याचे दिसते.
      खेड्यापेक्षा शहरात फार मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जातो. रोजच्या वापरातील या पिशव्यांची निर्गत वा विल्हेवाट योग्य प्रकारे होत नाही. शहरातील कचरा उठावासाठीची अपुरी यंत्रणा, पुनर्विघटनाची पुरेशी सोय नसणे, अशा अनेक कारणामुळे प्लास्टिक कचर्‍यांचा प्रश्न जटील बनला आहे. विशेष म्हणजे या कचर्‍यामुळे जनावरांच्या पोटात अशा पिशव्या जात असल्याने त्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. प्लास्टिक पिशव्या कुजत नसल्याने त्या तशाच अडकून राहतात. शहरातील अनेक ड्रेनेजमध्ये मोठय़ा प्रमाणात प्लास्टीक पिशव्या अडकल्याने ड्रेनेज तुंबून राहणार आहेत. त्यामुळे पावसाळ्यात शहरातील सांडपाणी हे नागरी वस्तीत शिरते ,यामधून आरोग्याचा प्रश्नही गंभीर होतो.
      वापरले गेलेल्या प्लास्टिकच्या संपर्कात आल्याने मोठय़ा प्रमाणात त्वचारोग होण्याची शक्यता वाढली आहे. श्‍वसनाच्या विकारातही वाढ झाली आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या मतानुसार महिलांच्या स्तन कर्करोगामध्येही प्लास्टिक कचर्‍याने वाढ झाली आहे. शहरात धारावी, भांडूप, मुलूंड, दमण, सुरत आणि गोवा आदी ठिकाणच्या कारखान्यातून मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांची आयात केली जाते. तिथून या पिशव्या देशात,राज्यात सर्वत्र विक्रीस पाठविल्या जातात. जकात बंद असल्यामुळे त्या सहजपणे जिल्ह्यात पाठविल्या जात आहेत. एकूणच प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढल्याने पर्यावरण हानीबरोबरच मानवी जीवितास धोका निर्माण झाला आहे.
      प्लास्टिक कचर्‍याची समस्या अतिशय गंभीर असून यावर काम म्हणावे तसे कुठल्याच शहरात होताना दिसत नाही. केवळ विल्हेवाटीचा प्रश्न नाही तर  पावसाळ्यात त्याचा प्रचंड त्रास होतो. नागरिकांच्या आरोग्याशी हा चाललेला खेळ बंद करण्यासाठी काही शहरांमध्ये कठोर  निर्णय घेतला गेला  आहे. मात्र लोकांशिवाय हा निर्णय कडेला जात नाही. व्यापारी वर्ग आपला व्यवसाय आणि लाभ सोडायला तयार नाही. आणि लोकसूद्धा त्याचा वापर केल्याशिवाय राहत नाहीत. लोकसहभागाशिवाय हा प्रश्न तडीस जात नाही.  यामुळे  50  मायक्रॉन जाडीपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशवी न वापरण्याचे नियमही कोंडाळ्यात पडले आहेत. या प्लास्टिक पिशव्यांमध्ये पॉलीथिन, पॉली व्हिनाईल, पॉली प्रोपोलीन, स्टायरोफोम, अल्कोहोल, पॉलीस्टायरीन यासारख्या रासायनिक पदार्थांचा समावेश असतो ,ते आपल्या शरीराला घातक असतात. शिवाय प्लास्टिक पिशव्यांवर केले जाणारे डिझाईन आणि रंगही हानीकारक असतात.
वैद्यकीय जाणकारांनुसार  प्लास्टिक संपर्कामुळे महिलाना स्तनाच्या कर्करोगाचा धोका होतो.
     जनावरांच्या आरोग्याचे प्रश्न गंभीर, त्वचा आणि श्‍वसन रोगाला आमंत्रण मिळते. एका आकडेवारीनुसार दर आठवडड्याला 6, महिन्याला 24, वर्षाला 288 तर आयुष्यभरात 22 हजार 176 पिशव्यांचा एका माणसाकडून वापर होत असतो.  फेरीवाले, भाजीविक्रेते, फळ विक्रेते आणि मटण-मासळी विक्रेत्यांकडून सरासरी 1.5 मायक्रॉन जाडीच्या पिशव्यांचा वापर करतात.चैनीच्या वस्तूमधूनही प्लास्टिक पिशवीचा महाराक्षस आपल्या दारात आला आहे.या सगळ्यांत मानवाचेच अधिक नुकसान होत आहे.प्लास्टिकचा वापर थांबवण्यासाठी  कठोर व्यवस्थापन आणि योग्य विल्हेवाटीची गरज आहे.
      बांगला, चीन, आयर्लंड, इस्त्रायल, कॅनडा, केनिया, टांझानिया, साऊथ आफ्रिका, सिंगापूर देशात प्लास्टिक पिशव्यांना बंदी आहे.मात्र आपल्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात याच्या वापरावर काही प्रमाणातच निर्बंध आहेत.मात्र तेही पाळले जात नाहीत, अशी परिस्थिती आहे. आपल्या भारतात दरवर्षी दहा कोटी मेट्रिक टन प्लास्टिक पिशवींचा वापर होत असतो.हे फारच भयानक आहे.प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे. यासाठी लोक चळवळ उभी राहिली पाहिजे. लोकांच्या मनात प्लास्टिक न वापरण्याविषयी पक्की धारणा निर्माण झाली पाहिजे.

No comments:

Post a Comment