Thursday, April 5, 2018

सुट्टीचा सदुपयोग करा,नवं काही शिका


     एप्रिल, मे महिना म्हणजे आपल्याकडे शाळांना सुट्टीचा काळ असतो. दहावी-बारावीच्या परीक्षा झालेल्या असतात. साधारण एप्रिलच्या मध्यावर सुट्ट्या लागतात. परीक्षेला कंटाळलेली मुले सुट्टीची अगदी अतुरतेने  प्रतीक्षा करीत असतात. काहींचे प्लॅन ठरलेले असतात. कुणाला गावाला जायचं असतं, कुणाला फिरायला जायचं असतं. तर कुणाला काही नवं शिकायचं असतं. काहींना नवं काही वाचायचं असतं. एकूण काय तर सुट्टी एंजॉय करायची असते. कुणाला ती सत्कारणी लावायची असते. सुट्टीचा कालावधी आहे, मौजमजा करायला हरकत नाही. पण संपूर्ण सुट्टी अशीच वाया घालवून चालायचं नाही. आपल्याला सुट्टी असली तरी आपण विद्यार्थी आहोत. निरंतर शिकायचं असतं. आपल्याला आवडतं, भावतं, ते शिकायला घ्यायचं! शिकलेलं काही वाया जात नाहीपण काहींना शिकणं म्हणजे पाठ्यपुस्तक वाचणे, अभ्यास करणे असे वाटत राहते. त्यामुळेच आजकालच्या पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा शिकण्याचा कल पाहिला तर तो केवळ शैक्षणिक कालावधीपुरताच दिसून येतो. एकदा का परीक्षा आटोपल्या की मग ही सुट्टी केवळ अन् केवळ या विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल आणि कंप्युटरवरचे गेम खेळण्यात व्यतित झालेली दिसून येते.काहींच्या हातात बॅट-बॉल येतो. काहीजण कॅरम खेळतात. त्यातल्या त्यात बैठे खेळांना पहिली पसंदी दिली जाते. अर्थात काही शिकण्यासारखं आहे. नवे खेळ, नवे उद्योग शिकायलाच हवेत. जुने खेळ, क्रीडा प्रकार आता दिसेनासे झाले आहेत. खरे तर मोठ्या लोकांनी अशा खेळ प्रकारांना पाठबळ द्यायला हवं. क्रिएटीव्ही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.

      मुलांबरोबर पालकांनीदेखील सुट्टीचे नियोजन करायला हवे. आपल्या पाल्याला मदत करावी. अगोदरच पालक मुलांना तुला अमूक करायचे आहे, तमूक करायचे आहे, असे सांगून आपल्या पाल्यांना दडपणाखाली आणलेले असते. अगोदरच पालकांनी बजावून सांगितलेले असते परीक्षा झाल्याखेरीज मोबाईलला हात लावायचा नाही. त्यामुळे कधी एकदा परीक्षा संपतात आणि कधी एकदा मोबाईलवर गेम खेळतो असे होऊन बसलेले असते. हा मोबाईल केवळ काही मिनिटे पालकांच्या हातात नसतो तर तासन् तास ही मुले पालकांचे मोबाईल आपल्या ताब्यात घेऊन बसतात. यामुळे संपूर्ण वेळ, दिवस त्यातच सरून जातो. याचा परिणाम या मुलांच्या डोळयांवर तर होतोच पण त्यांचा मेंदू ही यातच गुरफटून गेल्याने या मुलांचे लक्ष कुणाच्या बोलण्याकडे जात नाही. एकीकडे मोबाईल, एकीकडे टीव्हीवरील कार्यक्रम, कार्टून्स किंवा कंप्युटरवर ही मुलं तासनतास खिळून बसलेली असतात. अशा मुलांना ना भुकेचा अंदाज येत ना त्यांना तहान लागत. मग यातूनच सुरू होतात, शारीरिकपिडा!
      पालक आज आपल्या मुलांचे लाड काही कमी करत नाहीत. त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे,म्हणून महागड्या शाळेत पैसे, देणग्या देऊन प्रवेश मिळवतात. लोकांकडे पैसा असल्याखेरीज ही मंडळी आपल्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये घालत नाहीत. शिवाय मुलांना काय हवं, ते त्यांचे शब्द खाली पडण्याअगोदरच कुणी तरी ते उचललेले असतात. आता स्वस्तात मिळणार्या स्मार्ट फोनला अगदी गरिबातला गरीब लोकांना देखील पहिली पंसदी आहे. अगदी पहिलीपासूनच नव्हे तर तीन-चार वर्षाच्या मुलांच्या हातातही मोबाईल हे खेळणं म्हणून असतं. पहिलीपासूनचा अभ्यास हा जरी मुलांच्या शिकण्याचा पाया असला तरी मोबाईलवरील गेम्स, व्हीडिओ, गाणी, आदींच्या सान्निध्यात राहिल्याने मुलांच्या शैक्षणिक जीवनावर त्याचा निश्चितच परिणाम जाणवतो. जाहिरातबाजीचाही या मुलांवर परिणाम झालेला दिसून येतो. ऑनलाईन खरेदी करणे, मोबाईलमध्ये गुंतणे या मुलांना जडलेल्या सवयींकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
      शैक्षणिकदृष्टया पाल्य आणि पालक, विद्यार्थी आणि शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थी असं या मुलांचं नातं घट्ट होत असताना मोबाईलच्या माध्यमातून हे विद्यार्थी दुसरीकडेच भरटकलेले दिसून येतात. सुट्टीमध्ये पालकांसोबत वेळ घालवताना ही मुलं आपल्या कुटुंबामध्ये फार कमी वेळ रमतात. जितकी ती या निर्जीव उपकरणामंध्ये रमतात. याचे परिणाम मुलांच्या स्वभावावर दिसून येतात. मग अबोल राहणं, कुणामध्ये न मिसळणं, वेळेवर जेवण न जेवणं, एकलकोंडेपणा निर्माण होणं, स्वभावात चिडचिडेपणा येणं. आदी गोष्टी या मुलांच्या जीवनावर परिणाम तर करतातच पण शैक्षणिक पातळीवर ही या मुलांच्या श्रेणीवर त्याचा परिणाम होतो. ही सुट्टी जरी मुलांना एंजॉय करायची असेल तर काहीवेळा मामाचं गाव, कुटुंबासमवेत सहली, गावी जाणे किंवा घरातच थांबणे आदी पर्याय निवडले जातात.पण फक्त सुट्टी वाया घालवण्यापेक्षा त्याचा सदुपयोग झाला पाहिजे.
      आजकाल मुलांचं लक्ष्य मात्र एकच असतं ते म्हणजे मोबाईल, कंम्प्युटर, टीव्ही. प्रवासातही या मुलांच्या हातात मोबाईलच असतो. गेम, व्हीडिओ, गाणी ऐकणे आदी गोष्टींना ही मुलं अधिक प्राधान्य देतात. यामुळे जेव्हा शाळा सुरू होतात तेव्हा मग अचानक अभ्यास हाती घेणे, अभ्यासात मन रमवणे, टयुशन्स आदी गोष्टी या मुलांना नंतर जड जातात कारण आज वास्तव स्थिती पाहिली तर, मोबाईलचं तंत्र या मुलांच्या मेंदूवर एवढं फिट्ट बसलंय की, या मुलांना जडलेली ही सवय सुटू शकेल की नाही, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. कारण आजची मुलं ही ख-या अर्थाने आपलं बालपण विसरत चालली आहेत. स्वच्छंदी बागडण्याचे, निसर्गाचा आस्वाद घेण्याचे, सट्टीचा खरा अर्थ जाणण्याचेच विसरून गेली आहेत. त्यामुळे शरीराला व्यायाम देणारे, मन स्वच्छंदी करणारे, मैत्रीचा बंध जपणारे खेळही आज लोप पावत चालल्याचेच दिसून येतात. चित्रकला, रांगोळी, एमएससी- आयटी संगणक शिक्षण, एकादी भाषा शिकणे, मोडीलिपीसारख्या लिपीची ओळख करून घेणे, चांगली पुस्तके वाचणे, किराणा दुकानात काम करून तिथली परिस्थिती तो व्यवसाय जाणून घेणे अशा बर्याच गोष्टी करता येतात. तबला-पेटीचे शिक्षण, कागदकाम, पोहायला शिकणे, सायकल शिकणे, मेहंदी काढणे अशा किती तरी गोष्टी आहेत. त्याच्या शिकण्याने आपल्या ज्ञानात भर पडते. कौशल्य आत्मसात होते. त्याचा उपयोग आपल्याला आयुष्यात वारंवार करता येतो. ज्याला अधिक कला माहित आहेत, अभ्यास आहे,कौशल्य आहे अशा लोकांना खरे तर मोठा मान असतो. त्यामुळे विद्यार्थी या नात्याने आपण रोज काही ना काही शिकले पाहिजे.

1 comment: