Monday, April 9, 2018

आम्ही डफळापूरकर


     डफळापूर हे जत तालुक्यातले एक राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि प्रगत गाव. मात्र शिक्षण, सांस्कृतिक आणि मूलभूत सुविधांबाबत मागास गाव. जत-सांगली मार्गावरचं प्रमुख असलेलं डफळापूर गाव असा टोकाचा विरोधाभास घेऊन वाटचाल करीत आहे. पण अलिकडच्या कैक वर्षात गावात काही नवं,उल्लेखनीय घडलं नाही. पाणी टंचाईसारख्या मूलभूत समस्यांना तोंड देऊन कसं तरी जगणारं गाव फारसं कुणाच्या लक्षात राहत नाही. ना राजकीयदृष्ट्या प्रगती, ना शिक्षणात आगेकूच. भकास माळरानासारखं डफळापूर गावाचं झालं आहे. डफळापूरला फक्त पाणी नाही म्हणून वस्ती करण्याचम टाळणारे लोक एक तर जतला राहायला जातात किंवा कवठेमहांकाळला. या गावात प्यायला आणि वापरायला मूबलक पाणी झाल्यास इथे नक्कीच लोकवस्ती वाढून विकास घडला असता. पण डफळापूरच्या वाट्याला हे दिवस कधी येणार असा प्रश्न सुज्ञ नागरिकाला पडल्याशिवाय राहणार नाही. राजकारण करायला हरकत नाही,पण विकासासाठी मात्र सगळ्यांनी एकत्र यायला हवं.
चंद्रकांत भगवान कांबळे ( madhyabhagi)
     डफळापूरबाबत मोठी खंत अनेकांना आहे. संस्थानिक गावाचा कायापालट कधीचा व्हायला होता, असे अनेकांचे मत आहे. पण आता ही सल निदान शिक्षणात तरी दूर करावी, असं काही जाणत्या लोकांना वाटत आहे आणि ही मंडळी ‘आम्ही डफळापूरकर’ या बॅनरखाली एकत्र येऊन गावासाठी, गावातल्या मुलांच्या,युवकांच्या शिक्षणासाठी काही तरी करू ही जिद्द बाळगून कामाला लागली आहेत. या गावात गेल्या चाळीस वर्षात आयएसआय किंवा एमपीएससी अधिकारी झाला नाही, ही सल या लोकांना बोचते आहे. त्यामुळे या गावाचे नाव उज्ज्वल करण्याबरोबरच आपले नावही पुढे आणणारी पिढी घडावी,यासाठी ही मंडळी प्रयत्न करीत आहेत.  अर्थात ही त्यांची सुरुवात असली तरी अल्पावधीतच ही मंडळी काही तरी भरीव केल्याशिवाय राहणार नाहीत, असा आत्मविश्वास त्यांच्या बोलण्यातून दिसतो आहे.
     चंद्रकांत भगवान कांबळे यांच्या रुपाने पहिला आयएसआय अधिकारी डफळापूर गावातून मिळाला. सध्या श्री. कांबळे तामिळनाडू राज्याच्या मंत्रालयात सचिव पातळीवर काम करत आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत आणि माध्यमिक शिक्षणदेखील गावातल्या हायस्कूलमध्ये झाले. त्यांच्या चुलत्यांनी त्यांचे पुढचे शिक्षण पूर्ण केले. पुण्यात असतानाच त्यांनी शिक्षण क्षेत्रात भरारी घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या रुपाने पहिला आयएसआय अधिकारी डफळापूर गावचा झाला. पुष्पा चव्हाण, मसणे मॅडम ही मंडळी पोलिस अधिकारी झाली. याच गावचे सुपुत्र बाळासाहेब लांडगे हे मुंबई आयकर विभागात आयुक्त पदापर्यंत पोहचून सेवानिवृत्त झाले. राहुरी कृषी विद्यापीठाच्या वरच्या पदावर कार्यरत राहिलेले बी. के. माळी हेदेखील डफळापूरचेच! या लोकांनी गावाचे नाव आपल्या कर्तृत्वामुळे सर्वदूर केले. अलिकडेच जत पंचायत समितीच्या माजी सभापती देवयानी गावडे यांच्या मुलाला बीडीएसला प्रवेश मिळाला आहे. अशी काही मोजकीच नावे आपल्याला देता येतील. या गावातल्या लोकांना कृषी,वैद्यकीय अथवा भारतीय प्रशासन आणि महाराष्ट्र लोकसेवा क्षेत्रात संधी असतानाही फक्त मार्गदर्शनाचा अभावामुळे डफळापूर मंडळी पुढे सरकली नाहीत. डफळापूरकर पुढे जावा, त्याने गावाचे नाव उज्ज्वल करावे यासाठी ‘आम्ही डफळापूर’ पुढे सरसावले आहेत.
     सुमारे सव्वाशे समविचारी, ज्येष्ठ,तरुण एकत्र आली आहेत. इथल्या युवकांना विविध क्षेत्रातील परीक्षांच्या अभ्यासासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असून या निमित्ताने पन्नास हजारांची पुस्तके आणली आहेत. सर्व स्तरातल्या मुले, युवकांना लागतील ती पुस्तके आणण्यात आली आहेत. 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांची जयंती आहे. यादिवसापासून आम्ही डफळापूरकर जोमाने कामाला लागणार आहेत. आपल्या देशातल्या विविध संत, महान पुरुषांनी देशाची प्रगती कशात लपली आहे, याचा उलगडा आपल्या साहित्यातून, आपल्या वचनातून करून दिला आहे. त्या संतांना स्मरून या ‘आम्ही डफळापूरकर’ यांची वाटचाल राहणार आहे. गावातल्या सामाजिक अथवा अन्य क्षेत्रात योगदान दिलेल्या मंडळींचा गौरव करून त्यांच्या साथीने सुसंस्कृत पिढी घडवण्याचा विढा या मंडळींनी उचलला आहे. गावातला युवक आयएसएस अधिकारी झाला पाहिजे, महाराष्ट्र लोकसेवा क्षेत्रात गेला पाहिजे शिवाय अन्य क्षेत्रातही कामगिरी उंचवावी, म्हणून त्यांचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. त्यांना त्यांच्या या कार्यात यश लाभो, डफळापूरचे नाव त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवक उज्ज्वल करीत अशी अशा बाळगायला हरकत नाही, यासाठी ‘आम्ही डफळापूरकरां’ना अगदी मनापासून शुभेच्छा!

No comments:

Post a Comment