Saturday, May 12, 2018

डिप्रेशनमधून बाहेर आली आणि यश मिळवलं: मेहुली घोष


     मेहुषी घोषला बालपणापासूनच शुटर बनायचं होतं. ट्रेनिंगच्यावेळी तिचा नेम चुकला आणि पॅलेट एका कर्मचार्याला लागली. तिला निलंबित करण्यात आले. वाटलं, आता सगळं संपलं. ती डिप्रेशनमध्ये गेली. आईने तिच्यावर उपचार केले आणि पुन्हा खेळायला धैर्य दिले. एप्रिल 2018 मध्ये ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकूल स्पर्धेत तिने नेमबाजीत रौप्य पदक मिळवले. तिच्या या यशाने सर्वच अचंबित असले तरी तिचा इथपर्यंतचा प्रवास मोठा खडतर आणि जिद्दीचा आहे.तिची यशोगाथा आजच्या युवा पिढीला प्रेरणादायी आहे.
मेहुली बालपणापासूनच रंगीबेरंगी फुग्यांना नेम साधायची. तिला ते आवडायचे. लांब भिंतीवर लावलेले फुगे ज्यावेळेला तिच्या पॅलेटचा मार खाऊन फुटायचे, तेव्हा तिला खूप आनंद वाटायचा. तिच्यासाठी सर्वात रोमांचित खेळ होता हा! सात वर्षांची असताना तिने नेमबाज अभिनव बिंद्राला गोल्ड मेडलचे चुंबन घेताना पाहिले होते. रायफलचा निशाना लावत असतानाचा बिंद्राचा फोटो पाहून तिच्या लहानग्या मनाला प्रश्न पडला होता, नेम साधल्यावर मेडल मिळते का? नंतर तिला कळलं की, नेमबाजी हा एक व्यावसायिक खेळ आहे.
   
 कोलकातापासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिरमपूरमध्ये राहणार्या मेहुलीला टीव्ही मालिका पाहायला आवडायच्या. खासकरून अशी मालिका आवडायची,ज्यात कोणी मुलगी पोलिस इन्स्पेक्टर असेल आणि तिच्या हातात असेल पिस्टल किंवा रायफल. तिला सीआयडी मालिका खूप आवडायची. इथूनच तिच्या मनात नेमबाजीविषयी आवड निर्माण झाली. सीआयडी बघून प्रेरणा मिळाली. तिच्या वडिलांनीदेखील तिच्या मनातले अचूक ओळखले. त्यांनी ठरवूनच टाकलं,तिला नेमबाज बनवायचं. ते सरकारी विभागात कर्मचारी होते. खेळाचा आणि त्यांचा दुरान्वयेही संबंध नव्हता. पण मनात इच्छा होती की, मुलीने खेळाडू बनावे. यासाठी ते काहीही करायला तयार होते.
     वडिलांनी सिरमपूर रायफल क्लबमध्ये तिचे नाव नोंदवले. तेव्हा ती चौदा वर्षांची होती. ही गोष्ट 2014 आहे. मेहुलीचा तर आनंद गगनात मावेनासा झाला होता. शुटर बनण्याचे स्वप्न साकार होणार होते. अचानक एक अशी घटना घडली आणि तिला नैराश्याच्या गर्तेत लोटलं. एके दिवशी सराव करताना तिचा नेम चुकला. तिच्या रायफलमधून निघालेले पॅलेट एका व्यक्तीला लागले. तो जमिनीवरच कोसळला. त्याला जखम झाली. तिथे उपस्थित असलेल्या कर्मचारी वर्गाने त्याला हॉस्पीटलमध्ये दाखल केले. संपूर्ण अॅकेडमीमध्ये गोंधळ उडाला. मेहुलीला मोठा धक्का बसला. कोच तिच्यावर भयंकर रागावले, हे तू काय केलंस? तिला घरी जायला सांगण्यात आलं. ती कित्येक दिवस घराच्या बाहेर पडली नाही. ॅकेडमी प्रशासनाने या मुद्द्यावरून एक बैठक बोलवली आणि तिला निलंबित करण्यात आलं.
     निलंबनाची गोष्ट ऐकून ती बिथरली. तिच्यासाठी हा  धक्का इतका मोठा होता की,ती डिप्रेसनमध्ये गेली. शाळेला जाणं बंद झालं. ती गपचिप राहू लागली. ती घरात कैद्यासारखं राहू लागली. तिच्या मनात सारखा सारखा एक प्रश्न उपस्थित राहायचा, आता माझं कसं होणार? ती स्वत:ला दोष द्यायची. दु:खाची आणखी एक गोष्ट म्हणजे तिचे शुटर साथीदारदेखील तिच्या विरोधात गेले होते. नातेवाईक आणि शेजार्या-पाजार्यांच्या नजरेत ती बेफिकीर आणि दोषी बनली होती. तिला जाहीररित्या अपमानितही करण्यात आले. अशा अडचणीच्या काळात फक्त आई-वडील तिच्यासोबत होते. त्यांनी मुलीला खचू दिले नाही. डिप्रेशनपासून सुटका करून घेण्यासाठी तिच्या आईने तिला मानसशास्त्रतज्ज्ञाकडे घेऊन गेली. डॉक्टरांनी तिचे काउन्सिलिंग केले. त्यांनी तिला जाणीव करून दिली की, नेमबाजीमधली चूक एक अपघात होता. अशा घटना होत राहतात.
     डिप्रेशनमधून बाहेर यायला तिला जवळजवळ एक वर्ष लागले. मोठ्या मुश्किलीने तिच्यात आत्मविश्वास जागा झाला. तेव्हा तिच्या आईने तिला सांगितले की, तुझे आयुष्य संपलेले नाही. आताही तू शुटर बनू शकतेस. थोडे दैर्य दाखव. पुढे चल. रायफल तुझी वाट पाहात आहे. 2015 मध्ये ती आई-वडिलांसोबत कोलकात्याला आली. इथे तिची भेट माजी नेमबाज आणि उत्तम प्रशिक्षक जयदीप कर्माकर यांच्याशी झाली. कर्माकर यांना त्या अपघाताबाबत सांगण्यात आले. ते मेहुलीशी बोलले आणि तिला ट्रेनिंग द्यायला तयार झाले. जयदीप सांगतात की, मेहुलीसाठी तो अपघात विसरणं सोपं नव्हतं. सर्वात मोठे आव्हान होते, ते म्हणजे तिला मानसिकरित्या जिंकण्यासाठी उभं करणं. खरोखरच ती प्रतिभावंत आहे. आम्ही तिला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवलं.
     कोलकातामध्ये ट्रेनिंगसोबतच तिची कठीण दिनचर्यादेखील सुरू झाली. ॅकेडमी घरापासून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर होती. रोज चार तासांचा प्रवास करून तिला पोहचावं लागायचं. सकाळी तिला लवकर घराबाहेर पडावं लागायचं. आणि नेहमी घरी परतायला रात्री उशीर व्हायचा. कधी कधी रात्री 11-12 वाजायचे. थकून जायची. पण पुन्हा एकदा आपले स्वप्न साकार होणार या कल्पनेने ती सुखावून जायची.
     घरची परिस्थिती तशी चांगली नव्हती. सरकारी मदतीशिवाय मुलीला शुटर बनवणे कठीण होते. पण तिच्या घरच्यांना तिचे स्वप्न भंगू नये, असं वाटायचं. वडिलांनी नवीन रायफल खरेदी करण्यासाठी दोन लाखाचे कर्ज उचलले. 2016 मध्ये तिला पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल शुटींग चॅम्पियनशीपमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. इथे तिने दोन गोल्ड मेडल आपल्या नावावर केले. या विजयाने तिचा आत्मविश्वास दुणावला. 2017 मध्ये तिने राष्ट्रीय शुटींग चॅम्पियनशीपमध्ये आठ मेडल जिंकून वाहवा मिळवली. तिला भरपूर प्रसिद्धी मिळाली. ओळखही मिळाली.

No comments:

Post a Comment