Tuesday, October 30, 2012

बालकथा बिच्चारा व्यापारी

     एक व्यापारी होता. एका देशातून दुसर्‍या देशात जाऊन माल खरेदी करायचा आणि विकायचा. महिनोमहिने बाहेर राहून पुष्कळ पैसा गोळा करून आपल्या देशात परतायचा. या त्याच्या भटकंतीत त्याला चित्र-विचित्र माणसे भेटायची, तिथल्या नानाविध तर्‍हा पहायला मिळायच्या.
     एकदा तो अशा एका शहरात पोहचला, तिथले सगळेच लोक श्रीमंत होते. तिथे त्याच्या वस्तूंना दुप्पट-तिप्पट दाम मिळाला. दिवसभर फिरून फिरून त्याची मुबलक अशी कमाई झाली. रात्र होताच तो पार थकून गेला. भूकेने त्याचा जीवही कासाविस झाला. त्याने संपूर्ण शहर पालथे घातले, पण एकही खानावळ त्याला दिसली नाही. मग मात्र त्याची अवस्था खूपच केविलवाणी झाली. बरीच भटकंती आणि विचारपूस केल्यावर त्याला एक खानावळ दिसली. त्यावर लिहिले होतं, 'विचार करून खा भोजनालय.' त्या विचित्र नाव असलेल्या खानावळीतले नियम आणि कायदेही वेगळे होते. तिथे कुठलाही ग्राहक फक्त एकदाच ऑर्डर देऊ शकत होता. आपल्याला लागतील ते आणि लागतील तेवढे पदार्थ एकदाच मागवायचे. शिवाय ताटात एकही पदार्थ ठेवायचा नाही. ताटात शिल्लक ठेवल्यास अथवा पुन्हा मागणी केल्यास एक हजार  मोहरांचा दंड भरावा लागे. व्यापारी नियम, कायदे वाचताच घाबरला, पण भुकेपुढे सारे अशक्य होते. तो घाबरतच आत घुसला.
     खानावळीच्या मालकाने पहिल्यांदाच प्रश्न केला, "आमच्या नियम-अटी वाचल्या आहेत ना?"
त्याने होय म्हटल्यावरच त्याची ऑर्डर स्वीकारण्यात आली. त्यादिवशी फक्त शंकरपाळ्याच उरल्या होत्या. व्यापार्‍याला देश नवा होता. त्यामुळे या पदार्थांविषयी अनभिज्ञ होता. शंकरपाळीचे नाव कधी त्याने ऐकले नव्हते. त्याला कितीची ऑर्डर द्यावी समजेना. शेवटी खूप विचार करून त्याने दहा शंकरपाळ्यांची ऑर्डर दिली. थोड्या वेळाने एका सुंदर ताटात चांदीच्या वेष्ठनात दहा शंकरपाळ्या त्याच्यासमोर हजर झाल्या. शंकरपाळ्या पाहिल्यावर तो उडालाच. एवढ्या-एवढ्याशा शंकरपाळ्या त्याच्या एका घासाच्याही नव्हत्या. पण काहीच करू शकत नव्हता. दंड म्हणून शंभर मोहरा भरण्यापेक्षा उपाशी राहिलेले परवडले, असा विचार करून त्याने त्या शंकरपाळ्या खाल्या, पाणी प्याला आणि बिल देऊन मुकाट्याने बाहेर पडला.
     दुसर्‍यादिवशीही त्याचा धंदा जोरात झाला. रात्री पुन्हा तीच अडचण त्याच्यासमोर उभी राहिली. पण आता तो घाबरला नाही. त्याच खानावळीत जाऊन त्याने विचारले, काय तयार आहे?
उत्तर आलं, "शेव!"
     "ठीक आहे"  व्यापारी म्हणाला, "शंभर घेऊन या." आणि मनातल्या मनात म्हणाला, पोट कसे भरत नाही, तेच मी बघतो. कितीही लहान वस्तू असली तरी पोट भरेलच. पण तशाच सुंदर तबकात सोन्याच्या वेष्टनात  बारीक बारीक शेव त्याच्यासमोर ठेवण्यात आले, तेव्हा त्याने डोक्यालाच हात लावला. बेसनच्या पिठाचे बारीक बारीक शेव बनवले होते. मोजून शंभर त्याच्यापुढे ठेवण्यात आले होते. बिच्चारा व्यापारी काय करणार होता, निमुटपणे  तेवढ्यावरच समाधान मानून पोटावरून हात फिरवत बाहेर आला.
     तिसर्‍यादिवशीही त्याला रात्रीच सवड मिळाली. सलग तीन दिवस झाले, त्याच्या पोटाची आग शमली नव्हती. तो खानावळीत आला. आता त्याने मनोमन निर्धार केला होता, आज आपली भूकही भागवायची आणि दंडही भरायचा नाही. खानावळीचा मालक कशी हुशारी करतो, तेच मी बघतो, असा विचार करत त्याने काय बनवले आहे, याची पृच्छा न करताच त्याने ऑर्डर दिली, ''जे काही असेल ते एक हजार घेऊन ये''  
     त्यादिवशी जिलेबी बनवण्यात आली होती. थोड्या वेळातच मोठीशी सुंदर थाळी भरून जिलेबी त्याच्यासमोर ठेवण्यात आली. भुकेने व्याकूळ झालेल्या व्यापार्‍याने त्याच्यावर ताव मारायला सुरुवात केली. पोट भरून जिलेबी खाल्ली.पण ज्यावेळेला त्याने थाळीकडे पाहिले, तेव्हा भीतीने उडालाच. कारण अजूनही निम्मी थाळीसुद्धा संपलेली नवहती.
     शंभर मोहरांचा दंड त्याच्या डोळ्यांसमोर दिसू लागला. घाबरून त्याने आणखी खायला बसला. पण जेमतेम आठ-दहा आकडेच खाऊ शकला. पोट तुडुंब भरलेले. त्यात गोड. त्याच्याने  खाववेना. शेवटी एक हजार मोहरांचा दंड भरून रडवेला चेहरा करून बाहेर पडला. दुसर्‍यादिवशी त्याने तिथून  आपला बाडबिस्तरा हलवला. 

No comments:

Post a Comment