Sunday, April 2, 2023

(प्रेरक प्रसंग) सर्वात मोठा मूर्ख

एका राजाने आपल्या मंत्र्याला सोन्याची काठी दिली आणि म्हणाला, 'जो तुला मूर्ख वाटतो त्याला ती दे.' मंत्री काठी घेऊन निघाला. खूप शोधाशोध केल्यावर एक भोळा भाबडा माणूस दिसला, त्याला मूर्ख समजून मंत्र्याने काठी त्याच्या हातात सोपवली. मंत्री त्याला म्हणाला, 'तुझ्यापेक्षा मूर्ख कोणी सापडला तर त्याला ही काठी दे.' ती व्यक्ती सुद्धा स्वतःपेक्षा अधिक मूर्ख असलेल्या व्यक्तीच्या शोधात ठिकठिकाणी हिंडत राहिला, पण त्याला अशी व्यक्ती सापडली नाही. अशा प्रकारे भटकतभटकत  तो राजदरबारात पोहोचला. राजाची भेट घ्यावी, असे त्याला वाटले. त्याला त्याची परवानगी मिळाली. जेव्हा तो राजाजवळ गेला, तेव्हा त्याने पाहिले की राजा आजारी पडला आहे. राजा त्याला म्हणाला, 'आता माझी शेवटची वेळ आली आहे.  मी हे जग सोडून जाणार आहे.' त्या व्यक्तीने विचारले, 'मग तुमच्या या सैन्याचे, हत्ती, घोडे, राजवाड्याचे काय होणार?' राजा म्हणाला, 'ते सगळे इथेच राहणार, दुसरं काय होणार!' यावर तो मनुष्य म्हणाला, 'अनेक युद्धांत जे धन मिळवले आहे त्याचे काय होणार?' राजा म्हणाला, 'ते सगळे इथेच राहणार.' हे ऐकून त्या व्यक्तीने ती सोन्याची काठी राजाच्या पुढे धरली आणि म्हणाला, 'ही घ्या.  मला ही सोन्याची काठी माझ्यापेक्षा जास्त मूर्ख वाटणाऱ्या व्यक्तीच्या हाती सोपवण्यास सांगण्यात आले आहे. आपण यासाठी पात्र आहात .तुम्हाला तुमच्याबरोबर काहीही नेता येणार नाही हे माहीत असतानादेखील तुम्ही ते मिळवण्यासाठी तुमचे संपूर्ण आयुष्य का खर्ची घातले? यासाठी तुम्ही अनेकांचे प्राणही घेतले.  हे सर्व मिळवून शेवटी तुम्हाला काय मिळाले? माझ्या मते जगात तुमच्यापेक्षा मोठा मूर्ख दुसरा कोणी असूच शकत नाही. म्हणूनच ही काठी तुम्ही तुमच्याकडे ठेवा.' राजा त्याची काठी पाहून आश्चर्यात पडला. त्याला मनोमन वाटले,  खरोखरच तो सर्वात मोठा मूर्ख आहे.

प्रेरणा- तुम्ही आयुष्यात जे काही कराल ते विचारपूर्वक करा.

-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Saturday, April 1, 2023

शहरी भारत हगणदारीमुक्त झाला पाहिजे

देशातील एक हजार शहरे ऑक्टोबर 2024 पर्यंत तीन तारांकीत कचरामुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे असे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप एस. पुरी यांनी म्हटले आहे. ते अलीकडेच नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवसनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कचरामुक्त शहरांसाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्पर्धेच्या भावनेला प्रोत्साहन देण्याकरिता जानेवारी 2018 कचरामुक्त शहर मानांकनाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीपासूनच नोंदणीत झपाट्याने वाढ झाल्याचं सांगत त्यांनी याच्या प्रगतीवर प्रकाश टाकला. त्यांनी देशभरातील स्वच्छता दूतांशीही संवाद साधला. समाजात बदल घडवून आणत, नेतृत्व दिल्याबद्दल आणि आव्हानांचं रुपांतर उपजिविकेच्या संधीत केल्याबद्दल त्यांनी स्वच्छता दूतांचे अभिनंदन केले. अभियानाच्या यशाबद्दल त्यांनी यावेळी माहिती दिली. शहरी भारत हगणदारीमुक्त झाला आहे. सर्व 4715 शहरी स्थानिक संस्था पूर्णपणे हगणदारीमुक्त झाल्या आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

खरे तर देशभरात स्वच्छता अभियान राबवण्याअगोदर महाराष्ट्रात ते आधीच संत गाडगेबाबा यांच्या नावाने सुरू होते. यात अनेक गावांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन मोठमोठी बक्षीसे जिंकली आहेत. मात्र या अभियानात शहरे अधिक उतरली नव्हती. मोदी सरकारने खास शहरांसाठी स्वच्छ शहर अभियान राबवले. गेल्या चार पाच वर्षात त्याचे चांगले रिझल्ट येत आहेत. अलिकडेच  देशातील शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले. मध्य प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्यांत स्वच्छ शहरांची संख्या जास्त असल्याचे आढळून आले आहे. सगळ्याच खालचा तळाचा क्रमांक उत्तर प्रदेश राज्याचा होता. भारतातील कचर्‍यावर प्रक्रिया होण्याचे प्रमाण 2014 मधील 17 टक्क्य़ावरून आज 75 टक्क्य़ांवर गेले असून यात चार पटीने वाढ झाली आहे.  भारताला कचरामुक्त राष्ट्र बनण्याचे उद्दिष्ट असलेले स्वच्छ भारत अभियान-शहरी अर्थात रइट-व ची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी केलेला संकल्प आणि दृढनिश्‍चय अभियानाच्या दुसर्‍या टप्प्यात अनेक पटींनी वाढण्याची अपेक्षा आहे. 

अलीकडच्या काळात वस्तू वापराच्या पद्धतीत झालेला बदल आणि जलद शहरीकरणामुळे कचरा वाढतो आहे, त्या पार्श्‍वभूमीवर कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी, कचरामुक्त शहरे रॅलीचे महत्व  अधोरेखित आहे. शहरे कचरामुक्त होण्यासाठी संबंधित प्रयत्नांना चालना देण्याकरता स्वच्छोत्सव 2023 ची सुरुवात हरदीप सिंग पुरी यांनी 7 मार्च, 2023 रोजी केली. कचरामुक्त शहरे करण्यासाठी विविध क्षेत्रातील महिलांना एकत्र आणत सर्व शहरांमध्ये 8 मार्च 2023 पासून विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आहे. स्वच्छतोत्सव ही शहरातील स्वच्छतेसाठी चार लाखांहून अधिक महिला उद्योजिकांच्या नेतृत्वाखालील मोहीम आहे.

घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, वर्गीकरण करणे, कचरा प्रक्रिया आणि तो जमा करण्याचे उपाय, आयईसी, क्षमता वाढवणे, डिजिटल ट्रॅकिंग इत्यादी हे कचरामुक्त शहरांसाठीचे घटक आहेत. कोरोना कालावधीनंतर तर लोकांमध्ये आणखी जागृती वाढू लागली आहे. लोक त्यादृष्टीने स्थानिक पातळीवर पुढाकार घेत आहेत. त्यामुळे साहजिक आगामी काळात चित्र सकारात्मक बदलाचेच दिसणार आहे. आणि ते देशाच्या भल्यासाठीच असणार आहे. शहरात सगळ्यात जास्त गंदगी आहे. लोकसंख्या अधिक असल्याने सोयी-सुविधांची तिथे कमतरता दिसून येत असल्याने अनेक समस्या उदभवलेल्या दिसतात.सांडपाण्याचा निचरा हा इथला सगळ्यात मोठा प्रश्‍न असतो. राबून खायला ग्रामीण भागातून शहरात गेलेली माणसे जागा मिळेल तिथे झोपड्या,तंबू मारून दाटीवाटीने राहत आहेत. अशा काही शहरांच्या समस्या आहेत, त्या सोडवण्याच्यादृष्टीने प्राधान्याने प्रयत्न व्हायला हवे आहेत.

 आपल्या देशातले अनेक लोक अनेक कामांसाठी परदेशात जातात. तिथली स्वच्छता,टापटीपपणा त्यांना भावतो. अशावेळी त्यांना नक्कीच आपल्या देशाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. मात्र काही महाभाग अपल्याच देशाला नावे ठेवतात आणि नाके मुरडतात. परदेशात गेलेल्या लोकांनी भारतात परत आल्यावर देशाच्या स्वच्छतेच्या कामाला हातभार लावायला हवा आहे. विदेशातील स्वच्छता डोळ्यात भरते, आपण त्याचे भरभरून कौतुक करतो, मात्र   तेव्हा त्यामागे घेतलेले कष्ट आणि पाळलेले नियम याकडेही डोळसपणे पाहण्याची गरज असते.  आपल्याकडे असे का होणार नाही, असा स्वत:ला प्रश्‍न करत आपणही त्यात मनापासून सहभाग घेतला तर नक्कीच आपल्या देशाविषयीचे चित्र बदलल्याचे पाहायला मिळेल.  स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात पालिका- महापालिका यांनी अगदी मनावर घेऊन आपल्या शहराच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यायला हवे. ती त्यांची जबाबदारीच आहे.  नागरी वस्ती वाढतेय, शहरांचे आकारमान वाढतेय. त्याचा बोजा यंत्रणेवर पडतोय. कचर्‍याची समस्या विक्राळ रुप घेत आहे. शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या पुणे शहरात  कचरा कोणाचा आणि टाकायचा कोठे यावर संघर्ष सुरू आहे व त्याला राजकीय फोडणीही दिली जात आहे. खरेतर येथे नेटक्या व्यवस्थापनाची अधिक गरज आहे व त्या आधारे समस्या मार्गी लावता येऊ शकते. बंद पडलेले प्रक्रिया प्रकल्प सुरू करून भार हलका केला जाऊ शकतो. मात्र, पुन्हा तहान लागल्याशिवाय विहीर खोदायचीच नाही, असा दंडक असेल तर काय होते, ते आपण पाहतो आहोत.

आपल्याकडची शहरे बकाल, अस्वच्छ व्हायला भ्रष्टाचार आणि क्षूद्र राजकारणदेखील कारणीभूत आहे. खरे तर विकासात पारदर्शीपणा असायला हवा. विरोधकांनी सक्षमपणे सत्ताधार्‍यांना साथदेखील द्यायला हवी आहे. इथे कुठलेच राजकारण आणले जाऊ नये. विकासासाठी सगळ्यांनी पुढे आले तर ती गावे, शहरे नक्कीच पुढे जातात. याचा थेट लाभ इथल्या लोकांनाच होतो. त्यामुळे लोकांनीही राजकारण करणार्‍यांना आणि भ्रष्टाचार करणार्‍यांना त्यांची जागा दाखवायला हवी आहे. पण तसे होताना दिसत नाही,त्यामुळेच  शहरे बकाल आणि अस्वच्छ झालेली दिसत आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या स्वच्छतांच्या शहरात मध्यप्रदेशातील इंदूर आणि भोपाळ यांनी बाजी मारली आहे. इथे सबका साथ, सबका विकास दिसून आला आहे. इथल्या लोकांना जमले, मग आपल्याला का जमत नाही, याचा विचार लोकांसह सार्‍यानीच स्वत:ला विचारायला हवा. आणखी महत्त्वाचे म्हणजे इच्छाशक्ती जिथे असते तिथे यश हे हमाखास मिळत असते. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

आयुष्यात मिठाचा वाटा किती?

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मीठ एक फक्त अन्नपदार्थ नाही, एक पूर्ण चळवळ आहे, एक परिपूर्ण तत्त्वज्ञान आहे. त्यामुळेच इतिहासाची पाने उलटताना मिठाच्या काही कथा आपल्या समोर येतात. महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीबरोबरच सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला. त्यांनी मिठालाच आपले शस्त्र बनवले.  मिठाच्या सत्याग्रहानेदेखील स्वातंत्र्याच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली. म्हणी व वाक्प्रचारांनी आपली भाषा समृद्ध आहे. खाल्ल्या मिठाला जागणे म्हणजे प्रामाणिक राहण्याची नीती आहे. आपल्याकडे ऐकीव गोष्टींनाही महत्त्व आहे. म्हणून कुणाकडे मिठाशी हात पसरणे चांगले नसल्याचे म्हटले जाते. या सगळ्या थांब्यांवर थांबत थांबत मीठ ज्यावेळेला आपल्या ताटापर्यंत पोहचतं, त्यावेळेला त्याची कथा आणखी वेगळीच बनते. आरोग्याच्यादृष्टीने मिठाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, हे आपण जाणतोच. जसा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक धोकादायक असतो, तसेच मिठाचे आहे. अधिक मिठाचे सेवन आपल्याला नुकसान पोहचवते, तसे कमी मिठाच्या सेवनानेदेखील होते. त्यामुळे आपल्या आहारात योग्य प्रमाणात मीठ असायला हवे. तरच आपले आयुष्यदेखील संतुलित राहणार आहे.

अलिकडच्या काही वर्षांमध्ये झालेल्या सर्व्हेक्षणानुसार काही गोष्टी समोर आल्या आहेत, त्यानुसार एक म्हणजे 19 वर्षांच्या वर्षांवरील युवकांमध्ये मिठाच्या सेवनाचे प्रमाण वाढत चालले आहे. आणि हे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या मानकांपेक्षा किती तरी अधिक आहे. मानकानुसार प्रत्येक माणसाला दररोज पाच ग्रॅम मिठाचे सेवन पुरेसे आहे. मात्र सर्व्हेक्षणानुसार आपल्या भारतात रोज दहा ग्रॅमपेक्षा अधिक मिठाचे सेवन केले जाते. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जगातील तमाम जनतेला ‘मीठ जरा जपूनच खा’, जेवणातून ते शक्य तितके कमीच करा, असा धोशा लावला आहे. दैनंदिन आहारातील मीठ तीस टक्क्यांनी कमी करण्याचा निर्धार 2013 मध्ये करण्यात आला होता. हे उद्दिष्ट 2025 पर्यंत पूर्ण व्हावे, असे ठरले होते. तथापि, त्या दिशेने जगभरातील हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच देशांनी पावले उचलली. यामध्ये ब्राझील, चिली, चेक प्रजासत्ताक, उरुग्वे, सौदी अरेबिया, स्पेन, मेक्सिको अशा निवडक देशांचा समावेश होतो. मात्र, भारतासह बहुतांश देशांनी त्या दृष्टीने भरीव आणि ठोस पावले उचलली नाहीत. मिठाच्या वापराबाबत जनजागृती आणि त्यासाठी अन्नपदार्थ उत्पादकांना मार्गदर्शक सूचना करण्याबाबत या देशांच्या शासनसंस्थांनी तोंड बंद केले आहे. धोरणात्मक ठोस कार्यवाही केलेली नाही, ही खेदाची बाब आहे. 

' द जॉर्ज इंस्टीट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ' या ऑस्ट्रेलियाच्या संस्थेचे एक संशोधक, ज्यांचे नाव आहे क्लेयर जॉन्सन. यांनी अलिकडेच मिठाच्या सेवनाच्याबाबतीत भारतातल्या एका अभ्यासगटाचे नेतृत्व केले होते. या अभ्यासात एक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे आपल्या भारतातले लोक अधिक मीठ खाण्यावर फिदा आहेत. त्यांना जेवनात जास्त मीठ आवडते. जॉन्सन यांच्या अहवालानुसार मिठाच्या सेवनाच्या प्रमाणात घट केल्यास भारतीयांचा फायदाच होणार आहे. आपल्या खाण्यातील मिठाच्या प्रमाणात फक्त एक ग्रॅम कपात केली तरी हृदयाचा झटका किंवा हार्ट स्ट्रोकचा धोका 4.8 टक्के कमी होऊ शकतो.   आपल्या देशात अशी एक धारणा झाली आहे की, आपण ज्या वातावरणात राहतो, त्या वातावरणात इच्छा नसतानादेखील अधिक प्रमाणात मिठाचे सेवन करावे लागते. वास्तविक आपल्या देशातले हवामान उष्णकटिबंधीय आहे. त्यामुळे आपल्या शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम बाहेर पडतो. घामाबरोबरच आपल्या शरीरातून आवश्यक असणारे सोडियमदेखील बाहेर पडते. हे कमी झालेले प्रमाण भरून काढण्यासाठी आपण मिठाचे सेवन अधिक प्रमाणात करतो. काही लोकांची अधिक प्रमाणात मीठ खाण्याची कारणेदेखील वेगवेगळी असू शकतात. काही लोक भोजन अधिक स्वादिष्ट बनवण्यासाठीसुद्धा अधिक मिठाचे सेवन करतात. मांसाहार आणि जंक फूड खाणार्‍यांची दिनचर्या तर सामान्य मात्रेपेक्षा अधिक मिठाच्या सेवनाची असते. कारण असे पदार्थ ज्यादा मिठाशिवाय स्वादिष्ट लागतच नाहीत. याशिवाय जे लोक दारू-बिअरसारख्या नशिल्या पदार्थांचे सेवन करीत असतात, त्यांच्या दिनचर्येत मिठाचे प्रमाणात अधिक असतेच.

खरे तर भारतीय व्यंजनाचा स्वाद याला अधिक कारणीभूत आहे. यात मीठ आणि अन्य मसाले पदार्थांचे प्रमाण अधिक असते. ज्यादा मिठाच्या सेवनामुळे किडनी आणि हृदयासंबंधीचे आजार होण्याचा धोका अधिक असतो. जर आपल्या शरीरातील दोन्हीही किडन्या व्यवस्थित काम करत असतील तर समजावे की, शरीरात जाणारे अधिक मात्रेचे मीठ बाहेर टाकले जात आहे. अधिक मिठाचे सेवन आणखी एका कारणामुळे होत असल्याचे समोर

आले आहे, ते कारण म्हणजे टेबल सॉल्ट. जेवनाच्या टेबलावर मीठदाणी ठेवण्याच्या प्रथेमुळे मिठाचे सेवन अधिक प्रमाणात होत आहे. आपल्या संस्कृतीवर खरे तर हा घालाच आहे,कारण आपण पाश्‍चिमात्य लोकांचे अंधानुकरण करत आहोत. त्याचाच हा परिणाम आहे. आपल्या संस्कृतीत मीठदाणी ठेवण्याची प्रथाच नाही. दुसर्‍या देशाचे पाहून आपण त्याचा स्वीकार करत असल्याने साहजिकच आपल्या शरीरात मिठाचे अधिक प्रमाण जाणारच! गप्पा-गोष्टी करत असताना विनाकारण आपण अन्नपदार्थांवर मीठ टाकत असतो. याचा धोका आपण वेळीच ओळखला पाहिजे.

     आपल्या शरीराला वयाच्या हिशोबानेदेखील मिठाचे प्रमाण वेगवेगळे लागते. काही अभ्यासांमध्ये आपल्या देशातल्या युवकांमध्ये ज्यादा मिठाचे सेवन करण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. शरीराला मिठाची मात्रा किती लागते,याबाबत वेळोवेळी शोध लागले आहेत. वर म्हटल्याप्रमाणे आपल्या सेवनातून एक ग्रॅम मीठ कमी केले तर हार्ट अटॅकची शक्यता 4.8 टक्क्यांनी कमी होते. याच सर्व्हेणात आणखी एक गोष्ट समोर आली आहे, प्रत्येक चार व्यक्तींपैकी एक व्यक्ती गावात म्हणजे खेड्यात राहते. आणि जे तीन शहरात राहतात, त्यातल्या प्रत्येकी एकाला हायपरटेन्शनची समस्या आहे. हायपरटेन्शन नियंत्रणात आणण्यासाठी मिठाची मात्रा कमी करण्याची आवश्यकता असते. शरीरात सोडियमचे प्रमाण अधिक असल्यास धमन्या अंकुचन पावतात. त्यामुळे ब्लडप्रेशर वाढते. हायपरटेन्शन कार्डियोवेस्कुलर आजारांचे मुख्य कारण बनते.

जर भारतीयांनी आपल्या जेवनातून मिठाचे 30 टक्के प्रमाण कमी केल्यास त्यांना हार्ट अटॅकमुळे होणारा मृत्यूचा धोका हा 15 टक्क्यांनी कमी होणार आहे. खरे तर रोजच्या जीवनात जे आवश्यक असलेले 10 टक्के मीठ आपल्याला फळ, भाज्या आणि धान्यधान्यादींमधून  नैसर्गिकरित्या उपलब्ध होते. गेल्या काही वर्षांमध्ये असे आढळून आले आहे की, भारतीयांमध्ये डाळ, धान्य, भाज्या आणि फळांचे सेवन कमी झाले आहे तर प्रक्रिया केलेले पदार्थ आणि फास्ट फूड यांचा खप वाढला आहे. साहजिकच मिठाच्या सेवनाच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.

     आपल्या देशांमध्ये ज्या प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांची किंवा फास्ट फूडची विक्री होत आहे, त्यांवर पोषक घटकांच्या प्रमाणांची माहिती दिली जात नाही. कित्येकदा त्यांची माहिती दिलेली असते, पण आपले त्याकडे लक्ष नसते. आहारातील मीठ कमी करण्यासाठी सरकारने धोरणात्मक पावले उचलली पाहिजेत. जनजागृतीद्वारे मिठाचा वापर कशा प्रकारे कमी करता येईल, यावर भर द्यावा. धकाधकीच्या या काळात प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे अशक्य असले तरी त्यातील मिठाचे प्रमाण घटवणे शक्य आहे. त्यासाठी सीलबंद पदार्थ उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांमधील मिठाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रवृत्त करावे. वेष्टनावर ‘कमी मिठाचा पदार्थ’ असा ठळक उल्लेख करायला भाग पाडावे. कोणत्या प्रकारच्या पदार्थात मिठाचे तसेच सोडियम घटक असलेल्या पदार्थांचे कमाल प्रमाण किती असावे, याचीही मानके निश्‍चित करावीत. त्याच्या जोडीला मिठाच्या अतिरिक्त वापराने जगण्याला बसणारी खीळ किती जीवघेणी आहे, हे पटवून देण्यासाठी जनजागृती करावी.

आपण नकळतपणे मिठाचे सेवन अधिक प्रमाणात करत असतो. त्यामुळेही आजारांच्या समस्या वाढतात. जसे आपण जास्त मीठ खाल्ल्याने आपले नुकसान होते, तसे कमी मीठ खाल्ल्यानेही होते. ज्या लोकांना उच्च रक्तदाब असतो, ते भितीने फारच कमी मीठ खातात. किंवा खातच नाहीत. अशामुळे त्यांच्या शरीरातील सोडियमची मात्रा कमी होते. मग ते हायपोनेट्रेमिया आजाराने ग्रासित होतात. खरे तर मिठाचा वापर न केल्याने त्यांच्या रक्तातील सोडियमचा स्तर 120 पेक्षाही खाली जातो. त्यामुळे रुग्ण बेशुद्ध होण्याचा धोका असतो. सामान्य माणसाच्या रक्तातील सोडियमचे प्रमाण 135 ते 150 च्या दरम्यान असायला हवे. त्यामुळे उच्च रक्तदाब असला तरी त्याला मीठ हे खावेच लागणार आहे. पण त्याच्या शरीराच्या गरजेनुसार ते हवे. म्हणजेच आपल्या आयुष्यात मिठाचा जो फंडा आहे, तो तसा लगेच समजून येणारा नाही. कमी आणि जास्तच्या दरम्यानचा मार्ग धरूनच मिठाची मात्रा ठेवल्यास आपलेही आयुष्य संतुलित राहणार आहे.

 -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

Wednesday, March 29, 2023

जलसंकटावर मात करण्याची गरज

संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक जल विकास अहवालानुसार जगातील पाण्याची मागणी दरवर्षी जवळपास एक टक्क्याने वाढत असून पुढील दोन दशकांत ती आणखी वाढणार आहे. या अहवालानुसार विकसनशील आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये पाण्याची मागणी झपाट्याने वाढणार आहे. शेतीपेक्षा  औद्योगिक आणि घरगुती वापरासाठी पाण्याच्या मागणीला अधिक वेग येईल. जगभरातील अनेक शहरांना हवामान बदलामुळे पूर आणि दुष्काळासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या भारतातील अनेक शहरांमध्ये पाण्याचे भीषण संकट आहे. विशेष म्हणजे जलसंकटाचा सामना करणारी बहुतांश शहरे नद्यांच्या काठावर वसलेली आहेत. वास्तविक, येथील मोठ्या लोकसंख्येने या नद्यांच्या पाण्याचा अव्याहतपणे वापर केला आहे. अनेक पाण्याचे स्रोत सतत कोरडे होत आहेत. 

ज्या वेगाने जंगले नष्ट होत आहेत त्यापेक्षा तिप्पट वेगाने पाण्याचे स्रोत कोरडे होत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. नीती आयोगाच्या 2018 च्या अहवालानुसार, देशातील अनेक शहरांमध्ये जलसंकट गंभीर स्वरूप धारण करत आहे. दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आदी शहरांना या समस्येचा सर्वाधिक सामना करावा लागणार आहे.  2030 पर्यंत देशातील सुमारे चाळीस टक्के लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार नाही. येत्या अकरा वर्षांत देशातील साठ कोटींहून अधिक जनता पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे. जागतिक वन्यजीव निधी (डब्लूडब्लुएफ) च्या सर्वेक्षणात पुढील तीस वर्षांत जगातील 100 शहरांमध्ये पाण्याचे गंभीर संकट निर्माण होणार असल्याचे म्हटले आहे.

गेल्या दहा वर्षात भूजल पातळी 54 टक्क्यांनी घटली आहे. देशातील 55 टक्के विहिरी जवळपास कोरड्या पडल्या आहेत. वातावरणातील बदलामुळे आणि वाढत्या तापमानामुळे भविष्यात दुष्काळाची समस्या अधिक गडद होण्याची शक्यता आहे. तसे पाहिले तर आपल्या देशातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1170 मिमी आहे, जे पश्चिम अमेरिकेपेक्षा जवळजवळ सहा पट जास्त आहे. असे असूनही, देशातील शहरी भागातील सुमारे 9 कोटी सत्तर लाख लोक पिण्याच्या स्वच्छ पाण्यापासून वंचित आहेत आणि ग्रामीण भागातील सुमारे 70 टक्के लोकांना प्रदूषित पाणी प्यावे लागते. देशातील सुमारे 33 कोटी लोक अशा ठिकाणी राहत आहेत जिथे दरवर्षी भीषण दुष्काळ पडतो. दुष्काळाला वैतागून शेतकरी आत्महत्या करत आहेत. देशात अनेक नद्या असल्या तरी त्यातील उपलब्ध पाण्याचा दर्जा मात्र खूपच खालावला आहे. 

सध्या एकूण पाण्याच्या वापरापैकी 85 टक्के पाणी शेतीसाठी, 10 टक्के उद्योगांमध्ये आणि 5 टक्के घरांमध्ये वापरले जाते. 1994 मध्ये, देशात गोड्या पाण्याची दरडोई उपलब्धता सहा हजार घनमीटर होती. सन 2000 मध्ये ते प्रति व्यक्ती दोन हजार तीनशे  घनमीटर इतके कमी करण्यात आले. 2025 पर्यंत, त्याची उपलब्धता प्रति व्यक्ती केवळ 1600 घनमीटरपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. देशातील पावसाच्या पाण्यापैकी पासष्ट टक्के पाणी समुद्रात वाहून जाते. गटारी- नाल्यांमध्ये दररोज चार लाख लिटर पाणी सोडले जाते. पण यापैकी फक्त 20 टक्केच पाणी पुन्हा वापरले जाते. देशभरात पडणाऱ्या एकूण पावसापैकी केवळ पाच टक्के पावसाचे पाणी संरक्षित  केले, तरी वर्षभराची 100 कोटींहून अधिक लोकांची तहान भागू शकते. त्यासाठी स्थानिक पातळीवर भूजल व्यवस्थापन प्रकल्प उभारावे लागतील, त्यामुळे लोकांना त्यांच्या भागातील भूजलाच्या उपलब्धतेची माहिती मिळेल आणि ते त्याचा योग्य वापर करू शकतील. 

देशातील अनेक नद्या, तलाव आणि जलसाठे कोरडे पडले आहेत. त्यामुळे अनेक भागातील पाण्याची पातळी धोकादायक पातळीच्या खाली गेली आहे. ज्या नद्यांवर धरणे बांधून पाण्याचा मुक्त प्रवाह बंद केला आहे, त्या नद्यांनाही धोका निर्माण झाला आहे.ज्या  धरणाद्वारा पाणी अडवले जात आहे, त्या पाण्याचा औष्णिक वीज केंद्र, अणुऊर्जा केंद्रे आणि औद्योगिक युनिटसाठी जास्तीत जास्त वापर केला जात आहे. शेतकरी सिंचनासाठी खोल खोदलेल्या कूपनलिकेचा वापर करतात.  घरगुती आणि औद्योगिक गरजांसाठीदेखील भूजल साठ्याचा वापर वाढला आहे. भूगर्भातील पाण्याचे योग्य पुनर्भरण होत नाही, उलट आधुनिक तंत्राच्या साहाय्याने जमिनीतील पाणी अक्षरशः शोषून काढले जात आहे. या अंदाधुंद पाणी पिळवणुकीचा परिणाम म्हणजे ज्या भागात दहा वर्षांपूर्वी 200 ते 300 फूट खोलीवर पाणी उपलब्ध होते, त्या भागात आता पाण्याची पातळी 700 ते 1000 फूट खोल गेली आहे. 

आणखी एक गंभीर बाब म्हणजे माणसे तलाव, नद्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करू लागले आहेत. पाण्याचा अपव्यय थांबविण्यासाठी ठोस प्रयत्न केले जात तर नाहीतच. शिवाय उपलब्ध असलेले साफ व स्वच्छ पाणीदेखील हळूहळू प्रदूषित होत आहे. त्यामुळे जलसंधारण, पाण्याचा विवेकपूर्ण वापर, पाण्याचा पुनर्वापर आणि भूजल पुनर्भरण याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. युनोस्कोच्या जागतिक जल विकास अहवाल 2018 मध्ये असे नमूद केले आहे की भारत हा जगातील सर्वात जास्त भूजलाचा अतिशोषण करणारा देश आहे. खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळेदेखील जलप्रदूषण वाढत आहे. पाण्याचे शुद्धीकरण करून ते पुनर्वापरासाठी योग्य बनविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामध्ये नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. पावसाचे ८५ टक्के पाणी नद्यांमधून समुद्रात जाते. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि कृत्रिम पुनर्भरण तंत्र वापरण्याची गरज आहे. विहिरी व कूपनलिका यांची खोली निश्चित केली पाहिजे. एका मानकानुसार, विहिरी आणि कूपनलिका यांची खोली केवळ चारशे फूट म्हणजे एकशे वीस मीटरपर्यंत असायला हवी. कृषी क्षेत्राच्या सिंचनासाठी ठिबक आणि स्प्रिंकलर पद्धतीचा वापर वाढायला हवा. कृत्रिम पुनर्भरण तंत्राचा अवलंब करून डोंगराळ भागातील भूजल पातळी सुधारता येते. या तंत्राद्वारे वाया जात असलेल्या पाण्याची बचत करून ग्रामीण भागात भूजल पातळी वाढवता येऊ शकते. 

जलसंकट टाळण्यासाठी प्रभावी जलव्यवस्थापनासोबतच पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी गांभीर्याने पावले उचलण्याची गरज आहे. सरकारकडून होत असलेल्या प्रयत्नांबरोबरच सर्वसामान्यांनाही आपली जबाबदारी समजून घ्यावी लागेल, तरच आपण जलसंकटाला तोंड देऊ शकू. कृषी क्षेत्रातील पाण्याच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी, सिंचनाच्या आधुनिक पद्धतींचा अवलंब, पावसाच्या पाण्याचे संवर्धन आणि दूषित पाणी पुनर्वापर करण्यायोग्य करण्यासाठी योग्य प्रयत्न करावे लागतील. यासोबतच भूगर्भातील पाणी प्रदूषणापासून वाचवण्यासाठीही लक्ष द्यावे लागणार आहे. 

वॉटर हार्वेस्टिंगचे तंत्र आणि नवनवीन शोध याबरोबरच भारतातील पारंपरिक ज्ञान पद्धतीचाही आपण अवलंब केला पाहिजे. पूर्वी पावसाचे पाणी विहिरी, तलाव, सरोवर, पाझर तलाव इत्यादींमध्ये पुरेशा प्रमाणात साचत असे. ती परंपरा आपल्याला पुन्हा सुरू करावी लागेल, जेणेकरून जलाशयांमध्ये पुनर्भरण करून साठवता येईल. पावसावर आधारित शेती, नैसर्गिक शेतीसोबतच दुष्काळ प्रतिरोधक बियाणांच्या वापरालाही प्रोत्साहन द्यायला हवे. रसायने आणि कीटकनाशकांचा वापर कमीत कमी ठेवला पाहिजे, त्यामुळे जलप्रदूषण टाळता येईल.  जलस्रोत जंतूमुक्त करण्यासाठीही व्यवस्था असायाला हवी. पाण्याचा पुनर्वापर करणेदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Thursday, March 23, 2023

अवकाशातील कचरा नष्ट करण्याच्या कामाला आला वेग

निकामी झालेल्या उपग्रहांचा  कचरा ही अंतराळातील एक मोठी समस्या बनत चालली आहे. यामुळे प्रभावी अशा आंतरराष्ट्रीय बंधनकारक कराराची गरज जगातील शास्त्रज्ञ अधोरेखित करत आहेत. सामाजिक, शैक्षणिक, दळणवळण आणि पर्यावरणीय गरजा लक्षात घेता उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत, या अवकाश उद्योगाच्या वाढीमुळे पृथ्वीच्या कक्षेतील मोठा भाग निरुपयोगी होण्याची शक्यता आहे. पृथ्वीच्या कक्षेत सध्या सुमारे नऊ हजार उपग्रह आहेत, जे 2030 पर्यंत साठ हजारांपर्यंत वाढू शकतात. जुन्या उपग्रहांचे शंभर लाख कोटी अधिक तुकडे पृथ्वीच्या कक्षेत फिरत असल्याचाही अंदाज आहे.उपग्रह तंत्रज्ञान आणि महासागरातील प्लास्टिक प्रदूषण यासह विविध क्षेत्रातील तज्ञांच्या आंतरराष्ट्रीय संघाने म्हटले आहे की पृथ्वीच्या कक्षेचे अधिक चांगले नियंत्रण कसे करता येईल यावर जागतिक एकमत तयार करण्याची नितांत गरज आहे.

हाच दृष्टीकोन समोर ठेवून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) त्यांचे आयुष्य पूर्ण केलेले उपग्रह परत आणण्याची मोहीम सुरू केली आहे. अलीकडेच त्यांनी पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पुन्हा प्रवेश करून आपली सेवा पूर्ण केलेला मेघा-ट्रॉपिक्स-1 (MT-1) हा उपग्रह प्रशांत महासागरात पाडला.या उपग्रहाचे वजन सुमारे एक हजार किलोग्रॅम होते. इस्रोने सांगितले की त्यात सुमारे 125 किलो इंधन शिल्लक होते, ज्यामुळे संकट निर्माण होऊ शकले असते. त्यामुळे प्रशांत महासागरातील निर्जन भागात ते नष्ट केले गेले. मात्र उपग्रहांचा हा कचरादेखील समुद्रातील प्रदूषणाचे प्रमुख कारण ठरत आहे. बेंगळुरूस्थित अंतराळ संस्थेकडून प्रक्षेपित करण्यात आलेल्या एमटी-1 चे मूळ आयुष्य तीन वर्षांचे होते. हा उपग्रह 2021 पर्यंत प्रादेशिक आणि जागतिक हवामान डेटा सेवा प्रदान करत राहिला. याला पृथ्वीच्या कक्षेत राहू दिले असते तर तो उपग्रह शंभर वर्षे कक्षेत फिरत राहिला असता.

इंधनाचे प्रमाण जास्त असल्यामुळे पृथ्वीच्या कक्षेत फिरता फिरता फुटण्याची किंवा इतर फिरणाऱ्या  कोणत्याही तत्सम निकामी उपग्रहांवर आदळण्याची आणि स्फोट होण्याची भीती होती. म्हणूनच त्याला पूर्णपणे नष्ट करणे आवश्यक होते. युनायटेड नेशन्स इंटर-एजन्सी स्पेस डेब्रिस कोऑर्डिनेशन कमिटी (UN/IADC) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ते पूर्णपणे नष्ट केले गेले. मोठ्या प्रमाणात उपग्रह अवकाशात कचरा बनून भटकत आहेत. त्यांची संख्या सुमारे शंभर लाख आहे, जे ताशी पंचवीस ते अठ्ठावीस हजार किमी या वेगाने पृथ्वीच्या कक्षेतून सतत प्रदक्षिणा घालत आहेत. त्यांना केवळ क्षेपणास्त्रांनीच नष्ट केले जाऊ शकते. जपान आणि अमेरिकेतील अनेक एजन्सी हा मानवनिर्मित कचरा साफ करण्यात गुंतल्या आहेत. 

अनेक देशांच्या खासगी कंपन्या या क्षेत्रातील भविष्यातील मोठा व्यवसाय म्हणून याकडे पाहत आहेत. या दिशेने पुढाकार घेत भारताने एमटी-1 नष्ट करून आपली भूमिकादेखील स्पष्ट केली आहे. या कामातही भारत आता नवा उद्योगपती म्हणून उदयास येणार हे यातून स्पष्ट दिसत आहे. अवकाशात साचलेला हा कचरा नष्ट करण्यासाठी जगभरातील अवकाश संस्था नवनवीन आणि अनोखे मार्ग शोधत आहेत. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) आणि आर्यभट्ट ऑब्झर्वेशनल सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूट (एआरआयईएस), नैनिताल हे या कचऱ्याचे निरीक्षण आणि नष्ट करण्याचे मार्ग शोधत होते. इस्रोला आता यात यश मिळाले आहे. जपानी कंपनी Astroscale म्हणते की त्यांनी 22 मार्च 2020 रोजी बायकोनूर, कझाकस्तान येथून 'Elsa-D' उपग्रह सोयुझ रॉकेटद्वारे प्रक्षेपित करून आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे. एल्सा-डी दोन उपग्रहांनी बनलेले आहे, जे एकमेकांच्या वर जोडलेले आहेत. 

एक 175 किलोचा 'सर्व्हिझर' उपग्रह आणि दुसरा 17 किलोचा 'क्लायंट' उपग्रह आहे. सर्व्हिझर हा उपग्रह आणि वाहनांमधील कचऱ्यात रूपांतर झालेले  मोठे तुकडे काढून टाकण्याचे काम करणार आहे. जपानचा दुसरा उपग्रह JAXA हा स्टेनलेस स्टील आणि अॅल्युमिनियमपासून बनलेला इलेक्ट्रोडायनामिक बोगदा आहे. हा वेगाने प्रदक्षिणा घालणाऱ्या कचऱ्याचा वेग कमी करेल आणि नंतर तो हळूहळू वातावरणात ढकलेल. अवकाशातील हा कचरा नष्ट करण्यासाठी जर्मनीची अंतराळ संस्था 'DLR' नेदेखील लेझर तंत्रज्ञान विकसित केले आहे. अमेरिकन कंपनी नासाने 'इलेक्ट्रो-नेट' तयार केले आहे. हे एक प्रकारचे जाळे आहे, जे कचरा एकत्र बांधून पृथ्वीच्या वातावरणात आणते. बहुतेक कचरा वातावरणात प्रवेश करताच स्वतः जाळून नष्ट होतो. अमेरिकेतील सहाहून अधिक स्टार्टअप्स या मोहिमेशी संबंधित आहेत. 

वास्तविक मानवनिर्मित अंतराळातील कचऱ्यामध्ये सतत वाढ होत असल्याने सक्रिय उपग्रहांना मोठा धोका निर्माण झाला आहे. इस्रोचे पन्नासहून अधिक संचार नेव्हिगेशन आणि निगराणी उपग्रह खालच्या पृथ्वीच्या कक्षेत कार्यरत आहेत, ज्यावर हा कचरा धोक्याच्या रूपात समोर येत आहे. हा कचरा भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठीही अडथळा ठरत आहे. अनेकवेळा मिशन सुरू करताना हे तुकडे मार्गात आल्याने शेवटच्या क्षणी काही काळ प्रक्षेपण वाहने थांबवावी लागली आहेत. आतापर्यंत, इस्रो कचऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड (NORAD) वर अवलंबून होता. आता भारत या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. अंतराळातील मालमत्तेला सुरक्षितता देण्यासाठी दुर्बिणी आणि रडारचे जाळे उभारण्यात आले आहे. मौल्यवान अवकाश उपग्रहांना कचऱ्याच्या टक्करीपासून वाचवण्यासाठी हा उपाय केला जात आहे. भारताने यापूर्वीच उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र (A-SAT) तयार केले आहे आणि त्याची यशस्वी चाचणीही केली आहे. 

सध्या पृथ्वीच्या खालच्या कक्षेत सुमारे सहा हजार टन कचरा पसरला आहे. आतापर्यंत तेवीस हजारांहून अधिक उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यात आले आहेत. त्यापैकी केवळ पाच टक्केच कार्यरत आहेत. बाकीचे कचऱ्यात रुपांतरित झाले आहेत. उपग्रहभेदी (अँटी-सॅटेलाइट) उपग्रहांच्या चाचणीतही असा कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या म्हणण्यानुसार, पृथ्वीच्या कक्षेत पाच लाखांपेक्षा अधिक कचऱ्याचे तुकडे किंवा स्पेस-जंक फिरत आहेत. हा कचरा इतका शक्तिशाली आहे की त्याचा छोटासा तुकडाही उपग्रह किंवा अंतराळ यानाला हानी पोहोचवू शकतो. शंभर अब्ज डॉलर्स खर्चून बांधलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकालाही हे तुकडे धोका पोहचवू शकतात. अंतराळातील कचरा धोकादायक पातळीवर पोहोचला असून तो लवकरात लवकर हटवला नाही, तर भविष्यात अवकाशयान आणि उपयुक्त उपग्रह नष्ट होऊ शकतात, असा इशारा अवकाश शास्त्रज्ञ सतत देत आहेत. असे झाल्यास अंतराळ मोहिमांवर बंदी घालणे आवश्यक होईल. 

दुसरीकडे, अमेरिकन खगोलशास्त्रज्ञांनी एक सर्वेक्षण केले आहे आणि सांगितले आहे की दर वर्षी एक हजार टन कचरा अवकाशातून पृथ्वीवर पडतो. त्याची नीट ओळख होताना दिसत नाही. हा अवकाश कचरा नैसर्गिक तसेच मानवनिर्मितदेखील असू शकते. निरुपयोगी अवकाशयान, नष्ट झालेले उपग्रह आणि त्यांचे भाग या एकमेव मानवनिर्मित वस्तू कचऱ्याच्या रूपात अवकाशात तरंगत आहेत. आणि मग अचानक ते अंतराळातील गुरुत्वाकर्षण शक्तीने एकवटले जातात आणि पृथ्वीच्या चुंबकीय प्रभावाखाली येतात. मात्र, अंतराळातील वाढता कचरा साफ करण्यासाठी आंतरराष्ट्रीय करार आवश्यक आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 


Tuesday, March 21, 2023

माणसाच्या मानवतेसाठीही अॅप बनवले जाईल का?

आज तंत्रज्ञान जीवनावर अशा प्रकारे वर्चस्व गाजवत आहे की माणूस त्यात भरकटत चालला आहे, माणुसकी आता शोधायची गोष्ट बनत चालली आहे. हे समजून घेण्यासाठी फार खोलात जाण्याची गरज नाही. फक्त सोशल मीडियाच्या दुनियेकडे नजर टाकली तरी खूप झालं. आता ते इतक्या वेगाने विस्तारत आहे की जीवनच अॅप आधारित होत आहे. सोशल मीडिया आणि टेक्नॉलॉजीच्या भरभराटीत, कसले कसले अॅप्स रोज नव्याने येत आहेत, ही संख्याही गुंतागुंतीची होत चालली आहे. प्रत्येक माहिती, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक सुविधा आपल्या मोबाईलमध्ये आणि बोटांच्या टोकावर उपलब्ध झाली आहे. मोबाईलमध्ये डोळे लावले तर क्षणार्धात सगळं काही दिसतं. जेवणाची ऑर्डर देण्यापासून ते विमानाची तिकिटे बुक करण्यापर्यंत आणि ट्रेनच्या परिस्थितीपासून ते मार्ग शोधण्यापर्यंत, कुणाला काय हवं ते क्षणार्धात कळू शकते. आजची तरुणाई सांगू शकते की त्यांना कोणता जुना काळ आठवतोय...आज मोबाईल नावाच्या या जादुई पिटाऱ्यात किती नवीन अॅप्स आले आहेत, जुन्या लोकांना काय माहीत!

वास्तविक, सर्व काही माणसाच्या हातात येत असल्याने त्याला कोणत्याही माणसाची गरज किंवा पर्वा वाटेनाशी झाली आहे. आपण भले आणि आपलं जग या मर्यादेत माणूस येत चालला आहे. कालपर्यंत लोक तक्रार करायचे की आता कोणीच कोणाशी भेटत नाही, प्रत्येकजण आपापल्या वर्तुळात बंदिस्त झाला आहे, आता तर परिस्थिती अशी झाली आहे की लोक एकमेकांशी बोलायलाही तयार नाहीत. जे खरेच चांगले दिन आणि चार प्रेमाच्या गोष्टी बोलतात त्यांना मूर्ख ठरवले जात आहे.सकाळी उठल्यापासून रात्री उशिरापर्यंत सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअॅपच्या दुनियेतून मिळालेले ज्ञान इकडे-तिकडे पाठवून लोक इतरांना ज्ञानी बनवण्यात मग्न असतात. ज्यांना स्वतःची उंची निर्माण करता आली नाही, ते अनेकदा टाच वाढवल्याने पात्र उंच होत नाही असे लिहिताना दिसतात. त्याचप्रमाणे जगातील अहंकारी लोक एकमेकांना नम्रता आणि प्रेमाचा संदेश देत आहेत. 'हम बदलेंगे, जग बदलेगा' ऐवजी 'तुम बदलोगे, सब बदलेगा'चा संदेश देत जग बदलण्याचा निर्धार केला आहे. ही गोष्ट सामाजिक चिंता आहे की नाही हे समजू शकत नाही? धंद्यात चढाओढ आहे, नोकरीत अहंकाराची चढाओढ आहे किंवा संस्थेत पदांसाठी भांडण आहे आणि लोक एकमेकांशी भांडणात वागत आहेत, हेही समजण्यासारखे आहे. मात्र येथील तणाव आणि वाद पाहिल्यानंतर आणि समजून घेतल्यानंतरही हेच कळत नाही की, तणावाचे कारण काय आणि एकमेकांपासूनचे वाढते अंतर. 

मला प्रश्न पडतो की आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात सर्व प्रकारचे अॅप्स बनवणारे जादूगार लोकांची मने आणि त्यात चाललेल्या वाईट गोष्टी त्यांच्या तंत्रज्ञानाने वाचू शकतील असे अॅप कधी बनवतील? अहंकारी लोकांचा अहंकार आणि द्वेष दूर करण्याचे अॅप कधी येणार? विनाकारण चावणाऱ्याला काय त्रास होतो हे सांगणारे ते अॅप कधी येणार?विभक्त होण्याचे कारण सांगून क्षणार्धात अंतराचे जवळीकेत रूपांतर करणारे अॅप? मग असंही वाटतं की खरंच अशी अॅप्स बनायला लागली तर माणसाला माणूस म्हणून जगणं शक्य होईल का? अशा अॅप्सचे निर्माते लोकांच्या विचार आणि समजूतीवरही नियंत्रण ठेवणार नाहीत आणि ऑपरेट करणार नाहीत का? यानंतर काय होईल?  नक्कीच, आजच्या घुसमटणाऱ्या वातावरणात, वाढत्या अहंकार, द्वेष आणि विनाकारण अबोला धरणाऱ्या या काळात अशा अॅपची गरज आहे जे आपल्या तंत्रज्ञानाने असे सकारात्मक बदल घडवून आणू शकेल, कारण भावनांचे पुतळे मानवाला बदलू देत नाहीत. ते खत्म करत आहेत. काही अॅप किंवा मशीन आपल्या चेतनेवरही नियंत्रण ठेवू लागण्या अगोदर, आपण वेळीच जागे होऊन मानवी मूल्ये जपली तर बरे. 

अहंकार, मत्सर, द्वेष, निंदा आणि एकमेकांपासूनचे अनावश्यक अंतर, जे आपल्या समाजात नकारात्मकता वाढवत आहेत, त्यामुळे आपल्या सर्वांमध्ये खूप नैराश्य, इतके रोग आणि इतके नको असलेले गुन्हेही वाढत आहेत, हे नाकारता येत नाही.एक संवेदनशील नागरिक या नात्याने आपल्या समाजाला योग्य दिशा दाखवून अनिष्ट वाईट गोष्टींपासून वाचवणे हे जबाबदार व्यक्तीचे कर्तव्य आहे.  हा बदल कोणत्याही दिव्याने किंवा अॅपने शक्य नसून वैयक्तिक प्रयत्नांनी शक्य आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

Thursday, March 16, 2023

डोळ्यांकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका

आजकाल जीवनात इलेक्ट्रॉनिक उपकरणांची  उपयुक्तता वाढली आहे आणि त्यामुळे दिवसभर त्यावरच डोळे खिळून राहिल्याने डोळ्यांवरचा ताण वाढत आहे. संगणक असो, मोबाईल फोन असो किंवा टीव्ही असो, त्यांच्या स्क्रीनवर चमकणारा प्रकाश आपल्या डोळ्यांच्या रेटिनावर दुष्परिणाम करतो. आम्हाला त्याची पर्वाही नसते. दिवसभर मोबाईल फोन किंवा कॉम्प्युटरवर काम करत राहतो. यामुळे हळूहळू दृष्टी क्षीण होऊ शकते. जास्त वेळ काम केल्यामुळे शरीराप्रमाणेच डोळ्यांनाही थकवा, जळजळ यासारख्या समस्या होतात. मग, घराबाहेर पडताना, डोळे प्रदूषित हवेच्या संपर्कात येतात, ज्यामुळे डोळ्यांना खाज सुटणे किंवा पाणी येण्याची समस्या उद्भवू शकते. वातावरणात धूळ आणि धुराचे प्रमाण वाढल्याने डोळ्यांची जळजळही वाढते. प्रदूषित हवेमुळे डोळ्यांतील कोरडेपणा वाढू लागतो. 

जे लोक कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर बराच वेळ काम करतात, त्यांच्या डोळ्यांत थकवा, जळजळ अशी लक्षणे दिसतात. इलेक्ट्रॉनिक पडद्यावर म्हणजेच स्क्रीनवर जास्त वेळ काम केल्याने डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. त्याकडे कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष करता कामा नये. डोळ्यांचा व्यायाम आणि त्यांना विश्रांती देण्यासाठी काही गोष्टींची नियमित काळजी घेणे आवश्यक आहे. 

थंड पाण्याने धुवा- रोज सकाळी उठल्यावर सर्वप्रथम डोळे उघडून पाण्याने धुवावेत. तोंडात भरपूर पाणी भरून डोळ्यांवर पाणी शिंपडत राहिल्याने डोळ्यांना आराम मिळतो. याशिवाय दिवसभरात जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा डोळे थंड पाण्याने धुवावेत. आता उन्हाळा सुरू झाला आहे, जेव्हा केव्हा बाहेरून याल तेव्हा थंड पाण्याने डोळे जरूर धुवा. डोळ्यात जळजळ किंवा थकवा जाणवत असल्यास डोळ्यांवर पाणी शिंपडावे. थोड्या थोड्या वेळाने पाणी पीत राहा. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात डिहायड्रेशनची लक्षणे दिसू लागतात. त्याचबरोबर इन्फेक्शनमुळे होणारी डोळ्यांतील जळजळ दूर करण्यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी प्यायल्याने विषारी घटक शरीरातून बाहेर पडतात आणि डोळ्यांचा संसर्ग बरा होतो. 

काकडीचा वापर- डोळ्यांची जळजळ आणि थकवा दूर करण्यासाठी काकडीचा वापर केला जाऊ शकतो. काकडीचे पातळ काप करा. त्यांना फ्रीजमध्ये ठेवा. नंतर हे काप (स्लाइस) डोळ्यांवर ठेवा. वीस ते तीस मिनिटे डोळे मिटून झोपा.  काकडीचा वापर केल्याने डोळ्यांना थंडावा मिळतो आणि जळजळ आणि थकवा दूर होतो. 

थंड दूध- जर तुम्हाला थकवा जाणवत असेल किंवा डोळ्यात जळजळ होत असेल तर तुम्ही थंड दूध वापरू शकता. कापसाचा गोळा थंड दुधात बुडवून डोळ्यांवर ठेवून हलका मसाज करा. दुधाच्या थंड प्रभावाने डोळ्यांचे संक्रमण दूर होईल आणि डोळ्यांना ताजेपणा येईल. बराच वेळ काम केल्यानंतर हे उपाय करून पाहिल्यास डोळे दुखणे, सूज येणे, थकवा येणे यासारख्या समस्यांपासून सुटका मिळेल. डोळ्यांची जळजळ दूर करण्यासाठीही कोरफडीचा वापर केला जाऊ शकतो. 

गुलाब पाणी- डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर खूप फायदेशीर आहे. कापसात गुलाब पाण्याचे काही थेंब टाकून डोळ्यांवर ठेवा. अशा प्रकारे वीस मिनिटे डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांची जळजळ आणि खाजे पासून सुटका होऊ शकते. गुलाब पाण्याचा प्रभाव थंड असतो. डोळ्यात ताजे गुलाबपाणीही टाकले जाते. मात्र बाजारात उपलब्ध असलेले गुलाब डोळ्यात घालू नका. त्यात रसायने असतात. यांच्या संपर्कात आल्याने डोळ्यात जळजळ होण्याची समस्या वाढू शकते, त्यामुळे डोळ्यांच्या आत काहीही घालणे टाळा. 

बटाटा- जर तुम्हाला थकवा जाणवत असेल आणि डोळ्यात जळजळ होत असेल तर कच्च्या बटाट्याचे कापही वापरता येतील. काकडीसारखे काप करून फ्रीजमध्ये ठेवा. बटाट्याचे तुकडे थंड झाल्यावर दोन्ही डोळ्यांवर ठेवा. वीस मिनिटांनी बटाट्याचे तुकडे काढा.  यामुळे डोळ्यांना आराम मिळेल आणि डोळ्यांचा थकवा दूर होईल. या गोष्टी डोळ्यांच्या आत वापरण्याऐवजी डोळ्यांच्या वर वापरा हे लक्षात ठेवा. 

व्यायाम करा- डोळ्यांचा नियमित व्यायामही करायला हवा. डोळ्यांच्या बाहुल्या वर आणि खाली, उजवीकडे आणि डावीकडे, गोल- गोल फिरवा. डोळे मोठे करा, लहान करा. दोन्ही हातांच्या दोन बोटांनी भुवया आणि खालच्या बाजूला हलके दाबून मालिश करा, यामुळे स्नायूंना आराम मिळतो. कॉम्प्युटर, मोबाईल इत्यादींवर काम करत असताना थोडा वेळ स्क्रीनवरून डोळे बाजूला करा. कुंड्यांतील हिरवी रोपे, झाडी यांकडे पहा. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळेल. 

(हा लेख फक्त सामान्य माहितीवर आधारित आहे  आणि फक्त जनजागृतीसाठी आहे.  उपचार किंवा आरोग्य सल्ल्यासाठी तज्ञांची मदत घ्या.) -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली