Saturday, October 12, 2013

बालकथा कष्टाचे मोल



      गोष्ट फार जुनी आहे. अमृतपूर  नावाच्या छोट्याशा गावात गोरखनाथ नावाचा एक शेतकरी राहात होता. त्याला केदार नावा मुलगा होतात्याच्याकडे एक अवगुण होता, तो म्हणजे वायफट पैसे खर्च करण्याचा. त्याच्या हातात लक्ष्मी ठरतच नव्हती. वडिलांकडून पैसे मागून घ्यायचा आणि उधळायचा. साहजिकच वडिलांना त्याच्या खर्चिकपणाची मोठी चिंता वाटत होती. हा असाच पैसे उधळत राहिला तर याला पैशाची किंमत कळणार नाही   आणि हा  भविष्यात दरिद्री बनून जाईल.
      एक दिवस गोरखनाहाने आपल्या मुलाला जवळ बोलावलं आणि समजावलं, “बाबा रे, मी एका गरीब घरात जन्माला आलो. माझे बाबा शेळ्या चारवत. दूध, बकर्यांची विक्री यातून चार पैसे मिळत. त्यात कशी-बशी घराची गुजराण होई. मला फार शाळा शिकता आली नाही. मी वडिलांना कामात मदत करू लागलो. वडिलांनी मग अधिक शेळ्या घेतल्या. थोडा फार पैसा येऊ लागला. ते पैसे खर्च न करता साठवून ठेवू लागलो. वडिलांच्या मृत्यूनंतर मी त्या पैशांतून थोडी जमीन घेतली. त्यात भाजीपाला पिकवून विकू लागलो. पैसे वाचवून पुढे त्यातून एक छोट्ंस घर खरेदी केलं. मी तुझ्यासारखे पैसे उधळत राहिलो असतो तर आज मी गरीबच राहिलो असतो.”
      केदारवर  याचा काडीमात्र परिणाम झाला नाही. तो पैसे उधळतच राहिला. एकदा गोरखनाथ विचार करीत बसला असताना त्याच्या मित्रानं-मंजूनाथनं कारण  विचारलंगोरखनाथने कारण सांगितलं.मंजूनाथने एक योजना सांगितली. ती गाेरखनाथला विलक्षण  आवडली. त्याने एक दिवस केदारला बोलावून सांगितले, “ मी बाजारला भाजीपाला विकायला जातो आहे. आता रोज मी भाजीपाला विकून आलो की, तुला दहा रुपये देत जाईन. त्यातले पाच रुपये तू खर्च करायचे  आणि पाच रुपये आपल्या शेतातल्या झाडीतल्या  विहिरीत फेकून द्यायचे. ”
      केदारला तेवढेच पाहिजे होते. रोज दोन रुपयाच्या जागी पाच रुपये मिळणार असतील तर कोणाला नको आहे? तो वडील सांगतील तसेच करू लागला. एक दिवस ठरल्यानुसार गोरखनाथने आजारी पडल्याचा बहाणा केला. केदारला जवळ बोलावून म्हणाला, “ बाबा रे, माझ्या अंगात ताप भरला आहे. अशक्तपणाही  आला आहे. उद्यापासून काही दिवस तुलाच बाजारला जावं लागेल. शेताचीही काम करावी लागतील. नाही तर मग  मी तुला पैसे कोठून आणून  देणार? ”
      दुसर्या दिवशी केदार शेतावर गेलाभाजी तोडली. त्याच्या पेंड्या बांधल्या. हे करताना त्याला खूप कष्ट पडलेभाज्याचे गाठोडे  बांधून बाजारात गेला.   संध्याकाळी घरी आला तो फार थकून. एवढे करूनही तो फक्त दहा रुपयेच कमवू शकला होता. त्याने अगोदरच पाच रुपये खर्च केले होते. उरलेले पाच रुपये विहिरीत टाकायला गेला. चालता चालता विचार करू लागला, एवढे कष्ट करून मिळवलेले पैसे विहिरीत कसे टाकायचे? तरीही मन मारून त्याने पाच रुपये विहिरीत टाकले.
      पुढच्या दिवशीही असेच घडले. पण विहिरीत पैसे फेकायला त्याचे मन तयार होईना. बराच वेळ विचार करत उभा राहिला आणि शेवटी मनाचा हिय्या करून पाच रुपये विहिरीत फेकून माघारी परतला. तिसर्या दिवशी मात्र त्याचे धाडस झाले नाही. विहिरीत पैसे न फेकताच तो माघारी फिरला. वडिलांना म्हणाला, “ बाबा, एवढे मोठे कष्ट उपसून पैसे कमावयचे आणि ते विहिरीत फेकायचे? जर हेच पैसे साठवले तर भविष्यात आपल्या कामाला येतील. ”
      गोरखनाथ म्हणाला, “केदारबाळा, मी रोज तुला दहा रुपये देत होतो, त्यावेळेला तू असा  का विचार केला नाहीस? ”
      “  बाबा, माझी चूक झाली. त्यावेळेला मला कष्टाचे मोल माहित नव्हते. पण आता समजून चुकलो आहे. यापुढे असा प्रकार होणार नाही. ”
      गोरखनाथ हसला. म्हणाला, “बाळ  जा, ती विहीर कोरडी आहे. तिला पायर्याही आहेत. त्यात फेकलेले पैसे काढून घेऊन ये. आता तुला पैशाचे मोल कळले ना, हेच मला हवे होते. ”  केदार आनंदला. तो धावतच विहिरीकडे गेला. विहिरीत उतरल्यावर पैशांचा ढीग पाहून चकीत झाला. ते सगळे पैसे गोळा करून घरी परतू लागला. वाटेत विचार करू लागला, आपण उगाचच पैसे खर्च करत होतोे. ते पैसे साठवले असते, तर सायकल घेण्याइतपत पैसे जमले असते. अजूनदेखील वेळ गेली नाही. हे पैसे आणि आणखी थोडे पैसे जमवून उपयोगाच्या काही गोष्टी करता येतील. ही  योजना त्याने आपल्या बाबांना सांगितली. गोरखनाथने त्याला गळ्याशी धरलं आणि म्हणाला, “ आता तुला पैशाची किंमत कळाली, माझ्या मनावरचं फार मोठं ओझं कमी झालं. मी निर्धास्त झालो. मुलं शहाणी  झाली की, मोठ्यांची काही काम उरत नाहीत. आता मी तीर्थयात्रा करून येतो. तू तुझा व्यवसाय सांभाळ. ”
      खरोखरच केदारने   व्यवसाय चांगला सांभाळलावाढविला आणि फुलविला. गोरखनाथ कृतकृत्य झाला.
kilbil.prahaar 2013
kilbil.mahasatta 2017


बालकथा अंधश्रद्धाळू आकाश




       संध्याकाळी बाबा ऑफिसमधून घरी आल्या आल्या आकाशानं विचारलं, “बाबा, माझा पेन आणलात?”
 “हो, आणलाय,” असे म्हणत त्यांनी आपल्या बॅगेतून एक पेन काढला आणि आकाशच्या हातात टेकवला.
 पेन पाहताच आकाशचा चेहरा उतरला.तो म्हणाला, “ हे काय हो बाबा, मी तुम्हाला निळ्या रंगाचा पेन आणायला सांगितला होता, तुम्ही हिरव्या रंगाचा आणलात. निळा रंग यश देतो, माहित नाही का तुम्हाला? ”
 “हे  कुणी सांगितलं तुला? ” बाबांनी चकित हो ऊन विचारलं.
 “नितीन म्हणाला असं!”आकाश म्हणाला.
 “कोण नितीन? ”बाबा
 “माझ्या वर्गात आहे तो! ”आकाश
 “असं काही नसतं! परीक्षेची तयारी कर. ” बाबा म्हणाले.
 “नाही बाबा, हिरव्या रंगाच्या पेनने परीक्षा दिली तर चांगले मार्क पडत नाहीत. ”आकाश म्हणाला.
 “आकाश, या सगळ्या फालतू गोष्टी आहेत. हिरव्या-निळ्या रंगानं काही घडत नसतं. तू परीक्षेची चांगली तयारी केली असशील तर चांगले मार्क मिळतीलच. ” बाबांनी समजावलं.
 पण आकाश ऐकायला तयार नव्हताच. तो बाबांकडे निळ्या रंगासाठी हट्ट धरून बसला. तेव्हा बाबा म्हणाले, “आता सगळी दुकानं बंद झाली असतील.आता कोठून निळ्या रंगाचा पेन आणणार? ”
 पेन शोधता शोधता  बरीच रात्र झाली. शेवटी एकदाचा निळ्या रंगाचा पेन मिळाला. अजून त्याला परीक्षेची तयारी करायची होती. पण त्याला झोप येऊ लागली. त्यामुळे त्याने आईला पहाटे पाच वाजता उठवायला सांगून झोपी गेला.
 पहाटे आईने त्याला उठवले. तो बेडवरून खाली उतरत होता, तोच आईला शिंक आली. तो पुन्हा बेडवर जाऊन पडला.
 आईने तो परत फिरून झोपल्याचे पाहून त्याला उठायला सांगून ती आपल्या कामाला निघून गेली. बाबांना तर त्याचा रागच आला. ते आकाशला म्हणाले, “आकाश, काल तू निळ्या पेनच्या भानगडीत अभ्यास केला नाहीस. आता उठतोस की नाही? साडेसहापर्यंतच तुला वेळ आहे. ”
 तेव्हा आकाश म्हणाला, “बाबा, नितीनने सांगितलंय की, कुठलंही काम सुरू करण्यापूर्वी कुणी शिंकलं तर लगेच कामाला सुरूवात करायची नाही. ”
 बाबा म्हणाले, “अरे व्वा! आमचा आकाश तर चक्क अंधश्रद्धाळू बनला आहे. पण याच्याने तुझं नुकसानच होणार आहे. ” तरीही आकाश टाळत राहिला. दहा मिनिटांनंतरच तो अंथरुणातून उठला.
 परीक्षेच्या तयारीसाठी त्याच्याकडे फक्त साडेसहापर्यंतच वेळ होता.सातला तर त्याची स्कूलबस यायची. काल रात्री निळ्या पेनच्या शोधात आणि आज सकाळी शिंकेच्या भानगडीत  त्याची परीक्षेची तयारी काही म्हणावी अशी झाली नाही. त्यामुळे त्याला शालेला जाण्यासाठी तयार व्हायलाही वेळ झाला. बाबा आणि आकाश रस्त्यावर येताच त्यांना एक मांजर आडवं गेलं. आकाशने बाबांना थांबवले. एक मोटरसायकल पुढे गेल्यावर मग तो निघाला. स्कूलबस कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर येऊन थांबायची. पण तिथे गाडी होती ना मुलं! म्हणजे स्कूलबस निघून गेली होती. आकाशला शाळेत पोहचणं आवश्यक होतं, कारण आज परीक्षा होती.
 एक रिक्षा आली. बाबांनी त्याला हाक दिली. दोघेही रिक्षात बसायला पुढे निघाले, तोच आकाश जागच्या जागी थांबला. बाबांनी विचारल्यावर आकाश म्हणाला, “बाबा, गाडीचा नंबर 1301 आहे. तेरा हा अंक अशुभ असतो. या रिक्षाने गेलो तर परीक्षा चांगली जाणार नाही. आपण दुसर्या रिक्षाने जाऊ.”
 आकाशची गोष्ट ऐकून बाबांना भलताच राग आला. ते म्हणाले, “तुझे डोके-बिके फिरलेय का काय? कुठल्या अंधश्रद्धेच्या बाता मारतोयस तू? या घडीला तुला शाळेत पोहचणं, महत्त्वाचं आहे. चल, रिक्षात बस बघू.आधीच उशीर झाला आहे. ”
 पण आकाश आपल्या गोष्टीवर अडून राहिला. रिक्षावाल्याला दुसरे भाडे मिळाले. तो निघून गेला. बर्याच उशीराने एक रिक्षा आली.
 दोघे शाळेत पोहचले. परीक्षा सुरू होऊन अर्धा तास झाला होता. आकाश वर्गात गेला. त्याचे बाबा घरी आले. दुसरा शनिवार असल्याने ऑफिसला सुट्टी होती.
 दुपारी आकाश शाळेतून घरी आला. त्याचा चेहरा उतरलेला होता. आई-बाबांनी त्याला विचारल्यावर त्याने पेपर खूपच कठीण गेल्याचे सांगितले. तेव्हा बाबा म्हणाले, “बघितलसं,अंधश्रद्धेच्या आहारी गेलं की काय होतं ते! मी तुला अगोदरच सांगितलं होतं, असल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नकोस म्हणून! ”
 बहुतेक ही गोष्ट आकाशच्या लक्षात आली असावी.त्याने हो म्हणत मान हलवली होती.तेवढ्यात आई म्हणाली,असू दे, आता हात-पाय धुवून घे. काही तरी खा. आणि पुढच्या पेपरच्या तयारीला लाग. ”
 आईची गोष्ट ऐकून आकाश हात-पाय धुवायला उठणार तोच, बाबांना शिंक आली. बाबा म्हणाले, “आकाश, मला शिंक आली. आता तू दहा मिनिटे असाच बसणार का? हात-पाय धुवायला जाणार नाहीस काय?”
 “नाही बाबा, आता या भानगडीत पडणार नाही. मला सगळं काही समजून चुकलं आहे. या सगळ्या गोष्टी बेकार आहेत. ” असे म्हणून आकाश हात-पाय धुवायला बाथरुममध्ये गेला.

  

बालकथा बकरी मिळाली परत



      ताश्कंद नगरीत मीर जाफर नावाचा एक फिरस्ता व्यापारी राहत होतादिवसभर उंटासारखा राबायचा. तरी त्याची बरकत काही होत नव्हतीउलट व्यापारात घाटाच व्हायचा. शेवटी त्याने व्यापार टाकला. आता तो मस्त खाई-पिई आणि कुठे तरी बाहेर जाऊन चकाट्या पिटत राही. बिच्चारी त्याची बायको चार घरची धुणी-भांडी करी आणि घरगाडा  कसा तरी टिच्चून टिच्चून चालवी.
      एक दिवस मीर जाफर एक मरतुकडी बकरी अगदी स्वस्तात घेऊन घरी आला. मीर जाफर तर दिवसभर घराबाहेरच असे. त्यामुळे बकरीचे सगळे काही जमिराला करावे लागे. बकरी  दिवसभर ओरडून दंगा घालायची. खुशाल चारा खायची आणि घरभर घाण करायची. बकरीची उसाभर करून करून जमिरा  पार मेटाकुटीला आली.
      एक दिवस मीर जाफर घरी आल्यावर जमिरा डोळ्यांत पाणी आणून म्हणाली, “ ही बकरी काय माझा जीव घ्यायला आणला आहात? आत्ताच्या आत्ता तिला विकून या नाही तर मला माहेरी सोडून या. इथे आपल्यालाच खायचे वांदे असताना हिला काय घालू, माझी वाळलेली हाडं?”
      “जमिरा, तू अजिबात काळजी करू नकोस. आत्ताच्या आत्ता हिचा बंदोबस्त करतो.”  मीर जाफर तिचे सांत्वन करीत म्हणाला.
      त्या दिवशी मीर जाफरचं मन फार उदास होतं. काय करावं त्याला सुचत नव्हतं. त्याला तिच्या अम्मीची याद आली. तो अम्मीची कबर असलेल्या कब्रस्तानात गेला. तिथं भरपूर गवत उगवलं होतं. गवत हिरवंगार, कोवळं लुसलुशीत होतं.
      मीर जाफर काही वेळ कबरीजवळ बसला. चोहोबाजूची हिरवळ पाहून त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. त्याच्या बकरीसाठी याच्यापेक्षा  चांगलं ठिकाण आणखी  कुठे असणार?    तो उठला आणि तडक कब्रस्तानच्या रखवालदाराकडे गेला. म्हणाला, “  मी तर आता फार थककून गेलोय. मला काही मूल-बाळ नाही. तेव्हा मी मेल्यावर माझं दफन तूच करायचंस. तुला ही बकरी आत्ताच देऊन टाकतो.”
      हैदरनं अगदी आनंदानं बकरीचा स्वीकार केला.
      दोन महिन्यांनी मीर जाफर पुन्हा अम्मीच्या कबरीकडे गेला. काही वेळ बसला.
 जाताना सहज त्याची नजर तिथे चरणार्या बकरीवर पडली. पहिल्यांदा तर तो ओळखूच शकला नाही. ती त्याचीच बकरी होती. हिरवंगार गवत खाऊन अगदी धष्टपुष्ट झाली होती.
      “इतकी वजनदार बकरी दान करायची म्हणजे खुळ्याचा बाजारच की!”  तो स्वत: शीच विचार करू लागला. विचार करता करता त्याने पक्का निश्चय केला. काय वाट्टेल ते झाले तरी बकरी सोडायची नाही. तो तडक रखवालदाराच्या घराकडे गेला. त्याचा दरवाजा खटकावला. दरवाजा  उघडताच म्हणाला, “ हैदर, चल आटप लवकर. मी शहर सोडून चाललोय. तूदेखील माझ्यासोबत निघायला तयार हो.”
      “कुठे जायला  तयार होऊ म्हणतोस?” हैदरने  हैराण होऊन विचारले.
      “कुठं काय, विचारतोयस. अरे, तू मला वचन दिलयसं , माझ्या मृत्यूनंतर माझा दफनविधी तू करणार म्हणूनम्हणून तर तुला मी बकरी दिली. आता मी जिथं कुठं राहीन, तिथं तुला यावं लागेल. माझा दफन विधी करायला तू हवास ना!”
      ऐकून हैदर चक्रावलाच! तो जाम भडकला. “ तुला जिथं कुठं जाऊन मरायचं आहे, तिथं जाऊन मर जा. आणि ही तुझी मनहूस बकरीदेखील सोबत घेऊन जा. दोघे जाऊन नदीत जीव द्या नाही तर आणखी काय करायचं ते करा. वेडपट कुठला!”  असे म्हणतच हैदरने पटकन दरवाजा लावून घेतला.


     मीर जाफर बकरी घेऊन अगदी आनंदाने घरी आला. आता तो आपल्या हुशारीवर   स्वत: ची पाठ थोपटून घेत होता.  

बालकथा शिवण यंत्राचा अविष्कार



      एक मुलगा होता. ताे एका पायाने अपंग होता. पण  आईचा लाडका होता. सात वर्षाचा  हा मुलगा  एक दिवस आईला म्हणाला, “ आई, आपल्या शेजारची दोन मुलं आज शाळेला गेली. मला कधी शाळेत  पाठवणार? ”
 आई म्हणाली, “ बेटा, शाळा फार दूर आहे. तुला चालवणार नाही. आणखी थोडा मोठा झालास की, तुला पाठविन हो.”
 तो म्हणाला, “ नाही आई, मी आताच जाणार! मी पायाने लंगडा असलो तरी काय झालं? मी जाऊ शकतो. ”
      आई त्याला किती तरी वेळ समजावत राहिली, पण त्याने आपला हट्ट सोडला  नाही. कुठलाही वाईट हट्ट दु:ख देतो, तर  चांगला हट्ट  सुख! आपल्या मुलाचा हट्ट  चांगल्यासाठी, भल्यासाठी आहे. शिवाय आपला मुलगा अपंग आहे. त्याला कष्टाची कामे जमणार नाहीत. शिकला-सवरला  तर कसली तरी बैठी नोकरी मिळून जाईल. त्याचे आयुष्य सुखी झाले म्हणजे झाले, याचा विचार करून तिने त्याला शाळेला जायला परवानगी दिली. त्याला  घेऊन शाळेत गेली आणि नाव दाखल केले.
      शाळेतील त्याचे वर्गमित्र  त्याला लंगड्या लंगड्या म्हणून चिडवत. पण तो त्यांना काहीदेखील  म्हणत नसे. त्यांच्या बोलण्याचे वाईट वाटून घेत नसे. सुरुवातीला त्याच्या वर्गातली मुलं फळ्यावर, भिंतीवर लंगड्या मुलाचे चित्र काढायचे, तर कधी त्याला पाहून लंगड्त चालायची. पण तो या सगळ्या गोष्टी हसून टाळत असे. एक दिवस तर मुलांनी तो बसताना त्याची खुर्ची मागे खेचली आणि तो खाली पडला. त्यालाप्रचंड  वेदना झाल्या. जखमदेखील  झाली. परंतु, तरीही त्याने खोड काढणार्या मुलांची नावे शिक्षकांना सांगितली नाहीत. सगळीच मुले अचंबीत  झाली. शेवटी त्यांना उपरती आलीत्याला चिडवणारे, त्रास देणारे सगळे  त्याचे मित्र बनले. आपल्या सहनशिलतेच्या आणि लाघवी बोलण्याच्या जोरावर त्याने सगळ्यांची मने जिंकली.
      एक दिवस तो घरात बसून अभ्यास करीत होता. बाजूलाच बसून आई कपडे शिवत होती. त्याने आईला विचारलं,“ तू शिंप्याचं काम  करते आहेस का? ”
      आई म्हणाली, “ नाही रे बाबा, तुझा फाटलेला  शर्ट शिवते आहे. ”
 त्यानं विचारलं,“ मग शिंप्याकडे टाकायचं नाही का? तो चांगल्या प्रकारे शिवून दिला असता. ”
 “बाळा, शिंप्याला पैसे द्यावे लागतील. तेवढे पैसे आपल्याकडे  नाहीत. ” आई म्हणाली.
      ही गोष्ट त्याच्या मनाला फार लागली. आई किती कष्ट उपसते. तरीही पुरेसे  पैसे नाहीत. त्याने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला. कामाच्या शोधात घराबाहेर पडला. कामाचा शोध घेत घेत तो एका कारखान्यात पोहचला. तिथल्या मालकाला अगदी विनम्रपूर्वक म्हणाला, “ साहेब, मी पायाने अपंग आहे. पण मला कोणतेही काम द्या, ते मी मन लावून करेन. काम आवडले तर कामावर ठेवा अन्यथा नका ठेवू. ”
      त्याच्या विनम्र बोलण्याने मालक प्रभावित झाला. त्याला कामावर ठेवून घेतले. कष्ट, एकाग्रता आणि जिद्दीच्या जोरावर त्याने मालकाचा विश्वास संपादन केला. त्याला आता स्थायीस्वरुपाची नोकरी मिळाली.
 काही वर्षे लोटली. त्याचे मन कामात रमले. कामात साधी चूकसुद्धा  होऊ नये, याची तो खबरदारी घेत असे. एक दिवस मालक -कारखानदार कोणाशी तरी बोलत होता, “ हाताने जितके काम होते, त्याच्या दहापट काम यंत्राद्वारा करता येते. एक शिंपी दिवसभरात एखादेच  कापड शिवू शकतो, मात्र  एक शिवण यंत्र दिवसभरात दहा कपडे शिवू शकते. ”
      त्या अपंग युवकाला त्याची आई आठवली की, जी अजूनही आपल्या वृद्धापकाळात दुसर्यांची कपडे शिवते  आणि     आपले पोट भरते. त्या काळात  अद्याप शिवण यंत्राचा शोध लागलेला नव्हता. शिंपी लोक हातानेच कपडे शिवत.
 तो युवक आपल्या मालकाला विनम्रपणे म्हणाला, “ आपली आज्ञा असेल तर मी शिवणयंत्र बनवण्याचा प्रयत्न करू का? ” मालकाने एकवार त्याच्याकडे पाहिले आणि म्हटले, “ असे शिवणयंत्र बनवले जाऊ शकते, याची तुला खात्री आहे का? ”
 “हो, मला खात्री आहे, मला माझ्या मेहनतीवर आणि निष्ठेवर विश्वास आहे. ” युवक दृढतेने म्हणाला.
      मालकाने परवानगी तर दिलीच, पण  शिवाय त्याच्या मदतीला लोक आणि आर्थिक सहकार्यही दिले. त्याने काही चित्रे बनवली, ज्याच्या आधाराने  धातूचे सुटे भाग बनवण्यात आले. यंत्राचा त्याने साचा बनवला. त्याद्वारे काम चालले होते. शेवटी त्याच्या दिवस-रात्रीच्या कष्टाला, जिद्दीला यश आले आणि शिवणयंत्राचा अविष्कार झाला. त्यावर कपडे शिवले जाऊ शकत होते.
      लोकांपर्यंत शोधाची बातमी पसरली. शिंप्यांनाही कळले, पण त्यांचा या यंत्रावर  विश्वास बसला नाही. यंत्रावर कपडे कसे शिवले जाऊ शकतात? असा त्यांचा सवाल होता. परंतु, हळूहळू लोक ते यंत्र पाहायला येऊ लागले. त्यांचा विश्वास बसू लागला. शिंपी मोठ्या खुबीने आणि तितक्याच संयमाने कपडे शिवतात, पण यंत्रानेही हुबेहुब तशीच शिलाई केली जाऊ शकते आणि अल्पावधीत होऊ शकते, याची खात्रीदेखील  त्यांना पटली.


 1840 मधली ही घटना आहे. आपल्या जिद्द, एकाग्रता आणि मेहनतीच्या जोरावर शिवणयंत्राचा अविष्कार करणार्या अपंग अमेरिकन युवकाचे नाव आहे, इलियस होव. त्याच्यामुळेच शिवण कलेत मोठी क्रांति झाली.

बालकथा टिंकीचा करिश्मा



      नंदनवनात परतल्यावर टिंकी  बरेच दिवस आपल्या आईच्या हातच्या स्वादिष्ट भोजनावर ताव मारत राहिली. मग  एक दिवस ती तिच्या मैत्रिणीला-किटी खारूला भेटायला बाहेर पडली. जाताना तिनं पाहिलं की, बंटी माकड कल्लू कावळ्याशी भांडत होता. फिस्सकन अंगावर जात होता आणि   तावदारू न म्हणत होता, “ तुझं  गबाळ उचलं आणि दुसर्या झाडावर जाऊन राहा. इथे माझ्याबरोबर नको. तुला कसं राहावं, याची अजिबात  अक्कल नाही.कुठलेही, कसले घाण मांसाचे तुकडे आणतोस, आणि  कुठेही, कसेही टाकतोस.त्याच्याने  परिसरात किती दुर्गंधी पसरली आहे. अरे, तुझ्यामुळे  आम्हाला  नाकपुड्या धरून वावरावं लागतं.छे... छे! तू इथे एक क्षणभरही थांबायचं नाहीस.चालता हो इथून! ”
      त्यावर कल्लू कावळा ठामपणे म्हणाला, “ आम्ही आमच्या  वाडवडिलांपासून इथे राहतो आहोत. इथून  अजिबात जाणार नाही.ङ्घ  बंटीचे पित्त खवळलेत्याने त्याच तिरीमिरीत  कल्लूच्या कानशिल्यात लगावली. तसा कल्लू तडमडत खाली पडला. त्यांचे भांडण पाहून इटुकली टिंकी  पटकन तिथे पोहचली. आणि म्हणाली,            “ नमस्कार बंटीकाका! कसे आहात? ”
      बंटी आवाज ऐकून  मागे वळला. पाहतो तर  टिंकी मुंगी  पुढचे दोन्ही हात जोडून उभीतिला पाहताच त्याचा राग कुठल्या कुठे पळाला. टिंकी होतीच तशी! सार्या  नंदनवनची  तिच्यावर मर्जी होती. तिला लहानपणापासून एक सवय होती, कुणी कितीही रागावलं तरी रागाला यायचं  नाही. आणि राग अनावर झाला तरच ती थेट तेथून उठायची आणि दुसरीकडे कुठे तरी जायचीपाणीबिणी प्यायची.   थोडावेळ  पुस्तक  वाचत बसायची.
 राग शांत  झाला की, मग ती माघारी परतायची. पुन्हा  पहिल्यासारखी हसत खिदळत  गप्पांमध्ये रमून जायची. तिच्या अशा या वागण्यामुळे जे आपल्या क्रोधाने दुसर्या पशु-पक्ष्यांना  त्रास द्यायचे, त्यांना आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप व्हायचा.
       टिंकीला पाहून कल्लूनेदेखील नमस्कार केला.ती बंटीला म्हणाली, “ काका, भांडणतंट्याने कुणाचे प्रश्न सुटले आहेत का? आणि कल्लू कावळ्याकडून काही चूक झालीच असेल तर तुम्ही त्याला अगदी शांतपणानेसुद्धा सांगू शकतामी मनोमन किती अभिमान बाळगला होता, आपल्या नंदनवनचा  आणि  इथल्या रहिवाशांचा! आपल्या नंदनवनात शहरातल्या माणसांसारखं कुणी भांडणतंटा करत नाही. अगदी प्रेमानं, गुण्यागोविंदयानं राहतात. आपले जंगल स्वच्छ आणि सुंदर ठेवतात, पण इथे तर  शहराची हवा लागली असल्याचं दिसतं.”
      टिंकीचे बोलणे ऐकून कल्लू कावळ्याला तर रडूच कोसळलं. तो रडतच म्हणाला, “ टिंकी, भांडण  मी उकरून काढलं नाही. या टिंकीमामानं काढलं. आणि मी काही जाणूनबुझून दुर्गंधी पसरवत नाही. अनावधानानं घडतं, यापुढे  काळजी घेईन, पण हे झाड सोडून जाणार नाहीइथल्या खुपशा स्मृति  हृदयात जपल्या आहेत. हे झाड मला फार आवडतं.”
      कल्लू  कावळ्याच्या डोळ्यांमध्ये पाणी पाहून बंटी माकड काहीसा नरमलाम्हणाला, “ अरे कल्लू, मी तर तुला हेच सांगत होतोआपल्या सगळ्यांनाच नंदनवन स्वच्छ आणि सुंदर ठेवायला हवं ना!   आपण जर असाच कचरा कुठेही टाकत राहिलो तर  नंदनवन किती कुरूप-विद्रुप  दिसेल. दुर्गंधीमुळे साथीचे आजार  पसरतील. काय टिंकी! मी म्हणतोय ते बरोबर ना? तू तर शहरात शिकून मोठी मॅडम होऊन आली आहेस. आता तुलाच आम्हा आडाण्यांना जगण्याची रीतभात शिकवावी लागेल. ”
      बंटीचे बोलणे ऐकून टिंकी हसत म्हणाली, “  नक्कीच काका! मी सगळ्यांना  मोठ्या आनंदान आणि  मोफत शिकवीन. आणि जे शिकतील-सवरतील, त्यांना माझ्या टीममध्ये सामिल करून घेईन. आणि  वनातल्या सर्व सानथोर  पशू-पक्ष्यांना शिकवून शिक्षित करीन. त्यांना चांगल्या ज्ञानाच्या गोष्टी सांगेन.कॉम्प्युटरदेखील शिकवीन. शेवटी आमचं  नंदनवन तरी का मागे असावंकॉम्प्युटरच्या माध्यमातून सगळी कामं  एका चुटकीसरशी  करता येतात. ”
      टिंकीचे बोलणे  बंटी आणि कल्लू कान देऊन ऐकू लागले. तिची तळमळ ऐकून ते   चकीत झाले. या दरम्यान बरेच पशू-पक्षी तिथे गोळा झाले होते. सगळेच  टिंकीचे बोलणे अगदी लक्षपूर्वक  ऐकत होते. कल्लू म्हणाला, “ टिंकी, तू तर खरंच, किती शहाणी झाली आहेस. शहरातला मधाळ गोडवा आणि  सुविचारांचा आमरस तू  ग्रहण केला आहेस.”
      यावर टिंकी पटकन म्हणाली, “ का नाही ग्रहण करणार! गोडवा ग्रहण करणं हे तर आमच्या  रक्तात आणि स्वभावातच  आहे. माणसांच्या स्वयंपाकघरात घुसतो, पण  आम्ही चटणी-मिठाला हात लावत नाही.   फक्त साखर-गुळावरच आमची नजर असते. म्हणजे, आम्हाला समाजात तिखट-मिठाचा फवारा  मारायचा नाही तर  गोडव्याचा शिडकावा करायचा  आहेहा गोडवा मला आपल्या नंदनवनातल्या  कानाकोपर्यात शिडकावयाचा  आहे. आणि या गोडव्याची कीर्ती फक्त शहरभर नव्हे तर  सार्या विश्वात पसरावयाचा आहे. ”
       तिचे हे गाेड  बोलणे नंदनवनचा राजा  सिंहराजदेखील ऐकत होता. तो टिंकीच्या ज्ञानाने ओतप्रोत भरलेल्या गोड  गोष्टीने भारावून गेला. त्याला टिंकीचा भारी अभिमान वाटला. त्याने तिला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
      आणि काय आश्चर्यकाही दिवसांतच टिंकीसोबत शिक्षित पशू-पक्ष्यांची एक फळी  सार्या नंदनवनला शिक्षित करायला पुढे सरसावली.

विषकन्या


      प्राचीन काळापासून आपल्या देशात शत्रूचा नायनाट करण्यासाठी, त्याची हत्या करण्यासाठी विषकन्यांचा विशिष्ट पद्धतीने वापर केला जायचा. अपार रुप आणि सौंदर्याच्या स्वामिनी म्हणून ओळखल्या जाणार्या या बालांना अगदी लहानपणापासून विषाची थोडी थोडी मात्रा सेवन करण्यासाठी दिली जात असे. कालांतराने वयात आल्यावर आपल्या सौंदर्याची भुरळ घालून  ती कोणत्याही व्यक्तीला केवळ आपल्या श्वासाच्या गंधाने, स्पर्शाने किंवा अन्य संपर्काच्या माध्यमातून  यमसदनाला पाठवू शकत होती. शत्रूला आपल्या प्रेमपाशात ओढून आणि आपले सर्व काही डावावर लावून आपल्या देशासाठी, राजासाठी अथवा  आपल्या  स्वामीसाठी शत्रूला संपवायची. विषकन्यांचे शरीर लहानवयापासून विषयुक्त करण्याची पद्धत फारच वैज्ञानिक होती. विषकन्या म्हणून निवडलेल्या मुलींना लहानपणापासून विषाची थोडी थोडी मात्रा दिली जायची. जसजसे वय वाढत जाईल, तसतसे तिच्यावरची विषाची मात्राही  वाढवली जायची. दुसर्या बाजूला तिला लागलीच विषाचा विपरित परिणाम होऊ नये म्हणून  त्यावर उताराही दिला जायचा. धोतरा, अफू,सोमल आदींची योग्य अशी मात्रा उतारा म्हणून वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या आधारावर दिला जायचा.
      आपल्या काळात राजे लोक या कामासाठी खास कन्यांची निवड करत असत. ही कामगिरी काही जणांवर सोपवली जायची. ही मंडळी सुंदर अशा नवजात मुलींची निवड करून त्यांच्यावर जन्माच्या सहा महिन्यापासूनच ही विषाची मात्रा देण्याची व्यवस्था करायचे. बारा वर्षांपर्यंत किंवा त्याहून अधिक काळ वाढत्या वेगाने अशा विषकन्यांवर विषाची मात्रा तीव्र  स्वरुपात वाढवत दिली जायची. काही काळानंतर मग ती त्याच्या इतकी अधिन व्हायची की, तिच्यावर विषारी सापाच्या दंशाचा किंवा विषारी घटकाचा  काही परिणाम व्हायचा नाही. या विष प्रयोगामुळे पुढे तिचे संपूर्ण शरीर, घाम, केस विषाक्त हो ऊन जात असे. इतकेच नव्हे तर तिच्या डोक्यात घातलेले फूलदेखील कोमेजून जायचे. तिच्या शरीराचा स्पर्श झालेली सोन्या-चांदीची, रत्नांची आभूषणे किंवा अन्य किंमती जवाहारात काळवंडून जात. ते आपली चमक गमावून बसत. पूर्वी  शत्रूचा नाश करण्यासाठी विषात बुडवलेली दागदागिने, काचेचे तुकडे, नखे, किल्ल्या किंवा छोटी छोटी शस्त्रे आदी साहित्यांचाही  वापर केला जात असल्याचे आपल्या ऐकण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर विषयुक्त वस्त्रांचाही वापर त्या काळात केला जात असे.
      सिंध प्रांतचा बादशहा अहमद शहा हा आहोरचा राजा पर्वतसिंह याची कन्या लालबाई हिच्या सौंदर्यावर मुग्ध हो ऊन तिच्याशी जबरदस्तीने विवाह करण्याचा घाट घातला होता. तिच्या वडिलाने, पर्वतसिंहने विवाहाला नकार दिल्यावर त्याने त्याच्या राज्यावर हल्ला चढवला होता. परिणाम राजा पर्वतसिंह आणि त्याचे साथीदार मारले गेले. आपल्या राज्याला नेस्तनाबूतहोण्यापासून वाचवण्यासाठी लालबाई विवाहाला तयार झाली. विवाहाची तारीख निश्चित झाली. या विवाहाआधी परंपरेनुसार वधूपक्षाकडून वरासाठी नवीन  विधीवस्त्र पाठवण्यात आले. विवाहाप्रसंगी हे वस्त्र बादशहाने घालताच  त्याच्या अंगाला धरधरून घाम फुटला. अंगाची लाही लाही झाली. आगीत लपटल्यासारखा ओरडून ,तडफडून त्याने प्राण सोडला. लालबाईनेदेखील जवळच्याच चांदी सरोवरात उडी मारून आपल्या प्राणाची आहुती दिली.  


     प्रसिद्ध लेखक अबुल फजलने आपल्याआईने अकबरीपुस्तकात विषकन्यांच्या कार्याचे वर्णन अगदी विस्ताराने केले आहे.इतिहासकार आणि अलबरूनी नावाच्या लेखकानेदेखीलतहकीकाते हिंदया आपल्या पुस्तकात रजपूत राजांद्वारा जासुसी करण्यासाठी शत्रू राजाला ठार मारण्यासाठी किंवा आपल्या शत्रूला नामोहरम करण्यासाठी व गुप्त माहिती मिळवण्यासाठी अशा विषकन्यांचा उपयोग केला जात असल्याचा उल्लेख केला आहे. विषकन्यांना नृत्य, संगीत आणि ललित कलांमध्येही निपुण केले जात असे. जेणे करून  राजा वैगेरे या कलांमुळे त्यांच्याकडे आकर्षित होतील. विषकन्यांच्या वापराचा इतिहास फार प्राचीन आहे. “ अटांग संग्रहआणिकथा सरित सागरआदी प्राचीन ग्रंथांमध्ये यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या विषकन्या इतक्या खतरनाक असायच्या की, त्यांच्या श्वासाने, स्पर्शाने, चुंबनाने किंवा संभोगाने माणूस निर्जीव हो ऊन जायचा. पण यांचा वापर विशिष्ट वेळीच किंवा खूप चतुर किंवा बुद्धिमान शत्रूला मारण्यासाठीच केला जात असे. चंद्रगुप्त राजाचा प्रमुख सल्लागार  असलेले चाणक्य महान कुटनीतीज्ञ  आणि कुशल वैज्ञानिक होते. त्यांनी शत्रू राजा संपवण्यासाठी अनेक उपाय सुचवलेले आहेत. त्यात विषकन्यांच्या सेवा आणि त्यांचा उपयोग यांचा उल्लेख केला आहे. संस्कृतमधले प्रसिद्ध नाटकमुद्राराक्षसमध्ये नंदाचा कुटतीतीज्ञ अमात्य राक्षसद्वारा चंद्रगुप्तची हत्या करण्यासाठी विषकन्येला पाठवल्याचा उल्लेख आहे. बालकृष्णाला मारण्यासाठी आलेली पुतणामावशी ही कंसाच्या दरबारातील विषकन्याच होती. आधिनिक काळात प्रसिद्ध हेर माताहारी आणि तिची मुलगी बांडा यांच्या धाडसी कार्यांचा उल्लेख काहीजण विषकन्यांच्या श्रेणीमध्येच करतात.

स्मार्टफोन बाळगणार्‍या स्मार्ट दोस्तानों, जरा इकडे लक्ष द्या


      आजकाल स्मार्टफोन अनेकांचा जीवाभावाचा सखा झाला आहे. काही जण तो हातात असल्याने स्वत:ला स्मार्ट समजू लागले आहेत. स्वत:ला अप-टू-डेट आणि सगळ्यांशी टचमध्ये असल्याचे मानू लागले आहेत. परंतु, त्याचा वापर तितकाच स्मार्टपणे केला नाही तर नुकसानदेखील हो ऊ शकतं हे जाणून घेतलं पाहिजे.
      स्मार्टफोननं माणसाचं अख्खं आयुष्यचं बदलून  टाकलं आहे. कॉलेजमध्ये जाणार्या युवावर्गांमध्ये तर तो हमखास रुळला आहे, पण कमाई करणार्या आजच्या नव्या पिढीच्या हाताचाही त्याने ताबा घेतला आहे. कित्येकदा ऑफिसातल्या पीसी वर सोशल नेटवर्कद्वारा मित्रांशी संपर्कात राहणार्या या मित्रांच्या हातात स्मार्टफोन आल्याने चोवीस तास ही माणसं सगळ्यांशी संपर्कात आहेत. अगदी भरल्या मिटिंग्जमधूनही बसल्या बसल्या मित्रांना जोक पाठवले जाताहेत. तर कधी कधी दोस्तांबरोबर गप्पा मारल्या जात आहेत. ऑफिसमधल्या फावल्या वेळात तिथल्याच पीसीवर मेल चेक करणारे आता केंव्हाही आणि कुठेही मेल तपासताहेत. मेल सेंड करताहेत. कित्येकांना या स्मार्टफोनमुळं सगळ्यांशी टचमध्ये राहावं, असं वाटत असतं. परंतु, आजकालच्या अधिक विचार  न करणार्या या पिढीला यामुळं आपलं नुकसान होतं आहे, याची कल्पनाच नाही. स्मार्टफोनमुळे आपण अधिकाधिक लोकांच्या संपर्कात राहत असलो तरी त्यामुळे आपले लक्ष कुठल्या एका गोष्टीवर केंद्रित होत नाही. याचा अर्थ आपण कुठल्या एकाही व्यक्तीला शंभर टक्के वेळ देऊ शकत नाही. आपल्या कम्युनिकेशनमध्ये तितकी गहराई नसते. त्यांच्यात आपण फार इनव्हॉल्व होत नाही.
      यामुळं आपण फारसा विचार करत नाही. परिणाम  काहीही लिहिलं जातं आणि बोललं जातं. टिवटरवर सेंकदा सेंकदाला ट्वीट येत असतात. एखाद्या पोस्टवर लोक बिनदास्त, बेशक कमेंटस करत असतात. या अशा दौडीत आपणही सामिल हो ऊन विनाकारण आपण आपली ऊर्जा घालवत असतोते करण्यापेक्षा कुठलाही एक विषय समजावून घेऊन त्यावर विचारपूर्वक कमेंट करा. खरे तर नाती बनवायची आणि टिकवायची असतील तर तिथे शब्दांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे कुठेही घाईगडबडीने प्रतिक्रिया द्यायला जाऊ नका.
      सोशल साईटस किंवा या  स्मार्टफोनने आपल्याला बोलायला अनेक  व्यासपीठं दिली आहेत. पण इथल्या व्यासपीठांवर प्रत्येक गोष्ट ऐकली जाते  असे नाही. अचानकच एखादी गरजेची नसलेली, व्ह्यायात गोष्ट मोठी हो ऊन बसते. हा सगळा परिणाम विचार न केल्याचा आहे. त्यामुळे आपणही त्यात न गुरफटून एखाद्याच विषयावर तेही महत्त्वाच्या विषयावर , मतावर ठाम राहा. आपणही एखाद्याच्या सांगणार्याचे विचारपूर्वक समजून घ्या आणि तितक्याच हुशारीने त्याला उत्तर द्या.

      सोशल साईट्स आणि स्मार्टफोन्सच्या ऍप्समुळे आपल्या भरपूर म्हणजे भरपूर वर्चु अल फ्रेंड्स दिले आहेत.त्यांच्याशी आपण तासनतास गप्पा मारत असतो. पण इतके करूनही आपल्या मनाचे समाधान झालेले नसते.मात्र एखाद्या खास दोस्ताशी थोडा वेळाच बोला, पण मनाला समाधान देऊन जाते. अशा वर्चु अल जगात आपला किंमती वेळ घालवण्यापेक्षा अशा थोड्याच मित्रांशी आपले कम्युनिकेशन जोडा, ज्यांच्याशी बोलल्याने तुम्हाला आनंद, समाधान वाटेल. आणखी विषयांमध्ये किंवा व्यासपीठावर आपण वावरत राहिलो तर आपले मनदेखील कन्फ्युज हो ऊन जाते, गोंधळून जाते. त्याच्याने आपल्यालाच त्रास होतो. वेळ वाया जातो. त्यामुळे कुठली समस्या आधी महत्त्वाची आहे, त्यावर मन एकाग्र करा. तो स्वॉल्व झाला की, दुसर्याकडे वळा. स्वत: ला गोंधळून टाकून दुसर्यालाही गोंधळात टाकू नका.  

बालकथा सावकार



      एक फार गरीब शेतकरी होता. तो आपल्या पत्नीसोबत एका छोट्याशा गावात राहात होता. त्याला चार मुलं होती- दोन मुली आणि दोन मुलगे. शेतकर्‍याजवळ एक छोटासा जमिनीचा तुकडा होता. पण जमिनीचा तो तुकडा इतका छोटा होता की, त्यात कुटुंबाला पुरेल इतकं पीक येत नव्हतं. त्यामुळे गरीब शेतकर्‍याला दुसर्‍याच्या शेतावर मजुरीही करावी लागे. अशाप्रकारे मजुरीतून मिळणारे पैसे आणि शेतातून मिळणारे धान्य यातून कसे तरी तो आपल्या कुटुंबाची गुजराण करीत होता.
 शेतकर्‍याची मोठी मुलगी जशी वयात येऊ लागली, तशी त्याला चिंता सतावू लागली. मुलीला योग्य वर मिळायचा, पण ते खूप ज्यादा हुंडा मागायचे. त्यामुळे तो मन मारून राहायचा.
 एक दिवस शेतकर्‍याची पत्नी म्हणाली, “ काय हो, तुम्हाला दिसत नाही का, मुलगी उपवर झाली ती. तिच्यासाठी मुलगा कधी शोधणार?”
 “ मी तर त्याच खटपटीला लागलो आहे, पण आपल्याकडे मुलीचा लग्न करून देण्याइतपत  पैसेच नाहीत. मग काय करणार?” त्याने उत्तर दिले.
 “ मला माहित आहे, आपल्याकडे पैसा-अडका नाही तो. पण मग  तिला अशीच लग्नावाचून ठेवायची का? तिचं लग्न तर केलं पाहिजेच. तिच्या लग्नाचं बघा. त्यासाठी आपल्याला जमीन किंवा  घर विकावं लागलं तरी चालेल.” शेतकर्‍याची पत्नी म्हणाली.
      शेतकरी हे ऐकून फार उदास झाला.  त्याने जमीन विकली तर तो खाणार काय? आणि जर घर विकलं तर तो राहणार कुठे? त्या रात्री त्याला जेवण गेलं नाही.  काही न खाता  तसाच अंथरुणावर जाऊन  पडला. पण त्याला झोप आली नाही. त्याला मुलीच्या लग्नाचा प्रश्‍न सतावत राहिला. तो तसाच  रात्रभर तळमळत राहिला.
 दुसर्‍यादिवशी शेतकरी घराबाहेर पडणार तोच पत्नी म्हणाली,” काय हो? मी रात्री काय म्हटले ते लक्षात आहे ना? मुलीच्या लग्नाचं मनावर घ्या. त्यासाठी जमीन आणि घर विकावं लागलं तरी चालेल.”
 शेतकरी काही न बोलताच घराबाहेर पडला. पत्नीने विचार केला की,  पती तिच्या बोलण्याकडे लक्षच देत नाहीए. त्यासाठी ती उठून उंबर्‍याजवळ आली आणो ओरडून म्हणाली, “ ठीक आहे, तुमची मर्जी. पण एक लक्षात ठेवा, जो पर्यंत मुलीचा विवाह पक्का होत नाही, तोपर्यंत मी अन्न-पाणी ग्रहण करणार नाही.”
      शेतकरी यावरही काही बोलला नाही. तो पुढे  निघाला. अशा परिस्थितीत त्याला गावातला एकच माणूस मदत करू शकत होता, तो म्हणजे गावातला सावकार. परंतु, त्याला सावकाराकडे जायची इच्छा नव्हती. सावकार ज्याला कुणाला कर्ज  द्यायचा, त्याने कर्ज  चुकते केले नाही तर तो त्याच्या जमिनीवर किंवा घरावर कब्जा करायचा.
      उधार घेण्यासाठी सोन्या-चांदीची दागिने किंवा जनावरे सावकाराजवळ गहाण ठेवावी लागत असत. गावातला प्रत्येक माणूस जाणत होता की  एकदा का  एखादी वस्तू सावकाराकडे गहाण ठेवली तर ती पुन्हा कधी परत मिळत नाही.  सावकार इतका  ज्यादा व्याज लावायचा की त्यामुळे कुठलाही गाववासी  मूळधन आणि व्याज परत करण्याची उम्मीद ठेवत नसे.
      सगळे गाववासी सावकाराचा तिरस्कार करत , पण ज्यावेळेला रुपये-पैशांची गरज पडे, त्यावेळेला त्यांना सावकाराकडेच जावे लागे. दुसरा कोणीही त्यांची गरज भागवू शकत नव्हता.
 गरीब शेतकर्‍याने शेवटी निर्णय घेतला की, सावकाराकडेच जायला हवं. सावकाराच्या घरी गेला. दरवाजा ठोठावून आत गेला.
 सावकार गरीब शेतकर्‍याला पाहून हसला. मग मोठ्या आवाजात म्हणाला, “ ये ये. बस. मोठ्या काळजीत दिसतो आहेस. मी  तुझ्या कुठल्या कामाला येऊ शकतो का ते सांग?”
 “ होय, शेठजी. आता तुम्हीच आमचे आश्रयदाता.” शेतकरी हात जोडून म्हणाला.
 “ बोल, काय काम आहे? तुला तर माहीतच आहे,माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी आयुष्यभर गाववाल्यांची सेवा केली. मीदेखील त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून  चालण्याचा प्रयत्न करतो आहे.” सावकर म्हणाला.
 “ माझी मोठी मुलगी लग्नायोग्य झाली आहे, पण माझ्याकडे तिचे लग्न करण्यासाठी पैसा-अडका नाही. आज पत्नीने निक्षून सांगितलं की, जोपर्यंत मुलीचा विवाह पक्का होत नाही, तोपर्यंत अन्न-पाणी ग्रहण करणार नाही. शेठजी, अशा अडचणीच्या वेळेला तुम्हीच माझ्या उपयोगाला पडाल.” शेतकरी म्हणाला.
 सावकार हे ऐकून हसायला लागला. तो म्हणाला, “ अरे एवढंच! अरे बाबा, ही तर क्षुल्लक गोष्ट आहे. तू काही घाबरू नकोस. मी करीन तुला मदत.”
 “ शेठजी, आपले फार उपकार होतील.” शेतकरी समाधानाने म्हणाला.
 “ अरे, सांगितलं ना! मदत करीन म्हणून. मी तर गावातल्या कित्येक तरुण मुला-मुलींच्या लग्नाला मदत केली आहे. पण तुला एक काम करावं लागेल. तुला काही तरी वस्तू गहाण ठेवावी  लागेल. तुला जितके पैसे लागतील, तितके  घे. आणि मुलीचे मोठ्या  थाटामाटात  लग्न कर.” सावकार म्हणाला.
 “पण शेठजी, आपल्याला तर ठाऊक आहे, माझ्याजवळ फक्त दोन एकर जमीन.  झोपडीवजा घर  आणि एक बैलजोडी आहे. जर जमीन गहाण ठेवली तर आम्ही जगायचं कसं? आणि घर गहाण ठेवलं तर राहायचं कुठं? आणि जर बैल दिले तर शेतीवाडी कशी करणार? ’’ शेतकर्‍याने आपली अडचण सांगितली.
 “ तुला तर नियम ठाऊक आहे. रुपये घेण्याअगोदर तुला काही ना काही गहाण ठेवावं लागेल.” सावकार म्हणाला.
 सावकाराची पत्नी आत दाराआड  बसली होती. ती सगळं काही ऐकत होती. शेतकरी उत्तरादाखल काही बोलणार तोच, तिने आपल्या नवर्‍याला आत बोलावून घेतले. आणि म्हणाली, “अहो, तुम्हाला  काही  डोक्याचा वापर करता  येतो की नाही?”
 “ का? काय झालं?” सावकारने विचारलं.
 “ का काय? इकडे कान द्या. आपल्याकडे जमीन-जुमला आहे.घरदार आहे. त्याची निगा राखणं अवघड जातं आहे. आता आपल्याला काही जमीन नको की घर! आपल्याला तर असा चाकर हवा, जो पैशाशिवाय काम करू शकेल.” सावकाराची पत्नी त्याला समजावत म्हणाली.
 “ तर मग सांग. अशा चाकराचा शोध कुठं घेऊ?” सावकाराने विचारले.
 “ शोध काय घेत बसताय. तो शेतकरी आलाय ना! त्याला दोन मुलं आहेत. त्याला पैसे हवे आहेत.  त्यातल्या एका मुलाला घ्या ना ठेवून! जो पर्यंत शेतकरी व्याजासह पैसे चुकते करत नाही, तोपर्यंत त्याचा मुलगा आपल्याकडे गहाण राहील. आपल्यालाही स्वस्तात एक चाकर मिळून जाईल.” सावकाराची पत्नी म्हणाली.
      सावकार परत बैठकीच्या खोलीत येत शेतकर्‍याला म्हणाला,” आजचा दिवस तुझ्यासाठी चांगला  फायदेशीर आहे. आत बसलेल्या शेठानीला  तुझी दु:खद कहानी ऐकून रडूच कोसळलं. तिने मला आत बोलावलं.  तिचं म्हणणं असं की, आपल्याला गावातल्या प्रत्येक उपवर मुलीला आपली मुलगी मानली पाहिजे. त्यासाठी आपण  जमीन-जुमला,  झोपडी,  बैलं गहाण ठेवून घ्यायची नाहीत. त्यांना तसंच कर्ज देऊ.”
 शेतकर्‍याचा  आपल्या कानांवर विश्‍वास बसेना. तो म्हणाला,“ शेठजी, आपण तर मला मोठं जीवनदान दिलंत. मी तुम्हाला वचन देतो, आपले पैसे मी व्याजासह चुकते करीन.”
 “ अरे, हो हो. मला ठाऊक आहे. पण तरीही तुला काही ना काही तरी रुपयांच्या बदल्यात  गहाण ठेवावं लागेल.”
 शेतकर्‍याला काहीच उमजेना. तो म्हणाला, “ शेठजी, माझ्याजवळ  जमिनीच्या तुकड्याशिवाय आणि  घर - बैलजोडीशिवाय दुसरं काहीच नाही. दैवानं सोन्या-चांदीचं दर्शनही कधी करू दिलं नाही. तुम्हीच सांगा, मी आणखी काय ठेवू शकतो आपल्याजवळ?”
       “ माझ्या पत्नीने यावर एक उपाय सांगितला आहे. तू तुझ्या मोठ्या मुलाला माझ्याकडे ठेव. तो आमच्यासोबत राहील. त्याच्या खाण्या-पिण्याची आणि कपड्यालत्त्याचीही सगळी सोय करू.  राहायला जागा देऊ. तुझ्यावरचं ओझंही कमी होईल. ज्यादिवशी तू व्याजासह पैसे परत करशील, त्यादिवशी तू आपल्या मुलाला परत घेऊन जाऊ शकतोस.” सावकाराने समजावलं.
      शेतकर्‍याचं आपल्या सगळ्या मुलांवर सारखंच प्रेम होतं. त्यामुळे आपल्या मुलाला सावकाराजवळ गहाण ठेवण्याच्या विचारानं त्याचं मन हडबडून गेलं. पण त्याच्याजवळ दुसरा कुठला पर्याय नव्हता.
      गरीब शेतकरी घरी आला. त्याने आपल्या पत्नीला मुलीच्या लग्नाला पैसे मिळण्यासाठीचा पर्याय सांगितला.  त्याच्या पत्नीला गलबलून आलं. पण त्याशिवाय आणखी कोणता मार्ग नव्हताच. शेवटी ती या गोष्टीला तयार झाली.
      मग शेतकरी आपल्या मोठ्या मुलाला सोबत घेऊन सावकाराच्या घरी आला. तिथे सावकाराने रुपये देण्याअगोदर शेतकर्‍याच्या अंगठ्याचा ठसा एका कागदावर उठवून घेतला.शेतकर्‍याने मोठ्या मुलाला सावकाराकडे सोडलं आणि मुलीच्या लग्नासाठी खुपसे रुपये  घेऊन घरी आला. या पैशांच्या मदतीने त्याने योग्य अशा मुलाशी त्याच्या मुलीचा विवाह लावून दिला.
      सावकाराच्या घरी शेतकर्‍याच्या मुलाला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोठे कष्ट उपसावे लागायचे. चुलीसाठी लाकडं फोडणं, जनावरांना चारा घालणं, त्यांना बाहेर चरायला नेणं, गोठा-घर यांची साफसफाई करणं अशी सगळी कामं त्याला करावी लागायची. जेवायला सकाळी, दुपारी आणि  संध्याकाळी दोन पातळ चपात्या आणि थोडी चटणी मिळायची.
 मुलाला कपड्याची आवश्यकता असायची, त्यावेळेला सावकार त्याला आपले फाटके, जीर्ण झालेले कपडे घालायला द्यायचा.
      काही दिवसांतच मुलाची तब्येत उतरली.  मरतुकड्यासारखा दिसू लागला. त्याची हाडं दिसू लागली. अशक्तपणा आल्यानं त्याला पहिल्यासारखे कामही करता ये ईना. मग सावकार आणि त्याची पत्नी त्याला आळशी म्हणून हिणवत आणि मारझोड करीत.
 गरीब शेतकरी आणि त्याची पत्नी आपल्या मुलाची ही अवस्था पाहून दु:खी राहू लागले. ते सावकाराला विनंती करायचे, “मुलावर दया करा. त्याला इतके मारू नका.”
 “ तो आळशी आहे. कुठलं काम वेळेवर करत नाही. मग त्याला शिक्षा तर मिळणारच.” सावकार म्हणायचा.
 “ नाही नाही शेठजी, तो चांगला मुलगा आहे. मेहनती आहे. तो फार अशक्त झाला आहे. त्याला थोडं अधिक जेवण द्या. त्याची तब्येत सुधारेल. मग तो चांगली मेहनत करेल.” शेतकरी म्हणायचा.
 सावकार ओरडून म्हणायचा, “ तू मला काय समजतोस? मूर्ख? मी मुलाची किंमत तुला आदीच चुकती केली आहे. आणि तो जितकं खातो, तितकं कामदेखील करत नाही. मग त्याला का देऊ जादा अन्न?’’
 “पण शेठजी, आपल्या घरचं शिळंपाकं खाऊनही मुलगा ठणठणीत होता. मग आता...? ” शेतकरी फिरून म्हणायचा.
 “ तुला जर  त्याची इतकीच फिकीर असेल तर माझे पैसे टाक आणि घेऊन जा तुझ्या पोराला. तोपर्यंत माझ्याशी बोलूदेखीलनकोस. समजलास?” एक लक्षात ठेव, तू मुलगा देताना कागदावर अंगठा उठवला आहेस.” सावकार अर्थपूर्ण ढंगात म्हणायचा.
 हे ऐकून गरीब शेतकरी गप्प मान खाली घालून निघून यायचा. या निर्दयी माणसाच्या हातून मुलाची सुटका कशी करायची आणि त्यासाठी इतके पैसे कोठून आणायचे, असा प्रश्‍न त्याला पडायचा.
 एक दिवस शेतकर्‍याच्या मुलाच्या सहनशक्तीचा अंत झाला. तो सावकाराच्या घरातून पळाला ते तो थेट राजाच्या दरबारात पोहचला.  राजासमोर उभा राहिला आणि आपली दु:खद कहानी राजाला ऐकवू लागला.
 राजा फार दयाळू आणि बुद्धिमान होता. मुलाची सगळी कहानी ऐकल्यावर त्याने सिपायांकरवी सावकाराला दरबारात बोलावून घेतले.
 सावकार दरबारात हजर झाला आणि म्हणाला, “ महाराज, या मुलाने आपल्याला अर्धवट कहानी सांगितली आहे.याच्या वडिलाने व्याजाने घेतलेल्या रुपयांच्या बदल्यात याला माझ्याकडे गहाण ठेवले आहे. कायद्यानुसार जोपर्यंत माझे पैसे चुकते होत नाहीत, तोपर्यंत या मुलाला माझ्याकडे ठेवण्याचा मला अधिकार आहे.”
 सावकाराने शेतकर्‍याच्या अङठ्याचा ठसा असलेला तो कागद राजाला दाखवला. राजाने तो कागद वाचला आणि म्हणाला,       “ बरोबर शेठजी,तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण कागदावर लिहिलं आहे की, तुम्ही मुला खाण्यासाठी अन्न देणार. तुम्ही त्याला अन्न देत होतात का?”
 “ हो, महाराज!” सावकार म्हणाला.
 “ तुम्ही रोज मुलाला किती भोजन देत होतात?’’ राजाने विचारलं.
 “ दोन-दोन चपत्या आणि चटणी. सकाळी, दुपारी आणि रात्री, तीन वेळ.” सावकाराने उत्तर दिलं.
 सावकाराकडे पाहात राजा हसला आणि म्हणाला, “ मस्तच! आजपासून तुम्ही माझे अतिथी आहात.”
      सावकाराला वाटलं की राजा त्याच्यावर खूश आहे. त्याला  महालातल्या अतिथीगृाहाच्या एका खोलीत  राहायला दिलं. तिथे तो राहू लागला. राजाने शेतकर्‍याच्या मुलालाही आपला अतिथी बनवलं.
      शेतकर्‍याच्या मुलाला रोज स्वादिष्ट आणि पौष्टिक भोजन मिळत होतं. पण सावकाराला रोज सकाळी दुपारी आणि रात्री तिन्ही वेळेला दोन दोन चपाती आणि थोडी चटणी मिळत होती.
      काही दिवसांतच शेतकर्‍याच्या मुलाची तब्येत सुधारली. तो पहिल्यासारखा धष्टपुष्ट बनला. मेहनतीला तयार झाला. पण इकडे सावकाराची तब्येत उतरली. तो हडकुळा दिसू लागला. त्याचे कपडे त्याला ढिले पडू लागले. एक दिवस तो इतका अशक्त बनला की, त्याला चालता- बोलताही येईना.
       ज्यावेळेला सावकार हे सगळे सहन करू शकेना, त्यावेळेला  त्याने राजाचे जाऊन पाय धरले आणि म्हणाला, “ महाराज! मला क्षमा करा. आता मला कळलंय की मी किती चुकीने आणि निर्दयीपणे वागत होतो ते. जर आपण मला क्षमा केलीत तर मी सगळे अंगठे उठवलेले कागद जाळून टाकीन. ज्यांनी माझ्याकडून रुपये घेतले आहेत, ते सगळे लोक स्वतंत्र होतील.”
      बुद्धिमान राजाने सावकाराला माफ केलं. सावकाराने व्याजाने रुपये देताना गरीब लोकांचे अंगठे उठवून घेतले होते, ते सगळे कागद आणले आणि ते सगळे कागद राजा व मंत्र्यांसमक्ष जाळून टाकले.
 सगळे कागद जळाल्यावर राजा म्हणाला,“ यामुळे फक्त एका गावाचा प्रश्‍न सुटला आहे. अशी अजून किती तरी गावं  असतील...”
 “ होय महाराज!” मंत्री म्हणाले.
 “ आणि शेतकर्‍याच्या मुलाला जो त्रास झाला , त्याला कारण आहे हुंडा. या मुलाच्या बहिणीच्या  लग्नात हुंडा द्यावा लागला, म्हणून याला सावकाराकडे चाकरी करावी लागली. बरोबर ना?” राजानं विचारलं.
 “ आपण म्हणता ते बरोबर आहे, महाराज. “ तिथे उपस्थित असलेले सगळ्यांनी सहमती दर्शवली.
 “तर मग ठीक आहे. आजपासून जोकोणी  हुंडा घेईल, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली जाईल.” राजाने घोषणा केली.
 “ ... मंत्रीमहोदय, तशी दवंडी राज्यभर  पिटवा.”
       शेतकर्‍याचा मुलगा आपल्या आईवडिलांकडे परतला. सोबत त्याला राजाने पुष्कळ भेटवस्तू दिल्या. गावातले सगळे लोक सावकाराच्या तावडीतून सुटका झाल्याने आनंदी होते.सावकारालादेखील समजून चुकलं की, सगळ्यांशी व्यवहारानं वागलं पाहिजे. आणि आता राज्यातल्या कुठल्याही गावात कोणत्याही  बापाला मुलीच्या लग्नात हुंडा द्यावा लागत नाही. (बुंदेली लोकथेवर आधारित)

Tuesday, October 8, 2013

बालकथा समजुतदारीचे फळ



      चंदनवनात खूप सारे पशू-पक्षी राहात. त्यात पिंकू हरीणदेखील होती. ती आपल्या कळपासोबत रोज तलावातले पाणी प्यायला जायची. तलावाजवळच एक आंब्याचं झाड होतं. त्या झाडाच्या एका डोलीत चिकर्या पोपट राहायचा. हळूहळू पिंकू आणि चिकर्यामध्ये मैत्री जमली. दोघे बराच वेळ गप्पा मारत बसायचे. एके दिवशी लांडगा भक्ष्याच्या शोधात तलावाकडे आला. तिथे त्याने हरणांचा कळप पाहिला. तो हळूच आंब्याच्या झाडामागे गेला आणि हरणांना न्याहाळू लागला.
      आता तो रोज तलावाकडे येऊ लागला आणि आंब्याच्या झाडामागे लपून हरणांना न्याहाळत राहिला. तो शिकारीसाठी योग्य संधीची वाट पाहू लागला. चिकर्या लांडग्याला रोज पाहात होता. त्याचे त्याला चलन-वलन काही चांगले वाटले नाही. त्याने ही गोष्ट पिंकू हरिणीच्या कानावर घातली. तिने ती आपल्या कळपातल्या बुजुर्ग मंडळींना सांगितली. मग सगळ्यांनी मिळून एक योजना आखली.
      दुसर्यादिवशी लांडगा आल्यावर आंब्याच्या झाडावर बसलेल्या चिकर्या पोपटाने टिर्रऽऽऽ...टिर्रऽऽऽ असा विचित्र आवाज काढून हरणांच्या कळपाला सावध केलं. पिंकू आणि तिचा कळप गप्पा मारत मारत आंब्याच्या झाडाजवळ आला. तिथे आल्यावर पिंकू कळपातल्या एका वडिलधारी हरणाला म्हणाली, “ आजोबा, आपल्या इथे फार वेळ थांबून चालणार नाही. इथे पाणी प्यायला कुणी हिंस्त्र श्वापद आलं तर आपली काही धडगत राहणार नाही. त्यापेक्षा आपण इथून पटकन निघून गेलेलं बरं.”
      तो बुजुर्ग हरीण म्हणाला, “  पिंकू, घाबरू नकोस. इथे आपली शिकार कोणतंही जनावर करणार नाही. ”
      पिंकूनं विचारलं,“ का बरं?”
      बुजुर्ग हरीण म्हणाले, “   खूप वर्षांपूर्वी वनराज सिंह आणि माझ्यात  एक सौदा झाला होतामी त्यांना सांगितलं होतं की, आम्ही पाणी प्यायला आलो की, तलावाजवळ काही वेळ आराम करू. वनराजांनी ते कबूल केलं होतं आणि यावेळी कोणी आमची  शिकार  करेल तर वनराज त्याची शिकार करतील. ”
      “ पण आजोबा, तुम्ही राजाला त्याची शिकार करायला कधी सांगता? ” पिंकू म्हणाली.
      “ या बाबतीत आपल्याला चिकर्या पोपट मदत करतो. सिंहदेखील इथेच कुठे तरी असेल. शिकारी प्राणी आला की, चिकर्या पोपट ओरडतो. मग सिंह धावत येऊन त्याची शिकार करतो. ”
      इतक्यात चिकर्या पोपटाने टिर्रऽऽऽ... टिर्रऽऽऽ असे ओरडायला सुरुवात केली. बुजुर्ग हरीण म्हणाले, “ चला, सगळे कळपात  या. शिकारी आपल्या आजूबाजूलाच आहे. ”

      हे  ऐकून लांडगा आपल्या जीव वाचवण्यासाठी हळूच मागच्या मागे सटकला आणि जंगलात धूम पळाला. त्यानंतर मात्र तो कधीच तिकडे फिरकला नाही.                                                          - मच्छिंद्र ऐनापुरे, जत (जि.सांगली)