Sunday, April 29, 2012

कविता

सारखेपणा...!
गावही आता
शहरी वाटू लागलीत
जशी विमान प्रवासात
चांगली वाईट माणसं
शेजारी शेजारी बसतात...
मतदान केंद्रावरचा सारखेपणा
आता सर्वत्र दिसू लागलाय
दिवसेंदिवस वैशिष्ट्यहीन
होत चाललेली माणसम
सामान्यत्व आणि
विशेषत्व
विसरत चाललीत
समतेचे वारे जरूर वहावे
पण, व्यक्तिवैशिष्टाचा अस्त न व्हावा
वारीतून भक्त बाजूला पडू नये

बालकविता

   महावृक्ष
भोवतालचे कवच त्याने ताडकन फोडले,
मातीतुनी वर येऊनी कोंब मोठ्याने हसू लागले.
       इवल्याशा डोळ्यांनी त्याने आभाळाकडे पाहिले,
       दूधाचा ग्लास प्यावा तसा रानवारा पिऊ लागले
पालटू लगल्या कायेला पानरुपी हात मिळाले,
दोन्ही हातांनी त्याने सूर्याला वंदन केले
       हिरवा अंगरखा लेवून ते मोठे होऊ लागले,
       वनदेवतेला त्याने मानवसेवेचे व्रत दिले
थकलेल्याला सावली, भुकेल्याला फळे द्यायचे,
मनी स्वप्न बाळगले महावृक्ष व्हायचे
                                   - मच्छिंद्र ऐनापुरे, जत

बालकविता

                                                      खोटी स्तुती
                  गरुड आणि घुबडाची
                  भाडणं संपली
                  मित्रत्वाने वागण्याची
                  शपथ त्यांनी घेतली
 एकमेकांच्या पिलांची
काळजी घ्यायची
नजर  ठेवायची
नाही शिकार्‍याची
                  घुबड म्हणाले, गड्या
                  माझी पिलं छान
                  देशील ना मग
                  मित्रत्वाला मान
एके दिवशी
पिलं सापडली
गरुडाला मग
खुशी झाली
                       पिले होती
                       कुरूप घाणेरडी
                       विचार आला
                       नसावी ती घुबडाची
गरुडाने मग ती
गट्टम केली
घुबडाला खोट्टीस्तुती
अंगलट आली
                                                
       सापळा
जंगलचा राजा सिंह
मरण पावला
आता राजा कोण?
प्राण्यांना प्रश्न पडला
                                  राजा निवडीची
                                  सभा झाली
                                 वानराने पशूंस रिजवून
                                  राजगादी मिळवली
कोल्होबाला गोष्ट ही
भलतीच खटकली
वानराची खोड मोडण्याची
डाळ त्याने शिजवली
                                  एकदा कोल्होबाच्या
                                  सापळा दृष्टीस पडला
                                  'तिथे खूप खोबरे आहेत'
                                  वानराकडे जाऊन म्हणाल
 ऐकून वानराच्या तोंडाला
सुटले हो पाणी
दोघेही धावले
तिकडे लगोलगी
                                      कोल्होबाने सापळ्यातले
                                     खोबरे दाखवले
                                     वानराने हात घालताच
                                     कोल्ह्याने चाप खेचले

इच्छा झाली पुरी!
आईचा डोळा चुकवून
एकदा चांदोबा उतरला खाली
पृथ्वीवरच्या गमती-जमती पाहून
त्याची मती झाली खुळी
                                       रंगी-बेरंगी भिंगर्‍या पाहून
                                       एक भिंगरी त्याने खेचली
                                        दगड घेऊन पाठी लागलेल्या
                                       भिंगरीवाल्याने पाठ शेकवली
कण्हत चांदोबा नुसताच भटकला
भुकेच्या व्याकुळीने भेळगाडीशी थांबला
भेळपुरी पोटभर चरली,
पण पैशाअभावी पुन्हा पाठ शेकली
                                             खजिल चांदोबा रस्त्यावर आला
                                             गाड्यांच्या दुराने बेजार झाला
                                             रडकुंडीला येऊन चांदोबा
                                             आकाशात आईकडे पाहू लागला
चांदोबा सुटला आईकडे
म्हणाला, नको या गमती-जमती
आपण आहोत तिथे बरे
फिरण्याची हौस बाबा फिटली

रावणाची मंदिरे

     अन्य देवतांप्रमाणे रावणसुद्धा पूजनीय दैवत आहे.वाचून आश्चर्य वाटले असेल ना? परंतु रावणालासुद्धा देवता मानणार्याची संख्या कमी नाही.काही भक्तांना रामायणसारख्या महाकव्यातील रावण खलनायक वाटत नाही. उलट रावण त्यांना अराध्य दैवत वाटते.
     मध्यप्रदेशात एक गाव आहे.त्याचं नाव आहे,रावणगाव! विदिशा जिल्ह्यातील या छोट्याशा गावात दसर्याच्या दिवसातील भाविकांचा उदंड प्रतिसाद पाहिला कि आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. इथे रामायणातील रावण खलनायक नाही. तो भक्तांचा देवता आहे. ते श्रध्देने रावणाला बाबा म्हणतात.भाविक 'रावण बाबा नमः' चा जप करत त्याची पूजाअर्चा करतात. रावणराज या नावाने बनलेल्या येथील मंदिरात आपल्याला पहुडलेल्या स्थीतीतील रावणाची एक ऐतिहासिक मूर्ती दृष्टीस पडते.स्वतःला रावणाचे वंशज समणारे येथील कान्यकुब्ज ब्राम्हण यांचं म्हणणं असं कि, रावण अतिप्रचंड असा विद्वान होता.त्याच्यामध्ये असे काही विलक्षण गुण होते कि ते अनेकांना प्रेरणादयी होते. त्यामुळेच त्याची प्रतिकृती बनवून ती जाळणे योग्य नाही. या भावनेतूनच येथील भक्त खीर प्रसाद बनवून त्याच्या प्रतिमेला अर्पण करतात.
     रावणगावाशिवाय अशी आणखी काही ठिकाणं आहेत कि जिथे रावणाची मंदिरं आहेत. आणि तिथे त्याची मोठ्या श्रध्देने पूजा करतात. नेपाळ्,इंडोनेशिया,थायलंड्,कंबोडिया आणि श्रीलंकेतील लेखकांनी आपल्या रामायणात लिहिलं आहे कि रावण राक्षस्त्वाचा अतिरेक असला तरी त्याच्या चांगल्या गुणांकडे दुर्लक्ष करता येत नाही.रावणाची आई कैकसी राक्षसमुलगी होती. त्यामुळे तिच्या मुलात राक्षस गुण येणं स्वाभविक आहे.परंतु रूषीपुत्र असल्यामुळे त्याच्यात कुबेर गुण येणंही साहजिक आहे.त्यामुळे त्याला मूल्यसंस्कारसुध्दा आपोआप मिळाले.तो वडिलांप्रमाणेच भगवान शंकराचा परमभक्त होता.विद्वान, महातेजस्वी, पराक्रमी आणि रूपवंत होता.वाल्मिकी यांनीही त्याला चारी वेदांचा अभ्यासक मानले आहे.त्यांनी असंही लिहिलं आहे कि, 'अहो रूप्महो धैर्यमहोत्सव्महो द्युति:| अहो राक्षसराजस्य सर्वलक्षणयुक्तता ||' अर्थात रावणाला पाहून रावण मंत्रमुग्ध झाला होता.रूप-सैंदर्य,धैर्य्,कांती अशा सर्व लक्षणांनीयुक्त आहे.म्हणूनच काही लोकांना रावणाच्या गुणांचा गैरव केला पहिजे, त्याचे पूजन केले पाहिजे असे वाटते.त्याचा पुतळा जाळणे बरोबर नाही. यामुळेच त्याची पूजा करण्याच्या उद्देशाने काही ठिकाणी रावणाची मंदिरे उभारली गेली आहेत.
     मध्यप्रदेशातीलच मंदसोर जिल्ह्यातल्या रावणरुंडीमध्येसुद्धा पस्तीस फुटाच्या दहातोंडी रावणाच्या भव्य मूर्तीची २००५ साली प्रतिष्ठापना केली होती.दरवर्षी दसर्याच्यादिवशी त्याची मनोभावे पूजा येथील नामदेव वैष्णव समाज करतो.त्यांच्याम्हणण्यानुसार रावणाची पत्नी मंदोदरी इथलीच होती. या भावनेतून ते रावणाला आपला जावई मानतात्.या  समाजातील स्त्रिया मंदिर परिसरात चेहर्यावर पदर ओढून वावरतात्.राजस्थानातील जोधपूर मध्येही रावणाचे मंदिर आहे.येथे देव ब्राम्हणांची संख्या मोठी आहे. ते स्वतःला महर्षी मुद्गल समाजाचे मानतात्.महर्षी मुद्गल रावणाचे आजोबा महर्षी पुलस्त्य यांचे नातेवाईक होते. त्यामुळे त्यांची रावणावर मोठी भक्ती आहे. त्यांनीच इथे रावणाचे मंदिर बांधले आहे.असं म्हणतात कि,रावणाची पत्नी मंदोदरी मंडोर्ची होती. मंडोर जोधपूरची प्राचीन राजधानी होती.इथे एक मंडप आहे.याच मंडपात रावणाचा मंदोदरीचा विवाह झाला होता.त्याला रावणाची चंवरी म्हणून ओळखले जाते.जोधपूरच्या चांद्पोल येथील महादेव अमरनाथ आणि नवग्रह मंदिर परिसरात रावणाची मूर्ती आहे.

Tuesday, April 24, 2012

हास्यकथा मध्यान्ह भोजनाचे तीन तेरा


     दुष्काळग्रस्त भागातल्या शाळांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीतसुद्धा मध्यान्ह भोजन शिजवून दिला जावा, असा आदेश शासनाने दिला होता. दुष्काळी भागातील लोकांच्या सोयीसाठी अनेक योजना राबविण्यात येत होत्या. जनावरांना मोफत चारा पुरवणं, पिण्याच्या पाण्याची टँकरने पुरवठा करणं  यांसह अनेक योजना होत्या. शाळांमध्ये रोज देण्यात येणारा शालेय पोषण आहार आता सुट्टीतही दिला जाणार होता. जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभाग याची काटेकोर अंमलबजावणी करणार होती. निगराणीसाठी केंद्रप्रमुख, विस्तार अधिकार्‍यांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या.
     वास्तविक शाळांना सुट्ट्या पडल्या होत्या. पण शासनाचा आदेश असल्यानं शिक्षकांनी आपला सुट्टीचा बेत रद्द करून शाळांचा रस्ता धरला होता. तर काही शाळांनी शिक्षकांची रोज एकाची पाळी लावलेली होती. मध्यान्ह भोजन शिजवण्याची सक्ती पाहता सगळेच सतर्क होते. निरीक्षक मंडळी कधी फिल्डवर जाऊन तर कधी मोबाईलवरून रोजचा रिपोर्ट घेत होते. तो वरती पाठवला जात होता.
     एक विस्तार अधिकारी धरपकडवाडीच्या प्राथमिक शिक्षकाला मोबाईल लावून परिस्थितीची माहिती घेत होते. आपल्या विस्तार अधिकार्‍याचा नंबर पाहून शिक्षकाने कॉल रिसीव केला.
शिक्षकः हाँ साहेब, नमस्कार!
विस्ताराधिकारी: नमस्कार. नमस्कार! कोठे आहात?
शिक्षकः सर, शाळेत.
विस्ताराधिकारी: काय करताय?
शिक्षकः साहेब, मुलांसाठी मध्यान्ह भोजन बनवतोय.
विस्ताराधिकारी: छान.. छान.. इतक्या कडक उन्हातसुद्धा आपण शासनाच्या उद्देशासाठी झटता आहात. मानलं पाहिजे तुम्हाला!
शिक्षक :(कौतुक ऐकून) साहेब, आपण तर पहिल्यापासूनच झटतो. कुणी आपल्याला नाव ठेवणार नाही, असं आपलं काम असतं साहेब! आपलं रेकॉर्ड चांगलं आहे साहेब. तुम्ही आता नवीन आला आहात. पण आपण  आपला  मोठेपणा सांगत नाही  साहेब ! आपण करतो ते 'दिल से' साहेब!
विस्ताराधिकारी: छान.. छान..! मनाला खूप बरं वाटलं. आपल्यासारख्या मूठभर शिक्षकांमुळेच तर शिक्षण विभाग टिकून आहे. नाही तर....
शिक्षकः साहेब, माझ्याबाबतीत तर आपण निश्चिंत राहा.
विस्ताराधिकारी: बरं, मुलं आलीयत का नाहीत?
शिक्षकः काय बोलताय साहेब ! ४२ पैकी २७ विद्यार्थी हजर आहेत साहेब.
विस्ताराधिकारी: किती वेळ झाला, मुलं येऊन?
शिक्षकः झाले साहेब, पंधरा-वीस मिनिटं!
विस्ताराधिकारी: छान... छान.. बचत गटानंच शिजवलाय ना?
शिक्षकः होय साहेब, मटकीच्या मोडीची आमटी आणि भात बनवलाय. कोथींबीर-टोमॅटो सगळं सगळं टाकलंय, साहेब!
विस्ताराधिकारी: छान.. छान.. पण मला मुलांचा आवाज येत नाही?
शिक्षकः साहेब, भुकेचं टाईम आहे ना! गपगार खाताहेत साहेब. दोन मुलं वाढतायत साहेब. हा बघा भांड्याचा आवाज. हे बघा साहेब, आणखी दोन मुलं आली साहेब... साहेब, आकडा आता उपस्थितीचा आकडा  २९ करा. ( मुलांना उद्देशून) चला रे, बसून घ्या पटकन... ये वाढ रे त्यांना ...!
विस्ताराधिकारी:  गुरुजी, ही दोन मुलं आली कोठून?
शिक्षकः यांच्या घरातून! दोघे बहीण-भाऊ आहेत, साहेब.
विस्ताराधिकारी: होय, घरातून आले आहेत, पण शाळेत ही दोन मुलं आणि बाकीची सगळी मुलं आली कोठून?
शिक्षकः साहेब, दरवाज्यातूनच आली. आणखी कोठून येणार साहेब!
विस्ताराधिकारी: किती दरवाजे आहेत, तुमच्या शाळेत यायला?
शिक्षकः एकच तर चॅनल गेट आहे, साहेब. आपल्याला तर माहितच आहे सर!
विस्ताराधिकारी: पण गुरुजी, त्या गेटला तर बाहेरून कुलूप आहे आणि गेल्या अर्ध्या तासापासून तुमच्या शाळेसमोर उभा आहे.

pudhari, bahaar 20/5/2012

लोककथा सहनशीलता


     फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नेपाळमधल्या एका गावात रामधन नावाचा एक गरीब मजूर राहत होता. त्याच्याजवळ एक गाय होती. गरिबीमुळे वैतागून गेलेल्या रामधनला त्याची बायको नेहमी धीर द्यायची. म्हणायची, 'काळजी करू नका. एक ना एक दिवस, चांगले दिवस येतील.'  एक दिवस त्याच्या गायीने एका वासराला जन्म दिला. आता रामधनने गाय विकण्याचा विचार केला. त्यानुसार एक दिवस तो गाय विकायला निघाला. वाटेत त्याला घोडेस्वार भेटला. रामधनने त्याला गाय विकत घेण्याची विनंती केली. " गाय घ्यायला माझ्याकडे पैसे नाहीत, पण घोड्याच्या बदल्यात गाय घ्यायला तयार आहे." घोडेस्वार म्हणाला. रामधनने विचार केला, ' घोडा रोज जंगलातून लाकडे आणण्याकामी उपयोगाला येईल. त्याच्याने थोडा का होईना पण भाकरीचा प्रश्न मिटेल.' त्याने गायीच्या मोबदल्यात घोडा विकत घेतला व घरी जायला निघाला.
     वाटेत त्याला एक धनगर भेटला. रामधनला घोड्यापेक्षा बकरीत लाभ दिसला. त्याने धनगराशी सौदा केला आणि एक बकरी खरेदी करून पुढे निघाला. पुढे वाटेत त्याला कोंबड्या घेऊन चाललेला माणूस दिसला. त्याला बकरीपेक्षा कोंबड्यांमध्ये फायदा असल्याचे वाटू लागले. अंडी, कोंबड्याच्या पिलांमुळे आपले दिवस पालटतील, असे त्याला वाटले. त्याने बकरी देऊन कोंबड्या विकत घेतल्या. काही अंतर चालून गेल्यावर रामधनला भुकेची जाणीव झाली. आणखी चार पावले पुढे गेल्यावर त्याला एक ढाबा दिसला. तो ढाबेवाल्याला म्हणाला," मला जेवायला दे. त्या बदल्यात या कोंबड्या ठेव कारण, माझ्याजवळ पैसे नाहीत."
     ढाबेवाला म्हणाला," अरे, तू रिकामा घरी गेलास तर तुझी बायको नाराज होईल. " यावर रामधन खात्रीपूर्वक म्हणाला," माझी बायको अडाणी असली तरी मोठी समजूतदार आहे. ती   अजिबात नाराज होणार नाही."  ढाबेवाला त्याला म्हणाला," मी तुला जेवायला देईन, पण माझी एक अट आहे. जर तुझी बायको नाराज झाली नाही तर मी तुला गाय, घोडा, बकरी आणि कोंबड्यांएवढी होणारी किंमत  देईन. नाही तर तुला आयुष्यभर माझ्या ढाब्यावर काम करावं लागेल."
     रामधनला प्रचंड भूक लागली होती. त्याने चटकन ढाबेवाल्याची अट मान्य केली. रात्री रामधन घरी परतला. ढाबेवाला दाराआड लपून दोघा नवरा- बायकोमधला संवाद  ऐकत होता. रामधनने दिवसभराच्या सगळ्या घडामोडी आपल्या बायकोला सांगितल्या. त्यावर बायको म्हणाली," काही हरकत नाही. तुम्हाला पोटभरून जेवण मिळालं, यातच मला आनंद आहे. तुम्ही माघारी आलात हे काय कमी आहे? आपण खूप काबाडकष्ट करू. कोंबड्यासुद्धा पाळू, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका."
     रामधनच्या बायकोची सहनशीलता पाहून ढाबेवाल्याला गदगदून  आलं. दिलेल्या शब्दानुसार हार मानून त्याने रामधनला गाय, घोडा, बकरी व कोंबड्यांची होणारी सर्व किंमत त्याच्या हातात ठेवली. शिवाय त्याला ढाब्यावर रोज कामालाही यायला सांगितले. रामधन सकाळी उठून बाहेर आला, तेव्हा दारात त्याची गाय बांधलेली दिसली.

विवाह नोंदणी सक्तीचीच हवी

विवाह नोंदणी बंधनकारक केल्याने वैवाहिक वादात अत्याचार, फसवणूक  झालेल्या अथवा यापुढच्या काळात होऊ शकणार्‍या महिलांसाठी हा कायदा दिलासा देणारा ठरणारा आहे. अलीकडच्या काळात महिलांच्या बाजूने अनेक कायदे होत असून यामुळे महिला सर्वच दृष्टीने सुरक्षित होत आहेत, असेच म्हणायला हवे. आणि ही बाब भारतासारख्या पुरोगामी राष्ट्रासाठी भूषणावह आहे. वास्तविक, विवाह नोंदणी बंधनकारक करण्याची ही मागणी तशी फार जुनी आहे. राष्ट्रीय महिला आयोगसुद्धा याबाबतीत आघाडीवर होते. शिवाय 2006 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात विवाह नोंदणी कायदा करण्याचे निर्देश दिले होते. आता तसा कायदाच अस्तित्वात आल्याने या कायद्याने विवाह नोदणी न करणार्‍यांना तुरुंगाची हवा खावी लागणार आहेच , पण महत्त्वाचे म्हणजे  यामुळे महिला अधिक सुरक्षित होतील व बेकायदा दुसरे लग्न करणार्‍यांना  चांगलाच चाप बसेल.  महिलांना फसवून अनेक विवाह करणारे महाभाग आपल्या देशात आहेत. अशा लोकांकडून मुलीकडील लोकांची होणारी फसवूक, त्यांना  अंधारात ठेवून अनेक घरोबे करणार्‍या लबाडांवर अंकुश आता अंकुश बसणार आहे. पती किंवा सासरकडून धुडकावले गेल्यास अथवा संपत्तिक प्रकरणात टाळले जात असल्यास महिलांना विवाहाचा पुरावा सहजगत्या मिळून तिला तिचा हक्क मिळण्यास आता कुठलीच अडचण राहणार नाही.   भावनिक, मानसिक आणि  आर्थिक होणारी पिळवणूक टाळता येईल. शिवाय या नोंदणीमुळे विवाहित महिलांना सासरी राहण्याचा हक्क मिळवण्यास सोपे जाणार आहे. आजकाल कुठलीही गोष्ट न्यायालयात नेऊन रेंगाळत ठेवण्याचा हुकमी एक्का वापरला जात आहे. या विवाह नोंदणीमुळे न्यायालयाची पायरी चढण्याचा उद्योग कमी होईल.  आणि महत्त्वाचे म्हणजे शाळा, गाव-कामगार, तलाठी यांनी आपली जबाबदारी आणि भूमिका चोख बजावली तर बालविवाहाची मोठी समस्या सुटू शकेल. विवाहित महिलांना मानसिक ताकद देणारा हा निर्णय स्वागतार्ह आहे.

- मच्छिंद्र ऐनापुरे, जत (सांगली)

दै. पुण्यनगरी , लोकजागर दि. २४/४/२०१२

Sunday, April 22, 2012

बालकथा शेरास सव्वाशेर


     एक वृद्ध रेल्वेतून प्रवास करीत होते. ते आरामात लवंडलेले होते. एका स्टेशनवर गाडी थांबली, तशी काही शाळकरी मुलं दंगा-मस्ती करत त्या डब्यात घुसली. त्यातला एकजण आपल्या साथीदाराला म्हणाला," आज साखळी ओढून पाहू. खूप मजा येईल."
     दुसरा म्हणाला," अरे पण, विनाकारण साखळी ओढली ना तर तीनशे रुपयांचा दंड भरावा लागेल. तो कोठून भरणार?"
     तिसरा म्हणाला," चला, सगळ्यांनी फटाफट खिशात हात घाला आणि लागतील तेवढे पैसे वर काढा आनि याच्याजवळ ठेवायला द्या." सगळ्यांनी पैसे गोळा केले आणि एका जोदीदाराच्या खिशात ठेवून दिले.
    थोड्या वेळाने त्यातला एकजण हळूच म्हणाला," हे फ्रेंडस, एक आयडिया आहे. आपले पैसेही वाचतील आणि चेन ओढण्याची मजाही लुटता येईल."
एकजण अतुरतेने म्हणाला," अरे यार, लवकर सांग ना मग! वेळ का दवडतोयस?''
     त्याने आपल्या जोडीदारांना जवळ बोलावले आणि हळूच कानात म्हणाला," तो बघा, तो बसलाय ना म्हातारा...त्याचे नाव सांगू टिशीला, चेन त्याने ओढलीय म्हणून..! खूप गंमत येईल. म्हातारा फसेल. तो कितीही रडला, ओरडला तरी आपण आहोत ना! सगळ्यांनी त्याचे नाव सांगू.! टिशी त्यालाच पकडून नेईल."
     त्यांनी आपला खोडकरपणा चालू केला आणि खेचली चेन! गाडी थांबली. टिशी आणि पोलिस संबंधित डब्याच्या दिशेने धावले. मुलेही डब्याच्या दारात येऊन जोरजोराने ओरडून हाका मारू लागले. टिशी आणि पोलिस त्यांच्याजवळ आले.
" या सर या, आम्ही सांगतो चेन कोणी खेचली ती?"
    टिशी आणि पोलिस ड्ब्यात शिरले. त्या खोडकर मुलांनी हाताच्या इशार्‍याने त्या वृद्ध माणसाला अपराधी ठरवले. टिशी संतापाने वृद्ध माणसावर उखडला. लाज नाही वाटत, चेन ओढायला. काय! गंमत वाटली की काय तुला. तीनशे रुपये दंड भरावा लागतो माहित आहे ना!.."
     वृद्ध म्हणाला," साहेब, ही मुलं म्हणतात ते खरं आहे. मीच चेन ओढली. पण काय करणार साहेब? या सगळ्यांनी मिळून लुटलं मला , साहेब! माझ्याजवळ तीनशेच रुपये होते साहेब. ते या सगळ्यांनी जबरदस्तीने लुटलं. त्यामुळे नाईलाजास्तव चेन खेचावी लागली. बघा साहेब, त्या निळ्या शर्टाच्या पोराच्या खिशात बघा, त्याने त्याच्या खिशात तीनशे रुपये ठेवले आहेत."
पोलिस हवालदाराने निळ्या शर्टाच्या मुलाचे खिसे तपासले. त्यात बरोबर तीनशे रुपये सापडले. वृद्ध माणसाला पैसे देऊन टिशीने त्यांची क्षमा मागितली आणि पोलिसाने मुलांना पकडून घेऊन गेला.
     वृद्ध आपल्या पांढर्‍या दाढीवरून हात फिरवत ओठातल्या ओठात हसत म्हणाला, लेकरानों, ही दाढी उगाच उन्हात पांढरी झाली नाही.
     आता त्या मुलांना पश्चाताप वाटू लागला. ते विचार करत होते,'आपण तर त्या म्हातार्‍याची गंमत करायला निघालो होतो, पण त्यानेच आम्हाला गाढव बनवले.म्हातारा मोठा उस्ताद निघाला, त्याने आमचीच विकेट घेतली.'      

बालकथा हलगर्जीपणा ... छू मंतर!

     सौंदर्या सातवी इयत्तेत शिकत होती. तिची वार्षिक परीक्षा जवळ आली होती. तिला भलतेच टेन्शन आले होते. ती दिवस-रात्र अभ्यासात गढून गेली होती. तिचे मम्मी-पप्पासुद्धा तिची काळजी घेत होते.
     सौदर्या नावाप्रमाणे जशी सुंदर होती, तशीच मोठी कष्टाळूही होती. तिची हुशार मुलांमध्ये गणना होत असे. तिचा वर्गात कधीही पहिला नंबर आला नसला तरी ती हमखास तिसर्‍या - चौथ्या क्रमांकावर असायची. मार्कांमध्येही फारसा फरक नसायचा. तिची मम्मी नेहमी तिला एक शिकवण द्यायची ," अभ्यासात आपण कुठल्या क्रमांकावर आहोत, याला अजिबात महत्त्व  नाही. महत्त्व आहे, ते आपण काय  शिकलो आणि किती समजलं याला! त्यावरच आपलं भविष्य अवलंबून आहे." पापांचंही म्हणणं, यापेक्षा वेगळं नव्हतं. मात्र सौंदर्याला या खेपेला वार्षिक परीक्षेत काही औरच करून दाखवायचं होतं. शेवटी असं काय होतं ते?
      झालं होतं असं की, पहिल्या टर्ममध्ये सौंदर्याने नेहमीप्रमाणे जीवतोड मेहनत केली होती. परीक्षा हॉलमध्ये ती मोठ्या तन्मयतेने पेपर सोडवत होती. तिने पेपर पूर्ण झाल्यावर कुठला प्रश्न राहिला आहे का, याच्यासाठी म्हणून तिने पेपर पुन्हा पुन्हा चेक केला होता. ती नेहमी कुठला ना कुठला प्रश्न हमखास विसरायची किंवा हमखास एखादी चूक करायची. तिची खोडच होती ती! पण ती काही मुद्दाम करायची नाही. पण हलगर्जीपणा व्हायचा. मात्र यामुळे ती नंतर पश्चाताप करत बसायची. हे तर आपल्याला येत होते, असे मम्मीजवळ म्हणायची. पण तिच्या या खोडीमुळे मार्क गेलेले असायचे. टिचर तर जादाच मार्क कापणार, असं तिला वाटायचं.
      मम्मीसुद्धा तिला हसून म्हणायची," अगं जाऊ दे गं, पैकीच्या पैकी मार्क मिलायला पाहिजेत असं कुठे आहे? " तिच्या गालाची पापी घेत वर म्हणायची," माझी गुणी बाळ गं." अभ्यास करता करता सौंदर्याने मम्मीची ही गोष्ट लक्षात ठेवली होती आणि परीक्षा हॉलमध्ये आठवून छान हसली.
      इतक्यात तिला तिच्या बाजूला बसलेल्या दीपाची खुसखुस ऐकायला आली. तिने तिच्याकडे थोडे वाकून पाहिले. तेवढ्यात मागून येणार्‍या सुपरवायझर टिचरने पाहिलं. टिचर दरडावत मोठ्यानं म्हणाल्या," बघून लिहितेस?"
" नाही... नाही, मॅम! माझा तर पेपरसुद्धा झाला आहे." सौंदर्या आत्मविश्वासानं पेपर दाखवत म्हणाली.
     तरीही सुपरवायझर टिचरने तिचा पेपर काढून घेतला व सौंदर्याला कळायच्या आत, तिच्या पेपरवर रिमार्क लिहिला गेला. सौंदर्या खूप रडली. परीक्षा हॉलमधल्या तिच्या अन्य मैत्रिणींनीही टिचरांना ,'ती खूप हुशार आहे, ती कॉफी करणारी मुलगी नाही," असे ठमपणे सांगितले. पण टिचरांनी कुणाचेच काही ऐकले नाही. सौंदर्याने झाला प्रकार मम्मीला सांगितला. मम्मीने तिला धीर दिला," टिचर तिचे पाच मार्क कापणार नाही."
     पण निकाल आल्यावर सगळेच चकित झाले. सौंदर्याच्या विज्ञान विशयातले पाच मार्क खरोखरच कापले गेले होते. ती तर रडून रडून आपला जीव द्यायला निघाली होती.दीपा तिच्यासमोर एखाद्या अपराध्यासारखी उभी होती. गौरांगी आणि श्रुती तिला शांत करत होत्या. सौंदर्याला कमी गुण मिळाल्याचे दु: ख वाटत नव्हते, पण तिला आपली काहीही चूक नसताना शिक्षा मिळाल्याचे तीव्र वाईट वाटत होते.
     घरी आल्यावर तिच्या दु:खाचा बांध फुटला. ती जोरजोराने ओक्साबोक्शी रडू लागली. मम्मीने तिला प्रेमानं मिठीत घेतलं आणि म्हणाली," तुझ्या खोडीमुळे दरवेळेला दोन मार्क जातात्च. आता पाच चुका झाल्या समज आणि गप बस." मम्मी म्हणाली," तुला स्वत: ला निर्दोष करायचे असेल तर आतापासूनच अभ्यासाला लाग. आणि खोडीला बाय बाय कर! पैकीच्या पैकी गुण मिळवून तुला परीक्षेत कॉपीची आवश्यकता नाही, हे दाखवून दे!"
     सौंदर्याने आपले डोळे पुसले. मम्मीचे म्हणणे तिला पटले होते. तिने रात्र- दिवस अभ्यास केला. पुन्हा पुन्हा प्रश्नपत्रिका सोडवल्या. तपासून पाहिल्या. चुका लक्षात घेऊन टाळण्याचा प्रयत्न केला.
     आज वार्षिक परीक्षेचा निकाल येणार होता. नेहमीप्रमाणे मम्मी-पप्पासुद्धा तिच्यासोबत होते. पूर्ण हॉल खचाखच भरलेला होता. खालच्या वर्गापासून निकाल सांगायला सुरुवात झाली होती. सातवीचा निकाल सांगताना टिचरांनी सौंदर्या संपूर्ण वर्गात पहिली आल्याचे सांगताच सारा हॉल टाळ्यांच्या कडकडाटात गर्जून गेला.
सौंदर्याच्या डोळ्यांत पाणी आले. सुपरवायझर टिचरांनी जवळ येऊन तिला आपल्या मिठीत घेतले. आणि कौतुकाने तिची पाठ थोपटली. मम्मी-पप्पांचाही ऊर अभिमानाने भरून आला.

(कथा) मनाची भाषा

     बाथरुममधून बाहेर आल्यावर तिने आपल्या मोबाईलवरचे मिस्ड कॉल पाहिले, मग लँड लाइनचे 'डायल-टोन' चेक केले. अशुतोष संध्याकाळी सातपर्यंत येत असतो. प्रिया ती येण्याअगोदरच फोन करते. मग आज काय झालं आहे? मन दुश्चिंतांनी घेरलं. कदाचित आपसात भांडले तर नसतील? आजकालच्या पोरांमध्ये सहनशील नवाची चिजच राहिली नाही.  एवढ्यात कीर्ती  फिरायला  बोलवायला आली. " अजून प्रियाचा फोन आला नाही." ती चिंता व्यक्त करत म्हणाली. " अगं येईल, काळजी काय करतेस एवढी? नवीन नवीन तर लग्न झालंय, गेले असतील कुठे तरी फिरायला? चल फिरायला, तेवढंच तुझं मन रमेल." कीर्ती जोर देऊन म्हणाली. नाही गं, आज माझं मन नाही." तिच्या उत्तरानं कीर्ती निघून गेली.
     " हो! असतील. कदाचित ती फिरायलाही गेली असतील." ती स्वत: ला समजावत होती.  'पण हे सगळं, मला का सुचलं नाही. सुचणार तरी कसं? ती अशा परिस्थितीतून गेलीच कुठे होती? प्रेम-बीम, रागावणं, रुसण्-फुगणं तिच्या नशीबीच नव्हतं. महेंद्रशी तिचं लग्न म्हणजे  जबरदस्तीचा एक सौदा होता. महेंद्रच्या आईनं तिला पसंद केलं होतं. 'आईची पसंद तिच माझी पसंद.' असे म्हणून त्यांनी होकार दिला होता.साखरपुढ्यालाच तिने त्याला पाहिलं होतं. दिसायला तिच्यापेक्षा डावाचं. पण मुलांच्या रंगरुपाकडं कोण पाहतं. त्याच्या नोकरी- पैशाकडं पाहिलं जातं. त्यांच्याजवळ चांगली नोकरी होती.
     लवकरच दोघंही प्रणय सूत्रात बांधले गेले नी ती त्यांच्यासोबत इथे आली. त्यांची आईसुद्धा आली. ते सकाळी कामावर निघून जायचे ते रात्री उशिराच घरी परतायचे. आल्यावर जेवण करून  झोपायचे. सुट्टीच्या दिवशीसुद्धा नेहमी बाहेर असायचे. सासूबाई  तिला सारखी डिवचायची-' रात्री तर तुझ्याशी हसतो, बोलतो का गं?' मग स्वतः च  'नेहमी कामातच असतो. स्वता:च्या मस्तीतच असतो. काय करायचं, याचा स्वभावच असा आहे.' असे म्हणून  स्वतः ला समजावयाची. काही दिवसांनी सासूबाई निघून गेल्या. आता दिवसभराचे एकटेपण खायला उठू लागले. तिने महेंद्रपुढे शिकण्याची इच्छा व्यक्त  केली. ते पटकन तयार झाले. ती दिवसभर घरच्या कामात व्यस्त राहायची आणि फावल्या वेळात अभ्यास करायची. याच दरम्यान तिच्या भावाचे लग्न होते. आईने तिला काही दिवसांसाठी बोलावलं. महेंद्रनी सहर्ष परवानगी दिली. घरातली सगळी व्यवस्था करून ती निघाली होती. पण एकदा, फक्त एकदा महेंद्रनी तिच्या अनुपस्थितीत होणार्‍या गैरसोयीचा उल्लेख करावा. पण महेंद्र, या सार्‍या गोष्टींपासून बेखबर होते. स्वता: च्या विश्वात मस्त होते. तिथेसुद्धा त्यांचे पत्र आले ना फोन. पण लग्नादिवशी मात्र आले. ती त्यांच्यासोबत माघारी आली. आता महेंद्रांकडे पाहण्याचा तिचा दृष्टीकोन बदलला होता. तिच्या मला ठेच पोहोचली होती. नारी सर्व काही सहन करू शकते, पण कोणी तिचे अस्तित्व नाकारत असेल तर मात्र ती  बर्दास्त करू शकत नाही. तिने बरीच मोठी धावपळ करून नोकरी मिळवली.
     तोपर्यंत प्रियासुद्धा त्यांच्या संसारात आली होती. पण दोघांमधला दुरावा वाढतच चालला होता. प्रियाचा सांभाळ, नोकरी आणि घरकाम यामुळे ती सतत व्यस्त असायची. पण प्रबल या सगळ्यांपासून बेखबर आपल्याच मस्तीत दंग असायचे. तिला कामाचा त्रास व्हायचा. मग ती चिडचिड करायची. तेव्हा महेंद्र म्हणायचे-'  घर आणि  नोकरी सांभाळायचं होत नसेल तर  नोकरी सोड. पण माझ्याकडून घर कामासाठी अपेक्षा करू नकोस.' नोकरी स्वतःला व्यस्त ठेवण्याचा सर्वोत्तम उपाय होता. यथावकाश या सगळ्या गोष्टींची तिला सवय झाली. इतकेच नव्हे तर गाडी बंद पडल्यावर  वर्कशॉपपर्यंत स्वतः जायची किंवा मॅकॅनिकला घरी बोलावून गाडी त्याच्या सुपूर्द करायची. कधी एकत्र बाजारात गेले तरी महेंद्र कुठे तरी बाजूला उभे राहायचे.  बिल बनवणं, पेमेंट करणं, सामान गाडीत ठेवणं ही सारी कामं  एकटीच करायची. यामुळे एक फायदा होत होता.  तिच्या आत्मविश्वासात वाढ होत होती. तिचे व्यक्तिमत्व निखरत होते.
      प्रियाचा सांभाळ  हेच  तिच्या जीवनाचे ध्येय होते. प्रियासुद्धा तिच्याशीच समरस झाली होती. दोघीच शॉपींगला जायच्या. फिरायला जायच्या आणि कधी मधी मूवीसुद्धा पाहून यायच्या. त्यांच्या पेहराव्यावरून सुमीसुद्धा टीका-टिप्पणी करायची. वैतागल्यावर प्रिया आईसारखी त्यांना समजावायची, प्रेमानं वागायची. प्रिया मोठी झाल्यावर महेंद्रनी कित्येकदा पुत्र-इच्छेने दुसर्‍या मुलाविषयी बोलायचे, पण ती यासाठी कुठल्याही किंमतीवर तयार नव्हती.
     अचानक फोन वाजला." ममा, आज आम्ही अशुतोषच्या मित्राच्या पत्नीच्या वाढदिवसाला गेलो होतो. मोठी मजा आली, आम्ही खूप मस्ती केली. खूप मोठे हॉटेल होते. आता आताच आलो आहे." प्रियाने एका दमात सगळं  सांगून टाकलं. " ममा, मी पिंक ड्रेस घातला होता. अशुतोषलासुद्धा खूप आवडला. आज मी पार्टीत डान्ससुद्धा केला... " आवाजावरून उत्साह ओसंडून वाहात होता. "... ममा, तूसुद्धा सोबत असती ना खूप मजा आली असती. तुझी खूप आठवण आली."
    तिचा उत्साह पाहून तिच्या डोळ्यांत पाणी आलं. चला, आपल्या नशिबात नाही ते नाही निदान मुलीच्या नशिबात... तिच्या कष्टाचं सार्थक झालं.
    तिला आठवलं, तिच्या वाढदिवसाला अनिता हसून म्हणाली होती-' जिजा, आज दीदीचा बर्थ डे. आज तुमचा विशेष प्रोगॅम काय आहे...' 'प्रोग्रॅम कसला? वाढदिवस काय येतात आणि जातात... ' महेंद्रनी उदासपणे उत्तर दिलं होतं. ती विचार करत राहिली. जीवनातले छोटे- छोटे आनंदाचे क्षणसुद्धा  बरेच दिवस आपल्या मनाला उभारी देतात, आल्हाद देऊन जातात. पण आपण मोठमोठ्या गोष्टींसाठी या छोट्या छोट्या आनंदावर विरजण घालत असतो.'
     मन पुन्हा भटकू लागलं. अनिताकडे गृहप्रवेशाचा कार्यक्रम होता. नेहमीप्रमाने ' माझी महत्त्वाची मिटिंग आहे.' सांगून महेंद्र बाजूला झाले. ती आणि प्रिया  दोघीच गेल्या. सगळ्या भावा-बहिणींचा परिवार पाहून तिला खूप विचित्र वाटलं होतं.
     अचानक अनिताच्या खोलीतून जोरजोराने ओरडण्याचा आवाज आला. माधव कुणावर तरी रागावत होता. 'तुझी हिंमत कशी झाली, माझ्या बायकोच्या फोनवर एसएमएस करण्याची.आता पोलिसात रिपोर्ट करतो.' तिकडे कुणी तरी 'सॉरी-सॉरी' म्हणत होते. ' हे नालायक लोक कोणालाही एसएमएस करीत असतात. असं काही खडसावलंय की पुन्हा हिंमत करणार नाही त्याची!.' माधव हसून सांगत होता. मनाला एक झटका बसल्यासारखं झालं. एक दिवस तिच्या फोनवर तीन्-चार रॉन्ग नंबर आले होते. महेंद्र खिजवून म्हणाले होते. आता रॉन्ग नंबरसुद्धा यायला लागले.कुणासठाऊक  कुठे कुठे नंबर दिला आहे. ऐकून तिचे पित्त खवळले होते. पण ती गप्प बसली होती. महेंद्रनी कधी तिला भावनात्मक संरक्षणसुद्धा दिले नव्हते.
     काळाचा महिमा आगाध आहे. ते नदीच्या दोन किनार्‍यासमान आपले जीवन व्यतीत करीत होते. हळू हळू बारीक सारीक गोष्टीसुद्धा मोठ्या मोठ्या मुद्द्यांचे स्वरुप घेत होते. त्यामुळे नेहमीचा संवादसुद्धा संपायचा.  प्रिया यात सेतूचे काम करायची. पण आता सेतूच्या अभावामुळे परिस्थिती आणखीच ताणली जात होती. वास्तविक, ही दोन व्यक्तींमधल्या 'इगो'ची टक्कर होती. महेंद्रमध्ये पुरुषांना स्त्रींपेक्षा श्रेष्ठ समजण्याचा इगो होता. आणि तिच्यात आपल्या रंगरुपाचा, व्यवहार कुशलतेचा, आत्मविश्वासाचा आणि स्वतः च्या पायावर गृहस्थी सांभाळल्याचा अहंकार होता.
     म्हणतात ना, सय  माणसाच्या मागे सावलीसारखी लागलेली असते. तिला पुन्हा आठवलं, सामाजिक समारंभांमध्ये सामिल होण्यापासून लांब पळणारे महेंद्र प्रियाच्या लग्नात किती घाबरल्या घाबरल्यासारखे वावरत होते. पण ती मात्र पूर्ण आश्वस्त होती. लग्नाची सगळी कमान तिने सांभाळली   होती. महेंद्र मात्र उदास उदास आणि  बाजू बाजूलाच राहिले.
     " आज वॉकला गेली नाहीस?" आवाज ऐकून चमकली. तिने मान वर करून पाहिले तर समोर महेंद्र होते. खूप थकल्यासारखे दिसत होते. जणू काही साठ वर्षाचे म्हातारे झाले आहेत. पण  ते आपल्या विश्वात दंग होते.   त्यामुळे या गोष्टींकडे त्यांचे ध्यानच दिले नाही. मानवाचे मस्तिष्क म्हणजे अजीब गुत्थ्यांचे जाळे आहे. जे नाही, त्याच्यामागेच धावत असते. आणि जे जवळ आहे त्याकडे मात्र साफ दुर्लक्ष करत असते.
    पाण्यासमान मनाचा प्रवाहसुद्धा मोठा विचित्र असतो.  कधी कुठले वळण घेईल सांगता येत नाही. आता ती विचार करत होती, शेवटी महेंद्रंशी असे तोडून  वागण्यासारखे त्यांच्यात असे काय कमी आहे? त्यांच्या खाण्यापिण्याकडे आपण म्हणावे असे लक्ष दिले नाही. शेवटी काम म्हणजे एक अल्कोहलिक तर आहे? मग कामात दंग राहणे,  काही गुन्हा नाही. ऑफिसमधील लोक त्यांच्या कामाचे किती प्रशंसा करतात.  कुठल्याही प्रकारचे व्यसन नाही, आब नाही. कुठला वायफट खर्च नाही. तीसुद्धा किती मूर्ख, जी या हिर्‍याची पारख करू शकली नाही.
    मानवी मन म्हणजे अजीब कोडे आहे. काही वेळापूर्वी तिला महेंद्रमध्ये दोष आणि दोषच दिसत होते.कारण ती त्यांना स्वतः च्या  नजरेतून पाहात होती. पण आता.. आता प्रेम उफाळून आले होते. कारण आता ती त्याच्याच दृष्टीकोनातून पाहाते आहे. नकारात्मक विचार व्यक्तीला निष्क्रिय बनवतात, हेच खरे!  पण सकारात्मक विचार नवीन ऊर्जा देतो. तिने झटकन घरभर प्रकाश केला. संध्याकळची धूपाची बत्ती लावली. आणि आज कित्येक वर्षांनी महेंद्रांच्या आवडीचा स्वयंपाक करण्यात गुंतली. आज तिच्या मनाची भाषा बदलली होती.
                                                                                                                   

बालकथा भुतांची मदत


     एका गावात दोघी मायलेकी राहत होत्या. त्यांची छोटीशीच झोपडी होती. त्यात दारिद्र्य नांदत होते. दोघी गावातल्या एका सावकाराच्या शेतात मजुरीला जात. त्यातून त्या आपला उदरनिर्वाह चालवित.
     दिवस जात होते. एकदा आई आजारी पडली. तिची सारी जबाबदारी मुलीच्या शिरावर आली. मुलीचे नाव होते, किरण! ती फार हुशार होती. ती शेतात राबण्याबरोबरच जंगलात जाऊन लाकूडफाटाही गोळा करून आणायची. ती बाजारात विकून आपला घरप्रपंच चालवायची आणि आईच्या आजारावरही उपचार करायची.
     किरण ज्या जंगलात लाकडे गोळा करायला जायची, त्या जंगलात दोन भुतं राहत होती. ती जंगलातल्या वास्तव्याला कंटाळली होती. त्यांना कोणतं  तरी सत्कार्य करून पिशाच्च योनीतून मुक्तता मिळवायची होती. एक दिवस मोठं भूत धाकट्याला म्हणालं," या जंगलात एक मुलगी रोज लाकूडफाटा गोळा करायला येते. विचार करतोय, तिलाच मदत करावी आणि या जन्मातून मुक्ती मिळवावी."
     "तू म्हणतोयस ते बरोब्बर आहे! तुला मुक्ती मिळाली की मीसुद्धा कुणाला तरी मदत करून सुटका करून घेईन. " लहान भूत म्हणाले.
     मोठे भूत किरण येण्याची प्रतीक्षा करू लागले. ती येण्याअगोदरच त्याने पुष्कळशी लाकडे जमा करून ठेवली होती. किरण आली. लाकडाच्या मोळ्या बांधलेल्या पाहून ती दुसरीकडे लाकूडफाटा शोधायला गेली. कदचित कोणीतरी ही लाकडे गोळा केली असतील, असा तिने विचार केला. जंगलात खूप हिंडली, पण त्यादिवशी कुठेच लाकडे मिळाली नाहीत. ती हताश होऊन माघारी परतली.
     विचार करत करत ती गावात आली. एका घरासमोर एक वृद्ध महिला घराच्या ओटीवर बसून फुलांचा हार बनवत असलेली तिला दिसली. शेजारी टोपलीत खूपशी फुलं होती. वृद्ध महिलेला हार बनवताना फारच कष्ट पडत होते. " आजी, तुला किती कष्ट पडतात? आण इकडे मी हार बनवून देते. तू जे काही देशील, ते मी समाधानाने घेईन." किरण वृद्धेला म्हणाली.
     "काय करू, मुली? हाच माझा पिढीजात धंदा आहे. म्हातारपणामुळे शरीर साथ देत नाही. नजरसुद्धा बारीक झाली आहे. तू हार बनवून विकशील तर तुला त्यातला चौथा हिस्सा देत जाईन." वृद्धा किरणला म्हणाली. किरणने ते काम आनंदाने स्वीकारले. ती आता हार बनवून बाजारात जाऊन विकून येऊ लागली. मागे भुताने किरणला मदत करण्याचा व्यर्थ प्रयत्न केला होता. त्याने  पुन्हा तिला मदत करण्याचे ठरवले. किरण रोज जंगलाच्या शेजारी असलेल्या वृद्धेच्या बागेत फुले तोडायला जायची. एक दिवस ती फुले आणून हार बनवत होती. किरणने टोपलीतले एक फूल घेतले की, भूत लगेच त्यात दुसरे फूल टाकायचे.
     काही वेळाने वृद्ध महिला घरी आली. टोपलीतली फुले पाहून म्हणाली," काय गं! हार बनवायला इतका उशीर? टोपलीत तर फुले जशीच्या तशी दिसताहेत."
     " हे बघ आजी, हारांचा ढिग! " से म्हणून तिने हारांचा ढिग वृद्ध महिलेला दाखवला.  वृद्धा आश्चर्यात पडली. "पण ही फुले जशीच्या तशी कशी? भुताटकी म्हणायची की काय? अगं बाई! तू चेटकीण आहेस की काय? चल, ऊठ, निघ येथून!" असे म्हणून तिने फुलांची टोपली दूर भिरकावून दिली.
     मोठ्या भुताने मदत करण्याचा जो जो प्रयत्न केला, तो वाया गेला. किरण आता घरीच मातीची खेळणी बनवत होती.  किरणचे वडील हयात होते, तेव्हा ते मातीची खेळणी बनवून विकत. किरण त्यांना मदत करत असे. त्यामुळे तिला खेळणी बनवण्याची कला येत होती. तो अनुभव आता तिला कामी आला. या खेपेला छोट्या भुताने तिला मदत करण्याचे ठरवले. तो पोपटाचे रूप घेऊन तिच्या घरी आला. आणि ओल्या मातीत एक हिरा टाकून निघून गेला. किरणचे त्याकडे लक्षच नव्हते. त्या मातीतून तिने एक हत्ती बनवला. काही दिवसांनी तो हत्ती घेऊन ती गावातल्या एका सावकाराकडे गेली.
     सावकाराच्या मुलाला तो हत्ती फार आवडला. सावकाराने तो विकत घेतला. दरम्यान त्यांचा एक हिरा हरवला होता. गेल्या काही दिवसांपासून त्याचा शोध घेतला जात होता. यासाठी त्याने आपल्या नोकरांना कामाला लावले होते. वास्तविक छोट्या भुताने तो हिरा चोरून किरणच्या मातीच्या चिखलात टाकला होता.
      सावकाराचा मुलगा तो हत्ती घेऊन खेळत होता. त्याला घेऊन इकडे-तिकडे धावत होता. आणि खेळता खेळता हत्ती जमिनीवर पडला व फुटला. विखुरलेल्या तुकड्यांमध्ये तो मौल्यवान हिरा मुलाला दिसला. तो घेऊन बाबांकडे गेला. सावकाराला अतिशय आनंद झाला. पण तो हिरा खेळण्याच्या मातीत कसा गेला, याचे त्याला आश्चर्य वाटले. त्याला किरणचा संशय आला, पण किरण कित्येक दिवस त्याच्याकडे आली नव्हती. त्याने फार विचार केला नाही. त्याचा हिरा त्याला मिळाला होता.
     इकडे किरण मूर्ती बनवण्यात पारंगत झाली होती. कष्टाच्या  जोरावर तिने आपले दिवस पालटवले होते. आता दोघी मायलेकी आपले दिवस आनंदात, समाधानात घालवू लाग्ल्या होत्या. पण जंगलात राहत असलेल्या त्या दोघा भुतांना मात्र मुक्ती मिळाली नाही.

बालकथा मुले परतलीच नाहीत.

     एक गरीब लाकूडतोड्या आपल्या पत्नी आणि सात मुलांसह एका छोट्या गावात राहत होता. घरात अठराविश्व दारिद्य असल्याने    त्याचे दिवस मोठ्या हलाकीत जात होते. दिवसरात्र काबाडकष्ट करूनही तो मुला-बाळांना पोटभर अन्न देऊ शकत नव्हता. मुले मोठी होत होती, तशी त्याची परिस्थिती आणखीच बिकट बनत चालली होती. कधी कधी त्यांना अन्नही मिळत नव्हते. मुलांची तब्येतही वाळलेल्या काट्क्यासारखी दिसू लागली होती. लाकूडतोड्याला त्यांची दशा पाहवत नव्हती.
     त्याने एक दिवस आपल्या पत्नीने सांगितले की, 'यापेक्षा सगळ्या मुलांना जंगलात सोडून येऊ. तिथे ते आपल्या जगण्याचा काहीतरी मार्ग शोधतील.'  लाकूडतोड्याच्या पत्नीच्या डोळ्याम्त अश्रू दाटले. पोटच्या पोरांना आपल्यापासून वेगळे करण्याची कल्पनाच तिला सहन होत नव्हती. तिने त्याला खूप विरोध दर्शविला. पण शेवटी लाकूड्तोड्याच्या समजवण्यावरून ती तयार झाली. शेवटी ती तरी काय करणार होती, बिच्चारी! भुकेने तडफडून आपल्या डोळ्यांदेखत त्यांनी दम तोडण्यापेक्षा जंगलात काहीतरी खाऊन जगतील, असे तिला वाटले.
     लाकूडतोडयाचे बोलणे थोरला मुलगा सोमनाथ लपून ऐकत होता. सकाळी लाकूडतोड्या सातही मुलांना घेऊन जंगलाच्या दिशेने निघाला, तेव्हा सोमनाथने आपल्या खिशात पुष्कळसे लाल खडे ठेवले.सगळे जंगलात पोहचले, तेव्हा सोमनाथने खिशातला एकेक खडा खिशातून काढून रस्त्यावर टाकू लागला. काही वेळाने लाकूडतोड्या दाट जंगालात आत आला. पाणी शोधण्याचा बहाणा करून मुलांना एका ठिकाणी थांबायला सांगून लाकूडतोड्या घरी माघारी परतला. मात्र तो मनोमनी खूप दु: खी होता.
     सोमनाथ काही वेळाने आपल्या भावंडांसह रस्त्यावर टाकलेल्या लाल खड्यांच्या मदतीने पुन्हा घरी आला. लाकूडतोड्याला मुले घरी आल्याचे पाहून खूप आश्चर्य वाटले. शिवाय खूप दु:खही झाले. त्याला काय करावे समजेना! त्याने दुसर्‍यादिवशी पुन्हा मुलांसह जंगलचा रस्ता धरला. या खेपेला सोमनाथ घाईगडबडीत खिशात लाल खडे ठेवायचे विसरला. त्याला वाटेत एक भाकरीचा तुकडा दिसला. तो त्याचेच तुकडे करून रस्त्यात टाकू लागला. सातही मुलांना जंगलात सोडून लाकूडतोड्या माघारी परत आला.
     सोमनाथ भावंडांसह घरचा रस्ता शोधत शोधत माघारी येऊ लागला. पण अचानक तो रस्ता चुकला. कारण रस्त्यात टाकलेले भाकरीचे तुकडे पक्षांनी वेचले होते. त्यामुळे तो घरी जाणारा  रस्ता ओळखू शकला नाही. अशा प्रकारे सातही भावंडे जंगलातच हरवली. काही दिवसांनी राजनाथसिंह नावाची व्यक्ती लाकूडतोड्याच्या घरी आली. त्याने फार पुर्वी घेतलेले खुपसे धन व्याजासह लाकूडतोड्याला परत केले. आता त्याच्या घरात सर्वकाही होते. पण, त्यांना आता आपल्या मुलांची खूप आठवण येऊ लागली. त्यांची उणीव भासू लागली. त्यांना केल्या गोष्टीचा पश्चाताप होऊ लागला. लाकूडतोड्या आणि त्याच्या  पत्नीने आपल्या सातही मुलांच्या शोधासाठी संपूर्ण जंगल पालथे घातले, परंतु त्यांची मुलेही काही सापडली नाहीत.   आपल्याला  कधी तरी आपली मुले भेटतील, या आशेवर लाकूडतोड्या आणि त्याच्या पत्नीने सारे आयुष्य  जंगलात काढले.