Friday, August 21, 2015

लोकसंख्येचा विस्फोट आणि साधनांची घट



     १९७०-७१मध्ये देशात वाढत चाललेल्या लोकसंख्येची मोठी चिंताजनक चर्चा होती. त्यावेळची लोकसंख्या जवळपास ५७ कोटी होती. पण लोकसंख्येचा वाढता वेग लोकांच्या लक्षात येत होता. वृत्तपत्रांमध्ये, नियतकालिकांमध्ये मोठेच्या मोठे रकाने भरून येत होते. लोकसंख्येच्या विस्फोटाच्या धोक्याचा लोकांनी धसका घेतला होता. विद्वान मंडळी येत्या दशकांमध्ये आपल्याला किती धान्य, कपडे, घरे आणि रोजगार लागणार याची हबकी भरवणारी आकडेवारी सांगत होते. असेही सांगितले जात होते की, लोकसंख्या अशीच वाढत राहिली तर माणसांना घोड्यासारखी उभ्याउभ्याच झोप घ्यावी लागेल.
     आपण सुदैवी आहोत. विज्ञानाची आपल्याला साथ मिळाली आहे. आज देशाची लोकसंख्या सवा कोटी आहे, पण त्यावेळी जितकी कल्पना केली होती तितकी काही वाईट परिस्थिती आपल्यावर ओढवली नाही. आपल्याकडे सगळं काही भरभरून आहे असं नाही, पण आपली अवस्था इतकी वाईटदेखील नाही. पण यावरून मोहरूनही जायचं नाही. लोकसंख्येचा भस्मासुर आपल्याला गिळंकृत करायला समोर उभा ठाकला आहे. वाढत्या लोकसंख्येला साधनांची कमतरता भासत आहे.
     आपली लोकशाही जगातली जुनी आणि सर्वात मोठी आणि तितकीच श्रेष्ठ आहे. आता तर आपल्याला हेदेखील मानावे लागेल की, जनतादेखील परिपक्व झाली आहे. ती सरकारवरच नव्हे तर विरोधकांवरसुद्धा लक्ष ठेवून आहे. प्रसारमाध्यमांचा तिसरा डोळा अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहाचला आहे; परंतु खेदाची बाब अशी की वादळाच्या गतीने घोंगावत येत असलेला लोकसंख्येचा विस्फोट थोपवायला कुणीच पुढे येताना दिसत नाही. देशव्यापी फक्त निरव शांतता आहे.
     १९७५-७६ मध्ये लोकसंख्यावृद्धी हा कळीचा मुद्दा बनला होता. पुढच्या निवडणुकीत विरोधकांसह सार्यांनी कॉंग्रेसला चीतपट केले. त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले, पण दुसरं अधिक दु: असं की, त्यानंतर राजकीय पक्षांनी लोकसंख्या नियंत्रणाचं नाव घेणंही बंद करून टाकलं. भीतीपोटी एका आवश्यक सरकारी कायद्याला ऐच्छिक करून टाकलं.
     शास्त्रज्ञ सांगतात की, हिंदुस्थान २०३० मध्ये १४५ कोटींचा जगातला सर्वात मोठ्या लोकसंख्येचा देश होईल. म्हणजे लोकसंख्येबाबतीत चीनपेक्षा पुढे जाईल. २०५० मध्ये हिंदुस्थानची लोकसंख्या १६० कोटींच्या आसपास असेल. सध्या १२५ कोटींमध्ये जगातला प्रत्येक सहावा माणूस हिंदुस्थानी आहे. सध्या कुठेही जा गर्दीच गर्दी. बाजार, बसस्टॅण्ड, रेल्वे स्टेशन, हॉटेल्स-रेस्टॉरण्ट, शाळा-कॉलेजेस अशा सगळ्या ठिकाणी गर्दीचं साम्राज्यच पाहायला मिळेल. प्रवासात तर नरकयातनाच सोसाव्या लागतात. हे सगळं पाहिल्यावर अशी चिंता वाटतेय की, उद्या आपण आपल्या मुलाबाळांसाठी कोणतं जग सोडून जाणार आहोत. १९४७ मध्ये जेव्हा आपण स्वतंत्र झालो होतो तेव्हा लोकसंख्या फक्त ३५ कोटी होती. ही गोष्ट सगळेच विसरले आहेत. चीनने आपल्या लोकसंख्येच्या नियंत्रणासाठी कठोर पावले उचलली. एक कुटुंब, एक मूल असा कायदा केला. आता त्यांची लोकसंख्यावाढ नियंत्रणात आहे. जेव्हा आपला भर    अप्रत्यक्षरीत्या लोकसंख्या वाढवण्यावर होता तेव्हा त्यांचा भर त्यांची ताकद वाढवण्यावर होता. आता चीन अमेरिकेनंतर दुसरा महाशक्तिशाली देश बनला आहे. आमच्या सगळ्या राजकीय पक्षांनी देशाच्या हितासाठी एक सामूहिक निर्णय घेऊन लोकसंख्या नियंत्रणाचा मजबूत असा कायदा करावा. तरच आपला देश खर्या अर्थाने महाशक्तिशाली बनेल. - See more at: http://www.saamana.com/lekh  21/08/2015