Tuesday, August 18, 2015

सेल्फीमुळे सामाजिक भान, जीवन मूल्ये धोक्यात

     माहिती तंत्रज्ञानाबरोबरच लोकांच्या सामाजिक व्यवहाराच्या पद्धतीही बदलत चालल्या आहेत.सेल्फी हा असाच नव्या जमान्यातला नवा बदल होय. स्मार्टफोनपासून सुरु झालेला हा बदल सोशल मिडियापयर्ंत पोहोचला आहे. याला कुठला काळ- वेळ नाही. ते कुठेही, कसेही प्रकटं.  यात मूल्यांना महत्त्व नाही. कुठलं भान नाही. सेल्फीशी संबंधित घडलेल्या घटनांमुळे लोकांना सामाजिक परिस्थितीचं भानच राहिलं नसल्याचं अधोरेखित होत आहे. अमिताभ बच्चन एका मित्राच्या अंत्यसंस्काराला गेले होते.काही मंडळी अशा वेळेला अमिताभसोबत सेल्फी काढण्याचा आटापिटा करत होते.अशा लोकांना घटनेचे गांभिर्यच नव्हते. शेवटी अमिताभ बच्चन यांनाच  त्यांना फटकारावं लागलं.
        दुसरी  एक अशीच घटना.सौदी अरेबियामधल्या एका युवकाने निधन झालेल्या आजोबांच्या मृतदेहासोबत सेल्फी काढला. तो तेवढ्यावरच थांबला नाही. आपल्या हसर्‍या चेहर्‍यासह तो सेल्फी सोशल मिडियावर टाकला. वर लिहिले, गुड बाय फादर. अभासी दुनियेचा फैलाव आपले सामाजिक भान ,मूल्ये गिळंकृत तर करत नाहीत ना, अशी  चिंता वाटू लागली आहे.
       सेल्फीचा ज्या प्रकारे विस्तार वाढत चालला  आहे, त्याच्याने जन्म आणि मृत्यूचा फरकच संपुष्टात आला आहे, असे म्हणावे लागेल. दुर्घटनांमधला हाहाकार असो किंवा अग्नितांडव असो अथवा महापुरांमुळे लोकांची झालेली वाताहत असो,  गोळीबाराला बळी पडलेल्या लोकांचे विदारक चित्र असो. अशा वेळेला  दुर्घटनाग्रस्तांना पहिल्यांदा तात्काळ मदतीची गरज असते.    पण अशावेळेला मदत करायचे सोडून लोक सेल्फी काढण्यात दंग असतात.अशा घटना दुर्दैवीच म्हणाव्या लागतील.
       याही पुढे जाऊन सेल्फीने  साहसी (डेअरिंग) सेल्फीचे रुप घेतले आहे.प्रशंसा मिळवण्याच्या नादात लोक विशेषता युवक वर्ग साहसी सेल्फी काढताना दिसतात. अशा  अती साहसामुळे तरुण  प्राणाला मुकल्याच्या घटना  घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी धावत्या रेल्वेतून सेल्फी काढताना विजेच्या खांबाला धडकून एका युवकाला आपला जीव गमवावा लागला. दुसरी घटनादेखील अशाच एका युवकाची आहे. एक युवक उंच अशा खडकावर उभा राहून सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून समुद्रात पडला आणि जिवाला मुकला.अमेरिकतल्या एका विद्यार्थ्याच्या खांद्याला गोळी लागली होती. खांदा रक्तबंबाळ झाला होता.तो लोकांकडे मदतीचा धावा करायचे सोडून रक्तबंबाळ खांद्याचा सेल्फी काढण्यासाठी हाका मारत होता. काय माणसांच्या तर्‍हा तरी, असे म्हणण्याची पाळी आली आहे.
       सेल्फी संबंधी काही अभ्यास पुढे आला आहे. त्यानुसार तरुणी आठवड्यातले पाच तास सेल्फी काढण्यासाठी घालवतात.सेल्फीचे वेड मानसिक विकाराच्यारुपाने पुढे येत आहे, असा निष्कर्ष अमेरिकेतल्या सायट्रेट्रीक असोशिएशनने काढला आहे.भारतातल्या मानसोपचार तज्ज्ञांनीदेखील याला मानसिक अस्वस्थेचे लक्षण मानले आहे. पण विद्यार्थी असो किंवा सामान्य माणूस. सिनेकलाकार असो  अथवा खेळाडू. उद्योजक असो किंवा राजकारणी असो.  सगळ्यांनाच  सेल्फीची भूरळ पडली आहे. भारताचे पंतप्रधान  नरेंद्र मोदीदेखील यापासून सुटले नाहीत.
       अमेरिकेतल्या आणखी एका अभ्यासानुसार तिथले 70 टक्के लोक सकाळी उठल्यावर आप्त-स्वकियांची खबरबात घ्यायचे सोडून आपल्या सेल्फीला किती लाइक आणि कमेंट मिळाल्या आहेत, हे आधी पाहतात. तर 48 टक्के लोक फोनवर व्यस्त असल्याने कौटुंबिक आनंदाला मुकतात. सेल्फी, फेसबूक,वॉट्स ऍप, ट्विटरसारख्या सोशल  मिडियाच्या सतत संपर्कात असूनही एकटेपणाच्या आहारी जात आहेत. फोनमध्येच गुंतून राहिल्याने आपल्या आजू-बाजूच्या परिसराला इतकेच नव्हे तर आपल्या जवळंच्या पासूनही दूर जात आहेत. आपण सोशल मिडियाच्या वापराला अटकाव करु शकत नाही, पण त्यावर मर्यादा आणू शकतो. भारतीय संस्कृतीची त्यांना जाणीव करुन द्यायला हवी.  अतिपणा रोखण्यासाठी तशी  संस्कृती विकसित करायला हवी. आपल्या वागण्याने  सामाजिक भान, मूल्ये यांना तडा जाणार नाही, याची जाणीव करुन दिली पाहिजे. यासाठी अशा लोकांचा शैक्षणिक पाठ घ्यायला हवा.                                                                  


 

No comments:

Post a Comment