Tuesday, December 25, 2012

बालकथा : सल्ला देण्यापूर्वी…


     एका झाडावर पक्ष्यांची वस्ती होती. ते सगळे अनेक दिवसांपासून तिथे राहत होते. सगळ्यांचे एकमेकांशी एका कुटुंबाप्रमाणे नाते जुळले होते. कोणी एखादा संकटात सापडला, तर सगळे त्याच्या मदतीला धावून जायचे. अथवा कोणी काही खास वेचून  आणले  तर ते आपापसांत वाटून खायचे. अशा प्रकारे मोठ्या आनंदात दिवस चालले होते.
     दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याला जोमदार  सुरुवात झालेली होती. पाऊस जोराचा  पडत होता. मधेच थंडगार  वारा सुटायचा. त्यामुळे सगळ्यांनाच त्याचा त्रास व्हायचा. एक दिवस जोराचा पाऊस सुरू होता. चिंब भिजल्यावस्थेत एक माकड झाडाखाली आले. भिजल्यानं कुडकुडत असलेल्या माकडाला पाहून एक चिमणी म्हणाली," तू तुझं स्वतःच घर का बांधत नाहीस?"  झाडातून अचानक आवाज आल्याने  माकडाने चमकून वर पाहिले. एक चिमणी आपल्या घरट्याबाहेर डोके काढून दयेने माकडाकडे पाहात होती. तो चिमणीला म्हणाला," वेडपट कुठली? आपल्या कामाशी काम राखावं. नसत्या कुणाच्या भानगडीत पडू  नये." आणि मग तो स्वतःशीच बडबडू लागला. " काय दिवस आले आहेत? ही एवढीशी चिमणी मला शहाणपणा शिकवते आहे. " त्याला तिचा भयंकर राग आला. 'याचा तिला धडा शिकवायलाच हवा. आत्ताच तिचा जीव घेतो.''
     मग तो चिमणीला म्हणाला," मला अडचणीत पाहून तुला दु:ख वाटायचं कारणच काय? ज्याला कुणाला सल्ल्याची गरज असते, त्याला सल्ला द्यावेत,  हे तुला कुणी शिकवलं नाही कायतू तुझा सल्ला तुझ्याजवळच ठेव आणि तुला सल्ला द्यायचाच असेल तर जे घाबरट लोकांना द्यायचे. मला नाही." असे म्हणत पटकन माकड झाडावर चढले. त्याने तिचे घरटे मोडून तोडून टाकले.    त्यामुळे म्हटल जातं की, सल्ला देण्यापूर्वी सावधानता बाळगायला हवी.  कारण मूर्ख माणूस सल्ल्यांना जुमानत तर नाहीच, शिवाय आपल्याला नुकसान पोहचवतो.

Sunday, December 23, 2012

बालकथा: कोल्हापुरी

     एक होती चप्पल. तिचे नाव होते कोल्हापुरी. कोल्हापुरी मोठी जिद्दी होती. दुकानदाराने रामरावदादाला तिला  विकल्यानंतरही ती त्याच्यासोबत गेली नाही. म्हणाली," मी इथेच राहणार. मला दिवसभर शेतात काम करायला आवडत नाही. मला थंड हवेत राहायला आवडते. इथे मस्त थंड हवा आहे."
     कोल्हापुरीच्या जिद्दीपुढे हात जोडत दुकानदार म्हणाला," अगं बया! माझी पाठ सोड. बोहनीचा टाईम आहे, मला धंदा करू दे. तू आपली रामरावदादांसोबत निघून जा." कोल्हापुरीला जायचं नव्हतंत्यामुळे  ती गेली नाही. रामरावदादा निघून गेला. बिच्चारा दुकानदार डोके धरून बसला.
     एक दिवस तर दुकानदारला कोल्हापुरीचा भयंकर राग आला. तिच्या नकारामुळे धंद्यावर परिणाम व्हायला लागला होता. त्याने विचार केला, तिला आता विकण्यापेक्षा अशीच फेकून देऊ.  आणि खरोखरच एक दिवस त्याने रात्री दुकान बंद करताना तिला जोडीदारीणसह आपल्या दुकानाच्या पाठीमागच्या रस्त्यावर फेकून दिले आणि गपगुमानं घरी निघून गेला.
     रात्री त्याला छान झोप लागली. आपण एका मोठ्या संकटातून सुटलो, याचा त्याला आनंद झाला होता. दुसर्‍यादिवशी दुकानदार आपल्या दुकानात बसला असताना त्याचा कवी मित्र विलासराव आला. "काय रे, निवांत बसला आहेस. कसला रे तू रसहीन माणूस. काही वाचत तरी जा."
     " ये, विलास ये!  पण बाबा तुझा तो रसिकतेचा डोस तेवढा देऊन नकोस." दुकानदार
     "बरं बाबा, राहिलं..." असे म्हणून त्याने आपल्या शबनमी बॅगेतून एक जोड चपल बाहेर काढली.  त्या पाहून   दुकानदार उडालाच." काल मागच्या रस्त्याने  निघालो होतो, तर या नव्या कोर्‍या चपला दिसल्या. वाटलं, चोरांनी लांबवताना पडल्या असतील तुझ्या दुकानातून. हे घे ठेव." असे म्हणत कवी महाशयाने चपला समोर ठेवल्या आणि   उत्तरादाखल आभाराची  अपेक्षा न करताच उठून निघून गेला.
     दुकानदाराचं आता डोकं ठणकायला लागलं. त्याने कविमहाशयांना हजारदा कोसत राहिला.
     "नमस्कार, मामा" अचानक दुकानदाराचे ध्यान भंगले.
     "अरे, तू कधी आलास? ये, ये आत बस."
     " हे काय, आताच येतो आहे. सगळं काही ठीक आहे ना?" बसता बसताच भाचाने विचारलं. यानंतर दोघांमध्ये गप्पा रंगल्या. दोन दिवस थांबल्यानंतर भाचा जायला निघाला तेव्हा दुकानदारने संधीचा फायदा घेण्याचा विचार केला. तो एक जोड चप्पल आपल्या भाच्याला देत म्हणाला, " ही जोड घे आणि आपल्या वडिलांना दे. त्यांना माझा नमस्कार सांग."
     चपलांसह भाच्याने निरोप घेतला तेव्हा त्याने सुटकेचा नि:श्वास टाकला.
     एक दिवस दुकानदारचा मेहुणा त्याला भेटायला आला. थोडा वेळ इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्या.  जाताना मेव्हण्याने आपल्या पिशवीतून एक जोड चप्पल बाहेर काढली आणि ती देत म्हणाला," भाऊजी, ही घ्या, तुमच्यासाठी खास कोल्हापुरी आणली आहे." चपलाचे खोके पाहून त्याला फार आनंद झाला. मनातल्या मनात म्हणाला, बरं झालं, एक जोड गेली आणि एक जोड आली.आपलं काही नुकसान झालं नाही"
     मेहुणा गेल्यावर त्याने खोके उघडले तर तीच ती कोल्हापुरी. तो हादरलाच! त्याला दरदरून घाम फुटला. ती हसत म्हणाली," काय शेठ! मी म्हणत होते ना की इथून जाणार नाही. इथली थंड हवा मला आवडते. "
     "तुझा मेव्हणा तुझ्या भाच्याकडे गेला होता. त्याच्या वडिलाने मला तुझ्या मेव्हण्याकडे सुपूर्द केलं... ही ही ही "
     "कोल्हापुरी!" ओरड्त दुकानदार तिथेच बेशुद्ध पडला.                                      

Sunday, December 16, 2012

बालकथा: दानशूर कर्णाची गोष्ट

काल करे सो आज कर,
आज करे सो अब।
पल में प्रलय होएगी,
बहुरि करोगे कब॥
     जितक्या काही महान व्यक्ती होऊन गेल्या, त्यांनी संत कबीरदास यांचा हा दोहा आत्मसात केला असल्याचे दिसते. अशा या महान व्यक्तींमध्ये महाभारतातल्या दानशूर कर्णाचाही समावेश होतो. चला, जाणून घेऊ, या महादानी कर्णाच्या आयुष्यातला असाच एक छोटासा प्रसंग!
     एकदाची गोष्ट. कर्ण आपल्या दरबारात बसला होता. तो कसल्याशा  कामात दंग होता. इतक्यात त्याच्या दरबारात एक याचक आला. त्याने हात फैलावत कर्णाकडे दान मागितले. कामात असलेल्या कर्णाने याचकाचा आवाज ऐकला. लगेच त्याने आपल्या डावा हात वर उचलला आणि आपल्या गळ्यातला हार काढला आणि याचकाच्या हातात दिला. कर्णाची ही कृती एक दरबारी पाहात होता. तो लगेच कर्णाजवळ आला आणि प्रश्न उपस्थित करत म्हणाला,"महाराज, क्षमा असावी. पण डाव्या हाताने दान द्यायचं नसतं, हे आपल्याला ठाऊक असतानाही आपण त्या हाताने दान दिलंत. असा हा अधर्म आपल्या हातून कसा काय घडला?"
     कर्णाने उत्तर दिलं," याचकाने मला दान मागितलं. त्यावेळेला माझ्याजवळ गळ्यातल्या हाराव्यतिरिक्त काहीही नव्हतं. माझा उजवा हात कामात गुंतलेला होता. मी माझा उजवा हात कामातून मोकळा करून दान देण्याचा विचार केला असता तर कदाचित वेगळं घडलं असतं. कदाचित माझा विचार बदलला असता आणि मी त्याला माझा हार देऊ शकलो नसतो. पलभरात काय घडेल, हे कोणाला सांगता येत का? त्यामुळे माझ्या मनात विचार आल्या आल्या, त्याची अंमलबजावणी केली आणि माझ्या डाव्या हाताने हार काढून दान दिला."
     महान व्यक्ती क्षणाक्षणाला किती महत्त्व देत होते, याचा हा एक उत्तम नमुना. विचार आला की, क्षणात त्याची अंमलबजावणी करणार्‍या व्यक्तीला जीवनातील सर्वोच्च उंची गाठणं काही अवघड नाही. म्हणूनच लक्षात ठेवा मित्रानों, कल करे सो आज कर, आज करे सो अब...। वेळच्या वेळी काम करणार्‍याला कधीच कुठला मानसिक त्रास होत नाही. कामे वेळच्या वेळी करणारा कधी सुखी असतो.

बालकथा: सन्मार्ग


     रामपूर गावात सुरेश नावाचा एक गरीब, कष्टाळू आणि अत्यंत साधाभोळा शेतकरी राहात होता. आपल्या थोड्याशा शेतात जे काही पिकायचं, त्यावर आपल्या कुटुंबाची गुजराण करायचा. सुरेश दयाळू होता. इतरांच्या मदतीला धावायचा. प्राणीमात्रावर प्रेम करायचा. एखादा प्राणी-पक्षी जखमी अवस्थेत आढळून आला तर त्याच्यावर मलमपट्टी करायचा, त्याला आसरा द्यायचा. सुरेशच्या शेजारी रमेश राहात होता. तो त्याच्या अगदी उलट्या स्वभावाचा होता. तो भोळ्याभाळ्या माणसांना ठकवायचा, फायदा उपटायचा.
     एक दिवस सुरेश शेतात काम करीत असताना त्याच्या पुढ्यात एक जखमी पक्षी पडला. त्याने वर पाहिले तर घार होती. त्याने पटकन तो जखमी पक्षी उचलला. त्याला पाणी पाजले आणि घरी घेऊन आला. त्याच्या जखमेवर मलम लावले. त्याला अंथरुणात झोपवले आणि तो परत शेतात जायला निघाला. तो दरवाजाकडे वळला तोच  एक मंजुळ स्वर त्याच्या कानी पडला. त्याने वळून पाहिले तर समोर एक सुंदर स्त्री उभी होती. ती म्हणाली," सुरेश, मी वनदेवी. तुझ्या नि:पक्ष सेवेने मी फार प्रसन्न झाले आहे. तुला हवा तो वर माग, मी देईन."
     सुरेश हात जोडून म्हणाला," माते, मला काही नको. तुझे दर्शन झाले, यातच मी धन्य पावलो. वनदेवी आणखी प्रसन्न झाली. तिने सुरेशला सोन्याच्या मोहरांनी भरलेली एक थैली दिली आणि अदृश्य झाली. ही बातमी संपूर्ण गावात पसरली. रमेशला कळले तेव्हा, त्याच्या तोंडाला पाणी सुटले. त्याने ती थैली चोरण्याची योजना बनवली. त्याच रात्री तो संधी साधून सुरेशच्या घरात घुसला. सुरेशच्या कुत्र्याने त्याला पाहिले तसे त्याने भुंकत जाऊन रमेशची पिंडरीच पकडली. रमेश जोरजोराने किंचाळू लागला. त्याच्या ओरडण्याने सुरेश जागा झाला. आजूबाजूचे लोक गोळा झाले. सुरेशच्या चोरीचा इरादा समजल्यावर सगळे त्याला मारायला धावले. सुरेशने त्यांना थांबवले. आणि समजावून परत पाठवले. रमेशने सुरेशचे पाय पकडले आणि माफी मागितली.
     तो म्हणाला, सुरेश, तू खरोखरीच महान आहेस. मी तुझे अहित करण्याच्या हेतूने आले होतो. पण तरीही तू मला वाचवलंस. मला माफ कर." सुरेश म्हणाला," तुला क्षमा मागायचीच असेल तर स्वत; ची माग. चोरी करून तू तुझे इमान डागाळायला निघाला होतास. अरे, प्रामाणिकपणाने जगणार्‍याच्या पाठीशी देव असतो. इथून पुढे इमान राखून जगायला शिक. तू सगळ्या संकटातून मुक्त होशील." रमेशने तसे राहण्याचे वचन दिले. आणि प्रामाणिकपणे जगू लागला.                                                                 

Friday, December 14, 2012

श्रद्धाळू बनवण्याचा बाजार

अलिकडे माणूस अंधश्रद्धाळू अधिक होत चालला आहे. आणि त्याला आणखी श्रद्धाळू बनवण्याचा बाजार अनेक क्लृप्त्या लढवून मांडला जात आहे, त्याला माणूस बळी पडत चालला आहे. एखादी दुर्मिळ योग जुळून  येणार असेल तर, तो  कोणत्या राशीतल्या लोकांना  शुभ आहे व कोणत्या राशीतल्या लोकांना   अशुभ आहे, याबाबत फलज्योतिषी सांगत असतात. त्याचे उदात्तीकरण करण्याचे काम अलिकडे मिडिया जोमात करत आहे. त्यामुळे अशा माणसांचे फावले असून ही माणसे   अशुभतेचा प्रभाव कमी करण्यासाठी काही कर्मकांडेही सूचवत असतात. खरे तर  कोणतीही तारीख शुभ वा अशुभ असत नाही.त्यामुळे १२-१२-२0१२ही तारीखसुद्धा  शुभ असण्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही.
     १२-१२-२0१२ याबाबत काहींनी संकेत दिल्याचा गवगवा निर्माण करण्यासाठी वर्षाचे दोन अंक गाळून १२-१२-१२ असे आकडे नजरेसमोर ठेवून शुभ व अशुभ योगाबद्दल सांगितले गेले किंवा सांगितले जाते.यातही १२ वा.१२ मि.१२ सेकंद ही वेळ शुभ कामासाठी विचारात घेतली जाते.  प्रत्येकजण आपापल्या परिने शुभ कामाचे आयोजन करतो अथवा  सुवर्ण खरेदीसारखे व्यवहार करतो.वास्तविक १२ ही तारीख  व १२ वा महिना ह्या दोनच बाबी जुळतात. वर्षाचा आकडा हा २0१२असा आहे.वेळेच्या बाबतीत उल्लेख करायचा झाल्यास जेव्हा १२ वाजतात. तेव्हा 00 लिहिण्याची पद्धत आहे.
म्हणजेच १२ वाजल्यानंतरची वेळ ही 00.१२.१२ अशी येईल.त्यामुळे पूर्णत: १२ चा योग साधत नाही व योग साधला तरी त्यात शुभ असे काहीही नसते.
ज्या सध्या प्रचलीत असलेल्या कॅलेंडरची १२-१२-२0१२ ही तारीख आहे.ते कॅलेंडर ग्रेगेरी नावाच्या पोपने 'ख्रिस्तोफर क्लॅव्हिन्स' नावाच्या खगोल शास्त्रज्ञाकडून १५८२साली करवून घेतले व त्याची अंमलबजावणी १५ ऑक्टोबर १५८२ पासून आहे.हे कॅलेंडर, पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी घेण्यास लागणार्‍या कालावधीवर म्हणजेच ऋतुचक्राशी संबंधित असणार्‍या सांपत्तीक वर्षावर (ट्रॉपीकल इअर) आधारित आहे.हा कालावधी ३६५.२४२५ दिवसांचा, म्हणजेच ३६५ दिवस, ५ तास ४८ मिनीटे ४५.५१ सेकंदाचा आहे.या कालावधीशी जुळवून घेण्यासाठी जे ग्रेगेरीयन कॅलेंडर तयार करण्यात आले त्याचा कालावधी मात्र ३६५.२४२५ दिवसांचा आहे.म्हणजे यात 0.000३ दिवसांची त्रृटी आहे.त्यामुळे या कॅलेंडरमध्ये ३000 वर्षानंतर अल्पशी दुरूस्ती करावी लागेल, असे यातले जाणकार सांगतात. तद्वतच कोणते वर्ष लिप इअर म्हणून घ्यावे अथवा कोणते शतकवर्ष लिप इअर घेऊ नये, कोणत्या दिवसाचा कालावधी सेकंदाने वाढवावा इत्यादी तरतुदी ह्या कॅलेंडरमध्ये करण्यात आलेल्या आहेत.
     मात्र दि.१२-१२-२0१२ ही तारीख किंवा वर्षातील कोणतीही विशिष्ट तारीख ही शुभ किंवा अशुभ राहील याबाबत उल्लेख नाही. अर्थातच हे मानवी मनाचे खेळ आहेत यात शंका नाही.  अशा प्रकारचा काही तरी दुर्मिळ योग सांगत लोकांना फशी पाडण्याचेच काम काही मंडळी करीत असतात. लोकांनी  कोणत्याही अंधश्रद्धेच्या मागे न लागता तारीख आणि वेळेच्या बाबतीतील शास्त्रीय बाजू समजून घ्यायला हवी.         

Wednesday, December 12, 2012

बालकथा : प्रामाणिक चोर

चंदरपूर राज्यात दुष्काळ पडला होता. चोर्‍यांचे प्रमाण वाढले होते. चोर्‍यांना अटकाव घालण्यासाठी राजाने चोराला पकडून देणार्‍याला दहा हजार मोहरांचे बक्षीस जाहीर केले होते.
     एके रात्री नगरातल्या एक श्रीमंत व्यापार्‍याच्या घरात चोरी झाली. चोराला सिपायांनी पाहिलं होतं. ते त्याचा पाठलाग करत होते. चोर चलाख आणि चतुर होता. तो नगराबाहेर पळून जात असताना त्याला धर्मशाळेजवळ एक झोपडी दिसली. त्याने दरवाजा वाजवला. तिथे एक वृद्ध महिला आपल्या तरूण नातीसह राहात होती. वाटसरू, यात्रेकरू यांना भोजन बनवून देण्याचे काम ती करत होती. त्या मिळणार्‍या मोबदल्यातूनच तिचा घरगाडा चालत होता.
     वृद्ध महिलेने दार उघडताच चोर म्हणाला," आजी, मी शहरात निघालो होतो. रात्र फारच झालीय. म्हटलं इथे भोजन करावं आणि रात्र काढावी आणि सकाळी उठून निघून जावं. आजी, यासाठी मी तुला दहा मोहरा दे ईन."
वृद्ध महिला तयार झाली. नातीला पाहिल्यावर चोराने चौकशी केली, तेव्हा ती वृद्धा म्हणाली, " माझा मुलगा आणि सून एका अपघातात दगावले. इथे आम्ही दोघीच राहतो. आता मला हिच्या लग्नाची चिंता लागली आहे. दुष्काळ पडल्यानं प्रवाशांची संख्याही कमी झालीय..."
     चोर आपल्याकडचे दागिन्याचे गाठोडे उघडून तिला देत म्हणाला," आजी, काही काळजी करू नकोस. हे घे दागिने आणि तुझ्या नातीचा विवाह मोठ्या धुमधडाक्यात करून टाक." एवढे दागिने पाहून वृद्ध महिला चकीत झाली. तिने चौकशी केल्यावर चोर म्हणाला," हे चोरीचे दागिने आहेत."
     चोरीचे दागिने घ्यायला वृद्ध महिलेने नकार दिला. चोर म्हणाला," आजी, एक तर हे दागिने घे, नाही तर मला शिपायांच्या हवाली कर. म्हणजे तुला चोराला पकडून दिल्याचे बक्षीस मिळेल आणि तुला नातीचे लग्न करता येईल."
शेवटी वृद्ध महिलेने त्याला शिपायांच्या हवाली केले. राजाने तिला दहा हजार मोहरा बक्षीस म्हणून देऊ केल्या, पण ती ते घ्यायला नम्रपणे नकार देत म्हणाली," महाराज, मोहरांच्या बदल्यात मला दुसरी भेट हवी आहे. तुम्ही या मुलाची सुटका करा."
     राजा म्हणाला," मग तुला काय फायदा?"                  
वृद्ध महिला म्हणाली," महाराज, हा मोठा भला माणूस आहे. याला इथे मी आणलं नाही, तर हा स्वत; आला आहे...." असे म्हणत तिने घडला प्रकार राजापुढे कथन केला.
     राजाने चोराला माफ केले. पण पुढे म्हणाला," पण तू पुन्हा चोरी करणार नाहीस कशावरून? मी कसा विश्वास करू?"
     चोर म्हणाला, " महाराज, मी नाईलाजाने पोटाच्या खळग्यासाठी चोरी करतो. मला काम मिळालं तर चोरी करण्याच्या प्रश्नच येत नाही." तेवढ्यात वृद्ध महिला म्हणाली," महाराज, मी  माझ्या नातीचे लग्न याच्याशी करावं म्हणते. याच्यापेक्षा योग्य जोडीदार तिला आणखी कोठे मिळणार आहे?"
     राजाने वृद्ध महिलेला बक्षीस तर दिलेच शिवाय चोराला शिपायाची नोकरीदेखील देऊन टाकली.

पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात येणार का?

अलिकडच्या काळात पत्रकारांवरील हल्ले वाढत चालले आहेत. त्यांच्या संरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. पत्रकारांना संरक्षण दिला जाणारा कायदा अस्तित्वात यावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र त्यावर भलतेच प्रश्न उभे करत राज्य सरकारातील मंडळी टोलवाटोलवी करून वेळ मारून नेण्याची भूमिका पार पाडत आहे. कोण म्हणतोपत्रकार कोणाला म्हणायचे? तर कोण म्हणतो,  पत्रकारांकडून होणार्‍या हल्ल्यापासून संरक्षण कसे करायचे?  असे अनेक प्रश्न उपस्थित करीत कोणी तरी मध्येच पत्रकारांचाच नव्या कायद्याला विरोध असल्याची पुडी सोअडतो.  तर कोणी चेंडू विरोधकांच्या कोर्टात टोलवत विरोधी पक्षांचाच कायद्याला विरोध असल्याचा कांगावा करून पळवाट शोधतो. कुणाला अभ्यास गट स्थापन करून कालापव्यय करायचा आहे तर कोणाला असा कायदा केंद्रानेच करावा यासाठी केंद्राकडे आग्रह धरा, असे बिनधास्त वाटते. अशा टोलवाटोलवीत दिवस ढकलले जात आहेत. 
     मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी असे करतच आपला दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला आहे.  अशोक चव्हाण यांनी आपल्या मुख्यमंत्री काळात तत्कालीन माहिती सचिव आनंद कुळकर्णी यांना संभाव्य विधेयकाचा मसुदा तयार करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार पत्रकार व त्यांची  हल्ला विरोधी कृती समिती, तज्ज्ञ  यांच्याशी  चर्चा करून आनंद कुळकर्णी यांनी एक चांगला मसुदा तयार केला होता. दरम्यानच्या काळात अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. पृथ्वीराज चव्हाण यांनी सूत्रे हाती घेतली आणि याच दरम्यान  पत्रकार जे. डे. यांची हत्या झाली. जे.डे यांच्या हत्येने राज्यातील संपूर्ण  वृत्तपत्रसृष्टी  सुन्न होऊन गेली. संतापाचा उद्रेकही झाला.
      संतापलेल्या पत्रकारांनी  थेट मंत्रालयावर मोर्चा काढला.  यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडले जाईल आणि ते संमत करून घेतले जाईल, असे आश्वासन दिले.  आनंद कुलकर्णी यांनी तयार मसुदासुद्धा आपण वाचला आहे आणि तोच मसुदा विधेयक म्हणून सभागृहात मांडण्याचा शब्द दिला. दरम्यानच्या काळात राज्यात अनेक ठिकाणी पत्रकारांवरील अहल्ल्याच्या घटना घडल्या. मात्र तरीही   कायद्याचे विधेयक मात्र सभागृहात मांडले गेले नाही. या कायद्याबद्दल मात्र  हेतुत: गैरसमज पसरविण्याचे काम झाले.
     पत्रकार स्वतः च्या संरक्षणासाठी स्वतंत्र विधेयक मागतात, याचा अर्थ ते स्वतःला वेगळेच कोणी तरी व्हीआयपी मानतात. असे ते कोण लागून गेले, असा सूर उमटून लागला. मात्र, वस्तुस्थिती अशी की, पत्रकारांनी कोणत्याही स्वतंत्र कायद्याची मागणी केलेली नाही. पत्रकारांवरील हल्ला हा अजामीनपात्र गुन्हा ठरवावा आणि पत्रकारांवरील हल्ल्याची प्रकरणे जलदगती न्यायालयाच्या मार्फत चालविली जावीत एवढीच पत्रकारांची मागणी आहे. अर्थात मागणी करण्याची वेळ पत्रकारांवर का आली, याचा विचार केल्यावर आपल्या लक्षात ये ईल कीपत्रकारांवर हल्ला झाल्यावर पोलिसांकडून आरोपींवर दाखल करण्यात येणारे गुन्हे जामीनपात्र असतात. त्यामुळे अटक झाली तरी आरोपी काही वेळातच सुटतात आणि आपलं काय झालं म्हणत उजळ माथ्याने फिरतात. ही एकप्रकारची दहशत आहे.  दुसरे म्हणजे असे खटले वर्षानुवर्षे चालत राहतात. त्यामुळे ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांना न्याय मिळणे अशक्य होऊन जाते. हल्लेखोरांवर किमान वचक बसावा याच प्रामाणिक उद्देशाने पत्रकारांनी ही मागणी लावून धरली आणि ती सार्थ असल्याचे पत्रकारांना वाटते.
      अशा प्रकारची  मागणी करून पत्रकार फार काही वेगळं मागताहेत असेही नाही. तीन वर्षांपूर्वी सरकारने डॉक्टर आणि रुग्णालयावरील हल्ल्यासाठी हा कायदा लागू केला आहे. त्यानंतर डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. डॉक्टरांना लागू असलेला कायदाच आम्हालाही लागू करा एवढीच पत्रकारांची मागणी आहे, अशाप्रकारे कायद्याचे संरक्षण लोकप्रतिनिधींना व सरकारी कर्मचार्‍यांना आहे. समाजातील अन्य काही घटकांनाही आहे. त्यामुळे विशेष काही मागताहेत असे मूळीच नाही. असे असतानाही असा कायदा करताना सरकार टोलवाटोलवी का करतात, असा प्रश्न उपस्थित होतो.
वास्तविक पत्रकारांवर हल्ला करणार्‍यांमध्ये राजकारणी आघाडीवर आहेत. त्यांना आपल्याविरोधात कोणी लिहिलेले आवडत नाही. शिवाय या विधेयकाने पत्रकार शिरजोर होतील आणि याचा त्रास आपल्यालाच होईल, असाही गैरसमज राजकारण्यांमध्ये पसरवला जात आहे. कदाचित यामुळेच राज्य सरकार पत्रकारसंरक्षण कायद्यासंदर्भात टोलवाटोलवीची भाषा करत आहे, असे वाटत आहे. वस्तुत: राज्यात , देशात कायद्याचं राज्य आहे. सनदशीर मार्गाने न्याय मागण्यासाठी सनदशीर मार्ग आहेत. एखादा पत्रकार चुकीचे वार्तांकन करत असेल  तर त्याला दोषी आढळल्यास शिक्षेची तरतूद आहे. काही गुन्ह्यांमध्ये वृत्तपत्राची मान्यताही रद्द हो ऊ शकते. त्यामुळे पत्रकार शिरजोर होतील, म्हणण्याचे काही कारण नाही. जिवितास मिळणार्‍या धोक्यापासून संरक्षण मिळण्याची अपेक्षा यात करण्यात आली आहे. मसुदा खुला केला जावाज्यामुळे सगळ्यांनाच समजेल की, या मसुद्यात काय आहे. मात्र मात्र गुंडगिरीद्वारे पत्रकारांवर  हल्ला करून दहशत निर्माण करणार्‍यांना शिक्षा ही मिळायलाच हवी अथवा धाक  बसायलाच हवा. जिथे पत्रकारांवर हल्ले होत असतील तर सामान्य माणसांची तर काय कथा? सगळ्यांनाच सुरक्षित जीवन जगण्याचा हक्क आहे, त्याला पत्रकार कसा अपवाद असणार आहे?                                               

Saturday, December 8, 2012

ई- मतदान स्वागतार्ह


     मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी राज्यात २0१४ च्या निवडणुकीत 'ई- मतदान' पद्धत अमलात आणण्याचा राज्य निवडणूक आयोग प्रयत्न करीत असल्याची बातमी वाचनात आली. आहे. याचे स्वागत करायला हवे. लोकशाहीमध्ये मतदान प्रक्रिया महत्त्वाची आणि अनिवार्य आहे. इथे बहुमताला प्राधान्य आहे. मतदार मतदानाचे आपले कर्तव्य बजावताना त्याला येणार्‍या अडचणीचा, समस्यांचा विचार होणे आवश्यक आहे. मतदारांमध्ये मतदान करण्याविषयी कमालीची अनास्था आहे. अर्थात त्याला अनेक कारणे असली तरी  मतदान प्रक्रियेत सुलभता आल्यास कोणताही मतदार यापासून वंचित राहणार नाही. मतदान केंद्रावर जाऊन रांगेत उभारून मतदान करण्यापेक्षा घरी बसून अथवा जिथे कोठे असेल तेथून मोबाईल किंवा संगणकावरून मतदान करता येत असेल, यासारखी सोयीची आणखी दुसरी कुठली सोय असणार नाही. याचा विचार राज्य निवडणूक आयोग करत आहे, ते स्वागतार्ह म्हटले पाहिजे.
     मतदानाची घटत चाललेली टक्केवारी   वाढविण्यासाठी 'ई- मतदान' हा चांगला पर्याय हो ऊ शकेल, यात अजिबात शंका नाही. कारण  या पद्धतीचा वापर केल्याने मतदारांना घरी बसून मोबाईल किंवा संगणकावरून मतदान करता येईल. तथापि, या पद्धतीत काही धोकेही आहेत. आणि हे लोकशाही घटनेसाठी घातक आहेत. कारण उमेदवार मतदारांच्या घरी जाऊन प्रलोभने दाखवू शकतात आणि  तेथेच समक्ष मतदान करून घेऊ शकतात  किंवा दहशत निर्माण करूनही  ते मतदारांकडून बाहेरच्या बाहेर मतदान करून घेऊ शकतात.  त्यामुळे 'ई- मतदान' प्रक्रियेत उमेदवारांकडून येणारे प्रलोभन, दडपण हे प्रकार कसे टाळता येतील, याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.  माहिती- तंत्रज्ञान विभाग, त्यातले तज्ज्ञ यांच्या विचारातून यावर उपाय शोधला जाऊ शकतो. 
       0१४ च्या निवडणुकीत हा प्रयोग राज्यात पहिल्याप्रथम राबवण्यात येणार आहे. यातल्या पहिल्या टप्प्यात जे मतदार मतदान केंद्रावर येऊ शकत नाहीत असे, वृद्धाश्रमातील वृद्ध, रुग्णालयातील रुग्ण व निवडणुकीच्या कामात असलेल्या विविध विभागांच्या कर्मचार्‍यांसाठी या पद्धतीचा वापर करण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या अध्यक्षा नीला सत्यनारायण यांनी म्हटले आहे. यानिमित्ताने 'ई-वोटिंग' ची सुरूवात होतेय आणि ही पुरोगामी महाराष्ट्राच्यादृष्टीने चांगलीच बाब म्हटली पाहिजे. वास्तविक, अशा प्रकारच्या 'ई- वोटिंग' चा वापर परदेशात अगोदरच सुरू आहे. आपल्या देशात तूर्तास शहरी भागात राबवायला काहीच अडचण नाही. अर्थात काही समस्या उद्भवणार आहेत, त्याचे निराकरण होत राहिल. यंत्रणा राबविल्याशिवाय त्यातल्या त्रुटी अथवा दोष समजून येत नाहीत. त्यामुळे ई-मतदान प्रक्रियेचे स्वागत करायला काहीच हरकत नाही.             

Friday, December 7, 2012

प्राथमिक शिक्षण : दीर्घकालीन धोरण हवे!


राज्यातीलच नव्हे तर देशभरातील प्राथमिक शिक्षणाची अवस्था वाईट असल्याचे म्हटले जाते. मात्र यासाठी खास दीर्घकालीन धोरण राबविण्याची आवश्यकता आहे. स्थानिक परिस्थितीचा विचार न करता योजना लादल्या जातात. त्यामुळे शिक्षकांची ती योजना राबवताना दमछाक होते. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावावे लागते.
देशातल्या प्राथमिक शिक्षणाच्या एकत्रित प्रगतीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे, त्यात देशातल्या ३५ राज्यांमध्ये आपला महाराष्ट्र १७ व्या क्रमांकावर असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ही बाब मोठी धक्कादायक म्हणावी लागेल. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याची दखल घेऊन तज्ज्ञांचा समावेश असणारा कोअर ग्रुप स्थापन करण्याचा निर्धार केला आहे. वास्तविक राज्यात फार चांगल्या आणि दर्जेदार शिक्षण देणार्‍या शाळा आहेत. मात्र नवा अधिकारी आणि नवा फार्म्युला असे नवनवे प्रयोग राबवण्याच्या नावाखाली शिक्षणाचा बट्ट्याबोळ चालला आहे. शिवाय नव्या सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकासाच्या नावाखाली शिक्षकांना प्रत्यक्ष कामाऐवजी लिखाण काम करण्याची जबाबदारी वाढली आहे. गावातल्या शेंबड्या पोरांपासून तालुका, जिल्हा पातळीवरच्या पुढार्‍यांपर्यंत सगळेच चांगल्या शिक्षकालाही चांगली वागणूक देत नाही. शिक्षकांवर सतत कारवाईचा बडगा उगारण्याची भाषा केली जाते. शिक्षकच भयमुक्त नसेल तर तो कसली पिढी किंवा कसले शिक्षण देऊ शकणार आहे! शाळांची गुणवत्ता पाहात असताना तेथील परिस्थितीचाही विचार व्हायला हवा.
मुले आई-वडिलांबरोबर ऊसतोडणीला जात असतील तर तिथे कशी गुणवत्ता दिसणार आहे. अजूनही ग्रामीण भागात घराची, लहान भावंडांची, जनावरांची राखण करण्यासाठी मुले घरात राहात असतात. ग्रामीण भागात अद्यापही पालकांमध्ये सजगता आलेली नाही. काहीही करीन, पण मुलांना शिक्षण देईन अशी ठाम भूमिका पालकाने घेण्याइतपत प्रयत्न झाले नाहीत. म्हणजे पालकांना अद्यापि शिक्षणाचे महत्त्व समजलेले नाही असा त्याचा अर्थ होतो.
जसे पालकांना शिक्षण समजले नाही, तसे गावाला, प्रत्येक नागरिकाला महत्त्व समजलेले नाही. सर्व शिक्षणाच्या माध्यमातून बर्‍यापैकी शाळा, इमारती, शौचालये, पाण्याची व्यवस्था होत आली आहे. मात्र ते सांभाळण्याची जबाबदारी, त्याची चोख व्यवस्था ठेवण्याची जबाबदारी कोणाची? गावाची ना! पण राज्यभरातल्या शाळांची पाहणी केली असता असे लक्षात येईल की, गावातल्या इमारतींना धोका पोहोचवण्याचे काम, शौचालये, मुतार्‍या यांची वाट लागल्याचे दिसते. शौचालये- मुतार्‍या असून अडचण आणि नसून खोळंबा अशा अवस्थेत आहेत. त्याचा वापर शाळा करीत नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. शाळा, शिक्षण याबाबतीत आस्था दाखवणारी क्वचितच गावे आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात व त्यातून आसुरी आनंद मिळवणार्‍यांना काय शिक्षा आहे? या शाळा सांभाळण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींकडे द्यायला हवी. शाळांना शिपाई, क्लार्क नसल्याने त्यांची देखभाल, दुरुस्ती व्यवस्थित होत नाही. शाळांमधील शौचालये-स्वच्छतागृहे यांची स्वच्छता कोणी ठेवायची? त्यासाठी काय आर्थिक तरतूद आहे? मग या भौतिक सुविधा व्यवस्थितरीत्या कशा राहणार?
शाळांची एक गुणवत्ता ठरवायला हवी. शाळांनी भरून दिलेल्या अहवालाची वस्तुनिष्ठ तपासणी व्हायला हवी आणि त्या शाळेपुरता शैक्षणिक गुणवत्तेचा आराखडा तयार करण्यात यावा. शाळांना त्यानुसार भौतिक सुविधा द्यायला हव्यात. म्हणजे शाळांची एक श्रेणी ठरवून त्यानुसार भौतिक सोयीसुविधा पुरवाव्यात व शैक्षणिक दर्जाची अपेक्षा केली जावी. आज खरे तर कार्यानुभवात्मक शिक्षणाची अधिक गरज आहे. संगणक, क्रीडा यांवर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे. मात्र नेमक्या याच गोष्टींचा अभाव दिसून येतो. कार्यात्मक साधनांची, क्रीडांगणाची कमतरता आहे. कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण प्रशिक्षित शिक्षकांची वाणवा आहे. इंग्रजी ही ज्ञान, कार्यभाषा म्हटली जात असली तरी अद्यापही प्रशिक्षित शिक्षक मिळत नाहीत. प्रशिक्षण, साधनांची उपलब्धता याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. इंग्रजी माध्यमाचे शिक्षक, कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण प्रशिक्षण देणारी अध्यापक विद्यालये निर्माण व्हायला हवीत. राज्यातीलच नव्हे तर देशभरातील प्राथमिक शिक्षणाची अवस्था वाईट असल्याचे म्हटले जाते. मात्र यासाठी खास दीर्घकालीन धोरण राबविण्याची आवश्यकता आहे. आज शिक्षणाच्या बाबतीतही वरून लादण्याचाच प्रकार चालला आहे. वास्तविक तो खालून वरती सरकवण्याची आवश्यकता आहे. स्थानिक परिस्थितीचा विचार न करता योजना लादल्या जातात. त्यामुळे शिक्षकांची ती योजना राबवताना दमछाक होते. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावावे लागते. मुलांच्या सवडीने, त्यांच्या कुवतीप्रमाणे शिक्षण देण्याचा अट्टहास केला असला तरी प्रत्यक्षात तसे राबवण्याबाबत जागरूकता नाही. शाळा तपासणी करणार्‍या अधिकार्‍यांना व पदाधिकार्‍यांना याबाबत प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
अलीकडेच शाळांना दर्जा ठरविणारा अहवाल स्थानिक पातळीवरून ते राज्य पातळीपर्यंत शाळांकडून घेण्यात आला आहे, त्यानुसार त्यांचा दर्जा ठरवून देऊन त्यांना विशेष सोयी-सुविधा आणि मार्गदर्शन देण्याचे नियोजन व्हायला हवे. कुठल्याही गोष्टीची सरसकट अंमलबजावणी न करता शाळांच्या दर्जानुसार त्याची अंमलबजावणी व्हायला हवी. अद्यापि शिक्षकांवरची अशैक्षणिक कामे कमी झालेली नाहीत. कागदपत्रांची गर्दी थांबलेली नाही. मुख्याध्यापकाचे काम करणार्‍या शिक्षकाला शाळा, वर्ग आणि गावपातळीवर सर्वच कामांची जबाबदारी पार पाडताना मोठी कसरत करावी लागते. शाळा बांधकाम वगैरे कामांमुळे शिक्षकांची शिकवण्याची मानसिकता राहात नाही. शिक्षकांना मुलांना घडविण्याव्यतिरिक्तची कुठलीही जबाबदारी दिली जाऊ नये. शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. शिक्षकांनीही नवनव्या गोष्टी शिकण्याचा ध्यास घेतला पाहिजे. ते शिकण्यासाठी शिक्षण खात्याने सोयी उपलब्ध करून द्यायला हव्यात. उदाहरणच द्यायचे झाल्यास आपल्याला अनेक गोष्टींचे देता येतील. ग्रामीण भागात संगणक, विविध संगीतवाद्ये शिकण्याच्या सोयी उपलब्ध नाहीत. गायन, चित्रकला, नृत्य यासाठी परफेक्ट मार्गदर्शन मिळत नाही. इतकंच काय, ग्रामीण भागात राहणार्‍या मुलांना माती परीक्षण, त्यांचा भौगोलिक परिसर याचीही शास्त्रशुद्ध माहिती नसते किंवा तशी माहिती देणारी यंत्रणा उपलब्ध नाही. वाचन, लेखन आत्मसात करताना मुलांना आनंददायी शिक्षण मिळावे, अशी अपेक्षा केली जात असली तरी तशी उपलब्धता असायला हवी आहे. शिक्षणावर बराच पैसा खर्च केला जात असल्याचे म्हटले असले तरी तो योग्य तर्‍हेने होण्याचीही आवश्यकता आहे.
- मच्छिंद्र ऐनापुरे saamana, 7/12/2012

Thursday, December 6, 2012

महाराष्ट्राची भारनियमनातून मुक्तता कधी?

     गेल्या हिवाळी अधिवेशनात तत्कालिन ऊर्जामंत्री अजितदादा पवार यांनी १२ डिसेंबर २०१२ पर्यंत महाराष्ट्र भारनियमनमुक्त होईल, असे ठामपणे घोषणा केली होती. त्याला मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण यांनीही दुजोरा दिला होता.  आता ही तारीख जवळ यायला काही दिवसच बाकी आहेत. आणि  पुढील आठवड्यात हिवाली अधिवेशनाला सुरुवात ही होत आहे. मात्र भारनियमनमुक्तीचे वारे कोठेच वाहताना दिसत नाही. तसे वातावरणही कोठे आढळून येत नाही. आजही राज्यातील गावे, शहरे अंधारात चाचपडताहेत. महावितरण कंपनी थकबाकीच्या मागे लागली आहे तर ऊर्जामंत्रीपदाचा चार्ज घेतलेल्या राजेश टोपे हे महाराष्ट्र राज्य भारनियमनमुक्त होऊ शकत नाही, असे सांगताहेत. कुणाचा पायपोस कोणाला नाही. म्हणजे सगळा सावळा गोंधळ चालू आहे. गेल्या सहा वर्षात राज्याला चार ऊर्जामंत्री झाले. त्या सगळ्यांनी भारनियमनमुक्तीचे आश्वासन दिले. पण त्यांना अंधारात चाचपडत असलेल्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनात प्रकाश आणणे शक्य झाले नाही. २००६ मध्ये दिलीप वळसे-पाटील, २००८ मध्ये सुनील तटकरे, २०१० मध्ये अजितदादा पवार आणि आता राजेश टोपे, अशी ही मंडळी विजेचा भार हलका करू शकले नाहीत. आता येत्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकार आणखी काय घोषणा अथवा गमजा करून राज्यातल्या जनतेची करमणूक करतेते पाहावे लागेल. एवढे मात्र निश्चित कीविजेबाबतीत राज्य सरकार अजिबात गंभीर नाही.
     भारनियमनामुळे राज्यातला ग्रामीण भागातला माणूस कातावून गेला आहे. शेतकर्‍याला तर पाठशिवणीचा खेळ अनुभवावा लागत आहे. वीज आहे, तर पाणी नाही आणि पाणी आहे, तर वीज नाही, अशा गर्देत सापडलेल्या शेतकर्‍याला मोठा आर्थिक फटका बसतो आहे. गेल्या दोन वर्षांपासून शेतकर्‍याला पावसाबरोबरच विजेनेही झटका दिला आहे. शेतीमुळे उदवस्त झालेल्या शेतकर्‍यांनी  वैतागून शेती विकून टाकली आहे. परिणामी राज्यातल्या शेतीच्या उत्पन्नात घटत होत चालली असल्याचे दिसते  आहे.
      मध्यंतरी केंद्र सरकार देशातल्या गरीब कुटुंबांना मोबाईल द्यायला निघाले होते. अर्थात बरीच ओरड आणि माध्यमांमध्ये मोठी चर्चा झाल्यावर  हा निर्णय अंमलात आणण्याअगोदरच बासणात गुंडाळून ठेवला. खरे तर ग्रामीण भागातल्या जनतेला विजेची मोठी आवश्यकता आहे. आज विजेशिवाय पर्याय नाही, अशी परिस्थिती आहे. गावातले, शेतातल्या विजेचा प्रश्न तूर्त बाजूला ठेवले  तरी घराघरात विजेमुळे प्रकाश  यायला काहीच अडचण नाही. पण तसे होताना दिसत नाही. स्वातंत्र्यानंतर ६० वर्षानंतर अजूनही लोकांना अंधारात चाचपडावे लागत आहे. घरात प्रकाश करण्यासाठी  निदान सरकारने गरिबांना मोबाईलाऐवजी सौरदिवे दिले तरी बराच घरोघरीचा प्रश्न मिटणार आहे. शासकीय अनुदानातून ही सौरदिवे चांगल्या उपयोगाचे ठरतील. मात्र शासनाला हिताचे काही सुचत नाही.

     याशिवाय आजही हजारो वाड्या-वस्त्यांवर दिवाबत्तीची सोय नाही. यामुळे लोकांची मोठी गैरसोय  होत आहे. घरात वीज नाही, दारात वीज नाही, अशा अवस्थेत राज्यातला नागरिक जगत असताना राज्यशकट चालवणारे मात्र बिनधास्त भारनियमनमुक्तीच्या वल्गना करताना दिसतात. वास्तविक राजकारण्यांच्या आश्वासनाला जनता विटली आहे. तरीही त्यांचा घोषा सुरूच असतो, याला काय म्हणायचे? असा प्रश्न लोकांना पडला आहे.   दिवाबत्ती (पथदिवे) नसल्याने हजारो खेड्यातल्या लोकांची  गैरसोय होत आहे. तसेच चोर्‍या-दरोड्यांचे प्रकारही वाढत आहेत. या गोष्टी टाळण्यासाठी ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर दिवाबत्तीची सोय करणे आवश्यक आहे; परंतु दिवाबत्तीचा प्रस्ताव देण्यासाठी ग्रामपंचायतींना अनेक प्रकारची कागदपत्रे जोडावी लागतात.  ग्रामसेवक संघटनेचा एक पदाधिकारी म्हणाला की, हा प्रस्ताव करून द्यायला बराच त्रास होतो.  प्रस्ताव देताना त्यामध्ये प्रामुख्याने मागील तीन वर्षांचा अर्थसंकल्प, वार्षिक अहवाल,हातनकाशा, वीजवितरण कंपनीच्या वायरमनचा अहवाल, विजेसाठी लागणार्‍या खांबांचे अंदाजपत्रक, पंचायत समितीची शिफारस अशी बरीच कागदपत्रे जोडून प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी पाठवावा लागतो. एवढ्यावर प्रश्न संपत नाहीत, नव्हे इथून नवीन प्रश्न तयार होतात. एकतर  जिल्हा परिषदेचे कार्यालय गावांपासून दूर असल्याने दिवाबत्तीचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचार्‍यांना पाठपुरावा करणे शक्य होत नाही. दुसरे म्हणजे अनेकवेळा जिल्हा परिषदेकडे पाठविलेल्या प्रस्तावाची कागदपत्रे गहाळ होतात. त्यामुळे साहजिकच पुन्हा कागदपत्रे गोळा करून प्रस्ताव तयार करण्यास विलंब लागतो. तर काही वेळेला त्रुटी राहिल्याने प्रस्ताव परत ग्रामपंचायतीकडे पाठविला जातो.
राज्य शासनाने विकासाच्या कामात कागपत्रांची अडचण आणू नये, असे लोकांना वाटते. वीज ही लोकांची गरज आहे आणि त्यांचा हक्क आहे, यासाठी मधे येणार्‍या  अनेक गैरसोयी शासनाने विचार घेण्याची  व त्यावर   उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक गोष्टीत अडचणी उभा केल्यावर कसे महाराष्ट्र विजमय आणि भारनियमनमुक्त होईल. आपल्या हातून होत नसेल तर राज्यकर्त्यांनी वल्गना करू नयेत

Tuesday, December 4, 2012

लाचखोरांविरोधात तक्रारी वाढायला हव्यात

     सांगली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे आणि त्यांचे स्वीयसहाय्यक व शिपाई १५ हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या गळाला लागले. मोठा अधिकारी गळाला लागल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असली तरी अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्यांच्या भ्रष्टाचाराच्या चर्चा सतत ऐकायला मिळत होत्या, तर जिल्हा परिषदेच्या सभागृहातही त्याची सतत चर्चा होत होती. शेवटी पापाचा घडा भरला आणि नवाळे गळाला लागले. यामुळे सांगली जिल्हा परिषदेची मात्र मोठी नाचक्की झाली आहे. असे असले तरी अलिकडच्या काळात मोठे अधिकारी लाचलुचपत विभागाच्या गळाला लागण्याचे प्रमाण वाढले आहे. यात त्यांना पकडून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावणार्‍या कार्यकर्त्यांचा वाटा मोठा आहे. भ्रष्टाचार खपवून घेतला जात नाही आणि आता या विषयी चांगलीच जागृती झाल्याचे दिसून येत आहे.
     पुणे विभागात लाचखोरी करणार्‍या महाभागांच्या विरोधात तक्रारींच्या संख्येत वाढ झाल्याचे लाचलुचपत विभागाच्या कारवाईमुळे दिसून येते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०१२ या वर्षात १०२ लोकांना लाच घेताना आपल्या जाळ्यात अडकविले आहे. असं म्हटलं जातं की, आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. गतवर्षी म्हणे या विभागाच्या जाळ्यात ६९ लाचखोर महाभाग अडकले होते. गेल्या आणि या वर्षीच्या आकडेवारीचा विचार केला तर आपल्या लक्षात ये ईल की, यात यंदा तीस टक्के वाढ झाली आहे. भ्रष्टाचाराविषयी जनसामान्यांमध्ये कमालीची चीड आहे. ही चीड आता अशाप्रकारे बाहेर पडते आहे, ही चांगलीच गोष्ट म्हटली पाहिजे.
     पुणे विभागातल्या सांगलीसह पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा या पाच जिल्ह्यात वर्षभरात लाचलुचपत विभागाने टाकलेल्या जाळ्यात शंभराहून अधिक लाचखोर महाभाग सापडले असले तरी यात आणखी एक समाधानाची बाब अशी की, यात अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, समाजकल्याण अधिकारी असे मोठे मासे गळाला लागले आहेत. याअगोदर त्यांच्या हाताखालचे किंवा अन्य चतुर्थ कर्मचारीच गळाला लागत होते. आणि त्यांच्यामागचा प्रमुख सूत्रधारच मागे राहत होता. मोठे मासे गळाला लागल्याने याचा वचक निर्माण होण्यास मदत होणार आहे. सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातल्या तहसीलदाराच्या लाचप्रकरणाबरोबरच सांगलीतच सुपर क्लास-वन दर्जाचा अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात सापडल्याने सर्वसामान्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई होण्याची आवश्यकता आहे. आणखी एक समाधानाची बाब म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या सरकारी अधिकारी-कर्माचारी लोकांवर कारवाई हो ऊन शिक्षा होण्याचे प्रमाणही वाढले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार या वर्षभरात ८४ खटले निकाली निघाले आहेत. त्यातल्या ३४ प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे.
     लाचप्रकरणात अडकलेल्या लोकांवर कित्येक वर्षे खटला चालत राहतो. काही खटल्यात दम राहत नाही. तक्रारदार पहिल्यांदा ज्या जोशाने कामाला लागलेले असतात, तो त्यांचा जोश नंतर ओसरतो. त्यामुळे साहजिकच लाच घेणार्‍यांचे फावते. पुढे तो पुन्हा उजळमाथ्याने फिरायला मोकळा होतो. शिक्षा हो ऊ लागल्याने आता चांगलाच वचक बसन्यास मदत होणार आहे. अलिकडच्या काळात भ्रष्टाचाराविरोधात देशभरात मोठे आंदोलन झाले. त्याचा परिणाम म्हणूनच तक्रार करणार्‍यांची संख्या वाढत आहे. मुळात भ्रष्टाचाराविरोधात लोकांमध्ये चीड, संताप असतोच. अगदीच असह्य झाल्यावर कोणीही गप्प बसत नाही. गळाला आले की, माणूस चिडीला पेटतो. त्यातूनच तक्रारींचे प्रमाण वाढत राहते. तरीही पाच जिल्ह्यांच्या कारभाराचा विचार करता ही गुन्ह्यांची शंभरी कमीच आहे, असे म्हणायला हवे. तक्रारींची संख्या अजूनही फारच कमी आहे. यात वाढ व्हायला हवी. तरच लाचखोरांवर वचक बसणार आहे.   
यावर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सापळे लावताना सुमारे १७ लाख रुपयांची रक्कम वापरण्यात आली. ही देखील आतापर्यंतची सर्वाधिक रक्क्म आहे. लाचखोर अधिकार्‍यांच्या घरी छापे घातल्यानंतर सुमारे वीस कोटी रुपयांची अपसंपदा ( वेतन व इतर अधिकृत स्त्रोतांव्ततिरिक्तचे उत्पन्न) उघड झाली. तसा गुन्हाही संबंधितांवर दाखल झाला. लाचखोरांना पकडण्यासाठी पुण्यात ३९, सातार्‍यात १९, सोलापूरमध्ये १८, सांगलीत १५ आणि कोल्हापुरात ११ सापळे लावले गेले. (सोर्स- दै. सकाळ)

Saturday, December 1, 2012

बालकथा अति घाई, मती गुंगवी

     घोडा पूर्वी दुसर्‍या वन्य प्राण्यांप्रमाणे जंगलातच राहत होता. मोठे हिंस्त्र प्राणी अन्य जनावराबरोबर घोड्यांचीही शिकार करत.  एकदा वाघ पाठी लागल्याने घोडा गावाच्या दिशेने पळून आला. वाटेत एका शेतकर्‍याला भेटला. त्याच्याजवळ जात म्हणाला, शेतकरीदादा, माझ्या मागे वाघ लागला आहे. तो मला फाडून खाईल. मला वाचव."
घोड्याची दीनवाणी अवस्था पाहून शेतकर्‍याला त्याची दया आली. शेतकरी म्हणाला," मित्रा, अजिबात काळजी करू नकोस. तू मदत मागितली आहेस ना, मग नक्की मिळेल. वाघापासून तुझे रक्षण केले जाईल. वाघ तुझे काहीही बिघडवणार नाही. पण, तुला यासाठी माझ्या काही अटी मान्य कराव्या लागतील."
     आपल्या जीविताची हमी मिळाल्यावर घोड्याला फार मोठे हायसे वाटले. तो मागचा-पुढचा विचार न करता पटकन होकार देत म्हणाला," मला काय काम करावं लागेल, दादा?" मात्र त्याच्या चेहर्‍यावर किंचित भीतीची छटा होती.
     "तुला मी सांगेल तसं वागावं आणि करावं लागेल." शेतकरी म्हणाला.
     "दादा, तू सांगशील तसं वागेन. बस्स! मला तेवढा त्या क्रूर वाघापासून वाचव."
     शेतकर्‍याने त्याच्या गळ्याला दोरी बांधली आणि त्याला घरी घेऊन आला. " आता इथे तू अगदी सुरक्षित आहेस. मी तुला  ज्यावेळी बाहेर घेऊन जाईन, त्यावेळी तुझ्या पाठीवर स्वार होईन. मी तुझ्यासोबत असल्याने वाघ तुला काहीही करण्याची  हिंमत करणार नाही."
     बरं दादा, पण मला इथे काही खायला मिळणार की नाही ?" घोडा.
     "अलबत, माझ्या मित्रा! मी तुला रोज हिरवं, कोवळं आणि मऊ-लुललुशीत गवत आणि चना आणून खायला घालीन." शेतकरी म्हणाला.
      शेतकर्‍याची ही गोष्ट ऐकून घोडा आनंदला.  जीव वाचणार असेल आणि  खायलाही मनाजोगे, चांगले खुराक मिळणार असेल तर कशाला हवी, जंगलातली भीतीदायक भटकंती!  घोडा खूश झाला. शेतकर्‍याने त्याला लगाम घातला. पाठीवर खोगीर टाकले. आणि त्यावर स्वार झाला.
     आता या आपल्या नव्या जीवनशैलीने घोडा समाधान पावला. पण हळूहळू मात्र त्याला आपण कोठे येऊन फसलो, असे वाटू लागले. त्याने मनोमन विचार केला, मी इथे सुरक्षित नक्कीच आहे. पण स्वतंत्र नाही. मी माझं संरक्षण मिळवलं, परंतु स्वातंत्र्य गमावलं. मला हा सौदा फारच महागात पडला. पण आता घोडा विवश होता.
मी एका शेतकर्‍याच्या भीतीमुळे मागचा-पुढचा कसलाही विचार न करता अटी मान्य केल्या. खरेच! मी जर का त्यादिवशी न घाबरता धीरानं,  विचारपूर्वक निर्णय घेतला असता, तर ही गुलामी पदरात पडली नसती. बिच्चारा! आता काय करणार होता? आणि   शेवटी त्या दिवसापासून घोडा माणसाचा गुलाम  बनला.