Wednesday, December 12, 2012

बालकथा : प्रामाणिक चोर

चंदरपूर राज्यात दुष्काळ पडला होता. चोर्‍यांचे प्रमाण वाढले होते. चोर्‍यांना अटकाव घालण्यासाठी राजाने चोराला पकडून देणार्‍याला दहा हजार मोहरांचे बक्षीस जाहीर केले होते.
     एके रात्री नगरातल्या एक श्रीमंत व्यापार्‍याच्या घरात चोरी झाली. चोराला सिपायांनी पाहिलं होतं. ते त्याचा पाठलाग करत होते. चोर चलाख आणि चतुर होता. तो नगराबाहेर पळून जात असताना त्याला धर्मशाळेजवळ एक झोपडी दिसली. त्याने दरवाजा वाजवला. तिथे एक वृद्ध महिला आपल्या तरूण नातीसह राहात होती. वाटसरू, यात्रेकरू यांना भोजन बनवून देण्याचे काम ती करत होती. त्या मिळणार्‍या मोबदल्यातूनच तिचा घरगाडा चालत होता.
     वृद्ध महिलेने दार उघडताच चोर म्हणाला," आजी, मी शहरात निघालो होतो. रात्र फारच झालीय. म्हटलं इथे भोजन करावं आणि रात्र काढावी आणि सकाळी उठून निघून जावं. आजी, यासाठी मी तुला दहा मोहरा दे ईन."
वृद्ध महिला तयार झाली. नातीला पाहिल्यावर चोराने चौकशी केली, तेव्हा ती वृद्धा म्हणाली, " माझा मुलगा आणि सून एका अपघातात दगावले. इथे आम्ही दोघीच राहतो. आता मला हिच्या लग्नाची चिंता लागली आहे. दुष्काळ पडल्यानं प्रवाशांची संख्याही कमी झालीय..."
     चोर आपल्याकडचे दागिन्याचे गाठोडे उघडून तिला देत म्हणाला," आजी, काही काळजी करू नकोस. हे घे दागिने आणि तुझ्या नातीचा विवाह मोठ्या धुमधडाक्यात करून टाक." एवढे दागिने पाहून वृद्ध महिला चकीत झाली. तिने चौकशी केल्यावर चोर म्हणाला," हे चोरीचे दागिने आहेत."
     चोरीचे दागिने घ्यायला वृद्ध महिलेने नकार दिला. चोर म्हणाला," आजी, एक तर हे दागिने घे, नाही तर मला शिपायांच्या हवाली कर. म्हणजे तुला चोराला पकडून दिल्याचे बक्षीस मिळेल आणि तुला नातीचे लग्न करता येईल."
शेवटी वृद्ध महिलेने त्याला शिपायांच्या हवाली केले. राजाने तिला दहा हजार मोहरा बक्षीस म्हणून देऊ केल्या, पण ती ते घ्यायला नम्रपणे नकार देत म्हणाली," महाराज, मोहरांच्या बदल्यात मला दुसरी भेट हवी आहे. तुम्ही या मुलाची सुटका करा."
     राजा म्हणाला," मग तुला काय फायदा?"                  
वृद्ध महिला म्हणाली," महाराज, हा मोठा भला माणूस आहे. याला इथे मी आणलं नाही, तर हा स्वत; आला आहे...." असे म्हणत तिने घडला प्रकार राजापुढे कथन केला.
     राजाने चोराला माफ केले. पण पुढे म्हणाला," पण तू पुन्हा चोरी करणार नाहीस कशावरून? मी कसा विश्वास करू?"
     चोर म्हणाला, " महाराज, मी नाईलाजाने पोटाच्या खळग्यासाठी चोरी करतो. मला काम मिळालं तर चोरी करण्याच्या प्रश्नच येत नाही." तेवढ्यात वृद्ध महिला म्हणाली," महाराज, मी  माझ्या नातीचे लग्न याच्याशी करावं म्हणते. याच्यापेक्षा योग्य जोडीदार तिला आणखी कोठे मिळणार आहे?"
     राजाने वृद्ध महिलेला बक्षीस तर दिलेच शिवाय चोराला शिपायाची नोकरीदेखील देऊन टाकली.

1 comment:

  1. कुठल्याही वाईट घटनेला चांगले वळण लागू शकते.
    मात्र ते देणारा प्रत्येक वेळी तेथे असतोच असे नाही
    ह्यालाच नियती असे म्हणतात.
    असे मला वाटते
    आपली कथा आवडली

    ReplyDelete