Wednesday, April 24, 2019

मतदान प्रक्रियेसाठी सोपी पद्धत वापरा

व्हीव्ही पॅटच्या 50 टक्के  स्लीपांची मोजणी करण्याची मागणी देशातल्या 23 राजकीय पक्षांनी केली आहे. निवडणूक आयोगाने या मागणीला नकार दिला असल्याने या राजकीय पक्षांनी शेवटी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. व्हीव्ही पॅट यंत्रे खरेदी केली असतील तर यातील 50 टक्के स्लिप मोजण्यास काय हरकत आहे,असा त्यांचा सवाल आहे. सक्षम आणि पारदर्शक लोकशाहीसाठी राजकीय पक्ष व लोकांच्या मनातील शंका दूर व्हाव्यात ही आपली बाजू मांडण्यासाठी आता या राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी जनजागृती मोहीम उघडली आहे. ईव्हीएम मशीन हॅक करून आपल्याला हवे तसे निकाल लावले जाऊ शकतात, असा दावा विरोधकांकडून  केला जात आहे.

Sunday, April 14, 2019

70 व्या वर्षी पहाड खोदून गावात पाणी आणणारा अवलिया: दैतारी नायक


माणसाची इच्छाशक्ती प्रचंड असेल तर तो अशक्य कोटीतील गोष्ट शक्य करून दाखवतो. वय सत्तरीकडे झुकलेले,गावाला पाणी द्यायला प्रशासन हतबल, गावकरी आहे,त्यात जगण्याच्या अधीन झालेले. गावात उपासमार, शिक्षणाचा अभाव, अशा कठीण परिस्थितीत दिवस काढणार्या लोकांना आपल्या इच्छाशक्तीने पाणी देऊन मोठं कर्म केलेल्या दैतारी नायक यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात मध्ये कर्मयोगी असा उल्लेख केला. नुकताच त्यांना पद्मश्री देऊन गौरव करण्यात आला आहे. अशा माणसांची गरज इतरांना नक्कीच प्रेरणादायी ठरते. पहाड खोदून गावाच्या शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचे संकट दूर करणारा अवलिया हा तिथल्या लोकांसाठी देवच म्हटला पाहिजे.

Saturday, April 13, 2019

(बालकथा) आणि विठूचं आयुष्य बदललं


कचरा आणा... कचरा…” या आवाजाबरोबरच दरवाजाची बेल वाजली. प्रमिला कचर्याची बादली घेऊन बाहेर आली. आज कचरा उचलणार्या दादाबरोबर अकरा-बारा वर्षांचा एक मुलगाही आल्याचं तिनं पाहिलं.
 याला यापूर्वी कधी पाहिलं नाही. ” प्रमिलानं विचारलं.
 वयनी, हा माझा मुलगा आहे. आता यालाही कामाला लावायचं आहे. ”
याला शाळेला का नाही पाठवत? शिकला तर चांगली नोकरीदेखील मिळून जाईल. ” प्रमिला म्हणाली.

(लघुकथा) फर्स्ट इंप्रेशन

बहिणीचा फोन आल्यावर जगन सगळी कामं जिथल्या तिथं टाकून सांगलीला आला. बहिणीनं सांगितलं होतं की, आम्ही कोल्हापुरातून सांगलीत शिफ्ट होतोय. तुझी मदत लागणार आहे. आईनं त्याला जायला नकार दिला होता. पेरणीसाठी ट्रॅक्टर सांगितला होता. पण लगेच जी एसटी मिळाली,त्यात बसलासुद्धा! बहिणीकडे सामानांचा ढिग पडला होता. आल्या आल्या तो बहिणीसोबत घर सजवण्याच्या कामाला लागला. या दरम्यान शेजार्यांनी चहा-नाश्टा आणून दिला. पोहे खावून वर चहा पिऊन जगन पुन्हा कामाला लागला. संध्याकळचे पाच वाजत आले. काम आवरत आलं.

(लघुकथा) जाणीव

पवारसाहेबांचे दोन-चार शेजारी त्यांच्या घरी आले. त्यांना पाहून पवारसाहेब म्हणाले, “आज कसं काय येणं केलंत माझ्या घरी? ”
त्याचं असं आहे, तुमचा बंड्या आपल्या कॉलनीतल्या मुलींची छेड काढतो. त्याला समजवा. तुमच्याही घरी मुलगी आहे म्हटलं, ” त्यातला एकजण म्हणाला.

Monday, April 8, 2019

कॅल्शियम कार्बाईड बाजारात उपलब्ध होतेच कसे?


   
 सध्या बाजारात सकस,स्वच्छ, रसायनरहित असं काही खायचे पदार्थ मिळणे दुर्लभ झाले आहे. सगळा बाजार भेसळीचा भरला आहे. भेसळ करणार्या लोकांना जबर अद्दल घडावी म्हणून शिक्षेची तरतूदही मोठी आहे,तरीही त्याचा फारसा परिणाम माणसांच्या जीवावर उठलेल्या लोकांवर झालेला नाही. अशाच प्रकारे फळ पिकवण्यासाठी घातक रसायनाचा वापर करणार्यांवरही वचक राहिला नाही. साहजिकच फळ खाल्ल्यानंतर अनेक त्रासांना तोंड देण्याचा प्रकार घडत आहे. सध्या आंब्यांचा सिझन सुरू होतोय. आंबा लवकर पिकावा, त्याला रंग यावा म्हणून सर्रास कॅल्शियम कार्बाईडसारख्या घातक रसायनाचा वापर केला जातो. याचा वाढता वापर लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासन (एफडीए)ने त्यावर बंदी घातली आहे. पण लक्षात कोण घेतो, असा प्रश्न आहे. कारण याचा वापर करणार्या शेतकरी किंवा व्यापार्यांना शिक्षा झाल्याचे काही ऐकिवात नाही. त्यामुळे याचा वापर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ग्रामीण भागातला छोटा शेतकरीसुद्धा आता याचा वापर करताना दिसत आहे.

Wednesday, April 3, 2019

मी असा, मी तसा


माझा स्वत:चा स्वभाव ओळखणं माझ्यासाठी कठीण आहे. मी कसा आहे, याची माझी मलाच कल्पना नाही.त्यामुळे माझ्या स्वभावाविषयी सांगताना माझाच गोंधळ सुर्रू आहे. कारण आपण सांगणार आहे, तो तसा मी खरेच आहे का? त्याला माझी बालपणीची परिस्थितीही कारणीभूत आहे. जशी परिस्थिती येईल, तसा झुकत गेलो आहे. लहानपणी आपलं अस्तित्व शून्य होतं, कुणी काहीही म्हणावं, त्याचा राग धरावा आणि त्याचा सूड घ्यावा, असे मनात वाटत असलं तरी तसं धाडस काही मी कधी केलेलं नाही. उलट अपमान मूग गिळून सहन करणे, एवढेच माहित! मात्र यामुळे एकमात्र झालं. मी माणसांपासून दूर पळत राहिलो. माणसांची भिती वाटायला लागली. माणसं काही म्हणतील आणि आपली टर उडवतील, म्हणून त्यांच्यात मिसळत नव्हतो. साहजिकच एकटं राहणं आलं.याचा परिणाम आजही दिसतो. आजही स्टेजवर उभारून ठामपणे आपली मते मांडता येत नाहीत. दुसर्याच्या मतांचीच री ओढून वेळ मारून नेणे, हेच करत आलो आहे. शालेय वयात असं डेरिंग करून परिपाठात सहभाग घेतल्याचं आठवत नाही. डी.एड.लाही पुढे येऊन काही मिनिटे बोलल्याचं आठवत नाही. म्हणजे बोलण्याच्या बाबतीत आपण त्याच्यापासून चक्क पळच काढला आहे.

Monday, April 1, 2019

हास्य आणि आरोग्य


आपल्या हसण्यावर मोठी सांस्कृतिक बंधनं लागली आहेत. म्हटल जातं की, विनाकारण नका हसू, आयुष्य काही हसण्यावरी नेण्याची गोष्ट नाही. पण खरी गोष्ट अशी की, हास्य,हसू याच्याशिवाय जीवन म्हणजे एकाद्या आजारासारखं होऊन जाईल. अमेरिकेतील एक संस्था आहे, इंस्टीट्यूट फॉर द स्टडी ऑफ ह्यूमन नॉलेज. या संस्थेच्या जागरूक डॉक्टरांनी माणसाच्या आरोग्यावर संशोधन केलं आहे. ते या संशोधनानुसार अशा निष्कर्षापर्यंत पोहचले आहेत की, हास्यात आरोग्य प्रदान करण्याची अदभूत क्षमता आहे.