Friday, December 30, 2011

लोभ आणि महत्त्वाकांक्षा

     लोभ आणि महत्त्वाकांक्षा समाजात मोठी विषमतेची दरी उत्पन्न करीत असते. याचा प्रत्यय देणारा हा एक प्रसंग. कुटुंब कल्याण विभागाचे कर्मचारी गावच्या सरपंचांकडे गेले. थोडा वेळ इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्यावर त्यातला एक कर्मचारी म्हणाला," आम्ही एका विशेष कामाच्या उद्देशाने आपल्याकडे आलो आहे. आपण गावातले एक जबाबदार व्यक्ती आहात. कुटुंब नियोजन आज व्यक्ती, समाज, राष्ट्र सर्वांसाठीच मोठी गरज बनली आहे. आम्हाला सांगितलं गेलंय की, आपल्याला सहा मुलं आहेत. त्यामुळे कुटुंब नियोजनाची सुरुवात सर्वात प्रथम  आपल्यापासूनच व्हावी, असं आम्हाला वाटतं. "
     सरपंच विचारात पडले. मग म्हणाले," तुमचं म्हणणं बरोबर आहे. मलाही ते पटतं. पण माझ्या मनाची मात्र मोठी घालमेल सुरू आहे. कारण काही दिवसांपूर्वीच एका ज्योतिषाने  माझी कुंडली आणि भाग्यरेखा पाहून  अशी एक गोष्ट सांगितलीय की, त्या गोष्टीची मला पदोपदी आठवण येते.  त्यामुळे मी आता त्या दिवसाचीच वाट पाहण्याचं ठरवलं  आहे." 
     अधिकार्‍यांनी आश्चर्याने विचारलं," ज्योतिषाने काय सांगितलं होतं आपल्याला? तुमचं भाग्य उजळणार असेल तर फारच छान. तसं असेल तर मग त्यातलं थोडं आमच्याही वाट्याला येऊ दे. आम्हीसुद्धा वाट पाहात राहू."
     सरपंच म्हणाले," ज्योतिषाने सांगितलं आहे की, तुमचा नऊ नंबरचा मुलगा मंत्री होणार आहे. त्यामुळे मी नवव्या मुलाची वाट पाहात आहे. " कुटुंब कल्याण विभागाच्या कर्मचार्‍यांची तोंडेच बंद झाली. नवव्या मुलाच्या मंत्री होण्याच्या लालसेपोटी माणूस हित- अहित या गोष्टींकडे पाहतच नाही. तो गरिबी, दु:ख, अडचणी, संकटे सगळे सगळे झेलेल, परंतु नवव्याचा लोभ त्याला चिंतन करण्याची संधीच उपलब्ध  करून देणार नाही.

Wednesday, December 28, 2011

यमाचा वाढ्दिवस

यमाच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने स्वर्गलोकात दरबार भरला होता.सगळे देवलोक आपाअपल्या सिंहासनावर विराजमान होते. त्याचवेळी मृत्युलोकातून तीन जिवात्मे दरबारात आले. आणि आपल्याला स्वर्ग मिळेल का नरक याचा  लेखाजोखा पाहण्यासाठी वाट पाहत उभे राहिले. यातील एक सावकाराचा जिवात्मा होता.तर  दुसरा सराफाचा आणि तिसरा एका चोराचा जिवात्मा होता.
यमराज म्हणाले, आज माझा आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे सगळ्यांच्या इच्छा पुर्ण होतील. मग यातला कोणी पापी असेल अथवा सज्जन. सगळ्यांना त्यांच्या मागणीनुसार सारे काही मिळेल्.सावकार म्हणाला , मी खाली दहा लाख सोडून आलो आहे, पुढच्या जन्मी मला ते दसपट मिळाले तर बरं होईल.यमराजने हात उंचावत म्हटले ,तथास्तू.सराफ दुकानदार म्हणाला, मला जास्त काही नको, पण मी सोडून आलेले सोनेनाणे, हिरे-मोती मला पुन्हा मिळावे एवढीच माझी इच्छा आहे.
 तुझ्या मनासारखं होईल, असे म्हणत यमराजने  चोराकडे पाहिले.चोर म्हणाला, मला अजिबात काही नको, फक्त या दोघांचे खरेखुरे पत्ते द्या.  

सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवा

पण आपले घर स्वच्छ व नीटनेटके ठेवतो. स्वता: च्या वैयक्तिक स्वच्छतेबाबतही आपण जागृत असतो. पण आपला परिसर आणि सार्वजनिक ठिकाणांबाबत मात्र आपण निष्काळजी असतो. परंतु वैयक्तिक स्वच्छतेबरोबर सार्वजनिक स्वच्छता राखणे तेवढेच महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. सार्वजनिक रुग्णालये, बस स्थानक, रेल्वे स्टेशन, बागबगिचा, चित्रपट्-नाट्यगृहे, मंदिरे या ठिकाणी प्रचंड अस्वच्छता असते. त्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरात आपला सतत वावर असतो. हा परिसर स्वच्छ राहिल्यास डास, माशा अथवा अन्य रोग जंतूंचा फैलाव होणार नाही. रोगाचा प्रसार होणार नाही. त्यामुळे हा परिसरसुद्धा स्वच्छ राखणे आपले कर्तव्य आहे.  अनेकदा आपण अनावधानाने खाद्यपदार्थांची पाकिटे, कागद, खराब झालेली फळे जिथल्या तिथे टाकत असतो. आपल्याजवळचा टाकाऊ पदार्थ जाग्यावरून उठून कचराकुंड्यांमध्ये टाकल्यास केरकचरा होणार नाही, सार्वजिक जागा स्वच्छ राहतील. त्यामुळे आपल्याच मनाला प्रसन्न वाटेल. त्यामुळे थोडे कष्ट पडत असतील, तर घ्यायला हरकत नाही. नागरिक म्हणून ते आपले कर्तव्य आहे. काही महाभाग मात्र तिथेच पान, गुटखा आणि मावा-तंबाकू खाऊन थुंकतात. परिसर तर घाण होतोच शिवाय एक नकोशी दुर्गंधीही पसरते. थुंकताना अनेकांच्या अंगावर शिंतोडे उडतात. याची अजिबात फिकीर न करणारी माणसे आहेत. अशा मंडळींना नागरी कर्तव्याची जाण आणून देण्याची गरज आहे. बसमध्ये अथवा अन्य वाहनांमध्ये बसलेली थुंकेबाज मंडळी मागे-पुढे न पाहता सरळ खिडकी बाहेर थुंकत असतात. सरकारने सार्वजिक धुम्रपान, नशापानबंदीची काटेकोर अंमलबजावणी करायला हवी. अशा मंडळींना सिक्षा झाल्याशिवाय अद्दल घडणार नाही.  सार्वजनिक ठिकाणी काही स्वतःला नियम घालून घ्यायला हवेत.  सार्वजनिक स्वच्छतेचे भान ठेवायला हवे.  विश्रांती घेताना स्वच्छतेचे भान ठेवत नाहीत. तेथे बसूनच थुंकणे, शिंकरणे, धूम्रपान करणे, विड्यांचे थोटके टाकणे, काही खाल्ल्यास खरकटे, कॅरिबॅग कागद तेथेच टाकणे. टाईमपास करण्यासाठी बसणे, विचित्र हावभाव करणे आदी गोष्टी केल्या जातात.  महिला लहान मुलांना तिथेच शौचास, लघुशंकेस  बसवतात, असे कार्यक्रम तेथेच जवळपास पार पाडले जातात. मोबाईलवर जोरजोराने बोलून इतरांना उपद्रव करणे. नाकात, कानात, दातात किळसवाणे बोटे घालणे इत्यादी प्रकार करतात.
काही  मंडळींना दुसर्‍याला त्रास देण्यात, दुसर्‍याच्या  झालेल्या फजितीवर  मनमुराद हसने, आसुरी आनंद मिळवण्यात मजा येत असते. मात्र त्यांनी आपल्यावरसुद्धा असा प्रसंग येऊ शकतो, याचे भान ठेवायला हवे. कागदाच्या एका बाजूला काहीतरी लिहायचे आणि  त्याचे दुसरे बाजूला च्यूइंगमसारखे चिकट पदार्थ लावून बेंचवर ठेवतात. अनवधनाने एखादी व्यक्ती त्यावर बसली व त्याचे पार्श्‍वभागाला कागद चिकटून गेल्यावर त्यात आनंद मानणारी विशेषतः युवा मंडळी असतात.  नागरी शिस्तीचे, कर्तव्याचे आणि नियमांचे आपल्याला भान असले पाहिजे.  सार्वजनिक मालमत्ता आपलीच संपती आहे, असे मानून स्वच्छतेच्या संबंधातील  आपलीही  जबाबदारी लक्षात घ्यायला हवी.                                                    
- मच्छिंद्र ऐनापुरे, जत

Saturday, December 24, 2011

सरकारी शाळांमधील घसरलेली गुणवत्ता

     सरकारी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता नाही, अशी ओरड सतत होत राहते. यात तथ्यांश असल्याचेही काही गोष्टींवरून स्पष्ट होते. याला काही प्रमाणात शिक्षकांमध्ये शाळा व विद्यार्थीप्रति नसलेली आत्मियता, नसलेला एकोपा, त्याचबरोबर शिक्षकांमधला अहंगंड, एकमेकांविषयी असलेली असुया, राजकारण्यांच्या दबावाने दबलेली प्रशासन व्यवस्था आदी गोष्टीसुद्धा कारणीभूत आहेत. शाळा म्हणजे एक कुटूंब आहे, याचा लवलेशसुद्धा काही शाळांमध्ये दिसून येत नाही.
     एका तालुक्याच्या ठिकाणच्या शाळेतला अनुभव पाहायला मिळाला. तिथे खटणार्‍या अनेक बाबी पाहावयास मिळाल्या. या शाळेतल्या शिक्षकांमध्ये विशेषतः शिक्षिकांमध्ये एकमेकांविषयी प्रचंड असुया असल्याचे जाणवले. आपण मुलांसाठी आहोत, त्यांच्यासाठीच एका कालमर्यादेत काम करणार आहोत. शिक्षकी पेशा ही एक सामाजिक बांधिलकी आहे, याचा तिथल्या शिक्षकांना विसर पडल्याचे जाणवत होते. उलट 'ती उशीरा येते, मग मी का लवकर येऊ? तिने आज रजा भोगली , उद्या मी रजेवर जाणार... तिचा वर्ग मी का सांभाळू ? ती कुठे माझा वर्ग सांभाळते? तो नुसताच फिरतो... त्याला तुम्ही काहीच का म्हणत नाही? असे एक ना धड अनेक प्रश्न घेऊन आपल्या वरिष्ठांशी सतत तंडताना पाहिले. प्रभावी अध्यापन अथवा सर्जनशीलतेच्या प्रभावी सोज्वळ दर्पापेक्षा पैशाचा दर्प त्यात डोकावत असल्याचे जाणवायचे. पालकांशी संपर्क ठेवताना प्रसंगी त्यांच्या दारापर्यंत जाणे ओघानेच आले. पण इथे मात्र मुलाला घरी पाठवून पालकालाच शाळेत बोलावण्याचा अट्टाहास! सभोवतालच्या सामान्य व उच्च मध्यमवर्गियांच्या कुटुंबांची मुले शाळेत नाहीतच. गावाबाहेरची, झोपडपट्टीतील रोज राबून खाणार्‍यांची मुलं या शाळेत होती. आपल्या परिसरातील मुलं आपल्या शाळेत यावीत, असा विचारही त्यांच्या मनाला शिवत असावा की नाही कोण जाणे! खासगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे आजूबाजूला पेव  फुटले असताना शाळा अपात्र होण्याची आणि आपल्याच एखाददिवशी बोर्‍या-बिस्तरा  दुसर्‍या शाळेत  हलवावा लागणार, याची अजिबात भीती नसलेली मूर्दाड शिक्षक मंडळी पाहायला मिळाली.
     अशी शिक्षकांची मानसिकता का झाली आहे, याचा विचार होण्याची गरज आहे. आपले कर्तव्य न पाळणारा आणि तो पाळत नाही म्हणून मी तरी का पाळावं, अशी मतलबी मानसिकता तयार झालेल्या शिक्षकांकडून कुठली  अपेक्षा करायची? असे शिक्षक रोजच्या पाट्या टाकण्यापलिकडे दुसरे ते काय करणार? त्यांच्यात मुलांप्रती मायेचा ओलावा कसा बरे येणार?  त्यांच्या समस्या , त्यांच्या गुणावगुणांचा थांगपत्ता कसा लागणार? मुलांमधील सर्जनशीलता, त्याच्या सर्जनशीलतेआड येणारी परिस्थिती अथवा अन्य काही समस्यांचा उकल कशी होणार? व त्यातून मुलाला बाहेर काढून शिक्षणाच्या प्रवाहात आणताना, त्यांच्यातील कलागुणांचा विकास तो कसा साधला जाणार? आज सर्वांगिण गुणवत्ता विकास आणि आनंददायी शिक्षणावर भर दिला जात असतानाच शिक्षणाचा अधिकार कायदा शाळांच्या उंबरठ्या आत आला आहे. असे असताना दांड्या मारणारा शिक्षक आणि त्याची असुया करत बसणार्‍या शिक्षकालासुद्धा शाळेत लवकर येण्याची चूक केली, असे का वाटावं? असा हा सवाल आहे. 
     राजकारण्यांच्या जीवावर नुसतीच शाळा करणार्‍या शिक्षकांमुळे खरोखरीच शाळा होईल, काय? असा प्रश्न आहे. शिक्षकांची कर्तव्ये, शिक्षणाचा अधिकार याविषयी पालक जागृत होत असताना शिक्षक मात्र स्वतःच्या मतलबात मश्गुल असावेत, हेच मोठे दुर्दैव आहे. शिक्षक स्वतःच आनंदापासून कोसो दूर असल्यावर  मुलांना कुठले आनंददायी शिक्षण मिळणार? अशाने का नाही जाणार मुलं खासगी शाळांकडे? आज कामाच्या मागे धाव धाव धावणार्‍या पालकांना मुलांसाठी वेळ द्यायला सवड नाही. चांगली ट्यूशन, चांगली शाळा यासाठी पैसे मोजण्याची पालकांची तयारी असते. खासगी शाळांमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज राबवल्या जात असल्याने तिथे खूप चांगले शिक्षण मिळते, असा पालकांना वाटत असते. वास्तविक आजच्या घडीला अभ्यासापेक्षा विविध उपक्रमांवर भर देण्याची आवश्यकता असल्याने पालकांचा ओढा खासगी शाळांकडे वाढला आहे.
     प्राथमिक शाळांमध्ये सर्व शिक्षा अभियानातून भौतिक सुविधा मिळाल्या आहेत. पण गुणवत्ता वाढली नाही. सरकारी शाळांमध्ये अपवाद सोडल्यास विविध उपक्रमांच्या नावाने ठणाणाच असतो. आपापसातील मतभेद, असुया , मी आणि माझा वर्ग अशा कोषात प्राथमिक शिक्षक अडकल्याने सरकारी शाळांमधील गुणवत्ता   दिसत नाही.  ओरडून  विकणार्‍याच्या एरंडयाच्या बिया विकल्या जातात, मात्र गप बसणार्‍याचे गहूसुद्धा विकत नाहीत, असा आजचा जमाना आहे. त्यामुळे सरकारी शाळांमध्ये राबवलेल्या उपक्रमांना प्रसिद्धी मिळायला हवी. नव्हे प्रसिद्धीसाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत. आपापसातील मतभेद विसरून, शाळा एक कुटुंब आहे, असे समजून सेवावृत्तीने काम करीत राहिल्यास सरकारी शाळा पुढे गेल्यासशिवाय राहणार नाहीत.
     सगळीकडे कामे करणार्‍यांचा व न करणार्‍यांचा गट असतो. न करणार्‍यांकडे कानाडोळा करून आपली जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. आपल्याला कामासाठी मोबदला पगाराच्यारुपाने मिळत असतोच, पण शिक्षक म्हणून आपले आणखी एक मोठे कर्तव्य आहे, याचे भान सतत ठेवायला हवे. देशाची भावी पिढी शिक्षकाच्या हाती आहे, त्यांना चांगला, सक्षम  नागरिक बनवण्याची जबाबदारी शिक्षकाची आहे.
     राजकारणाचा शिक्षण क्षेत्रात हस्तक्षेप वाढला आहे. त्यांना हाताशी धरून काही करता येऊ शकत असेल तर कशाला कामकरण्याची उसाभर करा, अशी मनोवृत्ती वाढली आहे. पैसे फेकले की राजकारण्यांच्या वरदहस्ताने पाहिजे तिथे सोयीस्कर अशी बदली करून घेता येते, ही मानसिकता तयार झाल्याने शाळांमध्ये निव्वळ पाट्या टाकण्याचा प्रकार वाढला आहे. त्यामुळे सरकारी शाळांमधील गुणवत्ता घसरल्याची, जी ओरड सुरू आहे,  ती योग्यच आहे.

Friday, December 23, 2011

ही कसली अन्न सुरक्षा ?

     अन्न सुरक्षा विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केले आहे. ही खरं तर देशासाठी एक महत्त्वपूर्ण आणि स्वागतयोग्य घटना आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा लाखो लोक भूकेचे बळी ठरले आहेत. सरकार खुल्या मनाने भूकबळी समस्येचा स्वीकार करत नसले तरी भूकबळी भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय समाजासाठी एक मोठे वास्तव आहे, आव्हान आहे, हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाने टाकलेले हे पाऊल स्वातंत्र्यानंतर तात्काळ टाकले गेले असते तर आजच्या भारताचा चेहरा काही औरच दिसला असता.  अर्थात सध्याच्या काँग्रेसप्रणित सरकारने  सत्ताधारी घटक पक्षांच्या काही नेत्यांचा विरोधाला न जुमानता मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. त्यामागे स्वार्थ दडला आहे, हे धडधडीत वास्तव आहे. उत्तर प्रदेशसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका आगामी काळात होत आहेत. त्या पार्श्वभूमीवरच हा निर्णय घेण्यात आला आहे. असे जरी असले तरी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार अन्न सुरक्षा विधेयक पारित करण्यात यशस्वी झाल्यास, तो एक मोठा  इतिहास ठरेल एवढे नक्की!  
     या अगोदरही केंद्र सरकारने काही महत्त्वाचे कायदे केले आहेत. पहिल्यांदा माहितीचा अधिकार आणला,मग रोजगार हमी योजना,  नंतर शिक्षणाचा सक्तीचा अधिकार.  आणि आता अन्न सुरक्षा कायदा म्हणजे भोजनाचा अधिकाराला मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दर्शविला. पण आतापर्यंत जे काही अधिकार लोकांना मिळाले आहेत, त्यांच्यामागे परंतु- किंतु चिकटलेले आहेतच. त्यांना अद्याप खरवडून काढता  आले नाही. आता नव्याने जो अधिकार मिळणार आहे, त्यालाही असेच कित्येक प्रकारचे किंतु-परंतु चिकटले आहेत. अनेक शंका-कुशंकांनी घर केले आहे.
     अन्न सुरक्षा विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळात मंजूर झाले खरे, पण  गरजवंतांपर्यंत खाद्यान्न पोहचवण्याच्या या प्रस्तावित योजनेवर अद्याप सविस्तर असा 'होमवर्क'च करण्यात आले नाही, हाच मोठा चिंतेचा आणि गंभीर विषय आहे. योजना कशी लागू होणार? कुणाला याचा लाभ होणार ? याबाबत अद्याप काहीच स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे अन्य योजनांप्रमाणे ही योजनासुद्धा लुटीचे माध्यम ठरणार नाही कशावरून? सरकार सार्वजिक वितरण व्यवस्थेद्वारे चाललेली लूट थांबवण्यात सपशेल अपयशी ठरले असताना , मग या योजनेतून कुठली सकारात्मक आशा व्यक्त केली जाऊ शकते, असा प्रश्न आहे. वास्तविक या अन्न सुरक्षा अधिकार कायद्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही योजना देशात ऐतखाऊ व कामचोरीला तर प्रोत्साहन देत नाही ना?, अशी शंका येऊ लागली आहे. सरकार लोकांना मोफत घरे पुरवत आहे. रोजगार देत आहे. व भोजनसुद्धा देत आहे. अशाने जी संस्कृती गावा-गावांमध्ये व शहरा-शहरांमध्ये उभी राहत आहे, त्याचा खरोखरीच देशाला फायदा होणार आहे का? ज्या योजना लोकांना उत्पादक बनवू शकत नाहीत, त्याचा देशाला काय लाभ होणार आहे? उलट देश खड्ड्यातच जाणार आहे.
       मनरेगामध्ये काय होत आहे, याची कल्पना सार्‍यांना आली आहे. कामात आणि मजुरीतही बेमानी घुसली आहे. कित्येक ठिकाणची कामे जेसीबी मशीनने उअरकली जात आहेत. तर मजूर घरात बसून मजुरीचा मोठा भाग लाटत आहेत. एखादी योजना कामचुकारपणा, आळशीपणा आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत असेल तर अशाने लोककल्याण कसे होणार? उलट लोकविनाशच होईल. खाद्यान्न सबसिडी वर्षाला ९५००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असली तरी ही सबसिडी गरजू लोकांपर्यंत कितपत पोहचली, हा प्रश्न आहे. खरे तर सार्वजनिक वितरण प्रणाली प्रामाणिक आणि प्रभावी बनविण्याची गरज आहे. सरकारने त्यादृष्टीने पावले उचलण्याची आवश्यकता आहे. जर व्यवस्थाच प्रामाणिक आणि प्रभावी नसेल तर योजना कितीही चांगली असली तरी ती लक्ष्यापर्यंत पोहोचतच नाही, हे लक्षात ठेवायला हवे. 

Thursday, December 22, 2011

आमदारांची काहीच कर्तव्ये नाहीत?

    लोकशाही व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असलेल्या आमदार या लोकप्रतिनिधींची राज्यघटनेत काहीच कर्तव्ये नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आल्याचे वाचून खरोखरीच धक्का बसायची वेळ आली आहे. माहितीच्या अधिकारात मागितलेल्या प्रश्नांच्या उत्तरात अप्पर सचिवांनीच असा  खुलासा केला असल्याने सर्वसामान्यांनी कपाळावर हात मारून घेण्याशिवाय पर्याय नाही. खरोखरीच आमदारांची काहीच कर्तव्ये नसतील तर   विविध कामांसाठी आमदारांच्या नावाने खडे फोडण्याचा प्रश्नच येत नाही. सर्वसामान्यांना आता  गप्प  शांत बसण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही, असे म्हणावे लागेल.
     आमदारांच्या कर्तव्याबाबत नागपूरच्या एका कार्यकर्त्याने  माहितीच्या अधिकाराखाली  विधानमंडळ सदस्यांची कोणकोणती   कर्तव्ये असतात? असा प्रश्न विचारला होता. तसेच भारतीय राज्यघटनेतील परिशिष्ठ तीन मधील प्रावधानातील निर्धारित प्रपत्रानुसार विधीमंडळाच्या सदस्यांना निर्वाचनानंतर ग्रहण कराव्या लागणार्‍या शपथेत 'मला नेमून दिलेल्या जबाबदार्‍या व कर्तव्यांचे निष्ठापूर्वक पालन करीन' असा उल्लेख आहे. या जबाबदार्‍या व कर्तव्ये  कोणकोणती  आहेत हे स्पष्ट करण्याची विनंती माहिती अधिकार कार्यकर्त्याने केली होती. त्यावर महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील माहिती अधिकारी व अवर सचिव जी. आर. दळवी यांनी लेखी उत्तर पाठवले आहे. या उत्तरात दळवी यांनी दिलेली माहिती धक्कादायक अशीच आहे.दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानमंडळ सदस्यांच्या कर्तव्यांबाबतची तरतूद भारताच्या राज्यघटनेत किंवा यथास्थिती राज्य विधानसभा नियम अथवा महाराष्ट्र विधानपरिषद नियमात वा इतरत्र आढळून आली नाही.' त्यांच्या या उत्तरामुळे आमदारांसाठी काही कर्तव्यच नसल्याचे स्पष्ट होते.
     राज्यघटनेच्या प्रस्तावनेत संघ व राज्य सरकारची निर्मिती, त्यातील घटकांचे अधिकार, कर्तव्ये, देशाचे नागरिकत्त्व, नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये यासंदर्भात सखोल उहापोह करण्यात आला आहे. घटनेच्या सहाव्या भागातील दुसर्‍या परिशिष्ठात राज्याचे कार्यकारी अधिकारी म्हणून राज्यपालांच्या कर्तव्यांचा उहापोह आहे. त्यातील परिशिष्ठ तीन अंतर्गत विधीमंडळाची निर्मिती, विधानसभा व परिषदेची रचना, कालावधी, सदस्यांची योग्यता यांचा उल्लेख आहे. पुढे परिशिष्ठ तीन मध्ये घटनेतील कलम १८८ च्या प्रावधानामध्ये उल्लेखीत प्रपत्रानुसार विधीमंडळ सदस्यांना 'मला नेमून दिलेल्या जबाबदार्‍या व कर्तव्यांचे निष्ठापूर्वक पालन करीन' अशी शपथ घ्यावी लागते. जर अशी शपथ घ्यावी लागत असेल तर कर्तव्ये व जबाबदार्‍या असायलाच हव्यात. मात्र, सचिवांनी दिलेले उत्तर बुचकळ्यात टाकणारे आहे. आपल्या अधिकार व कर्तव्यांचा वापर करून जनतेच्या समस्यांची सोडवणूक करण्याऐवजी आमदार केवळ वेतन व भत्ते उचलत राहत असतात असे तर सचिवांना सुचवायचे नाही ना ? असा सवाल उपस्थित होतो. राज्य सरकारने याकडे गांभिर्याने पाहून आमदारांची कर्तव्ये आणि जबाबदार्‍या जनतेसमोर आणायला हव्यात. अन्यथा लोकांपर्यंत चुकीचा संदेश जाईल.                                                                 

Wednesday, December 21, 2011

संघर्षाशिवाय जीवन व्यर्थ आहे

    माणूस जन्म पून्हा पून्हा मिळत नाही. पूनर्जन्म वर विश्वास न ठेवता, स्वर्ग- नरकाच्या बाता न मारता  सध्याच्या मिळालेल्या मानवी जीवनातच आपल्या वागणुकीवर स्वर्ग- नरकाची अनुभूती मिळत राहते, यावरच विश्वास ठेवायला हवा. कुठल्याही माणसाला पूर्वजन्माची, स्वर्ग- नराकाची जिवंत कहानी ठाऊक नाही. त्यामुळे मिळालेल्या मानवी आयुष्यातच स्वर्ग- नरकाच्या संकल्पना दडल्या आहेत. ज्याचे आचरण चांगले, संघर्ष नेक आहे, त्याच्यासाठी इहलोक स्वर्गसमान आहे. याचे भान ठेऊन मानवी जीवन सत्कारणी लावले पाहिजे.  माणसाचा जन्म सर्वात श्रेष्ठ आहे. याला फुकाचे वाया घालवण्यात अर्थ नाही. माणूस म्हणून जगताना आपली कर्तव्ये पार पाडण्यावर भर दिला गेला पाहिजे. आपल्या कष्ट, मेहनतीच्या जोरावर आपण ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी धडपडले पाहिजे. मानवाला मिळणार्‍या अत्यल्प आयुष्यामध्ये सुरुवातीची २५ वर्षे  शिक्षणामध्ये जातात. जीवनाच्या संपूर्ण कालावधीमध्ये ४0 वर्षापर्यंतचा काळ हा  उमेदीचा मानला जातो, म्हणजेच मिळालेल्या १५ वर्षात केवळ इतरांसोबत तुलना, अहंकार, भोगी व अभिलाशी वृत्ती जोपासली तर साहजिकच द्वेष, खोटारडेपणा या बाबीसुद्धा  पाठोपाठ येऊन चिकटल्या म्हणून समजा.
    हा कालावधी मनुष्य जन्मातला महत्त्वपूर्ण कालावधी आहे. यावरच मानवी जीवनाची सार्थकता- व्यर्थता अवलंबून आहे.  या कालावधीत जर तुम्ही समाजाचा, महत्त्वाचे म्हणजे स्वत:च्या कुटुंबाचाही विश्‍वास संपादन करू शकत नसाल, तर खरोखरच मनुष्यजीवनाचा खरा स्वाद आपण चाखला, असे प्रामाणिकपणे म्हणता येणार नाही. मानवी जीवनच संघर्षाचे आहे.  संघर्षाने मनुष्य सार्मथ्यवान बनतो. त्याच्यात आत्मविश्‍वास निर्माण होतो. जी व्यक्ती ऐशोआरामाचे जीवन जगण्यास इच्छुक असते, ती कमजोर होऊन बसते. त्यांची योग्यता, प्रतिभा सुद्धा कमजोर होते. याचा अर्थ त्याला मानवी जीवनाचा अर्थच कळला नाही, असा होतो.  जी व्यक्ती आपल्या जीवनात संघर्षाला सामोरे जाऊ शकत नाही. ती जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही.
    संघर्ष आपल्याला जीवन जगायला शिकवते. म्हणून संघर्षाकडे पाठ फिरवू नका. अन्यथा जीवनात नैराश्य, असुया, दु: ख येत राहतात. सतत कामात असलेल्या माणसाला कशाचीच तमा नसते. आयुष्यात हार-जीत ठरलेली आहे. एखादा विजयी होतो, तेव्हा कोणी तरी हरलेला असतो. म्हणूनच विजय प्राप्त झालेला असतो. त्यामुळे त्याचा बाऊ न करता संघर्ष करत राहिले पाहिजे. संघर्ष यशाच्या किनार्‍याला पोहचवल्याशिवाय राहत नाही, याची खात्री बाळगा.
    आपल्याला आयुष्यात जे काही मिळवयाचे आहे. ते आपल्या शरीराच्या जोरावर ! त्यामुळे त्याची काळजी घेतली पाहिजे. शरीर सुदृढ तर मन सुदृढ. त्यासाठी शरीराला व्यायाम द्या. काम द्या.  नियमित व्यायामाने  शरीर निरोगी राहील. त्यामुळे  स्वत:ला कार्यमग्न ठेवाल व  तणावमुक्तीचा आनंद घ्याल. एखादे कार्य कठीण आहे असे समजून ते टाळत असाल तर स्वत:ला चिंतेच्या दरीत ढकलाल. एखादे कार्य कठीण वाटत असूनही तुम्ही त्याला सुरुवात केली तर आलेल्या अडचणींना सोडविण्याची कल्पकताही तुमच्यामध्येच निर्माण होईल नव्हे ती क्षमता तुमच्यामध्ये होती याचा साक्षात्कार तुम्हाला होईल. थोडा संघर्ष करावा लागला तरी ते कार्य तुम्ही तडीस नेऊ शकाल. जी व्यक्ती श्रम  करत नाही ती व्यक्ती गाढ झोपीचाही आनंद घेऊ शकत नाही. त्यामुळेच म्हटल्या गेले आहे,  'संघर्षहीन जीवन आणि मृत्यू यामध्ये केवळ श्वासाएवढेच अंतर आहे.'  वाईट प्रसंग, दु:खद  परिस्थिती यातून कोणाचीही सुटका नाही. इतिहास पाहिल्यावर आपल्या लक्षात येते, पण ज्यांनी त्यावर हसत खेळत मात केली आहे, तेच यशस्वी झाले आहेत.  
    मानवी जीवन संघर्षाशिवाय पूर्ण होत नाही.  आपल्याला पावलागणिक  सामना करावा लागतो. अलिकडच्या युवकांना स्पर्धा परीक्षा अत्यंत कठीण असतात, असे वाटत असते. पण हा त्यांचा  गैरसमज आहे. योग्य नियोजन, यापूर्वी विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण, त्यानुसार अभ्यास आणि त्यासाठीची चिकाटी, प्रयत्नात सातत्य आवश्यक आहे. परिश्रमाची तयारी ठेवल्यास काहीही असाध्य नाही. मग या स्पर्धा परीक्षासुद्धा काहीच वाटणार नाहीत. त्या  सहज उत्तीर्ण करता येतात. अपयशाला घाबरू नये. अपयशातून यशाचा मार्ग मिळतो हे नेहमी लक्षात ठेवावे. जिज्ञासू मनोवृत्ती असणारा स्पर्धा परीक्षार्थी अपयशी होऊच शकत नाही, असे ठामपणे म्हणण्यात अतिशयोक्ती  नाही.         

Saturday, December 17, 2011

सेलफोनने फैलावतो बॅक्टेरिया इंफेक्शन

      सेलफोन आणि मोबाईलचा वापर ज्या गतीने वाढत आहे, तितक्याच गतीने लोकांमध्ये संक्रमणाच्या समस्यांचा ग्राफसुद्धा वाढत आहे.अस्वच्छ हातांनी सेलफोनचा वापर केल्याने आपल्या हातांबरोबरच आता मोबाइलसुद्धा बॅक्टेरियाचा वाहक बनला आहे. यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. अलिकडेच ब्रिटनच्या संशोधकांनी सेलफोन वापराबाबतचा एक सर्वेक्षण रिपोर्ट नुकताच प्रसिद्ध केला आहे.
      लंडन युनिवर्सिटीच्या क्विन मेरी आणि लम्डन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडीसीनच्या अभ्यासकांनी ब्रिटनच्या १२ शहरांमधील ३९० सेलफोनचे आणि हातांचे  नमुने तपासणीसाठी  घेतले होते.या नमुन्यांचे प्रयोगशाळेत परीक्षण करून एनालिटिकल रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.
      नमुन्यांच्या प्राप्त परिणामांचा विश्लेषणानंतर असा  निष्कर्ष समोर आला आहे की, नमुन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विभिन्न प्रकारचे जीवाणू आहेत.    सेलफोनची तपासणी केल्यानंतर प्रत्येक सहामधील एकात हा कोलाई बॅक्टेरिया मिळून आले. ज्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते, त्यांपैकी ९५ टक्के लोक दिवसभरात फोन आणि ८२ टक्के हातांवर जीवाणू मिळून आले. यांतील जवळजवळ १६ टक्के हात आणि १६ टक्के फोनवर ई कोलाई बॅक्टेरिया सापडले. हा बॅक्टेरिया पोटाच्या तक्रारी उत्पन्न करणारा म्हणून ओळखला जातो. ज्यांच्या हातावर बॅक्टेरिया मिळून आला, त्यांच्या सेलफोनवर बॅक्टेरिया असण्याची शक्यता तिपटीने वाढली असल्याचे सांगितले आहे. बाथरुममध्येसुद्धा सेलफोनचा वापर करणार्‍या लोकांच्या फोनवर  बॅक्टेरियाची उपस्थिती दिसून आली.
      बॅक्टेरियाच्या वृद्धीसाठी सेलफोन अनुकूल ठिकाण असल्याचे लंदन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसीनचे डॉ. रॉन कटलर यांचे म्हणणे आहे. आपण जितका अधिक काळ फिनवर बोलत राहू, तितके ते अधिक गरम होत जातात. बॅक्टेरिया हातांवर आणि तेही कुठल्याही परिस्थितीत कित्येक तास जिवंत राहू शकतात. विशेषतः सूर्य प्रकाशाच्या उष्ण तापमानावर ते अधिक काळ जिवंत राहून मोठ्या गतीने वाढत असतात. हे जीवाणू दरवाजाचे हँडल, अन्न आणि सेलफोनच्या स्पर्श मध्यमातून सहजगत्या स्थलांतरित हो ऊ शकतात. पोटात गेल्यावर हेच जीवाणू डायरिया, पोटदुखी, उलटी- जुलाबसारखे आजार उत्पन्न करतात. गंभीर प्रकरणात हे मृत्यूलासुद्धा कारणीभूत ठरू शकतात. संशोधकांनुसार , दर वर्षी पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या ३५ लाख मुलांचा मृत्यू निमोनिया आणि दायरियाच्या कारनाने होतो. स्वच्छतेकडे लक्ष दिल्यास हे प्रमाण किती तरी प्रमाणात कमी करता येऊ शकते.
      आरोग्य तज्ज्ञांनुसार शौचालयास जाऊन आल्यानंतर हात दोन्ही बाजूंनी स्वच्छ साबणाने धुणे आवश्यक आहे. हात धुताना बोटे आणि नखे यांचा आतील भाग चांगल्याप्रकारे घासून स्वच्छ धुवावा. बोटांमध्ये अंगठी किंवा आनखी काही असेल तर हात धुण्यापूर्वी ती काढून हात धुवावेत. अंगठी अथवा अन्य चिजासुद्धा स्वच्छ धुवून घ्याव्यात.
      जीवाणूंचा प्रसार कमी करण्यासाठी सेलफोन किंवा कामाची ठिकाणे अशा सेल्यूशनने स्वच्छ करावीत, ज्यात कमीत्र कमी ६० टक्के अल्कोहोल असावे, असेही आरोग्य चिकित्सकांचे म्हणणे आहे.   

Tuesday, December 13, 2011

बालकथा स्वप्नातल्या सुवर्णमुद्रा

     एका गावात एक मजूर राहत होता. तो खूपच दरिद्री होता. दिवसभर काबाडकष्ट केल्याशिवाय संध्याकाळच्यावेळची  त्याच्या घरची चूल पेटत नव्हती. एक दिवस त्याला एक स्वप्न पडले. स्वप्नात त्याने त्याच्या एका मित्राकडून शंभर सुवर्णमुद्रा घेतल्या होत्या. सकाळी उठल्यावर त्याला स्वप्नाची आठवण झाली. अन्य मित्रांशी सहज गप्पा मारताना मजुराने त्याला पडलेल्या स्वप्नाचा विषय काढला. स्वप्नात ज्या मित्राकडून शंभर सुवर्णमुद्रा घेतल्या होत्या, त्याला ही गोष्ट समजली. त्याच्या मनात लबाडी उत्पन्न  झाली.
      तो लगेच गरीब मजुराकडे जाऊन पोहचला  आणि म्हणाला," मित्रा, तू ज्या सुवर्णमुद्रा माझ्याकडून घेतल्या आहेस, त्या मला परत कर." मजुराला पहिल्या पहिल्यांदा गंमत वाटली. मित्र आपली फिरकी घेत असावा, असे त्याला वाटले. पण त्याचा मित्र अगदी गंभीरपणाने  सुवर्णमुद्रा मागू लागल्यावर मात्र त्याची भीतीने गाळण उडाली. त्याच्याकडे तर फुटकी कवडीसुद्धा नव्हती, मग बिचारा शंभर सुवर्णमुद्रा कोठून देणार? "
      अचानक ओढवलेल्या संकटामुळे बिथरलेला मजूर कसा तरी मित्राच्या दावाच्या मुकाबला करत होता. पण धूर्त मित्र मात्र आपल्या मागणीवर ठांम होता. शेवटी तो मजुराची तक्रार घेऊन पंचांकडे गेला. पंचांनी दोन्ही पक्षाची बाजू काळजीपूर्वक ऐकून घेतली. पण त्यांना निर्णय घेता आला नाही. कारण सकृतदर्शनीचा पुरावा मजुराच्या स्वप्नात मित्राकडून मुद्रा घेतल्याची साक्ष देत होता.
     खूप विचार केल्यानंतर शेवटी पंचांनी तक्रार राजाकडे पाठवली. राजाने तक्रारीवर खूपच गांभिर्याने विचार केला. राजा समजून चुकला की मजुराचा मित्र बेमानी करतो आहे. लबाडी करतो आहे. पण निर्णयसुद्धा 'जशास तसा' द्यायला हवा होता. शेवटी राजाने दुसर्‍यादिवशी दोघांना पुन्हा दरबारात यायला सांगितले. दुसर्‍यादिवशी  दोघेही दरबारात  पोहोचले. दरबारात एक भलामोठा आरसा अशापद्धतीने लावण्यात आला होता की, शंभर सुवर्णमुद्रांचे प्रतिबिंब त्यात दिसेल. राजा मजुराच्या लबाड मित्राला म्हणाला," तुमचे योग्यच आहे. मजुराने तुमच्या सुवर्णमुद्रा परत करायला हव्यात..." मित्राच्या तोंडाला पाणी सुटले. तो  मनोमनी सुखावला.  राजा पुढे म्हणाला," आरशात ज्या सुवर्णमुद्रा दिसताहेत, त्या तुम्ही घेऊन जाऊ शकता."
      यावर मजुराचा मित्र आश्चर्य व्यक्त करत म्हणाला," हे कसे होऊ शकते?" त्यावर राजा पटकन म्हणाला," का नाही होणार? मजुरानेसुद्धा सुवर्णमुद्रा स्वप्नात घेतल्या होत्या, जे एक प्रतिबिंब होते. मग त्या मोबदल्यात खर्‍या मुद्रा हव्यात कशाला? "  हे ऐकून मजुराच्या मित्राची मान शरमेने आपोआप खाली झाली.
    राजाने तात्काळ मजुराच्या मित्राला कारावासाची शिक्षा ठोठावली. आणि मजुराला त्या सुवर्णमुद्रा उपहार म्हणून दिल्या.                                                                                                     - मच्छिंद्र ऐनापुरे

मानवतावादी युगप्रवर्तक : संत गाडगेबाबा

तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ,अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तीपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू  नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवर्षी, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम बांधले व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दिन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव.या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत.

Monday, December 12, 2011

किंचाळगारे संगीत आणि अर्थहीन गाण्यांची लोकप्रियता

   गाण्यांमध्ये सुर आणि शब्दांपेक्षा बीट्सवर अधिक लक्ष दिले जाऊ लागल्यापासून बॉलिवूडमध्ये जणू काही फुट टेपिंग गाण्यांचे पेवच फुटले आहे. प्रत्येक चित्रपटात तडका-फडका मारणारं गाणं गरजेचं झालं आहे. आता गाण्यात लिरिक्स कसंही असो... जर बीट्स चांगले असतील गाणं चाललं नव्हे पळालंच म्हणून समजा.  त्यामुळे साहजिकच सध्या प्रत्येक चित्रपटात अशा थिरकायला  लावणार्या अर्थहीन गाण्यांना हमखास स्थान दिलं जाऊ लागलं आहे.
   भारतीय संगीताला एक मोठी परंपरा आहे. श्रवणीय गाणी हा संगीताचा आत्मा आहे. पण अलिकडे हा आत्माच हरवत चालला आहे. भाषा आणि शब्दांची सरळ सरळ कत्तल करून केवळ ठेक्याच्या आधारावर श्रोत्यांच्या कानांवर गाणी अक्षरशः आदळवली जात आहेत. अशा गाण्यांची सवय नाही असे नाही, पण त्याला काही मर्यादा होत्या. आता अलिकडच्या काळात या मर्यादा पुसल्या गेल्या आहेत. आजचा युवा वर्ग अशाच संगीताची डिमांड करू लागला आहे. सध्याची जनरेशन अशा गाण्यांना  केवळ पसंदच करीत नाही तर त्याच्या तालावर थिरकताना दिसत आहे. त्यामुळे मागणी तसा पुरवठा या मार्केटिंग फंड्याचा वापर करतण्यात झालेले  व्यावसायिक संगीतकार आपले व्यावसायिक रतीब घालण्यात कोणतीही कसर बाकी ठेवताना दिसत नाहीतत्यामुळे  दिवसेंदिवस अशा गाण्यांची क्रेझ वाढत चालली आहे.  
   पूर्वी  गाण्यांचे बोल ध्यान देऊन ऐकले जात, आता ते दिवस गेले म्हणण्याची वेळ आली आहे. गाणे पहिल्यावरच त्याचे चांगले- वाईट पैलू तपासले जात. मात्र आजची गाणी बिलकूल बदलली आहेत. आता गीतकाराची फारशी आवश्यकता राहिलेली नाही. गाण्यात थोडे हिंदी शब्द घाला, थोडे इंग्रजी शब्द  आणि थोडा प्रादेशिक शब्द टाका. त्यात रॉकिंग बीट्सचा मसाला तडका टाकून चांगला घोळा. बस्स! झालं गाणं... न्यू जनरेशनला असेच रॉक मसालेदार गाणं हवं आहे. त्यात पाय थिरकायला लावणारा तडाका मारला म्हणजे झालं. अनेक अर्थहीन पण उडत्या चालीची गाणी ऐकणं आणि त्यावर धुंद होऊन ठेका धरणं हे जणू आजच्या तरुणाईचं ब्रीद झालं आहे.
   'रा-वन' मधील छम्मक छल्लो.... गाण्यावर युवा कमालीचे थिरकाताना दिसतात. शाहरुख खानला चित्रपट हिट ठरवण्यासाठी काय काय उपद्व्याप करायला लागले. पण जर 'रा-वन' मध्ये  हे गाणं नसतं तर खरोखरच शाहरुखच्या चित्रपटाचं काय झालं असतं कोण जाणे!शाहरुखचा महत्त्वाकांक्षी, बहुप्रचारित चित्रपट 'रा.वनवर  जवळपास पावणे दोनशे कोटी खर्च करण्यात आले. तर चित्रपटाच्या मार्केटिंगवरच जवळपास 52 कोटी रुपये खर्च केले गेलेपण ताल धरायला लावणारे गाणे आणि छम्मक छल्लो करिनाचे ठुमके  लोकांना विशेषतः युवावर्गाला पसंद पडले. सध्या सोशल नेटवर्कवर आणि युवा जनरेशनच्या मोबाईलवर 'वाय दिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी?' या गाण्यानं धुमाकूळ घातला आहे. जिकडं पाहावं तिकडं गाणं वाजताना दिसत आहे. पण या गाण्याला कुठला अर्थच नाही. हिंग्लिश आणि तामिळ भाषेतल्या या गाण्याला अर्थच नसल्याचं खुद्द  धनुष सांगताना दिसतो. पण तरीही तरुणांनी गाण्याला डोक्यावर घेतलं आहेअशाच  ‘मुन्नी बदनाम हुई...’( दबंग)  , ‘कॅरेक्टर ढिला है...’( रेडी) , ‘मौजा ही मौजायासारख्या उडत्या चालीच्या गाण्यांवर ज्यांच्या पावलांनी ठेका धरला नसेल किंवाकैसा ये इश्क है’, या आणि यासारख्यासुफिया अंदाजमध्ये सादर केलेल्या गाण्यांनी ज्याला डोलायला लावले नसेल किंवादिल चाहता हैसारखी गाणी ज्याच्या ओठावर रुळली नसतील असा तरुण शोधूनही सापडणार नाही.
   मात्र आजच्या इन्स्टंट जमान्यात किंचाळणारं संगीत आणि अर्थहीन गाणी झटपट लोकप्रिय होतात आणि अशी गाणी लोकप्रिय कशी होतात हे पाहून आपल्यापैकी अनेकजण आश्चर्यचकित होताना दिसतात. अशी अनेक गाणी अलिकडच्या काळात आली आहेत. पण विशेष म्हणजे, त्यांची क्रेझ कायम राहिली आहे.अशाच काही गाण्यांची चर्चा आपण करणार आहोत.  'रात की मटकी फोडे....' या 'कमिने' चित्रपटातल्या गाण्याला अजूनपर्यंत क्रेजिएस्ट साँग मानले जात आहे. चित्रपट रिलिज हो ऊन बराच काळ लोटला तरी त्याची जादू युवा पिढीमध्ये दरवळताना दिसत आहे. वरात, मिरवणुकांमध्ये या गाण्याची डिमांड हमखास असते. मेट्रो सिटीजच्या डिस्कोथेकमध्येही म्हणे या गाण्याला अजून मागणी आहे. ' दे दणादण' मधल्या 'पैसा पैसा करती है... ' गाण्यावरही न्यू जनरेशन थिरकताना दिसते. हा चित्रपट भलेही आपटला तरी गाण्याची लोकप्रियता अद्याप कमी झाली नाही. खरे तर या गाण्यात फुट स्टेपिंग बीट्स नाहीत, तरीही विचित्र बोलीने या गाण्याने आपल्याकडे आकर्षित केले आहे.
   'देव डी' ने जरी प्रेक्षकांची वाहवा मिळवली असली तरी यात मोठं योगदान गाण्याचंही आहे. ' इमोशनल अत्याचार' या गाण्यात शब्दांचा वापर कसाही केला असला तरी बीट्स मात्र लाजवाब आहेत. 'इमोशनल अत्याचर' सारखे शब्दसुद्धा लोकांना या गाण्यानंतरच परिचित झाले. यावरून रिऍलिटी शोजसुद्धा सुरू झाले. हे गाणं बराच काळ क्रमांक एकवर वाजत राहिलं होतं. ' बीडी जलै ले...' गाण्याविषयी बोलावं तितकं कमीच आहे. 'ओंकारा' मधल्या अजय देवगण आणि सैफ अली खान यांच्यापेक्षा अधिक लोकप्रियता या गाण्याने मिळवली. बिपाशाचे लटके- झटके आणि उत्तम डान्स स्टेप्स यांनी या गाण्याला थिरकण्याचं कारण बनवलं. अजूनही या गाण्याची जादू कायम आहे.
    प्रियांका आणि रणबीर कपूर यांच्या 'अंजना-अंजानी' या प्लॉप चित्रपटाच्या टायटल गाण्याचे बोल कळतही नाहीत, पण हे गाणे नंबर गेमचा हिस्सा बनले. याची जोरदार धुन डान्स प्लोरवर थिरकायला भाग पाडते. हेच या गाण्याच्या यशाचे रहस्य आहे. जर आपण गाण्याच्या बोलींकडे लक्ष दिल्यास याला आतापर्यंतच्या सगळ्यात बकवास गाण्यांच्या श्रेणीत याचा समावेश करता येईल. पण युवकांमध्ये अशा गाण्यांनाच अधिक पसंदी दिली जात आहे. त्यामुळे असं वाटतं की, या जनरेशनला ज्यामध्ये काही अर्थ नाही अशाच वस्तू पसंद पडत आहेत. ज्याला आकार- ऊकार नाही, अर्था-बिर्थाचा गंध नाही, अशाच चिजा न्यू जनरेशन डोक्यावर घेऊन नाचताना दिसते. अर्थात अशाप्रकारची गाणी लोकप्रियतेच्या शिखरावर आजच पोहचली नाहीत. किंवा अशी गाणी नवीन नाहीत. पण इतकेच आज अशाप्रकारची गाणी अधिक काळ आणि अधिक हिट होताना दिसत आहेत. अमिताभच्या काळात 'कुली' या सुपरहिट चित्रपटातले ' ऍक्सिडेंट हो गया रब्बा...' आणि ' हम' मधील ' जुम्मा चुम्मा दे दे...' ही गाणी आपापल्या काळात हिट होती. पण या काळात अशाप्रकारची गाणी कमी बनत. अशाचप्रकारे गोविंदा आणि करिश्मा कपूरच्या ' कुली नं.' मधले ' तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं...' हे गानेसुद्धा ब्लॉक बस्टर हिट झाले होते. पण अशा गाण्यांचा प्रयोग मर्यादितच होता. आता मात्र अशा गाण्यांना कुठली मर्यादाच राहिली नाही.
·         आज चित्रपटातल्या गाण्यांनी आपलं रुपडं पालटलं आहे. हे असंच चालत राहिलं तर मात्र धोकादयक ठरण्याची शक्यता अधिक आहे. अशा गाण्यांमुळे एका नव्या फाजिल, उडानटप्पू संस्कृतीला खतपाणी घातलं जात आहे. विचित्र आणि अर्थहीन शब्दांचा वापर आता प्रचलित होऊ लागला आहे. गीतकारांनी व्यावसियकता स्वीकारल्याने व त्यांच्या कामाच्या व्यस्ततेमुळे निर्मात्यांच्या मर्जीनुसार पाट्या टाकण्याचे काम सुरू असल्याने बकवास गाणी पण फुटिंग स्टेप्सच्या जोरावर निर्मिली जात आहेत. आवडी-निवडी बदलल्या याचा अर्थ समाजही बदला आहे, याची जाणीव यायला हवी आहे. आजकाल चित्रपटांमध्ये ज्या प्रकारच्या शब्दांचा वापर केला जात आहे, ए पाहता समाजातला शालीनता आणि शिष्टाचार कमी होत चालाला असल्याचेच हे द्योतक आहे. आधुनिक प्रयोगाच्या नावावर आज युवा पिढीशी एक वेगळाच खेळला जात आहे. कारण व्यक्ती जे काही ऐकते आणि पाहते , त्याचा थेट परिणाम त्याच्या आचरणावर, व्यवहारावर होत असतो. समाजात त्याची व्यवहारताच त्याची भूमिका स्पष्ट करीत असते. 

चित्रपटातील गाणी त्याच्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. चित्रपटाचे यशापयश बर्‍याचांशी गाण्यांच्या लोकप्रियतेवर अवलंबून असते. त्यामुळेच चित्रपट रिलिज होण्यापूर्वी त्याची गाणी लोकांमध्ये आणली जातात. गाणी प्रेक्षकांना चित्रपटाकडे खेचण्याचे काम करतात, असे समिक्षकांचे म्हणणे आहे.  आपले नैतिक आणि सामाजिक कर्तव्य विसरलेले निर्माते, दिग्दर्शक केवळ पैशासाठी शॉर्टकटचा मार्ग अवलंबत आहेत. त्यातच एकमेकांवर कुरघोडी करण्यात गीतकार मश्गुल झाले आहेत. त्यामुळे ते आपली सामाजिक भूमिका विसरत चालले आहेत. आपल्या देशातला मध्यम वर्ग चित्रपटातल्या नायकाला आपला आदर्श मानतो. आणि कधी कधी चित्रपटातल्या कहानीशी आपली कहानी जोड्तो. त्यामुळे तशाप्रकारचे बोलण्याचा , व्यवहार करण्याचा प्रयत्न केला जातो.  स्वाभाविकता एकच चिज आपल्याला पून्हा पून्हा दाखवली किंवा ऐकवली जाऊ लागली तर आज ना उद्या आपल्याला आपली सवय बदलणं भाग पडतं. आणि ही सवयच आपाली ओळख बनायला फारसा वेळ लागत नाही. त्यामुळे अशी गाणी किंवा चित्रपट नाकारायला हवेत. अशा चित्रपटांची नशा दारूसारखी हो ऊन बसते. लगेच काही परिणाम आपल्याला दृश्य स्वरुपात दिसणार नाहीत,