Saturday, December 3, 2011

सकारात्मक विचारांचा संकल्प

     ९५२ मध्ये एडमंड हिलेरीने जगातल्या सर्वात उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टवर चढण्याचा प्रयत्न केला,पण त्याला यश मिळाले नाही. काही आठवड्यानंतर त्याला इंग्लडमधील एका कार्यक्रमात बोलायला लावले.हिलेरी मंचावर आला आणि माऊंट एव्हरेस्टच्या चित्राकडे पाहात मूठ आवळत म्हणाला, ' माऊंट एव्हरेस्ट , तू मला पहिल्या वेळेस हरवले आहेस. पण पुढच्या खेपेला मी तुला हरवून टाकीन. कारण तू आणखी उंच वाढू शकत नाहीस, मी मात्र प्रगती करू शकतो.'
     एका वर्षाने म्हणजे २९ मे रोजी एडमंड हिलेरी माऊंट एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारा पहिला मानव ठरला. त्यावेळी हिलेरी म्हणाला होता,' माणसाला पर्वतावर नव्हे तर स्वतः वर विजय मिळवावा लागतो.' 'दी सिक्रेट' ची लेखिका रॉन्डा बर्न आपल्या जीवनाविषयी सांगते," मी पूर्णपणे निराश झाले होते. शारीरिक, भावनात्मक आणि आर्थिकदृष्ट्या पुरती खचून गेले होते. त्यातच अचानक माझे वडील गेले. आता मला माझ्या आईचीही चिंता सतावू लागली. चारी बाजूने जसा दु:खाचा डोंगर कोसळला होता. मी रात्रं-दिवस रडत होते... रडत होते आणि फक्त रडत होते. पण अचानक माझ्या मनात आशेचा एक तरंग उमटला. आता मी चांगल्या गोष्टींना माझ्या जीवनाकडे खेचू लागले. चांगल्या गोष्टींची आशा करताच मी प्रसन्नता महसूस करू लागले. चमत्कार होऊ लागला. मी शारीरिक, मानसिकदृष्ट्या अत्यंत समाधानी राहू लागले. श्रीमंत होऊ लागले आणि प्रसिद्धचे वलयही विस्तारू लागले.  हीच 'दी सिक्रेट'ची सुरुवात होती माझ्यासाठी ! मी एक बेस्टसेलर पुस्तकाची लेखिका बनले होते. कारण , मला खात्री होती की, असे होणार !'
     नव्या वर्षात आपण सगळ्यांनी मिळून संकल्प करुयात की, नेहमी आशेचा पदर धरून चालू. मग पुढ्यात कितीही मोठी संकटे येऊ देत. निराश व्हायचं नाही. दु: खी व्हायचं नाही. आपण आशावादी राहिलं की नशीबसुद्धा आपल्या मागे मागे चालून येईल. 'युनिवर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिया ( युएस) मधील मानसशास्त्राचे प्रोफेसर बारबरा फ्रेड्रिक्सन यांनी आपल्या ताज्या संशोधनात म्हटले आहे की, सकारात्मक भावनेमुळे मोठमोठ्या संकटांवर मात करण्यासाठी ऊर्जा मिळते. उत्तम क्षमता प्राप्त होते.इतकेच नव्हे तर यामुळे एकाग्रता आणि शिकण्याच्या ऊर्मीत वाढ होते. फ्रेड्रिक्सन म्हणतात,' गेल्या काही वर्षांपासून आम्ही पॉझिटिव्ह विचार आणि प्रसन्नतेच्या संबंधातले काही रंजक तथ्ये अभ्यासली आहेत. सकारत्मक विचाराने जीवनात महत्त्वपूर्ण यशात्मक बदल घडवता येतात. याचा शोध लागला आहे."
     रॉन्डा बर्न म्हणतात," तुम्ही या ब्रम्हांडातले सर्वात शक्तीशाली चुंबक आहात. जसा विचार कराल, तसेच घडेल. चांगल्याची आशा करा... चांगल्या गोष्टीची खात्री बाळगा... सगळे काही चांगलेच होईल. तुम्ही आशावादी राहिलात आणि एखाद्या पॉझिटिव्ह गोष्टी व विचारांवर फोकस करीत राहिलात, तर त्याक्षणी तुम्ही ब्रम्हांडातल्या सकारात्मक वस्तूंना आपल्याकडे खेचत असता."
सकारात्मक विचार करा
     "आशावादी माणसे आजारी पडल्यावरही रुटीन जीवनाशी जोडलेली असतात. आपल्याला कुठला  तरी आजार आहे आणि त्याचाच  रात्रंदिवस यावरच विचार करता आहात , तुमच्या भेटीला येणार्‍या लोकांशीही याच विषयांवर बोलता आहात तर मग खात्रीने समजा की, तुम्ही  या आजाराच्या अधिक कोषिका निर्माण करता आहात. दिवसभर स्वतःलाच शंभरदा म्हणा, मी सुखी, समाधानी आहे. फिट आहे. मला मस्त वाटते आहे. असे म्हणून स्वतःला ऊर्जा द्या. आणि सामान्य जीवनाशी एकरुप व्हा." रॉन्डा बर्न
      जो नेहमी आशेवर जगतो. आशेचा पिच्छा सोडत नाही.त्यांनाच जीवनाची साथ मिळत राहते. आशावादी माणसे अगदी पर्वतसुद्धा हलवून सोडतात, असे म्हटले जाते. सकारात्मक चिंतन आणि शास्त्रज्ञांच्या नव्या संशोधनाने आशेवर जगणार्‍यांच्या जीवनात आनंदाचे क्षण येत राहतात, हे सिद्ध केले आहे. त्यामुळे माणसाने काहीही होवो, आपला सकारात्मक विचार, दृष्टीकोन सोडायचा नाही. त्यामुळे  आपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत असतात. चांगल्या आणि वाईट, सुखी आणि दु:खी, सकारात्मक आणि नकारात्मक, सुगंधी आणि दुर्गंधी, योग्य आणि अयोग्य पण यातून आपण कुठल्या आकर्षित करायच्या ते आपल्याच हातात आहे. यात महत्त्वाचे भूमिका बजावते ते आपले मन. मनच सर्वांचा कर्ता करविता आहे.  मन दिसत नाही पण त्याला अखिल ब्रह्मांडाची जाणीव आहे. ते क्षणार्धात करोडो मैलांचा पल्ला पार करु शकते. मनाद्वारे आपण शरीरावर नियंत्रण, सभोवतालच्या  परिस्थितीवर नियंत्रण आणू शकतो. बघा मन प्रसन्न असेल तर आजूबाजूचा परिसर, सजीव, निर्जीव सर्व गोष्टी प्रसन्न वाटू लागतात.
आरोग्य सुरक्षा कवच
* अलिकडेच केल्या गेलेल्या संशोधनानुसार, आशावादींचा कार्डियोवॅसकुलर सिस्टम आणि शरीराच्या रोगांपासून रक्षण करणारी प्रणाली ( इम्यून सिस्टम) निराशवादी लोकांच्या तुलनेत अधिक तंदुरुस्त असते.
* चांगले वील पॉवर आणि सकारात्मक विचाराचे रुग्ण घाबरट आणि नकारात्मक विचारी रुग्णांच्या तुलनेने लवकर बरे होतात. गर्भवती महिलांवरही चांगल्या- वाईट विचारांचा थेट प्रभाव पडतो. तणावरहित आणि प्रसन्न राहणार्‍या महिलांमध्ये नॉर्मल डिलीचरीची शक्यता अधिक असते. आणि त्यांचे मूल स्वास्थपूर्ण असते.
* प्रसन्नतेमुळे हार्मीन प्लाज्मा फायब्रीनोजेनसुद्धा घटतो. जो कोरोनरी हार्ट डिजीजचा संकेतांक आहे. प्रसन्नतेमुळे हार्ट रेटसुद्धा कमी होतो. उच्च हार्ट रेट जीवनमान घटवते, असे मानले जाते.
* युनिवर्सिटी ऑफ नेब्रास्का मेडिकल सेंटर ( ओमाहा-युएस) मधील हेल्थ प्रमोशनचे प्रोफेसर मोहम्मद सियापुश म्हणतात, पॉजिटीव सायकोलॉजीमध्ये झालेल्या नव्या संशोधनात सकारात्मक विचाराचा आरोग्यावर सुरक्षात्मक प्रभाव पडतो.
कसे बनाल आशावादी?
* सकारात्मक विचार आणि प्रसन्नता प्राप्त करणं, ही गोष्ट म्हणावी तितकी सोपी नाही. कारण ५० टक्के लोकांच्या जीवनामध्ये पॉजिटीव आणि आनंदी राहण्याची क्षमता असते. यामुळेच काही माणसे कठीण प्रसंगीसुद्धा आनंदी राहतात आणि आशेवर विश्वास ठेवतात. तर काही माणसे नेहमी हताश, अनुत्साही राहतात. सतत पडलेल्या चेहर्‍याने वावरणार्‍यांना लोक पसंद करीत नाहीत. त्यामुळे त्यांच्या वाट्याला नेहमी अपयश, आजार आणि गरीबी येते. पण काही गोष्टी ध्यानात ठेवल्यास ही माणसेदेखील आशावादी बनू शकतात.
* सगळ्यात अगोदर आपल्याला काय मिळवायचे आहे, हे निश्चित करा व त्यानुसारच पावले टाका.
*स्वत:ची तुलना इतरांशी कधीच करू नये. त्यांचा प्रवास कशासाठी आणि कोणत्या दिशेने सुरू आहे, याची तुम्हाला कल्पनाच नसते. मग तुलना अर्धवट होते. त्यामुळे तुलना टाळणं हे सगळ्यात उत्तम.
*आपल्या मनात नकारात्मक विचार येतात. त्या नकारात्मक विचारांचा परिणाम आपल्या वागण्यावर होत असतो. म्हणूनच या नकारात्मक गोष्टी जितक्या टाळता येतील, तितक्या टाळाव्यात. तुम्ही असे नकारात्मक विचार मनात कधीच आणू नका, ज्यांच्यावर तुम्ही नियंत्रणच ठेवू शकणार नाही आणि भरकटत जाल. त्यापेक्षा तुमची एनर्जी सकारात्मक गोष्टींचा विचार करण्यात वापरा.
*एखादी गोष्ट किती प्रमाणात करायची, हे प्रत्येकालाच माहीत असतं. म्हणूनच अतिरेक टाळा. मर्यादा सांभाळणं गरजेचं असतं.*स्वत:ला किती सिरिअसली घ्यायचं हे आपलं आपण ठरवायचं असतं. इतर जण आपला फार विचार करत नसतात, ना आपल्याला फार सिरिअसली घेत असतात. त्यामुळे थोडं चील करायला हरकत नाही.
*आरोग्य सांभाळलं की आत्मविश्वासावर सकारात्मक परिणाम होतोच. स्वाभाविकच हा आत्मविश्वास पर्सनॅलिटीच्या माध्यमातून डोकावायला लागतो. पण ही पर्सनॅलिटी अधिक इम्प्रेसिव्ह व्हावी यासाठी आणखी प्रयत्न करायलाच हवेत
*जागेपणी स्वप्नं बघा, ती स्वप्न पूर्ण होण्याचे चान्सेस जास्त असतात.
*दुसऱ्यांवर जळणं हे तर सगळ्यात वाईट. तसं जळून काही मिळत नसतं. तुम्हाला जे हवं ते तुमच्याकडे खरं तर सगळं असतं किंबहुना आहे. फक्त त्याची तुम्हाला जाणीव नसते.
*भूतकाळ विसरा. सांगणं सोपं, करणं कठीण.. माहिती आहे. पण ते विसरून पुढे जाताना आनंद मिळतो. भूतकाळ सोबत घेऊन गेलं की ओझं कायम वाढतच जातं.

*इतरांचा तिरस्कार करू नका. तुमच्या शब्दांतून पाझरणारा तिरस्कार तुमच्या चेहऱ्यावर परिणाम करतो. हसरा चेहरा सगळ्यांनाच आवडतो. आणि तसंही आयुष्य फार मोठं नाही. किती काळ असा तिरस्कार करण्यात घालवणार आहात?                                                                                                                      - मच्छिंद्र ऐनापुरे

No comments:

Post a Comment