Tuesday, January 31, 2023

प्रेम रक्षित : 'नाटु नाटु'मधून जगाला थिरकायला लावणारा दिग्दर्शक

भारतीय दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या चित्रपट 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटु नाटु' या लोकप्रिय गाण्याने जगभरात धुमाकूळ घातला आहे, त्यात सध्या त्याचा कोरिओग्राफर प्रेम रक्षित खूप चर्चेत आहे.'नाटु नाटु' या गाण्यात अभिनेते रामचरण आणि ज्युनियर एनटीआर या दोघांनी केलेल्या उत्कृष्ट नृत्याने या गाण्याच्या लोकप्रियतेत मोठा हातभार लावला आहे. यामुळेच चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते, गीतकार आणि संगीतकार यांच्यासोबतच नृत्य दिग्दर्शक प्रेम रक्षितही सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या या शानदार नृत्यदिग्दर्शनाने भारतीय चित्रपटसृष्टीचा सातासमुद्रापार डंका वाजवला आहे. या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे. आता या चित्रपटाला ऑस्करसाठी विविध श्रेणींमध्ये  नामांकन मिळाले आहे.

प्रेम रक्षित यांचा जन्म 14 डिसेंबर 1977 रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला. त्यांच्या कुटुंबात  आई-वडिलांशिवाय त्यांना एक लहान भाऊ आहे. त्यांच्या पत्नीचे नाव राजलक्ष्मी आणि मुलाचे नाव परीक्षित आहे. तेलुगू आणि तमिळ भाषेतील ७० हून अधिक चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शन करणाऱ्या प्रेम रक्षित यांचे कुटुंब एकेकाळी खूप श्रीमंत होते. त्यांचे वडील हिरे व्यापारी होते आणि आई गृहिणी. 1993 मध्ये, काही कारणांमुळे, त्यांच्या वडिलांना त्यांच्या कौटुंबिक व्यवसायातून वेगळे व्हावे लागले आणि तेथून त्यांच्या कुटुंबाचे वाईट दिवस सुरू झाले. कुटुंब चालवण्यासाठी वडिलांनी चित्रपटांमध्ये नृत्य दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली. प्रेम रक्षितदेखील एका शिंपीच्या दुकानात छोटी मोठी कामं करू लागला. प्रेम रक्षितच्या म्हणण्यानुसार, वडिलांच्या कमाईत घर चालवणे मुश्किल होते. 

त्यांचे वडील डान्स युनियन फेडरेशनचे सदस्य होते. कधी कुठे काम नाही मिळाल्यास ते खूप निराश व्हायचे. कुटुंबाच्या विवंचनेमुळे व्यथित होऊन त्यांनी एकदा आत्महत्या करण्याचाही विचार केला होता, कारण त्यांना वाटले की जर आपण आपला जीव दिला तर फेडरेशन नियमानुसार त्यांच्या कुटुंबाला 50,000 रुपये देईल, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाला  मोठी मदत होईल. रक्षित सांगतात की, आत्महत्या करण्याच्या उद्देशाने त्यांनी कोणाकडून तरी सायकल मागून घेतली आणि चेन्नईच्या मरीना बीचकडे निघाले, पण तिथे पोहोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की  ज्याची सायकल त्यांनी आणली होती ती व्यक्ती त्यांच्या कुटुंबाकडे सायकल मागायला गेले तर काय होईल? उधार घेतलेल्या सायकलने रक्षित यांना आत्महत्या करण्यापासून रोखले. जेव्हा रक्षित घरी पोहोचले तेव्हा त्याच्या वडिलांना सांगितले की त्यांना एका चित्रपटात बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम मिळाले आहे. 

2004 मध्ये  'विद्यार्थी' या  तेलुगू चित्रपटामधून त्यांनी नृत्य दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आणि 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या राजामौली यांच्या 'छत्रपती' चित्रपटाने त्यांना मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. 'विद्यार्थी' चित्रपटानंतर त्यांना फारसे काम मिळत नव्हते आणि अशा कष्टाच्या दिवसात त्यांनी राजामौली यांच्या मुलांना नृत्यही शिकवले. तोपर्यंत राजामौली यांना हे माहीत नव्हते की रक्षितने 'विदयार्थी' चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. एके दिवशी त्यांनी राजामौलींना सत्य सांगण्याचे धाडस केले. यानंतर राजामौली यांनी त्यांच्यावर 'छत्रपती' चित्रपटाच्या कोरिओग्राफीची जबाबदारी सोपवली. 'छत्रपती'मधून रक्षितच्या कामाचे सर्वत्र कौतुक होऊ लागले. पुढे अनेक चित्रपटांमध्ये नृत्य दिग्दर्शनाचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. 'छत्रपती'च्या माध्यमातून त्यांचे राजामौली यांच्याशी असलेले नाते आजतागायत कायम आहे. या दोघांच्या मेहनतीमुळेच आता त्यांना ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत आणले आहे. 

हे गाणं कोरियोग्राफ करण्यासाठी लागले दोन महिने लागले आणि शूटिंग पूर्ण व्हायला 20 दिवस लागले.  प्रेम सांगतात की, मी हे गाणं एक आव्हान म्हणून स्वीकारलं. खरंतर, एका स्टारसोबत काम करणं सोपं असतं पण मी या गाण्यात दोन सुपरस्टारसोबत काम केलं आहे. दोन सुरपरस्टार्सची डान्सिंग स्टाईल आणि एनर्जी वापरून गाण्याची कोरियोग्राफी करणं एक आव्हान होतं. या गाण्याच्या कोरियोग्राफीसाठी दोन महिने लागले. तुम्हाला जाणवेल की ते दोघं जेव्हा चालतात तेव्हा त्यांच्या चालीतील समानता, पर्फेक्शन यावर खूप काम करण्यात आलं आहे. दोघांसाठी 110 मूव्स तयार केल्या होत्या.  गाण्याच्या शूटींगविषयी ते सांगतात की. या गाण्याच्या शूटींगसाठी 20 दिवस लागले होते. तसेच 43 रीटेक्सनंतर शूटींग पूर्ण झालं.या 20 दिवसांमध्ये रिहर्सलसोबतच आम्ही गाण्याचं शूटींग पूर्ण केलं. कोरियोग्राफीसाठी 2 महिने लागले होते. जेव्हा राजामौली सर माझ्याकडे हे गाणं घेऊन आले तेव्हा मी घाबरलो होतो. दोन सुपरस्टार्सना एकाच वेळी नाचवणं सोपी गोष्ट नाही. माझ्यावर या गोष्टीचं प्रेशर होतं की दोन सुपरस्टार्सपैकी कुणीही एकमेकांपेक्षा कमी वाटायला नको. दोघांना इक्वल एनर्जीमध्ये दाखवणं हे माझं ध्येय होतं. या गाण्याचं शूटिंग युक्रेनमध्ये झालं आहे.

-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Sunday, January 29, 2023

जग्गुदादा ते जॅकी श्रॉफ

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1957 रोजी मुंबईतील वाळकेश्वर येथील तीन बत्ती परिसरात झाला. जॅकी आज 66 वर्षांचे होत आहेत. 80 च्या दशकात जॅकी अॅक्शन आणि रोमँटिक हिरो म्हणून ओळखले जात होते. जॅकी यांनी आतापर्यंत जवळपास 250 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र जॅकी यांच्या आयुष्याची गोष्ट ही कोणत्याही सिनेमाच्या कथेपेक्षा वेगळी नाही. चाळीत राहणारा टपोरी एक दिवस सुपरस्टार होईल याची कोणीच कल्पना केली नव्हती. 

जॅकी यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झालेला. असे म्हटले जाते की जॅकी यांनी आपल्या चाळीतील लोकांना नेहमीच मदत केली आणि म्हणूनच त्यांचे नाव जग्गू दादा ठेवण्यात आले. चाळीतले सगळे त्यांना याच नावाने हाक मारायचे. गरिबीमुळे जॅकींना अकरावीनंतर शिक्षण सोडून नोकरी शोधावी लागली. त्यांना स्वयंपाकाची खूप आवड होती, त्यामुळे ते ताज हॉटेलमध्ये नोकरीसाठी गेले होते पण तिथे त्यांना नोकरी मिळाली नाही. 

अनेक दिवस नोकरीच्या शोधात भटकल्यानंतर एक दिवस जॅकी बस स्टँडवर बसची वाट पाहत उभे होते, तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने त्यांची उंची पाहून, 'तुला मॉडेलिंगमध्ये रस असेल का?' असे विचारले. प्रत्युत्तरात जॅकी म्हणाले की, 'तुम्ही पैसे द्याल का?' जग्गू दादाहून जॅकी श्रॉफ होण्याचा प्रवास इथून सुरू झाला. अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर त्यांना सुभाष घई यांच्या 'हिरो' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला आणि जॅकी रातोरात सुपरस्टार झाले. 

आज जॅकी श्रॉफ  यांचे बॉलीवूडमधल्या निवडक अभिनेत्यांमध्ये नाव घेतले जाते.त्यांनी  आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांमध्ये आपलं वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. जॅकी श्रॉफने हिंदी चित्रपटांशिवाय गुजराती, तामिळ, बंगाली, मल्याळम, कन्नड, मराठी, पंजाबी आणि उडिसा अशा नऊ भाषेतल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. जॅकी श्रॉफचे मूळ नाव जयकिशन  काकूभाई श्रॉफ   आहे.  त्यांच्या वडिलांचे नाव काकूभाई श्रॉफ आणि आईचे नाव रिटा श्रॉफ आहे. 

 1986 मध्ये जॅकीला पुन्हा एकदा सुभाष घईंच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट दिलीप कुमार यांच्याच भोवतीच फिरत असला तरी प्रेक्षकांनी या चित्रपटातल्या जॅकीच्या कामाचे कौतुक केले.या चित्रपटातील जॅकी आणि अनिलकुमार यांच्या जोडीला बेहद पसंद केले.1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'काश' या चित्रपटाचा खास करून उल्लेख करावा लागेल. जॅकी केवळ मारधाड चित्रपटांमध्ये उठून  दिसतो, अशी काही लोकांची धारण होती. मात्र या चित्रपटात त्यांनी भावनिक शेडचे काम उत्तमरित्या केले. 1989 साल जॅकीसाठी महत्त्वपूर्ण राहिले. या सालात त्रिदेव, राम लखन आणि परिंदासारखे सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाले. सुभाष घईंच्या रामलखन चित्रपटातल्या जॅकी आणि अनिल कपूर यांच्या जोडीने पुन्हा एकदा  प्रेक्षकांची मने जिंकली.

 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या '1942 ए लव स्टोरी' आणि 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रंगीला' चित्रपटासाठी जॅकीला सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्याचा फिल्म  फेअर  पुरस्कार मिळाला. जॅकीच्या कारकिर्दीत मीनाक्षी शेषाद्री आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबतची जोडी खूपच पसंद केली गेली.  त्यांनी आतापर्यंतच्या चार दशकातील कालावधीत सुमारे तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.  स्‍वामी दादा, हीरो, अंदर बाहर, युद्ध, तेरी मेहरबानियां, पाले खां, अल्‍लाह रख्‍खा, कर्मा, जवाब हम देंगे, काश, राम लखन, परिंदा, मैं तेरा दुश्‍मन, त्रिदेव, वर्दी, दूध का कर्ज, सौदागर, किंग अंकल, खलनायक, गर्दिश, त्रिमूर्ति, रंगीला, बंदिश, अग्निसाक्षी, बॉर्डर, बंधन, रिफयूजी, मिशन कश्‍मीर, फर्ज, यादें, लज्‍जा, देवदास, ऑन-मेन एट वर्क, हलचल, क्‍योंकि, भूत अंकल, भागमभाग, किसान, वीर, शूटआऊट एट वडाला, धूम 3, हैप्‍पी न्‍यू ईयर, डर्टी पॉलीटिक्‍स ही काही उल्लेखनीय चित्रपटांची नावे आहेत. 

जॅकी यांनी त्यांची दीर्घकाळची मैत्रीण आयशा दत्तशी लग्न केले, जी नंतर चित्रपट निर्माता बनली.  हे जोडपे सध्या जॅकी श्रॉफ एंटरटेनमेंट लिमिटेड नावाची मीडिया कंपनी चालवते.  त्यांना दोन मुले आहेत. टायगर श्रॉफ (हेमंत जय) नावाचा मुलगा बॉलिवूड मध्ये सक्सेस तरुण अभिनेता आहे. आणि त्यांना कृष्णा नावाची मुलगीही आहे.  दिग्दर्शक सुभाष घई यांनीच श्रॉफला 'जॅकी' हे नाव दिले. 1990 नंतर ते मुख्य भूमिकेपेक्षा सह-अभिनेता म्हणून सशक्त भूमिकेत दिसू लागले. जॅकीला 'परिंदा' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला, तर 'खलनायक' चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.  याशिवाय त्यांना अनेकवेळा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.  2007 मध्ये, जॅकीला भारतीय चित्रपटातील उत्कृष्ट योगदानाबद्दल विशेष न्यायाधीश ज्युरी पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

Saturday, January 28, 2023

'लकी चार्म' सोनाक्षी सिन्हा आता छोट्या पडद्यावर

सोनक्षी बॉलिवूडमध्ये फारशी यशस्वी ठरलेली नसली तरीही तिच्या नावावर काही हिट चित्रपट आहेत. परंतु अलिकडच्या काळात ती बिगबजेट चित्रपटांमध्ये दिसून आलेली नाही.  खूप दिवसांनी सोनाक्षी सिन्हा ‘निकिता रॉय एंड द बुक ऑफ डार्कनेस’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे तिचा भाऊ कुश सिन्हा फिल्मी दुनियेत पाऊल ठेवत आहे. सोनाक्षी सिन्हा मागील काही काळापासून झहीर इक्बालसोबतच्या रिलेशनशिपवरून चर्चेत आहे. झहीर अन्‌ सोनाक्षीने अलिकडेच स्वत:च्या या प्रेमाच्या नात्याची जाहीर कबुली दिली आहे. झहीर हा एका ज्वेलर्सच्या कुटुंबाशी संबंधित असून सलमान खानचा तो चांगला मित्र आहे. झहीरने स्वत:चे बॉलिवूड पदार्पण सलमान खानचा चित्रपट 'द नोटबुक'द्वारे केले होते. झहीर आणि सोनाक्षी आता 'डबल एक्स एल' या चित्रपटात एकत्र दिसून आले आहेत. तिने दबंग' 1 आणि 2 बरोबरच 'राउडी राठोड' ,'सन ऑफ सरदार', 'आर राजकुमार' यासारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या चित्रपटात आधुनिकता आणि रेट्रो लुक यांचं अफलातून मिश्रण सोनाक्षीने सादर केलं. मात्र या चित्रपटांमध्ये ती फक्त शोभेची बाहुली म्हणूनच वापरली गेली. अभिनय तिच्या वाट्याला आलाच नाही.

सोनाक्षी सिन्हा अमेजन प्राइम वीडियो  च्या दहाड़ या वेब सीरिजमधून ओटीटी मध्ये पदार्पण करणार आहे. बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दहाड़चा प्रीमियर होणार आहे.  या चित्रपट महोत्सवात प्रीमियर होणारी ही पहिली भारतीय वेब सिरीज आहे. दहाड ही आठ भागांची गुन्हेगारी मालिका आहे.  ही कथा राजस्थानमधील एका छोट्या शहरावर बेतलेली आहे.  सोनाक्षी सिन्हा सब इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आहे. सोनाक्षीने स्थानिक पोलीस उपनिरीक्षक अंजली भाटी यांची भूमिका केली आहे. सार्वजनिक शौचालयात अनेक महिलांचा रहस्यमयरीत्या मृत्यू झाल्यामुळे प्रकरणाचा तपास अंजलीकडे जातो. सुरुवातीला हे मृत्यू आत्महत्येचे वाटतात, पण जसजसे प्रकरण पुढे सरकते तसतसे अंजलीला सीरियल किलरचे असल्याचे जाणवते. यानंतर पोलिस आणि मारेकरी यांच्यात मांजर आणि उंदराचा खेळ सुरू होतो. 

सोनाक्षी सिन्हाचा चित्रपट प्रवास आश्चर्यकारक आहे. एसएनडीटीमधून फॅशन डिझायनिंगचा कोर्स केल्यावर तिला या विषयाची इतकी गोडी लागली की तिने याच क्षेत्रात झोकून द्यायचं पक्कं केलं. काही फॅशन ब्रँडसाठी रॅम्प वॉक केला. 'मेरा दिल लेके देखो' या चित्रपटासाठी कॉस्च्युम डिझायनर झाली. या क्षेत्रात वावरत असताना अचानक तिला अरबाज खान भेटला. त्यांना 'दबंग'साठी नायिका हवी होती. आणि सोनाक्षी सिन्हा मध्ये त्याला अपेक्षित नायिका सापडली. मात्र याच सोनाक्षी सिन्हाला चित्रपटात यायसाठी तब्बल तीस किलो वजन कमी करावं लागलं. पण ते सिन्हानं केलं. चित्रपट हिट झाला आणि सोनाक्षीचं नाणं चाललं.

सोनाक्षी लहानपणी फार मस्तीखोर होती. बंदुकीसारखी तेजतर्रार होती. स्विमिंग, व्हॉलीबॉल, टेनिस, फुटबॉल अशा बऱ्याच खेळात तिचा वावर होता. लव-कुश या आपल्या जुळ्या दोन भावांसोबत तिची खूप मस्ती चाले. मारामारी चालायची. शाळा- कॉलेजमध्ये तिच्या नादाला कोणी लागायचे नाही. अगदी टॉमबॉईश होती. त्यामुळे तिची आई- पूनम सिन्हा नेहमी म्हणायची,' हिच्यात मुलीचा एकही गुण शोधूनही सापडत नाही. सुरुवातीला सोनाक्षीला खेळाडू व्हायचं होतं. पण नंतर डिझायनिंग आवडायला लागलं आणि आता अभिनय.

पण तिचे चित्रपट गाजले असले तरी तिच्या अभिनयाची झलक मात्र अजून कुठल्या चित्रपटात दिसली नाही. विशेष म्हणजे सोनाक्षीच्या कारकिर्दीत 'दबंग' ची तुलना अन्य कुठल्याही तिच्या चित्रपटाशी होऊ शकली नाही. या चित्रपटातील ' थप्पड से डर नहीं लगता साब,प्यार से लगता है' या तिच्या डॉयलॉगने अक्षरशः धुमाकूळ घातला. तरीही या चित्रपटात तिच्या वाट्याला फारच कमी दृश्य आली. 'दबंग' हा पूर्णतः सलमानमय होता. 'दबंग 2' मध्ये तर तिचे अस्तित्वच नव्हते. काहीजण म्हणतात की, 'दबंग' मुळे हिंदी चित्रपट सृष्टीला देशी ठसक्याची नायिका मिळाली. ग्लॅम-डॉलसच्या गोतावळ्यात साडी आणि सलवार कमीजमधली सोनाक्षी 70-80 च्या दशकातल्या नायिकांची आठवण ताजी करत एक नवा ट्रेंड सुरू करू पाहत होती. त्यात तिला बऱ्यापैकी यश मिळालं सुद्धा. मात्र अभिनय तिच्या वाट्याला आलाच नाही. म्हणजे या चित्रपटांमध्ये तो नव्हताच. निव्वळ मनोरंजन हाच या चित्रपटांचा उद्देश. अक्षय कुमार, अजय देवगण, शाहिद कपूर, सलमान खान यांच्या प्रभावशाली देमार चित्रपटांमध्ये सोनाक्षीचा सहभाग नायकाची प्रियेसी आणि नाचण्या -गाण्यापुरताच होता. मात्र चित्रपटांनी करोडोंची कमाई केल्याने 'लकी चार्म' ठरवत तिचं ' मिस 100 करोड' असं नामाकरण झालं होतं.

महत्त्वाचं म्हणजे तिची लक्षात राहावी, अशी भूमिकाच नाही. 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' मध्ये बऱ्यापैकी महत्त्वाची भूमिका मिळूनही तिला स्वतःचा प्रभाव पाडता आला नाही. ज्या रेट्रो लुक मुळे तिच्याकडे कौतुकाच्या नजरा वळल्या, त्या लुकचा तिच्याच चाहत्यांना कंटाळा येत चालला. अशा वळणावर सर्वसाधारपणे शरीरप्रदर्शन ,बोल्ड दृश्यं, चुंबन दृश्यं याचा आधार घेण्याचा प्रयत्न केला जातो.मात्र या गोष्टीला सोनाक्षी बळी पडली नाही. त्यामुळे तिच्या कारकिर्दीला नायकाचाच भक्कम टेकू लागतो, हे स्पष्ट झालं. विशेष म्हणजे तिला नायकही तसेच भेटले.

स्वतःच्या बळावर चित्रपट चालवा, असा तिचा प्रयत्न झाला,पण तो अयशस्वी झाला. 'लुटेरा' काही चालला नाही. मात्र तिच्या पाखी या बंगाली मुलीच्या भूमिकेचे कौतुक झालं. 'इसी बहाने क्यूँ ना मैं भी दिल का हाल जरा संवार लू...' अशी सुरेल साद घालत एकीकडे आजारपण आणि अपयशी प्रेम याच्याशी झुंजत हेलकावे खाणारी सोनाक्षीचा पाखी हावभाव, दिसणं, वावरणं, संवादफेक सर्वच बाबतीत उजवी होती. खरे तर अभिनयासाठी नावाजले जाणं कलाकारांच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचं असतं. दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा, विद्या बालन, आलिया भट्ट आदींसाठी खास संहिता लिहून घेतली जाते, चित्रपटांचा डोलारा स्वतःच्या खांद्यावर वाहून नेण्यासाठी या नायिका सज्ज असतात. याचं गांभीर्य सोनाक्षीच्या कारकिर्दीत अभावानेच बघायला मिळालं. 'अकिरा', 'नूर', 'हॅप्पी फिर भाग जायेगी' आणि 'खानदानी शफखाना' हे तिन्ही चित्रपट सोनाक्षीच्या व्यक्तिमत्त्वाभोवती फिरत होते. पण समीक्षा आणि तिकीटबारी दोन्हीपैकी एकवरही हे चित्रपट चमकली नाहीत. ऍक्शन आणि कॉमेडी या तिच्या आवडत्या शैलीतील चित्रपट असूनही त्यात प्रेक्षकांना वेगळेपण आढळलं नाही.

'बुलेटराजा', 'तेवर', 'ऍक्शन जेक्शन', 'वेल कम टू न्यू यॉर्क' ,'फोर्स 2', 'इत्तेफाक' अशा चित्रपटातून सोनाक्षीचा फायदा तर झाला नाहीच,पण उलट अपयश पदरी पडून ती मागे खेचली गेली. करण जोहरचा 'कलंक' सुद्धा तिला फायद्याचा ठरला नाही. 'मिशन मंगल'ला यश मिळालं असलं तरी या चित्रपटाचे श्रेय कुणा एकाला जात नाही. या चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन हे कलाकार होते. यापुढच्या काळात सोनाक्षीला अभिनय करायला मिळायला हवा,तरच ती या क्षेत्रात टिकून राहणार आहे. आगामी चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये तरी तो दिसून यायला हवा. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

बडे स्टार छोट्या पडद्यासाठी उत्सुक

चित्रपटाचे प्रमोशन असो किंवा कोणतीही नवीन घोषणा असो, चित्रपटातील कलाकारांना छोट्या पडद्याचा आधार घ्यावा लागत आहे. रिअॅलिटी शोपासून ते फिक्शन शोपर्यंत, मोठे स्टार्स त्यांच्या चित्रपट आणि वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी या प्लॅटफॉर्मचा वापर मोठया प्रमाणात करताना दिसत आहेत. इतकंच नव्हे तर अमिताभ बच्चनपासून सलमान खानपर्यंत आणि रेखापासून माधुरी दीक्षितपर्यंत सगळ्यांनाच छोट्या पडद्याशी जोडल्याचा आनंद वाटतोय. ते तसं बोलून दाखवताहेत. कोविड-19 दरम्यान ओटीटीने चांगलेच हातपाय पसरायला सुरुवात केली.  चित्रपटगृहे बंद असल्याने प्रेक्षकांनी ओटीटीला पसंदी देत त्यावरील सिनेमा, वेबसिरीजची मजा लुटली. त्यामुळे आता छोटा पडदा मागे पडेल असे लोकांना वाटले, पण त्याने लोकांच्या हृदयात असे स्थान निर्माण केले आहे की टीव्ही मालिका आणि रिअॅलिटी शो आजही लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर आहेत.सोनाक्षी सिन्हा अमेजन प्राइम वीडियो  च्या दहाड़ या वेब सीरिजमधून ओटीटी मध्ये पदार्पण करणार आहे. बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दहाड़चा प्रीमियर होणार आहे.  या चित्रपट महोत्सवात प्रीमियर होणारी ही पहिली भारतीय वेब सिरीज आहे. दहाड ही आठ भागांची गुन्हेगारी मालिका आहे.  ही कथा राजस्थानमधील एका छोट्या शहरावर बेतलेली आहे.  सोनाक्षी सिन्हा सब इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आहे.2023 मध्ये, सोनाक्षीसह अनेक बॉलिवूड कलाकार ओटीटी इनिंग सुरू करू शकतात.  त्यापैकी एक म्हणजे शाहीद कपूर, जो प्राइम व्हिडिओच्या स्वतःच्या 'फर्जी' मालिकेद्वारे ओटीटीमध्ये पदार्पण करत आहे. ही वेब सिरीज 10 फेब्रुवारीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.  हा एक क्राईम कॉन ड्रामा आहे, ज्यामध्ये शाहिद मोठ्या व्यक्तींची फसवणूक करताना दिसणार आहे.  विजय सेतुपती समांतर लीड रोलमध्ये आहे.  उर्मिला मातोंडकर आणि करीना कपूर खान देखील ओटीटी स्पेसमध्ये दिसणार आहेत.  

आता 2023 मध्येही छोट्या पडदा मोठा धमाका करणार आहे. छोट्या पडद्यावरील अनेक हिट मालिकांच्या आमूलाग्र बदलाची बातमी समोर आली आहे. 2023 मध्ये अनेक नवीन चॅनेल्स सुरू झाली आहेत आणि त्याचबरोबर अनेक नवीन मालिकाही सुरू झाल्या आहेत. 2023 मध्ये प्रसिद्ध मालिकांमध्येही काही नवे बदल आणि नवा अंदाज दिसून येणार  आहे. निर्माता असित मोदी यांच्या मते यावर्षी 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये काही नवीन बदल पाहायला मिळतील. ही मालिका गेली कित्येक वर्षे प्रेक्षकपसंदीच्या टॉप 10 मध्ये आहे. या मालिकेतून बाहेर पडणाऱ्या कलाकारांची जागा लवकरच नवे कलाकार घेतील, असे सांगण्यात आले आहे. 2023 मध्ये पोपटलालचे लग्न आणि दयाबेनची एंट्री  होण्याची शक्यता आहे. मात्र दयाबेन दिशा वाकानी आहे की नवीन कोणी अभिनेत्री, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चांगला टीआरपी  असलेल्या 'अनुपमा' मालिकेमध्येही बरेच काही नवीन बदल दिसणार आहे.  'अनुपमा'मध्ये नवीन रोमँटिक ट्रॅक देखील पाहायला मिळणार आहे. त्याच वेळी 2023 मध्ये 4000 भाग पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर असलेली 'ये रिश्ता क्या कहलाता है' ही मालिका नवीन नात्याची सुरुवात करणार आहे. त्याचबरोबर 'भाभी जी घर पर है' या अँड टीव्हीवरील  सर्वात हिटमालिकेमध्ये नवीन पात्रांची एन्ट्री पाहायला मिळणार आहे.  त्याचे शूटिंग दुबईत नवीन ठिकाणी केले जाऊ शकते.  यामध्ये हॉरर कॉमेडीही दाखवण्यात येणार आहे. 

2023 मध्ये अनेक नवीन शो प्रदर्शनाच्या रांगेत आहेत. अनेक सुरुही झाले आहेत. जसं की, 'वागले की दुनिया' (ही मालिका 1988 मध्ये आली होती.) ही मालिका 2023 मध्ये नवीन पद्धतीने सादर केली जात आहे. याशिवाय बॅरिस्टर बाबू भाग 2, दुर्गा आणि चारू या मालिका आधीपासूनच प्रसारित होऊ लागल्या आहेत. 'धर्मपत्नी'चेही प्रसारण होत आहे. देव जोशी अभिनीत सब चॅनलचा प्रसिद्ध शो बालवीर सीझन 3 नव्या वर्षात प्रसारित होणार आहे. टीव्ही क्वीन एकता कपूर ब्युटी अँड द बीस्ट या हॉलिवूड चित्रपटावर आधारित मालिका घेऊन येत आहे ज्यात कुशल टंडन मुख्य भूमिकेत आहे. करण कुंद्रा, गश्मीर महाजनी आणि रिम शेख यांचा हॉरर रोमँटिक शो 'भेडिया' लवकरच कलर्स वाहिनीवर येणार आहे. स्टार प्लसवर 'तेरी मेरी डोरिया', झी टीव्हीवर 'मैत्री', सोनी सबवर 'ध्रुव तारा' लवकरच येणार आहेत. सुष्मिता मुखर्जी आणि काजल चौहान अभिनीत 'मेरी सास भूत है' रिलीजसाठी सज्ज आहे.

'अग्निसाक्षी एक समझौता' आणि त्रिकोणी प्रेमकथा 'इश्क में घायल' लवकरच कलर्स वाहिनीवर दिसणार आहे. मास्टर शेफ सीजन 7 स्टार प्लसवर शरारत 2 आणि थोड़ा जादू थोड़ी नजाकत, स्टार भारतवर मन की आवाज प्रतिज्ञा 2, स्टार प्लसवर रुद्रकाल, जी टीवी वर रब से दुआ, शेमारू उमंग चॅनलवर राजमहल दाकिन्न का रहस्य, सोनी टीवीवर कथा अनकही, सब टीवीवर दिल दिया गल्ला ,स्टार भारतवर आशाओं का सवेरा धीरे-धीरे 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.जुनून चित्रपटावर आधारित बाघीन या मालिकेव्यतिरिक्त मोलकी सीझन 2 रिलीजसाठी सज्ज आहे. या व्यतिरिक्त 2023 मध्ये प्रसिद्ध रियलिटी शो कपिल शर्मा शो, बिग बास 17, डांस दीवाने, झलक दिखला जा, डांस प्लस इत्यादी रियलिटी आणि डांस शोदेखील नव्या अंदाजात प्रदर्शित होणार आहेत. छोट्या पडद्याची ही नवीन तयारी आणि त्याची प्रचंड लोकप्रियता बघता असा निष्कर्ष निघतो की मोठ्या पडद्याचा दबदबा असो की ओटीटीचा, परंतु प्रत्येक घराघरात पोहोचलेला छोटा पडदा, त्याची प्रतिष्ठा आणि त्याची क्रेझ कधीच संपणार नाही. छोटा पडदा लहान असला तरी त्याचा प्रेक्षकवर्ग मात्र प्रचंड आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Friday, January 27, 2023

करिअर घडवण्याच्या घाईत बालपण हरवलेली मुलं

बालपण हा जीवनाचा सर्वात सुंदर टप्पा असतो, ज्यामध्ये ना जबाबदारीची जाणीव असते ना कसलीही चिंता. फक्त 'खा, प्या आणि मजा करा' हे तत्वच खरे वाटते. आपल्या सर्वांच्या बालपणीच्या अनेक आठवणी आहेत, काही चांगल्या आणि काही वाईट, पण तरीही त्याचाचा विचार करताना आजही चेहऱ्यावर आनंदाची लहर येते.आपण अनेकदा मुर्खपणाने वागलो असेल किंवा चुका केल्या असतील, ज्याचा विचार करून आपल्याला स्वतःवरच हसू आले असेल किंवा रागही आला असेल. पण आज पुन्हा कधी बालपण परत येत नाही, मुलांच्या निरागसतेचं गांभीर्य किंवा समजूतदारपणामध्ये कधी रूपांतर होतं ते कळत नाही. कदाचित या पिढीतील मुलांनी त्यांचे बालपण मनसोक्त जगले नसावे. तंत्रज्ञान आणि माध्यमे यांनी वय आणि काळापूर्वीच त्यांचे बालपण हिरावून घेतलं आहे. या वातावरणात त्यांच्या निरागसतेचे लागलीच परिपक्वतेत रूपांतर झाले. आजची पिढी एकतर आपल्या जीवनात निर्माण होणारी आव्हाने अतिशय हलकेपणाने घेते किंवा माघार घेऊन हिंसाचाराचा किंवा गुन्हेगारीचा मार्ग निवडते याचे हेही कारण असू शकते का?

पूर्वीचे बालपण आणि आजचे बालपण पूर्णपणे वेगळे आहे किंवा पूर्णपणे विरुद्ध आहे असे म्हणायला हरकत नाही. आजचे बालपण धकाधकीच्या, नियमित अभ्यासाबरोबरच विविध स्पर्धा परीक्षा आणि छंद वर्गाची तयारी करण्याच्या आणि अदृश्य अशा अनेक शर्यतीत धावण्यात व्यस्त झालेले दिसते. या सर्वांमुळे मुले वेळेपूर्वी परिपक्व होत आहेत. माहिती क्रांती आणि ग्राहक बाजार यांनी त्यांच्या अपरिपक्व मेंदूवर माहितीचा भडिमार केला आहे, ज्यामुळे त्यांना ती सर्व माहिती त्यांच्या 'नॉलेज स्टोअर्स'मध्ये साठवून ठेवण्याची मानसिक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवावी लागते आणि जीवनाच्या शर्यतीत यशस्वी होण्यासाठी स्वतःला व्यस्त ठेवावे लागते. या यशाच्या शक्यतेने मुले ग्राहक बनली आहेत, त्यांची नैसर्गिकता देखील संपली आहे.

मानवी शरीर नैसर्गिकरित्या विकसित झाले तर ते निरोगी असते हे आपणा सर्वांना माहीत आहे, परंतु जर मानवी शरीरात वैद्यकीय प्रक्रियेद्वारे (हार्मोन्स बदलणे, प्लास्टिक सर्जरी इ.) फेरफार केली गेली तर पुढे आपल्याला विविध अज्ञात आजारांना सामोरे जावे लागू शकते. हे देखील एक सत्य आहे की ब्लडप्रेशर, मधुमेह, दमा, हृदयविकाराचा झटका इ. आजार जे वृद्धापकाळात होत असत, ते आज किशोरवयीन आणि तरुणांमध्ये किंवा त्याहीपूर्वी होत आहेत. वैद्यकीय संशोधनानुसार ऐंशी ते नव्वद टक्के आजार तणावामुळे होतात. न्यूरोसायंटिस्ट बीएस ग्रीनफिल्ड यांच्या मते, मेंदूच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे घटक म्हणजे थेट अनुभव, प्रौढ पिढीशी संवाद, खेळण्याच्या आणि सर्जनशील बनण्याच्या संधी, ज्या आधुनिक जीवनाच्या वेगवान गतीमुळे नष्ट होत आहेत. 

तंत्रज्ञानाने जग मोठ्या प्रमाणात खुले केले आहे यात शंका नाही, परंतु प्रथमदर्शनी अनुभवांना पर्याय नाही, ज्यापासून आजची मुले अधिकाधिक वंचित राहिली आहेत. आजकाल तंत्रज्ञानामुळे बाहेरील क्रियाकलापांची जागा इनडोअर अ‍ॅक्टिव्हिटीजने घेतली आहे, त्यामुळे मुलांच्या शारीरिक आरोग्यावर परिणाम तर झाला आहेच, शिवाय मुलांमध्ये निराशा वाढली आहे. मुलांमध्ये 'सोशॅलिटी' संपत चालली आहे, त्यांच्यात व्यक्तिवाद वाढत आहे. आव्हानांना तोंड देण्याऐवजी, ते पलायनवादी बनत आहेत, जीवन जगण्यापेक्षा ते संपवणे त्यांना सोपे वाटत आहे. तसे पाहिल्यास मुलांमधील या बदलांच्या कारणांमध्ये  असमान आणि भेदभाव करणारी कौटुंबिक आणि  सामाजिक पार्श्वभूमी, शिक्षणपद्धती, बाजारपेठेवर आधारित ओळखींवर होणारा खर्च, स्पर्धेसाठी धडपडणे, उच्च स्थान मिळवण्याची इच्छा, यशाची कमाल पातळी गाठणे. करण्याची आकांक्षा, अनौपचारिकतेपासून वेगळे होणे. व्यवस्था आणि भावनिकतेचा अंत, मुलांवर करिअरसाठी दबाव, ग्रामीण-शहरी विभाजनाच्या आधारे गुणवत्तेची ओळख, अर्थव्यवस्था, राजकारण, संस्कृती आणि अहंकाराचे मानसशास्त्र, स्वतःच्या बुद्धिमत्तेवर संशय घेणे यांचा समावेश आहे. 

सर्व प्रकारच्या स्पर्धांमुळे मुलांमध्ये विभाजित व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होत आहे, त्यामुळे आत्महत्या हा निराशेपेक्षा सामाजिक दबावाचा परिणाम आहे. या आत्महत्यांना आत्महत्या नाही तर व्यवस्थाजनित आत्महत्या म्हणता येईल, ज्यासाठी औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही संस्था जबाबदार आहेत. शैक्षणिक संस्थांनी यशाचे मूल्य अमर्यादित केले आहे, म्हणजेच आता यशाला मर्यादा नाही. सर्वोच्च स्थान प्राप्त करणे हे यशाचे माप आहे.  यानंतर, तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये सर्वोत्तम रँक मिळावी, तुम्हाला जास्त वेतनश्रेणीची नोकरी मिळावी.  या प्रवृत्तीने विद्यार्थ्याला विनाशाच्या मार्गावर नेले आहे. 

बाजाराने प्रत्येक कुटुंबाला, मग ते गरीब असो वा उच्च, आपल्या मुलांना यशस्वी व्हायचे असेल तर त्यांना विशिष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश देणे भाग पाडले आहे. पण पालकांच्या अतिरेकी अपेक्षा आणि दिवसेंदिवस वाढणारी स्पर्धा यामुळे मुले इतकी व्यस्त झाली आहेत की ते तणावाखाली जगू लागली आहेत हेही एक वास्तव आहे. शाळा असो की ट्यूशन, कॉम्प्युटर क्लास असो की डान्स किंवा टीव्ही, मुलांचे वेळापत्रक या सर्वांसाठी ठरलेले असते. मात्र ही बाब मुलांच्या सोयीऐवजी अडचणीची ठरत असून, ते तणावाचे कारण आहे. आता मुलांमध्ये शारीरिक किंवा मानसिक कारणांऐवजी सामाजिक कारणांमुळे जास्त ताण येतो. संशोधनानुसार, जर मूल वर्गातल्या परीक्षेत चांगली कामगिरी करू शकले नाही किंवा त्याला वाईट खराब मिळाले तर तो न्यूनगंडाचा बळी ठरतो.  तो शिक्षकांच्या उपेक्षेचा बळी ठरतो, पालकांच्या दटावणीला कारण ठरतो. आणि त्याचे  निकाल असेच येत राहिले तर किंवा माझी निवड झाली नाही तर आई-वडील कर्ज कसे फेडणार या टेन्शनचा तो बळी ठरतो. 

मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, मी आयुष्यात काहीच करू शकत नाही आणि हा विचार करून तो आत्महत्येसारखे अमानुष पाऊल उचलण्याचे धाडस करतो. ज्या वयात आपण त्यांना कोचिंग इन्स्टिट्यूटच्या शिस्तबद्ध पिंजऱ्यात कैद करतो, ते वय म्हणजे मैत्री करण्याचे, सामाजिक मूल्ये शिकून घेण्याचे, शारीरिक आणि मानसिक विकासाचे आणि त्यांची सर्जनशीलता विकसित करण्याचे, आजीच्या कथा ऐकण्याचे आणि त्या पात्रांमध्ये स्वत:चा पाहण्याचे, मोठे होऊन देशासाठी काहीतरी करण्याचे असे वाटण्याचे असते. सर्जनशीलतेसाठी कल्पनाशक्तीही आवश्यक असते आणि ती कल्पनाशक्ती आपण लहानपणीच मुलांची  मारून टाकली आहे, हे वास्तव आहे.कदाचित यामुळेच मुलांमधील सर्जनशीलतेची प्रवृत्ती संपत चालली आहे. आणि जरा विचार करा, आम्ही या वयातील मुलांना कृत्रिम वातावरणात बंदिस्त करतो. त्याला कुटुंबाच्या सामाजिक वर्तुळापासून वेगळे करतो.कोणतीही समस्या सोडवण्यासाठी त्याला तंत्रज्ञान किंवा गुगलकडे वळण्यास भाग पाडतो. त्याला खेळण्यासाठी आणि मित्र बनवण्यासाठी पुढचे संपूर्ण आयुष्य पडले आहे, असे सांगून त्याला आपण त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायला सांगतो. हे वय गेलं की ते पुन्हा मिळत नाही हे आपणा सर्वांनाच माहीत आहे.  करिअर घडवण्याच्या घाईत मुलं इतकी मोठी होतात की बालपण मागे राहून जातं आणि ते तरुण बनतात. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि.सांगली 


Thursday, January 26, 2023

'आयटी नियम २०२१'वर चर्चा करण्याची केंद्राची तयारी

प्रसारमाध्यमांवरील माहितीच्या सत्यशोधनाचा अधिकार प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो (पीआयबी) तसेच केंद्र सरकारला देणाऱ्या माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींना एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया, विविध पत्रकार संघटनांनी विरोध दर्शविल्यानंतर  संबंधित तरतुदींवर चर्चा करण्याचा पवित्रा केंद्र सरकारने घेतला आहे. हे चांगलेच झाले म्हणायचे. गेल्या आठवड्यात इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 'आयटी नियम, 2021' कायद्याचा सुधारित मसुदा प्रसिद्ध केला. या संभाव्य कायद्यातील बहुतांश तरतुदी ऑनलाइन गेमिंगबाबत नियम निश्चित करण्याशी संबंधित असताना केंद्र सरकारने खोट्या बातम्यांबाबत यामध्ये एक छोटे टिपण समाविष्ट केले. यानुसार चुकीच्या, खोट्या व भ्रामक बातम्या ठरवण्याचे अधिकार 'पीआयबी'कडे देण्यात आले आहेत. त्यासाठी 'पीआयबी' मध्येच स्वतंत्र तथ्य परीक्षण विभागाची स्थापना करण्यात येणार आहे. हा विभाग सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांवरील माहितीचे परीक्षण करील व चुकीच्या खोट्या व भ्रामक बातम्यांची स्वतःहून दखल घेईल किंवा पीआयबीच्या पोर्टल, ईमेल तसेच व्हॉट्सअॅपवर नागरिकांनी केलेल्या तक्रारींचाही आढावा घेईल.

एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने या तरतुदींना विरोध दर्शवला आहे. 'माहितीची सत्य- असत्यता ठरवण्याचा अधिकार केवळ सरकारकडे केंद्रित नसावा. अन्यथा यामुळे प्रसारमाध्यमांवरील सेन्सॉरशिपची सुरुवात होईल, असे सांगून पत्रकार संघटनांनी या तरतुदीबाबत चिंता व्यक्त केली आहे. पत्रकार संघटनांनी केलेल्या विरोधानंतर अखेर केंद्रीय माहिती-तंत्रज्ञानमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याबाबत प्रसारमाध्यमांशी संबंधित संस्था, व्यक्तींशी पुढील महिन्यात चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.

अभिव्यक्तीवर वेगवेगळ्या प्रकारे अंकुश आणण्याचे जे प्रयत्न सध्या देशात होत आहेत, त्यांचे गांभीर्य कळू शकते. सर्वात ठळक आणि ताजे उदाहरण म्हणजे ‘फेक न्यूज’ कोणत्या हे ठरविण्यासाठी सरकार आणू पाहात असलेल्या कायद्याचे. माहिती-तंत्रज्ञान कायद्यातील दुरुस्तीच्या मसुद्यात समाजमाध्यमांवर पसरणाऱ्या `फेक न्यूज’ला आळा घालण्यासाठी तरतूद करण्यात येत असून त्यानुसार प्रेस इन्फर्मेशन ब्यूरो (पीआयबी)ला अशा ज्या बातम्या आढळतील, त्या काढून टाकण्याचे आदेश संबंधित कंपन्यांना देण्यात येतील.बातम्या खोट्या आणि निराधार कोणत्या हे ठरविण्याचे अधिकार जर सरकारी संस्थेलाच असतील, तर एक प्रकारे हे स्वतंत्र अभिव्यक्तीवर घाला घालण्यासारखेच नाही का? एखादी बातमी चुकीची वा खोटी ही कशाच्या निकषावर ठरवले जाणार, हा यातील महत्त्वाचा प्रश्न आहे. माहितीच्या प्रसाराचे योग्य ते नियमन आवश्यक असते. पण ते नियमन म्हणजे सरकारच्या हातातील अस्त्र नव्हे. सरकार जनतेतूनच बहुमताने निवडून आलेले असते हे खरे. पण म्हणून दोन निवडणुकांच्या दरम्यानच्या काळात सत्ता एकवटण्याचा प्रयत्न करणे घटनाकारांना अभिप्रेत नव्हते आणि म्हणूनच नियंत्रणाच्या व्यवस्था निर्माण केल्या गेल्या.

भारताच्या शेजारी देशातील स्थिती पाहिली तर कुठे लष्करशाही, कुठे सर्वंकष नियंत्रणाची व्यवस्था, तर कुठे एकाधिकारशाही दिसते. यापैकी अनेक देशांत निवडणुका होतातही. परंतु केवळ निवडणुका म्हणजे लोकशाही नव्हे. तो सांगाडा आहे. त्यात सर्वसामान्य व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा, सर्वांना समान संधीचा, संस्थांच्या स्वायत्ततेचा, मोकळ्या अभिव्यक्तीचा प्राण ओतला नसेल तर ती तोंडदेखली लोकशाही ठरते. भारतात प्रसारमाध्यमांना असलेले स्वातंत्र्य हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याला नख लागता कामा नये. गुजरातेतील दंगलींच्या संदर्भात ‘बीबीसी’ने तयार केलेल्या वृत्तपटावर केंद्र सरकारने घातलेली बंदी हादेखील अभिव्यक्तीला अटकाव करण्याचाच प्रयत्न होय. या वृत्तपटात केलेले चित्रण चुकीचे वाटत असेल तर त्याचा सरकार प्रतिवाद करू शकत होते. उलट बंदी घातल्याने या वृत्तपटाचे महत्त्व आणि त्याविषयीची उत्सुकता वाढली.एकूणच टीका, चिकित्सा मोकळेपणाने स्वीकारणे हे प्रगल्भ लोकशाहीचे लक्षण आहे. सध्या केंद्रात स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपने अनेकदा अनुदार धोरण स्वीकारून त्याच्याशी विसंगत वर्तन केले आहे. दुर्दैवाने बाकीचे पक्षही याबाबतीत फार वेगळे नाहीत. ममता बॅनर्जी यांचे व्यंग्यचित्र केवळ समाजमाध्यमांवरून ‘फॉरवर्ड’ केले म्हणून तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्राध्यापकाला बेदम मारहाण केली होती. त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले. दहा वर्षांनंतर न्यायालयाने त्यांना दोषमुक्त ठरवले; पण तोपर्यंत झालेला मनस्ताप आणि नुकसान कसे भरून निघणार? केंद्राच्या हडेलहप्पीवर टीकास्त्र सोडणारे पक्ष आपापल्या राज्यात मनमानी वर्तन करण्यात कमी नसतात, याचीही अनेक उदाहरणे सांगता येतील.

Wednesday, January 25, 2023

नव्या तंत्रज्ञानाने मंगळ मोहिमांना येणार गती

मंगळ ग्रहावर जीवनासाठी पोषक वातावरण निर्माण करून तेथे मानवी वस्ती स्थापण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर अनेक देशांनी काम सुरू केले आहे. यात अमेरिकेची नासा आघाडीवर आहे. पाठोपाठ चीन,रशिया यांचेही जोरदार काम चालू आहे. काही वर्षांपूर्वी स्टिफन हॉकिंग्ज यांनी ‘या पृथ्वीवर मानवजातीला आता वास्तव्यासाठी फार काळ राहिलेला नाही.जेमतेम शंभर वर्षं.त्यानंतर काय. याची तजवीज आताच करावी लागेल,’ असं एक विधान केलं होतं. ते बरंच गाजलंही. त्यावर उलटसुलट चर्चाही झाल्या. त्यातला वायूप्रदूषणाचा, जागतिक तापमानवाढीचा आणि त्यामुळं होणाऱ्या संभाव्य पर्यावरण ऱ्हासाबाबत गांभीर्याने बोलले जात आहे. काही वर्षांत होणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याच्या दुर्भिक्ष्याला माणूस कारणीभूत असणार आहेच. बदलत्या हवामानातून तसं सूचित होत आहेच, त्यामुळे अन्य ग्रहावर वसाहत करून राहण्याची मानवाला घाई झाली आहे.

२०३३ पर्यंत मंगळावर मानव पोहोचवणे असा नासाचा उद्देश आहे. यासंबंधी येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा मुकाबला करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. मंगळावर प्राणवायू तयार करणे हेदेखील त्या आव्हानांपैकीच आहे. कारण खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सोबत घेऊन जाणे व्यवहार्य ठरत नाही. म्हणूनच मंगळावर प्राणवायू तयार करणे गरजेचे आहे. आता यातच नव्या तंत्रज्ञानामुळे मंगळावर पोहचण्यासाठी जो लागणारा कालावधी आहे, तो खूपच कमी होणार आहे. यामुळे मंगळ मोहिमा जास्तीतजास्त आखता येणार आहेत. 

 पृथ्वीपासून मंगळापर्यंतचा प्रवास ७ महिन्यांचा असतो. मंगळावर आतापर्यंत गेलेल्या सर्व रॉकेट्सना इतकाच कालावधी लागला आहे, परंतु आता एका नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने हा प्रवास केवळ ४५ दिवसांचा राहणार आहे.  या नव्या तंत्रज्ञानाचे नाव 'न्युक्लियर थर्मल अँड न्युक्लियर इलेक्ट्रिक प्रॉपलशन’ आहे. नासा मंगळासाठीच्या मानवी मोहिमेकरता आण्विक इंधनाचा वापर करता येईल अशाप्रकारच्या रॉकेटची निर्मिती करणार आहे. वैज्ञानिकांनी रॉकेटचा पहिला टप्पा विकसित करण्यास सुरुवात केली आहे. रॉकेट निर्मितीसाठी दोन तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. न्यूक्लियर थर्मल प्रॉपल्शनमध्ये न्युक्लियर रिअँक्टर असेल, जो लिक्विड हायड्रोजन प्रोपेलेंट तप्त करणार आहे. यातून प्लाझ्मा तयार होणार असून तो रॉकेटच्या नॉजलमधून बाहेर पडेल, यामुळे रॉकेटला पुढे जाण्यास मोठा वेग मिळणार आहे. न्युक्लियर इलेक्टिक प्रोपल्शन या दुसऱ्या तंत्रज्ञानात न्युक्लियर रिअॅक्टर आयन इंजिनला इलेक्ट्रिसिटी पुरविणार आहे, यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होईल. हे क्षेत्र जेनॉनसारख्या वायूंना वेग प्रदान करते, यामुळे रॉकेटला पुढे जाण्यासाठी वेग मिळतो. नव्या तंत्रज्ञानादारे वैज्ञानिक रॉकेटच्या कामगिरीला जवळपास दुप्पट करू शकतील. रॉकेट निर्मितीची ही संकल्पना प्लोरिडा युनिव्हर्सिटीतील हायपरसोनिक्स प्रोग्राम एरिया लीड श्रोफेसर रेयान गोसे यांनी मांडली.  सद्यकाळात वापरल्या जाणाऱया तंत्रज्ञानादारे अंतराळयान पृथ्वीहून  मंगळावर जाण्यासाठी ७-९ महिन्यांचा कालावधी लागतो. याच वेगाने मानवी मोहीम राबविली गेल्यास दर २६ महिन्यांमध्ये एक अंतराळयान मंगळाच्या दिशेने झेपावणार  आहे. परंतु नव्या तंत्रज्ञानादारे मंगळावर जाण्याचा मार्ग सोपा होणार आहे. पृथ्वीपासून मंगळापर्यंतचा प्रवास केवळ ४५ दिवसांचा ठरणार आहे. यामुळे मोहिमेचा खर्च कमी होणार आहे. तसेच अंतराळातील  शून्य गुरुत्वाकर्षणामुळे मानवी प्रकृतीशी निगडित धोक्यांची तीव्रताही कमी होणार आहे. 

यापुढचा टप्पा हा मंगळावर मानववस्ती करण्यासाठीचा आहे. पृथ्वीपासून कोट्यवधी किलोमीटर अंतरावर असलेल्या मंगळ ग्रहावर सजीवांना जगण्यासाठी उपयुक्त ठरणारा ऑक्सिजन अर्थात प्राणवायू असल्याचे पुरावे तर आढळले आहेतच. अमेरिकेच्या नासा या संस्थेने पाठवलेल्या पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळ ग्रहावरील कार्बन डायऑक्साइडने भरलेल्या वातावरणातून ५.३७ ग्रॅम ऑक्सिजन संकलित केला. रोव्हरमधील टोस्टरच्या आकाराच्या यंत्राने ही कामगिरी केली असून या यंत्राचे पूर्ण नाव मार्स ऑक्सिजन इन-सीटू रिसोर्स युटिलायझेशन एक्सपेरिमेंट (मॉक्सी) असे आहे. त्यामुळे मंगळावर वसाहत करून राहण्याचे स्वप्न दृष्टिक्षेपात असल्याचं मानलं जात आहे.

नासाने मंगळ ग्रहावर इंजिन्युटी हेलिकॉप्टर उडवले आणि त्याच्या पोटातून बाहेर आलेल्या मॉक्सीने मंगळाच्या वातावरणातून ऑक्सिजनचे संकलन केले. मंगळ ग्रहावर ऑक्सिजन असल्याचे निष्पन्न झाल्याने त्या ठिकाणी मानवी वस्ती करणे शक्य आहे. या ऑक्सिजनचा वापर तिकडून पृथ्वीवर परत येणाऱ्या यानात इंधनाच्या रूपाने केला जाऊ शकतो. अंतराळवीरांना मंगळाच्या वातावरणातून किमान श्वास घेता येऊ शकेल एवढा ऑक्सिजन संकलित करता येऊ शकेल. मानववस्तीसाठी अजून फार मोठा पल्ला गाठायचा असला तरी मात्र यामुळे फार मोठी आशा निर्माण झाली आहे.   

नासाच्या स्पेस टेक्नॉलॉजी मिशन डायरोक्टेरेटचे प्रशासक जिम रियूटर यांच्या मते मंगळ ग्रहावरील वायूमंडळ अतिशय हलके आणि पातळ आहे. कार्बन डायऑक्साइडने भरलेल्या वातावरणातून ऑक्सिजन संकलित करणे अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. परंतु मॉक्सीने ही कामगिरी केली.अंतराळवीरांना हा ऑक्सिजन दिला तर ते किमान १० मिनिटे तग धरू शकतात, एवढा प्रभावी हा ऑक्सिजन आहे. अंतराळवीरांना जर एक वर्ष मंगळ ग्रहावर रहायचे असेल तर त्यांना १००० किलोग्रॅम एवढा ऑक्सिजन लागेल. हे खरे आहे की, आण्विक उर्जेच्या माध्यमातून पुरेशी उष्णता आणि विद्युत ऊर्जा उपलब्ध होऊ शकल्यास मंगळ हा पृथ्वीसारखाच मानवी वस्तीसाठी राहण्यायोग्य ग्रह ठरू शकतो. मात्र, हे तंत्रज्ञान अजून विकसित होणे आवश्यक आहे. प्रचंड प्रमाणात असणारा कार्बन डाय ऑक्साईड आणि अतिशय कमी तापमान आणि दाब या गोष्टी मंगळावरील मानवी वसाहतीसाठी आव्हान ठरतील. त्यांवर नवनव्या तंत्रज्ञानाच्या संशोधनातून मार्ग काढता येईल. दुसरे म्हणजे, मंगळावरील माती ही कार्बनच्या अतीव प्रमाणामुळे विषारी आणि पीक घेण्यास अयोग्य आहे. त्या मातीस कोळशाच्या मदतीने पीक घेण्यास योग्य बनविणे गरजेचे ठरेल. अर्थात मंगळावर मानव वस्ती हे अनेकांचे स्वप्न आहे. त्यादृष्टीने जोरदार प्रयत्न चालू आहेत. मोठमोठ्या कंपन्याही याकडे लक्ष देऊन आहेत. स्वप्न टप्प्यात असल्यास या कंपन्या यात मोठी गुंतवणूक करण्यास तयार आहेत. त्यामुळे कदाचित उद्या मंगळावर मानवी वस्ती शक्य होऊ शकेल, मात्र यासाठी बऱ्याच वर्षांचा कालावधी जावा लागणार आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Monday, January 23, 2023

अवकाश होतेय पृथ्वीबाहेरचे मोठे कचरा हाऊस

रशियाच्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला उल्का धडकल्याने त्याचा बचाव होणे अशक्य असल्याचे मानले जात आहे. रशियाच्या अंतराळ स्थानकातील कुपीत गळती होऊ लागल्याने अंतराळवीरांना पृथ्वीवर येण्यास अडचण निर्माण झाली आहे. अवकाश स्थानकावर आणीबाणीची स्थिती निर्माण झाली तर अंतराळवीरांना साधारणपणे तीन तासांत पृथ्वीवर परत आणले जाते. पण रशियाच्या अवकाशस्थानकातील सध्याची स्थिती नाजूक असून जर परिस्थिती आणखी बिघडली तर सर्व सात अंतराळवीरांना आणणे शक्य होणार नाही, अशी भीती डिडियर शुमेट यांनी व्यक्त केली. अंतराळवीरांना परत आणण्यासाठी नवीन अंतराळयान 20 फेब्रुवारी रोजी पाठविणार असल्याचे रशियाची अवकाश संशोधन संस्था ‘रॉसकॉसमॉस’ने सांगितले आहे.

अंतराळात वैश्विक वस्तूंचा आणि मानवनिर्मित कचरा लक्षणीय प्रमाणात आढळून येत आहे. लहान-लहान उल्का अवकाशयानावर आदळणे हे काही दुर्मिळ नाही, असे युरोपीय अवकाश संस्थेतील मानव आणि रोबोटिक संशोधन विभागाचे प्रमुख डिडियर शुमेट यांनी सांगितले. सूक्ष्म उल्का एका सेकंदाला 19 ते 30 किलोमीटर वेगाने फिरू शकतात. बंदुकीतून झाडलेल्या गोळीपेक्षाही खूप वेगाने त्या फिरत असतात. म्हणूनच अवकाश स्थानकाची मोठी निरीक्षण खिडकी ही जेव्हा वापरात नसेल तेव्हा संरक्षक साधनाच्या अत्यंत जाड आवरणाने बंद केलेली असते. लहान उल्का दूरवरच्या विश्वातून आणि अत्यंत वेगाने येत असल्याने त्यांचा माग ठेवणे शक्य होऊ शकत नाही, असे ते म्हणाले. परंतु अवकाश संशोधन संस्था ज्ञात उल्कावर्षावांचे निरीक्षण करतात. यंदा ऑगस्टच्या सुरुवातीला उल्कावर्षाव होणार आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात जेमिनिड उल्कावर्षावाची दिशा बदलल्याने सोयुझच्या कुपीला धडकण्याची शक्यता नसल्याचे ‘नासा’ आधी सांगितले होते. असंख्य लहान मोठ्या उल्का सतत विघटनाच्या अवस्थेत असतात.  सृष्टीचे हे चक्र कधीच थांबणारे नाही. 

शस्त्रास्त्रांच्या चाचण्यांसाठी क्षेपणास्त्रांद्वारे उपग्रह नष्ट करणाऱ्या देशांकडून अवकाशातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात लक्षणीय भर पडत आहे.  मॉस्कोने क्षेपणास्त्र चाचणी दरम्यान स्वतःचा एक उपग्रह 2021 मध्ये नष्ट केला. त्‍यावेळी त्याचे दीड हजारापेक्षा जास्त तुकडे झाले होते. यामुळे ‘आयएसएस’वरील अंतराळवीरांना सुरक्षित आश्रय घ्यावा लागल्याने ‘नासा’ने रशियावर टीका केली होती.चीनने 2007 मध्ये त्याचा एक हवामान उपग्रह पाडला, त्यावेळी साडेतीन हजारपेक्षा जास्त तुकडे निर्माण झाले होते, असा ‘नासा’चा दावा आहे. उपग्रह आणि अवकाशातील वस्तूंच्या अपघातातूनही कचरा वाढत असल्याचे दशकभरापासून दिसत आहे. रशियाच्या सैन्याचा एक निरुपयोगी उपग्रह 2009 मध्ये ‘यूएस इरिडियम कम्युनिकेशन’ उपग्रहाला धडकला होता. भविष्यात अशा घटना गंभीर स्वरूप घेतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

अंतराळातील वाढता कचरा ही पृथ्वीसाठी गंभीर समस्या बनत चालली आहे.  हा कचरा केवळ मानवनिर्मित नाही, तर त्याहीपेक्षा अधिक वैश्विक वस्तूंचाही आहे.   परंतु मानवनिर्मित अवकाशातील कचरा पृथ्वीवरील रहिवाशांसाठी धोका वाढवत आहे.  अमेरिकेची अंतराळ संस्था - नासाही याबाबत चिंतेत आहे.याविषयी विज्ञान मासिक- सायन्समध्ये, नासाचे शास्त्रज्ञ जे.सी.  लिओ आणि एन.एल.  जॉन्सन यांनी एका संशोधन अहवालात लिहिले आहे की, आपल्या जवळच्या अंतराळात असे कितीतरी हजार मानवनिर्मित तुकडे पृथ्वीच्या कक्षेत तरंगत आहेत, जे आगामी काळात भयावह दृश्य देऊ शक्तीक.  या अहवालात म्हटले आहे की, सध्या सुरू असलेल्या अंतराळ मोहिमा अजिबात थांबवल्या गेल्या तरी (जे आता शक्य नाही) अंतराळात इतके उपग्रह आहेत की ते तेथे कचऱ्याचेचे प्रमाण वाढवत राहतील.

या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठी अडचण म्हणजे हा कचरा गोळा करून पृथ्वीवर परत आणण्याची कोणतीही योजना नाही.  तथापि, अनेक देश आता या स्पेस वेस्ट मॉनिटरिंग योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करत आहेत.  काही काळापूर्वी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इसरो) ने अंतराळ परिस्थिती जागरूकता आणि व्यवस्थापन संचालनालय (डीएसएसएएम) स्थापन केले, जे अंतराळातील कचऱ्याचे निरीक्षण करते.  या संचालनालयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, गेल्या वर्षी इस्रोने आपल्या उपग्रहांना कचऱ्याच्या टक्करी होण्यापासून वाचवण्यासाठी वीस बचाव कार्ये हाती घेतली होती. वास्तविक एवढ्या मोठ्या प्रमाणात हा कचरा कुठून येतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  हा कचरा सूर्यमालेतील लघुग्रहांच्या झीज आणि तुटण्या-फुटण्यातून उद्भवतो असा एक सामान्य समज आहे.  काही कचरा बाहेरच्या अवकाशातून उल्काच्या रूपातही येतो.  पण ही समस्या तेव्हा वाढू लागली जेव्हा मानवाने आपले अवकाशयान अवकाशात पाठवायला सुरुवात केली आणि वेगवेगळ्या उद्देशांसाठी वेगवेगळ्या कक्षेत कृत्रिम उपग्रह बसवायला सुरुवात केली.  जेव्हा यापैकी काही उपग्रहांनी काम करणे बंद केले किंवा वाहनांमधील काही वस्तू अवकाशातून बाहेर पडल्या किंवा त्या खराब झाल्या, तेव्हा हे सर्व कचऱ्यामध्ये बदलले.

याचे ताजे उदाहरण म्हणजे रशियाने अंतराळ स्थानक सेंटरला (आयएसएस) सहकार्य करण्यास नकार दिल्याने 2030 मध्ये ते कचरा ठरण्याची शक्यता आहे.  गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये रशियन स्पेस एजन्सीचे तत्कालीन संचालक दिमित्री रोगोझिन यांनी अवकाशात अमेरिका आणि युरोपच्या आर्थिक निर्बंध आणि सहकार्याला उत्तर देताना म्हटले होते की, रशियाशिवाय युरोप, आशिया आणि अमेरिका अवकाशात टिकू शकत नाहीत.  अशा परिस्थितीत आयएसएस अनियंत्रित होऊन कचऱ्यात रूपांतरित होण्यास किंवा भारत-चीनमध्ये कुठेही  पडण्यापासून रोखता येणार नाही. हे खरे आहे की आता अंतराळ क्षेत्र देखील मानवी हस्तक्षेपापासून वाचलेले नाही. माणसाला अंतराळात  पोहोचण्याचे अनेक फायदे आहेत आणि तसे तोटेही.  गैरसोय म्हणजे एकीकडे तिथे कचरा निर्माण होत आहे आणि दुसरे म्हणजे अंतराळ युद्धाचा धोकाही वाढत आहे.  यावर विश्वास ठेवणे कठीण जाईल, परंतु हे खरे आहे की सर्वात जुना मानवनिर्मित कचरा अजूनही अवकाशात आहे.  

2018 मध्ये चिनी अंतराळ केंद्र थियांगॉन्ग-1 कचऱ्याच्या रूपात कधीतरी पृथ्वीवर आदळू शकते, अशी बातमी आल्यावर अंतराळ कचऱ्याच्या भीतीने डोके वर काढले.  2016 मध्ये चिनी अंतराळ संस्थेशी या केंद्राचा संपर्क तुटला.  नंतर तो पृथ्वीवरच पडल्याचे सांगण्यात आले.  मात्र, पृथ्वीच्या पृष्ठभागावर येईपर्यंत सुमारे नऊ टन वजनाच्या अंतराळ स्थानकाचे वजन एक ते चार टनांपर्यंत कमी झाल्याच्या बातमीने काहीसा दिलासा मिळाला.  पण नासाचे पंचाहत्तर टनांहून अधिक वजनाचे स्कायलॅब 1979 साली पृथ्वीवर पडले तेव्हा जगभरात खळबळ उडाली होती, पण कोणतीही हानी न होता समुद्रात पडून ती नष्ट झाली होती.गेल्या सहा-सात दशकांमध्ये विविध देशांच्या अवकाशातील हालचाली वाढल्याने तेथे पृथ्वीवरून पोहोचणारा कचरा वाढत आहे.  जुलै 2016 मध्ये, यूएस स्ट्रॅटेजिक कमांडने  अंतराळातील सतरा हजार आठशे बावन्न कृत्रिम वस्तूंची नोंद केली, त्यात एक हजार चारशे एकोणीस कृत्रिम उपग्रहांचा समावेश होता.  पण तो फक्त मोठ्या वस्तूंचा विषय होता.  यापूर्वी 2013 च्या अभ्यासात असे एक सेंटीमीटरपेक्षा लहान 17 कोटी तुकडे  आढळले होते आणि एक ते दहा सेंटीमीटर आकाराच्या कचऱ्याची संख्या सुमारे 7 कोटी होती.  अंतराळात यादृच्छिकपणे फिरणाऱ्या या गोष्टी कोणत्याही अंतराळ मोहिमेचा काळ बनू शकतात.

काही काळापूर्वी युनिव्हर्सिटी ऑफ साउथॅम्प्टनच्या संशोधकांनी, गुगल आणि स्पेस एक्स सारख्या खाजगी कंपन्यांच्या भविष्यातील अंतराळ कार्यक्रमांवर नजर टाकून अवकाशात तयार होणाऱ्या कचऱयांच्या नवीन शक्यतांचे मूल्यांकन केले.  संशोधकांच्या मते, एकीकडे गुगल आणि एलोन मस्क यांची कंपनी स्पेसएक्स येत्या काही वर्षांत जगात वायरलेस इंटरनेटचा वेगाने विस्तार करण्यासाठी आणि पर्यटकांना अंतराळात नेण्यासाठी शेकडो रॉकेट, वाहने आणि उपग्रह अवकाशात पाठवणार आहेत.  या योजनांच्या आधारे पुढील काही वर्षांत हे उपग्रह अवकाशात आल्यामुळे त्यांच्यातील टक्करींचे प्रमाण पन्नास टक्क्यांनी वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  सध्या दरवर्षी उपग्रह आणि त्यांचे तुकडे यांच्यात टक्कर होण्याच्या अडीचशेहून अधिक घटना घडतात.काही काळापूर्वी नासाने अंतराळातील या कचऱ्याला जबाबदार असलेल्या देशांची यादी तयार केली होती.  यातील पहिला क्रमांक रशियाचा आहे.  त्यापाठोपाठ अमेरिका, फ्रान्स, चीन, भारत, जपान आणि युरोपियन स्पेस एजन्सी यांचा क्रमांक लागतो.  सर्वात जास्त कचरा पृथ्वीपासून पाचशे पन्नास मैल ते सहाशे पंचवीस मैलांपर्यंत पसरलेला आहे.  पहिला स्पुतनिक-1 उपग्रह अवकाशात पाठवल्यापासून मानवाने हजारो टन कचरा पृथ्वीच्या बाहेर अंतराळात फेकला आहे.

गेल्या सुमारे पन्नास वर्षात दळणवळण उपग्रह, अवकाश प्रयोगशाळा, मानवरहित वाहने, अंतराळात पाठवलेली मालवाहू वाहने यामुळे अवकाश हे पृथ्वीबाहेरचे एक मोठे कचरा हाऊस बनले आहे.  याशिवाय निसर्गाने अशा हजारो लहान-मोठ्या वस्तूंना आपल्या पृथ्वीजवळ अंतराळात स्थान दिले आहे, जे केव्हाही पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करू शकतात आणि मानवी संस्कृतीचा संपूर्ण विनाश करू शकतात. आगामी दशकात उपग्रह अवकाशात सोडताना अवकाशात सोडले जाणारे प्रक्षेपकाचे तुकडे पृथ्वीवर कोसळून व्यक्तीला गंभीर इजा होण्याची किंवा त्या व्यक्तीचा मृत्यू होण्याची सहा ते दहा टक्के शक्यता असेल, असा इशारा एका अभ्यास अहवालात देण्यात आला आहे. हे टाळण्यासाठी प्रक्षेपण करतानाच संबंधित देशाने प्रक्षेपकाचे विलग झालेले भाग सुरक्षित ठिकाणी कोसळविण्याची सोय करावी; यासाठी त्यांना अधिक खर्च आला तरी चालेल, पण जीव वाचू शकतो, असा सल्लाही अहवालाद्वारे देण्यात आला आहे. उपग्रह अवकाशातील कक्षेत सोडण्याच्या प्रक्रियेदरम्यान प्रक्षेपकाचे काही भाग टप्प्याटप्प्याने विलग केले जातात. ते अवकाशात पृथ्वीच्या कक्षेजवळ तसेच फिरत राहतात. प्रक्षेपकाचे काही तुकडे पृथ्वीच्या कक्षेत शिरताच वेगाने खाली येतात. यातील बहुतेक तुकडे आकाशातच जळून खाक होतात, मात्र काही मोठे तुकडे जमिनीपर्यंत पोहोचतात. कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया या विद्यापीठातील संशोधकांनी गेल्या तीस वर्षांत अवकाशात सोडलेल्या उपग्रहांची माहिती संकलित करून त्याचा अभ्यास केला आणि पुढील दहा वर्षांत अवकाशातील या कचऱ्यापासून उत्पन्न होणाऱ्या धोक्याबाबत इशारा दिला आहे. त्यांचा हा अभ्यास अहवाल ‘नेचर ॲस्ट्रॉनॉमी’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.2020 मध्ये एका प्रक्षेपकाचा बारा मीटर लांबीचा पाइपचा तुकडा आयव्हरी कोस्ट येथील इमारतीवर कोसळला होता.

 प्रश्न असा आहे की या समस्येवर उपाय काय?  हा कचरा अवकाशातून गोळा करून पृथ्वीवर परत आणणे हाच यावर उपाय असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.मात्र आजही एवढ्या प्रभावी तंत्रज्ञानाचा शोध लागलेला नाही, ज्यामुळे अवकाशातील कचरा साफ करता येईल.  परंतु असे तंत्रज्ञान भविष्यात प्रक्षेपित होणार्‍या उपग्रहांच्या इंजिनांमध्ये आणि बूस्टर रॉकेटमध्ये बसवता येऊ शकते जेणेकरुन वापर केल्यानंतर ते अंतराळात न राहता ते पुन्हा पृथ्वीवर पडतील.  एक स्वस्त पर्याय असू शकतो की शटल आपले मिशन पूर्ण करून आणि थोडा फार कचरा गोळा करून सोबत घेऊन येवू शकते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Saturday, January 21, 2023

दुरवस्थेत असलेल्या शाळा

स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतरही देशातील अनेक शाळांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे अशा मूलभूत सुविधांचा अभाव आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचा सामना करावा लागत असेल, तर मग आपल्या इथल्या शिक्षणाची काय अवस्था आहे, याची कल्पना यायला हरकत नाही. प्रत्येक अभ्यास अहवालात आलेल्या समस्या शालेय शिक्षणातील सुधारणेची सर्वात प्राथमिक गरज म्हणून नोंदवण्यात येत असते. तथापि, शिक्षणाचे चित्र सुधारण्याचे उद्दिष्ट नेहमीच सर्व सरकारांच्या अजेंड्यावर घोषित केले गेलेले असते. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की अनेक दशकांपासून अजूनही ते एक प्रकारचे आश्वासनच राहिले आहे. विशेष म्हणजे, शैक्षणिक स्थितीच्या वार्षिक अहवालात म्हणजेच असर (एएसईआर) 2022 मध्ये, देशातील सुमारे एक चतुर्थांश शाळांमध्ये अजूनही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. 

शिवाय, एवढ्याच संख्येच्या जवळपास म्हणजे एक चतुर्थांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नाही. अशा स्थितीत राष्ट्रीय स्तरावर शिक्षणाच्या हक्काशी संबंधित शालेय दर्जामध्ये अपेक्षेऐवजी फक्त किरकोळ सुधारणा नोंदवली गेली असेल तर त्यात नवल ते काय? देशाच्या शिक्षण व्यवस्थेला जागतिक परिमाण देण्याची आश्वासने कशाच्या आधारे पूर्ण होणार, हा प्रश्नच आहे. शालेय शिक्षणाबाबत आतापर्यंत केलेल्या सर्व अभ्यासातून असे सांगण्यात आले आहे की, शाळांमध्ये स्वच्छतागृहे, पेयजल यांसारख्या मूलभूत सुविधांअभावी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी चांगले वातावरण निर्माण करणे शक्य होत नाही. ज्या शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची सोय नाही, त्या शाळांमध्ये मुलांना तहान लागल्यावर किंवा लघुशंके सारख्या गोष्टींची गरज असताना कोणत्या परिस्थितीतून जावे लागत असेल, याची कल्पना करणेही क्लेशदायक आहे. विशेषत: मुलींसमोर कोणता प्रश्न निर्माण होत असेल.

सुमारे अकरा टक्के शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नसल्याचीही नोंद एएसईआर च्या ताज्या अहवालात आहे. याआधीही असा अंदाज लावला गेला आहे की, विशेषतः शाळेत शौचालये आणि पिण्याच्या पाण्याचा अभाव असल्याने शालेय शिक्षणादरम्यान मुलींच्या गळतीमागचे हे एक प्रमुख कारण आहे. वस्तुस्थिती अशी आहे की अशा कमतरता पुढे एकमेकांशी जोडल्या जातात आणि एकत्रितपणे त्या समस्या अधिक जटिल बनतात. पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहे ही केवळ शाळांचीच नाही तर सर्वत्र सार्वजनिक प्राथमिक गरज आहे. याच्या अभावाने अभ्यास तर राहूच द्या, इतर कोणतेही दीर्घ काम सहजपणे करणे सोपे नाही. याशिवाय, शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्यावरील अवलंबित्वाच्या युगात देशभरातील बहात्तर टक्क्यांहून अधिक शाळांमध्ये मुलांच्या वापरासाठी संगणक उपलब्ध नसतील, तर मग आपण या शिक्षणातून काय मिळवणार आहोत.  एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या सरकारी शाळांमधील  शिक्षणाचे फलित काय असेल, याचा सहज अंदाज यायला लागतो.

इतर बाबतीत पायाभूत सुविधांच्या विकासावर मोठा खर्च होत असताना शाळांमधील आवश्यक सुविधा पूर्ण करण्याला सरकार प्राधान्य का देत नाही हे मात्र समजणे कठीण आहे. देशातील सरकारी शिक्षणपद्धती जर अशा व्यापक आणि चिंताजनक त्रुटींमधून जात असेल, तर अशा परिस्थितीत भविष्यात कोणत्या घडामोडी घडणार आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही! मग शिक्षण हक्क कायद्याच्या आधारे या क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्याची कल्पना आपण करतो, तो उद्देश कितपत साध्य होईल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

 

चित्रपट: प्राण्यांच्या नावाचे युग पुन्हा अवतरले

आपल्या जीवनात नावाला खूप महत्त्व आहे.  या आपल्या नावाची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी लोक आयुष्यभर मेहनत घेतात. नावाचे हे महत्त्व जाणून बॉलीवूडवालेदेखील आपल्या चित्रपटांची नावे विचारपूर्वक ठेवतात. एकेकाळी प्राण्यांच्या नावावर बनवलेले 'हाथी मेरे साथी', 'नागिन' हे चित्रपट लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. आता पुन्हा प्राण्यांच्या नावाच्या चित्रपटाचे युग परत आले आहे. विशाल भारद्वाजचा नुकताच प्रदर्शित झालेला 'कुत्ते' या चित्रपटात समाजात पसरलेल्या प्रत्येक क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे चित्रण करण्यात आले आहे. कुत्ते या चित्रपटापूर्वी विशाल भारद्वाजचाच शाहिद कपूरची भूमिका असलेला 'कमिने' चित्रपट आला होता. त्याची कहाणी कुठेतरी अशा लोकांचे प्रतिबिंब दाखवते जे आपल्या स्वार्थाने आंधळे  झालेले असतात. याशिवाय असे अनेक चित्रपट आहेत जे प्राण्यांच्या नावांवर केंद्रित आहेत. 

विशाल भारद्वाजच्या कुत्ते या चित्रपटाव्यतिरिक्त इतरही अनेक चित्रपट आहेत जे प्राण्यांच्या नावांवर आधारलेली आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वरुण धवनचा भेडिया आणि अंशुमन झाचा लकडबग्घा हे चित्रपट देखील प्राण्यांच्या नावावर बनलेले आहेत. वरुण धवन स्टारर फिल्म भेडिया ही एका लांडग्याची कथा आहे जो माणसाला चावल्यास तो लांडगा बनतो. भेडिया चित्रपटाची कथाही कुठेतरी अशा स्वार्थी लोभी लोकांना लक्ष्य करते जे आपल्या स्वार्थासाठी घनदाट जंगले तोडून मॉल आणि हॉटेल्स बांधण्यात मग्न आहेत. त्याचप्रमाणे अंशुमन झा यांच्या ‘लकडबग्घा’ या चित्रपटाची कथा प्राण्यांच्या तस्करीवर केंद्रित आहे. सर्व चित्रपटांमध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे समाजातील अत्याचार संपवायचे असतील तर माणसाला एकतर प्राणी बनावे लागते किंवा प्राण्यांची मदत घ्यावी लागते. 

कुत्ते, भेडिया व लकडबग्घा प्रमाणेच प्राण्यांच्या नावांवर लक्ष केंद्रित करणारे आणखी बरेच चित्रपट येत आहेत. जसे की रणबीर कपूर स्टारर अॅनिमल, राजू हिरानी दिग्दर्शित आणि शाहरुख खान स्टारर डोंकी, डेझी शाह आणि सुनील ग्रोव्हर स्टारर बुलबुल मेरीज, सलमान खान स्टारर टायगर 3. याशिवाय विद्युत जामवालचा 'जंगली' हाही अनेक प्राण्यांवर आधारित चित्रपट आहे. चित्रपटाची कथा हत्तीला वाचवण्यावर केंद्रित आहे.  या चित्रपटात महत्त्वाची भूमिका हत्तीची आहे. याशिवाय राजेश खन्ना अभिनीत 1971 साली आलेल्या हाथी मेरे साथी या चित्रपटाच्या कथेवर आधारित चित्रपट पुन्हा एकदा बनवला जात आहे.  ज्याचा अभिनेता आहे राणा तुंगा. 

यापूर्वी प्राण्यांच्या नावावर अनेक चित्रपट बनवले गेले आहेत.   या चित्रपटाप्रमाणेच रेखा अभिनीत नागिन पहिल्यांदाच बनवण्यात आला होता. त्यानंतर श्रीदेवी अभिनीत नगिना चित्रपट तयार झाला. मिथुन चक्रवर्ती अभिनित चित्रपट चीता, विद्या बालन स्टारर शेरनी, गोरिल्ला, भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू स्टारर सांड की आँख, राजेश खन्ना स्टारर हाथी मेरे साथी, सुधीर कुचा स्टारर आणि एसएस राजामौली दिग्दर्शित मक्खी, गाय और गौरी इत्यादी चित्रपट प्राण्यांच्या नावावर बनले आहेत. 

 टफी या पोमेरेनियन कुत्र्याने सलमान खान आणि माधुरी दीक्षित अभिनीत 'हम आपके है कौन' या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. जॅकी श्रॉफ स्टारर चित्रपट तेरी मेहरबानियामध्ये मोती नावाच्या कुत्र्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणले, तर राजेश खन्ना स्टारर चित्रपट हाथी मेरे साथीमध्ये हत्ती असलेल्या रामूने अप्रतिम काम केले होते. जितेंद्र आणि जयाप्रदा अभिनीत मां या चित्रपटात आपल्या मालकावरील अन्यायाचा बदला कुत्र्याने घेतला होता.जॅकी श्रॉफ स्टारर दुध का कर्ज चित्रपटाची कथा सापावर केंद्रित आहे. शोले चित्रपटात धन्नोच्या भूमिकेत असलेल्या घोडीचे काम जबरदस्त होते. अक्षय कुमार अभिनीत एंटरटेनमेंट या चित्रपटात एंटरटेनमेंट नावाचा कुत्रा होता, जो कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक होता. अक्षय कुमार आणि कुत्रा यांच्यातील एक उत्कट नाते या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. गोविंदा आणि चंकी पांडे स्टारर 'आँखे' चित्रपटात माकडाची मुख्य भूमिका होती, जी खूप मजेदार होती. यावरून कोणत्याही चित्रपटात इतर माणसांइतकेच महत्त्व प्राण्यांना असते, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.


Thursday, January 19, 2023

विद्याने साकारल्या बहुविध भूमिका

1995 मध्ये झी वाहिनीवरून 'हम पांच' नावाची एक विनोदी मालिका प्रसारित होत होती. यात बहिऱ्या आणि जाड भिंगाचा चष्मा आणि ढगळ कपडे घालणाऱ्या तिसऱ्या बहिणीची भूमिका विद्या बालनने केली होती. पाचजणींमध्ये यथातथाच दिसणारी, अजिबात ग्लॅमरस नसणारी व्यक्तिरेखा तिने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच साकारली होती. ही मालिका प्रचंड गाजली. यातल्या सर्वच व्यक्तिरेखा घराघरात पोहचल्या. इथे महत्त्वाचा मुद्दा असा की, व्यक्तिरेखा कुठलीही असली तरी आपल्या व्यक्तिमत्त्वात ती व्यक्तिरेखा साकारण्याची क्षमता आहे, असा विश्वास विद्याच्या ठायी होता,हे महत्त्वाचे. त्यामुळेच ती विविध छटेच्या भूमिका करूनही ती प्रत्येक वेळी नव्या रुपात चाहत्यांसमोर येते. वेगळ्या रुपात आधीच्या भूमिकेची छाप तिच्यावर नसते.

म्हणूनच उत्तम अभिनेत्री म्हणून विद्याने आज हिंदी चित्रपट सृष्टीत आपली स्वतःची ठाशीव मोहोर उमटवली आहे.
आतापर्यंत आपल्या फिल्मी करिअरमध्ये विद्याने बहुविध अशा भूमिका साकारल्या आहेत. रेडिओ जॉकी, प्रोजेरियाने पिडित असलेल्या 12 वर्षाच्या मुलाची आई आणि याशिवाय प्रेमिका ते फिजिकली चॅलेंज्ड गर्ल अशा किती किती तरी  भूमिका तिने केल्या आहेत. आपल्या प्रत्येक नव्या चित्रपटात  ती  नव्या रुपात दिसली आहे. आपल्या अभिनयाची वैविधतता दाखवली आहे  आणि विशेष म्हणजे प्रत्येक वेळा तिचा अभिनय सहजसुंदर  आणि विश्वसनीय वाटतो. कदाचित हाच खरा अभिनय आहे, हीच कलाकारी आहे, असे म्हटले पाहिजे. या काळातल्या दुसर्‍या कुठल्याच अभिनेत्रीने इतक्या  अनेकविध भूमिका साकारल्या नाहीत.
      'हम पांच' नंतर विद्याने अभिनय हेच करिअर म्हणून निवडले. वडिलांच्या सांगण्यानुसार तिने पहिल्यांदा सेंट झेवीयर्स महाविद्यालयातून बी.ए. व मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. आणि या काळात ती अभिनय क्षेत्रातही धडपडत होती. या काळात तिनं गौतम गलदर दिग्दर्शित 'भालो' (2003) या बंगाली चित्रपटात काम केलं होतं.अभिनयासाठी विद्याला 'आनंदलोक' पुरस्काराने गौरविण्यात आले. काही जाहिरात केल्या.  त्याकाळात विद्याची एक स्कुटर ची जाहिरात गाजत होती. याचदरम्यान विधू विनोद चोप्रा आणि प्रदीप सरदार 'परिणिता' (2005) साठी मुख्य नायिकेच्या शोधात होते. त्यांनी हा चेहरा हेरला. परिणिता' प्रचंड गाजला. करिअरच्या प्रारंभी विद्याने ऍडवरटायजिंग, सिरिअल, रीजनल चित्रपट, म्युझिक व्हिडिओ अशा विविध क्षेत्रात नशीब अजमावले आहे.  बराच स्ट्रगल केल्यावर मग  कुठे तिला बॉलिवूडमध्ये  ब्रेक मिळाला. चित्रपटातील आतापर्यंतचा प्रवास विद्यासाठी सोपा नव्हता. कित्येकदा तिला रिजेक्टही करण्यात आले. पण विद्याने हार मानली नाही. खरं तर विद्या चांगले काम मिळावे यासाठी प्रार्थना करायची म्हणे!  कठीण काळात मनापासून केलेल्या प्रार्थनेचा परिणाम होतो, यावर तिचा विश्वास आहे. त्यानुसार  तिला चांगले दिवस आले आहेत.  ‘परिणीता’ चित्रपटाद्वारे चंदेरी दुनियेत पदार्पण करून पदार्पणातच पुरस्कार मिळविल्यानंतर विद्या बालनने ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘भूलभुलय्या’, ‘इश्किया’, ‘पा’ यांसारख्या चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. 'परिणिता' चित्रपटात ती एका  मध्यमवर्गीय कुटुंबातील स्वाभिमानी मुलीच्या भूमिकेत होती.  विद्याने विचारसुद्धा केला नव्हता की, हा चित्रपट मोठे यश मिळवेल. आणि आपल्या कामाची प्रशंसा होईल. पण या चित्रपटात काम केल्याचा तिला खूप आनंद वाटतो. यानंतर विद्याने 'लगे रहो मुन्नाभाई' मध्ये रेडिओ जॉकी बनली. यात 'गुड मॉर्निंग मुंबई' म्हणण्याच्या तिच्या विशिष्ट अंदाजाने तर तिने प्रेक्षकांना घायाळ करून टाकले. यानंतर आलेल्या 'गुरू' मध्ये विद्याचा रोल छोटा असला तरी पायाने अपंग, आणि व्हीलचेअरवर बसलेल्या मुलीची भूमिका निभावून तिने पुन्हा प्रेक्षकांना आपल्या अभिनयाचे नवे रुप दाखवले. 'सलामे इश्कः द ट्रिब्यूट ऑफ लव' , ' एकलव्यः द रॉयल गार्ड', ; हे बेबी' पासून विद्या आपली टिपिकल इंडियन ब्युटी' वाली इमेज बदलण्याचा प्रयत्न केला.
भूलभुलैया' मध्ये मंजुलिका बनलेली विद्या 'डीसोसिएटीव आयडेंटिटी डिसऑर्डर' या एक प्रकारच्या मानसिक आजाराने पिडित होती. या चित्रपटात विद्याचा  डांस आणि ड्रामाने  पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपल्या नव्या पैलूची ओळख देऊन गेला.
बेबी', 'किस्मत कनेक्शन', 'हल्लाबोल' चित्रपट चालले नाहीत. बालकी दिग्दर्शित 'पा' (2009) चित्रपट केला. अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारणारी ही आजच्या जमान्यातील पहिली अभिनेत्री. त्यातली तिची सहजता वाखाणण्यासारखी होती. तिने 'इष्कीया'(2010) मध्ये जी अदाकारी साकारली ते पाहताना प्रेक्षक अक्षरशः खल्लास झाले. नंतर तिने यु टर्न घेत 'नो वन किल्ड जेसीका'(2011) सारखा वेगळा चित्रपट केला. या सोज्वळ, देखण्या,ग्लॅमरची नवी बाजू दाखवणाऱ्या अभिनेत्रीला आपण हिरोईन आहोत, त्यामुळे पडदयावर परफेक्टच दिसलं पाहिजे, या गोष्टीची कधीच फिकीर नव्हती. तिचा एखादा चित्रपट प्रचंड ग्लॅमरस तर दुसऱ्या त त्याचा लवलेशही नाही. कधी तिचा वावर स्वप्नवत वाटतो तर त्याचवेळी दुसऱ्या एखाद्या चित्रपटात ती आपल्याच घरातील वाटते. आणि हे सगळे शक्य झालं ते तिच्या ठायी असणाऱ्या अभिनय क्षमतेमुळेच!  विद्या म्हणते की,  प्रत्येकवेळा काही तरी नवीन करण्याची मनीषा  बाळगून असते. स्वतः ला रिपीट करायला तिला आवडत नाही. कामात, भूमिकेत स्वतः ला झोकून द्यायला विद्याला आवडते.  एक ऍक्टर म्हणून माझ्यात काही नवीन करण्याची ऊर्मी आहे. कदाचित या कारणामुळेच तिला प्रत्येकवेळेला काही तरी नवीन  करण्याची संधी मिळत असावी. 
'पा' मध्ये विद्याने एका अशा मुलाच्या आईची भूमिका केली आहे, जो 12 वर्षाचा मुलगा आहे. व तो 'प्रोजेरिया' नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. अशा मुलाच्या आईची भूमिका करणं काही सोपी गोष्ट नाही. पण विद्याने या भूमिकेलासुद्धा न्याय दिला. विद्या सांगते की ही भूमिका जगण्याची प्रेरणा तिला आईकडून मिळाली. तिची आई पाच वर्षाची होती, तेव्हा  तिच्या आजीचं निधन झालं होतं. एक चांगली आई बनणं तिच्या आईचे तिच्या आयुष्यातले मिशन होते. आईने तिचा चांगल्या प्रकारे सांभाळ केला. ती म्हणते की, या चित्रपटातला अभिनय पाहून एका महिलेने फोन केला होता. त्यात ती तुमच्यासारखी आई बनू इच्छिते, असे म्हणाली होती. इतक्या  चांगल्याप्रकारे  आईची भूमिका साकारायला मिळाले, हे माझे भाग्यच , असे विद्या सांगते.
'इश्किया'मध्ये विद्याने  पुन्हा एकदा जरा हट के काम केले. अपशब्द वापरण्यापासून चुंबनपर्यंतची दृश्ये या चित्रपटात होती. पण विद्या स्वतः ला यासाठी तयार केले. दिग्दर्शक अभिषेक चौबे यांनी तिला 'इश्किया'ची स्क्रिप्ट ऐकवली, तेव्हा ही भूमिका करू शकू की नाही, या विषयी विश्वास नव्हता. परंतु आव्हान पेलण्याची ताकद तिच्यात आहे. त्यामुळे तिने ही भूमिका सहज पेलून नेली. कामाचे प्रचंड कौतुकही झाले. विविध प्रकारच्या भूमिका करणे मला आव्हानात्मक वाटते. त्यामुळे ‘किस्मत कनेक्शन’मधील भूमिकेपेक्षा ‘इश्कियाँ’मधील भूमिका अधिक जवळची वाटते. चरित्र अभिनेत्री म्हणवून घेण्यापेक्षा विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री म्हणवून घेणे मला अधिक भावते , असे तिने एका मुलाखतीत म्हटले आहे.  'इश्किया' नंतर 'नो वन किल्ड जेसिका' मध्ये विद्याने सबरिना लालच्या डिग्लॅमरची भूमिका स्वीकारली. या चित्रपटातही विद्याच्या कामाचे कौतुक झाले.
आपली पूर्वीची सोज्वळ अभिनेत्रीची प्रतिमा संपूर्णपणे बदलून टाकण्याचे आव्हान पेलून आपल्या सहजाभिनयाची उत्कृष्ट झलक विद्या बालनने आताच्या 'डर्टी पिक्चर' चित्रपटामध्ये  दाखवली आहे. तिच्या यापुढील अभिनय कारकीर्दीला वेगळे वळण देणारा हा चित्रपट आहे, असे म्हणायला हरकत नाही.  ती अभिनेत्री तर उत्कृष्ट आहेच; पण त्याशिवाय ती प्रयोगशीलही आहे. हिरोईनपणाचं ग्लॅमरही वेळप्रसंगी बाजूला ठेवत भूमिकेला न्याय द्यायचा ती शंभर टक्के प्रयत्न करते.  अलिकडे तिला डोळ्यांसमोर ठेऊन संहिता लिहिली जात आहे, यासारखे तिचे आणखी दुसरे ते यश कोणते?  भूमिकेसाठी वाट्टेल ती मेहनत घ्यायला ती तयार आहे.
सिल्क स्मिता या बोल्ड अभिनेत्रींच्या जीवनावर आधारित असलेल्या 'डर्टी पिक्चर्स' (2011) केला. तिच्या बोल्ड रूपाने सगळेच अचंबित झाले. त्यावर्षी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पुरस्कार मिळाला. यापूर्वी तिला 'परिणिता' साठी पदार्पणाचा, 'पा'मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाच होता. नंतर ही तिला 'कहानी'(2012), 'तुम्हारा सुलू'(2017) या चित्रपटांसाठीही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. फक्त पुरस्काराने तिच्या अभिनयाचे मोजमाप करणे चुकीचे आहे. पण तिचा स्वतःच्या अभिनय क्षमतेवर असलेला विश्वास आणि वेगळं काही तरी करण्याची धडपड यामुळे तिच्या अभिनयाचा साक्षात्कार पाहायला मिळाला.'कहानी'  (2012) या सुजॉय घोष दिग्दर्शित चित्रपटात तर तिने अख्खा चित्रपट आपण सहज पेलू शकतो, हे दाखवून दिले. एका अभिनेत्रींच्या बळावर चित्रपट चालू शकतो, 'कहानी' पाहताना पटतं. बऱ्याच कालावधी नंतर ती मार्च 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जलसा' द्वारे प्रेक्षकांसमोर आली. तीही हटके भूमिका घेऊनच. यातील तिच्या कामाचे कौतुक आहेच.या चित्रपटात विद्या बालनने भूमिका उत्तम प्रकारे साकारली आहे. तिने महिला पत्रकाराची भूमिका साकारताना बारकावे अचूक टीपलेत. स्पष्टवक्तेपणा तिच्या देहबोलीमधूनच दिसून येतो. त्यामुळे तिच्या अभियानाचे नेहमीप्रमाणे कौतुक होत आहे. आता ती सिद्धार्थ रॉय यांच्याशी लग्न करून संसारात रममाण झाली असली तरी तिने अभिनय क्षेत्र सोडलेले नाही. अर्थात तिचे अजून चित्रपट येणार आहेत.भारत सरकारने तिला पद्मश्री (2014)  पुरस्कार देऊन तिचा गौरव केला आहे. 'अपयश हा यशाकडे जाण्याचा मार्ग असतो.' हा तिचा आपल्यासाठी संदेश आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

खेड्यांतील आरोग्य सेवा कधी सुधारणार?

 गावागावात आरोग्य सुविधा आणि डॉक्टर नसल्यामुळे उपचाराअभावी दररोज हजारो लोकांचा अकाली मृत्यू होतो. केंद्र आणि राज्य सरकारच्या चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे दावे प्रत्यक्षात कुठेच दिसत नाहीत. हां, गेल्या काही वर्षांत काही सुधारणा झाल्या आहेत खऱ्या, पण समाधानकारक मानल्या जाव्यात तेवढ्या नाहीत. महत्त्वाचे म्हणजे आजही देशातील सात लाख गावांमध्ये आरोग्य सुविधांची तीव्र टंचाई आहे, शिवाय डॉक्टरांची नियुक्तीही आवश्यकतेपेक्षा खूपच कमी आहे. तामिळनाडू हे एकमेव राज्य आहे जिथल्या खेड्यांमध्ये आरोग्य सेवा समाधानकारक आहेत, असे म्हणता येईल. खेड्यांमध्ये डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी राज्यांनी काही वर्षांपूर्वी कठोर कायदे केले होते, पण तरीही बहुतेक नवीन डॉक्टर खेड्यात सेवा द्यायला नकार देतात. गंमत अशी आहे की, नोकरीसाठी भरलेले हमीपत्र मोडून डॉक्टर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा दंड भरतात, पण खेड्यापाड्यात सेवा देण्यास नकार देतात.

विशेष म्हणजे देशातील केवळ 20 टक्के डॉक्टर ग्रामीण भागात कार्यरत आहेत. त्यामुळे गावोगावी डॉक्टरांची उपलब्धता नाममात्र राहिली आहे. याबाबतचा कोणताही नकाशा सरकारकडे नसल्याचे कारण असल्याचे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे म्हणणे आहे. दुसरीकडे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे असेही म्हणणे आहे की प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सीएचसीमध्ये सुविधा उपलब्ध नसल्यामुळे डॉक्टर मंडळी गावांमध्ये जायला तयार नाहीत. खेड्यापाड्यात ऑपरेशन थिएटर, भूल देणारे डॉक्टर, पॅथॉलॉजिस्ट आणि तंत्रज्ञ यांची तीव्र कमतरता आहे. याशिवाय गावोगावी आरोग्य केंद्रांवर तैनात असलेल्या डॉक्टरांसाठी निवास व आवश्यक फर्निचरची वानवा आहे. डॉक्टर खेडेगावात जात नसल्याची जी काही कारणे आहेत, ती डॉक्टरांच्या संघटनांनी दिली आहेत, मात्र याकडे राज्य सरकारे लक्ष देताना दिसत नाहीत. खेड्यापाड्यात उत्तम आरोग्य सेवा मिळत नसल्याच्या कारणाला आम्ही जबाबदार नाही, असे डॉक्टरांच्या संघटनांचे म्हणणे आहे, उलट सरकारची धोरणेच अशी आहेत की, त्यामुळे उच्च पदव्या असलेले डॉक्टर खेड्यात सेवा देण्यास तयार नाहीत. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे सरकारी धोरणांच्या विरोधात डॉक्टरांच्या संघटना रस्त्यावर उतरताना दिसतात, पण खेड्यापाड्यातील आरोग्य सुविधा आणि डॉक्टरांची तीव्र कमतरता दूर करू शकेल असा कोणताही निर्णय राज्य सरकारे घेऊ शकत नाहीत.

आपल्याकडे तज्ज्ञ डॉक्टरांची तर वानवाच आहे. देशातील महाराष्ट्रासह 34 पैकी 25 राज्ये, केंद्रशासित प्रदेशांतील ग्रामीण शासकीय रुग्णालयांत 70 टक्‍क्‍यांवर तज्ज्ञ डॉक्टरांचा तुटवडा आहे. या राज्यांतील ग्रामीण भागांत सर्जन, महिला, बालरोगसह तज्ज्ञ डॉक्टरांचा मोठा तुटवडा आहे. ग्रामीण आरोग्य सांख्यिकी अहवाल 2021-22 च्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. ग्रामीण आरोग्य सेवेत मध्य प्रदेशची स्थिती देशात सर्वात वाईट आहे. येथे विषयतज्ज्ञ डॉक्टरांची 95 टक्के पदे रिक्‍त आहेत. गुजरातमध्ये 90 टक्के, राजस्थानमध्ये 79 टक्के, उत्तर प्रदेशात 72 टक्के, बिहारमध्ये 70 टक्के महाराष्ट्रात 70 टक्के तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. केरळमध्ये 94.31 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 93.3 टक्के, व तामिळनाडूत 83.83 टक्के, तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्‍त आहेत. मिझोराम, सिक्कीम, ग्रामीण दीव-दमण, पुद्दुचेरीत एकही तज्ज्ञ डॉक्टर नियुक्‍त नाही.

चीनच्या तुलनेत भारतामध्ये ग्रामीण भागातील 3,100 रुग्णांमागे फक्त एक बेड आहे. बिहारमध्ये 18,000 गावकऱ्यांसाठी एक बेड, उत्तर प्रदेशमध्ये 3,900 रुग्णांसाठी एक बेड आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात दर 26,000 लोकसंख्येमागे एक अ‍ॅलोपॅथी डॉक्टर आहे, मात्र जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की दर 1,000 लोकसंख्येमागे एक डॉक्टर असावा. सुमारे दहा हजार लोकसंख्येसाठी भारतात सात डॉक्टर्स आहेत. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय) मध्ये नोंदणीकृत अॅलोपॅथिक डॉक्टरांची एकूण संख्या सुमारे एक कोटी आहे. डॉक्टरांच्या उपलब्धतेच्या बाबतीत पश्चिम बंगालमध्ये  अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वात वाईट परिस्थिती आहे. नॅशनल हेल्थ प्रोफाईलनुसार, पश्चिम बंगालच्या ग्रामीण भागात फक्त 900 डॉक्टर आहेत. लोकसंख्येनुसार, 70,000 लोकांमागे एक डॉक्टर आहे. बिहार आणि झारखंडमध्ये 50,000 लोकसंख्येमागे एकच डॉक्टर आहे. विशेष म्हणजे ग्रामीण आरोग्य सेवेचा पाया प्राथमिक आरोग्य केंद्रांवर टिकून आहे, पण हा पायाच खूप कमकुवत आहे.

आज देशात केवळ सात लाख एमबीबीएस डॉक्टर सेवा देण्यासाठी उपलब्ध आहेत.अशा स्थितीत पाच लाख डॉक्टर आणि पाच लाख तज्ज्ञांची कमतरता कशी भरून काढायची हा मोठा प्रश्न आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने काही पावले उचलली आहेत. यामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या 'ई-संजीवनी मेडिसिन' सेवेने तीन कोटी टेलि-कन्सल्टेशनचा आकडा पार केला आहे. यासह 'ई-संजीवनी टेलिमेडिसिन'ने एका दिवसात 1.7 लाख सल्लामसलत करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या वेळी प्रत्येक गावात उपचारासाठी फिरती दवाखाना व्हॅन उपलब्ध करून दिली होती. याचा देशाच्या ग्रामीण भागातील लोकांना मोठा फायदा झाला. आयुष्मान भारत योजनेमुळे अत्यंत गरीब असलेल्या लोकांची चिंता काही प्रमाणात दूर झाली आहे, पण आरोग्य सेवा आणि डॉक्टरांच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्या दूर करता येतील का, हा प्रश्नच आहे.

डॉक्टरांच्या कमतरतेमुळे गावकऱ्यांना बनावट डॉक्टरांची सेवा घ्यावी लागत आहे. यामुळे हजारो लोक चांगल्या उपचाराअभावी अकाली मृत्यूमुखी पडतात. अ‍ॅलोपॅथीशिवाय खेड्यापाड्यात होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक डॉक्टरांची कमतरता असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. आयुर्वेद आणि योगाच्या प्रचारासाठी केंद्र सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी देते. मात्र सेवा देण्यासाठी पात्र डॉक्टरांची कमतरता आहे. त्यामुळे एमबीबीएस व्यतिरिक्त बीएमएस आणि आयुर्वेदिक डॉक्टरांची मोठ्या प्रमाणावर भरती करण्याची गरज आहे. गावपातळीवर होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक आरोग्य केंद्रांच्या अभावावर तातडीने पावले उचलली, तर खेड्यात डॉक्टरांची कमतरता असतानाही लोकांचे प्राण वाचू शकतात.

देशातील एमबीबीएस डॉक्टरांची कमतरता पूर्ण करण्यासाठी तज्ञांनी काही सूचना दिल्या आहेत. यामध्ये 'फॅमिली मेडिसिन', 'डिप्लोमा इन जनरल मेडिसिन' आणि ग्रामीण आरोग्य सेवेतील पदवीचा समावेश आहे. या तीन सूचनांवर प्रभावीपणे पुढे गेल्यास खेड्यापाड्यातील डॉक्टरांची कमतरता मोठ्या प्रमाणावर दूर करता येईल. परंतु डॉक्टरांना चांगले पगार आणि सुविधा उपलब्ध करून दिल्यास शिक्षण पूर्ण करून परदेशात जाणाऱ्या डॉक्टरांना आपोआप अटकाव येऊ शकेल.केंद्रीय आरोग्य मंत्रालय वर्षानुवर्षे गावांमध्ये आरोग्य सेवांच्या अभावाची समस्या सोडवण्यासाठी व्यावहारिक पाऊल उचलण्याची सातत्याने चर्चा करत आली आहे. हे सूत्र आहे, 'एमबीबीएस'चा पाच वर्षांचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थ्यांना एक वर्षाचा स्पेशलायझेशन कोर्स द्यायला हवा, जेणेकरुन ग्रामीण भागात त्यांच्या तैनातीनंतर अशा डॉक्टरांना बिनदिक्कतपणे ग्रामीण भागात त्यांची चांगली सेवा देता येईल, पण यावर पुढे अंमलबजावणी होताना दिसत नाही.

त्यानंतर आता केंद्र सरकारने दुसरा फॉर्म्युला तयार केला आहे. या अंतर्गत, एमबीबीएस पदवी असलेल्या डॉक्टरांना मास्टर्स म्हणजेच एमएस किंवा एमडीमध्ये प्रवेश  तेव्हाच मिळेल जेव्हा ते गावांमध्ये पोस्टिंगच्या अनिवार्य कालावधीसाठी शपथपत्र लिहून देतील. त्यात सरकारने आणखी एक गोष्ट जोडली आहे की, जे एमबीबीएस पदवीधर विद्यार्थी प्रतिज्ञापत्र देतील, त्यांचे गुण कमी असले तरी त्यांना एमएस किंवा एमडीला प्रवेश दिला जाईल. मात्र केंद्र सरकारच्या या भुरळ पाडणाऱ्या फॉर्म्युल्यानंतरही गावोगावी सेवा देणाऱ्या डॉक्टरांमध्ये विशेष आस्था दिसून येत नाही. अशा स्थितीत आता प्रश्न असा पडतो की, एवढ्या कसरती करूनही एमबीबीएस डॉक्टरांना खेड्यापाड्यात सेवा देण्यात स्वारस्य नसताना, ग्रामीण भागातील दुरवस्था असलेल्या आरोग्य सेवा सुधारण्यासाठी कोणते सूत्र अवलंबले जाणार? ‘फॅमिली मेडिसिन’ अभ्यासक्रमाच्या माध्यमातून गावागावांतील डॉक्टरांची कमतरता दूर करण्यात केंद्र सरकार कितपत यशस्वी ठरते, हे सांगणे कठीण आहे. मात्र हे सूत्र प्रभावी ठरले तर खेड्यापाड्यातील आरोग्य सेवेतील डॉक्टरांची कमतरता बऱ्याच अंशी आटोक्यात येऊ शकते. पण एवढी सर्व सूत्रे घेऊनही खेड्यापाड्यातील आरोग्य सेवा सुधारली नाही, तर काय करणार? -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Tuesday, January 17, 2023

स्वच्छ उर्जेचे नवे युग अवतरेल?

भारतात सध्या विजेचे मोठे संकट नाही, परंतु भविष्यातील गरजा आणि स्वच्छ ऊर्जेकडे वाटचाल करण्याच्या संकल्पांचा एक भाग म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनला मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, या अभियानांतर्गत, भारताला ऊर्जा-स्वतंत्र बनवण्याची, अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्रांचे डीकार्बोनाइज (कार्बन मुक्त) करण्याची आणि पर्यायी इंधनाचे उत्पादन, वापर आणि निर्यातीसाठी जागतिक केंद्र बनवण्याची योजना आहे. या मोहिमेअंतर्गत भारत 2030 पर्यंत 50 लाख टन हायड्रोजन उत्पादन क्षमतेचे लक्ष्य गाठेल अशी अपेक्षा आहे. विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करू पाहणाऱ्या भारतासारख्या देशांसाठी ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भरता मिळवणे ही सर्वात मोठी गरज आहे, यात शंकाच नाही. आपल्याला आणखीही कारखाने काढायचे आहेत, उत्पादन वाढवायचे आहे, लाखो तरुणांना रोजगार निर्माण करायचा आहे. यासाठी स्वच्छ ऊर्जा लागते.  आजचे वास्तव हे आहे की भारत उर्जेच्या बाबतीत पूर्णपणे स्वयंपूर्ण नाही.

जीवाश्म इंधन (पेट्रोल-डिझेल) च्या रूपाने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला दरवर्षी सुमारे बारा लाख कोटी रुपये आयातीवर खर्च करावे लागतात. त्याचबरोबर जनतेला माफक दरात पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध करून द्यावे लागते आणि आर्थिक संकटामुळे ते देण्यात अडचणी येत आहेत. सौरऊर्जेचा एक पैलू जो अलिकडच्या वर्षांत चर्चेचा विषय बनला आहे तो म्हणजे सौर पॅनेल आणि संबंधित नवीन तंत्रज्ञानासाठी आपले परदेशावरील अवलंबित्व. तथापि, तरीही काही ठोस योजना सावधपणे अंमलात आणल्यास जनतेला दिलासा देऊन ऊर्जा स्वावलंबन साध्य करता येईल. विशेषत: हायड्रोजन हे स्वच्छ इंधन आहे आणि एकदा कार्यक्षम झाले की ते अनंतकाळासाठी अमर्यादित ऊर्जा प्रदान करू शकते. पण यात काही समस्याही आहेत. यासाठीची एक मोठी अडचण म्हणजे त्याची दाबाखाली साठवणूक करणे, कारण ते अत्यंत स्फोटक आहे आणि त्यामुळे अपघात होऊ शकतात. 

मात्र राष्ट्रीय हायड्रोजन मिशनमध्ये यासंबंधीच्या सर्व समस्यांचे निराकरण होईल, अशी अपेक्षा आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हायड्रोजन इंधन स्वस्त करणे. यालाही प्राधान्य द्यावे लागणार आहे. कोळशापासून मिळणारी वीज महाग होत चालली असून  कोळशाचा तुटवडाही कधी कधी जाणवतो आहे. सध्या तसे हे मोठे संकट नाही. परंतु वाढत्या ऊर्जेच्या मागणीमुळे कोळशाचे भविष्य अंधकारमय दिसून येते. अशा परिस्थितीत, एकतर अणुऊर्जेकडे वाटचाल करणे किंवा हायड्रोजन इंधनासह स्वच्छ उर्जेचे इतर पर्याय वापरणे चांगले होईल. हायड्रोजनचा पर्याय मिळाल्यावर आपल्या देशात कच्चे तेल, कोळसा इत्यादी जीवाश्म इंधनांच्या आयातीत एक लाख कोटी रुपयांपर्यंत घट येऊ शकते. एक अप्रत्यक्ष फायदा असा आहे की यामुळे हरितगृह वायू उत्सर्जन 5 कोटी टन कमी होऊ शकते. पेट्रोल आणि डिझेल यांसारख्या जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व काढून टाकून देशाला स्वच्छ ऊर्जा निर्मितीचे केंद्र बनवणे हा राष्ट्रीय हायड्रोजन मिशनचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. 

हे खरे आहे की हायड्रोजन हे सध्या आपल्या ग्रहावर उपलब्ध असलेले सर्वात स्वच्छ इंधन आहे. परंतु समस्या अशी आहे की पृथ्वीवरील सर्व हायड्रोजन इतर घटकांमध्ये (जसे की पाणी आणि इतर हायड्रोकार्बन्स) बांधलेला आहे. अशा परिस्थितीत तो वेगळे करण्याच्या प्रक्रियेत प्रदूषण होते.  म्हणूनच त्याला स्वच्छ किंवा हिरवा हायड्रोजन म्हणता येणार नाही. अशा समस्यांवर उपाय म्हणजे राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन. हे उल्लेखनीय आहे की इलेक्ट्रोलिसिस प्रक्रियेद्वारे इंधन तयार करण्याची प्रक्रिया पूर्णपणे कार्बन उत्सर्जन मुक्त आहे. सध्या हायड्रोजन इंधन तयार करण्याचे दोन मार्ग आहेत.  पहिली पद्धत म्हणजे हायड्रोजन इंधन इलेक्ट्रोलिसिसद्वारे म्हणजे पाण्यामधून वीज पार करून मिळवणे. दुसरा मार्ग म्हणजे इंधन तयार करण्यासाठी नैसर्गिक वायूपासून हायड्रोजन आणि कार्बन वेगळा करणे. इलेक्ट्रोलिसिस प्रक्रियेद्वारे उत्पादित हायड्रोजन इंधनामध्ये स्वच्छ ऊर्जा वापरली जाते. 

सौर किंवा पवन ऊर्जा केंद्रातून मिळणारी वीज वापरून इलेक्ट्रोलायझिंग पाण्याने हायड्रोजन वेगळे केले जाते. अशा इंधनाला 'ग्रीन' हायड्रोजन किंवा (जीएच) GH-2 किंवा हिरवे इंधन म्हणतात. या प्रकारच्या ऊर्जेबद्दल असा दावा केला जात आहे की त्याचा सर्वात मोठा फायदा तेल शुद्धीकरण, खत निर्मिती, सिमेंट, स्टील आणि अवजड उद्योगांना होईल, कारण तेथे सीएनजी आणि पीएनजी मिश्रित हायड्रोजन इंधन वापरल्यास हे अवजड उद्योग कार्बनमुक्त होतील. सध्या जगातील ग्रीन हायड्रोजनच्या किमती अनेक घटकांवर अवलंबून आहेत. उदाहरणार्थ, त्याचा स्रोत काय आहे, बाजारातील परिस्थिती काय आहे आणि व्यवहार केलेल्या चलनाचे दर काय आहेत. सध्या जगात ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी सरासरी 300 रुपये प्रति किलो खर्च येतो. नैसर्गिक वायूपासून बनवलेला तो प्रतिकिलो 130 रुपयांपर्यंत असला तरी रशिया-युक्रेन युद्धामुळे ही सरासरीही 250 रुपयांवर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत या स्वच्छ इंधनाच्या किमती कमी करण्यासाठी ग्रीन हायड्रोजन मिशन खूप पुढे जाऊ शकते. केवळ भारतच नाही तर सध्या जगातील पंचवीस देश ग्रीन हायड्रोजन निर्मितीच्या दिशेने वेगाने काम करत आहेत. 

 स्वच्छ इंधनाला आणखीही काही पर्याय आहेत.  हिरव्या हायड्रोजन व्यतिरिक्त, उसाच्या मोलॅसिसमधून काढलेले इथेनॉल देखील एक स्वच्छ इंधन आहे. ती जाळून निर्माण होणारी वीज ही अनेक अर्थांनी इतर पर्यायांपेक्षा सुलभ आणि चांगली मानली जाते. भारतातही इथेनॉलपासून ऊर्जा मिळवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. काही राज्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर इथेनॉलवर बस आणि ट्रेनही चालवल्या जात आहेत. स्वच्छ विजेचा आणखी एक प्रकार आहे. स्वच्छ ऊर्जा आपल्याला सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेकडे घेऊन जाते. या संदर्भात भारताचे महत्त्व त्यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीवरून स्पष्ट होते. 2015 मध्ये, पॅरिसमधील हवामान बदल परिषदेत एक उल्लेखनीय पुढाकार घेऊन, भारताने 100 देशांची सौर युती स्थापन करण्याची घोषणा केली. या युती अंतर्गत भारताने 2030 पर्यंत 450 गीगावाट (GW) ऊर्जा उत्पादनाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.  यापैकी 100 गीगावाट (GW) चे उद्दिष्ट गाठण्यात आले आहे. 

याचा अर्थ देशाला शून्य कार्बन उत्सर्जन करणारा देश बनवण्याचा मार्ग फारसा अवघड नाही. दरवर्षी सुमारे सहा अब्ज टन कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन रोखण्यासाठी सौर तंत्रज्ञान 2050 पर्यंत पुरेशी वीज निर्माण करू शकेल. उत्सर्जनाचे हे प्रमाण सध्या संपूर्ण जगाच्या वाहतूक क्षेत्राद्वारे सोडल्या जात असलेल्या कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणात आहे. प्रदूषण टाळण्यासाठी अणुऊर्जा हादेखील एक चांगला पर्याय आहे. आता अणुऊर्जा प्रकल्पही पूर्वीपेक्षा खूपच सुरक्षित मानले जातात. पण सध्या भारत आपल्या अणुऊर्जा केंद्रांमध्ये केवळ दोन ते तीन टक्के अणुऊर्जा निर्माण करू शकतो.  अणुऊर्जा प्रकल्प उभारणे तसे खूप महाग आहे आणि  त्याचे मुख्य इंधन असलेले युरेनियम आयात करण्यासाठी ऑस्ट्रेलियासारख्या विकसित देशांवर अवलंबून राहणे हे एक वेगळे संकट आहे. 

पर्यावरणीय कारणांमुळे या प्रकल्पांना प्रचंड विरोध होतो.  याशिवाय पेनसिल्व्हेनिया (अमेरिका) येथील थ्री माईल आयलंड, चेरनोबिल (रशिया) आणि फुकुशिमा अणुभट्टीच्या गळतीच्या घटना, जुने आणि जीर्ण अणु प्रकल्प, किरणोत्सर्गी कचऱ्याची विल्हेवाट आणि युरेनियमची कमतरता या समस्या अणुऊर्जेच्या मार्गात अडथळा ठरत आहेत. सौर आणि पवन ऊर्जा हे स्वच्छ इंधनासाठी चांगले पर्याय आहेत, परंतु सौर पॅनेलची देखभाल करणे एक त्रासदायक आहे आणि पवन ऊर्जा अनियमित, व्यापक स्वरूपात पसरलेली आहे आणि निश्चित स्वरूपात पकडणे कठीण आहे. - मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि.सांगली 

छोट्या पडद्याची गरज बड्या स्टार मंडळींना

चित्रपटाचे प्रमोशन असो किंवा कोणतीही नवीन घोषणा असो, चित्रपटातील कलाकारांना छोट्या पडद्याचा आधार घ्यावा लागत आहे. रिअॅलिटी शोपासून ते फिक्शन शोपर्यंत, मोठे स्टार्स त्यांच्या चित्रपट आणि वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. इतकंच नाही तर अमिताभ बच्चनपासून सलमान खानपर्यंत आणि रेखापासून माधुरी दीक्षितपर्यंत सगळ्यांनाच छोट्या पडद्याशी जोडल्याचा आनंद वाटतोय. कोविड-19 दरम्यान ओटीटीचा डंका वाजला. चित्रपटगृहे बंद असल्याने प्रेक्षकांनी ओटीटीला पसंदी देत त्यावरील सिनेमा, वेबसिरीजची मजा लुटली. आता छोटा पडदा मागे पडेल असे लोकांना वाटले, पण त्याने लोकांच्या हृदयात असे स्थान निर्माण केले आहे की टीव्ही मालिका आणि रिअॅलिटी शो आजही लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर आहेत.आता 2023 मध्येही छोट्या पडदा मोठा धमाका करणार आहे. छोट्या पडद्यावरील अनेक हिट मालिकांच्या आमूलाग्र बदलाची बातमी आली आहे. 2023 मध्ये अनेक नवीन चॅनेल्स सुरू झाली आहेत आणि त्याचबरोबर अनेक नवीन मालिका सुरू झाल्या आहेत.

2023 मध्ये प्रसिद्ध मालिकांमध्येही काही नवे बदल आणि नवा अंदाज दिसून येणार  आहे. निर्माता असित मोदी यांच्या मते यावर्षी 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये काही नवीन बदल पाहायला मिळतील. ही मालिका गेली कित्येक वर्षे पेक्षाकपसंदीच्या टॉप 10 मध्ये आहे. या मालिकेतून बाहेर पडणाऱ्या कलाकारांची जागा लवकरच नवे कलाकार घेतील. यासाठी असित मोदी खास पत्रकार परिषद घेऊन नव्या कलाकारांची ओळख करून देणार आहेत. 2023 मध्ये पोपटलालचे लग्न आणि दयाबेनची एंट्री  होण्याची शक्यता आहे. मात्र दयाबेन दिशा वाकानी आहे की नवीन अभिनेत्री, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चांगला टीआरपी  असलेल्या 'अनुपमा' मालिकेमध्येही बरेच काही नवीन बदल दिसणार आहे.  'अनुपमा'मध्ये नवीन रोमँटिक ट्रॅक देखील पाहायला मिळणार आहे. त्याच वेळी 2023 मध्ये 4000 भाग पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर असलेली 'ये रिश्ता क्या कहलाता है' ही मालिका नवीन नात्याची सुरुवात करणार आहे. त्याचबरोबर 'भाभी जी घर पर है' या अँड टीव्हीवरील  सर्वात हिटमालिके मध्ये नवीन पात्रांची एन्ट्री पाहायला मिळणार आहे.  त्याचे शूटिंग दुबईत नवीन ठिकाणी केले जाऊ शकते.  यामध्ये हॉरर कॉमेडीही दाखवण्यात येणार आहे. 

2023 मध्ये अनेक नवीन शो प्रदर्शनाच्या रांगेत आहेत. अनेक सुरुही झाले आहेत. जसं की, 'वागले की दुनिया' (ही मालिका 1988 मध्ये आली होती.) ही मालिका 2023 मध्ये नवीन पद्धतीने सादर केली जात आहे. याशिवाय बॅरिस्टर बाबू भाग 2, दुर्गा आणि चारू याआधीपासूनच प्रसारित होऊ लागले आहेत. 'धर्मपत्नी'चेही प्रसारण होत आहे. देव जोशी अभिनीत सब चॅनलचा प्रसिद्ध शो बालवीर सीझन 3 नव्या वर्षात 2 जानेवारीपासून प्रसारित होऊ लागला आहे. टीव्ही क्वीन एकता कपूर ब्युटी अँड द बीस्ट या हॉलिवूड चित्रपटावर आधारित मालिका घेऊन येत आहे ज्यात कुशल टंडन मुख्य भूमिकेत आहे. करण कुंद्रा, गश्मीर महाजनी आणि रिम शेख यांचा हॉरर रोमँटिक शो 'भेडिया' लवकरच कलर्स वाहिनीवर येणार आहे. स्टार प्लसवर 'तेरी मेरी डोरिया', झी टीव्हीवर 'मैत्री', सोनी सबवर 'ध्रुव तारा' लवकरच येणार आहेत. सुष्मिता मुखर्जी आणि काजल चौहान अभिनीत 'मेरी सास भूत है' रिलीजसाठी सज्ज आहे.

अग्निसाक्षी एक समझौता आणि त्रिकोणी प्रेमकथा इश्क में घायलं लवकरच कलर्स वाहिनीवर दिसणार आहे. मास्टर शेफ सीजन 7 स्टार प्लसवर शरारत 2 आणि थोड़ा जादू थोड़ी नजाकत, स्टार भारतवर मन की आवाज प्रतिज्ञा 2, स्टार प्लसवर रुद्रकाल, जी टीवी वर रब से दुआ, शेमारू उमंग चॅनलवर राजमहल दाकिन्न का रहस्य, सोनी टीवीवर कथा अनकही, सब टीवीवर दिल दिया गल्ला ,स्टार भारतवर आशाओं का सवेरा धीरे-धीरे 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.जुनून चित्रपटावर आधारित बाघीन या मालिकेव्यतिरिक्त मोलकी सीझन 2 रिलीजसाठी सज्ज आहे. या व्यतिरिक्त 2023 मध्ये प्रसिद्ध रियलिटी शो कपिल शर्मा शो, बिग बास 17, डांस दीवाने, झलक दिखला जा, डांस प्लस इत्यादी रियलिटी आणि डांस शोदेखील नव्या अंदाजात प्रदर्शित होणार आहेत. छोट्या पडद्याची ही नवीन तयारी आणि त्याची प्रचंड लोकप्रियता बघता असा निष्कर्ष निघतो की मोठ्या पडद्याचा दबदबा असो की ओटीटीचा, परंतु प्रत्येक घराघरात पोहोचलेला छोटा पडदा, त्याची प्रतिष्ठा आणि त्याची क्रेझ कधीच संपणार नाही. छोटा पडदा लहान असला तरी त्याचा प्रेक्षकवर्ग मात्र प्रचंड आहे.

Thursday, January 12, 2023

ऐतिहासिक चित्रपटांची परंपरा यंदाही कायम

हिंदी सिनेमाची सुरुवात पौराणिक, धार्मिक बरोबरच ऐतिहासिक पार्श्वभूमीवर मूकपटाने झाली होती.याचं कारण हे की जनमानसात यांच्याशी जुडलेल्या गोष्टी, किस्से,कथा-कहाण्या आणि घटना माहीत होत्या,लक्षात होत्या आणि भाषेशिवाय सिनेमा समजून घ्यायला सोपे पडत होते. नंतर सिनेमा ऐतिहासिक पार्श्वभूमीवर बनण्याचा काळ सुरू झाला. शिवाय ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले सिनेमे प्रत्येक दशकात बनू लागले. आजदेखील सिनेनिर्मात्यांना त्यात स्वारस्य असल्याचे आगामी चित्रपटांच्या घोषणांवरून दिसून येत आहे. मूकपटाच्या काळात लोकप्रिय पौराणिक कथांवर सिनेमे बनवण्याचा एकप्रकारे पूरच आला होता. रामायण आणि महाभारत संबंधित सिनेमे मोठ्या प्रमाणात बनले. 'कंस वध', 'लव कुश', 'कृष्ण सुदामा', 'महाभारत', 'वीर अभिमन्यू', 'राम रावण युद्ध', 'सीता वनवास' सारखे सिनेमे मोठ्या प्रमाणात पसंद केले गेले. याचबरोबर ऐतिहासिक पार्श्वभूमीवर बनलेल्या ‘सम्राट अशोक’, ‘कालिदास’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘छत्रपति संभाजी’, ‘राणा प्रताप’ आदी  मूकपटांना सिनेरसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. नंतर सामाजिक सिनेमांचा काळ आला. 

मूकपट लोक मोठ्या चवीने पाहत होते कारण, लोकांसाठी पडदयावरच्या हालत्या-डुलत्या सावल्या त्यांच्यासाठी आश्चर्याचा विषय होता. ऐतिहासिक सिनेमांना लोकांनी पसंद केल्याने मोठ्या संख्येने अशा सिनेमांची निर्मिती व्हायला लागली. बहुतांश सिनेमे राजा-महाराजा,प्रसिध्द योद्धे आणि संतांच्या जीवनावर बनत होते. ऐतिहासिक सिनेमे प्रत्येक काळात बनले आणि आजदेखील बनत आहेत. स्वातंत्र्यानंतर ऐतिहासिक चित्रपटांचा जोर वाढला. या काळात सशक्त दावेदार होते सोहराब मोदी आणि त्यांची कंपनी मिनर्वा मूविटोन.त्यांनी 'पुकार', 'सिकंदर', 'पृथ्वीवल्लभ', 'मिर्झागालिब' सारखे सिनेमांची निर्मिती केली. 1952 मध्ये त्यांनी 'झांशी की रानी' चित्रपटाची निर्मिती केली, ज्यात झांशीच्या राणीची भूमिका त्यांची पत्नी मेहताब यांनी साकारली.

यानंतर दोन वर्षांनी मिर्झा गालिब यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती झाली,ज्याचे लेखन राजेंद्र सिंह आणि सआदत हसन मंटो यांनी केले. या काळात कोणी मुगल सम्राटांच्या जीवनावर आधारित तर  कुणी शिवाजी महाराज आणि मराठा शासकांवर चित्रपट बनवत होते. स्वातंत्र्यानंतर एका बाजूला ‘सलीम अनारकली’ ‘मुगले आजम’, ‘जहांगीर’, ‘ताजमहल’ सारखे काही भव्य चित्रपट बनले, तर दुसऱ्या बाजूला देशभक्तीवर आधारित ‘हकीकत’, ‘हिंदुस्तान की कसम’, ‘शहीद’ सारखे काही यशस्वी पीरियड चित्रपटदेखील पाहायला मिळाले. हिंदी सिनेमा क्षेत्रातील त्रिमूर्ती- राज कपूर, दिलीप कुमार, देव आनंद-यांच्या दशकांनंतर जेव्हा बॉलीवुडमध्ये आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान या तिकडीचा दबदबा वाढला तेव्हाही ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती सुरूच राहिली. अलीकडेच काही वर्षांत बनलेल्या ऐतिहासिक चित्रपटांमध्ये  कंगना रानौत अभिनीत आणि दिग्दर्शित ‘मणिकर्णिका’, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह अभिनीत ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पदमावत’, ऋत्विक रोशन अभिनीत ‘मोहेनजोदड़ो’ आणि ‘जोधा अकबर’.आमिर खान अभिनीत ‘मंगल पांडे’ आणि शाहरूख खानचा ‘अशोका’ आदी चित्रपटांनी हिंदी सिनेमा क्षेत्रात आपले स्थान बनवले.

ऐतिहासिक सिनेमांची निर्मिती करणं जितकं कठीण तितकंच रिलीज दरम्यान विवादावरून टीकाकारांना सामोरं जाणं कठीण असतं. खासकरून भारतात चित्रपटांच्या रिलीज दरम्यान दुखावलेल्या भावनांना वाट मोकळी केली जाते. खरं तर प्रत्येक दुसऱ्या ऐतिहासिक चित्रपटाला वाद विवादाचा सामना करावा लागतो. संजय लीला भसांळी यांच्या ‘पद््मावत’ चित्रपटाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. इतकंच काय या वादामुळे चित्रपटाच्या नावात बदल करावा लागला. त्यानंतर  ‘मणिकर्णिका’, 'सम्राट पृथ्वीराज' दरम्यानदेखील  अनेक वाद समोर आले. आमिर खानच्या ‘मंगल पांडे’ मधील एक चुंबन दृश्य आणि काही अन्य दृश्यांबाबत चित्रपटावर विवाद उभा राहिला. अशाच प्रकारे संजय लीला भंसाळी यांचा ‘बाजीराव मस्तानी’ देखील वादाच्या भोवऱ्यात अडकला. ‘जोधा अकबर’ मध्ये ऐतिहासिक भूमिकांमध्ये  छेडछाड केल्याप्रकारणावरून विवाद उभा राहिला. अशा चित्रपटांसाठी 200 ते 300 कोटी रुपये लागलेले असतात,त्यामुळे निर्मात्यांवर मोठा ताण येतो.

गेल्या वर्षभरात आलेल्या बहुचर्चित चित्रपटांवर नजर टाकल्यास वेगवेगळ्या बायोपिक आणि इतिहासपटांचंही त्यात नाव दिसतं. पण सत्य इतिहास आहे तसा मांडण्याऐवजी या दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा कल वास्तव घडामोडींना सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली अतिरंजित कल्पकतेने मांडण्याकडे दिसून आला. त्यातून बरीचशी राजकीय, सामाजिक आणि पर्यायाने आर्थिक गणितही साधली गेली.  गेल्या वर्षी अशा धाटणीचे बरेच सिनेमे  आले, त्यातल्या काहींना चांगलं यश मिळालं तर काही दणकून आपटले. त्यातल्या फ्लॉप सिनेमांची यादी करायची तर यशराज फिल्म्सच्या 'सम्राट पृथ्वीराज' चं नाव आधी घ्यावं लागेल. अक्षय कुमारने यात सम्राट पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारली होती. आशुतोष राणा, संजय दत्त, साक्षी तन्वर, सोनू सूद अशी तगडी स्टारकास्ट असूनही हा सिनेमा चालला नाही. त्यानंतर ब्रिटिश सत्तेच्या कालखंडातील गोष्ट घेऊन आलेल्या 'समशेरा' लाही अपयशाचं तोंड पाहावं लागलं. 2015 ला घडलेल्या दोहा- कोची विमान दुर्घटनेवर आधारित 'रनवे 34' हा सिनेमाही फारसा चालला नाही. 

एकीकडे बॉत्लीवूड यशापयशाच्यया  गर्तेत गटांगळ्या खात असताना, प्रादेशिक सिनेमांनी मात्र वेगवेगळ्या इतीहासपटांच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर वर्चस्व राखण्यात यश मिंळ्ठवलं.  यातलं  सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे 1000 कोटींहून अधिक कमाई करणारा ‘आरआरआर’ हा तेलुगू सिनेमा. या सिनेमात अल्लूरी सीताराम राजू आणि कुमारम भीम या स्वातंत्र्ययोखद्ध्यांच्या जीवनातल्या एका कालखंडाचं कल्पकतेने सादरीकरण केलं गेलं होतं. दिग्दर्शक मणिरत्नमचा बहुप्रतिक्षित तमिळ सिनेमा 'पे पेन्नीयीन सेल्वनप 1 "ही याच वर्षी रिलीज झाला. चोल राजवटीवर आधारित असलेल्या या सिनेमाने 500 कोटींहून अधिक कमाई करत तिकीटनबारीवर आपलं वर्चस्व राखलं. एप्रिल 2023 मध्ये या सिनेमाचा दुसरा भागही येतोय. 

या वर्षात ऐतिहासिक सिनेमांचीही मोठी लाट उसळणार आहे.  दिग्दर्शक-निर्माता करण जोहरने दिल्लीतल्या मुघल राजवटीवर आधारित 'तख्त'  या सिनेमाची घोषणा केलीय. या सिनेमात विकी कौशल औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता बॉबी देओलही यावर्षी 'हरी हरा वीरा मल्लू' या तेलुगू सिनेमात औरंगजेबाचं पात्र रंगवताना दिसणार आहे. कुतुबशाहीतल्या एका अनाम वीराची शोर्यगाथा सांगणार्‍या या सिनेमात “पॉवर स्टार' पवन कल्याण प्रमुख भूमिका साकारणार आहे. 1818 मध्ये लढली गेलेली भीमा - कोरेगावची लढाई महाराष्ट्राच्या इतिहासातली एक महत्त्वाची लढाई मानली जाते. या लढाईत महार 'योद्ध्यांच्या मदतीने इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव केला. पेशवाईत अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीचं लढवय्या स्वरूप या लढाईमुळे समोर आलं. यावर आधारित 'द बॅटल ऑफ भीमाकोरेगाव' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. या ऐतिहासिक लढाईच्या नायकाची म्हणजेच सिदनाक इनामदाराची भूमिका अभिनेता अर्जुन रामपाल साकारतोय. गेल्या काही वर्षांत देशाच्या वैचारिक वर्तुळात गांधी विरुद्ध गोडसे आणि गांधी विरुद्ध सावरकर या राजकीय वादांनी थैमान घातलंय. त्याचे पडसाद वेळोवेळी साहित्यातून, नाटकांमधून उमटलेत. आता पुन्हा मोठ्या पडद्यावरही हा वाद नव्याने जिवंत केला जाणार असून, त्यांच्या निर्मिती आणि तिकीटबारीवरच्या व्यवसायात होणारा राजकीय हस्तक्षेप हा एक कळीचा मुद्दा ठरणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित 'स्वातंत्र्यवीर सावरकर'मध्ये अभिनेता रणदीप हुडा मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहे सप्टेंबर 2022 मधे रणदीपने मांजरेकरांच्या ऐवजी आपण हा सिनेमा दिग्दर्शित करणार असल्याचं जाहीर केलंय. 'गांधी गोडसे - एक युद्ध' हा राजकुमार संतोषी दिग्दर्शित सिनेमा या प्रजासत्ताक दिनाला प्रदर्शित होतोय. महाभारतातील कर्ण याच्या जीवनावर आधारित ‘महावीर कर्ण’, ज्यात अभिनेता विक्रम आणि मल्याळम अभिनेता सुरेश गोपी दिसणार आहेत. हा पौराणिक चित्रपट कन्नड़, हिंदी, मल्याळम, तामिळमध्ये रिलीज होणार आहे.500 कोटी रुपये खर्च झालेला 'आदिपुरुष' चित्रपट भारतीय महाकाव्य रामायणावर आधारित आहे आणि जून 2023 मध्ये रिलीज होणार आहे. - मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Monday, January 9, 2023

पतंग उडवण्याचा आनंद ठरतोय पक्ष्यांसाठी जीवघेणा

देशाच्या अनेक भागांतील लोक अनेक प्रसंगी आणि विशेषतः मकर संक्रांतीच्या दिवशी मोठ्या उत्साहाने पतंग उडवण्याचा आनंद घेतात. मकर संक्रांतीला पतंग उडवण्याच्या राजस्थान, गुजरातेतला खेळ आता महाराष्ट्रातही लोकप्रिय जोर धरू लागला आहे. पण, पतंग उडवण्यामुळे दरवषीर् अनेक पक्ष्यांना प्राणाला मुकावे लागते, याकडे आपले दुर्लक्षच होते. याचे कारण आहे, ग्लास कोटेड मांजा. या काचऱ्या मांज्यामुळे दिवसा आकाशात विहार करणाऱ्या पक्ष्यांना इजा होते. हा मांजा त्यांच्या गळ्यात, पायात किंवा पंखांमध्ये अडकला जाऊन कापल्याने त्यांचा हकनाक बळी जातो. अनेकदा, पतंग मांज्यासहीत झाडाला लटकतात. मांजा सहजासहजी डोळ्यांना दिसत नसल्याने मांज्याच्या गुंत्यामध्ये पक्षी अडकले जातात आणि त्यांना जखमा होऊन प्राण गमवावे लागते. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये ग्लास कोटेड मांज्यांवर बंदी आणण्यासाठी 'पेटा' (पीपल फॉर द एथिकल ट्रिटमेण्ट ऑफ अॅनिमल्स) ने प्रयत्न केले होते पण, त्याला यश मिळू शकले नाही. या मांज्यामुळे केवळ पक्षीच नाही, तर दुचाकीचालकांचाही मृत्यू ओढावतात.  बंदी असूनही हा दोरा बाजारात कसा उपलब्ध होता, हा एक गहन प्रश्नच आहे. 

बंदी असलेल्या नायलॉन मांजामुळे नागपुरातील एका 5 वर्षीय मुलीचा गळा कापल्याची घटना दोनच दिवसांपूर्वी  घडली. तिच्या गळ्याला 26 टाके पडले. ही मुलगी मरता मरता बचावली आहे. पुण्यात मकरसंक्रांतीच्या दरम्यान दरवर्षी सरासरी 80 पक्षी जखमी होतात तर 20 पेक्षा अधिक पक्ष्यांचा मांज्यात अडकून तडफडून मृत्यूही झाल्याचे समोर आले आहे.या जीवघेण्या मांज्यामुळे नाशिक आणि नागपूरमध्ये अनेक दुर्घटना घडल्या आहेत. यातच आता मुंबईतही एका पोलीस अधिकाऱ्याचा मांजामुळे गळा कापल्याची धक्कादायक महिती समोर आली आहे. मांज्यामुळे पक्षी जखमी होण्याचे प्रमाण अधिक आहे. 

वास्तविक, आपल्या आनंदासोबतच आपण मुक्या पक्ष्यांबद्दलही संवेदनशील असायला हवे. आपला तो आनंद सर्वात बेढब असतो, जो दुसऱ्यासाठी जीवघेणा किंवा वेदनादायक ठरतो. आपला जीव गमावलेला कोणी  मुका प्राणी किंवा पक्षी असेल, ज्याला आपल्या वेदना व्यक्तही करता येत नसेल, तर ही शोकांतिका आणखीनच भयानक होते. गेल्या काही वर्षांपासून विविध सणांच्या दिवशी पतंग उडवल्याने हजारो निष्पाप पक्ष्यांचा बळी जातो. गेल्या वर्षी एकट्या अहमदाबाद शहरात 141 आणि 15 जानेवारी 2022 म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पतंग उडवताना 500 हून अधिक पक्षी जखमी झाले होते, अनेकांचा तात्काळ मृत्यूही झाला होता. 

समाधानाची बाब म्हणजे अहमदाबादमध्ये पतंगाच्या दोरींमुळे जखमी झालेले बहुतांश जखमी पक्षी वाचले, कारण केवळ अहमदाबादमध्येच नाही तर संपूर्ण राज्यात गुजरात सरकारने 'संवाद पक्षी आणि प्राणी' या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून 'करुणा अभियान कार्यक्रम' सुरू केला होता. हेल्पलाइन चालवली होती. या मोहिमेअंतर्गत मकर संक्रांती आणि दुसऱ्या दिवशी राज्यभरात 600 हून अधिक पक्षी निदान केंद्रे उभारण्यात आली, ज्यामध्ये 620 हून अधिक डॉक्टर आणि 6,000 हून अधिक स्वयंसेवकांनी आपली सेवा दिली. एकट्या अहमदाबाद शहरात 11 आणि 15 जानेवारी 2022 रोजी आयोजित केलेल्या एका मोठ्या शिबिरात 12 डॉक्टर आणि 85 स्वयंसेवकांनी रात्रंदिवस आपली सेवा दिली.  अशा उपक्रमाचे  कौतुक कराल तितकं कमीच आहे. 

या प्रकरणातील खेदाची बाब म्हणजे देशातील बहुतांश भागात पक्ष्यांबाबत लोकांमध्ये संवेदनशीलता दिवून येत नाही. कदाचित त्यामुळेच मकर संक्रांतीसह इतर प्रसंगी पतंगबाजीमुळे हजारो मुके पक्षी जखमी होतात आणि शेकडो पक्ष्यांना जीव गमवावा लागतो. सर्वात चिंतेची बाब म्हणजे कायद्याने बंदी असतानाही चीनमधून आयात केलेल्या काच मिश्रित पतंगाचा दोरा म्हणजेच मांझा पक्ष्यांचा सर्वाधिक बळी घेतो आहे. पक्षीच  नाही, तर हा धोकादायक मांजा दरवर्षी अनेक माणसांचाही बळी घेत आहे. ऑगस्ट 2022 मध्ये राजधानी दिल्लीतील बदरपूर भागात एका डिलिव्हरी बॉयचा वेदनादायक मृत्यू झाला होता. ही काही वेगळी घटना नाही.  गेल्या काही वर्षांत राजधानीत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार या चायनीज मांजामुळे अर्धा डझनहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 

धोकादायक मांजासह केली जाणारी पतंगबाजी मुक्यासाठी दिवसेंदिवस धोकादायक बनत चालली आहे. दोन वर्षांपूर्वी राजधानी दिल्लीतही पतंगबाजीमुळे हजाराहून अधिक पक्षी जखमी झाले होते, त्यात 90 टक्क्यांहून अधिक पक्ष्यांना खोल जखमा झाल्या होत्या. अनेकांची मान पूर्णपणे कापण्यात आली होती. यावरून पक्ष्यांसाठी किती हे धोकादायक आहे याचा अंदाज येतो. हा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने 2017 मध्ये चायनीज आणि धातूच्या मांजावर बंदी घातली होती, पण ना मांजा विकणारे दुकानदार आणि ना तो खरेदी करून पतंग उडवण्याचा आनंद लुटणारे लोक या कायद्याचे पालन करताहेत. याचा परिणाम असा होतो की,इकडे आपण सण साजरा करत असतो, तेव्हा तिकडे आपल्या निष्काळजी कृत्यांमुळे हजारो पक्ष्यांचा जीव धोक्यात येतो. गेल्या वर्षी गुजरात सरकारने लोकांना संक्रांतीच्या दिवशी पतंग न उडवण्याचे आवाहन केले होते आणि पतंग उडवलेच तरी बंदी असलेला चीनी आणि मॅटेलिक धागा वापरू नये. पण सर्व लोकांमध्ये संवेदनशीलता जागृत झाली नाही आणि हजारो पक्षी मारले गेले. आणि आता अशी वेळ आली आहे की, या घटनांमधून धडा घ्यावा आणि काही तासांच्या आनंदासाठी पक्ष्यांचे आयुष्य संपवू नये. म्हणूनच या वेळी मकर संक्रांत किंवा इतर कोणत्याही प्रसंगी पतंग उडवण्याचा आनंद घेताना, या मुक्या पक्ष्यांच्या जीवनाचा जरा विचार करा. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Sunday, January 8, 2023

अशाने देश विज्ञान क्षेत्रात भरारी कसा घेणार?

अलीकडेच नागपुरात पार पडलेल्या  विज्ञानविश्वातील सर्वांत मोठ्या उपक्रमाला म्हणजेच  भारतीय विज्ञान काँग्रेसच्या वाट्याला दुर्लक्षच आले. सत्ताधारी, राजकारणी असो किंवा विज्ञान संशोधन क्षेत्रातील मातब्बर मंडळी याकडे फिरकलेसुद्धा नाहीत. कोरोनामुळे आभासी उपस्थितीचं नवं फ़ॅड आलं आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या काँग्रेसला याच पद्धतीने उपस्थिती दाखवली.देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाची दिशा निश्चित करण्यासाठी काही ठोस कार्यक्रम देण्यात अपयशी ठरले.  महत्त्वाचे म्हणजे  अत्याधुनिक संशोधन आणि देशाच्या विज्ञानजगताला ठोस कार्यक्रम देण्यात ही विज्ञान काँग्रेस अपयशी ठरली आहे. राजाश्रयाबरोबरच विज्ञान काँग्रेसला लोकाश्रयाची गरज असून, विज्ञानाला जनमानसात पोचविणाऱ्या या महा-उत्सवाला अस्ताचं ग्रहण लागलं आहे की काय असं वाटायला लागलं आहे. तसं झालं तर देशाच्या भवितव्यासाठी ते योग्य ठरणार नाही. पंतप्रधान मोदी यांनी भारतीय शास्त्रज्ञांना देशाच्या गरजा ओळखून संशोधन करण्याचं आवाहन केलं आहे. देशाच्या अमृतकाळातील विकासासाठी विज्ञानजगताची मोठी भूमिका असल्याचे गौरवोद्गार काढले. मात्र तेही वैज्ञानिक जगताला दीर्घकालीन व्यापक आणि सर्वंकष दृष्टिकोन देऊ शकले नाहीत. केवळ 'इनोव्हेशन' मधील क्रमवारी सुधारली म्हणजे देशात वैज्ञानिक  प्रगती झाली, असं म्हणता येणार नाही. मूलभूत विज्ञानातील संशोधनाचा अभाव , सुविधांची वानवा , नव्या संधीच्या कमतरता आणि नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल काहीच व्यक्त करण्यात आलं नाही. याशिवाय देश म्हणून आपल्या संशोधनातील उपलब्धीबद्दलही फारशी चर्चा झाली नाही. विविध चर्चासत्रांमध्ये विषयांच्या वैविध्याचा आणि नाविन्याचा अभाव पाहायला मिळाला.संपूर्ण आयोजनामध्ये देशभरातील आघाडीच्या शास्त्रज्ञांचा सहभाग कमी दिसला. खरंतर वादाची पार्श्वभूमी आणि उपयोजनशून्यतेमुळे आघाडीचे शास्त्रज्ञ विज्ञान काँग्रेसकडे पाठ फिरवत असल्याचं अनेक वर्षांपासून बोललं जात आहे.त्याची काहीशी प्रचिती या वेळी आली. एका मेळाव्याच्या पलीकडे विज्ञान काँग्रेस ठोस काही देण्यात अपयशी ठरत असल्याने वर्षागणिक मातब्बर शास्त्रज्ञांचा ओढा कमी झाला आहे. पर्यायाने कटिंग एड्ज संशोधन, भविष्यकालीन आव्हानं, संशोधनाच्या नव्या संधी आणि कृती कार्यक्रमातील प्रगल्भता लोप पावत आहे. दिवसेंदिवस राजकीय नेतृत्व विज्ञानाबद्दल प्रचंड अनास्था दाखवत असून, त्याची प्रचिती विज्ञान काँग्रेसच्या निमित्ताने आली. संपूर्ण मानवजातीच्याच प्रगतीचा अविभाज्य घटक हा विज्ञान असतानाही, राजकीय आणि सामाजिक नेतृत्व याकडे कमालीचं दुर्लक्ष करत असून, आत्मनिर्भर होऊ पाहणाऱ्या भारतासाठी निश्चितच हे भूषणावह नाही.अशाने देश विज्ञान क्षेत्रात प्रगती कशी साधणार? संशोधनासाठी निधीचा कमतरता नेहमीच असते. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) तुलनेत आपण फार कमी खर्च संशोधनावर करतो. अमेरिका, चीनसारखे देश दोन टक्क्यांवर खर्च करतात. एखाद्या विषयाचा पुर्वी देशात एखादा दुसरा शास्त्रज्ञ असायचा, त्यामुळे विचारांची देवाणघेवाण, नवकल्पना आणि परस्पर सहकार्य यांचा अभाव होता. अशा चर्चेतूनच विज्ञान पुढे जातंय. याबाबत अमेरिका आणि युरोपातील शास्त्रज्ञांप्रमाणे आपणही परस्पर सहकार्य आणि चर्चेतून संशोधन पुढे न्यायला हवे. 

डॉ. सी. व्ही. रमण यांच्या रूपाने देशातच काम केलेल्या पहिल्या शास्त्रज्ञाला नोबेल मिळाले. त्यानंतर अजूनही भारतात राहून संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना नोबेल मिळालेले नाही. त्या दिशेने प्रवास सुरू आहे. परंतु पुरेसे प्रोत्साहन हवे आहे. प्रयोगांसाठी निधीपासून शिक्षणातील मूलभूत बदलांपर्यंत आपल्याला काम करावे लागेल.संशोधनात पुर्वीपासून पैसे कमी मिळतात, पण मानसन्मान खूप होता. जनमानसात प्राध्यापक, शिक्षक आणि संशोधक यांना आदराचे स्थान होते. आता कुठेतरी ते कमी झाल्यासारखे वाटते. सर्वच हुशार विद्यार्थ्यांचा संशोधनाकडे कल असेलच असे नाही. संशोधनातल्या संधी, निधीची उपलब्धता हा प्रश्न आहेच. आता मोठ्या पॅकेजची नोकरी हीच विद्यार्थ्यांसह शिक्षणव्यवस्थेची आणि समाजाची भूमिका आहे. त्यामुळे सध्या संशोधनाचे गणित बिघडलंय, तरीही देशातील काही भागांमध्ये वैज्ञानिकांची परंपरा निर्माण होते, हे आशादायक चित्र आहे.  मूलभूत विज्ञानाचा नवनीतम संशोधनाशी संबंध विद्यार्थ्यांना स्पष्ट केला पाहिजे. संशोधनासाठी निधी हवाच पण विज्ञानाला लोकसन्मानही पाहिजे. विज्ञानात रुची निर्माण करणाऱ्या शिक्षण व्यवस्थेचा पाया रचावा लागेल. संशोधकांनीही 'कटिंग एज' म्हणजे नवीनतम संशोधनात स्वतःला गुंतवावे. तेव्हा कुठे आपण नोबेलविजेत्या संशोधनाकडे वाटचाल करू. राजकारण्यांच्या बातम्यांचा रतीब घालणाऱ्या टीव्ही चॅनेलवाल्यांनी देखील स्वतःच्या टीआरपी बरोबरच देशाचा विकास लक्षात घेऊन आजचा युवक विज्ञानाकडे कसा आकर्षित होईल, यासाठी काही कार्यक्रम द्यावेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 


Friday, January 6, 2023

शब्दसंपतीचे मालक व्हा

आदिम अवस्थेपासून आधुनिक मानवापर्यंतच्या विकासाच्या प्रवासाचं रहस्य काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? बहुतेक लोक याचे उत्तर देतात की इतर प्राण्यांच्या तुलनेत माणसाचा विकसित मेंदू या संपूर्ण प्रगतीच्या आणि संस्कृतीच्या मुळाशी आहे. तसं हे उत्तर अपूर्ण आहे. याचं पूर्ण उत्तर असं आहे- माणसाने प्रगती केली, कारण या मेंदूने भाषा शोधली. सर्व प्रगतीच्या मुळाशी भाषा आहे. जगातील ज्ञानाच्या सर्व शाखा विकसित झाल्या आहेत - त्या भाषेमुळे! 'भाषा' म्हणजे अर्थपूर्ण शब्दांचे व्यवस्थित-क्रमबद्ध संयोजन!

शब्दांची ही दुनिया फार विचित्र आहे. शब्दांच्या सामर्थ्याकडे आपलं कधीच लक्ष जात नाही. शब्दच माणसाला ज्ञानाशी जोडतात. शब्दच माणसाला माणसाशी जोडतात आणि शब्दच माणसाला माणसापासून तोडतात. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून, अक्षरे ध्वनीचे प्रतीक आहेत, ते निर्जीव आहेत. माणूसच त्यांना अर्थ देतो, जिवंत करतो. शब्द जिवंत झाले की मग माणसाचे विविध स्वभाव आणि गुण त्यांच्यात येऊ लागतात. मानवी स्वभावाचे जेवढे वेगवेगळे नमुने आहेत तितकेच शब्दांच्या स्वभावाचेही नमुने आहेत. जसे काही लोक इतरांना हसवण्याचे काम करतात, त्याचप्रमाणे काही शब्द देखील लोकांना हसवतात. जसे काही माणसे इतरांना नेहमी त्रास देतात;  तसे काही शब्दांच्या उच्चाराने समोरच्याला अस्वस्थ करतात. 

कधी कधी तर असे शब्द ऐकून ते रडायलाही लागतात. काही लोक खूप प्रिय असतात;  त्याचप्रमाणे काही शब्दही खूप प्रिय असतात.  त्यांना पुन्हा पुन्हा ऐकण्याची, त्यांना गुणगुणण्याची इच्छा होते. एकीकडे काही शब्द फसवे, काही अर्थहीन, तर काही शब्द अत्यंत सौम्य, सात्विक, सभ्य आणि सुसंस्कृत असतात. काही शब्द आपल्याला निष्क्रीय करतात. 'काहीही करू नकोस, जे काही तुझ्या नशिबात आहे ते तुला नक्कीच मिळेल. नाही तर मिळणार नाही.' न्यूटनने म्हटले आहे की, कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी ९०% (नव्वद टक्के) मेहनत, ५% (पाच टक्के) बुद्धिमत्ता आणि ५% (पाच टक्के) योगायोग आवश्यक असतो. शब्द जे आपल्याला निष्क्रिय ठेवतात;  आपण त्यांना आपल्या जीवन व्यवहारातून फेकून दिले पाहिजे. काही भाषांमधील शब्द इतर कोणत्याही भाषेशी मैत्री करतात आणि त्यातीलच एक बनतात. जसे तुमचे काही मित्र असे असतात की;  जे सर्वांमध्ये मिसळू शकतात. काही असे असतात की ते इतरांशी मैत्री करू शकत नाहीत.  शब्दांचाही असाच स्वभाव असतो;  विशेषतः, इंग्रजी भाषेतील बरेच शब्द ते ज्या प्रदेशात गेले त्या भाषेत मिसळून गेले. जसे 'बस, रेल्वे, कार, रेडिओ, स्टेशन' इत्यादी. तमिळ भाषेतील शब्द मात्र त्यांच्या द्रविड कुटुंबापुरतेच मर्यादित राहतात, असे म्हटले जाते. त्यांना कोणामध्ये मिसळायचे नसते. हिंदी शब्द  लगेच मिसळणारे असले तरी सर्वच नाहीत,  काही शब्द आपले स्वतंत्र अस्तित्व शेवटपर्यंत टिकवून ठेवतात. त्यांच्या मूळ स्वरूपातच ते इतर ठिकाणी जातात. काही शब्द इतर भाषांशी अशा प्रकारे मिसळून जातात की त्यांचे स्वतंत्र रूप, अस्तित्वच हरवून जातात. काही शब्द हिंदीतही आढळतात जे दोन वेगवेगळ्या भाषांमधील शब्द एकत्र करून बनवले जातात. आता ते शब्द फक्त हिंदीचे बनले आहेत. हिंदी-संस्कृत पासून वर्षगाँठ, माँगपत्र; हिंदी-अरबी /फारसी पासून थानेदार, किताबघर ; अंग्रेजी-संस्कृतपासून रेलयात्री, रेडियो तरंग ; अरबी /फारसी-अंग्रेजी पासून बीमा पॉलिसी इत्यादी.हिंदीचे शब्दविश्वही या शब्दांमुळे समृद्ध झाले आहे. काही शब्द आपल्या आईला इतके प्रिय असतात की ते आपली मातृभाषा सोडून इतरांसोबत जात नाहीत. काही शब्द खूप छान असतात, ते कोणत्याही भाषेत स्वतःसाठी जागा बनवतात. 

शब्दांच्या बाहेर जाण्याच्या आणि इतर अनेक भाषांमधून शब्द येण्याच्या या मार्गाने आपली भाषा समृद्ध झाली आहे. विशेषत: ते शब्द ज्यासाठी आपल्याकडे पर्यायी शब्द नाहीत. इंग्रजी, पोर्तुगीज, अरबी, पर्शियन भाषेतून आलेले हजारो शब्द आले आहेत;  त्यांना येऊ द्या. जसे ब्रश, रेल्वे, पेन्सिल, रेडिओ, कार, स्कूटर, स्टेशन इ. परंतु ज्या शब्दांसाठी आपल्याकडे सुंदर शब्द आहेत, त्या शब्दांसाठी इतर भाषेतील शब्द वापरू नयेत. आमच्याकडे 'आई'- वडिलांसाठी अनेक सुंदर शब्द आहेत. जसे- माई, अम्मा, बाबा, अक्का, अण्णा, दादा, बापू.आता त्यांना मम्मी-डॅडी म्हटणे म्हणजे आपल्या भाषेतील सुंदर शब्दांचा अपमान आहे. 

आपल्या तोंडून बोललेले शब्द आपले चारित्र्य, बुद्धिमत्ता, समज आणि मूल्ये दर्शवतात, म्हणून आपण शब्द उच्चारण्यापूर्वी विचार केला पाहिजे. कमीत कमी शब्दात अर्थपूर्ण बोलणे आणि लिहिणे ही एक कला आहे. ही कला मेहनतीने आणि विविध पुस्तके वाचून साध्य करता येते. पण फक्त एका चुकीच्या शब्दाच्या उच्चारामुळे अनेक वर्षांच्या मैत्रीला तडा जाऊ शकतो. आता कोणत्या वेळी, कोणाच्या समोर, कोणते शब्द वापरावेत, हे अनुभवातून, मार्गदर्शनातून, वाचनाने आणि संस्कारातूनच कळते. परीक्षेत जी वाक्ये सुंदर, समर्पक आणि अर्थपूर्ण शब्दांनी लिहिली जातात, त्यामुळे चांगले गुण मिळतात. अपशब्द वापरणे नेहमीच हानिकारक असते. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची अशी शब्दसंपत्ती असते. हा शब्दसंग्रह वाढवण्यासाठी साहित्याचे वाचन आवश्यक आहे. शब्दांचे वेगवेगळे अर्थ जाणून घेण्यासाठी  शब्दकोशाचीही गरज असते. शब्दकोषाचे रोज एक पान एकाग्रतेने वाचले तर शब्दसंपत्तीची ताकद कळून येईल. तर, आता तुम्ही ठरवूनच टाका की  तुम्हाला तुमचा शब्दसंग्रह वाढवायचा आहे.  आणि त्यासाठी वाचन संस्कृती वाढवा. वाचायला सुरुवात करा.मग  तुम्ही शब्दांच्या संपत्तीचेही मालक व्हाल. - डॉ. सूर्यनारायण रणसुभे (अनुवाद- मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली) 


बिमल रॉय : हिंदी चित्रपटसृष्टीला नवी दिशा देणारे दिग्दर्शक

ज्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये धार्मिक आणि ऐतिहासिक विषयांचे वर्चस्व होते, तेव्हा बिमल रॉय यांनी स्वत:ला सामाजिक आणि उद्देशपूर्ण चित्रपटांपुरते मर्यादित केले.शेतकरी, मध्यमवर्ग आणि महिलांचे प्रश्न त्यांनी आपल्या चित्रपटांतून मांडले. ते त्यांच्या काळातील ज्वलंत प्रश्नांपासून कधीही दूर गेले नाहीत.  बिमल रॉय यांनी प्रसिद्ध साहित्यकृतींवर अप्रतिम चित्रपटही बनवले. तगडी कथा-पटकथा-संवाद, उत्कृष्ट चित्रीकरण आणि सुरेल गाणी-संगीत ही त्यांच्या सर्वच चित्रपटांची ओळख आहे. बिमल रॉय यांच्याशिवाय हिंदी सिनेमाची कल्पनाच करता येत नाही, हे एक सत्य आहे. बिमल रॉय हे खरंच हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नक्षत्र आहे, ज्याची चमक कधीच फिकी पडणार नाही. फिल्मी दुनियेत त्यांचा सिनेमा 'बिमल रॉय स्कूल' या नावाने ओळखला जातो. ज्यांच्याकडून अनेक पिढ्या प्रशिक्षित होत राहतील.  भारतीय चित्रपटसृष्टीत असे वेगळे स्थान फार कमी चित्रपट दिग्दर्शकांनी मिळवले आहे.

बिमल रॉय यांनी खूप सुंदर चित्रपट भारतीय प्रेक्षकांना दिले. जीवनाच्या वास्तवतेला कलात्मकता आणि काव्यात्मकतेचं सौंदर्यलक्ष्यी परिणाम देऊन रुपेरी पडद्यावर एखाद्या उत्कट कवितेसारखं चितारणाऱ्या , भारतीय जीवनशैलीचं हृद्य दर्शन घडवणाऱ्या , साहित्यकृती, अमर व्यक्तिरेखा यांचं प्रतिबिंब ज्यात आहे अशा श्रेष्ठ चित्रपटांची देणगी भारतीय रसिकांना दिली.  निर्माता, दिग्दर्शक, कॅमेरामन बिमल रॉय यांचा जन्म 12 जुलै 1909 रोजी पूर्व बंगालमधील ढाक्क्याजवळच्या सौपूर या गावचे जमीनदार हेमचंद्र रॉय यांच्या संयुक्त विशाल अशा कुटुंबात झाला. अत्यंत संवेदनशील, पण बुद्धिमान असलेला हा मुलगा निसर्गाचा वेडा होता.
ब्रिटिश शाळेत त्याचं शिक्षण झालं. पेंटिंग काढण्यात , व्हायोलिन वाजवण्यात तर तळ्याकाठी , आमराईत रमणारा हा मुलगा मितभाषी होता. ढाक्क्याच्या जगन्नाथ महाविद्यालयात इंटरला असताना वडिलांचं निधन झालं. भावंडं इंग्लंड, कोलकाता येथे शिकत होती. आईजवळ बिमल एकटा होता. त्यानंतर घरातल्या मुनिमनं सर्व संपत्तीचा अपहार केला. जमीनदारी एका रात्रीत गेली. घर, जमीन, शेत, तलाव सर्व गेलं. दक्षिण कोलकात्यात शिक्षण सोडून आणि आईला घेऊन ते राहायला आले. त्या वेळी कोलकात्यात 'न्यू थिएटर्स' ही नामवंत चित्रनिर्मिती संस्था उदयास येत होती. लहानपणी दुर्गापूजेत सर्वांना जमवून 'यहुदी की लडकी' किंवा ' मिसर कुमारी' सारखी नाटकं बसवणारे बिमलदा , कॅमेरा चालवण्यात तरबेज होते. न्यू थिएटरमध्ये दिग्दर्शक- कॅमेरामन नितीन बोस यांचे सहायक कॅमेरामन म्हणून रुजू झाले. न्यू थिएटर्सच्या मीरा, गृहदाह, देवदास, माया, मुक्ती, अभिनेत्री अशा चित्रपटांतून हे नाव चमकू लागलं. पोस्टरवर प्रमुख अभिनेत्यांच्या जोडीला बीमलदाचं नाव प्रकाशित होत असे. ते स्टार कॅमेरामन झाले. प्रत्येक अभिनेत्री त्यांच्याकडून फोटो काढून घेण्यास उत्सुक असत. तरुण बिमलदांवर शरत साहित्याचा प्रभाव होता. प्रथमेश बारुआबद्दल , नितीन बोसबद्दल आकर्षण होतं. 1937 मध्ये मनोबिनासारख्या सुविद्य , प्रगल्भ पत्नीमुळे त्यांच्या जीवनात नवीन पर्व सुरू झालं. बीमलदांना आता स्वतंत्रपणे काम करण्याची इच्छा होती. तशी संधी चालून आली. त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट एक सप्टेंबर 1944 रोजी 'चित्रा' सिनेमा गृहात प्रदर्शित झाला. 'उदयेर पाथे' नवसिनेमाचा, नवविचारांचा संदेश घेऊन आला. बंगाली तरुणांत त्यांची खूप चर्चा होई. 'उदयेर पाथे' च्या हिंदी आवृत्तीच्या - हमराहीच्या निमित्तानं बिमलदा प्रथमच मुंबईत आले. पण काही काळ कोलकात्यात अस्थिर वातावरणात काढल्यानंतर ते मुंबईस राहायला आले. शाळेतल्या मित्राने हितेश चौधरीने त्यांना मुंबईत आणलं. येताना ऋषिकेश मुखर्जी, असीत सेन, नझीर हुसेन अशी गुणी माणसंहि त्यांच्याबरोबर होती. हितेन चौधरी यांनी ' माँ' चित्रपटाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. माँ चांगला चालला. देविकारणीच्या बंगल्यात बिमलदांचे वास्तव्य होते. मनोबीना सर्वांची - सहकारयांची जातीनं देखभाल करीत . त्यातूनच 'बिमल रॉय प्रॉडक्शन' उभे राहिले. सलील चौधरी ' रिक्षावाला' ही त्यांची कथा घेऊन आले आणि ' दो बिघा जमीन' ही अजोड कलाकृती प्रेक्षकांसमोर आली. बलराज साहनी यांनी शंभू महातो या गरीब शेतकऱ्याची अविस्मरणीय भूमिका केली आणि हिंदी चित्रपट सृष्टीत बंगाली खादीचा पेहराव घातलेले मितभाषी बिमल रॉय दाखल झाले. त्याच सुमारास 1953 मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेला  'परिणिता' आला आणि बिमलदांनी अनेक पारितोषिक जिंकली. चित्रपटाच्या इतिहासात बिमल रॉय युग सुरू झाले.
'देवदास', 'मधुमती', 'बंदिनी', ' सुजाता', 'परख' मधून बिमलदांनी वास्तवता, जीवनाचे गहिरे रंग, व्यक्तिरेखा, निसर्ग, संगीत यांचे रंग भरले. त्यांच्या आवडत्या शरच्चंद्र यांच्या कादंबऱ्यांवर हळुवारपणे 'बिराज बहु' , देवदास, परिणिता सारखे चित्रपट केले. त्यांचे सहकारी, चाहते, मित्र असलेले ऋषिकेश मुखर्जी , असीत सेन, बासू भट्टाचार्य आदी दिग्दर्शकांनी बिमल रॉय स्कूलची परंपरा पुढे चालू ठेवली. संयत अभिनय, वास्तवता, आणि कलात्मकता यांचं भान बिमलदांची देणगी आहे.
अविश्रांत काम करणाऱ्या बिमलदांना अर्ध्या वाटेत फुफ्फुसाच्या कर्करोगाने गाठलं. डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. पण युनिटमध्ये कुणीही विनावेतन राहिलं नाही. वांद्र्याच्या 'गोदीवाला' बंगल्यात अखेरपर्यंत भाडेकरू म्हणून राहिले. 8 जानेवारी 1966 रोजी बिमलदांनी अखेरचा श्वास घेतला.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली