Friday, December 2, 2011

निष्काळजीपणाचा कळस आणि वाहन अपघात

      रस्त्यांवरील वाढत्या अपघातांच्या भीषण घटना आपल्याकडे मोठा चिंतेचा विषय झाला आहे. माणसाचे मरण स्वस्त असल्याचे या घटना सांगताहेत. का अशा अपघातांच्या घटनांमध्ये भर पडत आहे?  माणसाला दुसर्याचा जाऊ द्या पण स्वतःचा जीवसुद्धा प्यारा नाही कायअनमोल अशा  माणूस जिवाची कदर कुणालाच नाही का? शासन- प्रशासन, संबंधीत मालक , वाहनांचा चालक अशी या यंत्रणेसंबंधीत असलेली  माणसे अशी का बिघडली आहेत?  का त्यांना माणसाच्या जिवाची किंमत कळत नाही? " मनावर ब्रेक, उत्तम ब्रेक" अथवा "अति घाई जीव नेई' अशा सूचनांचा भडीमार  असूनही ना चालक त्याकडे लक्ष देतो, ना प्रवाशी. सगळे वेळेला मागे टाकायला निघाले आहेतशासनसुद्धा निव्वळ रस्त्याच्या बाजूला संदेश बोर्ड लावले म्हणजे आपली जबाबदारी संपली , असे समजून बाजूला होत आहेशासन  आपली जबाबदारी का टाळत आहे? रस्त्यातले खड्डे की खड्ड्यातले रस्ते, याचा पत्ता लागू नये इतकी बेपर्वाई का करत आहे? या सगळ्या प्रश्नांचे डोक्यात काहूर माजायला लागते, तेव्हा  डोके पार बधीर होऊन जातेउत्तर सापडतच नाही.
      कसली ही जीवघेणी स्पर्धा म्हणायचीकिती हा बेजबाबदारपणा आनि निष्काळजीपणा? ज्या जीवाच्या सुखासाठी धावधाव धावायचं आणि तोच जीव असा किड्यामुंग्यांसारखा सहज मृत्यूच्या हवाली करायचा. याचा कोणीच का विचार करत करत नाही? सोमवार पहाटेच्या  सैनी आणि रॉयल ट्रॅव्हल्सच्या बसेस एकमेकांवर आदळून झालेल्या  बुलढाणा जिल्ह्यातल्या अपघातात निष्पाप १५ जणांचा बळी गेला. पन्नासभर प्रवाशी जखमी झाले. गाड्यांचा स्फोट झाल्याने त्या बेचिराख झाल्या. हा अपघात  म्हणजे खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या आपसातील स्पर्धेचा आणि बेदरकार चालकांच्या निष्काळजीपणाचा परिपाक असल्याचे सुकृतदर्शनी दिसते आहे. म्हणजे इथून्-तिथून सगळा स्पर्धेचा ओव्हरटेक आणि निष्काळजीपणाचा अतिरेकच म्हणायला हवा
     कुठल्याही गोष्टीतला निष्काळजीपणा घातकच असतो. अपघातांमध्ये  निष्काळजीपणा स्वतःच्या जीवाची आणि दुसर्याच्या जीवाची फिकीर करीत नाही. परवाच्या अपघातातल्या एका खासगी बसवाहतुकीच्या चालकाने मद्यप्राशन केले होते. वाहनांचा वेग भरधाव. त्यात रस्त्यात मुलुखभर खड्डेत्यामुळे खड्डा चुकवण्याच्या नादात हा भयानक आणि भीषण अपघात झाला. यात सरळ अर्थाने चूक एका चालकाची वाटत असली तरी चुका अनेकांच्या आहेत. शासन, वाहनमालक, चालक आणि प्रवाशी याचबरोबर आणखीही काहींच्या अप्रत्यक्ष चुका आणि निष्काळजीपणा या अपघाताला कारणीभूत  आहेत. अर्थात केवळ या अपघातामध्ये नव्हे तर घडणार्या प्रत्येक अपघाताला अनेकांचा निष्काळजीपणा जबाबदार असतो. चालकांचा निष्काळजीपणा, वाहनांचा प्रचंड वेग, वाहनांच्या देखभालीकडे दुर्लक्ष, आपल्याकडील सुमार रस्ते, डागडुजीबद्दल निष्काळजीपणा असे अपघात घडतात आणि यामुळे अशा  अनेक निष्पापांचे   बळी जाताहेत.
    आपल्याकडील सुमार रस्ते, डागडुजीबद्दल निष्काळजीपणा हा मोठा कळीचा मुद्दा आहे. महामार्गावरील खड्डे निष्पाप प्रवाशांच्या मृत्यूचे निमंत्रक बनले आहेत. हे खड्डे बुजवण्याचे काम कधीच वेळेवर होत नाही. रस्त्यांच्या कामांच्या दर्जेबाबत तर विचारायची सोयच राहिलेली नाही. एक पावसाळा सुखाने जात नाही. लगेच खड्डे पडलेच म्हणून समजा. रस्ते म्हणजे देशांची वाहिनी आहे. पण त्याकडे कोणीच गांभीर्याने पाहात नाही. टक्केवारीला सोकावलेले लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यामुळे ठेकेदार आपल्या सोयीने रस्त्यांची कामे करतो  त्याला रस्त्याच्या क्वालिटीशी काही देणे-घेणे नसते. त्याचा परिणाम म्हणून जागोजागी खड्डे दिसतात. बरे खड्डे पडले ते पडले,  ते बुजवण्याचे कामही वेळेवर होत नाही. परिणाम काय तर हे असले अपघात दिसत राहतात.
     वाहन चालवण्याला एक मर्यादा आहे. शासनानेही त्याला मर्यादा आखून दिली आहे. साधारणतः द्रुतगती महामार्गावर ८० कि.मी. वेगमर्यादा आहे. पण पाळतो कोण? अशा वेगाचे, कायद्याचे उल्लंघन सतत होत असते. त्याला आवर कधी घातल्याचे ऐकिवात नाही. माणसाने आजच्या घडीला आपल्यापेक्षा वेळेला अधिक महत्त्व दिले आहे. कामाला दिवस पुरत नाही म्हणून रात्रीचाही धावधाव धावतो आहे. अलिकडच्या काळात रात्रीच्या प्रवासाला निघण्याचा ओढा कमालीचा  वाढला आहे. आपल्या देशात सकाळी ते रात्री दरम्यान रस्त्यावर जी वाहतूक असते, त्यापेक्षा कमी वाहतूक रात्री असते. मात्र तरीही रात्रीचा अपघात हा दिवसाच्या अपघातापेक्षा आठपटीने जास्त आहे. रस्ता मोकळा आहे, म्हणून चालक भरधाव वाहने चालवित असतात. रात्रीचा काळ वास्तविक निसर्गनियमाने झोपेसाठी राखीव असतो. पण माणूस ही निसर्ग चक्रे आपल्या सोयीनुसार फिरवीत आहेमात्र शरीर आणि मन त्याला साथ द्यायला हवे ना! साथ मिळाली नाही तर अनर्थ घडतोच.
     एक तर अलिकडच्या वीस-पंचवीस वर्षात वाहनांची संख्या बेसुमार वाढली आहे. वेळेच्या पुढे जाण्याच्या घाईत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला फाटा दिल्याने रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे. गरिबांच्या देशात ही वाहनांची गर्दी सामान्यांच्या मुळावरच उठली आहे. खासगी वाहतूक, बेकायदा वाहतूक वाढली आहे. मर्यादेपेक्षा अधिक माणसे गाडीत अक्षरशः कोंबली जातात. चालकाला वाहन नीट चालवता येत नाही, तरीही गर्दी केली जातेच. चार पैसे जास्त मिळवन्याच्या नादात सगळेच त्याच्या मागे लागले आहेत. अशा वाहतुकीला आळा घालणारी पोलिसी यंत्रणासुद्धा चिरीमिरीसाठी अभय देत राहते.  सगळी दुनिया पैसा खाते. मग मी थोडा खाल्ला म्हणून थोडच आभाळ कोसळणार आहे, अशी या यंत्रणेची  मानसिकता बनली आहे.
     खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसेस वातानुकूलित, आरामदायी  असतात. त्या तुलनेत एस.टी. महामंडळाकडे अशा सुविधा अपुऱ्या असतात. शिवाय महामंडळ वाहनांची देखभाल करण्यास कुचराई करत आहे. त्यासाठी निधी देत नाही. त्यामुळे चालकाला वाहन आहे त्या परिस्थितीत हाकावे लागते. माणसांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात  म्हणावी अशी वाहतूक यंत्रणा पुरेशी नाही. त्याचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे एकमेकाच्या पायावर पाय ठेऊन , दाटीवाटीने आणि लोंबकळत लोक प्रवास करतात. असा प्रवास नको म्हणून  उच्चभ्रू, मध्यमवर्गीय गरजू प्रवासी खासगी वाहतूकीकडे आपसूकच धाव घेतात. या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या प्रवाशांच्या मानसिकतेचा बरोबर फायदा घेतात आणि  त्यांना हवे तसे लुटण्याचा सतत प्रयत्न करतातत्यात खासगी वाहतूकदारांमध्येसुद्दा स्पर्धा प्रचंड वाढली आहे. तू पुढे की मी या नादात आपल्यासह दुसर्याचा जीव धोक्यात घालत आहेत. पैसा मिळवण्याच्या मोहापायी वाहनमालक वाहन फक्त हाकीत असतात. त्याची  देखभाल करत नाहीत. जी रोजीरोटी देते, तिची काळजी घ्यायला हवी, देखभाल करायला हवी. परंतु तसे करताना दिसत नाहीत. निष्काळजीपणा नडतो. . चालकांच्या शारीरिक, मानसिक परिवहन क्षमतेकडेही काणाडोळा केला जातो.लांब टप्प्याच्या गाडय़ांसाठी दोन चालक हवे असतात, मात्र एकाच चालकाला अशी वाहने  चालवावी लागतात, त्यामुळे तो शारीरिक मानसिक तणावाखाली असतो. वाहन चालवण्याला सक्षम नसतो.
    प्रवास सुखकर, सुरक्षित व्हावा, यासाठी कायदे करण्यात आले आहेत. त्याचे व्यवस्थितरित्या पालन केल्यास, वेळेपेक्षा जीव महत्त्वाचा मानल्यास आणि  वेळेवर पोहचण्यासाठी थोडे लवकर निघण्याची मानसिकता ठेवल्यास भीषण अपघात टाळता येतील. प्रवासादरम्यान चालकाने मद्यप्राशन करू नये, यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. आरटीओ पोलिसांनी याबाबत दक्ष राहायला हवे. प्रवास सुखकर व्हावा, दळणवळण वाढावे म्हणून रस्ते बांधण्यात आले आहेत, त्यांची वेळचेवेळी दुरुस्ती व्हायला हवी. असं खूप वाटतं. पण विचारात घेतो कोण? ज्यांनी याची काळजी घ्यायला हवी, त्यांना कुठे   सवड आहे?  फक्त  धावधाव धावण्याच्या स्पर्धेत आजचे अपघात कालचे होऊन जाताहेत.- मच्छिंद्र ऐनापुरे
Deshonnati , Nagpur 30/11/11 dainik Surajya, solapur 2/12/11

No comments:

Post a Comment