Sunday, December 23, 2012

बालकथा: कोल्हापुरी

     एक होती चप्पल. तिचे नाव होते कोल्हापुरी. कोल्हापुरी मोठी जिद्दी होती. दुकानदाराने रामरावदादाला तिला  विकल्यानंतरही ती त्याच्यासोबत गेली नाही. म्हणाली," मी इथेच राहणार. मला दिवसभर शेतात काम करायला आवडत नाही. मला थंड हवेत राहायला आवडते. इथे मस्त थंड हवा आहे."
     कोल्हापुरीच्या जिद्दीपुढे हात जोडत दुकानदार म्हणाला," अगं बया! माझी पाठ सोड. बोहनीचा टाईम आहे, मला धंदा करू दे. तू आपली रामरावदादांसोबत निघून जा." कोल्हापुरीला जायचं नव्हतंत्यामुळे  ती गेली नाही. रामरावदादा निघून गेला. बिच्चारा दुकानदार डोके धरून बसला.
     एक दिवस तर दुकानदारला कोल्हापुरीचा भयंकर राग आला. तिच्या नकारामुळे धंद्यावर परिणाम व्हायला लागला होता. त्याने विचार केला, तिला आता विकण्यापेक्षा अशीच फेकून देऊ.  आणि खरोखरच एक दिवस त्याने रात्री दुकान बंद करताना तिला जोडीदारीणसह आपल्या दुकानाच्या पाठीमागच्या रस्त्यावर फेकून दिले आणि गपगुमानं घरी निघून गेला.
     रात्री त्याला छान झोप लागली. आपण एका मोठ्या संकटातून सुटलो, याचा त्याला आनंद झाला होता. दुसर्‍यादिवशी दुकानदार आपल्या दुकानात बसला असताना त्याचा कवी मित्र विलासराव आला. "काय रे, निवांत बसला आहेस. कसला रे तू रसहीन माणूस. काही वाचत तरी जा."
     " ये, विलास ये!  पण बाबा तुझा तो रसिकतेचा डोस तेवढा देऊन नकोस." दुकानदार
     "बरं बाबा, राहिलं..." असे म्हणून त्याने आपल्या शबनमी बॅगेतून एक जोड चपल बाहेर काढली.  त्या पाहून   दुकानदार उडालाच." काल मागच्या रस्त्याने  निघालो होतो, तर या नव्या कोर्‍या चपला दिसल्या. वाटलं, चोरांनी लांबवताना पडल्या असतील तुझ्या दुकानातून. हे घे ठेव." असे म्हणत कवी महाशयाने चपला समोर ठेवल्या आणि   उत्तरादाखल आभाराची  अपेक्षा न करताच उठून निघून गेला.
     दुकानदाराचं आता डोकं ठणकायला लागलं. त्याने कविमहाशयांना हजारदा कोसत राहिला.
     "नमस्कार, मामा" अचानक दुकानदाराचे ध्यान भंगले.
     "अरे, तू कधी आलास? ये, ये आत बस."
     " हे काय, आताच येतो आहे. सगळं काही ठीक आहे ना?" बसता बसताच भाचाने विचारलं. यानंतर दोघांमध्ये गप्पा रंगल्या. दोन दिवस थांबल्यानंतर भाचा जायला निघाला तेव्हा दुकानदारने संधीचा फायदा घेण्याचा विचार केला. तो एक जोड चप्पल आपल्या भाच्याला देत म्हणाला, " ही जोड घे आणि आपल्या वडिलांना दे. त्यांना माझा नमस्कार सांग."
     चपलांसह भाच्याने निरोप घेतला तेव्हा त्याने सुटकेचा नि:श्वास टाकला.
     एक दिवस दुकानदारचा मेहुणा त्याला भेटायला आला. थोडा वेळ इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्या.  जाताना मेव्हण्याने आपल्या पिशवीतून एक जोड चप्पल बाहेर काढली आणि ती देत म्हणाला," भाऊजी, ही घ्या, तुमच्यासाठी खास कोल्हापुरी आणली आहे." चपलाचे खोके पाहून त्याला फार आनंद झाला. मनातल्या मनात म्हणाला, बरं झालं, एक जोड गेली आणि एक जोड आली.आपलं काही नुकसान झालं नाही"
     मेहुणा गेल्यावर त्याने खोके उघडले तर तीच ती कोल्हापुरी. तो हादरलाच! त्याला दरदरून घाम फुटला. ती हसत म्हणाली," काय शेठ! मी म्हणत होते ना की इथून जाणार नाही. इथली थंड हवा मला आवडते. "
     "तुझा मेव्हणा तुझ्या भाच्याकडे गेला होता. त्याच्या वडिलाने मला तुझ्या मेव्हण्याकडे सुपूर्द केलं... ही ही ही "
     "कोल्हापुरी!" ओरड्त दुकानदार तिथेच बेशुद्ध पडला.                                      

No comments:

Post a Comment