Tuesday, August 18, 2015

बालकथा : मोठ्यांचा सल्ला

      सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचे गोष्ट असावी. विजयनगर राज्यात एक विचित्र प्रथा होती, त्यानुसार राज्यातली एखादी व्यक्ती साठ वर्षांची झाली असेल तर त्याला  जंगलात नेऊन सोडण्यात येई. समाजात फक्त सशक्त आणि युवा वर्गच राहावा, असा या मागचा उद्देश होता. त्याच नगरातली  रामनाथ नावाचा एक व्यक्ती  लवकरच आपली साठी पार करणार होती. रामनाथच्या   मुलाचे म्हणजे  रमाकांतचे  त्याच्या वडिलांवर  जिवापाड प्रेम होते. त्यामुळे अन्य वृद्धांप्रमाणे आपल्याही  वडिलांना   जंगलात सोडून येण्याविषयी मन कचरत होते. त्यांची सेवा करून पुण्य  मिळवायचे सोडून त्यांना जंगलात मृत्यूच्या दाढेत लोटून पाप पदरात पाडून घ्यायला, तो तयार नव्हता.  शेवटी त्याने आपल्या वडिलांना जंगलात  न  धाडता  आपल्या तळघरात लपवून ठेवले. तो त्यांची सर्व प्रकारची काळजी घेत राहिला.  त्यांच्यासाठी सगळ्या  सोयी-सुविधा त्याने तळघरात उपलब्ध केल्या. आणि त्यांच्या सल्ल्याने प्रपंच चालवू लागला.
      एकदा नगरात  एका उत्सवाच्यानिमिताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अशी एक स्पर्धा आयोजलेली होती की, सर्वात  अगोदर सूर्य  किरणे  पाहणार्‍याला मोठे बक्षीस ठेवण्यात आले होते. नगरीतल्या तरुण मंडळाने  मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदवला होता. रमाकांतलाही यात भाग घ्यावा, असे वाटले. त्यामुळे त्याने आपल्या वडिलांना स्पर्धेविषयी सांगितले. त्यांनी त्याला स्पर्धेत हमखास भाग घ्यायला सांगितलेच शिवाय म्हणाले, मुला, ज्या ठिकाणी सूर्याच्या प्रकाश किरणांची प्रतीक्षा केली जाईल, त्याठिकाणी सगळे पूर्व दिशेला पाहात राहतील. मात्र, तू तसे न करता त्याच्या उलट म्हणजे पश्‍चिम दिशेला सर्वदूर असलेल्या डोंगरमाथ्यांवर  लक्ष ठेव. तू नक्की स्पर्धा जिंकशील.
      रमाकांतने तसेच केले आणि स्पर्धाही  जिंकली. सगळे चकीत झाले. मात्र लोकांना वाटले की, रमाकांतला कोणी तरी सल्ला दिल्याने त्याने स्पर्धा जिंकली. शेवटी काही  लोकांनी त्याला पश्‍चिम दिशेला पाहायचा सल्ला कोणी दिला, हे   विचारले. रमाकांतने सत्य काय आहे, ते निर्भीडपणे सांगून टाकले. आणि आपले वडील आपल्या तळघरात असल्याचे  सांगताना त्याने  वेळोवेळी  वडिलांचा मोलाचा सल्ला मिळत आला आहे, असेही तो म्हणाला. आता लोकांच्या लक्षात आले की, घरात वडीलधार्‍या माणसांची मोठी गरज आहे. त्यांचा सन्मान केला पाहिजे व त्याच्या अनुभवाचा लाभ उठवला पाहिजे. ही हकिगत राजाच्या कानांवर गेली. त्यालाही आपली चूक उमगली. त्याने ही प्रथा तात्काळ बंद करून टाकली.
 

No comments:

Post a Comment