Tuesday, August 18, 2015

भेटवस्तू

   मुलांविषयी महात्मा गांधीजींच्या मनात विशेष जिव्हाळा होता. हा प्रसंग ते मुंबईत राहात असतानाचा आहे. त्यांच्यासोबत राहणारी मम्डळी कुठल्या तरी सभेला जाण्याच्या गडबडीत होते. पण गांधीजी मात्र काही तरी शोधण्यात गुंतले होते. सभेला उशीर होत होता.काका कालेलकरांनी विचारलं, बापू, तुम्ही काय शोधता आहात? गांधीजी म्हणाले, पेन्सिल शोधतोय. काका कालेलकर त्यांना एक नवीन पेन्सिल देत म्हणाले, ही घ्या पेन्सिल आणि चला बरं गाडीची वेळ होतेय. गांधीजींनी ती पेन्सिल घेतली नाही. उलट ते लहान मुलासारखा हट्ट करत म्हणाले, मला तीच पेन्सिल हवी आहे.
      काकांनी विचारलं, त्या पेन्सिलमध्ये असं काय आहे, ज्यात तुमचा इतका जीव अडकला आहे. गांधीजी म्हणाले, ती फक्त एक पेन्सिल नाही तर त्यात कुणाचं तरी प्रेम आहे. एका छोट्या दोस्तानं मोठ्या प्रेमानं ते मला भेट म्हणून दिलं होतं. मग ती अशी कुठे तरी कशी टाकू बरं!
      मग दोघेही ती पेन्सिल शोधू लागले. थोड्या वेळाने पेन्सिल सापडली. ती एवढीशीच बारीक उरली होती. पण तरीही ती पेन्सिल गांधीजी टाकू इच्छित नव्हते. कुणी तरी प्रेमाने दिलेली वस्तू अशी कुठे तरी टाकून देणं, म्हणजे देणार्‍याचा अपमान केल्यासारखं आहे, असे त्यांना वाटे.                                                                         

No comments:

Post a Comment