Tuesday, August 18, 2015

बोधकथा : मानव सेवा हिच खरी ईश्‍वर सेवा

     दक्षिणी राज्य तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यातल्या शहरापासून जवळपास तीस मैलावर तिरुचुजही नावाचं गाव आहे. महर्षी रमण यांचा जन्म या गावात 30 डिसेंबर 1879 ला झाला. त्यांचं बालपणाचं नाव व्यंकट. यांच्या वडिलांचं नाव सुंदरम अय्यर तर आईचं नाव अलगम्माल. त्यांचे वडील नामांकित वकिल आणि दिलदार मनाचे व्यक्ती होते. त्यामुळेच वेंकट रमण यांचंही मनही परोपकारी होतं. पुढे व्यंकट रमण महर्षी रमण म्हणून विख्यात झाले.
      युवावस्थामध्येच महर्षी रमण यांची कीर्ती दूर दूरवर पसरली होती. त्यांनी प्रत्यक्ष ईश्‍वरदर्शन घेतलं आहे, अशी लोकांमध्ये त्यांच्याबाबतीत चर्चा होती. त्यावेळी देशात इंग्रजांचं शासन  होतं. ही गोष्ट इंग्रजांपर्यंत पोहचली. त्यांना विश्‍वास वाटला नाही. काही इंग्रज महर्षी रमणविषयी अधिक जाणून घेण्यास उत्सुक होते. एक दिवस ते लोक महर्षींना भेटायला आले.
      “ आम्ही ऐकलंय की, आपण परमेश्‍वराचं दर्शन घेतलं आहे.” त्यातला एका इंग्रजानं विचारलं. इतक्यात दुसरा इंग्रज म्हणाला,” आम्ही  असम्ही  ऐकलंय की आपण त्यांना रोज भेटता?”
      त्यांचं बोलणं ऐकूण महर्षी हसले. मग  शांत स्वरात म्हणाले, “ हे खरंय की, मी ईश्‍वर दर्शन घेतलं आहे आणि हेदेखील खरंय की, मी रोज ईश्‍वराशी भेटतो.”
      “ तर मग आपण आम्हालादेखील ईश्‍वराशी भेट घालून द्यालं ना? “ सगळे इंग्रज एका स्वरात म्हणाले.
      महर्षी हसत म्हणाले, “ जर तुम्ही उद्या सकाळी माझ्याकडे आला तर, मी तुमची ईश्‍वराशी भेट घालून देईन.”
      महर्षींचे आश्‍वासन घेऊन सगळे इंग्रज निघून गेले. ते आतुरतेने उद्याची वाट पाहू लागले. रात्रभर त्यांना झोपदेखील आली नाही. दुसर्‍यादिवशी सकाळीच ते महर्षींकडे पोहचले. इंग्रजांना पाहून महर्षी म्हणाले,” तुम्हाला परमेश्‍वराला भेटायचं आहे, माझ्या मागे या.” असे म्हणून महर्षी निघाले. महर्षी पुढे पुढे, इंग्रज मागे मागे निघाले. काही अंतर चालून गेल्यावर महर्षी एका झोपडीसमोर थांबले. इंग्रजांना म्हणाले, “ या झोपडीत ईश्‍वर आहे. त्यांची मी रोज भेट घेतो. तुम्हाला भेट घ्यायची असेल तर त्यांना आत जाऊन भेटू शकता.”
      इंग्रजांना वाटलं की महर्षी आपल्याशी कपटीपणाने वागत आहेत. लगेच ते सावाध झाले. हळूहळू ते झोपडीच्या दिशेने निघाले आणि तितक्याच सावधपणे त्यांनी झोपडीचे दार लोटले. आणि काय आश्‍चर्य ! ते आतले दृश्य पाहतच राहिले. झोपडीत एक अत्यंत वृद्ध दांम्पत्य अंथरुणावर  झोपले होते. ते फारच आजारी होते. त्यांच्या शरीरावर जखमा होत्या. ते वेदनेने कण्हत होते. महर्षी यांनी त्या दोघांना पहिल्यांदा आंघोळ घातली. मग त्यांच्या जखमांवर औषध लावलं. नंतर त्यांनी वृद्ध दांम्पत्यांसाठी जेवण तयार करायला घेतलं. स्वयंपाक करता करता ते इंग्रजांना म्हणाले, “ आपण पाहिलंत, मी परमेश्‍वराची सेवा करतो आहे. यांना मी रोज भेटतो.”
      इंग्रज अगदी मुग्ध हो ऊन सारं दृश्य पाहात होते. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. त्यांना समजून चुकलं की, ईश्‍वर तर माणसांमध्येच असतो.  आणि मानवसेव आ म्हणजेच ईश्‍वरसेवा आहे. 

No comments:

Post a Comment