Tuesday, August 18, 2015

प्रेरक प्रसंग : सत्यनिष्ठा

     महात्मा गांधीजी अगदी लहानपणापासूनच सत्यवचनी होती. खोटे बोलणे त्यांच्या स्वभावात नव्हते. त्यांना  असत्याचा तिटकारा होता. यासंबंधातला हा एक प्रेरक प्रसंग. शालेय वयात मोहनदास राजकोट इथल्या अल्फ्रेड हायस्कूलमध्ये नववीच्या इयत्तेत शिकत होते. एक दिवस शाळा तपासायला जिल्हा शिक्षण विभागाचे अधिकारी शाळेत आले. त्यांनी नववीच्या वर्गात गेल्यावर विद्यार्थ्यांना श्रुतलेखनाच्या स्वरुपात लिहायला इंग्रजी विषयाचे पाच शब्द दिले.त्यातला एक शब्द होता, केटल! शाळकरी मोहनदास तो शब्द बिनचूक लिहू शकला नाही.  शेजारी बसलेल्या त्याच्या वर्गमित्राने ते पाहिले आणि त्याला आपले बघून लिहायला खुणावले. पण मोहनदासने त्याचे बघून लिहिले नाही.
      वर्गातल्या सर्व मुलांनी पाचीच्या पाची शब्द बरोबर लिहिले, मात्र मोहनदासचा एक शब्द चुकला. त्यामुळे त्याला पैकीच्या पैकी मार्क मिळाले नाहीत. अधिकारी गेल्यानंतर तो वर्गमित्र मोहनदासला म्हणाला, मी तुला माझे बघून लिहायला खुणावले होते, पण तू का लिहिलं नाहीस? त्यामुळे तुला पैकीच्या पैकी मार्कापासून वंचित राहावे लागले.
      मोहनदास निश्‍चयाने आणि तितक्याच आत्मविश्‍वासपूर्वक म्हणाला, मी असं केलं असतं तर धोका दिल्यासारखं आणि चोरी केल्यासारखं झालं असतं. आणि असा हीन प्रकार मी कदापी करणार नाही.जर तो शब्द मला माहित नाही, तो  मी  कुणाचे तरी बघून का लिहावा? माझ्यातला कमीपणा मी का लपवावा? माहात्मा गांधीजी  पुढे आपल्या आयुष्यात  सदैव सत्यनिष्ठचे आचरण करीत राहिले.       

No comments:

Post a Comment