Wednesday, April 4, 2012

असा एकचि श्री हनुमान

      आचार्य विनोबा भावे यांनी श्री मारुतीच्या दोन रुपांचे मोठे सुंदर वर्णन केले आहे. वीर मारुती आणि दास मारुती. दुष्टांच्या पुढे मारुती हा वीरवर, शूरवर आहे, पण सज्जनांच्या पुढे तो नम्र आहे. मारुती हा पौरुषाचा, बलसंपन्नतेचा जणू अवतारच होय. त्याच्या या पराक्रमाचे पोवाडे गाता यावेत म्हणूनच केवळ श्री समर्थ रामदास स्वामींनी सुंदरकांड आणि युद्धकांड हे रामायणातील भाग मराठीत आणले. हनुमतांच्या बलोपासनेचा आदर्श समर्थांनी महाराष्ट्रासमोर ठेवला. त्यामुळे ठायी ठायी आखाडे, तालमी, हनुमंताच्या मूर्ती निर्माण झाल्या. महाराष्ट्र बलोपासक झाला. समर्थ म्हणतात,' कोण पुसे अशक्ताला? रोगीसे बराडी दिले' म्हणून समर्थांनी बलासाठी, शक्तीसाठी हनुमम्ताची उपासना सांगितली. महाराष्ट्र वाल्मिकी गदिमा हनुमम्ताचे हार सुरेख वर्णन करतात. ते म्हणतात,' असा हा एकाकी श्री हनुमान' हा गरुडाहून बलवान आहे. हा अंजनीच्या बळाला आत्मज, निजशक्तीने ताडील दिग्गज , बलशाळा धीमान|
     हनुमान असा बलोपासक, पराक्रमी आहे की त्याच्या शक्तीची श्री सीतादेवीने स्तुती करताच अंजनीमाता म्हणजे, मी हनुमंताचा धिक्कारच करते. कारण हनुमान असताना रामास रावणवधाचा त्रास पडला, ही काही चांगली गोष्ट नाही. वीरमातेच्या ठायी वीरपुत्र निर्माण होतात म्हणूनच महाराष्ट्रात महिला अंजनीगीत , भीमरुपी ही स्तोत्रे नित्य म्हणत असत. मारुती किती पराक्रमी आहे? तर रामायणात ७०-७५ च्या वर विशेषणे हे त्याच्या बलाचे वर्णन करतात. हनुमंताने अनेकांच्या बलाचे गर्वहरण केलेले आहे. आणि बलाबरोबरच तो महाबुद्धीमानीही आहे, ही बाब अगदी लक्षात घेतली पाहिजे. रामायणात हनुमंताच्या शिक्षणाचे वर्णन आहे. त्याच्या संस्कृत-प्राकृत भाषापटुत्वाचे वर्णन आहे. तो मोठा राजकारणपटू महणजे राजनीतीज्ञ आहे. बुद्धीमान म्हणूनही त्याची अनेक विशेषणे आली आहेत. मारुतीस संगीततशास्त्राचा एक प्रमुख प्रवर्तक मानलेले आहे. ( संगीत पारिजात संगीतरत्नाकर) हनुमंताला व्याकरणाचा नववा लेखक मानलेले आहे. हनुमंताच्या विलक्षण अशा रामभक्तीमुळे स्वतः श्री राम त्याच्याविषयी अत्यंत कृतज्ञ आहेत. तो रामभक्त, देशभक्त आहे. असुरांचा नाश करून दक्षिण भारत , उत्तर भारत हा असुरसंकटमुक्त झाला आहे. सर्व प्रमुख संतांनी श्री हनुमंताचे वर्णन केलेले आहे. श्री नामदेव महारज म्हणतात,' मारुती प्रकटला, नामा म्हणे म्या वंदिला| महान भगवद्भक्त श्री तुकाराम महाराजही भक्तीच्या वाटा हनुमंतासच विचारत आहेत. आणि हनुमान आणि रामदास यांचे नाते तर अतूटच आहे.
     आधुनिक काळात स्वामी विवेकानंदाम्वर श्री हनुमंताचा फार मोठा प्रभाव पडलेला आहे. ते म्हणतात,' त्या महावीराचे, त्या हनुमंताचे चरित्रच आता तुम्हाला आदर्शरुप मानले पाहिजे. प्रभू रामचंद्राच्या आज्ञेने त्याने महासागर ओलांडला. जीवनमरणाची तमा त्याने कधीच बाळगली नाही. तो पूर्ण जितेंद्रिय आणि विलक्षण बुद्धिमान होता, हनुमान जसा सेवाव्रताच्या आदर्शाचे मूर्तिमंत प्रतीक आहे, तसेच त्याच्या ठायी सार्‍या जगाचा थरकाप उडविणारे सिंहबलसुद्धा आहे.
प्रसिद्ध लेखक रा. चिं. ढेरे, श्री. य. गो. नित्सुरे यांनी केलेली हनुमंताची वर्णने वाचावी. सध्या कुस्ती हा क्रीडा प्रकार आहे. कुस्तीच्या मुख्य चार प्रकारात 'हनुमंती कुस्ती' हीच श्रेष्ठ मानली जाते. भारतातल्या पहिल्या क्रांतिकारकांपैकी एक म्हणजे वीर दामोदरपंत चाफेकर हे निस्सीम मारुतीभक्त होते. त्यांच्याचसाठी पोलिस मुख्यालयात ह्नुमंताची प्रतिष्ठापना करण्यात आली हाच तो फरासखान्यातील प्रख्यात चाफेकर मारुती होय.

No comments:

Post a Comment