Tuesday, July 23, 2013

रस्त्यांवरच्या अपघातांमुळे मरण झाले स्वस्त

    
     गाणगापूरच्या श्री दत्तात्रयाचे दर्शन येऊन परत असताना विजापूर-चिक्क शिंदगी हाय-वे वर एका वळणावर झालेल्या भीषण अपघातात सांगली जिल्ह्यातल्या जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यातल्या आठरा भाविकांवर काळाने घाला घातला. क्रूझर आणि ट्रॅव्हल बस यांच्यात ही समोरासमोर धडक झाली होती. ही धडक इतकी भीषण होती की, क्रूझरमधील २३ पैकी १८ भाविक जागीच ठार झाले. त्यांच्या शरीराचा आणि चेहर्‍याचा अगदी चेंदामेंदा झाला होता. मृतदेह ओळखू येत नव्हते, इतकी भयानकता घटना स्थळावर दिसत होती. वाहनांचा वेग आणि तो नियंत्रणात आणता न आल्याने हा भीषण अपघात घडला. मात्र एका वाहनात किती माणसे कोंबून न्यायची याला काही मर्यादा आहेत. वाहनचालकासह तब्बल २४ माणसे क्रूझरमधून प्रवास करत होती.
     या हृदयद्रावक आणि भीषण घटनेने पून्हा एकदा रस्ते अपघाताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अधिक पैसा मिळवण्याच्या नादात खासगी वाहन मालक-चालक अक्षरशः जनावरांसारखे माणसांना गाडीत कोंबून प्रवास करीत असतात. शिवाय वेगाने नेल्यास आणखी एखादी ट्रीप करता येते, या आणखी एका लालसेपोटी वाहने वेगाने चालवतात. एकूण काय , तर लोकांना स्वतःच्या, दुसर्‍याच्या जीवापेक्षा पैसा प्यारा झाला आहे. त्याच्यासाठी 'वाट्टेल ते' करण्याची तयारी आज खासगी वाहतूक करणारे तयार आहेत.
     अशा घटना  माणसाचे मरण स्वस्त असल्याचे  सांगताहेतमाणसाच्या अनमोल आयुष्याची कदर कोणालाच राहिली नाही. ना वाहनमालक अथवा चालकाला ना शासन-प्रशासनाला! लोभापायी ही यंत्रणा बिघडत चालली आहे.  " मनावर ब्रेक, उत्तम ब्रेक" अथवा "अति घाई जीव नेई' अशा सूचनांचा भडीमार  असूनही ना चालक त्याकडे लक्ष देतो, ना प्रवाशी. सगळे वेळेला मागे टाकत पैशाच्या मागे लागले आहेत. अशा वाहनातून प्रवास करणारे प्रवाशीदेखील एसटीपेक्षा कमी पैसे द्यावे लागतात, थोडी फार आपली सोय होते, म्हणून खासगी वाहनांचा पर्याय निवडतात. गाणगापूर देवदर्शनाला गेलेले हे सगळे भाविक-प्रवाशी जत व कवठेमहांकाळ तालुक्यातल्या विविध ग्रामीण भागातून आलेले होते. याच मार्गावर नियमितपणे वाहतूक करणार्‍या वाहनाचा पर्याय त्यांनी निवडताना आपली सोयच पाहिली होती. मात्र इतक्या अक्षरशः कोंबलेल्या अवस्थेत देवाच्या दर्शनाची आस घेतलेल्या या भाविकांना चार पैसे कमी देता येतील आणि जागोजागी गाड्या बदलता येणार नाहीत, आणि वेळेत परत येऊयाचेच समाधान होते.
      पण वेळेवर मात करायची ही कसली  जीवघेणी स्पर्धा म्हणायचीकसला हा बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणा म्हणायचा? ज्या जीवाच्या सुखासाठी धावधाव धावायचं आणि तोच जीव असा किड्यामुंग्यांसारखा सहज मृत्यूच्या हवाली करायचा याला काय म्हणायचे?  याचा  विचार का करत  नाही? सोमवारी झालेल्या या अपघातातील क्रूझर चालकाचा आपल्या वाहनावरचा ताबाच सुटला होता. समोरून येणारी ट्रॅव्हल बसदेखील वेगात होती.  खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांही  आपसातील स्पर्धांमुळे वेगावर नियंत्रण ठेवायला तयार नसतात.  त्यात बेदरकार चालकांच्या निष्काळजीपणा अशा अपघाताला कारणीभूत ठरतात.   
    अलिकडे रस्त्यांवरील वाढत्या अपघातांच्या भीषण घटना आपल्याकडे मोठा चिंतेचा विषय झाला आहे. माणसाचे मरण स्वस्त असल्याचे या घटना सांगताहेत. असे अपघात फक्त वाहन चालक-मालकाच्या किंवा प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे होतात, असे नाही. याला   शासन, वाहनमालक, चालक आणि प्रवाशी याचबरोबर आणखीही काहींच्या अप्रत्यक्ष चुका आणि निष्काळजीपणा कारणीभूत  आहेत. अर्थात केवळ या अपघातामध्ये नव्हे तर घडणार्या प्रत्येक अपघाताला अनेकांचा निष्काळजीपणा जबाबदार असतो. चालकांचा निष्काळजीपणा, वाहनांचा प्रचंड वेग, वाहनांच्या देखभालीकडे दुर्लक्ष, आपल्याकडील सुमार रस्ते, डागडुजीबद्दल निष्काळजीपणा असे अपघात घडतात आणि यामुळे अशा  अनेक निष्पापांचे   बळी जाताहेत.
    आपल्या देशातल्या  सुमार रस्त्यांचा, डागडुजीबद्दलच्या निष्काळजीपणाचा मोठा प्रश्न ऐरणीवर आहे.  महामार्गावरील खड्डे निष्पाप प्रवाशांच्या मृत्यूचे निमंत्रक बनले आहेत. हे खड्डे बुजवण्याचे काम कधीच वेळेवर होत नाही. रस्त्यांच्या कामांच्या दर्जेबाबत तर विचारायची सोयच राहिलेली नाही. एक पावसाळा सुखाने जात नाही. लगेच खड्डे पडलेच म्हणून समजा. रस्ते म्हणजे देशांची वाहिनी आहे. पण त्याकडे कोणीच गांभीर्याने पाहात नाही. टक्केवारीला सोकावलेले लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यामुळे ठेकेदार आपल्या सोयीने रस्त्यांची कामे करतो  त्याला रस्त्याच्या क्वालिटीशी काही देणे-घेणे नसते. त्याचा परिणाम म्हणून जागोजागी खड्डे दिसतात. बरे खड्डे पडले ते पडले,  ते बुजवण्याचे कामही वेळेवर होत नाही. परिणाम काय तर हे असले अपघात दिसत राहतात.
     वाहन चालवण्याला एक मर्यादा आहे. शासनानेही त्याला मर्यादा आखून दिली आहे. साधारणतः द्रुतगती महामार्गावर ८० कि.मी. वेगमर्यादा आहे. पण पाळतो कोण? अशा वेगाचे, कायद्याचे उल्लंघन सतत होत असते. त्याला आवर कधी घातल्याचे ऐकिवात नाही. माणसाने आजच्या घडीला आपल्यापेक्षा वेळेला अधिक महत्त्व दिले आहे. कामाला दिवस पुरत नाही म्हणून रात्रीचाही धावधाव धावतो आहे. अलिकडच्या काळात रात्रीच्या प्रवासाला निघण्याचा ओढा कमालीचा  वाढला आहे. आपल्या देशात सकाळी ६ ते रात्री ९ दरम्यान रस्त्यावर जी वाहतूक असते, त्यापेक्षा कमी वाहतूक रात्री असते. मात्र तरीही रात्रीचा अपघात हा दिवसाच्या अपघातापेक्षा आठपटीने जास्त आहे. रस्ता मोकळा आहे, म्हणून चालक भरधाव वाहने चालवित असतात. रात्रीचा काळ वास्तविक निसर्गनियमाने झोपेसाठी राखीव असतो. पण माणूस ही निसर्ग चक्रे आपल्या सोयीनुसार फिरवीत आहेमात्र शरीर आणि मन त्याला साथ द्यायला हवे ना! साथ मिळाली नाही तर अनर्थ घडतोच.
     एक तर अलिकडच्या वीस वर्षात वाहनांची संख्या बेसुमार वाढली आहे. वेळेच्या पुढे जाण्याच्या घाईत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला फाटा दिल्याने रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे. गरिबांच्या देशात ही वाहनांची गर्दी सामान्यांच्या मुळावरच उठली आहे. खासगी वाहतूक, बेकायदा वाहतूक वाढली आहे. मर्यादेपेक्षा अधिक माणसे गाडीत अक्षरशः कोंबली जातात. चालकाला वाहन नीट चालवता येत नाही, तरीही गर्दी केली जातेच. चार पैसे जास्त मिळवन्याच्या नादात सगळेच त्याच्या मागे लागले आहेत. अशा वाहतुकीला आळा घालणारी पोलिसी यंत्रणासुद्धा चिरीमिरीसाठी अभय देत राहते.  सगळी दुनिया पैसा खाते. मग मी थोडा खाल्ला म्हणून थोडच आभाळ कोसळणार आहे, अशी या यंत्रणेची  मानसिकता बनली आहे.
     आपल्याकडे आपल्या जीवाची हमी घेणारे  एस.टी. महामंडळ आहे, मात्र या महामंडळांकडील गाड्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. शिवाय सीमाभागात वैगेरे या वाहनांना मर्यादा पडतात. माणसांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात  म्हणावी अशी महामंडळाची वाहतूक यंत्रणा पुरेशी नाही. त्याचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे एकमेकाच्या पायावर पाय ठेऊन , दाटीवाटीने आणि लोंबकळत लोक प्रवास करतात. असा प्रवास नको म्हणून  उच्चभ्रू, मध्यमवर्गीय व गरजू प्रवासी खासगी वाहतूकीकडे आपसूकच धाव घेतातखासगी वाहन मालक अशा  प्रवाशांच्या मानसिकतेचा बरोबर फायदा घेतात आणि  त्यांना हवे तसे लुटण्याचा सतत प्रयत्न करतातत्यात खासगी वाहतूकदारांमध्येसुद्दा स्पर्धा प्रचंड वाढली आहे. तू पुढे की मी या नादात आपल्यासह दुसर्याचा जीव धोक्यात घालत आहेत. पैसा मिळवण्याच्या मोहापायी वाहनमालक वाहन फक्त हाकीत असतात. त्याची  देखभाल करत नाहीत. जी रोजीरोटी देते, तिची काळजी घ्यायला हवी, देखभाल करायला हवी. परंतु तसे करताना दिसत नाहीत. निष्काळजीपणा नडतो. . चालकांच्या शारीरिक, मानसिक व परिवहन क्षमतेकडेही काणाडोळा केला जातो.
    प्रवास सुखकर, सुरक्षित व्हावा, यासाठी कायदे करण्यात आले आहेत. त्याचे व्यवस्थितरित्या पालन केल्यास, वेळेपेक्षा जीव महत्त्वाचा मानल्यास आणि  वेळेवर पोहचण्यासाठी थोडे लवकर निघण्याची मानसिकता ठेवल्यास भीषण अपघात टाळता येतील. प्रवासादरम्यान चालकाने मद्यप्राशन करू नये, यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. आरटीओ व पोलिसांनी याबाबत दक्ष राहायला हवे. प्रवास सुखकर व्हावा, दळणवळण वाढावे म्हणून रस्ते बांधण्यात आले आहेत, त्यांची वेळचेवेळी दुरुस्ती व्हायला हवीपण विचारात घेतो कोण, असा प्रश्न आहे. ज्यांनी याची काळजी घ्यायला हवी, त्यांना तरी कुठे   सवड आहे?  त्यामुळे फक्त  धावधाव धावण्याच्या स्पर्धेत आजचे अपघात कालचे होऊन जाताहेत.

No comments:

Post a Comment