Friday, June 14, 2013

चोराच्या घरात चोरी

  
   एक चोर होता. त्याचे नाव होते करणकुमार. अनेक वर्ष तो चोरी करत आला
, पण एकदाही सापडला नाही. त्याला खूप वाटायचं, आपण हा धंदा सोडावा आणि मेहनतीचं काम करावं. पण हा त्याचा संकल्प दुस-या दिवसापर्यंतही टिकायचा नाही.
     एका रात्री करणकुमार चोरी करायला बाहेर पडला होता. एका घरात तो अगदी काळजीपूर्वक शिरला. खोलीत दिवा जळत होता. एक माणूस दु:खी मनाने मान खाली घालून चिंताग्रस्त बसला होता. त्याच्यासमोर देवाचा एक सोन्याचा मुकूट आणि दागदागिने पसरलेले होते. करणकुमार माघारी फिरणार, तोच आवाज आला, ‘‘मित्रा ये, आता परत चाललास कुठे? तू चोर ना! चोरी करण्याच्या उद्देशानेच आलास ना?’ करणकुमार जागच्या जागी थबकला. त्याला मोठं आश्चर्य वाटलं.
तो माणूस एखाद्या पाहुण्याचं स्वागत करावं, तशाप्रकारे बोलत होता. काहीसा घाबरलेला करणकुमार त्याच्याजवळ जाऊन खाली बसला. तो माणूस म्हणाला, ‘काय नाव तुझं? तुझ्यासारखाच मीदेखील चोर आहे. प्रत्येक वेळेला चोरी केल्यावर विचार करतो की, आता हा चोरीचा धंदा सोडावा. चोरी म्हणजे पाप, अधर्म. कष्टानं कुणी तरी मिळवतं आणि आपण त्याच्याकडून ते लुबाडून नेतो. त्याला अडचणीत टाकतो.’’
      करणकुमार म्हणाला, ‘‘माझं नाव करणकुमार. मित्रा, तू म्हणतोस ते खरं आहे. आपण आपल्या आणि घरच्यांच्या नजरेतून उतरलेले असतो. माझी बायको तर माझा तिरस्कार करते. चोरीच्या वस्तूंना स्पर्शदेखील करत नाही.’’ ‘‘माझं नाव श्रावणकुमार. जरा विचार कर, तो एक श्रावणकुमार होता, ज्याने आपल्या अंध माता-पित्यांची सेवा केली. त्यांना कावडीत बसवून तीर्थयात्रा घडवून आणली. आणि मी एक असा श्रावणकुमार, जो नालायक आणि अधर्मी. मी मेल्यावर मला नरकातदेखील जागा मिळणार नाही.’’
     ‘‘तू म्हणतोस ते बरोबर आहे, श्रावणकुमार. बरं, तू हे समोर काय घेऊन बसला आहेस? हा सोन्याचा मुकूट आणि ही आभूषणं?’’ करणकुमारने विचारलं. ‘‘अरे मित्रा, आज तर मी करंटेपणाचा कळस केला. मी एका मंदिरात गेलो होतो. तिथे देवाच्या मूर्तीवर सोन्याचे दागिने घातले होते. मी मंदिराच्या दाराला लावलेलं कुलूप तोडलं आणि हे सगळे दागिने चोरून घेऊन आलो. आता माझा आत्मा माझा धिक्कार करतो आहे. अरे, देवालाही सोडलं नाहीसहे शब्द घणासारखे माझ्या कानात आदळत आहेत. क्षणभरही माझं मन स्थिर नाही. आता तूच सांग, मी काय करू?’’ श्रावणकुमार दु:खी होऊन म्हणाला.
     करणकुमार म्हणाला, ‘‘माझ्या मते तू देवाची ही सगळी आभूषणं जिथे होती, तिथे ठेवून ये.’’
‘‘पण मला मूर्तीचा शृंगार करता येत नाही. पहिल्यासारखी आभूषणं जिथल्या तिथे कशी बरं चढवता येतील मला?’’ श्रावणकुमार म्हणाला.
     करणकुमार म्हणाला, ‘‘काळजी करू नकोस. मी या कामात तुला मदत करीन.’’
     दोघेही मुकूट आणि आभूषणं घेऊन मंदिराच्या दिशेने निघाले. मंदिरात पोहोचल्यावर दोघांनीही पाहिलं, पुजारी अजून झोपलेला होता. मंदिरातल्या आभूषणांची चोरी झाल्याची बातमी अजूनही कुणाला कळालेली नव्हती. करणकुमारच्या मदतीने श्रावणकुमारने देवाच्या मूर्तीवर मुकूट आणि इतर आभूषणं जशी होती तशी चढवली. दोघांनीही देवाला हात जोडले. आपल्या वाईट कामाबद्दल क्षमा मागितली आणि देवाला वचन दिलं की, आता यापुढे कधीही चोरी करणार नाही. कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीन.
     मंदिराबाहेर आल्यावर श्रावणकुमार म्हणाला, ‘माझ्यावर जे पापाचं ओझं होतं, ते आता दूर झालं आहे. आता मला खूप समाधान मिळतंय.’’‘‘मलादेखील फार बरं वाटतं आहे. कारण ही जी वाईट गोष्ट मी सोडू शकत नव्हतो, ती सोडायला माझं मन तयार झालं आहे. परमेश्वराने आपल्याला सद्बुद्धी दिली आहे. आता मी मेहनत करीन आणि भल्या कामासाठी वेळ देईन.’’
     ‘‘खरंच, प्रामाणिक माणूस म्हणून
     जगण्यात फार मोठा आनंद आहे.’’ असं म्हणून श्रावणकुमारने करणकुमारला अलिंगन दिलं. चोरीचा धंदा सोडून नवं जीवन जगण्याचा संकल्प करून दोघांनेही एकमेकांचा निरोप घेतला.
     त्यानंतर खरोखरच करणकुमार आणि श्रावणकुमार दोघांनी चोरीचा धंदा सोडून दिला आणि छोटा व्यवसाय सुरू केला. त्यांच्या मेहनतीमुळे आणि प्रामाणिक व्यवहारामुळे दोघांच्याही धंद्याला चांगली बरकत आली. लवकरच ते शहरातले एक प्रतिष्ठित आणि श्रीमंत व्यापारी बनले. आता त्यांना लोक शेठ करणकुमार आणि श्रावणकुमार म्हणून ओळखू लागले.

No comments:

Post a Comment