Sunday, June 9, 2013

अंधश्रद्धने केले नुकसान

   
 
संध्याकाळी बाबा ऑफिसमधून घरी आल्या आल्या आकाशने विचारलं, ‘बाबा, माझं पेन आणलंत?’ ‘हो, आणलंय’, असं म्हणत त्यांनी आपल्या बॅगेतून एक पेन काढलं आणि आकाशच्या हातात टेकवलं. पेन पाहताच आकाशचा चेहरा उतरला. तो म्हणाला, ‘हे काय हो बाबा, मी तुम्हाला निळ्या रंगाचं पेन आणायला सांगितलं होतं, तुम्ही हिरव्या रंगाचं आणलंत. निळा रंग यश देतो, माहीत नाही का तुम्हाला?’ त्यावर बाबा चकित होऊन म्हणाले, ‘हे कुणी सांगितलं तुला?’ ‘माझ्या वर्गातल्या नितीनने सांगितलं.

     हिरव्या रंगाच्या पेनने परीक्षा दिली तर चांगले गुण मिळत नाहीत!आकाशने उत्तर दिलं. आकाश, या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. हिरव्या-निळ्या रंगाने काही घडत नसतं. तू परीक्षेची चांगली तयारी केली असशील तर चांगलेच गुण मिळतील. बाबांनी समजावलं. पण आकाश ऐकायला तयार नव्हताच. तो बाबांकडे निळ्या रंगासाठी हट्ट धरून बसला. तेव्हा बाबा म्हणाले, ‘आता सगळी दुकानं बंद झाली असतील. आता कोठून आणणार निळ्या रंगाचं पेन?’
     पेन शोधता शोधता बरीच रात्र झाली. शेवटी एकदाचं निळ्या रंगाचं पेन मिळालं. अजून त्याला परीक्षेची तयारी करायची होती. पण त्याला झोप येऊ लागली. त्यामुळे त्याने आईला पहाटे पाच वाजता उठवायला सांगून तो झोपी गेला. पहाटे आईने त्याला उठवलं. तो बेडवरून खाली उतरत होता, तोच आईला शिक आली. तो पुन्हा बिछान्यावर जाऊन झोपला. आईने पुन्हा एकदा त्याला उठायला सांगितलं. आणि ती आपल्या कामाला निघून गेली. बाबांना तर त्याचा रागच आला.
     ते आकाशला म्हणाले, ‘आकाश, काल तू निळ्या पेनच्या भानगडीत अभ्यास केला नाहीस. आता उठतोस की नाही? साडेसहापर्यंतच तुला वेळ आहे.तेव्हा आकाश म्हणाला, ‘बाबा, नितीनने सांगितलंय की, कुठलंही काम सुरू करण्यापूर्वी कुणी शिकलं तर लगेच कामाला सुरुवात करायची नाही.बाबा म्हणाले, ‘अरेव्वा! आमचा आकाश तर चक्क अंधश्रद्धाळू बनला आहे. पण याच्याने तुझं नुकसानच होणार आहे.तरीही आकाश टाळत राहिला. दहा मिनिटांनंतरच तो अंथरुणातून उठला.
     परीक्षेच्या तयारीसाठी त्याच्याकडे फक्त साडेसहापर्यंतच वेळ होता. सात वाजता त्याची स्कूलबस यायची. काल रात्री निळ्या पेनाच्या शोधात आणि आज सकाळी शिकेच्या भानगडीत त्याची परीक्षेची तयारी काही म्हणावी तशी छान झाली नाही. त्यामुळे त्याला शाळेत जाण्यासाठी तयार व्हायलाही वेळ झाला. बाबा आणि आकाश रस्त्यावर येताच त्यांना एक मांजर आडवं गेलं. आकाशने बाबांना थांबवलं. एक मोटारसायकल पुढे गेल्यावर मग तो निघाला. स्कूलबस कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर येऊन थांबायची. पण आता तिथे ना गाडी होती ना मुलं! म्हणजे स्कूलबस कधीच निघून गेली होती. पण आकाशला तर शाळेत पोहोचणं आवश्यक होतं, कारण आज परीक्षा होती.
     एक रिक्षा आली. बाबांनी त्याला हाक मारली. दोघेही रिक्षात बसायला पुढे निघाले, तोच आकाश जागच्या जागी थांबला. बाबांनी विचारल्यावर आकाश म्हणाला, ‘बाबा, गाडीचा क्रमांक १३०१ आहे. तेरा हा अंक अशुभ असतो. या रिक्षाने गेलो तर परीक्षा चांगली जाणार नाही. आपण दुस-या रिक्षाने जाऊ या.
     आकाशचं बोलणं ऐकून बाबांना भलताच राग आला. ते म्हणाले, ‘तुझं डोकंबिकं फिरलंय का? कुठल्या अंधश्रद्धेच्या गोष्टी करतोयस तू? आत्ता तुला शाळेत पोहोचणं महत्त्वाचं आहे. चल, रिक्षात बस बघू. आधीच उशीर झाला आहे.पण आकाश आपल्या गोष्टीवर अडून राहिला. रिक्षावाल्याला दुसरं भाडं मिळालं आणि तो निघून गेला. ब-याच उशिराने एक रिक्षा आली. दोघे शाळेत पोहोचले.
     परीक्षा सुरू होऊन अर्धा तास झाला होता. आकाश वर्गात गेला. परीक्षा दिली आणि दुपारी शाळेतून घरी आला. त्याचा चेहरा उतरलेला होता. आई-बाबांनी त्याला विचारल्यावर त्याने पेपर खूपच कठीण गेल्याचं सांगितलं. तेव्हा बाबा म्हणाले, ‘बघितलसं, अंधश्रद्धेच्या आहारी गेलं की काय होतं ते! मी तुला अगोदरच सांगितलं होतं, असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नकोस!आई म्हणाली, ‘ठीक आहे. आता हात-पाय धुऊन घे. काही तरी खा आणि पुढच्या अभ्यासाच्या तयारीला लाग.
     आकाश हात-पाय धुण्यासाठी उठणार तोच, बाबांना शिक आली. बाबा म्हणाले, ‘आकाश, मला शिक आली. आता तू दहा मिनिटे असाच बसणार का? हात-पाय धुवायला जाणार नाहीस का?’ ‘नाही बाबा, आता मी या भानगडीत पडणार नाही. मला सगळं काही समजून चुकलं आहे. या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत.असं म्हणून आकाश अभ्यास करायला बसला

No comments:

Post a Comment