Thursday, September 10, 2015

धोक्याची घंटा

     ब्रिटनमधला हा सर्व्हे आपल्या सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. आपल्या देशात ज्या शिक्षणाचं मॉडेल स्वीकारलं जात आहे, त्याच्याबाबतीत खरोखरच पुनर्विचार व्हायला हवा. मुलांना आपल्या आजूबाजूच्या जगाची माहिती जाणून-समजून घेण्याची आवड निर्माण व्हायला हवी आपण ज्या पाश्‍चात्य देशांचे अनुकरण करायला निघालो आहोत, त्या देशांच्या मुलांचे ज्ञान ऐकल्या-वाचल्यानंतर गड्या आपला देशच बरा, असे क्षणभर वाटल्यावाचून राहत नाही. इंग्लंडमध्ये अलीकडेच एक सर्व्हे झाला. या सर्व्हेमध्ये मुलांना रोजच्या खाण्यात असणार्‍या फळांविषयी काही प्रश्‍न विचारण्यात आले. त्या प्रश्‍नांची त्यांनी दिलेली उत्तरे थक्क करणारी तर आहेतच. शिवाय त्या प्रगत म्हणवणार्‍या देशाची कीव करावी अशी वाटणारी आहे. स्ट्रॉबेरी फ्रिजमधून मिळते तर चॉकलेटस् झाडावर लगडतात अशी तिथल्या मुलांचे उत्तरे आहेत. इंग्लंडमधल्या मुलांना बहुतांश फळे ही झाडांवर नव्हे तर कारखान्यात तयार होतात, असे वाटते. यावरून त्यांचे परिसरातील ज्ञान किती सखोल (?) आहे याचा अंदाज येतो.
       प्रसिद्ध मफिन फर्मच्या ‘द फेबुलस बेकर्स’ने सहा ते दहा वयोगटातील मुलांचा सर्व्हे केला त्यात ही बाब उघड झाला आहे. सर्व्हेनुसार प्रत्येक दहापैकी एका मुलाला सफरचंद झाडावर लागत नाही असे वाटते. चारपैकी एका मुलाचा स्ट्रॉबेरी जमिनीखाली उगवते, असा समज आहे. मध गायीपासून मिळते, हे सांगणार्‍या या मुलांना केळी कुठे लगडतात याची माहितीच नाही. द्राक्षे वेलींवर नव्हे झाडावर लगडतात. हे दहापैकी एका मुलाचं उत्तर आहे. मुलांचा सगळ्यात अधिक संभ्रम दिसतो तो टरबुजाविषयी! पाण्यानं भरलेलं हे फळ जमिनीखाली, झाडावर आणि झुडुपांमध्ये लागतं, अशी इंग्लंडमधील मुलं सांगतात. सर्व्हे वाचल्यावर आपल्याला हसू येणं स्वाभाविक आहे. पण क्षणभर. अधिक विचार केल्यावर मात्र डोक्याचं दही व्हायला होतं. आपण कुठल्या प्रकारचं शिक्षण देत आहोत, असा प्रश्‍न पडतो. फळं कारखान्यात नाहीत तर झाडांवर लागतात. या साध्या गोष्टी माहीत नसाव्यात हे आश्‍चर्यकारकच आहे. ही तर्‍हा फक्त इंग्लंडमधील शिक्षणाची नाही तर आपल्या देशातल्या शिक्षणाची देखील हीच तर्‍हा आहे. मुलांना ग्लोबल बनवायच्या धुंदीत आपण त्यांना आसपासच्या गोष्टींपासून दूर नेत आहोत. ज्या प्रकारचं कथित कान्व्हेंटी शिक्षणाचं प्रचलन हिंदुस्थानात वाढत चाललं आहे. त्यामुळे आसपासची दुनिया जाणून समजून घेण्याच्या त्यांच्या संधीवर आपण कुर्‍हाड मारत आहोत. मुलगा सकाळी उठतो. बसने किंवा कारने शाळेला जातो. तिथे पाठ्यक्रमाशी झटत राहतो. घरी आल्यावर गृहपाठाच्या दबावाखाली वावरतो आणि उरलेला वेळ कॉम्प्युटर किंवा टीव्हीपुढे बसून घालवतो. शिक्षण पूर्ण करताना कुठली तरी एखादी डिग्री किंवा पुढे जास्तीत जास्त कुठलं तरी एखादं पॅकेज अशा बंदिस्त वातावरणात त्यानं जग समजून घेण्याचा प्रश्‍नच येत नाही. मुलांनादेखील त्याची आवश्यकता वाटत नाही. आई-वडिलांना त्यांची मुलं अमेरिकेतल्या राज्यांची नावं जाणतात, याचाच काय आनंद वाटतो. जगातला सर्वात मोठा धबधबा कोठे, मायकल जॅक्सनच्या जीवनात काय घडलं, असले ज्ञान त्याच्या डोक्यात भरवले जाते. मुलांच्या मनात जे ग्लोबल ज्ञान कोंबलं जात आहे, त्यानुसारच त्यांची स्वप्नाची दुनिया ग्लोबल होत चालली आहे. हे शिक्षण व्यवस्थेचे दुष्परिणामच म्हणावे लागतील. जस-जसा मुलगा उच्च शिक्षणाची पायरी चढायला लागतो, तस-तसा त्याला आपल्या देशाचा वीट यायला लागतो. आपल्या देशात त्याला उणिवा दिसायला लागतात आणि देशाबद्दल कमीपणा वाटायला लागतो. आपल्या देशातल्या सगळ्यात गोष्टींची त्याला दुर्गंधी यायला लागते. मग शेवटी त्याचं विमान अमेरिका, कॅनडा आदी देशाच्या दिशेनं टेक-अप घ्यायला लागतं. जे पेरलं आहे, तेच शेवटी उगवणार.
      ब्रिटनमधला हा सर्व्हे आपल्या सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. आपल्या देशात ज्या शिक्षणाचं मॉडेल स्वीकारलं जात आहे, त्याच्याबाबतीत खरोखरच पुनर्विचार व्हायला हवा. मुलांना आपल्या आजूबाजूच्या जगाची माहिती जाणून-समजून घेण्याची आवड निर्माण व्हायला हवी असं शिक्षण मिळायला हवं. मोबाईल फोनमुळे माणसांमधील अंतर वाढत चाललं आहे. तसं शिक्षण पद्धतीमुळे सभोवतालचा परिसर दूर होत चालला आहे. हे सगळं थांबवायचं असेल तर पहिल्यांदा परिसराचं ज्ञान आवश्यक आहे. चार भिंतीच्याबाहेर मुलाना काढायला हवं. आई-वडिलांनीदेखील कामातून थोडा वेळ काढून मुलांना शेत-शिवरात न्यावं. नद्या, तलावात, विहिरीत मनसोक्त डुंबायला लावावं. त्याची निसर्गाशी मैत्री घट्ट करावी. त्याचं मातीशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं की भारतमातेलाच काय, पण जैविक मातेलादेखील तो अंतर देणार नाही. - See more at: http://www.saamana.com/utsav/6/9/2015

No comments:

Post a Comment