Tuesday, January 31, 2023

प्रेम रक्षित : 'नाटु नाटु'मधून जगाला थिरकायला लावणारा दिग्दर्शक

भारतीय दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या चित्रपट 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटु नाटु' या लोकप्रिय गाण्याने जगभरात धुमाकूळ घातला आहे, त्यात सध्या त्याचा कोरिओग्राफर प्रेम रक्षित खूप चर्चेत आहे.'नाटु नाटु' या गाण्यात अभिनेते रामचरण आणि ज्युनियर एनटीआर या दोघांनी केलेल्या उत्कृष्ट नृत्याने या गाण्याच्या लोकप्रियतेत मोठा हातभार लावला आहे. यामुळेच चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते, गीतकार आणि संगीतकार यांच्यासोबतच नृत्य दिग्दर्शक प्रेम रक्षितही सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या या शानदार नृत्यदिग्दर्शनाने भारतीय चित्रपटसृष्टीचा सातासमुद्रापार डंका वाजवला आहे. या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे. आता या चित्रपटाला ऑस्करसाठी विविध श्रेणींमध्ये  नामांकन मिळाले आहे.

प्रेम रक्षित यांचा जन्म 14 डिसेंबर 1977 रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला. त्यांच्या कुटुंबात  आई-वडिलांशिवाय त्यांना एक लहान भाऊ आहे. त्यांच्या पत्नीचे नाव राजलक्ष्मी आणि मुलाचे नाव परीक्षित आहे. तेलुगू आणि तमिळ भाषेतील ७० हून अधिक चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शन करणाऱ्या प्रेम रक्षित यांचे कुटुंब एकेकाळी खूप श्रीमंत होते. त्यांचे वडील हिरे व्यापारी होते आणि आई गृहिणी. 1993 मध्ये, काही कारणांमुळे, त्यांच्या वडिलांना त्यांच्या कौटुंबिक व्यवसायातून वेगळे व्हावे लागले आणि तेथून त्यांच्या कुटुंबाचे वाईट दिवस सुरू झाले. कुटुंब चालवण्यासाठी वडिलांनी चित्रपटांमध्ये नृत्य दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली. प्रेम रक्षितदेखील एका शिंपीच्या दुकानात छोटी मोठी कामं करू लागला. प्रेम रक्षितच्या म्हणण्यानुसार, वडिलांच्या कमाईत घर चालवणे मुश्किल होते. 

त्यांचे वडील डान्स युनियन फेडरेशनचे सदस्य होते. कधी कुठे काम नाही मिळाल्यास ते खूप निराश व्हायचे. कुटुंबाच्या विवंचनेमुळे व्यथित होऊन त्यांनी एकदा आत्महत्या करण्याचाही विचार केला होता, कारण त्यांना वाटले की जर आपण आपला जीव दिला तर फेडरेशन नियमानुसार त्यांच्या कुटुंबाला 50,000 रुपये देईल, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाला  मोठी मदत होईल. रक्षित सांगतात की, आत्महत्या करण्याच्या उद्देशाने त्यांनी कोणाकडून तरी सायकल मागून घेतली आणि चेन्नईच्या मरीना बीचकडे निघाले, पण तिथे पोहोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की  ज्याची सायकल त्यांनी आणली होती ती व्यक्ती त्यांच्या कुटुंबाकडे सायकल मागायला गेले तर काय होईल? उधार घेतलेल्या सायकलने रक्षित यांना आत्महत्या करण्यापासून रोखले. जेव्हा रक्षित घरी पोहोचले तेव्हा त्याच्या वडिलांना सांगितले की त्यांना एका चित्रपटात बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम मिळाले आहे. 

2004 मध्ये  'विद्यार्थी' या  तेलुगू चित्रपटामधून त्यांनी नृत्य दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आणि 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या राजामौली यांच्या 'छत्रपती' चित्रपटाने त्यांना मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. 'विद्यार्थी' चित्रपटानंतर त्यांना फारसे काम मिळत नव्हते आणि अशा कष्टाच्या दिवसात त्यांनी राजामौली यांच्या मुलांना नृत्यही शिकवले. तोपर्यंत राजामौली यांना हे माहीत नव्हते की रक्षितने 'विदयार्थी' चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. एके दिवशी त्यांनी राजामौलींना सत्य सांगण्याचे धाडस केले. यानंतर राजामौली यांनी त्यांच्यावर 'छत्रपती' चित्रपटाच्या कोरिओग्राफीची जबाबदारी सोपवली. 'छत्रपती'मधून रक्षितच्या कामाचे सर्वत्र कौतुक होऊ लागले. पुढे अनेक चित्रपटांमध्ये नृत्य दिग्दर्शनाचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. 'छत्रपती'च्या माध्यमातून त्यांचे राजामौली यांच्याशी असलेले नाते आजतागायत कायम आहे. या दोघांच्या मेहनतीमुळेच आता त्यांना ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत आणले आहे. 

हे गाणं कोरियोग्राफ करण्यासाठी लागले दोन महिने लागले आणि शूटिंग पूर्ण व्हायला 20 दिवस लागले.  प्रेम सांगतात की, मी हे गाणं एक आव्हान म्हणून स्वीकारलं. खरंतर, एका स्टारसोबत काम करणं सोपं असतं पण मी या गाण्यात दोन सुपरस्टारसोबत काम केलं आहे. दोन सुरपरस्टार्सची डान्सिंग स्टाईल आणि एनर्जी वापरून गाण्याची कोरियोग्राफी करणं एक आव्हान होतं. या गाण्याच्या कोरियोग्राफीसाठी दोन महिने लागले. तुम्हाला जाणवेल की ते दोघं जेव्हा चालतात तेव्हा त्यांच्या चालीतील समानता, पर्फेक्शन यावर खूप काम करण्यात आलं आहे. दोघांसाठी 110 मूव्स तयार केल्या होत्या.  गाण्याच्या शूटींगविषयी ते सांगतात की. या गाण्याच्या शूटींगसाठी 20 दिवस लागले होते. तसेच 43 रीटेक्सनंतर शूटींग पूर्ण झालं.या 20 दिवसांमध्ये रिहर्सलसोबतच आम्ही गाण्याचं शूटींग पूर्ण केलं. कोरियोग्राफीसाठी 2 महिने लागले होते. जेव्हा राजामौली सर माझ्याकडे हे गाणं घेऊन आले तेव्हा मी घाबरलो होतो. दोन सुपरस्टार्सना एकाच वेळी नाचवणं सोपी गोष्ट नाही. माझ्यावर या गोष्टीचं प्रेशर होतं की दोन सुपरस्टार्सपैकी कुणीही एकमेकांपेक्षा कमी वाटायला नको. दोघांना इक्वल एनर्जीमध्ये दाखवणं हे माझं ध्येय होतं. या गाण्याचं शूटिंग युक्रेनमध्ये झालं आहे.

-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Sunday, January 29, 2023

जग्गुदादा ते जॅकी श्रॉफ

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1957 रोजी मुंबईतील वाळकेश्वर येथील तीन बत्ती परिसरात झाला. जॅकी आज 66 वर्षांचे होत आहेत. 80 च्या दशकात जॅकी अॅक्शन आणि रोमँटिक हिरो म्हणून ओळखले जात होते. जॅकी यांनी आतापर्यंत जवळपास 250 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र जॅकी यांच्या आयुष्याची गोष्ट ही कोणत्याही सिनेमाच्या कथेपेक्षा वेगळी नाही. चाळीत राहणारा टपोरी एक दिवस सुपरस्टार होईल याची कोणीच कल्पना केली नव्हती. 

जॅकी यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झालेला. असे म्हटले जाते की जॅकी यांनी आपल्या चाळीतील लोकांना नेहमीच मदत केली आणि म्हणूनच त्यांचे नाव जग्गू दादा ठेवण्यात आले. चाळीतले सगळे त्यांना याच नावाने हाक मारायचे. गरिबीमुळे जॅकींना अकरावीनंतर शिक्षण सोडून नोकरी शोधावी लागली. त्यांना स्वयंपाकाची खूप आवड होती, त्यामुळे ते ताज हॉटेलमध्ये नोकरीसाठी गेले होते पण तिथे त्यांना नोकरी मिळाली नाही. 

अनेक दिवस नोकरीच्या शोधात भटकल्यानंतर एक दिवस जॅकी बस स्टँडवर बसची वाट पाहत उभे होते, तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने त्यांची उंची पाहून, 'तुला मॉडेलिंगमध्ये रस असेल का?' असे विचारले. प्रत्युत्तरात जॅकी म्हणाले की, 'तुम्ही पैसे द्याल का?' जग्गू दादाहून जॅकी श्रॉफ होण्याचा प्रवास इथून सुरू झाला. अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर त्यांना सुभाष घई यांच्या 'हिरो' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला आणि जॅकी रातोरात सुपरस्टार झाले. 

आज जॅकी श्रॉफ  यांचे बॉलीवूडमधल्या निवडक अभिनेत्यांमध्ये नाव घेतले जाते.त्यांनी  आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांमध्ये आपलं वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. जॅकी श्रॉफने हिंदी चित्रपटांशिवाय गुजराती, तामिळ, बंगाली, मल्याळम, कन्नड, मराठी, पंजाबी आणि उडिसा अशा नऊ भाषेतल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. जॅकी श्रॉफचे मूळ नाव जयकिशन  काकूभाई श्रॉफ   आहे.  त्यांच्या वडिलांचे नाव काकूभाई श्रॉफ आणि आईचे नाव रिटा श्रॉफ आहे. 

 1986 मध्ये जॅकीला पुन्हा एकदा सुभाष घईंच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट दिलीप कुमार यांच्याच भोवतीच फिरत असला तरी प्रेक्षकांनी या चित्रपटातल्या जॅकीच्या कामाचे कौतुक केले.या चित्रपटातील जॅकी आणि अनिलकुमार यांच्या जोडीला बेहद पसंद केले.1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'काश' या चित्रपटाचा खास करून उल्लेख करावा लागेल. जॅकी केवळ मारधाड चित्रपटांमध्ये उठून  दिसतो, अशी काही लोकांची धारण होती. मात्र या चित्रपटात त्यांनी भावनिक शेडचे काम उत्तमरित्या केले. 1989 साल जॅकीसाठी महत्त्वपूर्ण राहिले. या सालात त्रिदेव, राम लखन आणि परिंदासारखे सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाले. सुभाष घईंच्या रामलखन चित्रपटातल्या जॅकी आणि अनिल कपूर यांच्या जोडीने पुन्हा एकदा  प्रेक्षकांची मने जिंकली.

 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या '1942 ए लव स्टोरी' आणि 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रंगीला' चित्रपटासाठी जॅकीला सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्याचा फिल्म  फेअर  पुरस्कार मिळाला. जॅकीच्या कारकिर्दीत मीनाक्षी शेषाद्री आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबतची जोडी खूपच पसंद केली गेली.  त्यांनी आतापर्यंतच्या चार दशकातील कालावधीत सुमारे तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.  स्‍वामी दादा, हीरो, अंदर बाहर, युद्ध, तेरी मेहरबानियां, पाले खां, अल्‍लाह रख्‍खा, कर्मा, जवाब हम देंगे, काश, राम लखन, परिंदा, मैं तेरा दुश्‍मन, त्रिदेव, वर्दी, दूध का कर्ज, सौदागर, किंग अंकल, खलनायक, गर्दिश, त्रिमूर्ति, रंगीला, बंदिश, अग्निसाक्षी, बॉर्डर, बंधन, रिफयूजी, मिशन कश्‍मीर, फर्ज, यादें, लज्‍जा, देवदास, ऑन-मेन एट वर्क, हलचल, क्‍योंकि, भूत अंकल, भागमभाग, किसान, वीर, शूटआऊट एट वडाला, धूम 3, हैप्‍पी न्‍यू ईयर, डर्टी पॉलीटिक्‍स ही काही उल्लेखनीय चित्रपटांची नावे आहेत. 

जॅकी यांनी त्यांची दीर्घकाळची मैत्रीण आयशा दत्तशी लग्न केले, जी नंतर चित्रपट निर्माता बनली.  हे जोडपे सध्या जॅकी श्रॉफ एंटरटेनमेंट लिमिटेड नावाची मीडिया कंपनी चालवते.  त्यांना दोन मुले आहेत. टायगर श्रॉफ (हेमंत जय) नावाचा मुलगा बॉलिवूड मध्ये सक्सेस तरुण अभिनेता आहे. आणि त्यांना कृष्णा नावाची मुलगीही आहे.  दिग्दर्शक सुभाष घई यांनीच श्रॉफला 'जॅकी' हे नाव दिले. 1990 नंतर ते मुख्य भूमिकेपेक्षा सह-अभिनेता म्हणून सशक्त भूमिकेत दिसू लागले. जॅकीला 'परिंदा' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला, तर 'खलनायक' चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.  याशिवाय त्यांना अनेकवेळा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.  2007 मध्ये, जॅकीला भारतीय चित्रपटातील उत्कृष्ट योगदानाबद्दल विशेष न्यायाधीश ज्युरी पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

Saturday, January 28, 2023

'लकी चार्म' सोनाक्षी सिन्हा आता छोट्या पडद्यावर

सोनक्षी बॉलिवूडमध्ये फारशी यशस्वी ठरलेली नसली तरीही तिच्या नावावर काही हिट चित्रपट आहेत. परंतु अलिकडच्या काळात ती बिगबजेट चित्रपटांमध्ये दिसून आलेली नाही.  खूप दिवसांनी सोनाक्षी सिन्हा ‘निकिता रॉय एंड द बुक ऑफ डार्कनेस’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे तिचा भाऊ कुश सिन्हा फिल्मी दुनियेत पाऊल ठेवत आहे. सोनाक्षी सिन्हा मागील काही काळापासून झहीर इक्बालसोबतच्या रिलेशनशिपवरून चर्चेत आहे. झहीर अन्‌ सोनाक्षीने अलिकडेच स्वत:च्या या प्रेमाच्या नात्याची जाहीर कबुली दिली आहे. झहीर हा एका ज्वेलर्सच्या कुटुंबाशी संबंधित असून सलमान खानचा तो चांगला मित्र आहे. झहीरने स्वत:चे बॉलिवूड पदार्पण सलमान खानचा चित्रपट 'द नोटबुक'द्वारे केले होते. झहीर आणि सोनाक्षी आता 'डबल एक्स एल' या चित्रपटात एकत्र दिसून आले आहेत. तिने दबंग' 1 आणि 2 बरोबरच 'राउडी राठोड' ,'सन ऑफ सरदार', 'आर राजकुमार' यासारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या चित्रपटात आधुनिकता आणि रेट्रो लुक यांचं अफलातून मिश्रण सोनाक्षीने सादर केलं. मात्र या चित्रपटांमध्ये ती फक्त शोभेची बाहुली म्हणूनच वापरली गेली. अभिनय तिच्या वाट्याला आलाच नाही.

सोनाक्षी सिन्हा अमेजन प्राइम वीडियो  च्या दहाड़ या वेब सीरिजमधून ओटीटी मध्ये पदार्पण करणार आहे. बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दहाड़चा प्रीमियर होणार आहे.  या चित्रपट महोत्सवात प्रीमियर होणारी ही पहिली भारतीय वेब सिरीज आहे. दहाड ही आठ भागांची गुन्हेगारी मालिका आहे.  ही कथा राजस्थानमधील एका छोट्या शहरावर बेतलेली आहे.  सोनाक्षी सिन्हा सब इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आहे. सोनाक्षीने स्थानिक पोलीस उपनिरीक्षक अंजली भाटी यांची भूमिका केली आहे. सार्वजनिक शौचालयात अनेक महिलांचा रहस्यमयरीत्या मृत्यू झाल्यामुळे प्रकरणाचा तपास अंजलीकडे जातो. सुरुवातीला हे मृत्यू आत्महत्येचे वाटतात, पण जसजसे प्रकरण पुढे सरकते तसतसे अंजलीला सीरियल किलरचे असल्याचे जाणवते. यानंतर पोलिस आणि मारेकरी यांच्यात मांजर आणि उंदराचा खेळ सुरू होतो. 

सोनाक्षी सिन्हाचा चित्रपट प्रवास आश्चर्यकारक आहे. एसएनडीटीमधून फॅशन डिझायनिंगचा कोर्स केल्यावर तिला या विषयाची इतकी गोडी लागली की तिने याच क्षेत्रात झोकून द्यायचं पक्कं केलं. काही फॅशन ब्रँडसाठी रॅम्प वॉक केला. 'मेरा दिल लेके देखो' या चित्रपटासाठी कॉस्च्युम डिझायनर झाली. या क्षेत्रात वावरत असताना अचानक तिला अरबाज खान भेटला. त्यांना 'दबंग'साठी नायिका हवी होती. आणि सोनाक्षी सिन्हा मध्ये त्याला अपेक्षित नायिका सापडली. मात्र याच सोनाक्षी सिन्हाला चित्रपटात यायसाठी तब्बल तीस किलो वजन कमी करावं लागलं. पण ते सिन्हानं केलं. चित्रपट हिट झाला आणि सोनाक्षीचं नाणं चाललं.

सोनाक्षी लहानपणी फार मस्तीखोर होती. बंदुकीसारखी तेजतर्रार होती. स्विमिंग, व्हॉलीबॉल, टेनिस, फुटबॉल अशा बऱ्याच खेळात तिचा वावर होता. लव-कुश या आपल्या जुळ्या दोन भावांसोबत तिची खूप मस्ती चाले. मारामारी चालायची. शाळा- कॉलेजमध्ये तिच्या नादाला कोणी लागायचे नाही. अगदी टॉमबॉईश होती. त्यामुळे तिची आई- पूनम सिन्हा नेहमी म्हणायची,' हिच्यात मुलीचा एकही गुण शोधूनही सापडत नाही. सुरुवातीला सोनाक्षीला खेळाडू व्हायचं होतं. पण नंतर डिझायनिंग आवडायला लागलं आणि आता अभिनय.

पण तिचे चित्रपट गाजले असले तरी तिच्या अभिनयाची झलक मात्र अजून कुठल्या चित्रपटात दिसली नाही. विशेष म्हणजे सोनाक्षीच्या कारकिर्दीत 'दबंग' ची तुलना अन्य कुठल्याही तिच्या चित्रपटाशी होऊ शकली नाही. या चित्रपटातील ' थप्पड से डर नहीं लगता साब,प्यार से लगता है' या तिच्या डॉयलॉगने अक्षरशः धुमाकूळ घातला. तरीही या चित्रपटात तिच्या वाट्याला फारच कमी दृश्य आली. 'दबंग' हा पूर्णतः सलमानमय होता. 'दबंग 2' मध्ये तर तिचे अस्तित्वच नव्हते. काहीजण म्हणतात की, 'दबंग' मुळे हिंदी चित्रपट सृष्टीला देशी ठसक्याची नायिका मिळाली. ग्लॅम-डॉलसच्या गोतावळ्यात साडी आणि सलवार कमीजमधली सोनाक्षी 70-80 च्या दशकातल्या नायिकांची आठवण ताजी करत एक नवा ट्रेंड सुरू करू पाहत होती. त्यात तिला बऱ्यापैकी यश मिळालं सुद्धा. मात्र अभिनय तिच्या वाट्याला आलाच नाही. म्हणजे या चित्रपटांमध्ये तो नव्हताच. निव्वळ मनोरंजन हाच या चित्रपटांचा उद्देश. अक्षय कुमार, अजय देवगण, शाहिद कपूर, सलमान खान यांच्या प्रभावशाली देमार चित्रपटांमध्ये सोनाक्षीचा सहभाग नायकाची प्रियेसी आणि नाचण्या -गाण्यापुरताच होता. मात्र चित्रपटांनी करोडोंची कमाई केल्याने 'लकी चार्म' ठरवत तिचं ' मिस 100 करोड' असं नामाकरण झालं होतं.

महत्त्वाचं म्हणजे तिची लक्षात राहावी, अशी भूमिकाच नाही. 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' मध्ये बऱ्यापैकी महत्त्वाची भूमिका मिळूनही तिला स्वतःचा प्रभाव पाडता आला नाही. ज्या रेट्रो लुक मुळे तिच्याकडे कौतुकाच्या नजरा वळल्या, त्या लुकचा तिच्याच चाहत्यांना कंटाळा येत चालला. अशा वळणावर सर्वसाधारपणे शरीरप्रदर्शन ,बोल्ड दृश्यं, चुंबन दृश्यं याचा आधार घेण्याचा प्रयत्न केला जातो.मात्र या गोष्टीला सोनाक्षी बळी पडली नाही. त्यामुळे तिच्या कारकिर्दीला नायकाचाच भक्कम टेकू लागतो, हे स्पष्ट झालं. विशेष म्हणजे तिला नायकही तसेच भेटले.

स्वतःच्या बळावर चित्रपट चालवा, असा तिचा प्रयत्न झाला,पण तो अयशस्वी झाला. 'लुटेरा' काही चालला नाही. मात्र तिच्या पाखी या बंगाली मुलीच्या भूमिकेचे कौतुक झालं. 'इसी बहाने क्यूँ ना मैं भी दिल का हाल जरा संवार लू...' अशी सुरेल साद घालत एकीकडे आजारपण आणि अपयशी प्रेम याच्याशी झुंजत हेलकावे खाणारी सोनाक्षीचा पाखी हावभाव, दिसणं, वावरणं, संवादफेक सर्वच बाबतीत उजवी होती. खरे तर अभिनयासाठी नावाजले जाणं कलाकारांच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचं असतं. दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा, विद्या बालन, आलिया भट्ट आदींसाठी खास संहिता लिहून घेतली जाते, चित्रपटांचा डोलारा स्वतःच्या खांद्यावर वाहून नेण्यासाठी या नायिका सज्ज असतात. याचं गांभीर्य सोनाक्षीच्या कारकिर्दीत अभावानेच बघायला मिळालं. 'अकिरा', 'नूर', 'हॅप्पी फिर भाग जायेगी' आणि 'खानदानी शफखाना' हे तिन्ही चित्रपट सोनाक्षीच्या व्यक्तिमत्त्वाभोवती फिरत होते. पण समीक्षा आणि तिकीटबारी दोन्हीपैकी एकवरही हे चित्रपट चमकली नाहीत. ऍक्शन आणि कॉमेडी या तिच्या आवडत्या शैलीतील चित्रपट असूनही त्यात प्रेक्षकांना वेगळेपण आढळलं नाही.

'बुलेटराजा', 'तेवर', 'ऍक्शन जेक्शन', 'वेल कम टू न्यू यॉर्क' ,'फोर्स 2', 'इत्तेफाक' अशा चित्रपटातून सोनाक्षीचा फायदा तर झाला नाहीच,पण उलट अपयश पदरी पडून ती मागे खेचली गेली. करण जोहरचा 'कलंक' सुद्धा तिला फायद्याचा ठरला नाही. 'मिशन मंगल'ला यश मिळालं असलं तरी या चित्रपटाचे श्रेय कुणा एकाला जात नाही. या चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन हे कलाकार होते. यापुढच्या काळात सोनाक्षीला अभिनय करायला मिळायला हवा,तरच ती या क्षेत्रात टिकून राहणार आहे. आगामी चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये तरी तो दिसून यायला हवा. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

बडे स्टार छोट्या पडद्यासाठी उत्सुक

चित्रपटाचे प्रमोशन असो किंवा कोणतीही नवीन घोषणा असो, चित्रपटातील कलाकारांना छोट्या पडद्याचा आधार घ्यावा लागत आहे. रिअॅलिटी शोपासून ते फिक्शन शोपर्यंत, मोठे स्टार्स त्यांच्या चित्रपट आणि वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी या प्लॅटफॉर्मचा वापर मोठया प्रमाणात करताना दिसत आहेत. इतकंच नव्हे तर अमिताभ बच्चनपासून सलमान खानपर्यंत आणि रेखापासून माधुरी दीक्षितपर्यंत सगळ्यांनाच छोट्या पडद्याशी जोडल्याचा आनंद वाटतोय. ते तसं बोलून दाखवताहेत. कोविड-19 दरम्यान ओटीटीने चांगलेच हातपाय पसरायला सुरुवात केली.  चित्रपटगृहे बंद असल्याने प्रेक्षकांनी ओटीटीला पसंदी देत त्यावरील सिनेमा, वेबसिरीजची मजा लुटली. त्यामुळे आता छोटा पडदा मागे पडेल असे लोकांना वाटले, पण त्याने लोकांच्या हृदयात असे स्थान निर्माण केले आहे की टीव्ही मालिका आणि रिअॅलिटी शो आजही लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर आहेत.सोनाक्षी सिन्हा अमेजन प्राइम वीडियो  च्या दहाड़ या वेब सीरिजमधून ओटीटी मध्ये पदार्पण करणार आहे. बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दहाड़चा प्रीमियर होणार आहे.  या चित्रपट महोत्सवात प्रीमियर होणारी ही पहिली भारतीय वेब सिरीज आहे. दहाड ही आठ भागांची गुन्हेगारी मालिका आहे.  ही कथा राजस्थानमधील एका छोट्या शहरावर बेतलेली आहे.  सोनाक्षी सिन्हा सब इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आहे.2023 मध्ये, सोनाक्षीसह अनेक बॉलिवूड कलाकार ओटीटी इनिंग सुरू करू शकतात.  त्यापैकी एक म्हणजे शाहीद कपूर, जो प्राइम व्हिडिओच्या स्वतःच्या 'फर्जी' मालिकेद्वारे ओटीटीमध्ये पदार्पण करत आहे. ही वेब सिरीज 10 फेब्रुवारीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.  हा एक क्राईम कॉन ड्रामा आहे, ज्यामध्ये शाहिद मोठ्या व्यक्तींची फसवणूक करताना दिसणार आहे.  विजय सेतुपती समांतर लीड रोलमध्ये आहे.  उर्मिला मातोंडकर आणि करीना कपूर खान देखील ओटीटी स्पेसमध्ये दिसणार आहेत.  

आता 2023 मध्येही छोट्या पडदा मोठा धमाका करणार आहे. छोट्या पडद्यावरील अनेक हिट मालिकांच्या आमूलाग्र बदलाची बातमी समोर आली आहे. 2023 मध्ये अनेक नवीन चॅनेल्स सुरू झाली आहेत आणि त्याचबरोबर अनेक नवीन मालिकाही सुरू झाल्या आहेत. 2023 मध्ये प्रसिद्ध मालिकांमध्येही काही नवे बदल आणि नवा अंदाज दिसून येणार  आहे. निर्माता असित मोदी यांच्या मते यावर्षी 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये काही नवीन बदल पाहायला मिळतील. ही मालिका गेली कित्येक वर्षे प्रेक्षकपसंदीच्या टॉप 10 मध्ये आहे. या मालिकेतून बाहेर पडणाऱ्या कलाकारांची जागा लवकरच नवे कलाकार घेतील, असे सांगण्यात आले आहे. 2023 मध्ये पोपटलालचे लग्न आणि दयाबेनची एंट्री  होण्याची शक्यता आहे. मात्र दयाबेन दिशा वाकानी आहे की नवीन कोणी अभिनेत्री, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चांगला टीआरपी  असलेल्या 'अनुपमा' मालिकेमध्येही बरेच काही नवीन बदल दिसणार आहे.  'अनुपमा'मध्ये नवीन रोमँटिक ट्रॅक देखील पाहायला मिळणार आहे. त्याच वेळी 2023 मध्ये 4000 भाग पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर असलेली 'ये रिश्ता क्या कहलाता है' ही मालिका नवीन नात्याची सुरुवात करणार आहे. त्याचबरोबर 'भाभी जी घर पर है' या अँड टीव्हीवरील  सर्वात हिटमालिकेमध्ये नवीन पात्रांची एन्ट्री पाहायला मिळणार आहे.  त्याचे शूटिंग दुबईत नवीन ठिकाणी केले जाऊ शकते.  यामध्ये हॉरर कॉमेडीही दाखवण्यात येणार आहे. 

2023 मध्ये अनेक नवीन शो प्रदर्शनाच्या रांगेत आहेत. अनेक सुरुही झाले आहेत. जसं की, 'वागले की दुनिया' (ही मालिका 1988 मध्ये आली होती.) ही मालिका 2023 मध्ये नवीन पद्धतीने सादर केली जात आहे. याशिवाय बॅरिस्टर बाबू भाग 2, दुर्गा आणि चारू या मालिका आधीपासूनच प्रसारित होऊ लागल्या आहेत. 'धर्मपत्नी'चेही प्रसारण होत आहे. देव जोशी अभिनीत सब चॅनलचा प्रसिद्ध शो बालवीर सीझन 3 नव्या वर्षात प्रसारित होणार आहे. टीव्ही क्वीन एकता कपूर ब्युटी अँड द बीस्ट या हॉलिवूड चित्रपटावर आधारित मालिका घेऊन येत आहे ज्यात कुशल टंडन मुख्य भूमिकेत आहे. करण कुंद्रा, गश्मीर महाजनी आणि रिम शेख यांचा हॉरर रोमँटिक शो 'भेडिया' लवकरच कलर्स वाहिनीवर येणार आहे. स्टार प्लसवर 'तेरी मेरी डोरिया', झी टीव्हीवर 'मैत्री', सोनी सबवर 'ध्रुव तारा' लवकरच येणार आहेत. सुष्मिता मुखर्जी आणि काजल चौहान अभिनीत 'मेरी सास भूत है' रिलीजसाठी सज्ज आहे.

'अग्निसाक्षी एक समझौता' आणि त्रिकोणी प्रेमकथा 'इश्क में घायल' लवकरच कलर्स वाहिनीवर दिसणार आहे. मास्टर शेफ सीजन 7 स्टार प्लसवर शरारत 2 आणि थोड़ा जादू थोड़ी नजाकत, स्टार भारतवर मन की आवाज प्रतिज्ञा 2, स्टार प्लसवर रुद्रकाल, जी टीवी वर रब से दुआ, शेमारू उमंग चॅनलवर राजमहल दाकिन्न का रहस्य, सोनी टीवीवर कथा अनकही, सब टीवीवर दिल दिया गल्ला ,स्टार भारतवर आशाओं का सवेरा धीरे-धीरे 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.जुनून चित्रपटावर आधारित बाघीन या मालिकेव्यतिरिक्त मोलकी सीझन 2 रिलीजसाठी सज्ज आहे. या व्यतिरिक्त 2023 मध्ये प्रसिद्ध रियलिटी शो कपिल शर्मा शो, बिग बास 17, डांस दीवाने, झलक दिखला जा, डांस प्लस इत्यादी रियलिटी आणि डांस शोदेखील नव्या अंदाजात प्रदर्शित होणार आहेत. छोट्या पडद्याची ही नवीन तयारी आणि त्याची प्रचंड लोकप्रियता बघता असा निष्कर्ष निघतो की मोठ्या पडद्याचा दबदबा असो की ओटीटीचा, परंतु प्रत्येक घराघरात पोहोचलेला छोटा पडदा, त्याची प्रतिष्ठा आणि त्याची क्रेझ कधीच संपणार नाही. छोटा पडदा लहान असला तरी त्याचा प्रेक्षकवर्ग मात्र प्रचंड आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Friday, January 27, 2023

करिअर घडवण्याच्या घाईत बालपण हरवलेली मुलं

बालपण हा जीवनाचा सर्वात सुंदर टप्पा असतो, ज्यामध्ये ना जबाबदारीची जाणीव असते ना कसलीही चिंता. फक्त 'खा, प्या आणि मजा करा' हे तत्वच खरे वाटते. आपल्या सर्वांच्या बालपणीच्या अनेक आठवणी आहेत, काही चांगल्या आणि काही वाईट, पण तरीही त्याचाचा विचार करताना आजही चेहऱ्यावर आनंदाची लहर येते.आपण अनेकदा मुर्खपणाने वागलो असेल किंवा चुका केल्या असतील, ज्याचा विचार करून आपल्याला स्वतःवरच हसू आले असेल किंवा रागही आला असेल. पण आज पुन्हा कधी बालपण परत येत नाही, मुलांच्या निरागसतेचं गांभीर्य किंवा समजूतदारपणामध्ये कधी रूपांतर होतं ते कळत नाही. कदाचित या पिढीतील मुलांनी त्यांचे बालपण मनसोक्त जगले नसावे. तंत्रज्ञान आणि माध्यमे यांनी वय आणि काळापूर्वीच त्यांचे बालपण हिरावून घेतलं आहे. या वातावरणात त्यांच्या निरागसतेचे लागलीच परिपक्वतेत रूपांतर झाले. आजची पिढी एकतर आपल्या जीवनात निर्माण होणारी आव्हाने अतिशय हलकेपणाने घेते किंवा माघार घेऊन हिंसाचाराचा किंवा गुन्हेगारीचा मार्ग निवडते याचे हेही कारण असू शकते का?

पूर्वीचे बालपण आणि आजचे बालपण पूर्णपणे वेगळे आहे किंवा पूर्णपणे विरुद्ध आहे असे म्हणायला हरकत नाही. आजचे बालपण धकाधकीच्या, नियमित अभ्यासाबरोबरच विविध स्पर्धा परीक्षा आणि छंद वर्गाची तयारी करण्याच्या आणि अदृश्य अशा अनेक शर्यतीत धावण्यात व्यस्त झालेले दिसते. या सर्वांमुळे मुले वेळेपूर्वी परिपक्व होत आहेत. माहिती क्रांती आणि ग्राहक बाजार यांनी त्यांच्या अपरिपक्व मेंदूवर माहितीचा भडिमार केला आहे, ज्यामुळे त्यांना ती सर्व माहिती त्यांच्या 'नॉलेज स्टोअर्स'मध्ये साठवून ठेवण्याची मानसिक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवावी लागते आणि जीवनाच्या शर्यतीत यशस्वी होण्यासाठी स्वतःला व्यस्त ठेवावे लागते. या यशाच्या शक्यतेने मुले ग्राहक बनली आहेत, त्यांची नैसर्गिकता देखील संपली आहे.

मानवी शरीर नैसर्गिकरित्या विकसित झाले तर ते निरोगी असते हे आपणा सर्वांना माहीत आहे, परंतु जर मानवी शरीरात वैद्यकीय प्रक्रियेद्वारे (हार्मोन्स बदलणे, प्लास्टिक सर्जरी इ.) फेरफार केली गेली तर पुढे आपल्याला विविध अज्ञात आजारांना सामोरे जावे लागू शकते. हे देखील एक सत्य आहे की ब्लडप्रेशर, मधुमेह, दमा, हृदयविकाराचा झटका इ. आजार जे वृद्धापकाळात होत असत, ते आज किशोरवयीन आणि तरुणांमध्ये किंवा त्याहीपूर्वी होत आहेत. वैद्यकीय संशोधनानुसार ऐंशी ते नव्वद टक्के आजार तणावामुळे होतात. न्यूरोसायंटिस्ट बीएस ग्रीनफिल्ड यांच्या मते, मेंदूच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे घटक म्हणजे थेट अनुभव, प्रौढ पिढीशी संवाद, खेळण्याच्या आणि सर्जनशील बनण्याच्या संधी, ज्या आधुनिक जीवनाच्या वेगवान गतीमुळे नष्ट होत आहेत. 

तंत्रज्ञानाने जग मोठ्या प्रमाणात खुले केले आहे यात शंका नाही, परंतु प्रथमदर्शनी अनुभवांना पर्याय नाही, ज्यापासून आजची मुले अधिकाधिक वंचित राहिली आहेत. आजकाल तंत्रज्ञानामुळे बाहेरील क्रियाकलापांची जागा इनडोअर अ‍ॅक्टिव्हिटीजने घेतली आहे, त्यामुळे मुलांच्या शारीरिक आरोग्यावर परिणाम तर झाला आहेच, शिवाय मुलांमध्ये निराशा वाढली आहे. मुलांमध्ये 'सोशॅलिटी' संपत चालली आहे, त्यांच्यात व्यक्तिवाद वाढत आहे. आव्हानांना तोंड देण्याऐवजी, ते पलायनवादी बनत आहेत, जीवन जगण्यापेक्षा ते संपवणे त्यांना सोपे वाटत आहे. तसे पाहिल्यास मुलांमधील या बदलांच्या कारणांमध्ये  असमान आणि भेदभाव करणारी कौटुंबिक आणि  सामाजिक पार्श्वभूमी, शिक्षणपद्धती, बाजारपेठेवर आधारित ओळखींवर होणारा खर्च, स्पर्धेसाठी धडपडणे, उच्च स्थान मिळवण्याची इच्छा, यशाची कमाल पातळी गाठणे. करण्याची आकांक्षा, अनौपचारिकतेपासून वेगळे होणे. व्यवस्था आणि भावनिकतेचा अंत, मुलांवर करिअरसाठी दबाव, ग्रामीण-शहरी विभाजनाच्या आधारे गुणवत्तेची ओळख, अर्थव्यवस्था, राजकारण, संस्कृती आणि अहंकाराचे मानसशास्त्र, स्वतःच्या बुद्धिमत्तेवर संशय घेणे यांचा समावेश आहे. 

सर्व प्रकारच्या स्पर्धांमुळे मुलांमध्ये विभाजित व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होत आहे, त्यामुळे आत्महत्या हा निराशेपेक्षा सामाजिक दबावाचा परिणाम आहे. या आत्महत्यांना आत्महत्या नाही तर व्यवस्थाजनित आत्महत्या म्हणता येईल, ज्यासाठी औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही संस्था जबाबदार आहेत. शैक्षणिक संस्थांनी यशाचे मूल्य अमर्यादित केले आहे, म्हणजेच आता यशाला मर्यादा नाही. सर्वोच्च स्थान प्राप्त करणे हे यशाचे माप आहे.  यानंतर, तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये सर्वोत्तम रँक मिळावी, तुम्हाला जास्त वेतनश्रेणीची नोकरी मिळावी.  या प्रवृत्तीने विद्यार्थ्याला विनाशाच्या मार्गावर नेले आहे. 

बाजाराने प्रत्येक कुटुंबाला, मग ते गरीब असो वा उच्च, आपल्या मुलांना यशस्वी व्हायचे असेल तर त्यांना विशिष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश देणे भाग पाडले आहे. पण पालकांच्या अतिरेकी अपेक्षा आणि दिवसेंदिवस वाढणारी स्पर्धा यामुळे मुले इतकी व्यस्त झाली आहेत की ते तणावाखाली जगू लागली आहेत हेही एक वास्तव आहे. शाळा असो की ट्यूशन, कॉम्प्युटर क्लास असो की डान्स किंवा टीव्ही, मुलांचे वेळापत्रक या सर्वांसाठी ठरलेले असते. मात्र ही बाब मुलांच्या सोयीऐवजी अडचणीची ठरत असून, ते तणावाचे कारण आहे. आता मुलांमध्ये शारीरिक किंवा मानसिक कारणांऐवजी सामाजिक कारणांमुळे जास्त ताण येतो. संशोधनानुसार, जर मूल वर्गातल्या परीक्षेत चांगली कामगिरी करू शकले नाही किंवा त्याला वाईट खराब मिळाले तर तो न्यूनगंडाचा बळी ठरतो.  तो शिक्षकांच्या उपेक्षेचा बळी ठरतो, पालकांच्या दटावणीला कारण ठरतो. आणि त्याचे  निकाल असेच येत राहिले तर किंवा माझी निवड झाली नाही तर आई-वडील कर्ज कसे फेडणार या टेन्शनचा तो बळी ठरतो. 

मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, मी आयुष्यात काहीच करू शकत नाही आणि हा विचार करून तो आत्महत्येसारखे अमानुष पाऊल उचलण्याचे धाडस करतो. ज्या वयात आपण त्यांना कोचिंग इन्स्टिट्यूटच्या शिस्तबद्ध पिंजऱ्यात कैद करतो, ते वय म्हणजे मैत्री करण्याचे, सामाजिक मूल्ये शिकून घेण्याचे, शारीरिक आणि मानसिक विकासाचे आणि त्यांची सर्जनशीलता विकसित करण्याचे, आजीच्या कथा ऐकण्याचे आणि त्या पात्रांमध्ये स्वत:चा पाहण्याचे, मोठे होऊन देशासाठी काहीतरी करण्याचे असे वाटण्याचे असते. सर्जनशीलतेसाठी कल्पनाशक्तीही आवश्यक असते आणि ती कल्पनाशक्ती आपण लहानपणीच मुलांची  मारून टाकली आहे, हे वास्तव आहे.कदाचित यामुळेच मुलांमधील सर्जनशीलतेची प्रवृत्ती संपत चालली आहे. आणि जरा विचार करा, आम्ही या वयातील मुलांना कृत्रिम वातावरणात बंदिस्त करतो. त्याला कुटुंबाच्या सामाजिक वर्तुळापासून वेगळे करतो.कोणतीही समस्या सोडवण्यासाठी त्याला तंत्रज्ञान किंवा गुगलकडे वळण्यास भाग पाडतो. त्याला खेळण्यासाठी आणि मित्र बनवण्यासाठी पुढचे संपूर्ण आयुष्य पडले आहे, असे सांगून त्याला आपण त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायला सांगतो. हे वय गेलं की ते पुन्हा मिळत नाही हे आपणा सर्वांनाच माहीत आहे.  करिअर घडवण्याच्या घाईत मुलं इतकी मोठी होतात की बालपण मागे राहून जातं आणि ते तरुण बनतात. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि.सांगली 


Thursday, January 26, 2023

'आयटी नियम २०२१'वर चर्चा करण्याची केंद्राची तयारी

प्रसारमाध्यमांवरील माहितीच्या सत्यशोधनाचा अधिकार प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो (पीआयबी) तसेच केंद्र सरकारला देणाऱ्या माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींना एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया, विविध पत्रकार संघटनांनी विरोध दर्शविल्यानंतर  संबंधित तरतुदींवर चर्चा करण्याचा पवित्रा केंद्र सरकारने घेतला आहे. हे चांगलेच झाले म्हणायचे. गेल्या आठवड्यात इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 'आयटी नियम, 2021' कायद्याचा सुधारित मसुदा प्रसिद्ध केला. या संभाव्य कायद्यातील बहुतांश तरतुदी ऑनलाइन गेमिंगबाबत नियम निश्चित करण्याशी संबंधित असताना केंद्र सरकारने खोट्या बातम्यांबाबत यामध्ये एक छोटे टिपण समाविष्ट केले. यानुसार चुकीच्या, खोट्या व भ्रामक बातम्या ठरवण्याचे अधिकार 'पीआयबी'कडे देण्यात आले आहेत. त्यासाठी 'पीआयबी' मध्येच स्वतंत्र तथ्य परीक्षण विभागाची स्थापना करण्यात येणार आहे. हा विभाग सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांवरील माहितीचे परीक्षण करील व चुकीच्या खोट्या व भ्रामक बातम्यांची स्वतःहून दखल घेईल किंवा पीआयबीच्या पोर्टल, ईमेल तसेच व्हॉट्सअॅपवर नागरिकांनी केलेल्या तक्रारींचाही आढावा घेईल.

एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने या तरतुदींना विरोध दर्शवला आहे. 'माहितीची सत्य- असत्यता ठरवण्याचा अधिकार केवळ सरकारकडे केंद्रित नसावा. अन्यथा यामुळे प्रसारमाध्यमांवरील सेन्सॉरशिपची सुरुवात होईल, असे सांगून पत्रकार संघटनांनी या तरतुदीबाबत चिंता व्यक्त केली आहे. पत्रकार संघटनांनी केलेल्या विरोधानंतर अखेर केंद्रीय माहिती-तंत्रज्ञानमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याबाबत प्रसारमाध्यमांशी संबंधित संस्था, व्यक्तींशी पुढील महिन्यात चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.

अभिव्यक्तीवर वेगवेगळ्या प्रकारे अंकुश आणण्याचे जे प्रयत्न सध्या देशात होत आहेत, त्यांचे गांभीर्य कळू शकते. सर्वात ठळक आणि ताजे उदाहरण म्हणजे ‘फेक न्यूज’ कोणत्या हे ठरविण्यासाठी सरकार आणू पाहात असलेल्या कायद्याचे. माहिती-तंत्रज्ञान कायद्यातील दुरुस्तीच्या मसुद्यात समाजमाध्यमांवर पसरणाऱ्या `फेक न्यूज’ला आळा घालण्यासाठी तरतूद करण्यात येत असून त्यानुसार प्रेस इन्फर्मेशन ब्यूरो (पीआयबी)ला अशा ज्या बातम्या आढळतील, त्या काढून टाकण्याचे आदेश संबंधित कंपन्यांना देण्यात येतील.बातम्या खोट्या आणि निराधार कोणत्या हे ठरविण्याचे अधिकार जर सरकारी संस्थेलाच असतील, तर एक प्रकारे हे स्वतंत्र अभिव्यक्तीवर घाला घालण्यासारखेच नाही का? एखादी बातमी चुकीची वा खोटी ही कशाच्या निकषावर ठरवले जाणार, हा यातील महत्त्वाचा प्रश्न आहे. माहितीच्या प्रसाराचे योग्य ते नियमन आवश्यक असते. पण ते नियमन म्हणजे सरकारच्या हातातील अस्त्र नव्हे. सरकार जनतेतूनच बहुमताने निवडून आलेले असते हे खरे. पण म्हणून दोन निवडणुकांच्या दरम्यानच्या काळात सत्ता एकवटण्याचा प्रयत्न करणे घटनाकारांना अभिप्रेत नव्हते आणि म्हणूनच नियंत्रणाच्या व्यवस्था निर्माण केल्या गेल्या.

भारताच्या शेजारी देशातील स्थिती पाहिली तर कुठे लष्करशाही, कुठे सर्वंकष नियंत्रणाची व्यवस्था, तर कुठे एकाधिकारशाही दिसते. यापैकी अनेक देशांत निवडणुका होतातही. परंतु केवळ निवडणुका म्हणजे लोकशाही नव्हे. तो सांगाडा आहे. त्यात सर्वसामान्य व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा, सर्वांना समान संधीचा, संस्थांच्या स्वायत्ततेचा, मोकळ्या अभिव्यक्तीचा प्राण ओतला नसेल तर ती तोंडदेखली लोकशाही ठरते. भारतात प्रसारमाध्यमांना असलेले स्वातंत्र्य हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याला नख लागता कामा नये. गुजरातेतील दंगलींच्या संदर्भात ‘बीबीसी’ने तयार केलेल्या वृत्तपटावर केंद्र सरकारने घातलेली बंदी हादेखील अभिव्यक्तीला अटकाव करण्याचाच प्रयत्न होय. या वृत्तपटात केलेले चित्रण चुकीचे वाटत असेल तर त्याचा सरकार प्रतिवाद करू शकत होते. उलट बंदी घातल्याने या वृत्तपटाचे महत्त्व आणि त्याविषयीची उत्सुकता वाढली.एकूणच टीका, चिकित्सा मोकळेपणाने स्वीकारणे हे प्रगल्भ लोकशाहीचे लक्षण आहे. सध्या केंद्रात स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपने अनेकदा अनुदार धोरण स्वीकारून त्याच्याशी विसंगत वर्तन केले आहे. दुर्दैवाने बाकीचे पक्षही याबाबतीत फार वेगळे नाहीत. ममता बॅनर्जी यांचे व्यंग्यचित्र केवळ समाजमाध्यमांवरून ‘फॉरवर्ड’ केले म्हणून तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्राध्यापकाला बेदम मारहाण केली होती. त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले. दहा वर्षांनंतर न्यायालयाने त्यांना दोषमुक्त ठरवले; पण तोपर्यंत झालेला मनस्ताप आणि नुकसान कसे भरून निघणार? केंद्राच्या हडेलहप्पीवर टीकास्त्र सोडणारे पक्ष आपापल्या राज्यात मनमानी वर्तन करण्यात कमी नसतात, याचीही अनेक उदाहरणे सांगता येतील.

Wednesday, January 25, 2023

नव्या तंत्रज्ञानाने मंगळ मोहिमांना येणार गती

मंगळ ग्रहावर जीवनासाठी पोषक वातावरण निर्माण करून तेथे मानवी वस्ती स्थापण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर अनेक देशांनी काम सुरू केले आहे. यात अमेरिकेची नासा आघाडीवर आहे. पाठोपाठ चीन,रशिया यांचेही जोरदार काम चालू आहे. काही वर्षांपूर्वी स्टिफन हॉकिंग्ज यांनी ‘या पृथ्वीवर मानवजातीला आता वास्तव्यासाठी फार काळ राहिलेला नाही.जेमतेम शंभर वर्षं.त्यानंतर काय. याची तजवीज आताच करावी लागेल,’ असं एक विधान केलं होतं. ते बरंच गाजलंही. त्यावर उलटसुलट चर्चाही झाल्या. त्यातला वायूप्रदूषणाचा, जागतिक तापमानवाढीचा आणि त्यामुळं होणाऱ्या संभाव्य पर्यावरण ऱ्हासाबाबत गांभीर्याने बोलले जात आहे. काही वर्षांत होणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याच्या दुर्भिक्ष्याला माणूस कारणीभूत असणार आहेच. बदलत्या हवामानातून तसं सूचित होत आहेच, त्यामुळे अन्य ग्रहावर वसाहत करून राहण्याची मानवाला घाई झाली आहे.

२०३३ पर्यंत मंगळावर मानव पोहोचवणे असा नासाचा उद्देश आहे. यासंबंधी येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा मुकाबला करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. मंगळावर प्राणवायू तयार करणे हेदेखील त्या आव्हानांपैकीच आहे. कारण खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सोबत घेऊन जाणे व्यवहार्य ठरत नाही. म्हणूनच मंगळावर प्राणवायू तयार करणे गरजेचे आहे. आता यातच नव्या तंत्रज्ञानामुळे मंगळावर पोहचण्यासाठी जो लागणारा कालावधी आहे, तो खूपच कमी होणार आहे. यामुळे मंगळ मोहिमा जास्तीतजास्त आखता येणार आहेत. 

 पृथ्वीपासून मंगळापर्यंतचा प्रवास ७ महिन्यांचा असतो. मंगळावर आतापर्यंत गेलेल्या सर्व रॉकेट्सना इतकाच कालावधी लागला आहे, परंतु आता एका नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने हा प्रवास केवळ ४५ दिवसांचा राहणार आहे.  या नव्या तंत्रज्ञानाचे नाव 'न्युक्लियर थर्मल अँड न्युक्लियर इलेक्ट्रिक प्रॉपलशन’ आहे. नासा मंगळासाठीच्या मानवी मोहिमेकरता आण्विक इंधनाचा वापर करता येईल अशाप्रकारच्या रॉकेटची निर्मिती करणार आहे. वैज्ञानिकांनी रॉकेटचा पहिला टप्पा विकसित करण्यास सुरुवात केली आहे. रॉकेट निर्मितीसाठी दोन तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. न्यूक्लियर थर्मल प्रॉपल्शनमध्ये न्युक्लियर रिअँक्टर असेल, जो लिक्विड हायड्रोजन प्रोपेलेंट तप्त करणार आहे. यातून प्लाझ्मा तयार होणार असून तो रॉकेटच्या नॉजलमधून बाहेर पडेल, यामुळे रॉकेटला पुढे जाण्यास मोठा वेग मिळणार आहे. न्युक्लियर इलेक्टिक प्रोपल्शन या दुसऱ्या तंत्रज्ञानात न्युक्लियर रिअॅक्टर आयन इंजिनला इलेक्ट्रिसिटी पुरविणार आहे, यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होईल. हे क्षेत्र जेनॉनसारख्या वायूंना वेग प्रदान करते, यामुळे रॉकेटला पुढे जाण्यासाठी वेग मिळतो. नव्या तंत्रज्ञानादारे वैज्ञानिक रॉकेटच्या कामगिरीला जवळपास दुप्पट करू शकतील. रॉकेट निर्मितीची ही संकल्पना प्लोरिडा युनिव्हर्सिटीतील हायपरसोनिक्स प्रोग्राम एरिया लीड श्रोफेसर रेयान गोसे यांनी मांडली.  सद्यकाळात वापरल्या जाणाऱया तंत्रज्ञानादारे अंतराळयान पृथ्वीहून  मंगळावर जाण्यासाठी ७-९ महिन्यांचा कालावधी लागतो. याच वेगाने मानवी मोहीम राबविली गेल्यास दर २६ महिन्यांमध्ये एक अंतराळयान मंगळाच्या दिशेने झेपावणार  आहे. परंतु नव्या तंत्रज्ञानादारे मंगळावर जाण्याचा मार्ग सोपा होणार आहे. पृथ्वीपासून मंगळापर्यंतचा प्रवास केवळ ४५ दिवसांचा ठरणार आहे. यामुळे मोहिमेचा खर्च कमी होणार आहे. तसेच अंतराळातील  शून्य गुरुत्वाकर्षणामुळे मानवी प्रकृतीशी निगडित धोक्यांची तीव्रताही कमी होणार आहे. 

यापुढचा टप्पा हा मंगळावर मानववस्ती करण्यासाठीचा आहे. पृथ्वीपासून कोट्यवधी किलोमीटर अंतरावर असलेल्या मंगळ ग्रहावर सजीवांना जगण्यासाठी उपयुक्त ठरणारा ऑक्सिजन अर्थात प्राणवायू असल्याचे पुरावे तर आढळले आहेतच. अमेरिकेच्या नासा या संस्थेने पाठवलेल्या पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळ ग्रहावरील कार्बन डायऑक्साइडने भरलेल्या वातावरणातून ५.३७ ग्रॅम ऑक्सिजन संकलित केला. रोव्हरमधील टोस्टरच्या आकाराच्या यंत्राने ही कामगिरी केली असून या यंत्राचे पूर्ण नाव मार्स ऑक्सिजन इन-सीटू रिसोर्स युटिलायझेशन एक्सपेरिमेंट (मॉक्सी) असे आहे. त्यामुळे मंगळावर वसाहत करून राहण्याचे स्वप्न दृष्टिक्षेपात असल्याचं मानलं जात आहे.

नासाने मंगळ ग्रहावर इंजिन्युटी हेलिकॉप्टर उडवले आणि त्याच्या पोटातून बाहेर आलेल्या मॉक्सीने मंगळाच्या वातावरणातून ऑक्सिजनचे संकलन केले. मंगळ ग्रहावर ऑक्सिजन असल्याचे निष्पन्न झाल्याने त्या ठिकाणी मानवी वस्ती करणे शक्य आहे. या ऑक्सिजनचा वापर तिकडून पृथ्वीवर परत येणाऱ्या यानात इंधनाच्या रूपाने केला जाऊ शकतो. अंतराळवीरांना मंगळाच्या वातावरणातून किमान श्वास घेता येऊ शकेल एवढा ऑक्सिजन संकलित करता येऊ शकेल. मानववस्तीसाठी अजून फार मोठा पल्ला गाठायचा असला तरी मात्र यामुळे फार मोठी आशा निर्माण झाली आहे.   

नासाच्या स्पेस टेक्नॉलॉजी मिशन डायरोक्टेरेटचे प्रशासक जिम रियूटर यांच्या मते मंगळ ग्रहावरील वायूमंडळ अतिशय हलके आणि पातळ आहे. कार्बन डायऑक्साइडने भरलेल्या वातावरणातून ऑक्सिजन संकलित करणे अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. परंतु मॉक्सीने ही कामगिरी केली.अंतराळवीरांना हा ऑक्सिजन दिला तर ते किमान १० मिनिटे तग धरू शकतात, एवढा प्रभावी हा ऑक्सिजन आहे. अंतराळवीरांना जर एक वर्ष मंगळ ग्रहावर रहायचे असेल तर त्यांना १००० किलोग्रॅम एवढा ऑक्सिजन लागेल. हे खरे आहे की, आण्विक उर्जेच्या माध्यमातून पुरेशी उष्णता आणि विद्युत ऊर्जा उपलब्ध होऊ शकल्यास मंगळ हा पृथ्वीसारखाच मानवी वस्तीसाठी राहण्यायोग्य ग्रह ठरू शकतो. मात्र, हे तंत्रज्ञान अजून विकसित होणे आवश्यक आहे. प्रचंड प्रमाणात असणारा कार्बन डाय ऑक्साईड आणि अतिशय कमी तापमान आणि दाब या गोष्टी मंगळावरील मानवी वसाहतीसाठी आव्हान ठरतील. त्यांवर नवनव्या तंत्रज्ञानाच्या संशोधनातून मार्ग काढता येईल. दुसरे म्हणजे, मंगळावरील माती ही कार्बनच्या अतीव प्रमाणामुळे विषारी आणि पीक घेण्यास अयोग्य आहे. त्या मातीस कोळशाच्या मदतीने पीक घेण्यास योग्य बनविणे गरजेचे ठरेल. अर्थात मंगळावर मानव वस्ती हे अनेकांचे स्वप्न आहे. त्यादृष्टीने जोरदार प्रयत्न चालू आहेत. मोठमोठ्या कंपन्याही याकडे लक्ष देऊन आहेत. स्वप्न टप्प्यात असल्यास या कंपन्या यात मोठी गुंतवणूक करण्यास तयार आहेत. त्यामुळे कदाचित उद्या मंगळावर मानवी वस्ती शक्य होऊ शकेल, मात्र यासाठी बऱ्याच वर्षांचा कालावधी जावा लागणार आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली