Friday, November 18, 2022

हेडफोन, कर्कश आवाजामुळे बहिरेपणाचा धोका

कानाला हेडफोन लावून गाणे ऐकणारे तरुण हे महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये, वाहनांमध्ये  हमखास दिसतात. आजकाल मोबाइलप्रमाणेच सध्या हेडफोनही तरुणांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. वाहनांमधून प्रवास करताना, गाडी चालवताना, जेवताना इतकेच काय तर अगदी अभ्यास करतानासुद्धा हेडफोनवर गाणी ऐकण्याचा मोह तरुणांना आवरत नाही. पण या सवयीमुळे अनेक शारीरिक, मानसिक आजार तर जडतातच, पण त्याचबरोबर यामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचेही समोर आले आहे. याचा परिणाम  अनेकदा हा छंदच जीवघेणा ठरत आहे. कानाला हेडफोन लावून रस्ता, रेल्वे लाईन ओलांडणे, वाहन चालवताना कानाला हेडफोन लावणे हे अपघाताला निमंत्रण ठरत आहे. बहिरेपणा, मानसिक आजार याचबरोबर जीवावर बेतणे  यानुसारख्या गोष्टी या हेडफोनच्या वापरामुळे घडत आहेत. 

हेडफोन आणि कर्कश आवाजातील कार्यक्रमांमुळे जगभरातील सुमारे एक अब्ज तरुणांना बहिरेपणाचा धोका असल्याचा निष्कर्ष नवीन अभ्यासात नोंदविण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) नेत्तृत्वाखालील अभ्यासातील निष्कर्ष बीएमजे ग्लोबल हेल्थ या र्जनलमध्ये प्रकाशित झाले आहेत. या अभ्यासात गेल्या 20 वर्षांमध्ये इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच आणि रशियन भाषेमध्ये झालेल्या 33 संशोधनातील माहितीचा विचार करण्यात आला आहे.

या अभ्यासात असे आढळले की, जगभरातील 24 टक्के तरुणांमध्ये मोबाईल फोनचे हेडफोन वापरताना त्यांच्या ऐकण्याच्या पद्धती ही र्शवणसंस्थेसाठी हानीकारण होत्या. 48 टक्के तरुण जे मनोरंजनाच्या ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक आवाजाच्या संपर्कात आले होते. सर्व अभ्यास एकत्र केले तर जगभरात 6 लाख 70 हजार ते 1.35 अब्ज तरुणांना हेडफोन आणि गोंगाटाच्या संपर्कात आल्यामुळे श्रवणशक्ती बाबत धोका असल्याचे स्पष्ट झाले.

या अभ्यासाबाबत दक्षिण कॅरोलिना मेडिकल युनिव्हर्सिटीच्या ऑडिओलॉजिस्ट लॉरेन डिलार्ड यांनी म्हटले आहे की, हेडफोन्सवरून ऐकू येण्याचा धोका कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आवाज कमी ठेवणे आणि हेडफोनचा वापर कमी करणे हा आहे, पण अलिकडे लोकांना खूप मोठय़ा आवाजात संगीत आवडते. मात्र बहिरेपणाचा त्रास होवू नयेसाठी तरुणी हेडफोन वापरताना आवाजाची पातळी तपासणीसाठी स्मार्टफोनवरील अँपचा वापर करावा. हेडफोनचा वापर आणि गोंगाटाच्या ठिकाणी तुम्ही सातत्याने वावरत असाल तर उत्तारवयात याचा मोठा परिणाम होवू शकतो. यावर तोडगा काढण्यासाठी सर्वच देशातील सरकारने आवाजाच्या पातळीबाबत डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे आवाहनही डिलार्ड यांनी केले आहे. डब्ल्यूएचओच्या माहितीनुसार जगातील एकूण लोकसंख्येच्या पाच टक्क्यांहून अधिक लोकांच्या श्रवणशक्तीवर परिणाम झाला आहे. जगभरात 2050 पर्यंत ही लोकसंख्या 700 दशलक्षांपर्यंत वाढेल, असेही नमूद करण्यात आले आहे.

     शालेय विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयातील तरुणांपर्यंत सर्वांना अशाप्रकारची सवय लागली आहे. कुटुंबातील कमी होत चाललेला संवाद आणि त्यामुळे मुलांमध्ये वाढलेला एकाकीपणा या सतत कानाला हेडफोन लावण्याच्या सवयीला कारणीभूत गोष्टी आहेत, असे म्हणायला हवे.  भावनांना वाट करून देण्यासाठीचे माध्यम म्हणून मुले याकडे सहज वळतात, असे काही मानसोपचार तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे. प्रत्यक्ष भेटून बोलण्यापेक्षा मोबाइलवर बोलणे सुरू झाल्याने अनेकदा मोबाइलवर तासभरही संवाद चालतो. त्यात एकावेळी अनेक कामे करण्याच्या सोयीमुळे हे हेडफोन गरजेचे बनले आहेत. दररोज दोन दोन तासाहून अधिक हेडफोनचा वापर करणे शारीरिक आणि मानसिक आजाराला निमंत्रण असल्याचेही  मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कमी ऐकू येणे, दुसर्‍याने उच्चारलेला शब्द व्यवस्थित ऐकू न येणे, अशा तक्रारी असणार्‍या रुण्गांची संख्या वाढत आहे. तासंतास फोनवर बोलल्यामुळे किंवा जास्त काळ डीजेच्या आवाजाच्या संपर्कात राहिल्यामुळे कानांच्या पेशींची कार्यक्षमता कमी झाल्यास कायमचा बहिरेपणा येऊ शकतो,असे डॉक्टर मंडळी सांगताना दिसतात. याचा मानसिक इफेक्टही मोठा धोकादायक आहे. 

     हेडफोनचा वापर हा आता सवयीचा भाग बनल्याचे तरुण सांगत असले तरी पण हेडफोनवर गाणे ऐकताना जीवनातील परिस्थितीशी समान असे गाणे ऐकून भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला जातो. पण या स्वप्नाच्या विश्वातून बाहेर येऊन वास्तविकतेचे भान ठेवणे गरजेचे आहे. गाडी चालवताना किंवा रस्त्यावरून चालताना मोबाइल आणि हेडफोनद्वारे गाणे ऐकत असल्याने सभोवतालच्या जगाचा विसर पडतो. त्यामुळे ही सवय अपघातास कारणीभूत ठरते. म्हणून किमान गाडी चालवताना किंवा रस्त्यावर चालताना तरी याचा वापर टाळणे आवश्यक आहे. हेडफोन हे अपघातांबरोबरच पिढीला भावनिक शून्यतेकडे नेण्याचे काम करतात. त्यामुळे हेडफोनचा वापर कमी प्रमाणात केला गेला पाहिजे.  -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली            


No comments:

Post a Comment