Sunday, January 28, 2024

रिव्हर्स मायग्रेशन :उदयास येत आहे एक नवा ट्रेंड

एक काळ असा होता की माणसं गाव- खेडी सोडून नोकरी, शिक्षण आणि सुविधांच्या शोधात शहरांकडे धाव घेत होते. पण आजकाल हा ट्रेंड बदलत चालला आहे. आता लोक शहरातून गावाकडे परतू  लागले आहेत. पण तरीही आजदेखील खेड्यांतून शहरांकडे स्थलांतराचे प्रमाण त्या तुलनेत खूपच अधिक आहे. असे असले तरी अलिकडच्या वर्षां-दोन वर्षांत एक नवीन ट्रेंड उदयास येत आहे, ज्याला ‘रिव्हर्स मायग्रेशन’ म्हणून ओळखले जाते. याचा अर्थ एखादी व्यक्ती किंवा समूह त्याच्या मूळ जागी परत येणे. हा एक नवीन ट्रेंड आहे, जो भारतासह अनेक देशांमध्ये पाहायला मिळत आहे.

शहरांमधून खेड्यांकडे स्थलांतराचा वाढता कल यामागे अनेक कारणे असू शकतात. यामध्ये आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय आणि वैयक्तिक कारणांचा समावेश आहे. आर्थिक कारण म्हणजे महानगरे आणि शहरांमध्ये राहणीमानाचा खर्च वाढत आहे. शहरांना जास्त भाडे, अन्न, शिक्षण आणि आरोग्य सेवा खर्च भागवणे कठीण होत आहे. याचे सामाजिक कारण म्हणजे शहरांमध्ये राहिल्यामुळे लोकांना त्यांच्या कुटुंबापासून आणि मित्रांपासून दूर राहावे लागते, ज्यामुळे त्यांना एकटेपणा आणि एकाकीपणा जाणवतो. शहरांमधील वेगवान जीवनामुळे लोकांना अधिक तणावाखाली जगावे लागते. तर खेड्यांमध्ये जीवनाची गती मंद असते आणि लोक एकमेकांच्या जवळ राहतात. त्यामुळे त्यांच्यातील तणाव कमी राहतो.

शिवाय, शहरांमध्ये प्रदूषण आणि इतर पर्यावरणीय समस्या अधिक आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कमी प्रदूषण असलेल्या अशा ठिकाणी लोकांना जाऊन राहावेसे वाटते. शहरांच्या तुलनेत खेड्यांमध्ये प्रदूषणाची पातळी कमी आहे. गावातील वातावरण शांत आहे आणि लोक एकमेकांना मदत करण्यास तयार आहेत. यामुळे लोकांना सामाजिक सुरक्षा मिळते. खेड्यापाड्यात निसर्गसौंदर्य पाहायला मिळते. यामुळे त्यांना शांतता  आणि सुख, आनंद मिळतो. पूर्वी गावांमध्ये सुविधांची वानवा होती, पण आजकाल वीज, पाणी, रस्ते, शाळा, रुग्णालय अशा सुविधाही तिथे उपलब्ध आहेत. यामुळेच लोक आता खेडेगावातील जीवनाकडे आकर्षित होऊ लागले आहेत.

खेड्यापाड्यात राहण्याचे अनेक फायदे आहेत. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असल्याने लोकही गावाकडे स्थलांतरित होत आहेत. गावांमध्ये शेतजमीन तुलनेने स्वस्त असल्याने व्यावसायिक शेती करणे सोपे जाते. याशिवाय कृषी क्षेत्रात सरकारकडून अनुदान आणि इतर सवलतीही दिल्या जात आहेत, ज्यामुळे शेतकरी आकर्षित होत आहेत. एवढेच नव्हे तर ग्रामीण भागात उद्योग सुरू झाल्याने रोजगाराच्या संधीही वाढत आहेत. तसेच, पशुसंवर्धन, मत्स्यपालन आणि पर्यटन यांसारख्या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या चांगल्या संधींमुळे लोक शहरांमधून गावाकडे परतत आहेत.

‘रिव्हर्स मायग्रेशन’ हा अलीकडच्या दोन-तीन वर्षांतला भारतातील वाढता कल आहे. 2020 मध्ये कोविड-19 महामारीमुळे अनेक स्थलांतरित कामगारांना त्यांच्या मूळ ठिकाणी परतावे लागले. या महामारीनंतर, पर्यावरण शुद्ध असलेल्या ठिकाणी जाऊन राहण्याचा लोकांचा कल वाढला. घरून काम करण्यासारखे पर्याय उपलब्ध असल्यामुळे हे सर्व शक्य झाले. वायू प्रदूषणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्याची उदाहरणे आहेत. यामुळेच समाजातील श्रीमंत वर्गातील लोक आता गावाकडे आकर्षित होऊ लागले आहेत.

गावागावात जमीन खरेदी करून फार्म हाऊस बांधून शेती करत आहेत. शहरांसारख्या सुविधा खेड्यात उपलब्ध नसल्या तरी आजकाल लोक आपल्या आरोग्याबाबत अधिक जागरूक होत आहेत. सेंद्रिय पदार्थ आणि भरड धान्यांचा कल पुन्हा वाढत आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती आणि भरड धान्य उत्पादनात लोकांची आवड वाढत आहे. याशिवाय, गावांमध्ये दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन यांसारख्या कार्यांसाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळेच काही लोक ग्रामीण भागात नवीन उद्योग उभारत आहेत, कारण येथे शहरांच्या तुलनेत व्यावसायिक स्पर्धा कमी आहे आणि कामगारही सहज उपलब्ध आहेत.

खरं तर, काही काळापर्यंत शहरांमध्ये जाऊन, नोकरी करून, स्थायिक होऊनच जीवन सुखी होऊ शकतं, असा समज होता. मात्र आता गावांच्या विकासाबरोबरच लोकांच्या विचारातही बदल झाला आहे. खेडेगावात राहूनही आर्थिक लाभ मिळवून सुखी जीवन जगता येते, हे आता लोकांना समजू लागले आहे.

‘रिव्हर्स मायग्रेशन’चे अनेक सकारात्मक परिणाम होऊ शकतात. यामुळे गावांमध्ये कृषी, पशुसंवर्धन आणि पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढतात. खेड्यापाड्यात व्यापार आणि उद्योग सुरू झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेत वाढ होत आहे. यामुळे शहरांमधून स्थलांतरित होणाऱ्या लोकांची संख्या वाढणार आहे  आणि शहरांमधील प्रदूषणही कमी होण्यास मदत होणार आहे. याशिवाय शहरे आणि गावांमधील सामाजिक एकोपाही वाढेल. शहरी लोकांना खेड्यातील संस्कृती आणि जीवनशैलीची ओळख होईल, तर ग्रामीण भागातील लोकांना शहरी लोकांच्या अनुभवांचा फायदा होईल. पण त्याचे नकारात्मक परिणामही होतात. शहरांमधून खेड्याकडे स्थलांतरामुळे महानगरे आणि शहरांमध्ये कामगारांची कमतरता निर्माण होते, ज्याचा आर्थिक विकासावर परिणाम होतो.

‘रिव्हर्स मायग्रेशन’मुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा आणि सेवांवर दबाव येऊ शकतो. जेव्हा ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांची संख्या वाढते तेव्हा पायाभूत सुविधा आणि सेवा वाढवण्याची गरज असते. त्यामुळे सरकारवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडू शकतो. ग्रामीण भागात लोकसंख्येच्या वाढत्या दबावामुळे पाणी, जमीन आणि घरे यासारख्या संसाधनांची कमतरता निर्माण होऊ शकते. जेव्हा लोक शहरांमधून खेड्यांकडे परत जातात तेव्हा ते शहरी जीवनशैली आणि मूल्येही सोबत घेऊन येतात. शहरी लोक ग्रामीण भागात येऊन स्वतःची संस्कृती आणि जीवनशैली प्रस्थापित करू शकतात, त्यामुळे ग्रामीण भागातील पारंपारिक संस्कृती आणि जीवनशैली धोक्यात येऊ शकते.

‘रिव्हर्स मायग्रेशन’चे सकारात्मक परिणाम वाढवण्यासाठी आणि नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी सरकार आणि सामान्य जनतेने एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. या ट्रेंडचे नियोजनबद्ध पद्धतीने व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील वीज, पाणी, रस्ते, शाळा, रुग्णालये या मूलभूत सुविधांच्या विकासावर सरकारला भर द्यावा लागणार आहे. गावांमध्ये रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण झाल्या पाहिजेत. त्यासाठी कृषी आणि पशुसंवर्धनालाही चालना द्यावी लागेल. याशिवाय गावांच्या विकासातही लोकांनी भरीव योगदान द्यावे. ग्रामीण भागात स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारी लोकांनी घेतली पाहिजे. खेड्यापाड्यातील पारंपारिक आणि सांस्कृतिक मूल्ये जपणेही महत्त्वाचे आहे.

खरे तर, हा अद्याप उलट स्थलांतराचा प्रारंभिक टप्पा आहे आणि त्याचा दर खूपच कमी आहे. परंतु वाढत्या विकास प्रक्रियेमुळे हा ट्रेंड काय रूप घेतो आणि त्याचा शहरी आणि ग्रामीण जीवनावर कसा परिणाम होतो हे येणारा काळच सांगू शकेल. तथापि, ही प्रवृत्ती भविष्यातही कायम राहण्याची शक्यता आहे कारण शहरे प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंगसाठी असुरक्षित होत आहेत, ज्यामुळे पर्यावरणाच्या समस्या वाढत आहेत. त्यामुळे लोकांचा गावाकडे कल वाढेल. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासामुळे रोजगाराच्या संधी वाढत आहेत. अशा स्थितीत बहुतांश लोक शेतीच्या कामाकडे आकर्षित होतील.- मच्छिंद्र ऐनापुरे

No comments:

Post a Comment