Monday, October 17, 2016

शरीराला पाण्याची गरज


      काहीजण सांगतात की ,सकाळी उठल्यावर सगळ्यात अगोदर दोन ग्लास पाणी प्यायला पाहिजे.आणखी कोणी दुसरेच काही सांगतं.जगातल्या जलसंकटाबाबत ज्याला कसलीही  गंध वार्ता नाही ,अशी मंडळी सकाळी सकाळी दोन दोन लीटर पाणी प्यायचा सल्ला देतात. जितकं पाणी प्याल,तितकं चांगलं,असंही ठणकावून सांगतात. जादा पाणी पिल्याने शरीराला कोणताच अपाय होत नाही, कारण जादा झालेले  पाणी शरीर स्वतः बाहेर फेकते आणि त्याच्या बरोबर शरीरातील घाणदेखील बाहेर टाकते,असेही सांगितले जाते.हे असल्या सल्ल्यांनी  शरीराला कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही ,त्यामुळे लोक असे सल्ले स्वीकारतात किंवा  अजमावूनही पाहताना दिसतात.पण शास्त्रज्ञ सांगतात की ,अशा सल्ल्यांमध्ये  कसलाच दम नाही आणि या मागील विचाराच्या द्रुष्टीत  सत्यही नाही. आपल्याला माहीत आहेच,आवश्यकतेपेक्षा पाणी कमी पिल्याने  शरीरात डीहायड्रेशन होते.आणि जरूरतपेक्षा अधिक पाणी पिले तर हायपोहायड्रेशन होऊ शकतं. उलट  हायपोहायड्रेशन शरीराला नुकसान पोहचवू शकतं. जादा पाणी पिल्याने शरीरातील  सोडियमचे प्रमाण कमी होते आणि ते धोकादायक होऊ शकतं.शिवाय किडनीचे  कामदेखील वाढते. म्हणजे आपल्याला जीवन देणारे पाणी अधिक झाल्याने जीवावरसुद्धा उठू शकते.
    काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातल्या शास्त्रज्ञांच्या एका टिमने आपल्या शरीरात जादा झालेल्या पाण्याने काय होतं किंवा काय घडू शकतं ,याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला.यांसाठी त्यांनी काही लोकांवर प्रयोगदेखील केले.त्यांनी त्या लोकांचे दोन गट केले.एका गटाकडून खूप उशीरापर्यंत कसरत करून घेतली.कारण व्यायाम केल्याने घाम निघाल्यानंतर  त्यांना पाण्याची गरज जास्त  लागते. दुसऱ्या गटाला अशा ठिकाणी ठेवलं गेलं की ,त्यांच्या शरीरातून घाम निघणार नाही.काम केल्यानेही त्यांच्यावर फारसा परिणाम होणार नाही. यानंतर दोन्ही गटातील लोकांना एकाच वेळी पाणी प्यायला देण्यात आले. तसेच ते पाणी पीत असताना त्या सगळ्यांचे 'फंक्शनल एमआरआय'देखील करण्यात आला. या 'एमआरआय'मध्ये असे आढळून आले की ,ज्या  लोकांनी व्यायाम केला होता त्या लोकांच्या मेंदूने आरामात पाण्याचा स्वीकार केला.पण दुसऱ्या गटातील लोक जबरदस्तीने पाणी पिण्याचा प्रयत्न करत होते.वास्ताविक  त्यांना तहान लागलेली नव्हती. या गटातील लोकांच्या मेंदूतील कोशिकांमध्ये तणाव दिसत होता. कारण नसताना ते पाणी पीत होते.
शास्त्रज्ञांचे म्हणणे असे की ,जितकं आवश्यक आहे तितकंच खावे तसे,पाण्याच्याबाबतीतही आहे.तहान लागली असेल तेवढेच पाणी प्यावे. आपल्याला भूक लागते , याचा सरळ अर्थ असा की , आपल्या शरीराला  ऊर्जेची गरज आहे. त्याप्रकारे ज्यावेळेस आपल्याला तहान लागते,त्यावेळेस शरीराला पाण्याची गरज आहे. आवश्यकतेपेक्षा खाल्लेले अन्न आपल्याला नुकसान पोहचवते. तसेच जादा पाणी शरीराला धोका पोहोचवते.आपण जादा मीठ असलेले  भोजन खाल्ले की आपल्याला  अधिक तहान लागते. कारण शरीरातील किंवा रक्तातील सोडियमची मात्रा कमी करण्यासाठी जादा पाणी लागते .आपले आणि बाकीच्या जीव -जंतूचे शरीर अशा प्रकारे विकसित झाले आहे की ,त्याला स्वतः ला आपल्या पोषनांची गरज ठाऊक आहे.आपल्या शरीराला माहीत आहे ,त्याला केव्हा , आणि किती पाणी लागते .यांसाठी त्याला सोशल मिडियातील वैद्यांची गरज लागत नाही.सोशल मीडिया आपल्या सामाजिकतेशी निगडीत आहे.आमच्या आरोग्यासाठी नाही.

Sunday, October 16, 2016

मच्छिंद्र ऐनापुरे: मुदतपूर्व बाळंतपण म्हणजे एक आघुरी प्रकारच !

मच्छिंद्र ऐनापुरे: मुदतपूर्व बाळंतपण म्हणजे एक आघुरी प्रकारच !:       विशिष्ट दिवशीच बाळाला जन्म देण्याच्या आग्रहापायी दोन महिलांना आपला जीव गमवायला लागल्याच्या घटना पुणे जिल्ह्यात घटल्या आहेत. या घटन...

भारतात 25 टक्के क्षयरोगी


     क्षयरोग जगभरातल्या लोकांचा जीव घेत आहे.मिनिटाला तिघांचा मृत्यू होत आहे.जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की, विविध देशातील सरकारे या रोगाच्या अटकावासाठी कायद्याने काहीच करायला तयार नाहीत,असं आरोग्य संघटनेच म्हणणं आहे.
     आकडेवारीनुसार गेल्यावर्षी जगभरातल्या क्षयरोगग्रस्त रुग्णांची संख्या 1.04 कोटी होती.त्याच्या अगोदरच्या सालात म्हणजे 1914 मध्ये हीच संख्या 96 लाख होती.डब्ल्यूएचओचे डायरेक्टर जनरल डॉ. मार्गेट चॅन यांच्या म्हणण्यानुसार यासाठी खूप काही करण्याचं बाकी आहे. युएनने 2015 ते 2030 पर्यंत क्षयरोगाने मृत्यू होणार्या संख्येत 90 टक्के घट आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे.याशिवाय क्षयरोगाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये 80 टक्के घट आणण्याच्यादृष्टीने लक्ष्य निश्चित केले गेले आहे.मात्र रोगाच्या उपचारासाठीचे प्रयत्न कमी असल्याकारणाने निर्धारित लक्ष्य गाठणे अवघड असल्याचे म्हटले जात आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की, अमेरिकेसारख्या श्रीमंत आणि विकसित देशानेदेखील या रोगाकडे फारसे लक्ष दिले नाही. या रोगाच्या निर्मूलनासाठी फारच थोड्या निधीची तरतूद हा देश करीत आला आहे.मार्गेट म्हणतात की, अमेरिका क्षयरोगापेक्षा अधिक फंड एचआयव्ही आणि मलेरियासाठी उपलब्ध करून देते.युरोपीय युनिअनदेखील एचआयव्ही आणि मलेरियाच्या तुलनेत क्षयरोगासाठी कमीच तरतूद करते. जगातले बहुतांश सगळ्याच देशातील सरकारे या रोगाच्या अटकावासाठी निष्क्रिय आहेत.या रोगाच्या खात्म्यासाठी सगळ्यांनीच पावले उचलण्याची गरज असून तशी व्यवस्था न झाल्यास रोग आणखी वाढण्याचा धोका आहे.

     डब्ल्यूओने भारताल्या वाढत्या रोगाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. जगभरातल्या क्षयरोगाच्या केसेसपैकी 25 टक्के केसेस भारतातील आहेत.गुजरातमध्ये सर्वाधिक क्षयरोगी आहेत.भारतात याबाबतीत अजूनही राष्त्रव्यापी सर्व्हे झालेला नाही.मात्र सरकार 2019 पर्यंत सर्व्हे करायला तयार आहे.यानंतर इंडोनेशिया आणि चीनमध्ये दहा-दहा टक्के रुग्ण आहेत.पाकिस्तानमध्ये पाच टक्के तर दक्षिण आफ्रिकेत पाच टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण आहेत.या सहा राष्ट्रांमध्येच 60 टक्के क्षयरुग्ण आहेत.  

Saturday, October 15, 2016

फिरकी भारताचे मोठे शस्त्र


     क्रिकेटची काशी म्हणून ओळखल्या जाणार्या लॉडर्स मैदानावर एक फलक लावलेला आहे. त्या फलकावर ज्या ज्या विदेशी गोलंदाजांनी डावात पाच- पाच बळी मिळवले आहेत किंवा फलंदाजांनी 100- 100 धावा कुटल्या आहेत, त्या सगळ्यांची नावे लिहिलेली आहेत. एखाद्या फलंदाजाने काढलेल्या 100 धावा किंवा गोलंदाजाने घेतलेले पाच बळी क्रिकेटमध्ये इक्वल किंवा समसमान समजले जातात.हीच गोष्ट इंदोरमधल्या कसोटी सामन्यावेळी आर. अश्विनच्या डोक्यात होती. त्यामुळेच तो म्हणाला होता, मला भारतीय गोलंदाजांचा विराट कोहली व्हायचं आहे.याचा अर्थ असा की, विराट कोहलीला प्रत्येक डावात शतक ठोकायचं असतं.तसंच आर. अश्विनला प्रत्येक डावात पाच विकेट मिळवायचे असतात. इंदोर कसोटीत स्थीरस्थावर झालेल्या न्युझिलंडच्याबाबतीत आश्विनने हेच केले. त्याने टॉम लॅथमला आपल्याच गोलंदाजीवर झेल घेऊन बाद केले आणि त्याच्या पुढची फळी त्याने सपासप कापून काढली.118 धावांवर पहिली विकेट गमावलेल्या न्युझिलंडची पुरी टिमच्या टिम 299 धावांत गारद झाली. या पहिल्या डावात अश्विनने सहा गडी बाद केले. तर दुसर्या डावात सात विकेट घेऊन त्याने आपल्या कारकीर्दीतील सर्वात चांगलं प्रदर्शन केलं.
     आर. अश्विनने एका डावात पाच गडी बाद करण्याची कामगिरी 20 वेळा केली आहे.20 वेळा एकाच डावात पाच वेळा गडी बाद करण्याच्या विक्रमात आर. अश्विन शेन वॉर्न,मुथय्या मुरलीधारन,अनिल कुंबळे आणि हरभन सिंह अशा दिग्गज गोलंदाजांच्या पुढे आहे. आपल्या कारकीर्दीच्या सुरवातीला 39 कसोटी सामन्यात शेन वॉर्न याने 167, मुथय्या मुरलीधरनने 177 आणि हरभजसिंहने 172 बळी मिळवले होते. हरभजसिंहने 59 कसोटी सामन्यांमधून ही संधी मिळवली होती. त्यांच्यापेक्षा कमी कसोटी सामन्यात ही कामगिरी करणारे जगात दोघेच गोलंदाज आहेत. सिडनी बार्न्स  आणि कॅलरी ग्रिमेट ही ती दोन गोलंदाज. दोन्हीही गोलंदाज 19व्या शतकाच्या प्रारंभी क्रिकेट खेळत होते. आजच्या आधुनिक क्रिकेटचा विचार केला तर अश्विनने ही कामगिरी कमी कालावधीत केली आहे, असे म्हणायला हरकत नाही. तो सव्वा दोनशे बळी घेण्याच्या अगदी जवळ पोहचला आहे.त्याने आतापर्यंत मिळवलेल्या 213 बळींपैकी निम्म्यापेक्षा जास्त बळी विरोधी संघाच्या टॉप फलंदाजांचे घेतलेले आहेत. यापैकी 15 टक्के बळी तर त्याने अशा फलंदाजांचे घेतले आहेत, जे मैदानावर  स्थिरावलेले होते. म्हणजेच त्यांनी पन्नासपेक्षा अधिक धाव्या काढलेल्या होत्या.

     फलंदाजाला चकवा देऊन बाद करण्याची अश्विनची खासियत आहे. आपल्या लाईन, लेंथ आणि टर्न यावर अधिक विश्वास ठेवणार्या अश्विनने इंदोरमध्ये फलंदाजांना फ्रंटफुट किंवा बॅकफुटवर  खेळवून संभ्रमात टाकत बळी मिळवले आहेत.ही कुठल्याही गोलंदाजासाठी मोठी उपलब्धी आहे. ती आर. अश्विनला साधली आहे. गोलंदाजीबरोबरच अश्विनने फलंदाजीतही चमकदार कामगिरी केली आहे.चार कसोटी शतकांसह सहा अर्धशतकेही त्याने झळकावली आहेत. विशेष म्हणजे त्याने ही कामगिरी भारत संकटात असताना केली आहे.तो संघात दाखल झाला तेव्हा तो अष्टपैलूच होता, पण त्याच्यावर लोकांची दृष्टी उशिराने पडली, असं त्याचं म्हणणं आहे.

Wednesday, October 12, 2016

सकारात्मक विचार



     21 वे शतक हे संधीचे आणि आव्हानाचे आहे. विज्ञानाने लावलेले शोध आणि तंत्रज्ञानात झालेल्या अदभूत बदलांमुळे मानवी जीवन पार ढवळून निघालं आहे. अर्थात तंत्रज्ञानाने मानवी जीवन सुखकर झालं आहे. मात्र ते अधिक गुंतागुंतीचं झालं आहे. संधी, आव्हान यामुळे जीवनात ताणतणाव वाढले आहेत. त्यामुळे नैराश्य माणसाला येऊन चिटकलं आहे. त्यातून ब्लडप्रेशर,हृदयविकार यासारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. किडनी,कॅन्सरसारखे जीवघेणे आजार बळावले आहेत.यात माणूस पार खचून जातो.त्याच्यातला जगण्याचा आनंद निघून जातो.
     पण सकारात्मक विचार अशा लोकांचं आयुष्य बदलू शकतो. त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवू शकतो. जीवनाविषयी एक आनंदी आणि आशावादी दृष्टिकोन तयार करू शकतो. सकारात्मक दृष्टीनं आपलं शरीर आणि मन आनंदी ठेवू शकतो. त्यांच्यातले आजार पळवून लावू शकतो.अशी कितीतरी उदाहरणं या जगात आहेत. सकारात्मक विचार आणि सतत सकारात्मक शब्दांचा वापर त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेलं आहे.
     एका रुग्णाची कथा.त्याने सकारात्मक विचाराची अदभूत शक्ती जाणली होती.तो गेल्या पाच वर्षांपासून किडनी आणि हृदयरोगाने आजारी आहे. अचानक एक दिवस त्याने आपला विचार बदलला. आणि आपल्या आरोग्याविषयी तो स्वास्थ्यवर्द्धक शब्दांचा वापर करत उत्साहपूर्ण जीवन जगू लागला.विचार आपला स्वभावच नाही तर आपले आरोग्यदेखील सुधारतो आणि बिघडवतोही.याची त्याला प्रचिती आली.
     अमेरिकेचा प्रसिद्ध मनोवैज्ञानिक व मेडिसीन विशेषज्ञ जॉर्ज डब्लू क्रेन म्हणतो, आधुनिक उपचार पद्धतीच्या प्रदीर्घ अनुभवाच्या आधारानुसार मला असं वाटतं की,सकारात्मक विचारांचा शरीरिक अंगांवर चांगला प्रभाव पडतो.तर नकारात्मक विचार शरीरातल्या आंतरिक अंगांवर आणि स्वास्थ्यवर्धक हार्मोन्सच्या कार्यांमध्ये अडथळा निर्माण करतो.
     विन्सेंट पील एक प्रसिद्ध मनोविश्लेषक आहे.तोदेखील म्हणतो की, औषधे मस्तीष्क आणि ग्रंथींना प्रभावित करतात.पण निरंतर सकारात्मक विचार केल्याने शरीराला निरोगी ठेवणार्या हार्मोन्सचं उत्सर्जन होतं आणि आंतरिक अंग सुदृढ व्हायला लागतात. कॅन्सरवर विजय मिळवणार्या क्रिकेटपटू युवराजसिंगचं म्हणणं आहे की, जीवनाप्रती सकारात्मक दृष्टिकोन आणि जिजीविषाचं फलस्वरुप यामुळेच तो या घातक रोगाचा सामना करू शकला आणि त्यात यशस्वी झाला.
     ॅकेडमिक ऑफ सायकोसोमेटिक मेडिसीनचे माजी अध्यक्ष अल्फ्रेड जे कँटर यांचं म्हणणं असं आहे की,सकारात्मक शब्दांचा सहजगत्या वापर केल्यानेदेखील आरोग्य सुदृढ बनतं. त्यांच्या मते, मी आजारी पडणार नाही, हे एक अर्ध-सकारात्मक कथन आहे. यापेक्षा सहजगत्या असं म्हणत चला की, आज मी छान राहीन. माझं संपूर्ण अस्तित्व स्वास्थ्यवर्धक राहील. के वाक्य पूर्ण सकारात्मक आहे. म्हणून अधिक क्रियाशील आहे.
   तुम्ही जसा विचार करता तसेच तुम्ही होता, हा निसर्गनियम आहे.त्यामुळे नेहमी मुखात,मनात सकारात्मक विचार, शब्द असायला हवेत. सकारात्मक विचार, वाक्यांच्या सततच्या वापरामुळे शारीरिक आणि मानसिक स्थिती आरोग्यपूर्ण ठेवली जाऊ शकते.                                           




Monday, October 10, 2016

चिनी वस्तू: भारतीय नागरिकांची जबाबदारी


      सध्या चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा मेसेज  सोशल मिडियावर फिरत आहे. कुठल्या तरी अख्ख्या गावाने चिनी वस्तूंवर बहिष्कार घातले असल्याचे त्यातून सांगितले जात आहे. जरा विचार केला तर खरेच यातून आपण घेऊ शकतो. सध्या भारतीय बाजारपेठेत चिनी वस्तूने धुमाकूळ घातला आहे. स्वस्त वस्तू म्हणून त्याची आपण खरेदी करत आहे. पण यातून आपण आपला पैसा चीनला देतो आहे. त्यामुळे साहजिकच त्यांची अर्थव्यवस्था आपण बळकट करत आहोत. वास्तविक चीन आपला मित्रदेश कधीच राहिला नाही. आपल्या देशाची प्रगती त्याला खुपते आहे. त्यामुळे अनेक स्तरावर तो देश आपल्या भारताला खाली खेचण्याचा प्रयत्न करतो आहे. अशा देशातील वस्तू खरेदी करून आपण त्यालाच पाठबळ देत आहोत. देशात, राज्यात जाती-धर्मासाठी लोक एकत्र येत आहेत. मोर्चे काढत आहेत. एकीचे प्रदर्शन करत आहेत. याच लोकांनी देशासाठी एकी दाखवून चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा. देशातील एकजुटीचे प्रदर्शन दाखवावे.
     चीनने 1962 साली आपल्याशी युद्ध केले. त्यावेळी आपली सैन्य संख्या उत्तरभागात तोकडी म्हणजे  10 ते 12 हजार होती. ती संख्या चीनच्या विशाल 80 हजार सैन्यासमोर फारच छोटी होती. युद्धात आपले 1047 सैनिक घायाळ झाले तर 1383 सैनिकांना वीरगती प्राप्त झाली. 1269 सैनिक बेपत्ता झाले तर 3968 सैनिक बंदी झाले. युद्धात आपला पराजय झाला. परिणामी चीनने तिबेट काबीज केला व आपला बराचसा भूभाग बळकावला. त्या युद्धात आपण धडा घेतला.पुढे पाकिस्तान-भारत यांच्यात सहा वर्षांनी म्हणजे 1971 मध्ये युद्ध झाले. तेव्हा मात्र पूर्व पाकिस्तान नष्ट झाला. त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधींनी बांगला देश घोषित केला. तेव्हापासून पाकिस्तान भारतावर अधिकच आक्रमक होत गेला. भारताचा सर्वनाश हा एकच उद्देश लक्षात ठेवून त्याने चीनचे सहाय्य घेतले व स्वत: अण्वस्त्रधारी बनला.
      आजही पाकची मदत घेत आहे. पूर्व पाकिस्तानचा बदला घ्यायचा आहेच. तेव्हा काश्मीर हे भारतापासून वेगळे केल्याशिवाय गत्यंतर नाही. याच भूमिकेत पाकिस्तानात सरकार कार्यरत असते. आजही त्याच्या कुरबुर्या सुरूच आहेत. यात चीन त्याला सहाय्य करतो आहे. पाकिस्तानने चीनला पाकव्याप्त काश्मीरमधील काही भूभाग दिला आहे. तिथे चीन रस्ते बांधत आहे. चीनला सीयाचीनच्या वरच्या भागातून पाकिस्तामध्ये प्रवेश मिळतो. तो बलुचिस्तानमार्गे जातो. म्हणजे या मार्गाने प्रवेश करून अरबी समुद्रात त्याला स्वत:च्या युद्धनौका प्रस्थापित करून तिथे स्वत:चे वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे म्हणून पाकिस्तान-चीन मैत्री दिसून येते. भारताच्या वाढत्या प्रभावावर चीन खूष कसा राहणार? म्हणून भारताच्या युनोमधील स्थायी सदस्यावर चीनचा नेहमी आक्षेप असतो. एवढेच नव्हे तर मध्ये (एनएसजी) एन.एस.जी. च्या मुद्यावरसुद्धा सगळे अण्वस्त्रधारी देशभारताला पाठिंबा देत असताना चीनने विरोधच केला. न्युक्लीअर सप्लाय ग्रुप मध्ये फक्त निवडक देश आहेत अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन यांच्या भारताला पाठिंबा आहे.
     आता नुकतेच पाकिस्तानने काश्मीरमध्ये उरी कॅम्प मध्ये दहशतवादी हल्ला करून 18 भारतीय सैनिक मारले. या भ्याड हल्ल्याच्या विरोधात केंद्र सरकारने भूमिका घेतली होती कीखून और पानी एकसाथ बहाया नहीं जायेगाम्हणजे काश्मीर मधून सिंधू नदीचे ज ेपाणी पाकिस्तानला फुकट जाते त्या पाण्यावर सिंधू कराराप्रमाणे अंकुश घालण्यात यावा. कराराप्रमाणे भारताच्या हिस्स्यातील 20 टक्के पाणी भारत रोखू शकतो. पाकिस्तान घाबरला. परंतु त्याला लगेच चीनने साथदिली. चीनने ब्रह्मपुत्रेचे पाणी रोखले. हा चीन भारताचा कधीच मित्र म्हणून राहिला नाही.
     भारत व चीन लोकसंख्येने आता जवळ जवळ आले आहेत. भारत हा विकसनशील म्हणून झपाट्याने प्रगती करत आहे. भारत म्हणजे मोठी व्यापारपेठ आहे. जगाच्या बाजारपेठेच्या मानाने भारताची मोठी बाजारपेठ म्हणून गणल्या जाते. येथे अमेरिका, चीन, जापान, सारखे देश वस्तू पाठवून पैसा कमवतात. चीनची सुद्धा अर्थव्यवस्था भारताच्या बाजार पेठेवर काही प्रमाणात नक्कीच अवलंबून आहे. अशा वेळी आपण सारे नागरिक मिळून चीनची अर्थव्यवस्था खिळखिळी करू शकतो. चीनच्या वस्तू स्वस्त मिळतात म्हणून आपण वापरतो. चायनीज वस्तूंवर पूर्णणे बहिष्कार टाकणे, ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे. विद्युत उपकरणे, मोबाईल, बॅटरी, फटाके, डेकोरेशन, खेळणी वगैरे कितीतरी वस्तू बाजारात दिसतात. यासर्व गोष्टींवर बंदी आणायला हवी. आपले सैनिक रात्रंदिवस चीनच्या सीमेवर पहारा देतात. एवढया थंडीत, पाण्यात, बर्फात ते कुटुंबापासून दूर राहून स्वत:चा जीव धोक्यात टाकून आपले रक्षण करतात. त्यांच्यामुळेच आपण सुखी जीवन जगत असतो. याची जाणीव प्रत्येक नागरिकाला व्हायला पाहिजे.
     आता दसरा-दिवाळी जवळयेत आहे. आपण दरवर्षीप्रमाणे आपले घर रंगवून सजावट करतो. विद्युत रोशणाई करतो. त्यावेळी प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे की चीनच्या वस्तू गांभीर्याने नाकारायला हव्या. रोशणाईसाठी भरपूर चायनीच दिवे बाजारात असतील. दोन दिवे कमी वापरले तरीही चालेल पण चीनच्या बनावटीचे दिवे नको, ही भूमिका घ्यायला हवी. याचा परिणाम नक्कीच होईल. चीनलासुद्धा वाटायला पाहिजे की भारतात त्याच्याविरुद्ध लाट आहे. या लेखाचा उद्देश हाच की मोठया व्यापारांनीच याची दखल घ्यायला हवी. म्हणजे चीनी वस्तू खुल्या बाजारात उपलब्ध राहणारच नाहीत. ही एकप्रकारची देशसेवाच होय. चीनी वस्तूंवर बहिष्कार म्हणजे आपण आपल्या सैनिकांना आतून सहाय्य करतो. याउलट चीनी वस्तूंचा वापार म्हणजे आपल्या सैनिकांचा अपमान करण्यासारखे होईल. हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे.         




Monday, October 3, 2016

भावनांवर नियंत्रण आवश्यक

    सामाजिक, सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणार्या पुणे शहरात प्रेमभंग आणि घरच्यांना प्रेम संबंधाची माहिती समजेल, या भीतीने तीन अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली. सुमारे महिनाभरापूर्वी दोन शालेय विद्यार्थिनींनीसुद्धा स्वत:चे हात बांधून नदीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनांमुळे सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. शाळा-महाविद्यालयांच्या शिक्षकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाली आहे.
     प्रसार माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेमविषयक भावनांची माहिती प्राप्त होते. मुलांच्या तारुण्याबद्दल असणार्या संकल्पना आणि पालकांचा विचार याबाबत मोठी तफावत आहे. किशोरवयात होणारे मानसिक आणि शारीरिक बदल, त्याचवेळी वाढती स्पर्धा आणि आयुष्याच्या बदलत असलेल्या संकल्पना यांचा मेळ घालणे विद्यार्थ्यांना अनेकदा कठीण होत आहे. . किशोरवयीन मुलांमध्ये प्रेमप्रकरण, करियरची चिंता, व्यसनाधीनता, प्रेमप्रकरणांमध्ये स्वाभिमान आणि पराभव एकत्र आल्याने मुला-मुलींकडून आत्महत्येचा मार्ग स्वीकारला जातो. आत्महत्या करण्यामागे अनेक कारणे असून, सामाजिक, सांस्कृतिक, नातेसंबंध, तत्कालीन किंवा दीर्घकालीन राग आणि भ्रमनिरास अशी कारणे असू शकतात. प्रत्येक आत्महत्या टाळता येत नाही; मात्र समुपदेशन, योग्य पद्धतीने संवाद याने हे प्रमाण निश्चित कमी करता येऊ शकते; तसेच आत्महत्या करणार्या व्यक्तीनंतर मागे राहणार्या व्यक्तींनी स्वत:ला दोषी धरू नये. समाजानेही आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्ती, प्रेमप्रकरणातील जोडीदार इत्यादींना दूषणे न देता त्यांचा समाजाने योग्य पद्धतीने स्वीकार करावा.
     सुरुवातीपासूनच संस्कृतीच्या नावाखाली समाजाने लैंगिक शिक्षणाला विरोध केला. मात्र, डॉक्टर, समुपदेशक आणि स्वयंसेवी संस्थांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहायला हवे. पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातील सर्व टप्प्यांवर समुपदेशन करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी घरात व घराबाहेर काय करतात, याकडे लक्ष द्यायला हवे. भारतीय समाज हा मुळातच भावनाप्रधान असल्याने मुलांमध्ये भावनेच्या भरात वाहून जाण्यामुळे आत्महत्येच्या प्रसंगांमध्ये मोठया प्रमाणात वाढ होत आहेकिशोरवयीन मुलांमध्ये अनेकदा मी म्हणेन तसेच झाले पाहिजे, असा अट्टहास असतो. तसे न झाल्यास येणार्या रागातून कोणाला तरी शिक्षा झाली पाहिजे, या एकाच उद्देशाने आत्महत्या केली जाते. ही शिक्षा स्वत:ला करणे म्हणजेच आत्महत्या. मात्र भावनांवर योग्य पद्धतीने नियंत्रण मिळविण्याची शक्ती या तरुणांमध्ये नसल्याने आत्महत्या हा टोकाचा मार्ग ते स्वीकारताना दिसतात. प्रेमभंग, करियरमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने आलेली निराशा, स्वत:बद्दल असणार्या अवास्तव अपेक्षा पूर्ण न होणे अशा आयुष्याच्या टप्प्यावरील एखाद्या घटनेवरून जीवनाला नापास करणे अतिशय चुकीचे आहे.
     किशोरवयीन मुला-मुलींच्या शारीरिक आणि मानसिक बदलाच्या कालावधीत पालकांशी संवाद तुटल्यामुळे दिवसेंदिवस अनेक समस्या उभ्या राहू लागल्या आहेत; तसेच वाढत्या वयात भुलविणारे प्रसंग, प्रेमाचे आकर्षण, स्वत:च्या महत्त्वाकांक्षा आणि सामाजिक, कौटुंबिक दबावामुळेकोवळ्या कळ्याउमलण्याआधीच आत्महत्येचा मार्ग स्वीकारून स्वत:ला चुरगाळून टाकत आहेत. त्यामुळे जग समजण्याआधीच, जग सोडण्याच्या निर्णयाप्रत जाणार्या मुला-मुलींना रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची वेळ आली आहे. भविष्यात ही समस्या आणखी तीव्र होण्यापूर्वी समाजातील सर्व घटकांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.