Friday, September 11, 2020

रिकामटेकड्यांचे उद्योग 'गुलामगिरी'च्या दिशेने...


आपला भारत आदेश आज अनेक अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेल्या टाळेबंदीने देशाचं अतोनात नुकसान झाले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.अनेक छोट्या-छोट्या असंघटित कामगारांचे रोजगार बुडाले आहेत. देशाचा जीडीपी दर -23 टक्क्यांवर घसरला आहे. हे सगळे होत असताना देशाची परिस्थिती सावरण्यासाठी केंद्र सरकार काहीच करताना दिसत नाही. उलट देशावर जे संकट ओढवले आहे,ती 'देवाची करणी' असल्याचा साक्षात्कार देशाच्या अर्थमंत्र्यांना झाला आहे. मागे ओढवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी20 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते, त्याचे काय झाले समजत नाही. अशा परिस्थितीत देशातल्या न्यूज चॅनेल आणि सोशल मिडियावर मात्र सुशांतसिंग, रिया चक्रवर्ती आणि आता कंगना राणावत यांचीच चर्चा करत त्यावर किस पाडला जात आहे. आणि या सगळ्या गोष्टींना केंद्र आणि राज्य सरकारांना जबाबदार धरून आरोप-प्रत्यारोप यांच्या फ़ैरी झाडल्या जात आहेत. सोशल मीडियावर तर राजकीय पक्षांच्या सुपाऱ्या घेतल्याचेच चित्र दिसत आहे. इथे कुणीच माघार घ्यायला तयार नसतो, माझंच कसं खरं हे 'खोटं बोल पण रेटून बोल' अशा पद्धतीने सांगितलं जातं आहे. त्यामुळे देशातल्या ओढवलेल्या आर्थिक परिस्थितीचं कुणालाच गांभीर्य दिसत नाही. प्रासारमाध्यम आणि सोशल मीडियावर जो काही गोंधळ चालू आहे, याचा फायदा सत्ताधारी आणी विरोधक दोघांनाही होत आहे. मात्र यामुळे प्रमुख प्रश्नांना सोयीस्करपणे बगल दिली जात आहे. आणि हेच आपल्या देशाचं दुर्दैव आहे. यावरून एक गोष्ट साफ दिसून येत आहे की, आपल्या देशात रिकामटेकड्या लोकांची संख्या प्रचंड आहे. खायचं-प्यायचं आणि दिवसभर सोशल मीडियावर दिवस घालवायचा. 'हा त्याला असं म्हणाला,तुम्हाला काय वाटतं?','राज्य सरकारनं असं केलं, त्यांचं वागणं योग्य आहे का?', 'केंद्र सरकारने असा निर्णय घेतला,तुमचं मत काय?' अशा पद्धतीची विचारणा कुणीतरी करतं आणि त्यावर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडतो. यात एकमेकांना अर्वाच्य शिव्यासुद्धा दिल्या जातात. यात जणू काही 'आताच सगळे प्रश्न मिटतील' अशा प्रकारे बोललं जातं. पण असं काही होत नसतं. आता कोणतेही सरकार लोकांचं ऐकून घेत नाही. त्याला जसं हवं, तशीच मनमानी किंवा निर्णय घेतला जातो. त्यामुळे इथे फक्त आमच्या पक्षाचे कसे बरोबर ,सत्ताधारी लोकांचे कसे योग्य हेच ऐकायला मिळतं आणि हा निर्णय कसा चुकीचा, मनमानीचा हेच ऐकवलं जातं. कुणीही खोलवर चिंतन करत नाही, थोडासुद्धा कुणी विचार करत नाही. लगेच प्रतिक्रिया देऊन मोकळे होतात. यामुळे शांतपणे ऐकून घ्यायचे आणि मग वैचारिक प्रतिक्रिया द्यायची असले दिवस संपले आहेत. शिवाय आणखी एक महत्त्वाचे म्हणजे लोकांची सहनशीलता संपली आहे. लोकं लगेच शिव्या-शाप,हमरीतुमरीवर आणि हाणामारीवर येतात. त्यामुळे शहाण्यांनी गप्प बसणेच योग्य आहे, अशी भयानक परिस्थिती देशावर आली आहे. ही परिस्थिती देशाला फक्त गुलामगिरीकडे घेऊन जाणार आहे.राजकीय पक्ष, सत्ताधारी लोक उद्योजकांचे गुलाम आणि त्यांचे समर्थक पक्षांचे किंवा त्यांच्या पुढाऱ्यांचे गुलाम. साहजिकच आपल्या देशात पुन्हा साम्राज्यशाहीला दिवस चांगले आहेत, हेच दिसत आहे. निसर्गचक्रसुद्धा हेच सांगते. फक्त एवढेच की, केवळ सत्तर वर्षांचे स्वातंत्र्य उपभोगल्यावर पुन्हा लगेच आपण गुलामगिरीकडे जातो आहोत, हे चित्र मात्र भयानक आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment